Monday, November 18, 2019

Problem of Evil आणि कर्मसिद्धान्त

तत्वज्ञानाचा अभ्यास करताना अपरिहार्यपणे एक मुद्दा पुढे येतो. तो तत्वज्ञानात Problem of Evil या नावाने ओळखला जातो.  परमेश्वराची व्याख्या करताना तो  सर्वज्ञ (Omniacient), सर्वशक्तिमान (Omnipotent) , सार्वकालिक (Omnivorous) , आणि चराचरात सामावलेला (Omnopresent) अशी केली जाते.  मग असा सर्वशक्तिमान परमेश्वर जगात असताना जगावर, माणसांवर संकटे येतातच कशी हा प्रश्न अनेकवेळा सर्वसामान्य माणसाला पडतो.  पाश्चात्य धर्मकल्पनांनुसार (Abrahamic religions) परमेश्वरासारखाच एक सैतान आहे अशी कल्पना करून या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही सर्वशक्तिमान परमेश्वर या सैतानाला काबूत का आणू शकत नाही हा प्रश्न उरतोच.
मानवाच्या आदिम अवस्थेत मानवाला सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना सुचली असावी. हा परमेश्वर माणसासारखाच असून प्रसन्न झाल्यास आपले संरक्षण करेल, इच्छापूर्ती करेल, रागावल्यास संकटे निर्माण करेल अशी कल्पना मानवाने केली असावी.  अधिक प्रगती झाल्यावर मानवाने या परमेश्वराला दयाळूपणा जोडला असावा. मग सर्वशक्तिमान आणि दयाळू परमेश्वर असतानाही जगावर आणि आपल्यावर संकटे का येतात अशी शंका निर्माण झाली असणार. पाश्चात्य कल्पनांनुसार या परमेश्वराला तुम्ही शरण जाणे आवश्यक आहे. मगच तो तुमचे संरक्षण करेल.
भारतीय भूमीत मात्र या Problem of Evil ला वेगळे उत्तर शोधले गेले. येथे या प्रश्नाच्या उत्तरासाठी कर्मसिद्धांत मांडला  गेला.  परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. पण तुम्ही चांगली/वाईट कर्मे केली असतील तर त्यांची फळे तुम्हाला कधीनाकधी भोगावीच लागतील असे हा कर्मसिद्धांत सांगतो. चार्वाक सोडता भारतीय भूमीत जन्मलेल्या सर्व धर्मानी/दर्शनांनी ही कर्मसिद्धांताची कल्पना कोणत्या ना कोणत्या मार्गाने उचलून धरली आहे.  शून्यवाद स्वीकारलेल्या बौद्ध धर्मानेही ही कर्मसिद्धान्ताची कल्पना प्रतीत्यसमुत्पादात संख्ररा (संस्कार) या नावाने स्वीकारली आहे.
मात्र ही कर्मसिद्धान्ताची संकल्पना स्वीकारतानाही एक अडचण निर्माण होते. जीवाच्या जन्माचे कारण मागील कर्मांची फळे भोगणे हे आहे असे सांगितले जाते. जीव कर्माची फळे भोगताना अज्ञानामुळे नवी कर्मे निर्माण करतो आणि ही साखळी चालू राहते असे कर्मसिद्धांत मानतो. जरी कर्मसिद्धांताच्या साखळीची कल्पना मान्य केली तरी ही साखळी मुळात सुरूच का झाली हा प्रश्न उभा राहतो. कर्मसिद्धांतावरील हाच मुख्य आक्षेप आहे.
कर्मसिद्धान्ताची संकल्पना समजावून घेताना 'माया' ही संकल्पनाही समजावून घेणे अपरिहार्य ठरते. माया ही ब्रह्माची शक्ती आहे हे आपण या आधीच्या लेखात पहिले आहे. सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, मायेच्या आवरणामुळे ते आपल्याला भासमान होते.  आपले मायेसंबंधीचे अज्ञान दूर झाले की ब्रह्म प्रकट होते.  स्थल आणि काल हे मायेचे क्षेत्र आहे. विश्वाच्या आरंभापूर्वी काल नव्हता तसेच स्थल (Space) नव्हते. त्यामुळे तेव्हा मायेचे अस्तित्व नव्हते. मात्र ब्रह्माचे होते.  कार्यकारणभाव हा कालावर अवलंबून असतो. कारण आधी घडावे लागते, मगच कार्य होते. म्हणजेच कार्यकारणभाव हे मायेचे क्षेत्र आहे. कर्म आधी घडावे लागते, त्याची फळे नंतर मिळतात. अर्थात कर्मसिद्धांत हा मायेच्या क्षेत्रात येतो.
माया ही अज्ञानरूपात आहे.  ब्रह्माच्या अज्ञानात मायेचा जन्म आहे. कोणत्याही अज्ञानाला आरंभ नसतो. अंत असू शकतो. उदाहरणार्थ मला रशियन भाषेचे ज्ञान नाही.  'कधीपासून मला रशियन भाषेचे ज्ञान नाही?'  असा प्रश्न उद्भवत नाही.  माझ्या या अज्ञानाला आरंभ नाही.  परंतु अंत असू शकतो. मी रशियन शिकल्यास या अज्ञानाचा अंत होईल. तद्वतच अज्ञानारुपी मायेत जन्म झालेल्या आपल्या कर्मसाखळीला आरंभ नाही. परंतु अंत असू शकतो. आपल्याला  मायेचे खरे स्वरूप कळल्यास या अज्ञानाचा अंत होईल. आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त होऊ.
आपल्या सर्वांना मायेच्या स्वरूपाचा बोध व्हावा आणि आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त व्हावे ही शुभेच्छा.

Sunday, November 17, 2019

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.
चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस

Friday, October 18, 2019

वेदांत

आपण गेले काही महिने वेदांताचा अभ्यास करीत आहोत.
वेदांताची मध्यवर्ती भूमिका ही 'को अहं ?' अथवा "मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेण्याची आहे.  "मी कोण" याचा शोध घेणे हा काही रिकामपणाचा उद्योग नाही. आपल्याला दैनंदिन आयुष्यात जे मानसिक अस्वास्थ्य अनुभवास येते, जी दु:खे सहन करावी लागतात त्याचे मूलभूत कारण "मी कोण आहे" याचा शोध न लागणे हे आहे असे वेदांत मानते.  आपण स्वत:ला आपले शरीर किंवा फार तर आपले मन समजतो. या
मुळे आपण स्वतः:ला या शरीरात बद्ध करून घेतो. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे कारण ही बंधनाची जाणीव आहे. 
आपण आपल्याला आपले शरीर अथवा मन समजतो याचे कारण आपल्याला आपल्यात असलेल्या चैतन्याचा अनुभव आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत सीमित असतो. त्यामुळे साहजिकच आपण आपल्याला आपले शरीर समजतो. आपले मन या चैतन्याशी एकरूप झालेले असल्याने आपण कधीकधी आपल्याला आपले मन समजतो. परंतु आपल्या मनाला आपल्या शरीरापर्यंतच सत्ता गाजविता येते. त्यामुळे स्वत:ला आपले मन समजणे हे ही आपल्याला एका मर्यादेत जखडणे असते. 
वेदान्ताचे प्रतिपादन आहे (आणि खोलात गेल्यावर आपल्याला त्याचा अनुभव येतो) की आपण आपल्या शरीर अथवा मनापुरते मर्यादित नाही. आपले चैतन्य हे चैतन्याचा महासागर पसरलेला आहे त्याचाच एक भाग आहे. किंबहुना चैतन्याचा स्रोत (ज्याला वेदांत बह्म या नावाने संबोधते) तळपत असतो.  या स्रोतातून सातत्याने पाझरणाऱ्या चैतन्यसोबत आपले मन एकरूप होते. आपल्या मनाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत पसरते. आपल्या ज्ञानेंद्रियांना चेतना देते. म्हणजेच आपण हे आपला देह अथवा मन नसून हा चैतन्याचा स्रोत म्हणजेच ब्रह्म आहोत. 
मग आपल्या या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आपल्याला का होत नाही? आपली ज्ञानेंद्रिये सातत्याने आपल्या शरीराच्या बाहेरील अनुभवात गुंतलेली असतात. आपल्या मनाच्या आरशात पडलेल्या चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने शरीराच्या बाहेर करीत असतात. जर या चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात अथवा ब्रह्माच्या विचारात केले तर ब्रह्मज्ञान होऊ शकते.  ध्यानाच्या विविध पद्धतीत चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात/मनात होते.
गौतम बुद्धाने विकसित केलेल्या विपश्यना ध्यान पद्धतीत आपल्याच शरीराचा वेध घ्यायचा असतो.  गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात (http://www.dhamma.org) ही ध्यान पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविली जाते.  गौतम बुद्धाला  "को अहं" या प्रश्नाचे उत्तर वेदान्ताच्या उत्तरापेक्षा वेगळे मिळाले. पण गौतम बुद्धाची ध्यानपद्धती ही वेदांच्या ध्यानपद्धतीशी मिळतीजुळती होती. गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतूनच आलेले होते.
वेदांताचा आपण अधिक खोलात शिरून अभ्यास करणार आहोत. 

