Thursday, July 20, 2023

आपल्या इतिहासाची मोडतोड कोणी केली?

आपण ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास शिकलो आहोत/शिकत आहोत. आपले सध्याचे केंद्र सरकार त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्या मनात ब्रिटिशांनी शिकवलेलाच इतिहास आहे. त्यामुळे सरकारचा प्रयत्न म्हणजे आपल्याला इतिहासाचे भगवेकरण वाटते.  म्हणूनच आपल्या इतिहासाची मोडतोड कोणी केली, हे कधीपासून सुरु झाले हे आपण नीट समजून घेणे आवश्यक आहे. 

आपल्या परंपरेत इतिहास लिहिला जात नाही. म्हणून आपला इतिहास ज्ञात नाही असे आपल्याला सांगितले जाते. पण हे अर्धसत्य आहे. आपले पूर्वज इतिहास लिहीत होते. त्यातील काही आजही पाहण्यास मिळतो. उदाहरणार्थ कल्हानाणी सुमारे एक हजार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये  लिहिलेला राजतरंगिणी आजही उपलब्ध आहे. भारतात अनेक विश्वविद्यालय होती. त्यातील ग्रंथालयांमध्ये हा इतिहास उपलब्ध होता. परंतु सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या सर्व विश्वविद्यालयांमधील पुस्तके जाळण्यात आली. केवळ नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय काही महिने जळत होते.  त्यानंतर आपल्या पूर्वजांनी आपल्या इतिहासाचे स्मरण अनेक पाड्यातून ठेवले आणि मौखिक परंपरेने हा इतिहास जिवंत ठेवला. परंतु जेव्हा येथे युरोपियन्स आले त्यांनी आपल्याला सांगण्यास सुरुवात केली की हा मौखिक परंपरेने आलेला इतिहास म्हणजे भाकडकथा आहेत.  आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आपला इतिहास लिहिणे चालू केले. आपण हाच इतिहास शिकलो. 

जेव्हा युरोपियन्स भारतात आले तेव्हा त्यांचा प्रगत संस्कृतीशी प्रथमच परिचय झाला. अशी प्रगत संस्कृती पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी आपल्या कुटुंबव्यवस्थेची खूपच स्तुती केली होती. खरे तर या वेळपर्यंत तुर्की आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर प्रहार केलेले होते. संस्कृतीची नासधूस झालेली होती. मात्र नंतरच्या काळात येथे ख्रिश्चन मिशनरी आले. त्यांनी येथील संस्कृतीवर प्रहार करायला सुरुवात केली. या मिशनऱ्यांच्या प्रवेशामुळे भारतात आपल्या व्यापारावर परिणाम होतो अशी ईस्ट इंडिया कंपनीची धारणा झाली होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात मिशनऱ्यांच्या प्रवेशाला हरकत घेतली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारतीय संस्कृती आवडत होती. परंतु मिशनऱ्यांच्या लॉबीने पार्लमेंटच्या सभासदांना आपल्या बाजूला वळविले. इ.स. १८१३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर त्यांचा चार्टर अमेंड करण्याची सक्ती केली आणि येथे मिशनऱ्यांचा प्रवेश सुकर झाला. या मिशनऱ्यांनी  भारतीय संस्कृतीला जंगली ठरविले. 

जेम्स मिल हा स्कॉटिश माणूस चर्चचा मिनिस्टर होता. त्याला पाद्री बनायचे होते. परंतु त्याला काही कारणाने पाद्री होता आले नाही. मग तो लंडनला आला. त्याला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम मिळाले. त्याने भारताचा इतिहास लिहिण्यास घेतला. जेम्सला कोणतीही भारतीय भाषा अवगत नव्हती. तो कधीही भारतात आला नव्हता. तरीही त्याने भारताचा इतिहास लिहिण्यास घेतला. त्याने भारताच्या इतिहासाचे तीन खंड लिहिले. त्याचे नाव आहे James Mills History of India. ते १८०५ साली प्रकाशित झाले. त्याच्या मते त्याने कधीही भारताला भेट न दिल्याने त्याने लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ठ आहे.  जेम्स मिल स्वत: स्कॉटलंड मधून, म्हणजेच ब्रिटिश वसाहतीतून आलेला होता. ब्रिटिशांचा सच्चा सेवक मनात होता आणि भारताची संस्कृती बदलण्याच्या मिशनरी प्रयोगास त्याची मान्यता होती. त्याला हिंदूंबद्दल खूप आकस होता. त्याच्या मते हिंदू हे केवळ गुलाम बनण्याच्याच लायकीचे होते.   त्याच्या मते ब्रिटिश  भारतीय लोकांना सुसंस्कृत बनविण्याच्या मोहिमेवर भारतात आले आहेत. म्हणूनच या त्याने लिहिलेली भारताच्या इतिहासाची मध्यवर्ती कल्पना हीच आहे. ईस्ट इंडिया कंपनीने यांच्या भारतात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला भारतात येण्यापूर्वी या जेम्स मिल याने लिहिलेलय इतिहासाच्या अभ्यास करणे अनिवार्य  केले होते. त्यामुळे त्यानंतर भारतात येणार प्रत्येक इंग्रज अधिकारी हा हिंदूंबद्दल आणि भारतीयांबद्दल तुच्छता मनात ठेऊनच भारतात पाऊल टाकीत असे. यामुळे या नंतरच्या काळात येथे ब्रिटिशांची दंडेली चालू झाली.  येथे भारतीयांना आणि विशेषतः हिंदूंना अपमानास्पद वागविणे आणि धर्मांतरं करणे हीच आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटू लागले.

त्यानंतर मॅक्स मुल्लरने भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानेही आधी जेम्स मिल याच्या पुस्तकाचा अभ्यास केला होता. त्याला भारतीय संस्कृतीतील चांगुलपणा दिसत होता. पण त्याच्या मते येथील मूळच्या 'जंगली' भारतीयांमध्ये अशी संस्कृती उपजणे शक्य नव्हते. मग त्याने उच्च वर्णीय 'आर्य' युरोपातून भारतात आले असल्याचे प्रतिपादन केले.  सुमारे ख्रिस्तपूर्व १५०० साली हे 'आर्य' भारतात आले असल्याचे त्याने सांगितले.  या आर्य आक्रमण थिअरीचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला म्हणजे 'हिंदू' धर्म भारतात युरोपमधून आला आणि तो येथील मूळ रहिवाशांवर लादला गेला. दुसरा भाग म्हणजे 'संस्कृत' ही मूळची भारतीय भाषा नाही. ती युरोपमधून येथे आली. 

बिशप रॉबर्ट कॉलवेल हा दक्षिण भारतात लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु त्याला अपयश येत होते. या माणसाने मग भारताच्या इतिहासाला अधिक विकृत बनवून आपले कार्य साध्य करण्याचा प्रयत्न केला. या माणसाने 'द्रविड' वादाला जन्म दिला. दक्षिणेतील ब्राह्मणेतर लोक हे द्रविड असून त्यांना 'आर्य' ब्राह्मणांनी गुलाम बनविले असल्याचा विचार त्याने मांडला. खरे तर हा रॉबर्ट युरोपातून आलेले  'आर्य ब्राह्मण'  अधिक सुसंस्कृत असल्याचे मनात होता. परंतु आपला धर्मांतरणाचा हेतू  करण्यासाठी त्याने तथाकथित द्रविड लोकांना भडकविण्यास सुरुवात केली. त्याने अनेक पुस्तके तामिळ भाषेतून लिहिली.  आजही भारतीय क्रमिक अभ्यासात ही आर्य-द्रविड कल्पना 'इतिहास' म्हणून सांगितली जाते. वस्तूत: या कल्पनेला काहीही आधार नाही. ही खोटी कल्पना पसरवून भारतीय समाजात फूट पडणाऱ्या रॉबर्ट कॉलवेलचा भव्य पुतळा आजही चेन्नईचा मरिनाबीचवर आहे. त्याला राजकीय पक्षांकडून वेळोवेळी हारही घातले जातात.  

पुढील काळात पौर्वात्य  इतिहासाचा अभ्यास युरोपमधील महाविद्यालयात चालू झाला. हे अर्वाचीन इतिहास संशोधक युरोपमध्ये राहूनच तेथे उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे हा अभ्यास करत होते. हा अभ्यास प्रामुख्याने इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषेत होत होता.  हा अभ्यास म्हणजे पौर्वात्य इतिहासाच्या फार खोलात न शिरता इतिहासाची ढोबळ मांडणी होती. जेम्स मिल, मॅक्स मुल्लर अशा भारतीय इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या लेखकांचा आधार या अभ्यासात घेतला गेला. त्यामुळे भारतीय आणि  पौर्वात्य संस्कृती जंगली असल्याचेच त्यात दाखविले गेले. उदाहरणार्थ भारत हा गारुड्यांचा देश आहे अशी प्रतिमा त्यांच्याकडून उभी केली गेली. भारतीय इतिहासाचे बाळकडू पाश्चात्य पुस्तकातून घेतलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी त्याला हातभार लावला. आपल्या संस्कृतीचे  करतानाही त्या चित्रकारांच्या मनात अशीच प्रतिमा होती. म्हणून अशीच चित्रे भारतात येऊन पाश्चात्य चित्रकार काढू लागले. संस्कृती जंगली आहे हे दाखविताना जगन्नाथ यात्रेत दरवर्षी अनेक जण रथाखाली चिरडले जातात अशासारखा प्रचार सुरु झाला. सतीची परंपरा भारतात सर्वमान्य आहे आणि नियमित पाळली जाते असे दाखविले गेले. भारतात नरबळींची प्रथा सर्वमान्य असल्याचे दाखविले गेले.  जातिप्रथेचे विकृत वर्णन केले गेले. यातून पाश्चात्यांना भारतीय समाजाला सतत अपमानित करायचे होते. भारतीय समाज जंगली असल्याने पाश्चात्य त्यांना संस्कृती शिकवतील,  त्यातून पौर्वात्य समाज अधिक मोठ्या प्रमाणात गुलामीत ढकलला जाईल असा हेतू होता. एका अरब-अमेरिकन विचारवंत एडवर्ड सैद याने १९७० मध्ये यावर प्रकाश टाकला आहे. आजही आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये ही वृत्ती कमी-अधिक प्रमाणात दिसते. विशेषतः हिंदू धर्माबद्दल ही वृत्ती स्पष्टपणे दिसते. सध्याच्या साहू-राजकीय परिस्थितीमुळे अशा प्रकारे भारतीय समाजाला अपमानित करण्याचा प्रयत्न या राष्ट्रांकडून होत असतो. यावर आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अत्यंत स्पष्टपणे बोलतात. आपलेच डावे  विचारवंत अत्यंत उत्साहाने भारतीय समाजाला परदेशात अपमानित करण्यात भाग घेताना दिसतात. 

