Saturday, December 10, 2022

माया-ब्रह्म

 मायेच्या पांघरुणासंबंधी लिहिण्याचे मी आश्वासन दिले होते. प्रथमदर्शनी 'मायेचे पांघरूण' ही काहीशी गूढ संकल्पना वाटते. पण त्यासंबंधी जाणून घेतल्यावर तो आपला नित्याचा अनुभव आहे हे लक्षात येते.  अद्वैत वेदांत कोणत्याही गूढ गोष्टी सांगत नाही. आपल्या रोजच्या अनुभवांचे विश्लेषण करते. मायेच्या पांघरुणासंबंधी आणि त्यातून ब्रह्म कसे डोकावत असते हे समजण्यासाठी आपण प्रथम ब्रह्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. 

'सत्-चित्-आनन्द' हे ब्रह्माचे त्रिगुण स्वरूप आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीत (Object) हे गुण आपल्याला ओळखता येतात. सत् ची ओळख करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. 

सोन्याचा दागिना हा मुलत: केवळ सोने आहे. या दागिन्यातून काही पद्धतीने सोने काढून घेतले तर तो दागिना राहणार नाही. जर ते सोने वितळले तर तो दागिना राहणार नाही. त्या सोन्यापासून अन्य दागिनेही घडविता येतील. म्हणजेच दागिना नष्ट केला तरी सोने तसेच राहाते. म्हणजेच सोन्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याला एक रूप दिलेले आहे आणि एक नाव दिलेले आहे. वस्तूत: ते केवळ सोने आहे. तसेच मातीचा घट ही केवळ माती आहे. मातीला उपयोगासाठी एक रूप दिलेले आहे आणि नाव दिलेले आहे. समुद्रातील लाट ही केवळ समुद्राचे पाणी आहे. तिच्या त्या रुपाला आपण 'लाट' असे संबोधतो. त्यातून पाणी काढले तर त्या लाटेला अस्तित्व उरणार नाही. परंतु ती लाट फुटल्यावर पाणी तसेच राहाते. 

तसेच हे विश्व म्हणजे केवळ 'सत्' म्हणजे अस्तित्व आहे.  विश्वातील प्रत्येक गोष्ट (Object) म्हणजे अस्तित्वाला दिलेले नाम-रूप आहे. त्या गोष्टींतू अस्तित्व काढून घेतले तर ती वस्तू राहणार नाही. ही गोष्ट प्रथमदर्शनी विचित्र (Absurd) वाटते. कारण प्रत्येक गोष्टीचा 'अस्तित्व' हा गुण आपण गृहीतच धरलेला असतो.

या वस्तूला 'अस्तित्व' हा गुण आपणच प्रदान केलेला असतो.  विस्तवावर एक भांडे ठेवले आहे. त्यात पाणी आहे आणि त्या पाण्यात काही बटाटे उकडत ठेवले आहेत. बटाटे आता गरम झाले आहेत. बटाट्यामधील उष्णता हा बटाट्याचा अंगभूत (Intransic Property) गुणधर्म नाही. हा गुणधर्म बटाट्याने पाण्याकडून उधार (Incidental Property) घेतला आहे. बटाटा गरम पाण्यातून बाहेर काढला तर थोड्याच वेळात थंड होईल. बटाट्याचा आकार आणि वस्तुमान मात्र त्याचा अंगभूत गुणधर्म आहे. तसेच भांड्यातील पाण्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. पाण्याने ती उष्णता भांड्याकडून घेतली आहे. पाण्याचा आकारही पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. पाण्याचे वस्तुमान हा मात्र पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. विस्तवावर ठेवलेल्या भांड्याचाही उष्णता हा मूलभूत गुणधर्म नाही. त्याने तो अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हा भांड्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अग्नीचा मात्र उष्णता हा मूलभूत गुणधर्म आहे. उष्णता काढून घेतली तर अग्नी राहणार नाही. 

तसेच अस्तित्व हा गुण प्रत्येक गोष्टीला आपणच प्रदान केलेला असतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना ती वस्तू जाणवते म्हणून ती तेथे असते. अन्यथा ती वस्तू तेथे आहे असे आपण केवळ तर्काने सांगू शकतो.  त्या वस्तूचे अस्तित्व केवळ आपल्या अस्तित्वाच्या परिक्षेत्रात असते.  अस्तित्व हा आपला म्हणजेच ब्रह्माचा मूलभूत गुण आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट हा गुण आपल्याकडून उधार घेत असते. 

आता ब्रह्माच्या दुसऱ्या गुणांचा म्हणजेच चित् या गुणाचा विचार करू. चित् म्हणजे चैतन्य. चैतन्य हे विश्वात सगळीकडे भरलेले आहे. खरे तर 'भरलेले' हा शब्दच चुकीचा आहे. विश्व म्हणजे एखाद्या भांड्यासारखे असून त्यात चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे असा त्याचा अर्थ नाही. हे विश्व म्हणजे मूलभूत चैतन्यच आहे असा याचा अर्थ आहे.  आपण स्वप्न बघतो. स्वप्नातील विश्व आपल्यापुढे आकार घेते. स्वप्नाच्या पातळीवर त्या विश्वातील सर्व घटना 'सत्य' असतात. हे स्वप्न आपल्या 'मनात' घडत असते. स्वप्नाला कच्चा माल आपले मन पुरवीत असते. म्हणजेच स्वप्नातील विश्व हे आपले केवळ मन असते.  तसेच आपले जागृतीतील विश्व चैतन्यात आकार घेत असते. या विश्वातील सर्व दृश्ये, गोष्टी (Objects) यांचा कच्चा माल (Raw Material) केवळ आपले चैतन्य असते.  मग आपल्याला हे चैतन्य सर्व गोष्टीत जाणवत का नाही? आकाशात सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो. पण अवकाशात गेले की सर्वत्र अंधार पसरलेला दिसतो. मात्र एखादी वस्तू या  प्रकाशाच्या वाटेत आली तर त्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित होतो आणि आपल्याला प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. म्हणजेच प्रकाशाचे अस्तित्व जाणण्यासाठी एखादी वस्तू तेथे असणे आवश्यक आहे. तद्वतच चैतन्याचे अस्तित्व जाणण्यासाठी तेथे सजीव वास्तूचे अस्तित्व आवश्यक आहे.  एखादी सजीव वस्तू असेल तर तेथे चैतन्य प्रकट होते, आपल्याला ते जाणवते. 

'आनंद' हा ब्रह्माचा तिसरा गुण. ब्रह्माचा अनुभव झाल्यावर सर्व चिंता नाहीशा होतात. आनंदाचे झरे फुटतात. 

अशा या 'सत्-चित्-आनन्द' रुपी ब्रह्मावर मायेने पांघरूण टाकले आहे. माया ही ब्रह्माचीच एक शक्ती आहे. या शक्तीत 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. आवरणशक्ती ब्रह्मावर आवरण टाकते. यातुन ती ब्रह्माला झाकून टाकण्याचा प्रयत्न करते. (परंतु ब्रह्म पूर्णपणे झाकले जात नाही). विक्षेपशक्ती ब्रह्माच्या ठिकाणी अन्य काहीतरी आहे असा आभास निर्माण करते. अंधाऱ्या खोलीत दोर (रज्जू) पडलेला आहे. अंधारामुळे आपल्या सापाच्या खऱ्या स्वरूपाचा बोध होत नाही. मात्र तेथे साप (सर्प) असल्याचा भास होतो. तसेच हे आहे. आपल्यासमोर मातीचे भांडे (घट) ठेवले असता खरे तर केवळ घटाचा आकार दिलेली माती ठेवलेली असते. अन्य काहीही नसते. या मातीला घटाचे रूप दिलेले असते आणि त्या रुपाला 'घट' असे नाव दिलेले असते. त्याकडे बघताना आपण मातीकडे बघत आहोत हे आपल्या झटकन लक्षात येत नाही. हीच ती आवरणशक्ती. आपले त्या मातीच्या रुपाकडे लक्ष जाते आणि आपण त्याला 'घट' असे संबोधतो. हीच ती विक्षेपशक्ती. या विश्वातील विविध गोष्टींकडे बघताना त्या गोष्टींचे  'सत्-चित्-आनन्द' असे ब्रह्मस्वरूप आपल्या झटकन लक्षात येत नाही. आपण त्या गोष्टींच्या नाम-रूपातच अडकतो. यालाच 'मायेचे पांघरूण' असे म्हणतात. अर्थात या सर्व गोष्टींतून  'सत्-चित्-आनन्द'रुपी ब्रह्म डोकावत असतेच. आपण ध्यानपूर्वक पाहिले तर ते लक्षात येते. 

माझ्यात आणि आपण सर्वांच्यात या मायेच्या पांघरुणाआडून डोकावणाऱ्या ब्रह्माला ओळखण्याची क्षमता प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

Friday, December 9, 2022

भारतीय कालगणना- पंचांग व दिनदर्शिका ! ——- दा. कृ. सोमण

 भारतीय कालगणना- पंचांग व दिनदर्शिका !