Wednesday, October 16, 2019

अपरोक्षानुभूती : निराभास-1

आद्य शंकराचार्यांचा 'अपरोक्षानुभूती' हा वेदांताच्या प्रकरण ग्रंथाचा  (Introductory Text)  अभ्यास सध्या सुरु आहे.  पूर्ण होण्यास अजून सुमारे एक वर्ष लागेल असा अंदाज आहे. नंतर त्यावर विस्तृत लिहीनच.
परंतु या ग्रंथाचा २६वा श्लोक आणि त्यातील एक शब्द खूपच महत्वाचा वाटला. म्हणून त्यावर लिहितो आहे. हा आणि याच्या आधीच्या श्लोकांत आपण देहापासून कसे वेगळे आहोत हे आद्य शंकराचार्य समजावून सांगत आहेत. यापूर्वी द्रष्टा-दृश्य विवेक या गंथाचे परिशीलन करताना आपण देहापासून आपण कसे वेगळे आहोत याची विविध प्रकारे केलेली कारणमीमांसा पहिली आहे.  आपण म्हणजे हा देह नाही, मन नाही हे वेदान्ताचे प्रथम सांगणे आहे. जर आपण देह-मन नाही तर आपण कोण आहोत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या श्लोकात शंकराचार्य आपण कोण आहोत हे समाजविण्याची सुरुवात करीत आहेत.
या श्लोकातील 'निराभास' हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपण 'निराभास' आहोत असे शंकराचार्य सांगतात. 'निराभास' या शब्दाचा शब्दाश: अर्थ 'कोठल्याही भासाशिवाय' म्हणजे 'without reflection' असा होतो. या शब्दात अद्वैत वेदान्ताचे सार सामावलेले आहे. 
आपण आधी आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान कसे होते हे जाणून घेऊ. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे ही प्रक्रिया दोन भागात होते. याला वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती अशी नावे आहेत.
आपली पंचेंद्रिये ही केवळ बाह्यजगताशी संपर्क साधणारी साधने आहेत. ही पंचेंद्रीये प्रत्येक क्षणी कित्येक हजार बाइट्स डेटा मेंदूला पाठवीत असतात.  उदाहरणार्थ डोळे. आपल्याला वस्तू दिसते म्हणजे ती वस्तू आपल्या डोळ्यात शिरत नाही. या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यात शिरतात. नेत्रपटलावर त्याची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे रूपांतर विद्युत स्पंदनांत होते. ही स्पंदने मेंदूच्या विशिष्ट भागातील पेशी उद्दिपित करतात. या पेशी या विद्युत स्पंदनांचे परत चित्रात रूपांतर करतात. आणि आपल्याला त्या वस्तूच्या रूपाचे ज्ञान होते. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे आणि विज्ञानालाही ही प्रक्रिया कशी घडते याचा संपूर्ण शोध लागलेला नाही.
परंतु यातही एक गमतीचा भाग असा, की डोळे प्रतिक्षणी खूप माहिती मेंदूकडे पाठवीत असतात. पण ही सर्व माहिती गोळा करण्याची मेंदूची क्षमता नाही. या माहितीपैकी कोणती माहिती घ्यायची हे मेंदू ठरवितो. येथे वृत्तिव्याप्तीचा संबंध येतो.
मेंदू अथवा मन एखाद्या गोष्टीबाबतच्या अनुभवांचे अथवा एखाद्या विचारांचे ग्रहण करण्यास सिद्ध झाले असेल तर ते त्या 'वृत्तीने व्याप्त झाले आहे' असे अद्वैत वेदांत मानते.  एखादे पाण्याने भरलेले पात्र आपण पहात असू तर आपले मन  'पात्रवृत्ती'ने भरले आहे असे म्हणता येईल. एखादा विद्यार्थी वर्गात उपस्थित असतो, पण मन भरकटल्याने त्याचे शिक्षक काय बोलत आहे याकडे लक्ष नसते. हे त्या विषयाच्या ठिकाणी वृत्तिव्याप्ती नसल्याचे उदाहरण आहे.  एखाद्या वस्तूचे / विचाराचे ज्ञान होण्यासाठी त्या वस्तूची / विचाराची 'वृत्तिव्याप्ती' असणे आवश्यक आहे.
एखादी गोष्ट मेंदूपर्यंत ज्ञानतंतूंद्वारे (नर्व्हजच्या साहाय्याने) पोचल्यावर वृत्तिव्याप्तीअसेल तर मेंदू ती  माहिती स्वीकारतो आणि यानंतर त्या माहितीचे पृथ:करण चालू होते. ही मिळालेली माहिती आधीच्या ज्ञानाशी कोठे मिळते का याची चाचपणी होते. त्यानुसार मेंदू पुढील सूचना देतो. या प्रक्रियेला 'फलव्याप्ती' असे नाव आहे.
पुढील लेखात आपण या वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्तीसंबंधी अधिक माहिती घेऊ.  

अपरोक्षानुभूती : निराभास -2

आपण मागच्या लेखात वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय हे पहिले.  त्यासंबंधी थोडे आणखी जाणून घेऊ.
आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत आहोत. खोलीला खिडकी आहे, परंतु खिडकीच्या विशिष्ट दिशेमुळे सूर्यकिरण आत पोचत नाहीत. आपण खिडकीजवळ छोटा आरसा घेऊन उभे राहिलो आणि सूर्यकिरणांचा कवडसा त्या खोलीत पाडला तर तेवढा भाग प्रकाशित होतो.  म्हणजेच एखादी वस्तू दिसण्यासाठी आपल्याला आरशाला त्या वस्तूच्या दिशेने वळवावे लागते. ती वस्तू प्रकाशित व्हावी लागते.
आपले असेच असते.  स्वयंप्रकाशी ब्रह्म  अथवा साक्षी चैतन्य आकाशात तळपत असते. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या ज्ञानेंद्रियांत प्रकटते. हा मनाचा आरसा ज्या वस्तूच्या अथवा विचाराच्या  दिशेने चैतन्य परावर्तित करतो त्या वस्तूचे / विचाराचे आपल्याला त्या त्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्या वस्तूसंबंधी वृत्ती आपल्या मनात निर्माण होते. मग आपले चैतन्य ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला त्या वस्तूचे/विचाराचे ज्ञान करून देतात. ती वस्तू आपल्या मनातून परावर्तित झालेल्या चैतन्याने प्रभावित होते/ प्रकाशित होते. प्रकाशित झाल्यावर आपल्याला त्या वास्तूचे ज्ञान हेते. ही झाली त्या वस्तूची/ विचाराची फलव्याप्ती.  वृत्तिव्याप्ती ही प्रथम आपल्या मनात होते, वृत्तिव्यापीमुळे चैतन्याने प्रकाशित झालेल्या वस्तूचे ज्ञान आपल्याला होते. ही झाली फलव्याप्ती  . ज्ञान होण्यासाठी वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
आपल्याला सूर्याचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर आरसा सूर्याच्या दिशने वळवावा लागेल. तरच त्या आरशात  आपल्याला सूर्याची प्रतिमा दिसेल. मात्र या आरशाच्या कवडशाच्या साहाय्याने सूर्याला प्रकाशित करण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच आपल्याला ब्रह्माचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर केवळ वृत्तिव्याप्ती पुरेशी आहे, फलव्याप्तीची गरज नाही. आपल्याला आपल्या 'चित्तवृत्ती' ब्रह्माकडे वळवाव्या लागतील, ब्रह्माकार कराव्या लागतील. केवळ तेवढे पुरेसे आहे. ज्या क्षणी चित्तवृत्ती ब्रह्माकार होतील त्याक्षणी ब्रह्म आपल्यापुढे प्रकट होईल.
विविध प्रकारच्या अध्यात्मिक साधना या आपली 'वृत्ती' ब्रह्माकार करण्याच्या साधना आहेत. मग ती भक्तिमार्गातील भक्तीची साधना असो, योगमार्गातील चित्तवृत्तींना शांत करण्याची ध्यानाची साधना असो अथवा अद्वैत वेदान्तातील आपले अज्ञान दूर करून ज्ञानाची कवाडे उघडण्याची ज्ञानसाधना असो.
ब्रह्माचे आकलन होण्यासाठी चैतन्याचे ब्रह्मावर प्रक्षेपण होण्याची गरज नाही. केवळ मनाचा आरसा ब्रह्माकडे वळविला तरी पुरेसे आहे. यालाच 'निराभास' असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याच्या जवळ जाणारा शब्द समूह 'without reflection' असू शकेल. अद्वैत वेदान्ताचे सार या एका शब्दात सामावलेले आहे.
मागच्या भागाची लिंक : https://www.facebook.com/photo.php?fbid=10218039445771927