मागील हजार वर्षांचा इतिहास तर बराचसा पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. या कालखंडात भारतीयांचे आणि विशेषतः: हिंदूंचे पद्धतशीर शिरकाण झाले.  प्रथम तुर्कांच्या आक्रमणात हे शिरकाण झाले. नंतर ब्रिटिशांच्या काळात कृत्रिम दुष्काळात येथे लाखो भारतीय बळी पडले. गोव्यात इन्क्विझिशनमध्ये अनेक हिंदूंना हाल हाल करून मारले गेले. परंतु याबाबत जगातील आणि भारतातील सगळे इतिहासकार मूग गिळून बसलेले दिसतात. आपल्या कोठल्याही शाळेत शिकविल्या जाणाऱ्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात याचा पुसटसा उल्लेखही नाही.  याबाबत ब्रिटिश इतिहासकारांनी काही लिखाण केले आहे. उदाहरणार्थ Elies Endowsan. खरे रे तर Henry Elies यांनी हे लिखाण करण्यास घेतले होते. Elies Endowsan यांनी ते पूर्णत्वास नेले. आठ खंडात हा ग्रंथ लिहिलेला आहे. सुमारे दोनशे अरेबिक आणि पर्शियन लेखकांच्या लिखाणाचा संदर्भ या ग्रंथाला आहे. हे अरेबिक आणि पर्शियन लेखक भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांच्या पदरी होते. जेव्हा इंग्रजांनी भारतात धर्माच्या नावाखाली दुही माजविण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा ग्रंथ अतिरंजित असल्याचा प्रचार ब्रिटिशांच्या छत्राखाली असलेल्या येथील इतिहासकारांनी सुरु केला. स्वातंत्र्यानंतर त्याचीच री येथील डाव्या विचारवंतांनी ओढली. 

भारतीय हे केवळ गुलामी करण्याच्या लायकीचे आहेत असा समज ब्रिटिश राज्यकर्त्यांचा असताना मात्र अमेरिकेत वेगळेच चित्र दिसत होते. १९ च्या  शतकाच्या पूर्वार्धात तेथील सगळ्या युनिव्हर्सिटीज भारतीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भरभरून वहात होत्या.  भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ हिच्या वडील (अथवा आजोबा .. नक्की लक्षात नाही) यांनी अमेरिकेतील एका प्रसिद्ध विद्यापीठात १८७० सालच्या आसपास आपले शिक्षण पूर्ण केले.  भारतात येऊन त्यांनी ठाणे  जिल्ह्यातील मनोरजवळ एक बँक सुरु केली. या बँकेतून १८५७ स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांच्या हातात न सापडलेल्या आणि अजूनही भूमिगत राहिलेल्या स्वातंत्र्ययोद्धयांना मदत केली जात होती. ब्रटिशांच्या हे ध्यानात येताच त्यांनी शिलोत्री यांना अटकेत टाकले. बँक बंद केली. शिलोत्री यांचा अंत तुरुंगातच झाला. अमेरिकेत शिकत असलेल्या भारतीयांनी कॅलिफोर्नियात गदर पार्टीची स्थापना केली होती. या गदर पार्टीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली.  

प्राचीन भारतीय साम्राज्यांबद्दलही माहिती शाळेच्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात येणार नाही अशी काळजी ब्रिटिशांनी घेतली होती. हीच प्रथा पुढे आपल्या राज्यकर्त्यांनी चालू ठेवली. गुप्त साम्राज्याचा ओझरता उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकात होता. दक्षिणेतील चोळ साम्राज्याचा गौरवशाली इतिहासाचा आपल्याला पत्ताही नसतो. हे साम्राज्य सुमारे १५०० वर्षे गादीवर होते. त्यांनी अगदी सिंगापूरपर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला होता. सिंगापूर ज्याने वसविले तो राजा या चोळ वंशातील होता. एकदा या चोळ साम्राज्याचा सम्राट निपुत्रिक असल्याने काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा व्हिएतनाम येथे राज्य करीत असलेल्या चोळ घराण्याच्या वंशज राजकुमाराला येथे आणून गादीवर बसविण्यात आले. चोळ साम्राज्याने एका बिकट प्रसंगी चीनच्या राजालाही बेजिंगपर्यंत आपले आरमार पाठवून मदत केली होती. त्या काळी चोळ साम्राज्याचे नौदल हे जगातील एकमेव Blue Water Navy होते. पण हा गौरवशाली इतिहास आम्ही कधी शिकलोच नाही.  वास्को द गामा याला भारताचा रस्ता राम नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने दाखविला होता. हा व्यापारी बारा गलबते घेऊन आफ्रिकेत गेला होता. तेथे त्याची वास्को द गामा बर्बर मैत्री झाली. वास्को द गमाने त्याला केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात कसे जायचे याचे मार्गदर्शन केले होते. पण हा इतिहास आम्हाला कधी सांगितलं गेलाच नाही. कोरियाची राणी ही अयोध्येची राजकन्या होती. तिच्या सोबत गेलेल्या पंडितांनी  कोरियन लिपी तयार केली आहे. म्हणून ती 'बाराखडी' या स्वरूपात आहे याचा आम्हाला कधी पत्ताच लागू दिला नाही. कुशाण हे परकीय हूण होते असेच शिकविले गेले. कुशाण हे हूण वंशाचे नव्हते. ते भारतीय वंशाचेच होते. ते कुरु प्रदेशातून आलेले होते. हा भाग काश्मीरच्या उत्तरेला आहे.  तो भाग भारतीय म्हणूनच ओळखला जात होता. त्यांची भाषाही भारतीय भाषासमूहामधील होती. त्यांची संस्कृती भारतीय होती. आणि त्यांचे भारतीय संस्कृतीत मोठे योगदान आहे. कुशाण राजांपैकी कनिष्कने पूर्ण पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृती लोकप्रिय केली. कनिष्कने पाडलेली नाणी मिळाली आहेत. त्यावर एका बाजूस कनिष्क राजाचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूस देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. यात अनेक देवदेवता आहेत. यात हिंदू, ग्रीक आणि बौद्ध देवतांच्या प्रतिमा आहेत. त्यापैकी सुमारे पाच टक्के नाण्यांवर गौतम बुद्धाच्या प्रतिमा आहेत. परंतु केवळ या आधारावर कनिष्काला बुद्ध धर्मीय ठरवले गेले. खरे तर बौद्ध हा येथील हिंदू धर्माचाच एक पंथ होता. त्याला राजकीय कारणांसाठी नंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी (जेम्स मिल याने मुख्यतः:) हिंदू धर्मापासून वेगळे केले. अशा प्रकारे पूर्णतः अशास्त्रीय संशोधनातून येथील हिंदू संस्कृतीवर, हिंदू आत्मविश्वासावर सातत्याने प्रहार करण्यात आले. 

पाठयपुस्तकातील  इतिहास केवळ मुघल साम्राज्याचे वर्णन करणारा असतो. मुघल हे तुर्की होते. त्यांना आपले पूर्वज 'तुरुष्क' या नावाने ओळखत. नरहर कुरुंदकर यांनी वर्णन केल्याप्रमाणे आपल्या इतिहासाचे इंग्रजांनी अशास्त्रीय तुकडे तोडले आहेत. यामुळे मुस्लिमांचा आपण भारतावर राज्य केले. म्हणून आपण हिंदूंपेक्षा वरचढ आहोत असा समज होतो. हिंदूंना आपण 'गरीब बिच्चारे' आहोत असे वाटून हीनगंड निर्माण होतो. तर ब्रिटिशांनी नंतर सर्वांवर राज्य केल्याने ते हिंदू-मुस्लिमांपेक्षा वरचढ असल्याची भावना निर्माण होते.  ब्रिटिशांनी असा इतिहास आपल्याला शिकविला.  ब्रिटनमध्ये जॉन मिलचा इतिहास वाचून Discovery of India सारखी पुस्तके लिहीत भारत शोधणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना आपला गौरवशाली इतिहास कधी कळलाच  नाही. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या तेव्हाच्या सरकारने स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे पूर्णतः तोडमोड केली. सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतीकारकांना दुर्लक्षित करण्यात आले. जागोजागी ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या आदिवासी जमातीच्या योगदानाचा कोठेच उल्लेख नाही. 


अध्यात्मिक भाषा

अध्यात्मिक अनुभव सांगताना अथवा अध्यात्मिक विषय समजावून सांगताना भाषा तोकडी पडते.  आपण आपली भाषा अनुभवाद्वारे शिकतो. उदाहरणार्थ लाल फुल दाखवून हा लाल रंग आहे असे लहान मुलाला (रंग ही संकल्पना माहीत नसलेल्या) सांगितले तर त्याला कळणार नाही. पण लाल फुल आणि लाल रंगाची अन्य गोष्ट एकाचवेळी दाखवून दोन्ही लाल आहे असे सांगितले तर तो कदाचित लाल म्हणजे काय हे समजू शकेल. म्हणजेच भाषा समजण्यासाठी आधी अनुभूती यावी लागले. या अनुभूतीचा अर्थ लावण्याची क्षमता अंगी बाणवावी लागते. 

आपण दुसरे उदाहरण घेऊ. एखाद्या माणसाने आयुष्यात कधीही गोड  पदार्थ खाल्ला नसेल तर त्याला केवळ शब्दांनी गोड म्हणजे काय हे कळणार नाही. मग त्याला आपण 'ते खाल्ल्यावर छान वाटते' इत्यादी भाषेत समजाविले तरी त्याला त्या चवीचे पूर्ण आकलन होणार नाही. 

