Wednesday, June 6, 2018

ईशावास्य उपनिषद -२

सर्व काही परमात्मा आहे, ईश्वर आहे या घोषणेने शांतीमंत्रानंतर या उपनिषदाची सुरुवात होते. जीवनात जे काही घडते, आपण जे काही करतो ते ईश्वर इच्छेनेच होते असा या घोषणेचा अर्थ आहे.  या जगात जगत असूनही कर्माने लिप्त न होण्याची कला हे उपनिषद शिकविते आहे. माणसाने शंभर वर्षे आनंदाने कोठल्याही कर्माने लिप्त न होता जगावे असे हे उपनिषद सांगते. जर परमेश्वराच्या चरणी तुम्ही स्वत:ला पूर्ण अर्पण केलेत तर त्या भावनेने आपण जे कराल त्याने कर्माचे लेप अंगाला चिकटत नाहीत.
माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याच्या इंद्रियांना अनेक गोष्टींचा स्पर्श होतो. यावेळी तो आपल्या पूर्वस्मृतींच्याद्वारा या स्पर्शाला प्रतिसाद देतो. डोळ्यांनी काही गोष्टी पाहतो. त्यावेळी पूर्वी पाहिलेल्या अशाच गोष्टींच्या आठवणीने तो रागावतो अथवा दु:खी होतो. असेच अन्य ज्ञानेंद्रियांना झालेल्या स्पर्शाने घडते. यातूनच नवी कर्मबंधने निर्माण होतात. जोवर आपण या जगात आहोत तोवर हे असेच चालू राहील. पण इशावास्योपनिषद यातून मुक्तीचा मार्ग दाखविते.
'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व) यामुळे राग (लोभ), द्वेष आदी दोष माणसात येतात. त्यामुळेच कर्मबंधन माणसाला चिकटते आणि माणूस या जगात परत जन्म घेतो आणि 'भवचक्रात' अडकतो असे सर्वच उपनिषदांचे म्हणणे आहे. खरे तर 'माझे' ही भावना प्रथम निर्माण होऊन त्यातूनच 'मी' चा जन्म होतो. जर या 'माझे' असण्याचा आधारच काढून घेतला तर ममत्व निर्माण होणार नाही आणि पर्यायाने अहंकाराचा जन्म होणार नाही. जर या जगातील सर्व काही या ईश्वराने निर्माण केले आहे, त्याचेच आहे तर कोठलीही गोष्ट 'माझी' म्हणण्याला काहीच अर्थ रहात नाही. आणि मग कर्माचे लेपही बसणार नाहीत. इशावास्योपनिषाद हा अहंकारमुक्तीचा मार्ग दाखविते.
एकदा एक राजा रस्त्यावरून जात होता. त्याला एक गरीब माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस ते ओझे तसेच डोक्यावर घेऊन बसला होता. ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'राजाने मला रथात घेतले हेच खूप उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"
आपली अशीच अवस्था झालेली असते असे  ईशावास्य उपनिषदाला म्हणायचे आहे. परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे आपल्या चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे?
पुढील लेखात आपण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या पहिल्या श्लोकात आलेल्या महत्वाच्या सूत्राचा मागोवा घेऊ.




2 comments:

  1. उत्तम लेखन !

    ReplyDelete
  2. संतोषजी...

    निरुपण भावले.

    राजाने मला रथात घेतले हेच खूप उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"

    अतिशय योग्य उदाहरण !!!

    ReplyDelete