Tuesday, October 8, 2019

चीन-३

चीनचे कॅलेंडर आपल्यासारखेच चंद्राच्या कलांवर आधारलेले आहे.  त्याला ते Lunar Calendar असेच म्हणतात. कोरिया आदी चीनच्या जवळपासच्या काही देशांत ते वापरले जाते. त्यांचे नववर्ष आपल्या एक ते दोन महिने आधी सुरु होते (अधिक महिना कधी येतो त्यावर अवलंबून). आपल्याकडे नववर्ष जसे सृष्टीचा नव्याने पाळावी फुटण्याचा महोत्सव असतो तसेच चीनमध्येही यावेळी कडाक्याची थंडी संपून झाडांना नवी पालवी येऊ लागलेली असते.  नववर्ष महोत्सव हा चीनमधील अत्यंत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.  राष्ट्रीय दिवसाप्रमाणे (१ ऑक्टोबर) या दिवशीही चिनी लोक आपापल्या गावी येतात. हा उत्सव त्याचे कुटुंबीयांची पुनर्मीलन असते. सर्वसाधारणपणे यावेळी सर्व कंपन्यांना पंधरा दिवस सुट्टी असते. बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते.
छेनामध्ये या वेळी भरपूर फटाके उडविले जातात. आपल्यासारखेच रस्त्यात फटाके उडविले जात असतात. मोठ्या शहरात आता रस्त्यांवर फटाके उडविण्यास बंदी आहे.  यावेळी घराघरांवर चिनी पद्धतीचे कागदी लाल कंदील लावले जातात. या कंदिलांवर शुभेच्छादर्शक वचने असतात. यावेळी घरातील लहान मुलाला छोटा रेशमाचा लाल कंदील भेट म्हणून दिला जातो. हा कंदील घराच्या दारावर लावायचा असतो. मोठा झाल्यावर मुलीला लग्नासाठी मागणी घालताना हा कंदील त्याने त्या मुलीला द्यायचा अशी पद्धत आहे.  माझया मुलासाठी माझया चिनी सहकाऱ्यांनी हा कंदील मला दिला होता आणि त्याचे काय करायचे हे सांगितले होते.
नववर्षदिनी घरासमोर फळे धरलेले संत्र्याचे झाड असणे खूप शुभ समजले जाते. त्यामुळे यावेळी मॉलमध्ये फळे लगडलेली संत्र्याची कुंडीतील झाडे विकण्यासाठी ठेवलेली असतात. मँडरिन भाषेत लिहिलेली लाल रंगाची शुभेच्छापत्रे एकमेकांना देतात. लाल रंग हा शुभ समाजाला जात असल्याने सर्वत्र लाल रंगाचे साम्राज्य दिसते. (मात्र कोणाचे नाव लाल रंगात लिहिणे खूप अशुभ समजतात. लाल रंगात कोणाचेही नाव आपण लिहिले तर आपण त्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करीत आहोत असे समजले जाते. आम्हाला चीनमध्ये गेल्यावर ही काळजी घेण्यास सांगितले होते) नववर्षदिन पक्वान्न होतात. नववर्षाच्या आसपास मित्रमंडळींना घरी बोलावितात. गावात ड्रॅगॉन डान्स होतात. घरासमोर, दुकानासमोर ड्रॅगन डान्स झाल्यास अशुभ शक्ती दूर  पाळतात आणि भरभराट होते असा समज आहे. ड्रॅगॉन डान्स करणारी मंडळे असतात. त्यांना मुद्दाम बोलावून भरपूर पैसे देतात. हा ड्रॅगॉन डान्स पाहण्यासारखा असतो.
नववर्षदिनी घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात. मोठी माणसे त्यांना आशीर्वाद देतात तसेच लाल रंगाच्या कागदात गुंडाळलेली भेटवस्तू अथवा लाल पाकिटात काही पैसे घालून लहान मुलांना देतात.
चीनमध्ये प्रत्येक वर्षाला एका प्राण्याचे नाव असते. त्या त्या नावाच्या वर्षात जन्मलेल्या माणसाची ती 'जन्मरास' असते असे ते मानतात. पहिली रास 'उंदीर', दुसरी 'बैल' तर बारावी 'डुक्कर' आहे. त्यांच्या पौराणिक कथेप्रमाणे १२ प्राणी परमेश्वराकडे गेले. बैल शक्तिवान असल्याने तो सर्वात पुढे होता. पण देवासमोर जाण्याच्या क्षणी बैलाच्या पाठीवरून उंदराने उडी मारली आणि तो सर्वात प्रथम देवापुढे पोचला. म्हणून उंदीर ही पहिली रास आहे. त्या त्या राशींच्या प्राण्याच्या स्वभावावरून त्या त्या जन्मराशींच्या माणसांचे स्वभाव ठरतात असे ते मानतात.  ड्रॅगॉन राशी सर्वात शुभ मनाली जाते. या राशीच्या माणसांना राजयोग असतो अशी समजूत आहे.  ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु झालेल्या चिनी वर्षाची राशी 'डुक्कर' आहे.
चिनी राशी दर बारा वर्षांनी परत येतात.  प्रत्येक चक्रातील बारा राशींना (उंदरापासून डुकरापर्यंत) एका चक्रात गुंफिले आहे. अशी पाच चक्रे असतात. प्रत्येक चक्र चिनी पंचमहाभूतांशी जोडलेले आहे. ही पंचमभूते म्हणजे जल, काष्ठ, अग्नी, सुवर्ण, पृथ्वी.  यापैकी सुवर्णचक्र हे अतिशय भाग्यवान समजले जाते. सध्या पृथ्वीचक्रातील शेवटचे वर्ष चालू आहे.  सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्मलेले मूल अत्यंत भाग्यवान मानले जाते. त्यामुळे अनेक चिनी कुटुंबनियोजन करून आपले मूल सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्माला येईल अशा प्रयत्नात असतात. त्यामुळे चिनी समाजात २००० साली सुवर्णड्रॅगन वर्षी  'बेबीबूम' आली होती.
ज्यांना शक्य असेल त्यांनी चिनी नववर्षदिनी चीनला अथवा सिंगापूरला भेट द्यावी आणि हा चिनी नववर्षाचा उत्साह अनुभवावा. आता येऊ घातलेला  चिनी नववर्षदिन  २५ जानेवारी २०२० रोजी आहे. 