अध्यात्मात एखादी संकल्पना अथवा अनुभव स्पष्ट करताना हीच समस्या समोर उभी ठाकते. एखाद्याला अध्यात्मिक अनुभव नसेल (आणि तो अनेकांना नसतो) त्याला काही अनुभव आलेला सांगणार कसा? मग त्या अनुभवाच्या जवळपास जाणारे काहीतरी म्हणजे 'प्रकाश दिसला' वगैरे सांगावे लागते. पण ते पूर्णपणे सत्य नसते. 

म्हणूनच अध्यात्मिक अनुभव शब्दात उतरताच 'असत्य' होऊन जातो.  अध्यात्मिक अनुभव आलेले अनेक साधक यामुळेच अनुभवासंबंधी काहीही वाच्यता न करणे अधिक शहाणपणाचे समजतात. 

रंग

 रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो 
गालावरची एक खळी तळहातावर घेऊन आलो 

 रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो 
तळहातावरची एक रेषा तुझ्या गालावर ठेऊन आलो 

 रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो 
तुझ्या तळहातावरच्या सर्व रेषा गालावर घेऊन आलो


कवी : राजेश कुलकर्णी आणि अन्य .. फेसबुक वॉल वरून. 

भक्तिमार्ग

 अद्वैत वेदांत परोपरीने हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की आपण आणि हे केवळ ब्रह्म आहोत. मग जेव्हा भक्तीचा प्रश्न येतो, मंदिरात जाण्याचा प्रश्न येतो तेव्हा वाटते, मी तर ब्रह्म आहे, मी केवळ साक्षी चैतन्य आहे. मग मी भक्ती कोणाची करायची? साक्षीचैतन्याबद्दल  माझ्या मनात कोणतीही भावना नाही. ना प्रेमाची, ना द्वेषाची. मग मी भक्ती कसली करू? मी माझीच भक्ती करू? माझ्यापुढेच नतमस्तक होऊ? 

हा प्रश्न योग्य आहे. कारण भक्तिभाव हा फक्त एखाद्या Object बद्दल असू शकतो. ज्याला आपले चैतन्य जाणू शकते त्याला Object म्हणतात. म्हणूनच Object आणि चैतन्य हे भिन्न असतात. चैतन्य हे चैतन्यालाच जणू शकत नाही. म्हणून ते Object नाही.  मग या साक्षी चैतन्याबद्दल भक्तिभाव कसा जागवायचा?

खरे तर याचे उत्तर आपल्या प्रश्नातच दडलेले आहे. 'मी भक्ती कोणाची करायची?' या प्रश्नातील 'मी' हे केवळ ब्रह्म अथवा साक्षीचैतन्य नाही. येथे 'मी' याचा अर्थ चैतन्यासहित मायेने उभे केलेले माझे स्थूल शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर आहे.  या मायेच्या 'नाम-रूपाच्या' पांघरुणामुळेच मी अन्य व्यक्तींपासून, अन्य वस्तूंपासून वेगळा झालेलो आहे. 'मी' एक Object आहे.  तेव्हा या 'नाम-रूपाच्या' पांघरुणाखालील 'मी' ने याच  मायेने नाम-रूपाचे पांघरूण  घालून आपल्यासमोर उभ्या केलेल्या देवतेचे ध्यान करायचे आहे. याच मायेने या देवतेला असीम शक्तीही दिलेल्या आहेत. आणि हा मायेचा खेळ या विश्वापुरता आहे.  ते या व्यावहारिक पातळीवरील सत्य आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी आपण भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्ग अवलंबितो तेव्हा आपण व्यावहारिक पातळीवर जगत असतो. तेव्हा 'मी माझीच भक्ती कशी करू?' हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. 

विज्ञाननिष्ठा

 माझा जवळचा मित्र आणि मी राष्ट्रसेवादलात असतानाचा माझा जुना सहकारी असलेल्या एकाने माझ्या एका पोस्टवर कॉमेंट करताना 'विज्ञाननिष्ठेचा' उल्लेख केला. राष्ट्र सेवादलाच्या पाच तत्वांपैकी विज्ञाननिष्ठा हे एक तत्व आहे. माझा हा मित्र १९८२ साली राष्ट्रसेवादलाने महाराष्ट्रात काढलेल्या विज्ञानयात्रेत सहभागी झाला होता. त्यामुळे विज्ञाननिष्ठा या तत्वाबद्दल त्याची बांधिलकी मी समजू शकतो. 

विज्ञाननिष्ठा हे तत्व राष्ट्रसेवादलाने स्वीकारले असले तरी दुर्दैवाने त्याबाबत स्पष्टता नाही. काही नव सेवादलसैनिक  या तत्वाला 'देवधर्मविरोध' असेही मानतात. खरेतर राष्ट्रसेवादलाचे एक आद्य नेते आणि ४२च्या चलेजाव आंदोलनाच्या पाच तरुण नेत्यांपैकी एक 'अच्युतराव पटवर्धन' हे स्वातंत्र्य मिळाल्यावर वाराणशीला जाऊन ध्यानधारणेत रमले होते. आयुष्याच्या अखेरीस ते परत आपल्या घरी पुण्यात आले. पण त्यांनी विजनवासात राहणे पसंत केले. पुण्यात राष्ट्र सेवादलाचे मुख्य कार्यालय असूनही राष्ट्रसेवादलाच्या कोठल्याच कार्यक्रमात ते दिसले नाहीत. कदाचित सेवादलाच्या नवीन नेतृत्वाने सेवादलाच्या पंचतत्वांचे जे अर्थ लावले आहेत ते त्यांना मान्य नसावेत.  राष्ट्रसेवादलाच्या पंचतत्वांवर सेवादलात कधीही विचारमंथन होताना दिसत नाही. नव्या साथींना या पंचतत्वांबद्दल पुसटशीही माहिती नसावी. 

विज्ञाननिष्ठा या नावातच विरोधाभास भरलेला आहे असे मला वाटते. निष्ठा ही एखाद्या चिरस्थायी तत्वावर ठेवायची असते. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत या विश्वाच्या सर्व रहस्यांचा शोध लवकरच विज्ञान लावेल असा विश्वास वाटत होता. न्यूटोनियन फिजिक्स हे अंतिम तत्व मानले गेले होते. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समजुतींना हादरे बसण्यास सुरुवात झाली. Relativity सिद्धांतामुळे न्यूटनचे नियम एका विशिष्ट  परिस्थितीत सत्य आहेत हे लक्षात आले. Heisenberg uncertainty principle ने विज्ञान निश्चित काही सांगू शकेल का नाही याबद्दल शंका निर्माण केल्या. विश्वाचे रहस्य उलगडताना विश्वाचे प्रसारण होण्याचा वेग वाढत असल्याचे ध्यानात आले. यासाठी ऊर्जा कोठून येते हे समजेना. मग या उर्जेला डार्क एनर्जी असे नाव दिले गेले. ही अज्ञात ऊर्जा एकूण ऊर्जेच्या ९६ टक्के आहे असे दाखवून दिले गेले. हे विश्व प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रसरण पावत आहे हे लक्षात आले. आजवर प्रकाशाचा वेग ही सर्वोच्च वेग मानला जात होता. मग या विश्व प्रसरणाच्या वेगाचे रहस्य निर्माण झाले. आता तर विश्वाचे गुरुत्वाकर्षण बल कमी होत चालले असून त्यातून मुक्त होणारी ऊर्जा ही विश्व प्रसरणासाठी वापरली जाते असा सिद्धांत आला आहे. 

सूक्ष्मात अधिक शिरल्यावर अणूचे विभाजन होते हे लक्षात आले. या कणांचे आधी विभाजन करताना केवळ सूत्रे हातात आली. यावरील गणिते करताना दहा मिती गृहीत धरल्या तर गणिते सोडविता येतात हे ध्यानात आले. आपले विश्व आणि विज्ञान चार मितींवर (काळ आणि लांबी, रुंदी, खोली) आधारलेले आहे. मग विश्व निर्मितीच्या महास्फोटात चार मिती आपल्या विश्वात आल्या आणि सहा मितींचे वेगळे विश्व अथवा विश्वे निर्माण झाली काय हा प्रश्न पडतो. या अन्य मिती असलेले विश्व कदाचित आपल्या आसपासच असू शकेल. 

Hard Problem of Consciousness हा विज्ञानाला पडलेला प्रश्न आहे. आपली ज्ञानेंद्रिये माहिती  गोळा करतात. ती मेंदूपर्यंत कशी जाते याचा शोध विज्ञानाला लागलेला आहे. पण या विद्युत स्पंदनांचे परत माहितीत (चित्र, गंध इत्यादी) रूपांतर कसे होते, आपल्या चैतन्यासमोर ते कसे उभे ठाकते हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. 

केवळ धर्माला विरोध करणे, केवळ प्रचलित विज्ञाननियमांत बसत नाही म्हणून निरनिराळ्या बाबांचे चमत्कार खोटे ठरविणे हीच जर विज्ञाननिष्ठा असेल तर हा फारच उथळ विचार आहे असे म्हणावे लागेल. विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपल्या विचारात स्पष्टता आणावी ही विनंती. 



देव-देवता

 जर आपण सगळे ब्रह्म आहोत तर विविध देवता कोण आहेत? आपण त्यांची उपासना करण्याची गरजच काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. (माझ्या आठवणीप्रमाणे अशा स्वरुपाचा The Kerala Story या चित्रपटात अन्य धर्मियांकडून उपस्थित केलेला दाखविला आहे).