——- दा. कृ. सोमण
( पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण मागील पन्नास वर्षे पंचांग - दिनदर्शिका तयार करीत आहेत. भारतीय पंचांगे तयार करण्यात कसा कसा चांगला बदल होत गेला ते या लेखात त्यांनी सांगितले आहे . सध्या भारतीय पंचांगे ही दृक् गणितावर आधारलेली आहेत. जसे आकाशात दिसते तसे पंचांगात दिलेले असते आणि जसे पंचांगात दिलेले असते तसेच आकाशात प्रत्यक्ष दिसते. सध्या पंचांगांबरोबरच ग्रेगोरियन वर्षारंभाप्रमाणे दिनदर्शिकाही प्रसिद्ध होतात. प्रत्येक इंग्रजी तारखेपाशी त्या त्या दिवसाचे पंचांग आणि सण-उत्सव दिलेले असतात.)
सण-उत्सव कशासाठी असतात ? असा प्रश्न काही लोक विचारतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य ! शरीराचे आरोग्य मुख्यत्वे करून आहारावर अवलंबून असते. ठराविक ऋतूत ठराविक आहार घेतला तर माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते. सणांप्रमाणे आपण आहार करतो. म्हणून ठराविक सण सण ठराविक ऋतूंमध्ये साजरे केले जातात. म्हणजे पहा. उपवासाचा श्रावण मास हा पावसाळयात येतो. पावसाळयात शरीराचे चलनवलन कमी होते, भूक कमी लागते. हलक्या आहाराची शरीराला आवश्यकता असते. थंडीमध्ये भूक जास्त लागते. शरीराला तेल-तुपाची जास्त आवश्यकता असते म्हणून दिवाळी, मकर संक्रातीसारखे सण थंडीत येतात. परंतू सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण आणि ऋतू यांची सांगड घालण्यासाठी आपल्या पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. परंतू कधीकधी एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्रमहिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास धरला जातो. या नियमाप्रमाणे पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येणार आहे.
उत्सवांमध्ये आप्तेष्ट-मित्रमंडळी एकत्र येत असतात. त्यामुळे आपणास आनंद प्राप्त होतो. दु:ख- चिंता आपण विसरून जातो. मनाचे आरोग्य उत्सवांमुळे चांगले राहते. तसेच देव-देवतांचे आदर्श गुण आपल्या अंगी यावेत यासाठी त्यांची जयंती आपण साजरी करीत असतो. त्यांचे पूजन करीत असतो. समाजातील गरीबांना मदत व्हावी यासाठी आपल्या कमाईतून दान करण्यास सांगितले आहे. पाप-पुण्याची व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकारामानी सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य ! पंचांग म्हणे फलज्योतिष नव्हे ! पंचांग म्हणजे खगोल गणिताने सिद्ध केलेले आकाशाचे वेळापत्रक आहे म्हणून पंचांग आणि सण-उत्सव या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहायला पाहिजे.
पंचांगातील दृक् गणित
समजा पंचांग- दिनदर्शिकेत एखाद्या दिवशी ग्रहण दिसेल असे लिहीलेले आहे आणि प्रत्यक्ष आकाशात ते त्या दिवशी दिसले नाही तर काय होईल ? अमावास्येनंतर अमुक दिवशी नूतन चंद्रकोर दिसेल असे लिहीलेले आहे आणि ती दिसली नाही तर काय होईल ? अमुक दिवशी दोन ग्रहांची युती होईल असे लिहीले आहे आणि त्या दिवशी ती युती आकाशात दिसली नाही तर काय होईल ? तुमचा पंचांग दिनदर्शिकेवरचा विश्वास उडेल ना ? नेमकी असेच आपल्या पंचांग - दिनदर्शिकांच्या बाबतीत होणार होते. परंतू तसे ते झाले नाही. सध्या जसे पंचांग- दिनदर्शिकेत दिलेले असते तसेच आकाशात दिसते आणि जसे आकाशात घडते तसेच पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. याला कारणीभूत आहेत श्री. गणेश दैवज्ञ आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! या दोन विद्वानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आत्ताच्या पंचांग-दिनदर्शिका या दृक् गणितानुसार तयार केल्या जात आहेत.
प्रथम आपण पंचांग म्हणजे काय ते पाहूया. (१) तिथी (२) वार (३) नक्षत्र (४) योग आणि (५) करण या पाच गोष्टी यामध्ये प्रामुख्याने दिलेल्या असतात म्हणून याला ‘ पंचांग ‘ म्हणतात. दिनदर्शिकेत पंचांगातील माहिती ही ग्रेगोरियन म्हणजे इंग्रजी तारखेनुसार दिलेल्या असतात. पंचांग अगोदर तयार केले जाते आणि त्यावरूनच दिनदर्शिका तयार केली जाते. परंतू कालगणनेमध्ये या पाच गोष्टी एकदम प्रचारात आलेल्या नाहीत. कालगणनेत ‘तिथी ‘ या इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या. ‘वार ‘ हे इसवीसनपूर्व १००० वर्षांपासून प्रचारात आले. भारतीयांना नक्षत्राचे ज्ञान इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपासून होते. कालगणनेत ‘ नक्षत्रांचा ‘वापर इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या असे काही संशोधकांचे मत आहे. कालगणनेत ‘ योग ‘ हे उशीरा म्हणजे इसवीसन ७०० वर्षांनंतरच प्रचारात आले.’ करण ‘ कालगणनेत इसवीसनपूर्व १५०० पासून प्रचारात आले असे ‘ भारतीय ज्योति:शास्त्राचा इतिहास ‘ या ग्रंथाचे लेखक ज्योतिर्विद् शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी सांगितले आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षांत आली असेल प्राचीनकाळी पंचांग हे पाच अंगांची माहिती देणारे नव्हते. ते एकांग, द्व्यंग, त्र्यंग आणि चतुरंगही होते . मेषादी राशी भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचारात आल्या. पंचांगाचे गणित ज्या ग्रंथांवरून करतात त्या ग्रंथाना ‘ करण ग्रंथ ‘ म्हणतात.
पूर्वी मुद्रणकला नव्हती, त्यावेळी करण ग्रंथांवरून हस्तलिखित पंचांग तयार करून ग्रहण, संक्रांत इत्यादी माहिती तोंडी करून दिली जात असे. दि. १६ मार्च १८४१ रोजी मुंबई येथून गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापलेले पहिले मराठी पंचांग प्रसिद्ध केले. या पहिल्या पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी तयार केले होते. त्या वर्षापासून दरवर्षी पंचांगे छापील रूपात प्रसिद्ध होऊ लागली.
पंचांग म्हणजे खगोलगणित
पंचांग म्हणजे खगोल गणित ! चांद्र महिने आणि आकाश याचा कसा संबंध आहे तो पहा. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आपणास दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. वैशाख महिन्यात विशाखा, ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा, आषाढ महिन्यात पूर्वाषाढा, श्रावण महिन्यात श्रवण, भाद्रपद महिन्यात पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यात अश्विनी, कार्तिक महिन्यात कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यात मृगशीर्ष, पौष महिन्यात पुष्य, माघ महिन्यात मघा आणि फाल्गुन महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या त्या नक्षत्रात असतो. असे जानेवारी, फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यांचे नसते.
भारतात पंचांगामुळे खगोलगणित संशोधनात आणि खगोलगणित संशोधनामुळे पंचांगात सुधारणा होत गेल्या हे खूप महत्वाचे आहे. ठराविक ऋतूमध्ये ठराविक धार्मिक विधींचे पालन करावे हा मूळ उद्देश आहे. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून अगदी पहिल्यापासून भारतीय पंचांग हे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले आहे. विशेष म्हणजे भारतीय कालगणनेत वसंत संपात बिंदूला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्या ग्रंथावरून पंचांगाचे गणित करतात त्या ग्रंथाला ‘ करणग्रंथ ‘ असे म्हणतात.
पंचांग विकासाचे तीन प्रमुख टप्पे मानले जातात.
(१) वैदिक कालखंड - अज्ञात भूतकाळापासून इ. सन पूर्व १५०० पर्यंतचा काळ. या काळात ऋग्वेद, संहिता, ब्राह्मण ग्रंथ लिहीले गेले. वेदांमध्ये वर्ष सौर आहे. महिने चांद्र आहेत. एका वर्षाचे ३६० दिवस व त्यांची १२ महिन्यात विभागणी करण्यात आली होती. चांद्र महिन्यांना त्या काळी मधू, माधव, शुक, शुची, नभ, नभस्य, ईश, ऊर्जा , सहस, सहस्य, तपस्, तपस्य अशी नांवे होती. उत्तरायण आणि दक्षिणायन अशी दोन अयने, सहा ऋतू व क्रांतीवृत्तावरील २७ नक्षत्रे निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी पंचांग चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले होते.अधिक महिना ( म्हणजे इंटर कॅलरी मंथ ) घेऊन ऋतूशी सांगड घालण्यात येत होती. त्याकाळी वर्षारंभ वसंत संपात बिंदूपासूनच होत असे. यज्ञयागादी धार्मिक विधी अवष्टंभ बिंदूवर ( विंटर सोल्स्टाइस ) केले जात असत. त्याकाळी वसंत संपात बिंदू कृत्तिका नक्षत्रात होता. म्हणून तैत्तिरिय संहितेत कृत्तिकेला पहिले स्थान देण्यात आले आहे. सध्या वसंतसंपात बिंदू उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे हे आपणास माहित असेलच.
(२) वेदांग ज्योतिष कालखंड- इ. सन पूर्व १५०० ते इ. सन ४०० पर्यंतचा हा काळ मानला जातो. इ.सन पूर्व १४०० वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वी लगध ऋषींनी ‘ वेदांग ज्योतिष ‘ या करणग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील गणितावरून लगध ऋषी हे काश्मीरमध्ये रहात होते असे दिसून येते. वेदांग ज्योतिषाच्या दोन संहिता उपलब्ध आहेत. ऋक् ज्योतिष म्हणजे ऋग्वेदीय वेदांग ज्योतिष आणि याजुष ज्योतिष म्हणजे यजुर्वेदीय वेदांग ज्योतिष. ऋग्वेदीय वेदांग ज्योतिषात ३६ श्लोक आहेत. यजुर्वेदीय वेदांग ज्योतिषात ४४ श्लोक आहेत त्यापैकी ३० श्लोक हे ऋक् ज्योतिषाप्रमाणेच आहेत. यामध्ये सूर्य अवष्टंभ बिंदूत ( म्हणजे विंटर सोल्स्टाइस) प्रवेश करतो असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे अनेक पाश्चात्य विद्वानांना या ग्रंथाविषयी आश्चर्य वाटले. अनेक संशोधकांनी वेदांग ज्योतिषामधील श्लोकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांनी वेदांग ज्योतिष संहितेचे विशेष संशोधन करून दोन भागात ग्रंथ लिहिला. पाश्चात्य पंडितानी लावलेल्या अर्थात त्रुटी आहेत हे त्यांना समजावे यासाठी हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. वेदांग ज्योतिषात युग पाच वर्षांचे मानले आहे. एका युगात १८३० सावन दिवस व १८६० तिथी मानल्या जात. एका युगात ६० सौरमास व ६२ चांद्रमास असत. पाच वर्षात दोन अधिकमास येत. वेदांग ज्योतिष हा करणग्रंथ अभ्यासकांना आजही उपलब्ध आहे.
(३) सिद्धांत ज्योतिष कालखंड - या कालखंड इ. सन ४०० पासून आधुनिक काळापर्यत मानला जातो. या कालखंडामध्ये सन ४९९ मध्ये आर्यभट यांचा ‘ आर्यभटीय ‘ आणि वराहमिहीर यांचा ‘ पंचसिद्धांतिका ‘ हे ग्रंथ निर्माण झाले. त्यानंतर ‘ सूर्यसिद्धांत ‘ हा करणग्रंथ प्रचारात आला. या ग्रंथाचा कर्ता मात्र अज्ञात आहे. काही संशोधकांच्या मते हा लाटकृत असावा. काहीना या ग्रंथकर्त्याचे नाव सूर्य असावे असे वाटते. सूर्यसिद्धांत हा करणग्रंथ सन ४७५ मधील असावा. या ग्रंथात १४ प्रकरणे असून ५०० श्लोक आहेत. ग्रहगती, चंद्र-सूर्याची ग्रहणे, चंद्रसूर्याचे उदयास्त यांची गणिते या ग्रंथात आहेत. आजही हा ग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. या करणग्रंथावरून तयार केल्या जाणार्या पंचांगांना ‘ सूर्यसिद्धांतीय पंचांगे ‘ म्हणून ओळखले जाई.
विशेष म्हणजे सुमारे एक हजार वर्षे या करणग्रंथावरून पंचांगे तयार केली जात. गंमत म्हणजे या करणग्रंथावरून केलेल्या पंचाग गणित आणि प्रत्यक्ष आकाश याविषयी कुणीही पडताळणी केलेली नसावी. किंवा पंचांगकर्ते या ग्रंथावरून केलेल्या गणितात वैयक्तिक अनुभवातून बदल करीत असावेत. सूर्यसिद्धांत ग्रंथावरून केलेले गणित आहेना, तेच खरे ! प्रत्यक्ष आकाशात काहीही होवो अशी मानसिकता देखील झाली असावी.
गणेश दैवज्ञांचे कार्य
सूर्यसिध्दांत करणग्रंथावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांची फारकत होतच राहिली. महाराष्ट्रातील कोकणात मुरुड- जंजिरा जवळ ‘ नांदगाव ‘ नावाचे एक गाव आहे. तेथे एक सिद्धिविनायक मंदिरही आहे. तेथे केशव दैवज्ञ नावाचे एक विद्वान पंडित रहात होते. ते सिद्धिविनायक मंदिरात रोज श्रीगणेशाची पूजा करीत असत. तसेच ते सूर्यसिद्धांत ग्रंथावरून पंचांग तयार करून गावात सांगत. त्यांनी पंचांगगणिताचा ‘ ग्रहकौतुक ‘हा करणग्रंथ आणि मुहूर्तशास्त्रावर ‘ मुहूर्ततत्त्व ‘ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या लक्षात आले की सूर्यसिद्धांतावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यात फरक पडत आहे. केशव दैवज्ञ यांचा मुलगा गणेश दैवज्ञ याने सूर्यसिद्धांत करणग्रंथाचा सखोल अभ्यास केला. तसेच आकाशातील ग्रहगोलांचे प्रत्यक्ष वेध घेतले. त्याने सूर्यसिद्धांत करणग्रंथावर संस्कार करून म्हणजेच त्या गणितात काही बदल करून सन १५२० मध्ये दृकप्रत्ययतुल्य गणित देणारा ‘ ग्रहलाघव ‘ हा करणग्रंथ लिहिला. ग्रहलाघव प्रमाणे तयार होणारे पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांचे नाते जुळून आले. त्रिकोणमिती ऐवजी ११ वर्षीय चक्रावरून गणित करण्याची अभिनव युक्ती त्याने शोधून काढली. गणेश दैवज्ञांनी एकूण १४ ग्रंथ लिहिले आहेत. ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित आकाशाशी जुळू लागल्याने भारतातील अनेक पंचांगकर्त्यांनी आपापली पंचांगे तयार करण्यासाठी ‘ ग्रहलाघव ‘ ग्रंथ वापरायला सुरुवात केली.ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेल्या पंचांगाला लोक ‘ ग्रहलाघवीय पंचांग ‘ म्हणून संबोधू लागले. लोकांची या ग्रंथावर श्रद्धा बसली.
लोकमान्य टिळकांचे कार्य !
सुमारे ४०० वर्षानी ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले पंचांग व प्रत्यक्ष आकाश यात यात फरक पडू लागला. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली होती. पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यामध्ये फरक पडता कामा नये असे त्यांना वाटत होते. खगोलगणित हे नेहमी अद्ययावत करावे लागते. गतीमध्ये होणार्या बदलांमुळे ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित चुकते हे लोकमान्य टिळकांना समजले होते. परंतू बरीच मंडळी ग्रहलाघव सारखे जुने परंपरागत ग्रंथ सोडायला तयार नव्हती. भारतात वेधशाळा हवी. त्यावरून ग्रहगोलांचे अचूक वेध घेऊन नव्याने दृक् गणित देणारे करणग्रंथ तयार करायला हवेत असे लोकमान्यांना वाटत होते. तसे त्यांनी अनेकांजवळ बोलूनही दाखविले होते.
शेवटी लोकमान्यांनी पंचांगकर्त्यांना व लोकांना पटवून देण्यासाठी पंचांग संमेलने घेतली. पहिले अधिवेशन सन १९०४ मध्ये मुंबईत झाले.या संमेलनाचे अध्यक्ष श्रीशंकराचार्य होते. परंतू दृक् गणित स्वीकारायला लोकांची तयारी नव्हती. ग्रहलाघवीय पंचांगेच हवीत असे लोकांचे मत झाले. पंचांगात दृक् गणित आणि अयनांशात एकवाक्यता यावी यासाठी १९१७ साली पुणे येथे दुसरे ज्योतिष अधिवेशन झाले. त्यावेळी अयनांशाबाबत एकमत होऊ शकले नाही.विशेष समाधानाची गोष्ट म्हणजे सन १९२० मध्ये सांगली येथील अधिवेशनात लोकमान्यांच्या प्रयत्नांना यश आले. पंचांगे ही दृक् गणितावरच आधारित हवीत असा ठराव मंजूर करण्यात आला.
मात्र त्यासाठी दृक् गणिताचा भारतीय करणग्रंथ निर्माण होण्याची गरज होती. वेंकटेश बापूजी केतकरांसारखे गणिती त्यासाठी तयार होते. सन १९२० मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली. ‘ जो कोणी दृक् गणिताचा करणग्रंथ लिहून देईल त्यास एक हजार रुपये बक्षीस मिळेल ‘ असे त्या जाहिरातीत छापले होते. लोकमान्यांनी प्रथम ज्योतिर्गणिती वेंकटेश बापूजी केतकर यांना विचारले. परंतू ते चित्रापक्षाचे आग्रही होते. शेवटी नागपूरचे डाॅ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांनी दृक् गणित देणारा ‘ करणकल्पलता ‘ हा करणग्रंथ लिहिला. हा ग्रंथ दोन भागात असून तो मराठी व संस्कृतमध्ये आहे. या ग्रंथावरून केलेल्या गणिताप्रमाणेच आकाश दिसते. लोकमान्यांचे पंचांगातील दृक् गणिताचे स्वप्न साकार झाले. हा ग्रंथ सन १९२४ मध्ये प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने १ आॅगस्ट १९२० रोजी लोकमान्यांचे दु:खद निधन झाले. स्थूल गणिताचा ग्रहलाघव हा ग्रंथ सोडून अनेक पंचांगकर्ते करणकल्पलता करणग्रंथावरून आपापली पंचांगे तयार करू लागले. महाराष्ट्रातील सर्व पंचांगकर्त्यांनी शके १८७२ ( सन १९५०-५१ ) पासून दृक् गणित स्वीकारले. याचे सर्व श्रेय लोकमान्य टिळकांच्या अथक मेहनतीस जाते.
आकाश दर्शनासाठी !
आता आपण पंचांग-दिनदर्शिकांचा आकाशदर्शनासाठी कसा उपयोग करायचा ते पाहूया. चंद्रमहिन्यांच्या नावावरून रात्रीच्या प्रारंभी कोणते नक्षत्र पूर्व आकाशात दिसेल ते समजते. चैत्र महिन्यात चित्रा वगैरे ! तिथीवरून चंद्राची स्थिती कळते. शुक्ल अष्टमीला सूर्यास्ताच्यावेळी चंद्र मध्य आकाशापाशी असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सूर्यास्ताच्यावेळी उगवतो. कृष्ण अष्टमीला चंद्र सूर्यास्तानंतर साधारण सहा तासांनी उगवतो. चंद्रप्रकाशाचा आकाशदर्शनात अडथळा होऊ नये म्हणून तिथी म्हणजेच चंद्राची स्थिती माहीत असणे आवश्यक आहे.
दररोज चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे ते पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. त्यावरून नक्षत्रज्ञान आपणास होऊ शकते. चंद्रग्रहणे व सूर्यग्रहणे याविषयी माहिती पंचांगात दिलेली असते. त्याप्रमाणे ग्रहणांचे खगोलप्रेमीना निरीक्षण करता येते. ग्रह सूर्याच्या जवळ आला की सूर्यप्रकाशामुळे आपणास दिसत नाही. ग्रहांच्या लोप-दर्शनांचे दिवस पंचांग दिनदर्शिकेत दिलेले असतात. पंचांगात दिलेल्या लग्न कोष्टकात वर्षभरात कोणत्याही वेळी पूर्व क्षितिजावर कोणती राशी उगवत असते ते दिलेले असते. तसेच प्रत्येक ग्रह कोणत्या राशीत आहे ही माहिती दिलेली असते. त्यावरून कोणता ग्रह कुठे दिसेल तेही समजू शकते. पंचांग -दिनदर्शिकेत ग्रह , तारका आणि चंद्र यांच्या युतींचे दिवस दिलेले असतात. या युत्या त्या त्या दिवशी निरीक्षण करणे खगोलअभ्यासकांना त्यामुळे शक्य होते.
काही पंचांगात उल्कावर्षावांच्या तारखाही दिलेल्या असतात. तसेच कोणत्या महिन्यात आकाशात काय दिसेल याचीही माहिती दिलेली असते तीही खगोलप्रेमींना उपयुक्त असते.
पंचांग-दिनदर्शिका म्हणजे आकाशाचे वेळापत्रक ! हे वर्षभराचे आकाशाचे वेळापत्रक तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात पंचांग- दिनदर्शिकेच्या स्वरूपात असतेच परंतू त्याचा उपयोग कसा करायचा हे आपणास माहीत नसते. ती माहिती जर आपण करून घेतली तर दूरवर असणारे आकाश नक्कीच आपल्याजवळ येईल.
पंचांग सुधारणा
पंचांगात पूर्वी सर्व वेळा या घटिकापळात देण्यात येत होत्या. आपण सर्वजण भारतीय प्रमाणवेळ दाखविणारी घड्याळे वापरतो. लोकाना समजायला सुलभ व्हावे म्हणून पंचांगातही तशीच भारतीय प्रमाणवेळ देण्यात येऊ लागली. संपूर्ण भारतात अनेक पंचांगे प्रसिद्ध होत असतात. पूर्वी पंचांगे प्रसिद्ध झाल्यावर मतभिन्नतेवर वृत्तपत्रातून बातम्या येत होत्या. आता महाराष्ट्रातील पंचांगे प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व पंचांगकर्त्यांची बैठक होते. काही मतभिन्नता असेल तर चर्चा होते. नंतर पंचांगे प्रसिद्ध होतात. महाराष्ट्रात निर्णयसागर, दाते, कालनिर्णय, रूईकर, लाटकर, राजंदेकर, ढवळे, जन्मभूमी, बम्बई समाचार इत्यादी प्रमुख पंचांगे प्रसिद्ध होत असतात.
संपूर्ण भारतात प्रकाशित होणा-या पंचांगामध्ये अजुनही काही मतभेद आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना भारतातील सर्व पंचांगकर्त्यांची सभा नवी दिल्ली येथे बोलावण्यात आली होती. मी त्या सभेला उपस्थित होतो. परंतू विद्वान पंचांगकर्त्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. उत्तर भारतात चांद्रमास हे पूर्णिमांत धरले जातात. त्यांच्या पंचांगातील चांद्रमास हा कृष्ण प्रतिपदेपासून शुक्ल पौर्णिमेपर्यंत असतो. तर महाराष्ट्र व दक्षिण भारतात चांद्रमास अमांत असतो. तो शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येला संपतो. वर्षारंभाविषयी असेच आहे. काही राज्यांत चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ होतो तर काही राज्यांत कार्तिक शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ होतो. अनेक मतभिन्नता आहे. कोणीही माघार घ्यायला तयार नाही. कधी कधी एकच गोष्ट दोन प्राचीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिली असल्याने कोणता ग्रंथ प्रमाण मानायचा हा प्रश्न येतो. अजूनही भारतातील सर्व राज्यातील पंचांगांमध्ये सुसुत्रता येणे गरजेचे आहे. पंचांगकर्त्यांची स्वत:ची वेधशाळा असावी असे लोकमान्य टिळकांना वाटत होते.
पंचांगगणित हे दृक् गणित असल्याने यात मनभिन्नता होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सूर्यबिंबमध्य, चंद्रबिंबमध्य आणि पृथ्वीमध्य विचारात घेऊन तिथीचे गणित केलेले असते.
=====================