Friday, October 4, 2019

चीन-2

चीनी क्रांतीचा सत्तरावा वर्धापनदिन नुकताच पार पडला. त्या निमित्ताने मी काल  चिनी खाद्य संस्कृतीवर लिहिले होते. आता थोडे चिनी संस्कृतीवर.
चीनमध्ये अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि भाषा वेगळी आहे. परंतु चिनी सरकारला ही 'विविधतेत एकता' मजूर नाही. त्यामुळे चीनने सर्व चीनवर 'मँडरिन' ही एकाच भाषा लादली आहे (जिला आपण चिनी भाषा म्हणून ओळखतो).  सर्व शिक्षण याच भाषेत असते. महाविद्यालयीन शिक्षणही याच भाषेत असते. सर्व सरकारी कागदपत्रेही याच भाषेत असतात. त्यामुळे नवी पिढी त्यांची मूळ भाषा विसरू लागली आहे.  १९९६ साली माझ्यासोबत काम करणारी माझी तरुण मित्रमंडळी त्यांची मूळ भाषा बोलू शकत नव्हती, पण समजू शकत होती. त्यांचे आजी-आजोबा ती  भाषा बोलत असल्याने त्यांना ती जेमतेम समजत होती.
चीनमध्ये ५७ 'नॅशनॅलिटीज ' आहेत. म्हणजेच ५७ भिन्न वांशिक समूहांचे लोक राहातात.  यात ९१. ५९% हे 'हान' समूहाचे आहेत तर ८.४१% हे बाकी ५६ वंशाचे आहेत.  त्यामुळे सर्व निर्णयांवर हान वंशाचा पगडा दिसतो.  अनेक अल्पसंख्य वांशिक समूहांवर 'हान' समूहाकडून अन्याय होत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.  उइगर वंशाच्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. तिबेटी वांशिक नागरिकांवर अत्याचाराच्या बातम्या भारतीय वृत्तपत्रात येत असतात.
चिनी भाषेच्या दोन लिप्या आहेत. यात अक्षरे नसतात, तर ही चित्रलिपी आहे.  एक लिपी प्राचीन आहे. त्यात सुमारे तीन हजार चित्रे आहेत. सध्या बहुसंख्य ठिकाणी सोपी केलेली लिपी वापरली जाते. त्यात थोडीशी चित्रे आहेत. चित्र लिपी असल्याने आपले नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. आपल्या नावाचे भाग करून उच्चारानुसार (तसा  उच्चार असलेल्या वस्तूंची चित्रे एकासमोर एक ठेऊन) आपले नाव लिहिले जाते. अक्षरांची सवय असलेल्या आपल्याला हे थोडे विचित्र वाटते.
चीन आणि त्याच्या पूर्व सीमेवर असलेला कोरिया यांच्यात पूर्वापार वैर आहे.  कोरियन लोकांनी चिनी सम्राटांना जेरीस आणले होते. म्हणून पूर्वीच्या कोरिया-चीन सीमेवर कोरियन लोकांपासून बचाव करण्यासाठी अजस्त्र चिनी भिंत बांधली होती. आजही कोरियन वंशाचे काही लोक चीनमध्ये राहतात. ५६ अल्पसंख्य वांशिक गटांपैकी कोरियन हे एक आहेत.
या विविध वांशिक गटांच्या संस्कृतीचे प्रदर्शन चीनने शेनझन या 'विशेष औद्योगिक क्षेत्रात' उभे केले आहे. शेनझन हे चीनच्या मुख्य भूमीत असलेले हाँग काँगचे जुळे शहर आहे. हाँग काँगला भेट देणाऱ्या पर्यटकांनी शेनझनला अवश्य भेट द्यावी. या प्रदर्शनात ता विविध वांशिक गटांच्या राहण्याच्या, खाण्याच्या आणि लग्नसमारंभ इत्यादींच्या पद्धती दाखविलेल्या आहेत. भारतातही अनेक जातिसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती आहेत. त्या कालौघात नष्ट होत आहेत. त्यांचे असेच एखादे कायमस्वरूपी प्रदर्शन का असू नये?
या प्रदर्शनात एका वांशिक समूहाने माझे लक्ष वेधून घेतले. या समूहाच्या विभागासमोर काहीजण सनई-चौघडा वाजवीत होते. हे वाद्य मंगलसमयी वापरतात असे तेथे लिहिले होते. तसेच या ठिकाणी एक जाते ठेवलेले होते. हे यंत्र पीठ करण्यासाठी वापरले जाते अशी माहिती होती. तसेच एका विहिरींची प्रतिकृती असून त्यावर रहाट होता. हा समूह निश्चितच भारतातून चीनमध्ये स्थलांतरित झालेला असावा. यावर कोणीतरी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. (या गोष्टीला आता वीस वर्षे झाली. मी त्या वांशिक समूहाचे नाव विसरलो).
याच प्रदर्शनात विविध वांशिक गटांच्या खाद्यपदार्थांचा एक विभाग होता. तेथे मला 'Goat Meat Available' अशी पाटी  दिसली. चीनमध्ये बकऱ्याचे मांस मिळत नसल्याने मी लगेच तेथे धावलो. तेथील माणूस प्रथमतः: मला पाकिस्तानी समजला. मी भारतीय असल्याचे कळल्यावर त्याने माझ्याशी हिंदीत बोलणे चालू केले.  मी आश्चर्याने थक्क झालो. तो कस्तगरचा असल्याचे मला परत परत सांगत होता. मला हे कस्तगर कोठे आहे तेच माहित नव्हते. नंतर शोध घेता हे ठिकाण तिबेटजवळ सिल्क रूटवर असल्याचे आणि त्या प्रदेशाशी भारतीय व्यापाऱ्यांचे येणेजाणे चीन राज्यक्रांतीपर्यंत होते असे लक्षात आले. त्यामुळेच तेथील रहिवाशाना अजूनही हिंदी चांगले बोलता येते.
चीनमध्ये अनेक लोक बुद्धाला मानतात. बुद्धाला तेथे शुकमुनि या नावानेही ओळखतात. हे नाव शाक्यमुनी शब्दाचा अपभ्रंश असावा. बुद्ध शाक्यवंशीय होता.  चीनमध्ये धर्माचे पालन जाहीरपणे करता येत नसल्याने बौद्धमंदिरे नाहीत. परंतु हाँग काँग मध्ये आहेत. मी तेथील एका मंदिरात गेलो होतो. पूजाविधीची पद्धत आपल्याशी जुळणारी आहे. जाड अगरबत्त्या देवाला वाहण्याची प्रथा आहे.  देवळात चिठ्ठीच्या साहाय्याने तुमचे भविष्य सांगणारे बसलेले असतात. नुकतेच चिनी सरकारने कन्फ्यूशियम हा चीनचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर करण्याचे ठरविले आहे.
चीनमध्ये कायदे पालनाची व्यवस्था अत्यंत चांगली आहे. एकदा एका टॅक्सीचालकाने माझ्याकडून जास्त पैसे घेतले.  तेथे टॅक्सी इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या आहेत.  आपल्या नियोजित स्थळी पोचताच छापील बिल येते. त्यावर बाकी सर्व त्यांच्या लिपीत असले तरी आकडे रोमन असतात. टॅक्सिवाल्याने बळजबरीने जास्त पैसे घेतले. माझ्या कार्यालयातील लोकांना हे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. जर मी तक्रार केली असती तर त्या टॅक्सीवाल्याचा परवाना गेला असताच, पण परदेशी प्रवाशांना त्रास दिल्याबद्दल कडक शिक्षा झाली असती.  मला त्या टॅक्सीवाल्याची  दया आली आणि मी तक्रार केली नाही.
एकदा मी चीनमध्ये असताना चाच्यांनी पळवलेले  इंडोनेशियन जहाज चीनने नजीकच्या समुद्रात पकडले.  त्याची न्यायव्यवस्था एवढी जलद आहे की चार महिन्यात त्या सर्व चाच्यांना मृत्युदंड दिला जाऊन त्याची अंमलबजावणीही झाली.
जगातील अन्य राष्ट्रात मिळून दहा वर्षात जितक्या लोकांना मृत्युदंड दिला जात नाही एवढ्या लोकांना चीनमध्ये एका वर्षात दिला जातो.  चीनमधील प्रमुख सणांच्या काही दिवस आधी (वर्षातून चार वेळा) एकाच दिवशी सर्व मृत्युदंडाची शिक्षा झालेल्याना गोळी घालून मारले जाते. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांच्या शरीरावर त्यांच्या नातेवाईकांचा हक्क नसतो. या मारलेल्या कैद्यांच्या शरीरातील अवयव काढून ते इच्छुक रुग्णांना दिले जातात. यामुळे चीनमधील डॉक्टर्स हे अवयव प्रत्यारोपण करण्यात जगात सर्वात अनुभवी समजले जातात.
या प्रकारच्या कायद्याच्या अत्यंत कडक अंमलबजावणीमुळे चीनमध्ये रात्री-बेरात्री फिरतानाही सुरक्षित वाटते.  शेनझन शहरात आम्ही अनेक वेळा एकटेच चालत सबवे पार करून मध्यरात्री आमच्या कंपनीत जात असू. पण कोणालाच कधी भीती वाटली नाही. अगदी अमेरिकेतही आम्ही असे निर्धास्त फिरू शकलो नाही.
चिनी नागरिक या वातावरणात आनंदी आहेत. १९८९ साली लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन चिनी सरकारने रणगाडे विद्यार्थ्यांच्या अंगावर घालून तो उठाव मोडून काढला होता. पण त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे सध्याचा तरुणवर्ग त्यांच्या राजकीय पद्धतीबद्दल समाधानी दिसतो. १९८९ चा उठाव ही मोठी चूक होती असे बहुसंख्य लोकांचे मत दिसते.
पुढील लेखात चिनी कॅलेंडर आणि नववर्ष उत्सव या संदर्भात.