यासाठी आपल्याला आपल्या प्राचीन तत्वज्ञानामधील 'विवर्त' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. 'सत्य' हे अनेक पातळीवर अस्तित्वात असते. उदाहरणार्थ स्वप्नात आपल्यासमोर विश्व उभे ठाकते. आपणही त्यात असतो. स्वप्नाच्या पातळीवर स्वप्नात घडणाऱ्या सर्व घटना 'सत्य' असतात. ही सत्याची एक पातळी आहे. जागेपणाच्या पातळीवर स्वप्नातील गोष्टी असत्य होतात. पण स्वप्नाच्या पातळीवर त्या सत्यच असतात. मी स्वप्नात आजारी पडलो तर डॉक्टर स्वप्नांतलाच बोलावावा लागेल आणि औषधही स्वप्नातच घ्यावे लागेल. जागेपणी स्वप्नातील रोगावर औषध घेऊन उपयोग होणार नाही. 

स्वप्नातील घटनांसाठी Raw Material माझ्या मनातून पुरविले जाते. तसेच आपल्या जागृतावस्थेसाठी Raw Material आपल्या ब्रह्मस्वरूपाकडून पुरविले जाते.  जागृतावस्था ही जशी सत्याची स्वप्नावस्थेपेक्षा उच्च पातळी म्हणता येईल, तशी ब्रह्मावस्था ही सत्याची आणखी उच्च पातळी आहे. 

जसे स्वप्नातील रोगांसाठी स्वप्नातील डॉक्टरकडून इलाज करवून घ्यावा लागतो, तसेच जागृतावस्थेतील समस्यांसाठी या विश्वातील शक्तींकडूनच मदत घ्यावी लागते. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. परंतु आपल्या जागृतावस्थेतील सत्याच्या पातळीवर आपण आपले शरीर-मन आहोत. आपल्या समस्या या आपल्या ब्रह्मरूपाच्या समस्या नाहीत तर शरीर-मनाच्या समस्या आहेत. म्हणूनच त्या समस्यांसाठी आपल्याला या विश्वातील शक्तींकडूनच - देवतांकडूनच मदत मिळू शकते. आपण आणि या देवता शेवटी ब्रह्मस्वरूपच आहोत. या देवता या विश्वातीलच आहेत. तेव्हा त्यांना भावना असणे यात काहीही गैर नाही.  त्यांच्या या भावना उच्च स्वरूपाच्या असतात, म्हणजेच चांगल्या व्यक्तींना मदत करण्यास या शक्ती उत्सुक असतात. 

अन्य धर्मियांचे तत्वज्ञान वेगळे आहे. त्यांचे तत्वज्ञान आणि आपले तत्वज्ञान या गल्लत करू नका. आपले तत्वज्ञान अधिक लॉजिकल आहे. 

पुनर्जन्म:

पुनर्जन्म ही संकल्पना सर्व पौर्वात्य धर्मांमध्ये आहे. मात्र अब्राहमीक धर्मांत (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) या संकल्पनेला स्थान नाही. आपल्यावर ब्रिटिश राजवटीत ख्रिश्चन संकल्पनांचा मारा झाल्याने आपल्यालापैकी अनेकांना पुनर्जन्म ही संकल्पना म्हणजे एक कल्पनाविलास वाटू लागला आहे. परंतु भारतात आणि पाश्चिमात्य देशांत आता यावर शिस्तबद्ध अभ्यास सुरु झाला आहे. ज्यांना मागील जन्म आठवतो त्यांच्या आठवणी संकलित करून त्याची शहानिशा केली जात आहे. (मला मागील जन्म अंधुकसा आठवतो. त्याची सांगड मी या जन्मातील माझ्या वर्तनाशी घालू शकतो).
अद्वैत दर्शनाच्या दृष्टीने आपण पुनर्जन्माकडे पाहू. आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities). मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो. आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो.
एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?
वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालदीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे.
संतोष कारखानीस ठाणे

All reactions:
Prakash Patil, Rajendra Hirlekar and 39 others

दु:ख आणि दु:ख निवारण - अद्वैत दृष्टिकोन

 आपले चैतन्य हे साक्षीचैतन्याचे आपल्या मनात पडलेले प्रतिबिंब आहे. मनाच्या अहंकार या भागाशी ते एकरूप होऊन चेतांस्थेद्वारे संपूर्ण शरीरात पसरते हे आपण मागील भागात पहिले. 

पण आपल्या चैतन्यात (म्हणजे आपल्यात) कधीकधी राग, लोभ, द्वेष अशा भावना उमटतात. साक्षीचैतन्य हे निरंजन, निर्विकार असते. मग हे आपले चैतन्य असे विविध भावनांनी गढूळ का होते. हे मालिन झालेले चैतन्य स्वच्छ कसे करायचे? यासाठी आपल्याला आपल्या तत्वज्ञानामधील 'उपाधी' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.

एखाद्या सानिध्यात असलेल्या वस्तूचे गुण सानिध्यामुळे त्याच वस्तूचे आहेत असे वाटणे म्हणजे 'उपाधी'. एखाद्या अत्यंत पारदर्शक अशा स्फटिकाच्या गोळ्याच्या मागे आपण लाल रंगाचे फुल ठेवले असता आपल्याला तो गोळा लाल रंगाचा आहे असे वाटते. तो लाल रंग त्या गोळ्याचा नसतो, परंतु सानिध्यामुळे त्या गोळ्याला तसा रंग आहे असे भासते. हे फुल बाजूस केले असता गोळा परत पारदर्शकच भासतो. हे उपाधीचे एक उदाहरण आहे. 

आपल्या शरीर-मनात उमटणाऱ्या संवेदना (स्पर्श, गंध, विचार इत्यादी) आपली चेतासंस्था आपल्या चैतन्यासमोर उभ्या करते. (चेतासंस्थेतील विद्युतसंवेदनांचे रूपांतर संवेदनांमध्ये कसे होते हे विज्ञानाला अजून न उलगडलेले कोडे आहे). चैतन्य केवळ निर्विकारपणे या संवेदना स्वीकारते. या संवेदनांमुळे मनात विविध विकार (राग, लोभ, द्वेष इत्यादी) निर्माण होतात. चैतन्य निर्विकारच असते. पण मनाच्या सानिध्यामुळे (उपाधीमुळे) हे विकार आपल्या चैतन्यात तयार झाले आहेत असे आपल्याला वाटते. मग आपण 'मला दु:ख झाले', 'मला आनंद झाला' अशी भाषा बोलू लागतो. केवळ भाषा नव्हे, आपल्याला तसेच वाटते. सानिध्यामुळे चैतन्याने हे 'रंग' धारण केले आहेत - चैतन्यात बदल झाला आहे असे भासते. उपाधीमुळे झालेला हा भ्रम आहे. पण चैतन्य 'निरामय' आहे, 'नि:संग' आहे. 'दु:ख' मला (म्हणजे माझ्या चैतन्यला) झालेले नसते - माझ्या चैतन्यात उमटलेले नसते, माझ्या मनात दु:खाची भावना निर्माण झालेली असते. मी म्हणजे माझे शरीर-मन नाही, तर चैतन्य आहे ही भावना मनात रुजलेली असल्यास आपण आपल्या दु:खाकडे अशा त्रयस्थ भावनेने बघू शकतो. या विश्वात आलो आहोत, दु:ख तर होणारच, पण त्या दु:खाचा त्रास होत नाही. 

आपण म्हणजे शरीर-मन नव्हे तर आपले चैतन्य आहोत - साक्षी चैतन्य आहोत ही भावना मनात रुजविण्यासाठीच आपण हा अध्यात्माचा अभ्यास करीत आहोत. हे केवळ पुस्तके वाचून-प्रवचने ऐकून (ज्ञानयोग) होणार नाही. त्यासोबत दैनंदिन जीवनात त्याची प्रचिती यावी लागेल. हे काही कोठल्या चमत्काराने होणार नाही, ध्यानातील अतींद्रिय अनुभवाने होणार नाही. आपल्या आसपासच्या सामान्य घटनांतून आपल्या विश्वातील विविध वस्तूंमधून (Objects) डोकावणारे ब्रह्म बघण्याची क्षमता अंगी यावी लागेल. हे कठीण नाही. फक्त आपली प्रत्येक क्षणी एकाग्रता वाढवावी लागेल, प्रत्येक क्षणी आपल्याला जागृत व्हावे लागेल. त्यासाठी ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्गाचा अवलंब करावा लागेल. ही वाट प्रथमतः: दिसायला कठीण वाटली तरी मार्गक्रमण सुरु केल्यावर सोपी वाटू लागते.

करणार सुरुवात ? 

मॅशमॅलो एक्सपरिमेंट आणि भगवद्गीता

 आधुनिक मानसशास्त्रात  वॉल्टर मिशेल या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने १९६० च्या दशकात केलेला एक प्रयोग सुप्रसिद्ध आहे. त्याने चार वर्षांच्या मुलांवर हा प्रयोग केला. प्रत्येक मुलाला एका खोलीत बसवून त्यांना एक मॅशमॅलो (अमेरिकन लहान मुलांची एक आवडती मिठाई) दिले. पण  वॉल्टर खोलीच्या बाहेर जाऊन सुमारे दहा मिनिटात परत येईपर्यंत त्या मुलाने ते मॅशमॅलो न खाल्ल्यास त्याला  आणखी एक मॅशमॅलो बक्षीस म्हणून मिळणार होते. म्हणजेच ते समोर ठेवलेले मॅशमॅलो लगेच खाण्याच्या इच्छेवर त्याने  मात केल्यास त्याला भविष्यात दुप्पट मॅशमॅलो मिळणार होते. ते मॅशमॅलो लगेच खाणे त्यांच्यासाठी प्रेयस-प्रिय गोष्ट होती. पण ते लगेच न खाणे त्यांच्या भविष्यकाळासाठी  श्रेयस-चांगली गोष्ट होती. 

वॉल्टरने त्यानंतर चौदा वर्षांनी या मुलांचे सर्वेक्षण केले. ज्या मुलांनी लहानपणी मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करून दोन मॅशमॅलो मिळविली होती त्यांनी भविष्यात करियरमध्ये, खेळात, कौटुंबिक जीवनात आणि एकंदरीतच खूप प्रगती केली होती. या मुलांच्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता. मात्र जी मुले वॉल्टर परत येण्यापूर्वीच मॅशमॅलो खाऊन मोकळी झाली होती, ज्यांना मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करता आली नव्हती ती मुले जीवनात मागे पडली होती. आपण youtube वर शोध घेतल्यास या टेस्टचे अनेक व्हिडीओ बघण्यास मिळतील. 

 https://www.youtube.com/watch?v=y7t-HxuI17Y  लिंकवर  क्लीक केल्यास असाच एक व्हिडीओ बघण्यास मिळेल. खूप मजेशीर व्हिडीओ आहे. नक्की बघा.  