Tuesday, December 6, 2022

जन्म-पुनर्जन्म

 अद्वैत तत्वज्ञानानुसार मृत्यूनंतर माणसाचे चैतन्य (म्हणजे आपण) कोठेही जात नाही. कारण मुळात चैतन्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच आपल्याला पुनर्जन्म नाही. जर जन्मच नसेल तर पुनर्जन्म कसा असेल?

चैतन्याची मनात पडलेली प्रतिमा आपल्या अंत:करणाच्या अहंकार भागाशी तादात्म्य पावते आणि आपल्या चेतासंस्थेमार्फत सर्व शरीरात पसरते. ही चैतन्याची प्रतिमा चेतासंस्थेमार्फत देहात पसरत असल्याने आपल्याला आपला देह चैतन्यमय जाणवतो. ही प्रतिमा अंत:करणाच्या 'अहंकार' या भागाशी तादात्म्य पावत असल्याने आपल्याला ही चैतन्याची प्रतिमा म्हणजे 'आपला' आत्मा वाटते. एखाद्या स्वच्छ लोलकाशेजारी लाल जास्वदांचे फुल ठेवले तर लोलकाचा रंग लाल भासतो (याला शास्त्रात 'उपाधी' असे नाव आहे). खरे तर लोलक रंगहीनच असतो. परंतु लाल फुलाच्या सानिध्यामुळे तो लाल आहे असे भासते. तद्वतच मनाच्या सानिध्यामुळे मनात येत असलेल्या भावना - राग, लोभ, सुख, दु:ख - या आपल्या चैतन्यात उगम पावल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर त्या रंगहीन लोलकासारखे आपले चैतन्य निरंजन असते- त्यावर कोठलाही परिणाम झालेला नसतो. आपण म्हणजे आपले चैतन्य निर्विकारच असते.
आपल्या देहाच्या मृत्यूनंतर आपले सूक्ष्म शरीर अन्य देहात जाते. सूक्ष्म शरीर हे एकोणीस घटकांचे बनलेले असते. पाच ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ) शक्ती, पाच कर्मेंद्रियांच्या (तोंड, पाय, हात, गुदद्वार, लैगिक इंद्रिये) शक्ती, पंचप्राण (प्राण, आपण, समान, उदान, व्यान), अंत:करणाचे चार भाग (मन, बुद्धी, अहंकार, चित्त) असे हे एकोणीस घटक आहेत. अंत:करणाच्या चार भागांसोबत आपण मिळवलेले ज्ञान, आपल्या वासना, कर्मे इत्यादी पुढील जन्मात जातात. मात्र आपण - म्हणजेच आपले चैतन्य कोठेही जात नाही. जसे एखादे स्वप्न आपल्या मनात घडते तसे हे जन्म आणि पुनर्जन्म आपल्या चैतन्यातच घडत असतात. जसे झोपेतून उठल्यावर (जागृतावस्थेची जाणीव झाल्यावर)आपले स्वप्न संपते तसेच आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची -तुर्यावस्थेची-जाणीव झाल्यावर हे आपल्या सूक्ष्म देहाचे जन्म-पुनर्जन्माचे रहाटगाडे थांबते.
मला आणि आपणा सर्वांना या जन्मातच आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, December 5, 2022

अनंत : अद्वैत वेदांताची संकल्पना

 वेदांतानुसार आपण अनंत आहोत. मात्र मायेच्या प्रभावामुळे आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. 

ही  बद्धता तीन प्रकारची असते. 

१> एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तर ती अन्य ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणजेच त्या वस्तूला स्थलाचे (space) बंधन आहे.  आपण आता आपल्या घरी आहोत, म्हणजेच अन्य ठिकाणी असणार नाही, रस्त्यावर असणार नाही. याला प्राचीन भाषेत 'देशपरिच्छेद:' असे म्हणतात. परिच्छेदाचा शब्दश: अर्थ 'कापणे' आहे. या अवकाशाचे विभाजन केले तर या ठिकाणी तुम्ही आहात. (किंवा तुमच्यामुळे या अवकाशाचे विभाजन झालेले आहे). जे देशापरिच्छेद करत नाही म्हणजेच एकाचवेळी सर्वठिकाणी असते (Omnipresent) त्याला 'देशापरिच्छेदशून्य' असे म्हणतात. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे  देशापरिच्छेदशून्य आहे.. 

२> दुसऱ्या प्रकारची बद्धता हे काळासंदर्भात असते. प्रत्येक वस्तू ही काही ठराविक काळातच अस्तित्वात असते. लहान कीटक काही काळ अस्तित्वात असतात, मानव कदाचित शंभर वर्षे  अथवा त्याच्या आसपासच्या काळापर्यंत अस्तित्वात राहू शकेल, तारे कदाचित काही कोटी वर्षे अस्तित्वात राहू शकतील. पण याला काही मर्यादा आहे. याला प्राचीन भाषेत 'कालपरिच्छेद:' असे म्हटले आहे. बुद्धाच्या मते ज्याची सुरुवात आहे त्याला अंतही आहे. जे कालाचे विभाजन करीत नाही, म्हणजेच अनंत काल उपलब्ध होते आणि राहणार आहे त्याला कालपरिच्छेदशून्य (Omnipresent) असे म्हटले आहे. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे कालपरिच्छेदशून्य आहे. 

३> तिसरी बध्दता ही नाम-रूपासंबंधी (Object) आहे.  एखादी वस्तू ही ती वस्तूच आहे आणि अन्य काहीही नाही. हे म्हणजे एखाद्या वस्तूला तिचे विशेषत्व देण्यासारखे आहे (Law of idendity). एखादी वस्तू 'अ' आहे याचाच अर्थ ती 'ब' 'क' इत्यादींपासून वेगळी आहे.  मी 'संतोष कारखानीस ' आहे याचाच अर्थ मी अन्य कोट्यवधी माणसांपासून वेगळा आहे.  मला - माझ्या या देहाला आधार कार्ड क्रमांक मिळाला की मी आपोआप अन्य देहांपासून वेगळा ओळखला जातो.  हा आहे 'वस्तूपरिच्छेद:'. एखादी गोष्ट वस्तुपरिचछेदशून्य असेल तर याचाच अर्थ अन्य कोठलीही गोष्ट या वस्तूपासून भिन्न नसेल. अर्थातच ही वस्तूपरिच्छेदशून्यता अद्वैताकडे निर्देश करते. 

म्हणजे जर एखादी गोष्ट या तीनही बध्दांतांच्या पलीकडे असेल तर ती स्थलातीत, कालातीत आणि अद्वैत असेल. हाच अद्वैत वेदांतानुसार 'अनंत' या शब्दाचा अर्थ आहे. जर एखादी गोष्ट अशी अनंत असेल तर तेथे दुसरी कोणतीही गोष्ट असणे शक्य नाही. ज्यावेळी आपल्याला आपल्या या अनंतस्वरूपाचा बोध होईल तेव्हा आपण या आयुष्यातील दु:खांच्या पलीकडे जाऊ. 

माझ्यासह आपणा सर्वांना आपल्या या अनंतस्वरूपाचा या जन्मताच बोध व्हावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना. 

Wednesday, October 12, 2022

लेणी

 ऐतिहासिक नाणेघाटला जाताय? तर आवश्य वाचाच.

मित्रांनो आपण जर जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते नाणेघाट प्रवास करत असाल तर आपण लेख आवश्य एकदा वाचा व खालील ऐतिहासिक वारसा क्रमानुसार नक्कीच पहायला विसरू नका.
१) *माणमोडी बौद्ध लेणी समूह.*
किल्ले शिवनेरी च्या पुर्वेस पुर्व- पश्चिम पसरलेल्या डोंगररांगेस माणमोडी डोंगर असुन या डोंगरात तीन लेणी समूह पहायला मिळतात.
१)अंबा अंबिका लेणी समूह
२) भिमाशंकर लेणी समूह
३)भूतलिंग लेणी - समूह हा जुन्नरच्या मानमोडी डोंगरात आहे . मानमोडी लेणी समूहातील लेण्यांपैकी लेणे क्र . 40 हे भूत लेणी चैत्यगृह असून हे जुन्नरमधील सर्वात देखणे दर्शनी भाग असलेले आहे . चैत्यकमानीवर पंचफणाधारी नागराज , मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे . या शिल्पांना स्थानिक लोक भुते , तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत . यावरून या लेण्यास ‘ भूत ' किंवा ' भूतलिंग ' असे नाव पडले असे म्हटले जाते .
२) *किल्ले शिवनेरी*
शिवनेर किंवा कुकडनेर या खोऱ्यामध्ये शिवनेरी हा प्राचीन किल्ला आहे . हा किल्ला महान मराठा राजा श्री. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे . याच्या पायथ्याला जुन्नर गाव आहे . या दुर्गावर शिवाई देवीचे मंदिर , गंगाजमना टाकं , शिवकुंज , शिवजन्मस्थान इमारत आणि तिन्ही बाजूंना कोरीव लेणी आहेत . संपूर्ण देशातून असंख्य शिवप्रेमी व पर्यटक दर्शनासाठी वर्षभर या किल्याला भेट देतात .
३) तुळजाभवानी बौद्ध लेणी समूह
जुन्नर शहरापासून पश्चिमेस ४कि.मी अंतरावर आपणास हा तुळजाभवानी लेणी समूह पहायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कोरलेला हा लेणी समूह असुन येथील १२ खांबावर तबकडीच्या आकाराची तरलेली लेणी ही विशिष्ट प्रकारची असुन ती इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही.
४) *किल्ले चावंड*
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील उत्कृष्ट कातळ अंड्यांची सुंदर भौगोलिक रचना असलेला अर्थात किल्ले चावंड हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर पुष्करणी, सरकारी वाडा, धान्य कोठार व पाण्याच्या टाक्या आहेत. सप्तमातृका टाक्या पाहुन किल्याचा काही आगळावेगळा इतिहास असावा असे वाटते. किल्यावर चावंडा देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , माणिकडोह धरण, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी आणि परीसराचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
५) *कुकडेश्वर मंदिर* Kukadeshwar Temple
कुकडेश्ववर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे . अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे . नवव्या शतकातील शिलाहारवंशीय झंझ राजाने हे मंदिर बांधले . या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो . चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले .
६) *ऐतिहासिक नाणेघाट*
नाणेघाट परिसर कोकणपट्टी आणि देश यांच्यामध्ये उभ्या असणाऱ्या सह्याद्रीतून माणसांची अन् वाणसामानाची ने - आण करण्यासाठी एका उत्तम घाटवाटेची निर्मिती सातवाहनांच्या साम्राज्याने नाणेघाटाच्या रुपात केली . या घाटमाथ्यावर ' नानाचा अंगठा ' नावाचा सुळका आहे . त्याला खेटूनच सुमारे ६० मी . लांबीचा अन् २ ते ५ मी . रुंदीचा नाणेघाट हा खोदीव नळीचा किंवा बोळीचा भाग आहे . त्याकाळच्या व्यापारी मालावर याठिकाणी जकात आकारली जात असे. त्यासाठी येथे लेण्या कोरलेल्या असुन त्याच लेणित २२०० वर्षांपूर्वी शिलाले कोरण्यात आला असून विविध दाणधर्माचा त्यात उल्लेख केला आहे व हाच शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
७) *किल्ले जीवधन* - वांदरलिंगी सुळका Jeevdhan Fort - Vandarlingi Pinnacle
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील मुकुटमणी अर्थात किल्ले जीवधन हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर गजलक्ष्मीचं शिल्प आहे . गावकरी याला कोठी असे संबोधतात . किल्यावर जीवाई देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , वांदरलिंगी सुळक्याचे व नाणेघाटाचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग आणि सुळका जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
संपूर्ण लेख हा copyright ©️ असुन आपण संपूर्ण माहिती व नावासहीतच प्रसारीत करू शकता.
लेख/ छायाचित्रे - श्री रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो. नं. ८३९०००८३७०

Sunday, September 4, 2022

माझे ठाणे

 १> इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार साम्राज्याच्या बिंब राजाने आपली राजधानी महिकावतीहून (केळवे माहीम) ठाण्याला हलविली. 

