Thursday, January 2, 2020

चैतन्य

चैतन्य

चैतन्य या शब्दाला Consciousness हा इंग्रजी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. खरेतर  Consciousness हा शब्द इंग्रजीत अत्यंत ढिसाळपणे वापरला जातो. आपले विचार, बोलणे अशा अनेक कृतींनाही हाच शब्द वापरला जातो. परंतु भारतीय तत्वज्ञानात या शब्दाला नेमका अर्थ आहे. आपले बोलावे, वागणे, मनातील विचार इत्यादी गोष्टींना साक्षी असणारे जे असते त्याला चैतन्य असे म्हणतात. याचाच अर्थ चैतन्य हे कधीही एखाद्या वस्तूसारखे (Object) असू शकत नाही. आपण त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही.  जे अनुभव घेणारे आहे ते चैतन्य. म्हणूनच चैतन्याला 'निर्गुण' म्हटले आहे.

आज आधुनिक विज्ञान चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.  आजचे Materialistic आणि आपल्याकडील प्राचीन दर्शन 'चार्वाक दर्शन' मानणारे हे चैतन्याचा उगम शरीरात आहे असे मानतात. त्यादृष्टीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही चालू आहे.  मेंदूतील एखाद्या भाग हा चैतन्याचा स्रोत असावा असा त्यांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने त्यांच्या शोधाचा प्रयत्न चालू आहे.

पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशाप्रकारे हे वैज्ञानिक आपल्या शरीरातील चैतन्याचा स्रोत कदाचित शोधू शकतील. पण तो चैतन्याचा मूळ उगम नव्हे.  जर आपण एखाद्या खोलीत बसलो आहोत आणि तेथे दारातून माणसे जात-येत आहेत म्हणून माणसांचे उगमस्थान त्या खोलीचे दार असत नाही. केवळ त्या खोलीत येण्यासाठी ते दाराचा वापर करतात. चैतन्य हे अनादी आहे. आपल्या शरीरात कदाचित ते मेंदूच्या एका भागातून प्रवेश करीत असेल (तसेही अजून सिद्ध झालेले नाही).

कदाचित शास्त्रज्ञ मन-मेंदू यांच्या संबंधाचा शोध नजीकच्या काळात लावतीलही, परंतु चैतन्य समजून घेणे अजूनही शास्त्राच्या दृष्टीने खूपच लांबचा पल्ला आहे.  त्याताही ही शोध घेण्याची प्रक्रिया चैतन्याच्या परिक्षेत्रातच करावी लागते.  आपल्याला जी अनुभूती होते ती चैतन्यातच होते. त्यामुळे सर्व संशोधन हे चैतन्यातच होते.  म्हणूनच विज्ञानाला चैतन्य समाजणे अधिकच कठीण  किंबहुना अशक्य होते.

विज्ञान हे कार्यकारणभावाच्या (Logistical Reasoning) कक्षेत काम करते. कार्यकारण भाव हा स्थल-कालाच्या मर्यादेत काम करतो. कारण आधी घडते, त्याचे परिणाम नंतर घडतात.  चैतन्य हे आदिम आहे. ते स्थल-कालापलीकडे आहे.  काल आदिम नाही. तो विश्वाच्या जन्मापासून सुरु होतो- आधुनिक विज्ञानानुसार बिग बॅंग पासून सुरु होतो.  विश्वाच्या जन्माच्या आधीच्या गोष्टीचा विज्ञान विचार करू शकत नाही कारण ती स्थल-कालाची पर्यायाने विज्ञानाची मर्यादा आहे.  उपनिषदांच्या मते स्थल-काल हे मायेच्या क्षेत्रात येतात. 

चैतन्य ही संकल्पना अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. यापुढे अद्वैत वेदान्ताच्या विवेचनात या संकल्पनेची मदत वारंवार घेतली जाईल.