आपण मागील एका लेखात दुर्योधनाची आणि अर्जुनाची मनावर नियंत्रण नसल्याची समस्या पहिली. या लहान मुलांची समस्या तीच आहे. ही आपली - म्हणजे मानवजातीची प्रातिनिधिक समस्या आहे. 

श्रीकृष्णाने तिसऱ्या अध्यायातील ३३ व्य श्लोकात ही समस्या का निर्माण होते हे सांगितले आहे. 

सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि |
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति || ३-३३||

सर्वच प्राणिमात्र आपल्या नैसर्गिक प्रेरणेने- राग (लोभ)-द्वेष या भावनेने लिप्त होऊन वागतात. या नैसर्गिक भावनांचे दमन करून काय मिळणार आहे? मग श्रीकृष्ण यावर उपायही सुचवितात.

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ |
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४||

आपली इंद्रिये ही आपल्या मनापुढे केवळ त्या त्या इंद्रियांना जाणवलेल्या संवेदना ठेवतात. त्यांना आपण बंधने घालू शकत नाही. मात्र त्यापासून या राग-लोभाच्या भावना निर्माण होतात त्यावर आपण नक्कीच नियंत्रण ठेऊ शकतो. हे नियंत्रण म्हणजे त्या भावनांचे दमन नव्हे, दमन केल्याने या भावना भविष्यात अधिक जोमाने उफाळून वर येतील. राग-लोभ निर्माणच होणार नाहीत, अथवा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होत जाईल यासाठी काही करणे आपल्या हातात आहे. आपण हे करू शकल्यास लगेच मॅशमॅलो खाण्याच्या इच्छेवर मात करणाऱ्या मुलांसारखे आपले आपल्या आपल्यावर नियंत्रण येऊ शकेल. आपण जीवनात यशस्वी होऊ. 

मग आपण श्रीकृष्णाने सांगितलेल्या ध्यानमार्ग/भक्तिमार्गाचा अवलंब करणार का? 


मेंदू - कार्यक्षमता - मानसिक रोग

 आपल्याला कार्यक्षमतेने कोठलीही कामे करायची असतील तर मेंदूची काम करण्याची पद्धत जाणून घ्यावी लागेल. मेंदू हा चेतासंस्थेचा महत्वाचा भाग आहे. चेतासंस्था ही विविध चेतापेशींची बनलेली असते. चेतापेशी मेंदूत असतात. या चेतापेशी सतत एकमेकींच्या संपर्कात असतात. या चेतापेशींपासून निघालेले अनेक चेतातंतू असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो/करतो तेव्हा चेतातंतूंमध्ये विद्युत संदेश तयार होतो. मेंदूत हा संदेश गेल्यावर आसपासच्या चेतापेशींत हा संदेश चेतातंतूंद्वारे पाठविला जातो. यासाठी चेतापेशींचे चेतातंतू परस्परांशी जोडले जातात. अशाप्रकारे काही चेतापेशींचा समूह या  शिकण्याच्या अथवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भाग घेतो. एखादे विशिष्ट काम करणाऱ्या पेशींचे समूह मेंदूतील विशिष्ट भागात असतात. उदाहरणार्थ बघण्याचे काम करणाऱ्या चेतापेशींचे समूह मेंदूतील एका भागात असतात, तर ऐकण्याचे काम करणाऱ्या चेतापेशींचे समूह दुसऱ्या भागात. या समूहातील चेतापेशींचा एकमेकींशी  चांगला संपर्क असतो. त्यांचे चेतातंतू एकमेकांशी जोडलेले असतात. आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा चेतापेशींतून जाणारा संदेश एका विशिष्ट मार्गाने जातो. आपण परत ही कृती करतो तेव्हा चेतातंतूंचा हाच मार्ग परत वापरला जातो. 

चेतातंतूंमधून जेव्हा विद्युत लहर जाते तेव्हा त्याचे भौतिक परिणामही होतात. या चेतातंतूंच्या आसपास विद्युतचुंबकीय क्षेत्र (Electromagnetic Field) तयार होते. त्यामुळे आसपासच्या भागाच्या द्रवातील आयन्स त्याकडे आकर्षित होतात. त्या पेशींवर एक थर तयार करतात. हा थर मेदाचा असतो. जेवढ्या वेळा या चेतातंतूंमधून विद्युत संदेश जाईल तेवढा हा थर जाड बनत जातो. हा थर विद्युत रोधक असतो. त्यामुळे चेतातंतूंमधून जाणाऱ्या विद्युत संदेशाची तीव्रता राखण्यास मदत करतो. 

जेव्हा आपण एखादी गोष्ट अथवा एखादा विचार परत परत करतो तेव्हा यासाठी बनलेल्या चेतातंतूंची जोडणी परत परत वापरली जाते आणि या संपूर्ण जोडणीवर जमलेला मेदाचा थर जाड होत जातो. त्यातून जाणाऱ्या विद्युत संदेशांचा कमी ह्रास (Loss) होतो. अर्थात या जोडणीतून वाहणारे विद्युत संदेश आपली तीव्रता कायम राखतात. म्हणूनच एखाद्या गोष्टीची वारंवार उजळणी केली की ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहाते. उजळणी केली नाही तर हा थर हळूहळू बाजूच्या द्रवात विरघळून जातो.

मेंदूत चेतापेशींचा एक समूह असतो जो अमूर्त संकल्पनांवर (Abstract Thinking) काम करतो. या भागाचे मुख्य काम आहे ते म्हणजे पूर्वी घडलेल्या घटनांचा विचार करून भविष्यात येणाऱ्या धोक्यांपासून शरीराला सावध करणे. अर्थात भूतकाळाचे प्रक्षेपण (Projection) भविष्यकाळावर करणे. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप अहत्वाचे काम आहे. त्यामुळे हा भाग स्वभावत:च खूप सक्रिय असतो. शिवाय आपले संरक्षण करण्यासाठी शरीराने ताबडतोब कृती करावी म्हणून या भागातील चेतापेशींचे चेतातंतूंचे मेंदूतील सर्व भागातील चेतापेशींच्या चेतातंतूंशी उत्तम जोडणी असते. या भागाला Default Mode Network अथवा DMN म्हणतात. आपण या लेखात त्याचा असाच उल्लेख करू. 

मानवाने आपल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मेंदूच्या DMN चा खूप वापर केला.  त्यामुळे निसर्गत:च हा भाग खूप कार्यक्षम बनला. हल्लीच्या युगात शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमाला महत्व आल्याने हा भाग अधिक कार्यक्षम बनत गेला. मनात विचारांचे अकारण थैमान माजू लागले. त्याचा मेंदूतील सर्व भागांमध्ये निकट संपर्क असल्याने मेंदूचा अन्य कामांमध्ये त्याचा अडथळा होऊ लागला. मानसिक रोगांचा आधुनिक मानव शिकार बनला. 

यावर उपाय काय? एक सहज सोपा वाटणारा उपाय म्हणजे औषधी गोळ्यांच्या सहाय्याने मेंदूत रासायनिक बदल घडविणे. याद्वारे चेतातंतूंमधील संपर्कात अडथळा निर्माण होईल. मग DMNमधील  चेतापेशी मेंदूतील अन्य भागातील चेतापेशींच्या कामात अडथळा आणणार नाहीत. पण यात एक अडचण आहे. या रासायनिक बदलामुळे मेंदूतील सर्वच चेतातंतूंच्या संदेश प्रणालीवर परिणाम होईल. संपूर्ण मेंदूचे कार्य मंदावेल. जे मानसिक रोगांसाठी औषधी गोळ्या घेतात त्यांना हा अनुभव आला असेल. 

यावर दुसराही उपाय आहे. जर मेंदूमधील अन्य भागांना आपले काम करण्यास उत्तेजन दिले तर हे भाग DMN मधून येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करतील. मग DMNशी संपर्कात असणारे चेतातंतू वापरले न गेल्याने काही काळाने त्यांच्यावरील मेदाचे आवरण कमी होऊन ते कमकुवत होतील. मेंदूतील अन्य भाग भूत-भविष्य काळाचा विचार न करता वर्तमानात काम करत असतात. म्हणजेच आपल्या पंचेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदना ग्रहण करत असतात. आपण या संवेदनांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर आपोआप DMNची विनाकारण वाढलेली आणि नियमित कामात अडथळा ठरणारी कार्यक्षमता कमी करू शकू. आपल्या मनातील अनावश्यक विचार कमी होतील. मनाला शांतता लाभेल.  मनातील अनावश्यक विचार दूर करण्याची ही गुरुकिल्ली आहे. 

ध्यानाची कोठलीही पद्धत ही आपल्या इंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत आहे. विपश्यना ध्यानात हेच शिकविले जाते. बऱ्याच ध्यानपद्धतीत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. मला  नुकतेच समजले की नर्मदा परिक्रमेत प्रत्येक पावलाला 'नर्मदे हर' म्हणत जाणीवपूर्वक पाऊल टाकायचे असते. म्हणजेच आपले लक्ष आपल्या पावलांच्या संवेदनांवर हवे -वर्तमानात हवे.

प्राचीन काळी मानसशास्त्राचा एवढा खोलवर अभ्यास करून मानवाला मानसिक शांतीचे विविध मार्ग दाखविणाऱ्या आपल्या ऋषींना प्रणाम.  

विचारयात्रा - परा-पश्यन्ति-मध्यमा-वैखरी

 प्राचीन भारतीय तत्वज्ञानाने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण केले आहे. भतृहरी ऋषी (इ.स. सुमारे ४५० ते ५००)हे मोठे व्याकरण तज्ज्ञ होते. आपल्या तोंडून शब्द येताना त्याची प्रक्रिया त्यांनी 'वाक्यपदीय' या ग्रंथात समजावून सांगितली आहे. 