२> राजाने आपल्या हत्तींना पोहण्यासाठी तेथील तलाव खोदून मोठा केला. तोच सध्याचा मासुंदा तलाव. त्याच्या काठाशी असलेलया भव्य शिवमंदिरासमोर आपला राजवाडा बांधला. मासुंदा तलावाची हद्द पूर्वी (स्वातंत्र्याच्यावेळी) पूर्वेला कौपिनेश्वर मंदिरापासून पश्चिमेला हनुमान व्यायामशाळेपर्यंत आणि उत्तरेला मुंबई रस्त्यापासून दक्षिणेला मो.ह.विद्यालयापर्यंत होती. मुंबई रस्ता हा देवळांचा रस्ता होता. हा रस्ता प्राचीन काळापासून ठाणे बंदराला उत्तर भारताशी जोडणारा रस्ता होता. याच रस्त्यावर सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बसविला होता. स्वातंत्र्यानंतर मासुंदा  तलावाचा पूर्वेकडील भाग बुजवून तेथे उद्यान आणि शिवाजी पथ करण्यात आला. तसेच तलाव  काही प्रमाणात बुजवून तलावाच्या सर्व बाजूस रस्ता करण्यात आला. तसेच तलावाच्या मध्यभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. 

३> बिंब राजा शिवभक्त  असल्याने त्याने ठाण्यात साठ तलाव खोदून त्याकाठी शिवमंदिरे बांधून घेतली. तेव्हापासून ठाणे 'षष्टीस्थानाक' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ च्या सुमारास यातील अनेक तलाव महानगरपालिकेने बुजवून त्यावर रस्ते/बागा/इमारती बांधल्या. उदारणार्थ घंटाळी देवीच्या बाजूचे मैदान हा एक विस्तीर्ण तलाव (घंटाळी तलाव) होता. तो सहयोग मंदिरापर्यंत पसरलेला होता. आजचे रंगायतन आणि शिंदे तरणतलाव याच सुमारास तळे (मासुंदा तलाव) बुजवून बांधला गेला आहे. 

४> पोर्तुगीज राजवटीत मुंबई रस्त्यावरील देवळे पाडून त्यातील मूर्ती मासुंदा तलावात टाकून त्यावर 'सेंट जॉज चर्च' बांधण्यात आले. आजही मुंबई रस्त्यावरील घरांचे पुनर्बांधणी होताना जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती सापडतात. 

५> पहिल्या बाजीरावाचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी ठाणे-वसई यावरील पोर्तुगीज राजवट समाप्त करण्याचे ठरविले. तेव्हा ठाण्यातील येऊर येथील एका टेकडीवरून या किल्ल्याची आणि परिसराची पाहणी केली होती. आजही या ठिकाणावरून वसईचा किल्ला दिसतो. याच लढाईच्या वेळी मराठ्यांचे 'महागिरी' हे जहाज ठाण्याच्या खाडीत रुतून बसले. त्या भागाला नंतर महागिरी हेच नाव पडले. 

६> ठाण्याचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा एक भक्कम किल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ब्रिटिशांचे हातात आल्यावर त्याचा तुरुंग म्हणून वापर झाला. या किल्ल्याचे एक दार (त्या काळी) थेट खाडीत उघडत असल्याने या किल्ल्यातून अंदमानला नेले जाणारे कैदी नेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना याच किल्ल्यातून अंदमानला नेले होते. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांना याच किल्ल्यात इंग्रजांनी फाशी दिले होते. या किल्ल्यात आजही खतरनाक कैदी ठेवले जातात. 

७> ठाण्याचे मीठबंदर हे एके काळी अत्यंत नावाजलेले बंदर होते. येथून मुख्यतः: मीठाचा व्यापार चालत असे. ठाण्यातील घोडबंदर येथे अरबी घोडे उतरवून घेतले जात. घोडबंदर येथे एक किल्लाही आहे. 

८> ठाण्यातील मूळ जमात म्हणजे आगरी आणि कोळी. चेंदणी भागात कोळीवाडा आहे. तेथेच ठाण्याची मूळ ग्रामदेवता आहे.  बिंब राजाने राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यात प्राविण्य मिळविलेल्या काश्मीरमधील चिनाब नदीच्या (चांद्रशोणा) खोऱ्यातील कायस्थांना आणि गुजरातमधील पाठारेंना येथे आणले. त्यांना 'प्रभू' ही पदवी दिली. त्यातील कायस्थ (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) ठाण्यात आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. पाठारे प्रभू मुंबईला स्थायिक झाले. 

९> ठाणे हे अर्वाचीन युगात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. जनकवी पी. सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. नावाजलेले क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्यातीलच. ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मराठी वाचनालयांपैकी एक आहे. 

Tuesday, August 9, 2022

मुलांशी काय बोलायचं? भाग १ लेखक चेतन एरंडे

 मुलांशी काय बोलायचं? भाग १

मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?"
त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं!
आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय.
१. तू मला काय शिकवशील? या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू मुलांना "शिकवण्यासाठी" त्यांच्याशी केलेल्या संवादापेक्षा, मुलांकडून "शिकण्याच्या" इच्छेने केलेला संवाद हा अधिक प्रभावी असतो.
आपण पूर्वी मुलांकडून शिकायच्या गोष्टींची यादी तयार करून तसा एखादा समर कॅम्प घेण्याचा विचार केला होता. गंमत म्हणजे या लेखिकेने सुद्धा "चल, मी तुला शिकवतो यापेक्षा तू मला काय शिकवशील" या वाक्याने संवाद कसा मस्त बहरतो, हेच सुचवले आहे! म्हणजे या दिवाळीत आपण असा प्रयोग करून बघायला हरकत नाही!
२. तू आणि मी चिडल्यावर घाबरल्यावर, दुःखी असू तर किंवा कुणाकडून दुखावले असू तर आपण कसे रिऍक्ट होतो? या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. गप्पा मारता मारता अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत आपला राग, आनंद, दुःख, भीती कशी व्यक्त करायची याच्या टिप्स आपण शेअर करू शकतो.
३. तुला अशी एखादी गोष्ट आठवतेय जी करताना तुझ्या मनात प्रचंड भीती होती, अस्वस्थता होती तरीही ती गोष्ट तू केलीस? तेव्हा तुला कसं वाटलं?
हे बोलता बोलता भीती आणि त्या अनुषंगाने एकीकडे धोकादायक कृत्य तर करायचं नाही पण दुसरीकडे भीतीमुळे मागं राहून संधीही घालवायची नाही, हे कसं जमवायचं हे उदाहरणांतून मुलांना सांगत आपण संवाद वाढवू शकतो. मग त्यात हेल्मेट घालणे असेल, गिर्यारोहण असेल किंवा मग बेफिकीरपणे रस्त्यावर सायकल, गाडी चालवणं असे, अशा विषयांवर गप्पा होऊ शकतात.
४. अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जी करताना तुला स्ट्रेस तर येतो पण मजा पण येते ?
हे बोलता बोलता आपण स्ट्रेस ही काही दरवेळी वाईटच गोष्ट असते असं नाही तर स्ट्रेस घेतल्याने आपण दोन पावलं पुढं देखील कसं जाऊ शकतो? हे सांगू शकतो. तसेच कष्ट घेणं ही काही वाईट किंवा कमी पणाची गोष्ट नाहीये, उलट अनेकदा कष्ट आपल्या प्रगतीसाठी कसे गरजेचे असते हेही सांगू शकतो.
५. तुला सगळ्यात जास्त सुरक्षित कधी वाटतं आणि का?
मला माहिती नाहीये आपण कितीवेळा या विषयवार आजपर्यंत मुलांशी बोलले असू. पण मला वाटतं की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मूल जेव्हा बोलण्याच्या मनस्थितीत असेल, आजूबाजूला योग्य वातावरण असेल तेव्हा हा प्रश्न आपण विचारून बघितलाच पाहिजे! याचे फायदे काय आहेत? हे मी सांगण्याची गरज नसावी!!
पुढचे पाच मुद्दे पुढच्या भागात..
महत्वाचे: अशा प्रकारे संवाद करत असताना, घरातील वातावरण, मुलाचा आणि आपला मड या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांशी संवाद सुरु करण्याआधी मुलाला कंफर्टेबल वाटेल असं वातावरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे नाहीतर हा संवाद "बॅकफायर" होऊ शकतो!!
क्रमशः
चेतन एरंडे

Wednesday, August 3, 2022

selfstudy-8

 या लेखमालेतील हा शेवटचा लेख. आपण यापूर्वी आपल्या मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालले हे पाहिले. चेतातंतूंवरील मेदाच्या थराचे महत्व ओळखले. मागील काही लेखांत आपण विज्ञान, समाजशास्त्रे, गणित या विषयांचा अभ्यास कसा करायचा हे पाहिले. या लेखात भाषा विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू. 

आपल्यापैकी अनेकांना इंग्रजी ही भाषा कठीण वाटते. बोली इंग्रजी भाषा शिकविण्याचे वर्ग भरपूर पैसे कमावतात. माझी इंग्रजी भाषा नानावीपर्यंत कच्ची होती. पण आमच्या मुख्याध्यापकांनी (सामंतसर - मो.ह.विद्यालय ठाणे) आम्हाला भाषा शिकण्याची एक युक्ती सांगितली. त्यामुळे माझी इंग्रजी चांगली झाली.  कोणतीही भाषा शिकायची असेल तर तुमचे विचार त्या भाषेतून आले पाहिजेत. मराठीतून विचार करून त्याचे इंग्रजी अथवा अन्य भाषांत रूपांतर करून तुम्ही बोललात तर त्या भाषेवर प्रभुत्व येणार नाही. यासाठी रोज एक पान त्या भाषेत निबंध लिहिणे आवश्यक आहे. या निबंधाचा विषय कोणताही असावा. त्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल तो विषय. हा निबंध लिहून झाला की इंग्रजी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून तपासून घ्यावा. मात्र कोणत्याही विषयाच्या शिक्षकाकडून नको. बहुसंख्य शिक्षकांना चुका काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याची सवय असते. म्हणून शिक्षक नकोत. घरातील अथवा ओळखीची कोणीही व्यक्ती, जी ढोबळ चुका प्रेमाने दाखवू शकेल अश्या व्यक्तीकडून हा निबंध तपासून घ्यावा. रोज असा एक निबंध लिहिला की काही महिन्यात आपण निबंध लिहिण्यास बसलो की आपले विचार त्या त्या भाषेत सुरु होऊ लागतील.  इंग्रजी पुस्तक वाचणे अथवा दिवसातून काही वेळ इंग्रजी बोलणे यापेक्षा ही पद्धत मला सुटसुटीत वाटते. 

मी गेले काही दिवस ही लेखमाला लिहितो आहे. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवणे हे प्रथम आवश्यक आहे. कोचिंग क्लासचे शिक्षक कदाचित विद्यार्थ्यांकडून या वर्षीचा अभ्यास करून घेतील ही, पण त्यातून आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कसा जागृत होणार? पुढे तो जेव्हा व्यवसायात/नोकरीत पाऊल ठेवेल तेव्हा त्याला येणाऱ्या समस्या त्यालाच सोडवायच्या आहेत. तेथे कोठलाही कोचिंग क्लास नसेल. या समस्या सोडविण्यासाठी त्याचा आत्मविवास जागृत असायला हवा. आणि त्याच्यात आत्मविश्वास जागृत करण्याचे काम तो लहान असतानाच - त्याच्या संस्कारक्षम वयातच व्हायला हवे. कोचिंग क्लासला न जाता कदाचित त्याला आज थोडे कमी मार्क्स मिळतील. पण मिळवलेले मार्क्स 'त्याचे' असतील त्याने परिश्रमाने मिळविलेले असतील. हे मार्क्सच त्याला आत्मविश्वास देतील. 

पालकांनो, विचार करा. आपल्या मुलांना भविष्यात या जगात वावरताना आत्मविश्वास देणे हे आपले कर्तव्य आहे.  आपणास काही शंका असतील, भविष्यातही काही मदत लागली तर माझ्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. ही लेखमाला मी येथेच संपवितो. 

Monday, August 1, 2022

selfstudy-7

 या पूर्वी आपण या लेखमालेत चेतासंस्थेचे - अर्थात मेंदूचे काम कसे चालते याचा थोडक्यात आढावा घेतला. चेतासंस्थेला अधिक सुदृढ बनविण्यासाठी - मेंदूने आपले कां अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्या खाण्यात कोणते पदार्थ असले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हेही आपण पाहिले. मागील लेखात विज्ञान आणि समाजशास्त्रे यांचा अभ्यास करण्याची पद्धतही पाहिली. आता या लेखात गणित या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू. 