Thursday, October 3, 2019

China - 1

काल चीनच्या राज्यक्रांतीला सत्तर वर्षे झाली. १९७९ पर्यंत जवळपास आपल्याचसारखी आर्थिक स्थिती असलेला हा देश नंतरच्या काळात आपल्याला खूपच मागे टाकून पुढे गेला. यामुळे मला चीनबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत आले आहे. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा कधीतरी चीनमध्ये काम करण्यास मिळावे अशी सुप्त इच्छा होती. ती फलद्रुप होऊन मला प्रत्येकी सुमारे सहा महिन्यांचे तीन प्रोजेक्ट चीनच्या मुख्य भूमीवर आणि एक हाँग काँग मध्ये करण्यास मिळाला. या निमित्ताने मला चीनची अर्थव्यवस्था, संस्कृती, इतिहास, जीवनपद्धती आणि तेथील लोकांची स्वभाववैशिष्ट्ये यांचा जवळून अभ्यास करता आला.
चिनी माणसांचा स्वभाव खूपच आतिथ्यशील आहे. 'अतिथी देवो भव ' ही परंपरा सर्वच आशियायी देशांत आहे, पण चीनमध्ये मला ती प्रत्येकाच्या स्वभावात मुरलेली जाणवली. मी कुटुंबाशिवाय एकटा राहत आहे याची जाणीव सर्व सहकाऱ्यांना होती. शनिवार-रविवार मला कंटाळा येऊ नये म्हणून ते आवर्जून प्रयत्न करीत. मात्र एखाद्या चिनी पारंपरिक लग्नसमारंभास जावे अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही.
No photo description available.'चीनमध्ये मी काय खात होतो' हा प्रश्न मला भारतात अनेकदा विचारला गेला. चिनी लोक काहीही खातात अशी आपली समजूत आहे. ही समजूत काही प्रमाणातच खरी आहे. चीन भारतासारखाच विशाल देश आहे. त्याचे अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची (भारतासारखीच) वेगळी संस्कृती, भाषा आणि खाद्य संस्कृती आहे. चीनच्या कँटोन प्रांतातील लोक निरनिराळे प्राणी/कीटक खातात. कँटोन हा चीनच्या आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) असलेला प्रांत आहे. हाँग काँग कँटोनमध्येच येते. चीनच्या उत्तरेला 'हान' वंशाचे लोक राहतात. ते चीनमध्ये बहुसंख्येने आहेत. ते असे कोठलेही प्राणी-कीटक खाणे निषिद्ध समजतात. चीनमध्ये प्रामुख्याने डुक्कर खाल्ले जाते. परंतु पश्चिमेला असलेल्या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य आहेत. ते डुक्कर खात नाहीत तर बीफ खातात. त्यामुळे चीनच्या कंपन्यांतील कॅंटीनमध्ये मुस्लिमांसाठी वेगळा काउंटर असतो. त्यावर डुक्कराचे पदार्थ मिळत नाहीत. मी 'सर्वहारी' असल्याने आणि मला नव्या चवी घेऊन बघण्याची आवड असल्याने चीनमध्ये मला कोठेच खाण्याची समस्या आली नाही. चिनी पदार्थात मसाले असतात. पण ते आपल्या मसाल्यांपेक्षा वेगळे असतात. आपल्याकडे मिळणाऱ्या चिनी पदार्थांची चव आपल्या जिभेला सोयीची केलेली असते. मूळ चिनी पदार्थांची चव पूर्णतः: वेगळी असते. मला भारतीय चिनी पदार्थांपेक्षा मूळ चिनी चवीचे पदार्थ आवडतात. त्यामुळेही मी चीनमध्ये आरामात राहू शकलो आणि सर्वसामान्य लोकांत सहज मिसळू शकलो. मी बेजिंगमध्ये राहत असताना माझ्या जवळच चीनची सुप्रसिद्ध 'खाऊ गल्ली ' होती. तेथे अनेक प्रकारचे कीटक खाण्यास मिळतात. पण असे कीटक खाणे सर्वसामान्य चिनी लोकांस कमीपणाचे वाटत असल्याने बहुदा मी बेजिंगमध्ये असेपर्यंत मला त्याचा पत्ता माझया चिनी मित्रांनी लागू दिला नाही. त्यामुळे या नव्या खाद्यानुभवाला मी मुकलो.
चीनमधील मध्यम आकाराच्या गावात हॉटेलांत पिंजरे ठेवलेले असतात. त्यात अनेक जिवंत प्राणी असतात. एखादे प्राणीसंग्रहालय वाटावे असे चित्रविचित्र जिवंत प्राणी ठेवलेले असतात. मी त्यात मुंगूस, मोर, हरीण, साप,नाग, कोंबडी असे अनेक प्राणी पहिले. मोठ्याल्या फिश टॅंकमध्ये मासे असतात. तुम्हाला जो प्राणी / मासा हवा तो दाखवायचा. मग तो प्राणी शिजवून आणून देतात. मात्र त्या पूर्ण प्राण्याची ऑर्डर द्यावी लागते. मला साप खाऊन बघण्याची इच्छा होती. पण 'एका सापाचे सूप पाच माणसांसाठी असते' असे मला सांगितले गेले. माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांपैकी (चिनी, भारतीय, युरोपियन, अमेरिकन) कोणीही हे सूप घेण्यास तयार न झाल्याने मला साप खाऊन बघता आला नाही.
चीन संस्कृतीसंबंधी पुढील लेखात.

Thursday, August 29, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-६

महाभारत युद्ध संपले. भारतवर्षातील आजवरचे सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून हे युद्ध ओळखले जाते. महाभारत हा कुरु वंशाच्या सात पिढ्यांचा .(शंतनू-विचित्रवीर्य-पंडू-अर्जुन-अभिमन्यू-परीक्षित-जनमेजय ) इतिहास आहे. हा व्यासांच्या डोळ्यासमोर घडलेला आहे. व्यास हे शंतनूचे सावत्र पुत्र आणि धृतराष्ट्र-पांडू-विदुर यांचे जैविक पिता. यामुळे या लेखनाला वैधता प्राप्त होते. आपण या लेखमालेत त्यातील कृष्णाचा सहभाग फक्त पाहत आहोत. कृष्णाची धडपड ज्या यादव राज्यासाठी चालली होती त्याचे महाभारत युद्धानंतर काय झाले हे आपण या  लेखात पाहू. या लेखमालेतील हा शेवटचा लेख आहे.
भारतवर्षातील जवळपास सर्व  राज्ये यात सहभागी झाली होती. ब्रह्मास्त्राचा रणभूमीवर उपयोग कदाचित प्रथमच (आणि शेवटचा) झाला असावा. येथील सुमारे ८०% प्रौढ पुरुष जनसंख्या या युद्धात मृत्युमुखी पडली. या युद्धानंतर शेकडो वर्षे भारत अंधारयुगात चाचपडत होता. काहीजण या युद्धासाठी कृष्णाला जबाबदार ठरवितात. पण मला तसे वाटत नाही. त्यावेळची भारताची भूराजकीय परिस्थिती, येथील अनेक सामर्थ्यसंपन्न राष्ट्रे आणि त्यांच्यातील वैर पाहता महाभारत झाले नसते तरी एखादे असेच महाभयंकर युद्ध लवकरच झाले असते. कृष्ण हा मुक्त पुरुष होता. त्यामुळे त्याने या युद्धात अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मानवजातीला पुढील कित्येक हजार वर्षे मार्गदर्शक ठरेल असे गीतेचे ज्ञान दिले. महाभारत लिहिणारे व्यासमुनी, त्यांचा शिष्य वैशंपायन आणि वैशंपायनाला सर्पसत्राच्या समारोपप्रसंगी महाभारत सांगण्याची विनंती करणारा अर्जुनाचा पणतू जनमेजय याच्यामुळे ही महाभारत कथा आपल्यापुढे आली.
महाभारत युद्धात कृष्ण स्वत: काही वीरांसह  पांडवांच्या बाजूने  उभा राहिला तर यादव सेना कौरवांच्या बाजूने लढली हे आपण पहिले. खरेतर यामुळे युद्धात कोणत्याही बाजूचा विजय झाला तरी यादव राज्याला धोका नव्हता. परंतु कृष्णाचा हा अंदाज चुकला. युद्धात सैन्य जीवावर उदार होऊन लढत असते. त्यामुळे ज्याच्या बाजूने लढते त्या बाजूची निष्ठा असल्याशिवाय असे जीवावर उदार होणे शक्य नसते. यादव सैन्याची निष्ठा कृष्णाच्या अशा दुहेरी धोरणामुळे विभागली गेली.
सात्यकी हा कृष्णाचा जीवाभावाचा मित्र होता. कृष्णाला सोडून कोठेही जाण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे तो युद्धात पांडवांबरोबर होता. युद्धाआधी कृष्ण हस्तिनापूर येथे मध्यस्ती करण्यास गेला तेव्हाही कृष्ण फक्त सात्यकीला सोबत घेऊन गेला होता. यादव सेनेमध्ये अनेक शूर वीर होते. कृतवर्मा हा असाच एक 'अतिरथी' होता. युद्धात त्याने युधिष्ठिर, भीमसेन, धृष्टद्युम्न अशा अनेक वीरांना पराजित केले होते. त्यामुळे तो दुर्योधनाच्या अत्यंत विश्वासातील होता. युद्धाच्या दरम्यान अश्वत्थामाचा तो जवळचा मित्र बनला होता. त्यामुळे अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्यांना अधर्माने मारल्याचा त्याला राग आला होता. अश्वत्थाम्याचे पितृवियोगाचे दु:ख त्याने जवळून अनुभवले होते. युद्ध संपल्यावर अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला तेव्हा कृतवर्मा अश्वत्थामासोबत होता.
कृष्ण आणि यादव सैन्य द्वारकेत परतल्यावर नित्य व्यवहार सुरु झाले. द्वारका परदेशांशी व्यापार करून समृद्ध होत होती. अचानक आलेल्या समृद्धीमुळे काही दोष यादवांच्यात शिरले होते. गोकुळात दह्या-दुधाचा आस्वाद घेत रमलेले यादव आता दारूच्या पाशात अडकले होते. असेच एकदा दारूच्या नशेत असलेल्या कृतवर्मा आणि सात्यकी यांच्यामध्ये 'द्रोणाचार्य यांना ज्या प्रकारे मारण्यात आले त्यावरून' बाचाबाची झाली. यावेळी कृतवर्माने कृष्णाची निर्भत्सना केली. ते सात्यकीला आवडले नाही. त्याने कृतवर्माला ठार मारले. दारूने उन्मत्त झालेले यादव दिसेल ते शस्त्र घेऊन या मारामारीत सामील झाले. त्यांचे आपापसात घनघोर युद्ध झाले. या आपापसातील युद्धालाच 'यादवी' असे नाव आहे. या यादवीत कृष्णाच्या समोरच यादवराज्य नाश पावले.
आता आपले जीवितकार्य पूर्ण झाले हे ओळखून कृष्ण प्रभास नदीच्या काठी ध्यानास बसले असता त्यांचे पाऊल एका पारध्याला हरिणाच्या तोंडासारखे वाटले. त्याने बाण सोडला. तो श्रीकृष्णाला लागून श्रीकृष्णाने प्राण सोडला. एक महान तत्ववेत्ता, युगपुरुष जगाला गीतेसारखे अनमोल रत्न देऊन काळाच्या पडद्याआड गेला.
चक्रधर श्रीकृष्णाला वंदन करून ही लेखमाला येथेच संपवितो. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-५