आपल्या तोंडातून येणारे शब्द हे प्रथम विचार बनून आपल्या मनात येतात. तोंडावाटे निघणारे शब्द हे 'वैखरी वाणी' बनून येतात. तोंडावाटे शब्द हे प्रथम 'मध्यमा वाणी बनून येतात. एखाद्या बासरीमधून येणारे सूर हे त्या बासरीच्या आत नसतात. ती फुंकणाऱ्या माणसाच्या श्वासातून हे सूर उमटत असतात. बासरी केवळ त्यांना रूप देणारे  यंत्र आहे. तसेच आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे केवळ आपल्या मनात येणाऱ्या विचारांची अभिव्यक्ती आहे. 

हे विचार आपल्या मनात शब्दरूपाने जन्म घेतात. हे शब्द एखाद्या भाषेचा आधार घेऊनच येतात. मला मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषा चांगली अवगत आहे. म्हणूनच हे विचार केवळ त्याच भाषेचे शब्द घेऊन प्रकट होतील. विचारांचे प्रकटीकरण कोणत्यातरी भाषेच्या साहाय्याने आपल्या मनात होते (अजून तोंडावाटे शब्द बाहेर आलेला नाही), हीच मध्यमा. मध्यमा ही वैखरीपेक्षा अधिक सूक्ष्मात जन्माला येते. 

मात्र हे विचार शब्दात जन्माला येण्याआधी त्यांची जुळवाजुळव मनात सुरु होते. नंतरच त्याला शब्दरूप मिळून ते मध्यमेत उतरते. ही जी शब्दरूप मिळण्याआधी विचारांची अवस्था आहे त्याला भर्तृहरीऋषी 'पश्यन्ति' म्हणतात. 

हे विचार पश्यन्तीमध्ये जन्माला येण्याआधी (काही क्षण तरी) मनाची अवस्था निर्विकार-निर्विचार असते. निर्विकार ही आकाशाची अवस्था आहे. 'आकाश' हे पंचमहाभुतांमधील सर्वात सूक्ष्म आहे. त्याचे तन्मात्र (म्हणजेच प्रकटीकरण) शब्द आहे. विचार मनात येतात (पश्यन्ति अवस्थेत) ते या आकाशातूनच. हीच ती विचारांची परावस्था. याला काहीजण परब्रह्म असेही म्हणतात. 

ज्यावेळी विचार पश्यन्तीमध्ये उतरतात तेव्हा शरीरावर कोठे ना कोठे काही संवेदना उमटतात. कधी श्वासाच्या  गतीत बदल होतो तर कधी शरीराच्या एखाद्या भागावर झिणझिण्या अथवा अन्य संवेदना उमटतात. आपण यावेळी  आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत असलो तर पश्यन्तीकडून हे विचार माध्यमेकडे जाताच आपण त्यांना पकडू शकतो. आपण यावेळी या विचारांवर काही प्रतिक्रिया दिली नाही (समत्व) तर आपल्याला या विचारांचा त्रास होत नाही. पण अनेकवेळा आपण शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत नसतो. अजाणतेपणी आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. मग आपण अस्वस्थ होत जातो. 

विपश्यना ध्यानात आपण आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत होतो. त्यामुळे आपण शांत होत जातो. आपल्या ऋषींनी प्राचीन काळी यावर संशोधन करून आपल्याला विपश्यना ध्यानाची देणगी दिली. वेदांमध्ये विपश्यना ध्यानाचा उल्लेख आहे. मात्र प्राचीन काळी हे ज्ञान फक्त गुरु-शिष्य परंपरेने देण्याची पद्धत असल्याने त्याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथात नाही. गौतम बुद्धाने विलुप्त झालेली विपश्यना विद्या अथक परिश्रमाने परत शोधून काढली आणि सामान्य लोकांना लाभ व्हावा म्हणून टप्प्याटप्प्याने शिकविण्याची पद्धत विकसित केली. मी ही विद्या गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात शिकलो आहे. 

विचारांच्या उगमाचा अभ्यास करणाऱ्या भर्तृहरीऋषींना प्रणाम. 

Wednesday, July 19, 2023

सांख्यदर्शन ५ : कुंडलिनी विद्या आणि आयुर्वेद

 मागील काही लेखात आपण सांख्य दर्शनासंबंधी थोडे जाणून घेतले. सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. काही जण त्याचा उगम वेदांपूर्वीचा आहे असे मानतात. कारण वेदात कपिलमुनींचा उल्लेख आहे.  कदाचित म्हणूनच सांख्यदर्शन वेदांचा पुरस्कार करत नाही, परंतु धिक्कार ही करत नाही. यासाठी हे दर्शन 'नास्तिक' दर्शन मानले गेले आहे.  भारतीय जनमानसावर  याच दर्शनाचा प्रभाव आहे. आयुर्वेद, योग, शाक्तपंथ, कुंडलिनी योग इत्यादी अनेक शाखांचा उगम याच दर्शनात आहे. 

हे दर्शन सत्कार्यवादावर आधारलेले आहे. सत याचा अर्थ अस्तित्व. अस्तित्व हे अस्तित्वातूनच जन्म घेते असे हे दर्शन मानते. या दर्शनात पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्वे मानलेली आहेत. प्रकृतीकडे असीम क्षमता (Potential) आहे. परंतु या क्षमतेचे प्रकटीकरण प्रकृती करू शकत नाही. कारण त्यासाठी चेतनेची आवश्यकता आहे. या उलट पुरुषाकडे चेतना आहे. परंतु या चेतनेचे प्रकटीकरण करण्यासाठी त्याला प्रकृतीची आवश्यकता आहे. म्हणून ते एकत्र येतात. एकत्र आल्यावर प्रकृती आपल्या खेळात पुरुषाला गुंतविते. मग पुरुषाला आपल्या निरामय चेतना या स्वरूपाचा विसर पडतो. तो स्वतःला प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. तेथेच दु:खाचा जन्म होतो हे आपण पाहिले. दु:खमुक्तीसाठी पुरुषाला या प्रकृतीच्या खेळातून दूर होऊन आपल्या चेतना स्वरूपाची जाणीव व्हावी लागते. यालाच सांख्य दर्शनात कैवल्य असे नाव आहे. 

कैवल्यावस्थेला जाण्यासाठी पुरुषाला प्रकृतीने ज्या क्रमाक्रमाने बद्ध केले आहे त्याच्या उलट क्रमानेच सोडवून घ्यावे लागते हे आपण मागच्या लेखात पहिले. हा क्रम म्हणजे 
बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

कुंडलिनी विद्या ही पुरुषाने अशा उलट्या क्रमाने सोडवून घ्यावे यासाठी निर्मिलेली विद्या आहे. त्यांच्याशी निगडित पंचमहाभूते क्रमश: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी आहेत. पंचमहाभूतांमध्ये  प्रथम आकाश जन्मले. नंतर क्रमाक्रमाने वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी जन्मली.  कुंडलिनी विद्येच्या प्रवर्तक ऋषींनी या पंचमहाभूतांची आपल्या शरीरातील पाठीच्या कण्यातील स्थाने शोधली. ही स्थाने आपले या पंचमहाभूतांसंबंधी असलेले तादात्म्य नियंत्रण करतात. या स्थानांवर आपले नियंत्रण आल्यास आपण (म्हणजे आपली चेतना - आपला पुरुष) या पंचमहाभूतांशी असलेले आपले तादात्म्य तोडू शकतो. आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे त्याला जाणवते. पुरुषाला प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत हे जाणवण्याची ही सुरुवात आहे. ही स्थाने म्हणजे कुंडलिनी विद्येत दाखवलेली चक्रे. यात मूलाधार चक्रापासून सुरुवात करून क्रमाने स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध चक्रापर्यंत जायचे असते. ही चक्रे अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी संबंधीत आहेत. म्हणजेच प्रकृतीने पुरुषाला ज्या क्रमाने आपल्यां गुंतविले त्याच्या विरुद्ध क्रमात आहेत. याच क्रमाने आपल्याला आपल्या चेतनेला प्रकृतीपासून मुक्त करायचे आहे. कुंडलिनी योगातील अन्य चक्रे - आज्ञा आणि सहस्रार - ही अनुक्रमे मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत. एकदा चेतनेचे बुद्धीशी तादात्म्य सुटले की चेतना - म्हणजेच पुरुष - प्रकृतीपासून मुक्त होतो. त्याला आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हे उमगते. त कैवल्यला पोचतो. कुंडलिनी विद्या ही सांख्य दर्शनातून उगम पावलेली विद्या आहे. 

प्रकृतीमध्ये असलेले तीन गुण सत्व-रज आणि तमोगुण हे स्वभावत: संतुलित असतात. परंतु पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रकृती या तीन गुणांच्या विविध मिश्रणाने सृष्टीतील विविध पदार्थ - ऊर्जा बनविते. लाल, पिवळा आणि निळा या मूळ रंगांची विविध प्रमाणात मिश्रणे करून अनेक रंग मिळविता येतात तसेच काहीसे हे आहे. मानवी शरीरात हेच तीन गुण कफ, पित्त आणि वात या नावाने ओळखले जातात. या तीन गुणांचे संतुलन असते तेव्हा मानवी शरीर आरोग्यपूर्ण असते. मात्र या गुणांचे संतुलन बिघडल्यास आरोग्य बिघडते. आयुर्वेद हे तीन गुण औषधांच्या साहाय्याने संतुलित करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आयर्वेदाचा पाया 'सांख्यदर्शन' आहे. 

सांख्यदर्शन हे भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले आहे. भारतीयांवर अद्वैत दर्शनाचा नाही तर सांख्य दर्शनाचा प्रभाव आहे. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या अनेक संज्ञा या दर्शनातून आलेल्या आहेत. म्हणून आपल्याला या दर्शनाची किमान माहिती व्हावी हा माझा या लेखमालेद्वारे प्रयत्न होता.  

हा या लेखमालेतील शेवटचा लेख.
लेखनसीमा !