शाळेत  अभ्यासाला गणिताचे पाठ्यपुस्तक लावलेले असते. आपण selfstudy करताना हे पाठयपुस्तक हाच आपला मुख्य resource आहे. पाठ्यपुस्तकात प्रत्येक विभागाला सुरुवात होताना काही गणिते सोडवून दाखवलेली असतात. ही सोडवून दाखवलेली गणिते प्रथम नीट वाचावी. त्यातील प्रत्येक पायरी (step) नीट समजून घ्यावी. त्यामागील logic समजून घ्यावे. जर एखाद्या step मागील logic समजले नसेल तर ते शिक्षकांकडून/मित्रांकडून अथवा पालकांकडून समजून घ्यावे. नंतर हेच पुस्तकात सोडवून दाखविलेले गणित पुस्तक बंद करून सोडवावे. जर सोडविता आले नाही तर परत पुस्तक उघडून आपण कोठे चुकलो ते पाहावे. नंतर परत पुस्तक बंद करून ते गणित पहिल्यापासून सोडवावे. 

हे झाल्यावर त्या विभागाखाली आपल्याला सोडविण्यासाठी जी गणिते दिलेली असतात ती १,३,६,९...अशा क्रमाने सोडवावीत. शिक्षकांकडून तपासून घ्यावीत. नंतर तीन-चार दिवसांनी २,४,७,१०.. अशा क्रमाने सोडवावीत. आणखी ३-४ दिवसांनी ५,८,११.. अशा क्रमाने सोडवावीत. आपण हे पाहिले की चेतासंस्थेतील ती गणिते सोडविण्याचे विद्युत मंडल तीच कृती परत ३-४ दिवसांनी केली तर अधिक कार्यक्षम होते. पण तीच कृती लगेच अनेक वेळा केली तर ते मंडल फार कार्यक्षम होणार नाही. म्हणून गणिताच्या धड्याखालील प्रश्न या पद्धतीने सोडवावेत. हीच पद्धत अन्य विषयांखाली दिलेले प्रश्न सोडवितानाही वापरता येते. 

उजळणी हा गणिताचा प्राण आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवता आल्या तर त्या सोडवाव्या. अन्य काही प्रकाशकांनी काढलेल्या पुस्तकातील गणिते सोडवावी. 

पुढील लेखात आपण भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहोत. 

Selfstudy-6

 मागील काही भागांत भागात आपण मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालते हे पाहिले. चेतासंस्थेतील संदेशांचे आदान-प्रदान वेगाने आणि सामर्थ्यशाली व्हावे म्हणून चेचेतातंतूंवरील  मेदाचा थर जाड बनवावा लागतो. यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ असावेत हे आपण मागील भागात पाहिले. आता आपण मिळविलेल्या ज्ञानाचा  उपयोग करून मेंदूची ही अवाढव्य आणि गुंतागुंतीची व्यवस्था आपल्या कामाला कशी लावायची हे पाहू. 

आपल्या लक्षात राहाते 

१०% वाचलेले 

२०% ऐकलेले 

५०% ऐकलेले आणि पाहिलेले 

७०% एकमेकांसोबत चर्चा केलेले 

९५% दुसऱ्यांना शिकविलेले 


याचाच अर्थ शाळेत मुले शिक्षकांचे ऐकतात, शिक्षक फळ्यावर काही लिहितात तेव्हा त्यांच्या जास्तीतजास्त ५०% लक्षात राहते. 

जेव्हा ते त्यासंबंधी youtube वर बघतात तेव्हाही केवळ ५०% लक्षात राहते.

मात्र या संबंधी ते मित्रमंडळींशी काही बोलतात तेव्हा ७०% लक्षात राहाते 

आणि जर त्यांनी अन्य मित्राना शिकवले तर ९५% लक्षात राहते. 


मग या माहितीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो का?

जर आसपास राहणाऱ्या मित्राचा ग्रुप असेल आणि त्यांनी एकमेकांना एखाद्या विषयातील धडे शिकविले तर  चांगले लक्षात राहील, तसेच या गटात आपापसात चर्चा झाल्यामुळे सर्वांच्या किमान ७०% लक्षात राहील. 

विशेषतः ही पद्धत विज्ञान आणि इतिहास या विषयात खूप उपयोगी ठरते हा अनुभव आहे. चार पाच मित्रांचा गट करावा. प्रत्येकाने काही धडे वाटून घ्यावेत. विज्ञानाचा/इतिहासाचा  धडा पुस्तकातून नीट समजावून घेतला, त्या संबंधी अधिक माहिती youtube वरून मिळविली. नंतर त्याचे एक powerpoint presentation करून अथवा अन्य मार्गांनी आपल्या गटातील बाकीच्या मित्रांना हा धडा शिकवावा. नंतर त्यावर चर्चा घडवून आणावी. यामुळे तो धडा शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या बाबत खोलवर अभ्यास होईल, ९५% लक्षात राहील. त्यावरील चर्चेने गटामधील बाकीच्या विद्यार्थ्यांच्याही ७०% लक्षात राहील. भूगोल शिकतानाही या पद्धतीचा उपयोग होऊ शकेल. या पद्धतीत मित्रमंडळींच्या सहवासात खेळीमेळीने ही चर्चा झाल्याने मनही प्रसन्न राहाते, कंटाळा येत नाही. 

पुढील भागात आपण गणित आणि विविध भाषा कशा शिकाव्यात याबद्दल विचार करू. 

संतोष कारखानीस ठाणे


Sunday, July 31, 2022

Selfstudy-5

 मागील लेखांत आपण मेंदूचे आणि चेतासंस्थेचे कामकाज कसे चालते हे पाहिले. चेतातंतूंची नवनवीन जोडणी आणि त्यावर तयार होणारा एक मेदाचा थर (myelin layer) हे आपली बुद्धिमत्ता वाढविण्यास कारणीभूत होतात हे आपण पाहिले. एकच गोष्ट वारंवार केल्याने (उजळणी) ती गोष्ट करण्याचे चेतापेशींचे विद्युत मंडल कार्यंवित होते, त्यामुळे या मेदाच्या थराची जाडी वाढत जाते. हा मेदाचा थर चेतातंतूंकडून जाणारी विद्युत स्पंदनांचे रक्षण करीत असल्याने या मंडलातून दिले जाणारे संदेश वेगाने आणि अधिक सामर्थ्याने पाठविले जातात. त्यामुळे त्या गोष्टीत/विषयात आपण प्रवीण होतो. 

आता जर या मेदाच्या थराची (myelin layer) जाडी वाढवायची असेल तर या मेदासाठी लागणारी द्रव्ये आपल्या आहारात पुरेशी असली पाहिजेत. अर्थातच मेदाचा थर बनविण्यासाठी लागणारे पहिले द्रव्य म्हणजे मेद अर्थात fat. देशी गायीच्या लोणकढ्या तुपाची रचना बरीचशी या myelin च्या रचनेसारखी असते. त्यामुळे देशी गायीचे लोणकढे तूप हे myelin layer बनविण्यास शरीराला मदत करते. आपल्या मुलाला अभ्यासात मदत व्हावी असे वाटत असेल तर हे तूप त्याच्या आहारात  योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. माझ्या लहानपणी माझी आजी मला डब्यात अधूनमधून गूळ-तूप चपाती अथवा तूप -साखर  आवर्जून देत असे त्याची मला ही माहिती मिळवताना आठवण झाली होती. लोणकढे तूप याचा अर्थ विरजण लावून दूध घुसळून लोणी काढून ते तापवून मिळविलेले तूप (bilona ghee). हल्ली अनेक ठिकाणी विरजण न लावता यांत्रिक पद्धतीने दुधातील fat छान अंश काढतात आणि त्यापासून तूप बनवितात. हे तूप लोणकढे नाही. 

myelin layer बनविण्यास उपयोगी अशा अन्य गोष्टींचा विचार केल्यास 'ड जीवनसत्व महत्वाचे आहे.  त्यामुळे 'ड जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश असावा. दुधातून हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. याशिवाय अंडी, लिव्हर, कठीण कवचाचे प्राणी (चिंबोऱ्या, कोळंबी इत्यादी), सोयाबीनचे पदार्थ यातूनही 'ड' जीवनसत्व मिळते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडचाही myelin layer बनविण्यास उपयोग होतो. Vitamin C आणि collagen यांचाही उपयोग हा थर बनविण्यासाठी होतो. आयोडीन आणि झिंक यांचाही हा थर बनविण्यात सहभाग असतो. काजू, बदाम, अक्रोड, सुके अंजीर यासारख्या सुक्या मेव्यातून तसेच माशांमधून हे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात. 

मात्र बाजारात मिळणारे फास्ट फूड आणि वाईट तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने या myelin layer बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांची हानी होण्याची शक्यता असते. यामुळे अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुलांनी असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. 

पुढील लेखात आपण अभ्यास करण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा विचार करू. 

Selfstudy- 4

 मागील काही भागात आपण मेंदूच्या कार्यपद्धतीबद्दल थोडेसे जाणून घेतले. मेंदू आणि चेतासंस्था ही सुमारे एक कोटी चेतापेशींची बनलेली असते. एका चेतापेशीतून दोन हजार ते दहा हजार चेतातंतू निघालेले असतात. हे चेतातंतू आपण काही काम/अभ्यास करतअसताना   जोडले जातात. हे चेतातंतू विजेच्या स्पंदनांद्वारे माहितीचे आदानप्रदान करतात. यामुळे माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या चेतातंतू-चेतापेशूंचे विद्युत मंडल तयार होते. अभ्यास करताना/ प्रत्येक उजळणीच्या वेळी तेच काम परत करताना हे मंडल कार्यान्वित होते. प्रत्येकवेळी कार्यान्वित होताना त्यावर मेदाचा एक हलकासा थर जमा होतो. हा थर विद्युतरोधक असल्याने माहितीच्या विजेच्या सपंदानांचा ह्रास रोखतो. स्पंदनांची तीव्रता चांगली राहते आणि त्यामुळे ती अभ्यास केलेली गोष्ट वेळेवर लगेच आठवते. हा थर जेवढा जाड होईल तेवढी विद्युत स्पंदने प्रभावी असतात. 

मागच्या भागात आपण दर काही दिवसांनी अभ्यासाची केलेली उजळणी का फायदेशीर ठरते हे पहिले. तसेच पुरेशा झोपेचे अभ्यासाच्या दृष्टीने असलेले महत्वही पाहिले. चेतासंस्थेमधील रासायनिक क्रियांवर झोप आणि उजळणीचा काय परिणाम होतो हे आपण पाहिले. 

आता मेंदूमधील 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' चा परिणाम अभ्यासावर कसा होतो हे पाहू. मेंदू अनेक कामे करत असतो. यासाठी  मेंदूमधील जवळ असणाऱ्या चेतापेशी एकमेकांशी संपर्क साधत असतात. या चेतापेशी विशिष्ट प्रकारची कामे करण्यात तरबेज असतात. या पेशींच्या मेंदूतील स्थानानुसार मेंदूचे विविध भाग शास्त्रज्ञांनी कल्पिले आहेत. यातील सात प्रमुख भागातील एक भाग म्हणजे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'. हा भाग अमूर्त गोष्टींचा विचार करतो. दिवास्वप्ने बघणे, भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरून भविष्यकाळाची चिंता करणे, एखाद्या गोष्टीबद्दल राग-लोभाचा सतत विचार करणे, स्वत:बद्दल मत बनविणे अशा गोष्टी हा भाग करतो. आपल्या जगण्यासाठी काही प्रमाणात असा विचार आवश्यक असतो. परंतु या गोष्टी सतत मनात येत राहिल्या तर मेंदूच्या बाकीच्या कामांमध्ये अडथळा ठरू शकतात. त्यातच मेंदूच्या या भागाचा मेंदूच्या बाकी अन्य भागांशी निकट संपर्क असतो. या भागातील चेतापेशींचे चेतातंतू अन्य भागातील चेतातंतूंशी जोडलेले असतात. कधी काय करायचे याचे सिग्नल्स अन्य भागांना हे नेटवर्क देत असते. त्यामुळे मेंदूच्या या भागाचे कार्य अनावश्यकपणे सतत चालू राहिले तर मेंदूला आवश्यक कामे करण्यास पुरेशी संधी मिळत नाही. या भागाचे कार्य अनावश्यकपणे सतत चालू राहिले तर त्याची अन्य भागांसोबत बनलेली विद्युतमंडले त्यांच्या चेतातंतूंवर अधिक मेदाचा थर जमून अधिक कार्यक्षम बनत जातात आणि मेंदूच्या कामात अधिकाधिक अडथळा बनत जातात. ही समस्या फार वाढली तर स्निझोफ्रेनियासारखे आजारही होऊ शकतात. अभ्यास करताना मनात अनावश्यक विचारांनी थैमान घातले तर अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही ते याच 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'मुळे. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे भविष्यातील घटनांबद्दल चिंता वाटू लागते ती याच नेटवर्कमुळे.

याच 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मुळे परीक्षेची अनावश्यक भीती वाटू शकते. अचानक भीती वाटली की काय करायचे याची कार्यपद्धती निसर्गाने आपल्या शरीरात पूर्वीच तयार केली आहे. याला इंग्रजीत 'Fight or Flight' असे नाव आहे. पूर्वी मानव जंगलात राहत असताना अचानक समोर वन्य प्राणी आल्यास पळणे अथवा त्याच्याशी लढणे हाच उपाय होता. त्यासाठी आपल्या पायांत आणि हातात अधिक ऊर्जा येणे आवश्यक होते. त्यामुळे खूप भीतीची भावना निर्माण झाली की आपले रक्त हाताकडे आणि पायांकडे जाते. पोटातील रक्त हाता-पायांकडे गेल्याने आपल्याला अशावेळी पोटात खड्डा पडल्यासारखे वाटते. पोट थंड पडते. आपल्या मेंदूला शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी २०% ऊर्जा लागते. त्यामुळे ही ऊर्जा पुरविण्यासाठी मेंदूत रक्ताचा मोठा साठा असतो. भीती वाटली की मेंदूतील  या रक्तापैकी काही रक्त हातापायांकडे वळविले जाते. अर्थात यावेळी मेंदूला ऊर्जेचा पुरवठा कमी पडतो. मेंदूच्या कामावर परिणाम होतो. डोके सुन्न होते. मग परीक्षेच्या वेळी आपल्या मुलाला या 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मुळे भीतीची अनावश्यक भावना निर्माण झाली तर काय होईल याचा विचार करा. 

'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मधील चेतातंतूंवर तयार झालेल्या मेदाच्या जाड थरामुळे हे नेटवर्क तोडणे कठीण होऊन जाते. आपल्या ऋषींनी यावर मार्ग शोधले होते. काही मार्गांचा आपण विचार करू. 