महायुद्धात यादवसेने कौरवांच्या बाजूने लढणार आणि कृष्ण पांडवांच्या हे स्पष्ट झाले. यादवसेनेचा सेनापती कृष्णाचा मोठा भाऊ बलराम होता. बलराम अत्यंत शूर होता. तसेच त्याला कौरवांची बाजू पटत होती. कृष्णाने 'हे युद्ध अधर्माने लढले जाणार आहे. त्यामुळे बलरामाने त्यापासून दूर राहावे' असे त्याला पटविले. त्यामुळे बलराम युद्धाच्या काळात हिमालयात तपश्चर्येला निघून गेला. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाने हे एक उदाहरण आहे.
युद्धाला सुरुवात होण्याआधी दोन्ही बाजूंकडून निरनिराळ्या राजांना आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न चालू होते. अशा प्रयत्नात काहीवेळा कृष्ण कमी पडल्याचे जाणवते. मद्रदेशाचा राजा शल्य हा माद्रीचा भाऊ - नकुल, सहादेवांचा मामा होता. त्यामुळे तो पांडवांच्या बाजूने युद्धात सहभागी होणार होता. परंतु वाटेतच त्याला गाठून कौरवांच्याकडून त्याचे आदरातिथ्य करण्यात आले. प्रथम हे आदरातिथ्य पांडवांच्या बाजूने आहे असा त्याचा समज झाला. नंतर वस्तुस्थिती कळल्यावर अतिथी परंपरेचा मान राखून त्याने कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यास मान्यता दिली.
महाभारत युद्धाला सुरुवात झाली आणि कृष्णाचे युद्धकौशल्य पणाला लागले. या युद्धात भारतवर्षातील बहुसंख्य राज्ये सामील झाली होती. कौरवांची सेना संख्येने मोठी होती. तसेच कौरवांकडे भीष्म, द्रोण, कर्ण यासारखे युद्धात निपुण असलेले बुजुर्ग योद्धे होते. अर्जुन हा पांडवांचा प्रमुख योद्धा  होता. त्याचे सारथ्य कृष्णाने पत्करले. सारथ्य ही सोपी गोष्ट नव्हती. युद्धभूमीत योग्य त्या ठिकाणी आपला रथ सांभाळून नेणे हे कौशल्याचेच काम होते. कौरवांकडे शल्यराजा  हा असाच उत्कृष्ट सारथी होता. त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले होते. युद्धभूमीत झालेल्या रक्ताच्या चिखलात तरीही कर्णाचा रथ रुतला. यावरूनच सारथ्याचे महत्व लक्षात येते. युद्धप्रसंगी एक बाण अर्जुनाच्या डोक्याचा वेध घेऊन आला. सावध असलेल्या कृष्णाने रथाच्या घोड्यांना त्याक्षणी खाली बसविले आणि अर्जुन वाचला. यावरून कृष्ण किती कसलेला सारथी होता हे लक्षात येते. सारथ्याला आणखीही एका गोष्टीमुळे महत्व आहे. युद्धाच्या धामधुमीच्या आणि अत्यंत तणावाच्या वातावरणात तो एकटाच त्या योध्याबरोबर असतो. योध्याचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, प्रसंगी त्याला लढण्यास प्रोत्साहित करणे हे काम सारथीच करू शकतो. कृष्ण हे काम करण्यास किती योग्य होता हे आपल्याला युद्धाच्या प्रारंभीच त्याने अर्जुनाला धीर दिला त्यावरून लक्षात येते. याउलट शल्य हा मद्रदेशाचा राजा होता. तो उत्तम सारथ्य करू शके. म्हणून कर्णाने युद्ध करण्यास तयार होताना 'शल्य हाच सारथी असावा' अशी अट घातली. शल्य हा मद्रदेशासारख्या मोठ्या देशाचा राजा असल्याने त्याला सारथ्य करणे अपमानास्पद वाटले. परंतु त्याचा दुर्योधनापुढे नाईलाज झाला. 'मी काहीही बोललो तरी मला कोणी अडवता काम नये' अशा अटीवरच त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले. युद्धाच्यावेळी तो सातत्याने कर्णाबद्दल अपशब्द उच्चारित होता, कर्णाचा 'सूतपुत्र' म्हणून अपमान करीत होता. यामुळे कर्णाची एकाग्रता भंग पावली. कदाचित स्वतः:शल्याचीही एकाग्रता भंग पावली असावी. त्यामुळेच कर्णाचा रथ रक्ताच्या चिखलात फसला.
युद्धाला प्रत्यक्ष तोंड लागण्याआधीच पांडवांच्या सेनापतीचा - अर्जुनाचा धीर खचला. यावेळी कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि त्याचे मन खंबीर केले. यावरून कृष्ण हा उत्तम युद्धमानसशास्त्रज्ञ होता हे ही लक्षात येते. कृष्णाने सांगितलेली ही भगवद्गीता आद्य शंकराचार्यांनी वेदांताच्या तीन आधार ग्रंथांपैकी - प्रस्थान त्रयींपैकी- एक म्हणून स्वीकारली यातच गीतेचे महत्व दिसून येते. आजही गीता हाच हिंदू धर्माचा आधारग्रंथ म्हणून मानण्यात येतो. कृष्ण हा ;ब्रह्मज्ञानी' माणूस होता, 'मुक्तावस्थेला पोचलेला' होता हे भागवद्गीतेवरून सहज लक्षात येते. (मी अद्वैत वेदांताचा पुरस्कर्ता आहे. आपण सर्वच 'ब्रह्म' आहोत. परंतु ब्रह्मज्ञान झालेले  थोडेच आहेत . त्यामुळे कृष्णाला 'देवत्व' न देता कृष्ण हा ब्रह्मज्ञानी माणूस होता असे मी मानतो).
आधी उल्लेख केल्याप्रमाणे कृष्णाला बालवयात आलेल्या अनुभवांमुळे 'वाईट लोकांशी वागताना अति चांगुलपणा दाखविला तर ते विनाशाला आमंत्रण असते ' याची जाणीव खूप आधीच झाली होती. त्यामुळे तथाकथित धर्माच्या नियमांना न जुमानता कृष्णाने या युद्धात पांडवांना सल्ले दिले.
कौरवांचे सेनापती भीष्म यांनी सर्व पांडवांचा दुसऱ्या दिवशी नाश  करण्याच्या प्रतिज्ञेची माहिती कृष्णाला त्याच्या गुप्तहेरांकरवी मिळताच तो द्रौपदीसह  त्यांना भेटला आणि भीष्मांना ठार करण्याचे रहस्य त्यांच्याकडूनच त्याने जाणून घेतले. भीष्म हे रणधुरंदर होते, तसेच त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ही भीष्मांकडून रहस्य जाणून घेण्याची कथा आहे ती खूपच रोचक आहे, पण विस्तारभयास्तव येथे देत नाही.
द्रोणाचार्यांचे आपल्या एकुलत्या एक मुलावर -अश्वत्थामावर खूप प्रेम होते. द्रोणाचार्य त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे पांडवांना भारी पडत आहेत असे दिसताच त्यांना 'अश्वत्थामा युद्धात मेल्याचे' खोटे  सांगून ते विचलित होताच मारण्याचे कृष्णाने ठरविले. नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्माला ही खोटी बातमी द्रोणाचार्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले. द्रोणाचार्य धर्माने सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतील याची कृष्णाला खात्री होती. पण खोटे बोलण्यास धर्म तयार नव्हता. तेव्हा अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून 'अश्वत्थामा मेल्याचे' द्रोणाचार्यांना सांगण्यास धर्माला सांगितले गेले. तरीही धर्म शेवटी 'नरो व कुंजरो वा' (माणूस अथवा हत्ती) असे सांगणार होता. पण कृष्णाने समयसूचकता वापरून यावेळी शंख जोरात वाजविला. त्यामुळे हा वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यांना ऐकू गेला नाही. धर्मराजाच्या नेहमी खरे बोलण्याच्या प्रतिज्ञेला बाधा आली नाही.
महाभारत युद्धाचा शेवट अत्यंत भीषण झाला. युद्धात पांडवांचे सर्व वंशज मारले गेले. यामुळे द्रौपदी दु:खी झाली.अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची आज्ञा व्यासांनी दिली. पण अश्वत्थामाला ते परत घेण्याची कला ज्ञात नव्हती. यावेळी अभिमन्यूची बायको उत्तरा गर्भवती होती. तिच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वाळविल्याने तिचा पुत्र जन्मात:च मृतवत निपजला. कृष्णाने त्याला जिवंत केले (औषधी वनस्पतीचे ज्ञान होते?). परंतु तो शरीर आणि  मनाने दुबळा राहिला.  त्याला नागांच्या तक्षक राजाने मारले. परंतु परीक्षिताने पांडवांचा वंश पुढे चालू ठेवला. त्याचा मुलगा जनमेजय शूर निपजला.
युद्ध संपल्यावर कृष्ण आणि कौरवांच्या बाजूने लढणारी (युद्धात वाचलेली) यादव सेना द्वारकेला परतली. कृष्णाने आपले आयुष्य यादव राज्यासाठी समर्पित केले होते. पण त्याच्या डोळ्यासमोरच यादव राज्याचा अंत त्याला पाहावा लागला. पुढील भागात त्यासंबंधी. पुढील भाग या लेखमालेतील शेवटचा भाग असेल.