संतोष कारखानीस ठाणे 

सांख्यदर्शन ४

मागील भागात आपण सांख्य दर्शनात प्रतिपादलेली २५ तत्वे बघितली. या पैकी २३ तत्वे 'प्रकृती' या तत्त्वापासून उत्पन्न होतात हे ही पाहिले. प्रकृती या २३ तत्वांच्या साहाय्याने पुरुषाला आपल्या खेळात गुंतविते. सार्वभौम, निरामय चेतना  - अर्थात पुरुष- स्वत:ला  त्या प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. पुरुषाला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडणे हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. हे आपण मागील भागात पाहिले.  

सांख्य दर्शनानुसार दु:ख तीन प्रकारचे आहे. अधिभौतिक (अधिदैहिक),अधिदैविक, प्राकृतिक. 

अधिदैविक दु:ख म्हणजे शरीर-मनाला झालेले दु:ख. आपल्याला एखादी जखम झाली, अथवा मानसिक क्लेश झाले तर हे आदिभौतिक दु:ख आहे. आपला जन्म गरिबीत झाला,हे अधिदैविक दु:ख. हे दु:ख आपल्याला भाग्यवश मिळते. पूर, दुष्काळ इत्यादींमुळे होणारे दु:ख हे प्राकृतिक दु:ख आहे. हे तीनही प्रकारचे दु:ख आपली चेतना स्वत:ला 'प्रकृतीचा' एक भाग समजू लागल्यामुळेच होते. 

या दु:खाचे निराकरण करण्याचा उपाय सांख्यदर्शन सुचविते. ज्या क्रमाने प्रकृतीने पुरुषाला - चेतनेला फसविले आहे त्याच्याच उलट्या क्रमाने पुरुष या 'आपण प्रकृतीचा भाग असल्याच्या' भ्रमातून मुक्त होऊ शकतो. जेव्हा पुरुष या भ्रमातून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा त्या अवस्थेला सांख्य दर्शनात 'कैवल्य' म्हटले आहे. 

मागील भागात आपण पाहिले खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते 

पुरुषाला फसविण्यासाठी सर्वात शेवटी पंचमहाभूते आणि त्या आधी तन्मात्रा (रस, गंध, रूप, स्पर्श, ध्वनी) जन्मल्या. तन्मात्रांना  'विषय' असेही नाव आहे. आपल्याला स्वत:पासून [रथां तन्मात्रांना म्हणजेच विषयांना अलग करावे लागेल. एखादे सुंदर रूप पाहिले की त्याची अभिलाषा सोडावी लागेल. एखादा अप्रिय शब्द आपल्याला कोणी बोलला तर आपल्याला त्याने त्रास होता कामा नये. आता मन, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांपासून पुरुषाला वेगळे करायचे आहे. उदाहरणार्थ आपल्याला ऐकू नसेल अथवा पाय मोडला तर त्यापासून (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय) होणाऱ्या दु:खापासून आपल्याला दूर जायचे आहे. पुसूंश का केवळ चेतनामात्र हे समजून घ्यायचे आहे. यानंतर मनाला पुरुषापासून अलग करायचे आहे. आपले मन चंचल आहे. सतत भरकटत असते. हे मनाचे भरकटणे आपल्याला अलिप्तपणे जाणून घ्यायचे आहे. मनाचे दु:ख अलिप्तपणे बघायचे आहे. आता पुरुषाला अहंकारापासून दूर करायचे आहे. ही कठीण गोष्ट आहे. अहंकाराचे विसर्जन म्हणजे 'मी' पणाचे  विसर्जन. विविध ध्यान पद्धतींनी हे साध्य होते. आता राहिली बुद्धी. बुद्धीपासून पुरुषाला अलग करणे हे तर खूपच कठीण आहे. आपण सांख्य दर्शन शिकत आहोत तेच बुद्धीच्या साहाय्याने. ध्यानात खूप खोलवर गेल्यावर पुरुष बुद्धीपासूनही स्वत:ला अलग करू शकतो. आता चेतना कैवल्यला प्राप्त होते.  हाच सांख्यदर्शनाने सांगितलेला दु:ख निवारणाचा मार्ग आहे. 

पुढील लेख या लेखमालेतील अखेरचा लेख असेल. 


संतोष कारखानीस ठाणे 


सांख्यदर्शन ३

 मागील भागात आपण सांख्य दर्शनाच्या मूळ सिद्धांताचा वेध घेतला. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा मूळ आधार आहे.  सत् याचा अर्थ अस्तित्व. 'अस्तित्व हे अस्तित्वातूनच उदयास येते' असे सत्कार्यवाद सांगतो. म्हणूनच अस्तित्व हे शून्यातून उदयास आले असे सांगणाऱ्या बौद्धदर्शनापेक्षा आणि अस्तित्व हे परमेश्वराने निर्माण केले असे सांगणाऱ्या अन्य दर्शनांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. 

 सत् कारणापासून सत् कार्य उदयास येते असे सत्कार्यवाद सांगतो. या सत् कारणाला सांख्य दर्शनात 'प्रकृती' असे संबोधले आहे.  प्रकृतीचा शब्दश: अर्थ आहे 'कृतीच्या आधी'.  प्रकृती ही 'जड' आहे तिच्यात प्रचंड क्षमता (potential) आहे पण कोठलीही चेतना नाही.  प्रकृतीकडून कार्य करून घेणाऱ्या चेतनेस या दर्शनात 'पुरुष' असे संबोधले आहे. 

पुरुष आणि प्रकृती एकमेकांजवळ का येतात हे आता समजून घेऊ. 
एखादी गोष्ट 'कारण' होण्यासाठी तिच्यातील क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे लागते. प्रकृतीच्या क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे म्हणून प्रकृती सदैव बेचैन असते. पुरुष हा केवळ चेतनामात्र आहे, निर्गुण आहे. जी अनुभव घेऊ शकते तिला चेतना म्हणतात. अनुभवांशिवाय चेतनेला अर्थ नाही. पुरुषाला तो 'चेतना' आहे हे सिद्ध करण्यासाठी अनुभव घ्यावे लागतात. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष हे एकत्र येतात. प्रकृतीला आपल्या अनुभवांचे प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषाच्या चेतनेची- इच्छाशक्तीची- आवश्यकता असते. तर प्रकृतीने निर्मिलेल्या विश्वाचा अनुभव पुरुष घेऊ शकतो. आपल्या अस्तित्वाला अर्थ प्रदान करण्यासाठी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात. 

प्रकृती एकच आहे, परंतु तिची क्षमता असीम आहे. पुरुष मात्र संख्येने अनेक आहेत. पुरुष ही केवळ चेतना आहे. तिचे काम 'अनुभव घेणे' हेच आहे. विश्वात अनेक जीव आहेत. एकाच घटनेचे अनुभव प्रत्येक जीवाला वेगळे येतात. म्हणूनच सांख्य दर्शनाच्या प्रणेत्यांनी अनेक पुरुष आहेत असे मानले. 

जेव्हा एखादा पुरुष आणि प्रकृती जवळ येतात तेव्हा तो पुरुष प्रकृतीचा अनुभव घेऊ लागतो. यावेळी प्रकृती 'विकृत' होऊ लागते. प्रकृतीचा खेळ चालू होतो.  प्रथम प्रकृती पुरुषामध्ये बुद्धी (महत् ) उत्पन्न करते. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीच्या खेळात फसतो. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीचा अधिक खोलात शिरून अनुभव घेऊ इच्छितो.  मग प्रकृती पुरुषांमध्ये अहंकार हे दुसरे तत्व उत्पन्न करते. या वेळपर्यंत आपल्याला आपल्या आसपासच्या निसर्गापासून पुरुष वेगळे समजत नसतो. परंतु अहंकाराचा जन्म होताच तो स्वत:ला वेगळे समजू लागतो. आता प्रकृतीच्या खेळात पुरुष अधिकाधिक गुंतत जातो. 

पुरुषाला अहंकार प्राप्त झाल्यावर आपले वेगळे रूप असावे असे साहजिकच वाटते. मग जन्मतात ११ इंद्रिये आणि पाच तन्मात्रे.  प्रथम पाच ज्ञानेंद्रिये बनली (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा). प्रकृतीच्या सत्व-रज-तम गुणांपासून ही  पंचेंद्रिये बनली. आजवर केवळ बुद्धीने प्रकृतीचा अनुभव घेता येत होता. आता त्या जोडीला ही पंचेंद्रिये आली. पंचेंद्रियांद्वारे पुरुष प्रकृतीचा अनुभव चांगल्याप्रकारे घेऊ शकला.  पुरुष प्रकृतीमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. 

आता प्रकृती सुचवीत आहे की माझा हा खेळ बराच काळ चालणार आहे. त्यामुळे पुरुषाला प्रकृतीचा हा अनुभव बराच काळ घेण्यासाठी प्रकृती सुचविते. म्हणून आता शरीराला प्रकृतीने पाच कर्मेंद्रिये दिली. हात पाय, लैंगिक इंद्रिये, मुख आणि गुदद्वार दिले. अशाप्रकारे प्रकृतीने पुरुषाला पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये दिली. तसेच एक मन ही दिले. बुद्धी प्रथम आली. बुद्धी निर्णय घेऊ शकते. मन चंचल असते. ते निर्णय घेऊ शकत नाही.  मनाला उभयेंद्रिय म्हटले आहे. हे एकाबाजूने ज्ञानेंद्रिय आहे तर दुसरीकडे कर्मेंद्रियही आहे. अशाप्रकारे प्रकृतीने चेतनेला आपल्यात पूर्णपणे गुंतविले आहे. आता पुरुष स्वत:लाच प्रकृतीचा एक भाग समजू लागला. 