'त्राटक' हा  'डिफॉल्ट मोड नेटवर्क' तोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. 'त्राटक' करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मी माझा मुलगा सहावी-सातवीत असताना त्याच्याकडून ज्योती त्राटक करवून घेत असे. अंधाऱ्या खोलीत एक मेणबत्ती डोळ्यांच्या पातळीवर ठेऊन मेणबत्तीच्या ज्योतीचे तेज डोळ्यांनी शरीरात घेऊन थोड्या थोड्या वेळाने डोळे मिटून ते तेज सर्व शरीरात पसरत आहे अशी कल्पना करणे म्हणजे ज्योती त्राटक. हे सुमारे दहा मिनिटे करायचे असते. नंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मरायचे असतात. यामुळे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी होऊन अभ्यासात लक्ष लागते. 

ध्यानमुळेही 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी करता येतो. मुलाला मांडी घालून बसायला सांगावे. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक आत येणारा आणि बाहेर जाणारा श्वास जाणवला पाहिजे. याला विपश्यना ध्यानपद्धतीत 'आनापान सति' असे नाव आहे. पातंजल योगात याला 'प्राणधारणा' म्हणतात. 

आपण आपल्या मुलाला 'त्राटक', 'ध्यान' अथवा अन्य मार्गांनी या  'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी करण्यास मदत करणे हे त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. 

मुलांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले हे myelin मेद बनविण्यासाठी आवश्यक घटक काय असतात हे पुढील लेखात पाहू. 

Saturday, July 23, 2022

Self Study Part 3

 आपण मागील भागात मेंदूचे काम कसे चालते याची थोडक्यात माहिती घेतली. आपण ज्यावेळी एखादी कृती करतो (उदा. वाचन) तेव्हा आपली ज्ञानेंद्रिये चेतातंतूंच्या साहाय्याने ही माहिती मेंदूकडे पाठवितात. ही माहिती विद्युत सपंदानाच्या स्वरूपात असते ज्याला सिनॅप्स synapse असे नाव आहे. हे चेतातंतू एकमेकांना जोडलेले असतात आणि ही विद्युत स्पंदने एका चेतापेशींकडून दुसऱ्या चेतापेशींकडे चेतातंतूंच्या जोडणीतून जाते. आपण एखादे काम करीत असता या जोडण्या होतात. अशाप्रकारे जोडल्या गेलेल्या चेतापेशींचे एक विद्युत मंडळ (electric circuit) तयार होते हे आपण मागील भागात पाहिले. ही स्पंदने चेतातंतूतून जात असताना त्यामुळे आसपाश्या भागात एक विद्युत भार निर्माण होतो. या विद्युत भारामुळे या चेतातंतूंभोवती एक मेदाचा थर तयार होतो. हा थर विद्युत रोधक असल्याने चेतातंतूंमधील विद्युतभाराचा ह्रास होऊ देत नाही. त्यामुळे विद्युत स्पंदने अधिक वेगात आणि मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. म्हणजेच हा थर जेवढा जाड, तेवढी या स्पंदनांची तीव्रता जास्त. म्हणजेच आपण शिकलेले परत आठवण्याची शक्यता जास्त. म्हणूनच जास्तीतजास्त चेतातंतूंच्या जोडण्या व्हाव्यात आणि त्या भोवतीचा मेदाचा थर अधिक जाड व्हावा हा आपला प्रयत्न असला पाहिजे. 

हा मेदाचा थर बनताना एकदा थर बनला की त्याची जाडी वाढण्यासाठी मध्ये काही काळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजेच आज मी काहीतरी अभ्यास  केला तर त्याची उजळणी आजच वीस वेळा  केली तर फार उपयोग नाही. त्याची उजळणी एक दोन दिवसाआड अशी वीस वेळा केली तर अधिक फायदा होईल. अभ्यास करताना याचा विचार नक्की हवा. 

मेंदूमध्ये या रासायनिक क्रिया चालू असताना काही टाकाऊ पदार्थ (beta amyloid) तयार होतात. हे पदार्थ मेंदूत तसेच राहिले तर मेंदूच्या कामावर विपरीत परिणाम करतात. मेंदूच्या अनेक रोगांचे कारण हेच  पदार्थ आहेत. हे पदार्थ काढण्याचे काम मेंदूतील द्रवपदार्थ (Cerebrospinal Fluid -CSF) करतात. परंतु जेव्हा मेंदू खूप काम करीत असेल (उदा. जागेपणी) तेव्हा मेंदूतील कामामुळे मेंदूतील  पेशींमधील अंतर खूप कमी झालेले असते. त्यामुळे या द्रवाला मेंदूत नीट शिरता येत नाही. झोपेमध्ये मेंदूच्या पेशींचे काम कमी होते. मग त्यांच्यामधील अंतर वाढते आणि हा द्रव मेंदूत शिरून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकू शकतो.  म्हणून चांगला अभ्यास करायचा असेल तर पुरेशी झोप आवश्यक आहे. तसेच परीक्षेच्या आदल्या दिवशी जागून परीक्षेला गेल्यास मेंदूतील टाकाऊ पदार्थामुळे मेंदूचे काम परीक्षेच्या वेळेस मंदावण्याची  शक्यता असते. म्हणून परीक्षेआधी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक आहे. 

व्यायाम आणि मैदानी खेळामुळे मेंदूत काही संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके आपल्याला आनंदाची भावना देतात. आपण आनंदी असलो तर अभ्यासात मन लागते.  नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार व्यायामामुळे मेंदूतील चेतापेशींच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे आपले मूल अभ्यासात पुढे यावे असे वाटत असेल तर त्याला मैदानी खेळासाठी उत्तेजन दिले पाहिजे. All work and no play makes jack a dull boy ही इंग्रजी महान आपल्याला माहीत असेलच. 

शेवटची मेंदूच्या बाबतीत  गोष्ट म्हणजे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' . लहानपणापासून आलेल्या विविध अनुभवांमुळे मेंदू  बऱ्याच वेळा काही विचार करत असतो.  आपल्या अंतर्मनात हे विचार सतत चालू  राहातात. यामुळे हे अनावश्यक विचार  करण्याचे मेंदूतील विद्युत मंडल अधिकाधिक शक्ती प्राप्त करते, त्याच्या चेतातंतूंवरील मेदाचे आवरण अधिक जाड बनत जाते. हे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' आपल्या मेंदूच्या कार्यशक्तीचा (Processing Power) बराचसा भाग खाऊन टाकते. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरावा तसे हे असते. त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात रहात नाही. वर्षानुवर्षे बनत गेलेले हे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' तोडणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. परंतु आपल्या ऋषींनी हे'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' तोडण्याच्या पद्धती विकसित केल्या होत्या. गुरुकुलांमध्ये विद्यार्थ्यांना यावर काम करणे अनिवार्य होते. 

पुढील भागात आपण या विविध पद्धतींची माहिती घेऊ. 

Friday, July 22, 2022

Self Study Part 2


आपण या लेखात मेंदूचे कार्य आणि त्याच्या आपण आपल्या पाल्यांच्या अभ्यासात कसा उपयोग करून घेणार आहोत हे बघणार आहोत. 

आपल्याला माहीतच आहे की मेंदू सुमारे एक कोटी चेतापेशींनी (न्यूरॉन्स) बनलेला आहे. प्रत्येक न्यूरॉन्सपासून दोन हजार ते दहा हज़ार चेतातंतू (डेन्ड्रॉईड्स) निघालेले असतात. हे चेतातंतू एकमेकांशी संपर्क साधून असतात. हे त्यांचे संपर्क करण्याचे मार्ग (Communication Channels) प्रचंड प्रमाणात असतात. कदाचित जगातील मूलकणांपेक्षा हे मार्ग अधिक भरतील. आपल्या मेंदूत ही प्रचंड गुंतागुंतीची अवाढव्य यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या साहाय्यानेच आपण नवे ज्ञान आत्मसात करत असतो. पण आपल्यापैकी अनेकांना ही यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे कशी वापरायची याचीच कल्पना नसते. मग आपल्या मुलांना या यंत्रणेचा कार्यक्षम वापर कसा करायचा हे कोण शिकविणार? प्राचीन काळी मुले शिक्षणासाठी गुरुगृही जात असत. या गुरूंना या मेंदूच्या कार्यप्रणालीची कल्पना होती. ते याचा उपयोग करून घेत असत. कसा ते आपण नंतर पाहू. 

आपण कसे शिकतो?

१> पाच ज्ञानेंद्रीयान्च्या साहाय्याने जे आपण सहज ग्रहण करतो 

२> वाचन 

३> लेखन 

४> उजळणी (प्रॅक्टिस) 

५> एकमेकांबरोबर चर्चा

६> भावनांद्वारे 

वरील सहा प्रकारांनी अथवा त्यांच्या एकत्रीकरणानी आपण शिकतो. त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग नाही. 

संवेदना वाहून नेताना अथवा वरील सहापैकी एक अथवा अनेक घटना घडताना आपल्या मेंदूतील चेतापेशी आपल्या चेतातंतूंच्या साहाय्याने सतत एकमेकांशी संपर्क साधत असतात. हा संपर्क विजेच्या स्पंदनांनी होतो. त्याला स्नॅप्स म्हणतात. अशा प्रकारे एक चेतापेशी दुसऱ्या चेतापेशीला संदेश पाठवते, ती पेशी आवश्यक असल्यास हा संदेश पुढील पेशींकडे पाठवते. अशा प्रकारे एक विजेचे मंडल (सर्किट) आपल्या चेतासंस्थेत तयार होते. जेव्हा आपण तीच गोष्ट परत करतो (वाचन, लेखन इत्यादी) तेव्हा हेच सर्किट परत उपयोगात येते. मग या सर्किटमध्ये असलेल्या चेतातंतूंवर  एक हलकासा मेदाचा (fat) थर  (myelin layer) तयार होतो. या मेदाच्या थरामुळे या सर्किटमधून जाणारी विजेची स्पंदने अधिक वेगात जातात, म्हणजेच  होणारा संवाद अधिक जलद होतो.  आपल्याला अनुभव आहे की सायकल शिकताना प्रथम आपल्या मेंदूला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पण परत परत चालवून मेंदूतील त्या सर्किटवरील चेतातंतूंवर मेदाचा थर पुरेशा प्रमाणात साठला की मेंदू त्या दिशेने जलद काम करतो. मग आपल्याला सायकल चालविणे सोपे वाटू लागते. हीच शिकण्याची -ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया आहे. ही केवळ आपले चेतातंतू अन्य योग्य चेतातंतूंना जोडले जाण्याची आणि त्या चेतांतूंवरील मेदाचे आवरण अधिकाधिक जाड करण्याची प्रक्रिया आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत हीच प्रक्रिया अधिक चांगली कशी होईल हे आपल्याला बघायचे आहे. 

हे कसे करायचे यावर आपण पुढील लेखात विचार करू. 

संतोष कारखानीस ठाणे 

#SelfStudy

Self Study Part 1


'स्वत:चा अभ्यास स्वत: कसा करावा' अर्थात 'Self Study' या माझ्या लेखमालेला सुरुवात करीत आहे. या लेखमालेचा उपयोग प्रामुख्याने पाचवीपासून पुढील विद्यार्थ्यांना अपेक्षित असला तरी काही भाग त्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी आशा आहे. 

Self Study मधील एक महत्वाचा भाग म्हणजे पालकांचा आपल्या पाल्यांवर विश्वास हवा. जर पालकांचाच आपल्या पाल्यांवर विश्वास नसेल तर पाल्य स्वत:वर विश्वास कसा ठेऊ शकतील. मग जर मुलांचा self confidence लहानपणीच मारला गेला तर भविष्यात  ही मुले पुढे कशी येणार? आपल्या मुलांनी शाळेच्या परीक्षेत अधिक मार्क मिळवावे हे आपले एकमेव ध्येय नक्कीच नसावे. आपल्या मुलांनी आयुष्य मजेत घालवावे, Enjoy करावे हेच ध्येय असावे. परीक्षेत मागे पडलेले आयुष्यात यशस्वी होताना दिसतात, तर शाळेत भरपूर मार्क मिळविणारे आयुष्यात त्यांच्यापेक्षा मागे पडलेले दिसतात. आपल्याला हे भोवती दिसत असते. त्याकडे डोळेझाक करू नका, आपल्या मुलांचा आत्मविश्वास मारू नका. प्रत्येक मुळात काही ना काही अंगभूत गुण असतात. ते ओळखून ते फुलविण्यासाठी प्रयत्न करा. हेच आपले पालक या नात्याने ध्येय आहे. 

या साठी प्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे मुलांना कोचिंग क्लासमध्ये घालू नका. त्यांना आपले गुण फुलविण्यास अवसर द्या. यासाठी आपण या लेखमालेत फ्तर्येक विषयाचा अभ्यास कसा करावा हे पाहणार आहोत. त्या आधी आपल्या मेंदूचे काम कसे चालते हे आपण जाणून घेऊ. कारण त्या आधारेच विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करण्याची आपल्या मुलांची क्षमता आपण वाढविणार आहोत. 

पुढील लेख हा आपल्या मेंदूचे काम कसे चालते आणि त्याचा उपयोग आपण कसा करून घेणार आहोत यावर असेल. 


संतोष कारखानीस ठाणे

Sunday, June 5, 2022

सत् - अस्तित्व

आज अद्वैत तत्वज्ञानात थोडे खोल जाऊ.

ब्रह्म हे सत्-चित्-आनंद स्वरूपी असते हे आता आपल्याला माहीत आहे. (माझे या आधीचे लेख आपण वाचले असतील हे गृहीत धरले आहे). यातील सत् म्हणजे अस्तित्व. म्हणजेच ब्रह्म अस्तित्वरूपात असते असे ढोबळमानाने म्हणता येईल. आपल्याला अस्तित्व (सत्), चैतन्य (चित्) आणि आनंद या तिन्ही स्वरूपात ब्रह्माची अनुभूती नेहमी येत  असते. 


आपण पुढील विवेचनाचा सुरुवात करण्यापूर्वी अंगभूत गुण (Intrinsic Properties) आणि उधार गुण (Acquired  Properties) यामधील फरक जाणून घेऊ. एखादे पाण्याने भरलेले भांडे चुलीवर ठेवले आहे. या पाण्याची उष्णता ही त्याने भांड्याकडून उसनी घेतली आहे. भांड्यातून ते पाणी दुसऱ्या भांड्यात ओतले तर हळूहळू ही उष्णता निघून जाईल. म्हणजेच उष्णता हा पाण्याचा उधार गुणधर्म आहे. तसेच आकार हा ही पाण्याचा उधार गुणधर्म आहे. तो त्याने भांड्याकडूनच घेतलेला आहे. मात्र वस्तुमान हा पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. दसऱ्या भांड्यात ओतले तरी पाण्याचे वस्तुमान तेच राहील.  अशाच प्रकारे उष्णता हा भांड्याचा उधार गुणधर्म आहे. तो त्याने खालील अग्नीकडून घेतला आहे. पण आकार आणि वस्तुमान हे भांड्याचे अंगभूत गुणधर्म आहेत. अग्नीचा मात्र उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे. अग्नी विझविताच उष्णता असणार नाही. जे उधार गुणधर्म आहेत ते काही कालच अस्तित्वात असतील. 