Tuesday, August 27, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-४

पांडवांकडे  साम्राज्याचा काही भाग आला. त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ वसविली गेली. जरासंध, नरकासुर, शिशुपाल यासारखे प्रबळ विरोधक मारले गेले. पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न झाला. आता कृष्णाचे नियोजन यशस्वी ठरू लागले होते. पण कृष्णाला आपल्या जवळची माणसे त्यांच्या स्वभावामुळे गोत्यात आणू शकतील याचा अंदाज आला नाही. धर्मराज धर्माचे नियम पाळण्यात कोणतीही कसूर करीत नसे. परंतु 'मोह' या एका षड्रिपूपासून त्याची मुक्तता झाली नव्हती. राजसूय यज्ञामुळे कौरव दुखावले गेले होते. शकुनी हा हस्तिनापुरात ठाण मांडून बसला होता आणि आपल्या भाच्यांना मदत करीत होता. शकुनी हा पाताळयंत्री होता आणि मानसशास्त्रात प्रवीण होता. त्याने आपल्या बोलण्यात धर्मराजाला गुंतविले आणि द्यूत खेळण्याच्या भरास घातले. धर्मराजाने द्युतात आपल्या बायको भावांसह सर्वकाही पणास लावले आणि तो हरला. पांडवांच्या नशिबी तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास आला. कृष्णाने केलेले नियोजन एका क्षणात उधळले गेले.
कृष्ण उत्तम नियोजनकार होता. अनपेक्षित घटनेने आधीचे नियोजन उधळले गेले तरी नाउमेद न होता नव्या परिस्थितीत नव्याने नियोजन करणे त्याला अवगत होते. पण आता किमान चौदा वर्षे थांबणे आवश्यक होते. आता पांडवांना परत राज्य मिळणे शक्य नाही हे त्याने ओळखले. कौरव-पांडव युद्धाशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आले. आता कृष्णाने या युद्धाच्या तयारीसाठी नियोजनाला सुरुवात  केली. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने करायचे या भावनेने तो कामाला लागला. भारतवर्षातील राज्ये आपल्या बाजूला कशी राहतील हे कृष्णाने या काळात पाहिले. धर्म-द्रौपदी यांना एकांतात पाहिल्याने अर्जुनाला एक वर्ष द्रौपदीचा सहवास मिळणार नव्हता. या काळात येथील अनेक अवैदिक समूहांना पांडवांशी जोडून घेतले गेले. नागा कन्या उलुपी हिच्यापासून अर्जुनाला मुलगा झाला. मणिपूरची चित्रांगदा हिच्याशीही अर्जुनाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला बभ्रुवाहन हा मुलगा झाला. भीमाने हिमाचल प्रदेशमधील हिडिंबा हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून घटोत्कच हा मुलगा झाला.  पांडवांच्या या पराक्रमी मुलांनी महाभारत युद्धात अतुलनीय कामगिरी केली. या चौदा वर्षांच्या काळात कृष्णाने हस्तिनापूरशी आपले संबंध चांगले ठेवले होते. राजनीतीत सर्वांशी संबंध चांगले ठेवणे गरजेचे असते हे कृष्ण जाणून होता.
पांडव वनवास-अज्ञातवास संपवून परतल्यावर त्यांना परत राज्य मिळावे म्हणून कृष्णाने शिष्टाई केली. पण ती  अयशस्वी झाली. युद्ध होणार हे निश्चित झाले. कृष्ण कौरव आणि पांडव या दोघांशीही चांगले संबंध ठेऊन असल्याने कौरव आणि पांडव या दोघांनाही त्याच्या मदतीची अपेक्षा होती.
आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्णाच्या मनात आपल्या यादव राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य होते. त्यामुळे कृष्णाने या युद्धात कोणा एकाचा पक्ष न घेता दोन्ही पक्षांना न्याय दिला. आपले सैन्य कौरवांच्या मदतीला दिले, तर आपण स्वतः: पांडवांच्या बरोबर राहिला. आता युद्धात कोणाचाही विजय झाला तरी यादव राज्याचे हित सांभाळणे कृष्णाला शक्य होणार होते. हा कृष्णाच्या मुत्सद्देगिरीचा हा कळस असावा. अर्थात यामुळे यादव राज्याचे हित सांभाळले गेले नाहीच, तर यादव राज्याचा विनाश झाला. या संबंधी आपण नंतर पाहू. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-३