परंतु फक्त ज्ञानेंद्रिये असून उपयोग नाही. जर ध्वनीचा नसेल तर कानाचा काय उपयोग? जर डोळे असतील तर किमान काही अनुभवण्यासाठी त्यासोबत एखादे रूप हवे. मग प्रकृती अनुभव देण्यासाठी तन्मात्रे बनविते. डोळ्यांसाठी रूप, कानासाठी 'शब्द', नाकासाठी 'गंध', जिभेसाठी 'रस', त्वचेसाठी 'स्पर्श'  अशी ही पाच तन्मात्रे आहेत. हे आपल्या ज्ञानेंद्रियांसाठी 'विषय' आहेत. या तन्मात्रांमधून पंचमहाभूते जन्मतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशी ही पंचमहाभूते तन्मात्रांमध्ये जन्मतात. प्रकृतीमधून अशी २३ तत्वे जन्म घेतात. प्रकृती आणि पुरुष यांना धरून अशी २५ तत्वे सांख्य दर्शनात मानली गेली आहेत. या प्रकृतीच्या २३ तत्वांचे एकाच काम आहे. पुरुषाला फसवून  तो प्रकृती आहे असा भ्रम  त्याच्यात निर्माण करणे. 

खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

अशाप्रकारे निरंजन-निर्विकार असलेली चेतना फसते आणि स्वतः:ला प्रकृती समजू लागते.  हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुढील भागात आपण याचा अधिक विस्ताराने विचार करू. 

----------------------------------------------------------------------------


सांख्य दर्शन - २

 सांख्य दर्शनाचे प्रणेता आणि हे दर्शन कसे विकसित होत गेले हे आपण मागील भागात पाहिले. आता या दर्शनात काय सांगितले गेले आहे ते पाहू. 

कोणत्याही दर्शनाचा एक आधार असतो. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा आधार आहे. याचा अर्थ सत् कार्याच्या निर्मितीसाठी सत् कारणांची उपस्थिती आवश्यक असते. सत् याचा अर्थ 'अस्तित्व' हे आपण पूर्वी अद्वैतवाद शिकताना पाहिले आहे. याचा अर्थ अस्तित्व हे केवळ अस्तित्वातून निर्माण होऊ शकते. ते शून्यातून (असत्) अथवा अन्य कशातूनही निर्माण होऊ शकत नाही. एखादी दैवी शक्ती अस्तित्व निर्माण करू शकत नाही. हाच सत्कार्यवाद आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. आधिनिक विज्ञानाच्या बिग बँग सिद्धांतानुसारही विश्व एका बिंदूतून निर्माण आले आहे, शून्यातून नाही. 

सत्कार्यवादाचे दोन पैलू आहेत. 'कारण' आणि 'कार्य'. 'कार्य' म्हणजे परिणाम. कारणात कार्य घडविण्यासाठी योग्य असा शक्तिसंचय (Potential) असावा लागतो. कारण हे दोन प्रकारचे असते. 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण'. जर आपल्यासमोर एक मातीचा घट आहे. तर तो अस्तित्वात येण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे 'माती' आणि दुसरे म्हणजे 'कुंभार'. जर माती नसेल तर तो घट बनविता येणार नाही. तसेच कुंभार नसेल तरीही तो घट बनविता येणार नाही. कुंभार हे 'निमित्त कारण' आहे तर माती हे 'उपादान कारण' आहे.  'ईश्वराने ' ही सृष्टी बनवली असे मानणारी दर्शने/धर्म केवळ निमित्त कारण दर्शवितात असे कपिलमुनींचे मत होते.  म्हणूनच कपिलमुनींनी 'उपादान कारणाचा' शोध घेण्यास सुरुवात केली. 

आपल्यासमोर 'कार्य' अस्तित्वात आहे. तेव्हा कारण असलेच पाहिजे. पण कधीकधी कारण आपल्याला समोर येत नाही. उदाहरणार्थ ही सृष्टी आपल्यासमोर आहे. म्हणजेच 'कार्य' आहे. पण त्यामागचे कारण आपल्यासमोर नाही. अशावेळी अनुमानाच्या साहाय्याने आपल्याला कारणाचा शोध घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपल्यासमोर मातीचा घडा आहे. आपण लोखंड, माती, लाकूड इत्यादी बघून या घड्याच्या 'उपादान' कारणाचा वेध घेऊ शकतो. हा घडा मातीचा बनला असेल असे सांगू शकतो. 

जेव्हा आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्माण्ड पाहिले तेव्हा एक अनुमान असे होते की हे ब्रह्माण्ड ज्यापासून तयार झाले (उपादान कारण) हे ब्रह्माण्डासारखेच असले पाहिजे. ब्रह्माण्डात काही गोष्टी प्रकाशमान आहेत, काही गतिमान आहेत तर काही अंध:कारमय आहेत. पृथीवरील माणसांचे निरीक्षण करतानाही असे दिसले की काही माणसे प्रसन्न आहेत, आपली कामे प्रसन्न चित्ताने वेळच्यावेळी करत आहेत, काही माणसे अत्यंत धावपळीत आहेत, आपली कामे वेगात करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण ती थकलेली आहेत. प्रसन्न नाहीत. तर काही माणसे आळसात जीवन घालावीत आहेत, प्रसन्न नाहीत. अशा प्रकारे ब्रह्माण्डातील विविध गोष्टींचे वर्गीकरण या ऋषीमुनींना तीन प्रमुख प्रकारात करता आले. त्यामुळे सृष्टीनिर्मितीच्या  मूळ उपादान कारणातही ही तीन गुण असले पाहिजेत असे अनुमान त्यांनी काढले. सृष्टीच्या उपादान कारणाला त्यांनी 'प्रकृती' हे नाव दिले. प्रकृती याचा अर्थ प्र+कृती. प्र म्हणजे आधीचे कृती म्हणजे कार्य. प्रकृती 'प्रधान' आहे असे त्यांनी मानले. 'प्रधान' म्हणजे सगळ्याच्या पूर्वी. प्रकृतीला 'सर्वगर्भा' असेही नाव दिले. 

वर पाहिलेलं हे जे तीन गुण प्रकृतीत असले पाहिजेत असे ऋषीमुनींनी म्हटले आहेत त्यांना सत्व, रज आणि तम अशी नावे दिली.  सत्वगुण प्रकाशमान आहे, रजगुण गतिमान आहे तर तमोगुण अंध:कारमय आहे, उदासीन आहे. मूळ प्रकृतीत हे तिन्ही गुण साम्यावस्थेत (Equilibrium) असले पाहिजेत. म्हणूनच मूळ प्रकृती निर्गुण आहे, Formless आहे. या मूळ प्रकृतीमध्ये कोठलीही चेतना नाही, ती 'जड' आहे, 'अव्यक्त' आहे. मात्र ती असीम (Infinite Potential)आहे.   मातीपासून घडा बनवायचा का अन्य काही हे माती हे सांगू शकत नाही. कारण माती ही 'जड' आहे, चेतनाशून्य आहे. तसेच प्रकृती तिच्या तीन गुणांपासून विश्वाची जडणघडण करू शकत नाही. 

मातीपासून घट बनविण्यासाठी कुंभाराची आवश्यकता आहे, चेतनेची आवश्यकता आहे, 'निमित्त कारणाची' आवश्यकता आहे. तसेच प्रकृतीपासून सृष्टीच्या निर्मितीसाठी चेतनेची आवश्यकता आहे. याच चेतनेला 'पुरुष' असे संबोधले गेले आहे. प्रकृतीत असलेल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या मिश्रणाने ही सृष्टी बनते (तीन मूळ रंगांच्या साहाय्याने सगळे रंग बनतात तसेच). या गुणांचे कोणत्या प्रमाणात मिश्रण करायचे हे पुरुषाची चेतना ठरवते. 

पुढील लेखात आपण सृष्टी निर्मितीच्या अधिक खोलात जाऊ. तेथून आपण आपल्याला अनुभवायला लागणाऱ्या दु:खाचे कारण शोधू. या दु:ख निवारण्यासाठी सांख्य दर्शन काय सांगते हे पाहू. या दर्शनाची मोक्षाची कल्पना काय आहे ते ही पाहू. 

सांख्य दर्शन १

 मित्रहो, आधी सांगितल्याप्रमाणे मी सांख्य दर्शनाचा अभ्यास सुरु केला. अर्थात माझा सांख्य दर्शन फार खोलात जाऊन शिकण्याचा विचार नाही. आणि कोठलेही दर्शन समजून घ्यायचे असेल तर खूप खोलात जावे लागते. दोन वर्षांनंतर आता कुठे मला अद्वैत दर्शन थोडेफार समजू लागले आहे. म्हणून हा लेख सांख्य दर्शनाची केवळ तोंडओळख करून देणारा असेल. 

हे दर्शन भारतीय माणसावर सर्वात प्रभाव टाकणारे दर्शन आहे. सांख्य दर्शन हे अन्य भारतीय दर्शनांप्रमाणेच अत्यंत तार्किक आहे. 

कपिलमुनींना सांख्य दर्शनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. कपिलमुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला  जातो. कपिलमुनींना प्राचीन भारतात अत्यंत आदराने गौरविले जात होते. गौतम बुद्धानेही त्यांचा आदराने उल्लेख केलेला आहे. गौतमबुद्धाचे बालपण याच कपिलमुनींचा नावाने वसविण्यात आलेल्या कपिलवास्तू नगरीत व्यतीत झालेले आहे. 'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. कपिलमुनींच्या नंतर सांख्य दर्शनाचे भाष्यकार म्हणून आसुरी ऋषींची नाव घेतले जाते. परंतु त्यांनी कोठलीही ग्रंथरचना केल्याचे माहीत नाही. त्यानंतर पंचशिखाचार्य हे सांख्यदर्शनाचे महत्वाचे गुरु मानले जातात. त्यांनी षष्ठीतंत्र हा ग्रंथ लिहिला आहे. या नंतर गुरुपरंपरेने हे ज्ञान ईश्वरकृष्ण ऋषिंपर्यंत हे ज्ञान आले. इसवीसन   पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी सांख्य कारिका हा ग्रंथ लिहिला आहे.  आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो. 

'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा आधार आहे. याचा अर्थ 'सत्कारणांनीच सत्कार्याची  निर्मिती होऊ शकते'. 'सत् ' या शब्दाचा अर्थ 'अस्तित्व' असा आहे हे आपण अद्वैत दर्शन शिकताना पाहिले आहेच. म्हणजेच शून्यातून कशाचीही उत्पत्ती होऊ शकत नाही. अस्तित्वच अस्तित्वाला जन्म देते. 

सांख्य दर्शनासंबंधी अधिक नंतरच्या लेखात.