आपल्या आसपासच्या वस्तूंचा 'अस्तित्व' हा मूलभूत गुणधर्म नाही. या वस्तू नष्ट होतील आणि त्यांचे अस्तित्व ही त्यांच्याबरोबरच नष्ट होईल. आपला देह नष्ट होईल. मग अस्तित्व हा कोणाचाच मूलभूत गुणधर्म नाही काय? 

भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील सोळाव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्या गोष्टीचा अस्तित्व (सत्) हा अंगभूत गुणधर्म आहे त्या गोष्टीची माहिती सांगतात. या गोष्टीलाच अद्वैत वेदांत ब्रह्मन् या नावाने ओळखते. या उलट काही गोष्टी कधीच अस्तित्वात येऊ शकत नाहीत. म्हणजे त्या कायम 'असत्' असतात. याचे उदाहरण उपनिषदे देतात. 'चौकोनी वर्तुळ'. असे वर्तुळ अस्तित्वात नाही, नव्हते, कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही.  

परंतु या दोन गोष्टींव्यतिरिक्त आणून एक प्रकार आहे. तो म्हणजे अस्तित्व उधार घेतलेल्या गोष्टी. या गोष्टींनाच वेदांतात 'मिथ्या' असे म्हणतात. या गोष्टी काही काळ अस्तित्व 'सत्' कडून उधार घेतात. म्हणजेच 'जगत् मिथ्या' असे म्हणताना हे सर्व जग खोटे आहे असे उपनिषदे सांगत नाहीत तर जगाचे अस्तित्व हे अल्प काळ आहे, चिरंजीव नाही असे उपनिषदांना सांगायचे आहे. 


अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला आहे. आपल्याला तो साप असल्याचे भासते. आपण घाबरतो. जवळ गेल्यावर तो दोर असल्याचे कळते. म्हणजेच सापाचे अस्तित्व आहे, पण ते अल्पकाळ आहे.  वाळवंटात मृगजळ दिसते. आपल्याला ते पाणी असल्याचे वाटून आपण काहीकाळ फसतो. पण जवळ गेल्यावर तेथे पाणी नसल्याचे समजते. पाण्याचे अस्तित्व अल्पकाळ असते. दोराने सापकडून काही काळ अस्तित्व उधार घेतलेले आहे. वाळूने काही काळ पाण्याकडून अस्तित्व उधार घेतलेले आहे. शंकराचार्य सांगतात की आपल्याला या विश्वात येत असलेले सर्व अनुभव या मिथ्या प्रकारात मोडतात.  हे अनुभव/वस्तू काही काळ अस्तित्वात राहणार आहेत. एवढेच नाही तर आपल्याला जाणवत असलेले वस्तूंचे अस्तित्व हे त्यांचे स्वत:चे नाही तर त्यांनी ते 'सत्' कडून उधार घेतलेले आहे. म्हणूनच या वस्तू अनंत काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. याचाच अर्थ आपल्या आसपासचे विश्व - त्यातील गोष्टी आधी अस्तित्वात नव्हत्या, काही काळाने अस्तित्वात नसतील आणि आताही त्या अस्तित्वात असल्याचे जाणवत असले तरी ते अस्तित्व त्यांनी उधार घेतलेले आहे. 

मातीचा घट आहे. तो वस्तूत: केवळ माती (मृदा) आहे. मातीला एक 'रूप' दिलेले आहे. त्या रुपाला आपण एक नाव


(नाम) दिलेले आहे. आणि व्यवहारात त्याचा उपयोग आहे. 'नाम-रूप-व्यवहाराच्या' आवरणामुळे आपल्याला ती माती घटाच्या रूपात दिसते. घटाने त्याचे अस्तित्व मातीकडून उधार घेतलेले आहे. तो आधी माती होता. नष्ट झाल्यावर परत त्याची माती होईल. घटातून माती काढून घेतली तर तो अस्तित्वात राहणार नाही . अगदी तसेच कोणत्याही गोष्टीतून 'सत् ' काढून घेतले तर ती वस्तू राहाणार नाही, अस्तित्वहीन होईल. 

हे विश्व निर्मितीपूर्वी अस्तित्वात नव्हते, प्रलयानंतरही काहीच राहणार नाही. म्हणजेच या विश्वाचा अस्तित्व हा मूलभूत गुण नाही. त्याने तो कशापासूनतरी उधार घेतला आहे. हे 'कशापासून' तेच ब्रह्म आहे. तेच अस्तित्वरूपी आहे. 

आपल्या प्रत्येक अनुभवात दोन गोष्टी निश्चित असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या अनुभवाचा 'विषय' (Object) आणि दुसरे म्हणजे त्या विषयाचे 'अस्तित्व'. अनुभवाच्या विषयामध्ये  त्या विषयाचे रूप आणि नाव असते. उदाहरणार्थ आपण एक घड्याळ बघत आहोत. तर आपण एकाच वेळी घड्याळाचे रूप-नाम बघत असतो आणि त्याचवेळी त्या घड्याळाचे अस्तित्व अनुभवत असतो. आपले अनुभवाचे विषय बदलत असतात. कधी घड्याळ तर कधी पुस्तक ... असे अनेक. पण यातून सातत्याने 'अस्तित्वाचा' अनुभव येत असतो. हा अस्तित्वाचा अनुभव स्थायी असतो, कायम तसाच असतो.  ज्याचा  अनुभव बदलता असतो, अस्थायी असतो ते मिथ्या असते. पण ज्याचा अनुभव स्थायी असतो ते 'सत्' असते. म्हणूनच आपल्याला सतत 'मिथ्या' आणि 'सत्' यांचा एकात-एक गुंफलेला अनुभव मिळत असतो. आपण निरनिराळे विषय - विचार, वस्तू - यांचा अनुभव घेताना त्या मागे अस्तित्वाचा - 'सत्'चा खंबीर आधार उभा आहे हे अनेक वेळा विसरतो. चित्रपट बघताना त्यावरील बदलते प्रसंग मागील पडद्याच्या आधारावर दिसत असतात. पण आपल्याला अनेक वेळा त्या पडद्याचे अस्तित्व जाणवतही नाही. तसेच या बदलत्या 'मिथ्या' अनुभवामागे अस्तित्वाचा - 'सत्' - चा पडदा असतो. त्याच्याच आधारे हा जीवनाचा - विश्वाचा- चित्रपट चालू असतो. 


आणखी एक प्रश्न उद्भवतो. विषय बदलत राहतील पण अस्तित्व कायम असेल असे आपण म्हटले आहे. मग प्रलयानंतर अस्तित्व राहील काय? प्रलयानंतर अस्तित्वाचे- सत् चे - काय होईल? अस्तितवाची जाणीव होण्यासाठी एखाद्या विषयाची (Object) आवश्यकता असते.  अवकाशात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला असतो. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये एखादी वस्तू येते तेव्हाच त्यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे अवकाशातील प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. खिडकीतून प्रकाशाचा कवडसा  आत येतो तेव्हा हवेतील धूलिकणांमुळे त्या कवडशातून येणाऱ्या प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. अन्यथा तेथील प्रकाशाचे अस्तित्व जाणवणार नाही, पण तेथे प्रकाश असेल. तसेच वस्तू अथवा विचार अशा विषया(object)मुळे अस्तित्व जाणवते. या विषयांनी हे अस्तित्व आपल्याकडून (आपण म्हणजे वैयिक्तक 'मी' नाही, तर 'अस्तित्व' ) उधार घेतलेले असते.  जेव्हा प्रलय होईल तेव्हा अस्तित्वाची जाणीव नसेल, पण अस्तित्व असेल. 

शेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपल्या अनुभवाचे विषय (Objects) बदलते असले तरी आपल्याला त्या अनुभवातून जसे या विषयांचे अस्तित्व सतत जाणवते तसेच आपले अस्तित्व हे ही सतत जाणवत असते. याचाच अर्थ आपण अस्तित्व आहोत. आपण सत् आहोत. आपण अस्तित्वरूपी ब्रह्म आहोत. अहम् ब्रह्मास्मि ।



Tuesday, May 31, 2022

कर्मयोग- साधना- ज्ञानयोग - मुक्तीच्या तीन पायऱ्या - भाग १

 सर्व विश्व हे ब्रह्म आहे असे अद्वैत वेदांत सांगते. अद्वैत वेदान्ताच्या दृष्टीतून आपण सगळे सदासर्वकाळ मुक्तच असतो. पण मायेच्या पांघरुणामुळे आपल्याला आपण आणि आसपासचे विश्व ब्रह्म असल्याचा अनुभव येत नाही, मुक्तीचा अनुभव  येत नाही.  जर आपण मुक्तच आहोत तर दैनंदिन जीवनात आपला जो संघर्ष चालू असतो, विविध समस्यांना  आपल्याला सामोरे जावे लागते त्याबाबत हे तत्वज्ञान काय सांगते? वेदान्ताच्या प्रस्थानत्रयींमध्ये भगवद्गीतेला स्थान आहे. गीता कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलेली आहे. त्यात कर्मयोगाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर अद्वैत वेदांताचा संदर्भ काय - अद्वैत वेदांतात कर्मयोगाचे स्थान काय  हे शोधणे नक्कीच उपयोगी ठरेल. 

आपण ब्रह्म आहोत, मग आपल्याला आपण ब्रह्म असल्याचा अनुभव का येत नाही? याचे कारण अज्ञान आहे. अज्ञान दूर करण्याचा मार्ग म्हणजे अर्थातच ज्ञान मिळविणे. हा आहे ज्ञानयोग. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, विविध ग्रंथ यांच्या साहाय्याने अथवा प्रवचने ऐकून आपण ज्ञान मिळवू शकतो. परंतु केवळ वाचन करून अथवा प्रवचने ऐकून आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. अद्वैत वेदान्ताने ज्ञानयोगाच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. 'श्रवण','मनन' आणि 'निजिध्यासन' या त्या तीन पायऱ्या,  

श्रवण म्हणजे एखादी गोष्ट नीट ऐकून अथवा वाचून समजून घेणे. समोरच्या माणसाला काय सांगायचे आहे ते सर्व खाचा खोचांसकट समजून घेणे म्हणजे श्रवण. जे ऐकले आहे त्यावर विचार करून त्यात आलेल्या शंकांचे निरसन करून घेणे म्हणजे मनन. सर्व शंकांचे निरसन झाल्यावर जे ऐकले आहे/ वाचले आहे आणि समजले आहे ते अनुभवाला येते काय हे पाहणे म्हणजे निजिध्यासन. श्रवण-मनन-निजिध्यासन हे एकाच वेळी होऊ शकतात. आपण आधी ऐकल्याचे आज मनन-निजिध्यासन करू शकतो. याच वेळी नवे काही श्रवण करू शकतो. 

मात्र काही जण हे श्रवण-मनन टप्पे पार करूनही 'अहं ब्रह्मास्मि' चा अनुभव येत नाही.  याचे कारण म्हणजे या व्यक्तींचे मन स्थिर नसते. त्यामुळे अनुभव जाणण्यासाठी लागणारी एकाग्रता त्यांच्याकडे नसते. यावर उपाय काय? .... पुढील लेखात याचा विचार करू. 

Tuesday, May 10, 2022

माझा नास्तिकतेकडून अस्तिकतेकडे झालेला प्रवास

माझ्या अनेक फेसबुक मित्रानी माझ्या परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेल्या प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे म्हणून हा लेख. खरे तर मी या विषयावर फारसे बोलत नाही. पण खूप आग्रह झाल्याने हे लिहीत आहे.

