Saturday, April 9, 2016

श्री राम

राम हा भारतीय संस्कृतीत अंशावतार मनाला जातो. त्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. सामाजिक रुढींची बंधने पाळणारा आणि त्या चौकटीत राहून आपले अवतार कार्य करणारा अशी रामाची ओळख सांगता येईल. या दृष्टीने पूर्णावतार असणाऱ्या कृष्णाहून तो वेगळा ओळखता येतो.

श्री राम म्हटले की प्रथम डोळ्यापुढे येतो तो वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वनवासाला निघणारा राम. यावेळी खरे तर त्याने वडिलांची अन्यायकारक आज्ञा धुडकावून लावली असती तरी प्रजाजन त्याच्या बरोबर होते. परंतु त्याने सामाजिक रूढींना प्रमाण मानत वनवास पत्करला.

यावेळी येथील वैदिक समाज आणि अवैदिक जनसमूह यांच्यातील संघर्ष पराकोटीला पेटलेला दिसतो. म्हणूनच दक्षिणेतील वनात राहणारा अवैदिक समाज (ज्याला असुर म्हणूनही संबोधले जाते) वैदिकांचे वनात येऊन राहणे हा त्यांच्या संस्कृतीवरील हल्ला मानीत होता आणि त्यांचे यज्ञ उध्वस्त करीत होता. या असुरांकडे लढण्याची अस्त्रे म्हणजे परशु, भाले अशी जवळून लढण्याची अस्त्रे होती तर रामासाराख्या वैदिकांकडे लाबून लढाई करता येण्यासाखी धनुष्य-बाणासारखी अस्त्रे होती. राम हा धनुष्य चालविण्यात तरबेज असल्याने वैदिक ऋषी त्याच्याकडे तारणहार म्हणून बघत असत.

यावेळी  दक्षिणेकडे असुर राज्यांचे प्राबल्य होते. उत्तरेकडील अत्यंत प्रबळ असे मगधेचे असुर साम्राज्य बळीराजाला फसवून वैदिकांनी आधीच  ताब्यात  घेतले  होते. दक्षिणेकडे लंकेत पराक्रमी रावण राज्य करीत होता. त्याच्या उत्तरेला वालीचे साम्राज्य होते. दंडकारण्य परिसरात रावणाची बहिण शूर्पणखा राज्य करीत होती (शूर्पारक बंदराचे नाव त्यावरूनच आले असावे). आंध्र, ओरिसा बंगाल परिसरात बळीचे वंशज (औड्र, पौंड्र) राज्य करीत होते.  दंडकारण्यातील ऋषींच्या आश्रमावर असुरांचे  हल्ले  होत  होते. अशावेळी राम आपल्या  बायको  आणि  भावासह या अरण्यात वनवासाला आले. त्यावेळची ही भू-राजकीय परिस्थिती विचारात घेतली तरच रामाच्या पराक्रमाचे महत्व वैदिकांना का वाटले  आणि रामाची अवतारात गणना कशी झाली हे लक्षात येते.

सुरुवातीलाच रामाने शूर्पणखेचे नाक कापून रावणाला आव्हान दिले. त्याकाळी असुरांमध्ये असलेल्या परंपरेत (आणि वैदिकांतही बहुपत्नीत्वाची पद्धत होतीच) शुर्पणखेची मागणी अयोग्य नव्हती. यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या असुरांबरोबर कोठलीही  सोयरिक  रामाला  मान्य  नसावी. रामाने तिची खोडी  काढली  आणि नंतर नाक कापले. 'नाक कापणे' ही  येथील  परंपरेनुसार अपमान करण्याची परमावधी होती. याद्वारे रामाने रावणाला आव्हान दिले. याला उत्तर म्हणून रावणाने सीतेला पळविले. रावण हा नितीमत्ता पालनाचे आदर्श असलेल्या असुर कुळातील होता, शंकराचा भक्त होता, ध्यानी होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच त्याने सीतेला बंदिवासात ठेवली परंतु कोठलेही अत्याचार केले  नाहीत.

रावणाने सीतेला पळविल्याने रामाचे आव्हान स्वीकारल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता रामाला माघार घेणे शक्य नव्हते. बरोबर सेना नसताना रावणाच्या बलाढ्य सेनेशी सामना करायचा होता. यात त्याला सुग्रीवाची मदत झाली. वाली-सुग्रीव हे येथील अवैदिक परंपरेतील जनसमुहांमध्ये (वानर) होते. कोणालाही फसविणे हे त्यांच्या नीतिमत्तेत बसत नव्हते. परंतु रामाने सुग्रीवाचा पराभव होत आहे हे दिसताच कपटाने वालीला मारले. त्याला निरनिराळी कारणे देण्याचा कितीही प्रयत्न  केला तरी हे येथील अवैदिकांच्या नीतिमत्तेच्या कल्पनाच्या बाहेर होते. रामाला रावणाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सुग्रीवाची मदत घेणे अपरिहार्य होते त्यासाठी काहीही करण्यास त्याची तयारी होती आणि वैदिकांच्या नितीमत्तेतही ते बसणारे होते.

रावणाचा पराभव करण्यासाठी रामाने भेदनीती वापरली. बंधुप्रेमाचा आदर्श असलेल्या रामाने रावणाच्या भावालाच फितविले आणि युद्ध जिंकले. सीतेला घरी आणल्यावर केवळ एका परिटाच्या बोलण्यावरून तिला वनात टाकून दिले. राम हा स्वत:च्या अंतर्मानापेक्षा जनरीतीच्या मर्यादांना अधिक महत्व  देत  होता.
मात्र सीतेने धरणीत प्रवेश केल्यावर (उंच कड्यावरून उडी मारल्यावर) रामाने आपले जीवनकार्य संपविण्याचे ठरविले आणि शरयू नदीत प्रवेश केला.
त्याकाळी वैदिकांचे पाय दक्षिणेत रोवणारा म्हणून त्याचा समावेश अवतारात केला गेला.