माझ्या मते परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फारसे अंतर नाही. मात्र अर्धवट नास्तिकता अथवा अर्धवट अस्तिकता यापासून परम नास्तिकता अथवा परम अस्तिकता फारच दूर आहेत.
मी माझी नास्तिकता अथवा अध्यात्मिक बैठक मागच्या जन्मातूनच घेऊन आलो होतो असे आता वाटते. मी केवळ आठ-दहा वर्षांचा असतानाच माझ्या मुंजीला विरोध केला होता. शेवटी मी बारा वर्षांचा झाल्यावर माझ्या वडिलांनी माझी मुंज सोसायटीच्या गच्चीवर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केली. मी आधीच जाहीर केल्यानुसार माझे जानवे मुंजीच्या दुसऱ्या दिवशी खुंटीला अडकविले ते आजतागायत. कोठलेही धार्मिक विधी करण्यात मला स्वारस्य नव्हते. मी कधीच कोणत्याही पूजेला बसलो नाही - आजही बसत नाही. देवासमोर कसलेही मागणे मागणे मला लहानपणापासून हास्यास्पद वाटत होते. आजही हास्यास्पद वाटते. परमेश्वराने मला जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा कृतज्ञही आहे. पण त्यासाठी ही कृतज्ञता केवळ देवाच्या मूर्तीसमोर व्यक्त न करता मनात असणे मी अधिक महत्वाचे मानतो. म्हणूनच माझे बाह्य वर्तन आजही परम नास्तिकाचेच आहे. या दृष्टीनेच परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फार अंतर नाही असे मी म्हणतो.
मी असा लहानपणापासूनच नास्तिक आणि बंडखोर होतो. सुदैवाने मला माझ्या पालकांनी देवपूजा अथवा कोठल्याही विधीसंबंधी कोठलीही सक्ती केली नाही. माझे लग्नही रजिस्टरच झाले होते. मुंजीनंतर झालेली सत्यनारायणाची पूजा सोडता मी कधीच सत्यनारायणाच्या पूजेला बसलो नाही.
माझ्या या बाह्य वर्तनाने मी नेहमीच 'नास्तिक' म्हणून ओळखला जात होतो. परंतु 'देव' या संकल्पनेबद्दल माझ्या मनात नेहमी विचार चालू असत. म्हणूनच IIT मध्ये असताना मी तत्वज्ञानाचे विषय माझे Elective म्हणून निवडत होतो. तेथेच मला भारतीय प्राचीन तत्वज्ञानाची तोंडओळख झाली.
IIT मध्ये असल्यापासूनच मी रोज संपूर्ण शरीर Relax करीत होतो. झोपून मनानेच शरीराचा प्रत्येक अवयव पूर्ण शिथिल करीत होतो. हे मला कोणी शिकविले नव्हते, तर अंत:प्रेरणेने मी करत होतो. शिक्षण संपवून नोकरीला लागल्यावरही मी रोज हे Relaxation करत होतो.
मी सुमारे तीस वर्षांचा असताना मी खूप आजारी पडलो. यावेळी माझी पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती आणि बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. माझ्या आजाराचे निदान होत नव्हते. अंगात खूप ताप होता. मी खोलीत एकटाच पडून होतो आणि माझ्या शरीराकडे लक्ष ठेऊन होतो. अचानक मला माझ्या शरीरातील रक्तप्रवाह कमी होत आल्याचे जाणवले. मी आता पूर्ण लक्ष माझ्या शरीराकडे दिले. आणि मला अचानक out of the body अनुभव आला. त्यानंतर मी अनेक अनुभवांतून गेलो. माझ्या (जन्माच्या प्रतीक्षेत असलेल्या) बाळाला माझी गरज असेल याची जाणीव होताच मी माझ्या शरीरात क्षणार्धात परत आलो. माझा ताप आता पूर्ण उतरला होता. नंतरही दोन दिवस मला अनेक वेगळे अनुभव येत होते. घरच्यांना (आणि मलाही) मला एखादी मानसिक व्याधी जडली असावी असा संशय आला. मला ठाण्यातील एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. पण त्यांनी मी मानसिकदृष्ट्या संपूर्ण सुदृढ असल्याचा निर्वाळा दिला.
त्यानंतर सुमारे अकरा वर्षे उलटली. मला आलेले out of the body आणि अन्य अनुभव कोणाला सांगितले नव्हते. ज्या जवळच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते मला झालेले भास होते असे सांगून गप्प बसविले होते आणि हे अनुभव विसरून जाण्याचा सल्ला दिला होता. पण अचानक माझ्या अनुभवांचा अर्थ लावणारे गुरु मला भेटले. मला प्राचीन अध्यात्मिक ज्ञानाची आवड असल्याने मी ठाण्यात सहयोग मंदिरातर्फे चालविण्यात येणाऱ्या 'पातंजल योग' अभ्यासवर्गाला गेलो. हा वर्ग 'स्वामी आनंदऋषी' घेत होते. पहिल्या दिवशी वर्ग संपल्यावर मी त्यांना मला अकरा वर्षांपूर्वी आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. त्यांनी लगेच मला त्यांच्या घरी नेले. तेथे अनेकांचे Near Death Experiences (NDE) चे अनुभव संकलित केलेले (त्यांनी लिहिलेले) पुस्तक वाचण्यास दिले. यातील अनुभव आणि मला 'मी शरीराबाहेर पडून परत शरीरात येईपर्यंतचे' अनुभव शब्दश: सारखे होते. मला नक्की काय झाले होते याचे कोडे अकरा वर्षांनी उलगडले होते. मी मृत्यूला स्पर्श करून आलो होतो. (त्यानंतर दोन दिवस येत असलेले अनुभव अद्वैत वेदान्ताच्या मांडणीशी सुसंगत होते हे नंतर लक्षात आले). नंतर स्वामीजींनी हे सर्वसामान्यांना सहसा न येणारे अनुभव का आले असावेत याचा शोध घेतला. तेव्हा मी कॉलेजजीवनापासून करत असेलेले Relaxation म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून 'विपश्यना ध्यान' होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला ताबडतोब विपश्यना शिबिरास जाण्यास सांगितले. त्यानंतर मी आजवर नऊ वेळा विपश्यना शिबीर (प्रत्येकी दहा दिवसांचे) केले आहे आणि विपश्यनेचे तंत्र घोटवून घेतले आहे.
यानंतर माझ्या अध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळाली. स्वामी आनंदऋषी यांच्याकडे ओशोंच्या पुस्तकाचे भांडार होते. स्वामीजी हे ओशोंच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक. स्वामीजी हे व्यवसायाने CA. टाटा हॉटेल्सच्या अमेरिकेतील व्यवसायाचे अर्थविषयक कामकाजाचे उपाध्यक्ष. त्यामुळे त्यांची विविध विषयांवरील मते तर्कशुद्ध आणि स्पष्ट होती. त्यांच्यासोबत अध्यात्मिक संवाद साधताना स्पष्टता मिळत असे. हळूहळू वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. youtube वर स्वामी सर्वप्रियानंद Swamisarvapriyanandafans यांच्याशी सूर जुळले. त्यांच्या भाषणातून अद्वैत वेदान्तातील खाचाखोचा कळल्या. मला तीस वर्षांपूर्वी आलेले अनुभव आणि अद्वैत वेदांत यांची संगती जुळली. सध्या अद्वैत वेदांताचा अभ्यास सुरु आहे.
अशाप्रकारे मी आज परम अस्तिक आहे. या विश्वात ब्रह्माशिवाय काहीही नाही असा मला विश्वास आहे - अनुभव आहे. आजही मी पूजा-अर्चा करीत नाही. भक्तिमार्ग आणि ध्यानमार्ग हे दोन मार्ग ब्रह्मज्ञानाकडे जाणारे मार्ग आहेत. मी ध्यानमार्गाचा साधक आहे.
माझ्या अनुभवांतून एक गोष्ट स्पष्ट होते. आपण मागील जन्मांतून अध्यात्मिक प्रवास केलेला असतो. तेथूनच पुढे सुरुवात करायची असते. म्हणून इतरांकडे बघून, त्यांची कॉपी करून तुमचा प्रवास करू नका. आपण कोठे आहोत, कसा प्रवास केला आहे याचा शोध घ्या आणि आपला मार्ग ठरवा. आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु प्रवासात वेळोवेळी भेटतील. कोणालाही आपल्याला भावलेल्या मार्गाने साधना करण्याची सक्ती करू नका. कोणता माणूस मागील जन्मी कशाप्रकारे साधना करून आला आहे आणि कोणत्या टप्प्याला आहे हे केवळ तोच जणू शकतो.
असा आहे माझा या जन्मातील अध्यात्माचा प्रवास ... परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेला प्रवास.
-------------------------------------------------------------------------------
माझ्या अनुभवानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील. 'मी कधी पूजा-अर्चा करत नाही, मग माझी मूर्तिपूजा, होमहवन इत्यादीसंबंधी भूमिका' इत्यादी. त्याला उत्तर मी वेळोवेळी माझ्या पोस्टमधून दिलेलेच आहे. पण वरील पोस्टचा संदर्भ धरून मी लवकरच अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी वेगळी पोस्ट लिहीन. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. म्हणजे सर्वांना एकत्र उत्तर देता येईल.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, May 9, 2022

सर्वमं खल्व ईदम् ब्रह्म

 आपल्यापैकी अनेकांना आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही तर शरीर मन यांचा अनुभव  घेणारे चैतन्य आहे हे पटते. परंतु चैतन्य हे सर्वव्यापी असून आपण आणि हे विश्व या चैतन्यात प्रकट झालो आहोत, एकाच चैतन्याचा (ब्रह्माचा) भाग आहोत हे समजणे थोडे कठीण जाते. 

सांख्य दर्शन प्रत्येकाचे चैतन्य (पुरुष) वेगळे मानते. तसेच आसपासचे 'जड' विश्व (प्रकृती) या चैतन्यापासून वेगळे आहे असे मानते. पुरुषाला वेगवेगळे 'अनुभव' देणे हे प्रकृतीचे काम आहे  तर पुरुषांमुळेच प्रकृतीचे प्रकटीकरण होते असे हे दर्शन मानते. भारतीय मानसावर सांख्य तत्वज्ञानाचा प्रभाव असल्याने सर्वव्यापी चैतन्यात जड प्रकट होते हे अद्वैत तत्वज्ञान समजण्यास थोडे कठीण जाते. 

आपण प्रथम एक उदाहरण घेऊ आणि नंतर आपल्या अनुभवाचे विश्लेषण करून अद्वैत तत्वज्ञान समजून घेऊ. आपल्याकडे सोन्याच्या पाटल्या आहेत. त्या पाटल्यांना 'पाटल्या' म्हणता येईल तसेच 'सोने' ही म्हणता येईल. हे दोन वेगळे पदार्थ नाहीत, तर एकाच आहे. त्या वितळावल्या तर पाटल्या नष्ट होतील, परंतु सोने तसेच राहील. त्या सोन्याचा आपल्याला नेकलेस बनविता येईल.  म्हणजे खरे तर तो पदार्थ 'सोने' आहे. त्याच्या रूप, नाम, उपयोगामुळे आपण त्याला वेगळा पदार्थ म्हणू. परंतु पाटल्या या अंतर्बाह्य सोनेच आहेत. म्हणजे त्या सोन्याने 'व्याप्त' आहेत. सोने काढले तर पाटल्या राहणार नाहीत, पण पाटल्या वितळवून नष्ट केल्या तर सोने शिल्लक राहील. 

आता आपण आपल्या रोजच्या जीवनातील एक प्रसंग घेऊ आणि त्याची संगती वरील उदाहरणाशी जोडता येते का ते पाहू. आपल्याला झोपेत स्वप्न पडते. प्रत्येक स्वप्नात आपण असतो. आजूबाजूला अन्य माणसे असतात. आपल्या आसपासचे विश्व उभे असते.  हे स्वप्नातील विश्व आपल्या मनाने निर्माण केलेले असते.  जसे दागिन्यांचा आधार सोने असते तसे मन हेच स्वप्नातील विश्वाचा आधार असते.  स्वप्नातील 'आपलाही' आधार मनच असते. त्यातून मन बाहेर पडताच (शांत झोप लागल्यावर) हे विश्व विलीन होते. हे स्वप्नातील विश्व आपल्या 'मनात' निर्माण होते, मनातच विलीन पावते.

अगदी अशाच प्रकारे आपले जागेपणीचे विश्व चैतन्यात निर्माण होते आणि चैतन्यातच  विलीन पावते.  आपल्या स्वप्नात आपण असतो तसेच या जगातही आपण असतो. हे आपण म्हणजे सर्वव्यापी चैतन्य अथवा 'साक्षीचैतन्य' आहे. जागेपणीच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट म्हणजे 'चैतन्याचा' आविष्कार आहे, चैतन्याने घेतलेले रूप, नाम आहे आणि त्याचा उपयोग आहे. महासागरात लाटा उसळतात आणि महासागरातच विलीन होतात. प्रत्येक लाट म्हणजे केवळ वेगवेगळे रूप घेतलेले पाणी असते. तसेच या विश्वातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळे रूप घेतलेले चैतन्य आहे. आणि हे सर्व चैतन्याच्या महासागरातच घडत आहे. 

गाढ झोपेत (सुषुप्ती) हे सर्व विश्व चैतन्यात विलीन पावते. तेथे फक्त आपण असतो. म्हणूनच झोपेतून उठल्यावर आपण गाढ झोपेचा अनुभव सांगू शकतो. 

Saturday, May 7, 2022

The Hard Problem of Consciousness: Part 2

 मागील भागात आपण डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने मांडलेला The Hard Problem of Consciousness काय आहे याची तोंडओळख करून घेतली. आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या विविध संवेदना मेंदूपर्यंत कशा पोचतात हे दाखविण्यास प्रचलित विज्ञान समर्थ आहे. परंतु या संवेदनांचे अनुभवात रूपांतर कसे होते आणि त्याद्वारे विविध भावभावना कशा उत्पन्न होतात हे दाखविण्यास सध्याचे विज्ञान असमर्थ आहे हे डेव्हिड चालमर्स यांनी दाखवून दिले आहे. काही भौतिकवादी (Materialistic) शास्त्रज्ञांच्या मते भविष्यकाळात विज्ञान पुढे सरकले की हे दाखविण्यास समर्थ ठरेल. या शास्त्रज्ञांचा 'हे जग पदार्थ-ऊर्जा यांनी बनलेले आहे आणि त्याव्यतिरिक्त काहीही नाही' यावर गाढ विश्वास आहे. या उलट अनेक शास्त्रज्ञ 'चैतन्य' हे पदार्थ-ऊर्जेपेक्षा वेगळे असल्याचे मानतात.


काही शास्त्रज्ञानी Hard Problem of Consciousness सारखाच Hard Problem of Matter असल्याचे दाखवून दिले आहे. सध्याचे भौतिक शास्त्राचे नियम पदार्थांचे एकमेकांवरील परिणाम दाखविते. म्हणजेच ते Software आहे. परंतु प्रत्येक softwear मागे त्याला आधार देणारे hardware असावे लागते. हे hardware काय आहे हे सध्याचे विज्ञान सांगू शकत नाही असे हे शास्त्रज्ञ मानतात. Matter म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास जेवढे अधिक खोलात जाऊ तेवढे नवे विसंवाद सापडत जातात. विज्ञान अधिक आपल्याला अधिकाधिक गोंधळात पाडते. विज्ञानाच्या मुळापर्यंत आपण आलो असे वाटत असतानाच Heisenberg's principle of uncertainty नी आपल्याला धक्का दिला. तसेच प्रकाश हा किरणांच्या स्वरूपात जातो या आपल्या दृढ समजुतीला धक्का मिळाला आणि आता प्रकाशाच्या या विसंगत आचरणातील संगती शोधण्याची प्रयत्न चालू आहेत. तीन मितींपेक्षा अधिक मिती असण्याची शक्यता दिसते आहे. या परिस्थितीत आपले तीन मितींमधील अवकाशावर (space) आधारलेले विज्ञान अपुरे भासू लागेल. काही दशकांपूर्वी मानवाला वाटत होते की लवकरच त्याला विज्ञानाची सर्व कोडी उलगडतील आणि विश्वनिर्मितीचे गूढ उकलेल. पण आपण जसे विज्ञानाच्या खोलात शिरत आहोत तशी विज्ञानाची सर्व कोडी उलगडण्याचे शक्यता धूसर होत चालली आहे. असे असेल तर भविष्यात पदार्थापासून (Matter) चैतन्याची निर्मिती होते हे दाखविण्याची आणि तसे प्रयोगाने करून दाखविता येण्याची शक्यता मला फारच कमी वाटते.
मग अशा वेळी आपल्याला उपनिषदे लिहिणारे प्राचीन ऋषी मार्ग दाखवितात. ध्यानस्त अवस्थेत असताना झालेले चैतन्य-पदार्थ संबंधातील ज्ञान ते आपल्यापुढे ठेवतात. हे ज्ञान आपण अंधभक्तीने जसेच्यातसे न स्वीकारता आपल्या दैनंदिन अनुभवांच्या कसोटीवर पारखून घ्यावे अशीही त्यांची अपेक्षा आहे. उपनिषदांत ऋषींनी काय सांगितले आहे ते पुढील लेखांत पाहू.
संतोष कारखानीस ठाणे