कृष्णाने आपल्या आजोबांना आणि आई-वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या, आपल्या भावंडांना जन्मात:च ठार मारणाऱ्या आपल्या जुलुमी मामाचा, कंसाचा वध लहानपणीच केला. पण त्यामुळे कंसाचा सासरा आणि मगधेच्या बलाढ्य साम्राज्याचा सम्राट जरासंधाचा त्याने रोष ओढवून घेतला. जरासंध आता कृष्ण आणि यादव राज्याचा विनाश करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत होता. त्यामुळे कृष्णाला गोकुळ सोडून  द्वारकेला प्रस्थान करावे लागले हे आपण पहिल्या भागात पहिले. आपल्या छोट्याशा यादव राज्याला वाचविण्यासाठी कृष्ण एका बलाढ्य राज्याच्या शोधात होता. त्याला वनवासातील पांडव भेटले. आता पुढील खेळी तो पांडवांच्या सहाय्याने करणार होता. पांडवांना कुरु साम्राज्याचा एक भाग मिळाला. कृष्णाच्या नियोजनाला आता फळे येऊ लागली होती. पांडवांना मिळालेला भाग खांडववाणाचे निबीड अरण्य होता. तेथे लढाऊ नागा समाजाची वस्ती होती आणि ते पांडवांचे वर्चस्व मान्य करण्याची शक्यता नव्हती. कृष्णाने हा प्रश्न सोडविण्यासाठी आपले कौशल्य वापरले. कृष्णाची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी असावी. या यंत्रणेच्या साहाय्यानेच त्याने वनवासातील पांडवांचा शोध घेतला असावा. आता खांडववनातील नागा राजा तक्षक आपल्या सैन्यासह उत्तरेस गेला असल्याची बातमी कृष्णाने मिळविली आणि त्याचा फायदा घेऊन खांडववन जाळून टाकले. त्यातील सर्व नागा कुटुंबांचा बायकामुलांसह कृष्णाने संहार केला. फक्त मयासूर या स्थापत्यअभियंत्याला अभय दिले आणि त्याच्याकडून मयसभा हा राजवाडा पांडवांसाठी बांधून घेतला. नागांचा राजा तक्षक याला ही बातमी समजताच तो सुडाने पेटून उठला. त्यानंतर नागांबरोबर पांडवांचा संघर्ष चार पिढ्या चालू होता. त्यात अर्जुनाचा नातू परीक्षित याला आपले प्राण द्यावे लागले. शेवटी परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने चालविलेले सर्पसत्र (नागांचा समूळ विनाश) आस्तिकऋषींच्या  मध्यस्तीने थांबले तेव्हाच हा संघर्ष थांबला. (आस्तिक ऋषींची आई नागा होती).
पांडवांसाठी 'इंद्रप्रस्थ' ही राजधानी तयार झाल्याबरोबर कृष्णाने पुढील खेळीला सुरुवात केली. बलाढ्य कुरु साम्राज्याचा एक भागच पांडवांना मिळाला होता. साम्राज्याची मूळ राजधानी हस्तिनापूर कौरवांकडेच होती. त्यामुळे बलाढ्य कुरु साम्राज्याचा वारसा आपल्याकडेच आला आहे हे अन्य राजांना दाखविणे पांडवांना भाग होते. यासाठी कृष्णाने धर्मराजाला राजसूय यज्ञ करण्यास सांगितले. 'राजसूय यज्ञ'' आणि 'अश्वमेध यज्ञ' हे जगज्जेते राजेच करू शकत होते. पांडवांनी हा यज्ञ करणे म्हणजे त्यांचे वर्चस्व सर्व राजांनी मान्य करण्यासारखे होते. हे कौरवांसाठी लाजिरवाणे होते. परंतु जवळचे नातेसंबंधी असल्याने आणि हस्तिनापूरचे राज्य अजूनही भीष्म-द्रोण-विदुर यांच्या सल्ल्याने चालत असल्याने कौरव या यज्ञात अनिच्छेनेच सहभागी झाले.
मात्र राजसूय यज्ञ करण्याआधी या यज्ञाला विरोध करू शकतील अशा राजांचा पाडाव करणे आवश्यक होते. कृष्णाने भीमाला आणि अर्जुनाला घेऊन मगध देशाची राजधानी गिरिव्रज गाठली. तेथे भीमाने मल्लयुद्धात जरासंधाचा वध  केला आणि त्याच्या मुलाला मगधाच्या गादीवर बसविले. जरासंधाने बंदी बनविलेल्या अनेक राजांना कृष्णाने सोडले. याच सुमारास कृष्णाने दूरवर आसामपर्यंत जाऊन नरकासुराचा वध  केला. या दोन शक्तिमान राजांचा पाडाव केल्यावरच राजसूय यज्ञ केला गेला.
राजसूय  यज्ञाचा उपयोग कृष्णाने आपल्या राजकारणासाठी पुरेपूर करून घेतला. कौरवाना यावेळी हलक्या दर्जाची कामे देऊन त्यांची जागा दाखविण्यात आली. आपल्या वैभवाचे प्रदर्शन पांडवानी या यज्ञात पुरेपूर केले. मयासुराने बांधलेली अद्भुत मयसभा सर्वानाच चकित करून गेली. मयसभेत जेथे पाणी दिसत होते तेथे जमीन होती तर जमीन दिसत होती तेथे पाणी होते. यामुळे दुर्योधन गोंधळून गेला. तेव्हा द्रौपदीला हसू आवरले नाही. हा अपमान समजून दुर्योधन रागावला.
राजसूय यज्ञात अग्रपूजा करण्याचा मान भीष्माने कृष्णाला देण्यास सुचविले. परंतु चेदी नरेश शिशुपाल याला हे रुचले नाही. कृष्ण हा कोणत्याही देशाचा राजा नसल्याने अथवा ब्राह्मण नसल्याने त्याला हा मान मिळू शकत नसल्याचे शिशुपालाचे म्हणणे होते. त्याने यज्ञमंडपातच अग्रपूजेचा मान असलेल्या कृष्णाला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. यज्ञमंडपात कोणीही सैन्य अथवा शस्त्रे न्यायाची नाहीत, कोणालाही मारायचे नाही  असा दंडक होता. तसेच यज्ञमंडपात कोणी भांडण करू नये असाही संकेत होता. शिशुपालाने संकेत मोडल्याने कृष्णाने यज्ञमंडपातच शिशुपालाला ठार मारले. शिशुपालाचा संतापी स्वभाव कृष्णाला माहित होता. शिशुपाल कृष्णाचा द्वेष करतो (रुक्मिणी स्वयंवरात कृष्णाने रुक्मिणीला पळविले होते. तिचा शिशुपालाबरोबर विवाह व्हावा अशी तिच्या भावाची-रुक्मिची इच्छा होती) याची कृष्णाला कल्पना होती. त्यामुळे शिशुपालाला मारण्याची संधी मिळावी म्हणून कृष्णाने कदाचित भीष्मांकरवी हा डाव मुद्दाम खेळाला असावा.
यज्ञात कोणालाही मारू नये हा नियम कृष्णाने मोडला. नंतरच्या काळात असे तेव्हा घालून दिलेले अनेक दंडक कृष्णाने मोडलेले आढळतात. कृष्णाचे आजोबा उग्रसेन राजे हे धर्मात्मा समजले जात. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उठवून जरासंध आणि कंसाने त्यांना आणि कृष्णाच्या आई-वडिलांना कैदेत टाकले हे कृष्णाने लहानवयातच पहिले होते. 'कपटी लोकांबरोबर अति चांगुलपणा करणे हे सर्वनाशाला आमंत्रण देते' हा धडा कृष्णाने तेव्हाच गिरविला असावा. म्हणूनच सर्व दंडकांना वळसा घालून आपल्याला हवे तेच करण्याचा कृष्णाचा स्वभाव आपल्याला महाभारतात सतत जाणवत राहतो. 

Sunday, August 25, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-२

कृष्णाने यादवांना द्वारकेला आणले आणि कालयवन याच्याबरोबर झालेल्या युद्धात योग्य रणनीती वापरून त्याला ठार मारले हे आपण मागील भागात पहिले. मात्र कृष्णाला याच वेळी यादव राज्यावर येऊ घातलेल्या संकटाची जाणीव झाली असावी. कंसाला मारल्याने त्याचा सासरा आणि अति बलाढ्य मगध साम्राज्याचा सम्राट जरासंध कृष्णावर रागावलेला होता. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जाऊन बसलेल्या कृष्णापर्यंत पोचण्याचा जरासंध प्रयत्न करणार हे स्पष्ट होते. मगध साम्राज्य आणि द्वारका यामध्ये कुरु साम्राज्य होते. त्याचा राजा धृतराष्ट्र होता. भीष्म, द्रोण इत्यादींच्या सल्ल्याने कुरु साम्राज्याचा राज्यकारभार चालू होता. त्यामुळे यादव राज्याला लगेच धोका नव्हता. परंतु धृतराष्ट्राच्या मुलांबद्दल काही सांगता येत नव्हते. मगध साम्राज्याने अनेक बलशाली राज्यांना आपले मित्र केले होते. हस्तिनापूर (येथे अजून दुर्योधनाच्या हातात राज्य आले नव्हते, पण येण्याची शक्यता होती), गांधार (शकुनीचा भाऊ राज्यकारभार पाहत होता), चेदी (शिशुपाल), विदर्भ (रुक्मि), सिंधूदेश (जयद्रथ), आसाम (नरकासुर), पौंड्र (वासुदेव), विराटाचे राज्य (सत्ता सेनापती किचकाच्या हातात) इत्यादी राज्यांची भक्कम फळी मगध साम्राज्याने उभी केली होती. यादव राज्य त्यासमोर कस्पटासमान होते. श्रीकृष्णाला कोणा भक्कम राज्याच्या आधाराची गरज होती आणि तो त्याच्या शोधात होता.
अशा वेळी द्रौपदी स्वयंवरात कृष्णाने प्रथम पांडवांना पाहिले. तेथे तो आगंतुक पाहुणा म्हणून आला होता. त्याला स्वयंवराचे आमंत्रण नव्हते (तो पुरु वंशाचा नव्हता तर यदु वंशाचा होता म्हणून ?). हे पांडवच आहेत हे त्याने ओळखले.  पांडवांचा उपयोग आपल्याला आपले राज्य राखण्यासाठी होऊ शकेल हे कृष्णाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. तो पांडवांचा शोध घेत त्यांच्या घरी पोचला. 'आणलेली भिक्षा सर्व भावंडे वाटून घ्या' असा आदेश कुंती देत असतानाच तो तेथे पोचला. या आदेशाचे पालन कसे करायचे हे त्यानेच पांडवांना समजावून दिले. कुंतीला आपल्या नातेसंबंधांची जाणीव त्याने करून दिली आणि कुंतीचा विश्वास संपादन केला. सर्व पांडवांचे मनही त्याने जिंकले आणि अर्जुनाचा जवळचा मित्र झाला. पांडवांचा मित्र या नात्याने त्याने कौरवांशी मैत्री केली आणि भीष्म, द्रोण इत्यादींचा विश्वास प्राप्त केला. कृष्णाच्याच सल्ल्याने पांडवांनी राज्याची मागणी केली. कौरव त्यासाठी तयार नव्हते. शेवटी भीष्मांनी राज्याची फाळणी करून निबीड खांडववन पांडवांना दिले. ते जाळून कृष्णाने तेथे इंद्रप्रस्थ ही राजधानी पांडवांसाठी उभारली. तेथे नागा जमातीची वस्ती होती. नागा हे स्वतंत्र बाण्याचे लोक होते. त्यांनी पांडवांना सुखासुखी राज्य करून दिले नसते. नागा आणि कुरु /यदु वंशीय यांचा संघर्ष पूर्वीपासूनच चालू होता. म्हणून कृष्णाने तेथील नागांना मारण्याचा सल्ला अर्जुनाला दिला. वाडे बांधण्याची कला नागांना अवगत होती. नागांचा स्थापत्यशास्त्रद्न्य मयासूर याला कृष्णाने अभय दिले आणि पांडवांसाठी राजमहाल बांधण्याची आज्ञा दिली. हीच ती प्रसिद्ध मयसभा. महाभारत घडविण्यात या मयसभेचा महत्वाचा वाटा आहे. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-१

श्रीकृष्ण हा खूप मोठा स्ट्रॅटेजिस्ट होता. 
कंस हा अति बलाढ्य मगध साम्राज्याचा राजा जरासंध याचा जावई. जरासंध याच्या दोन्ही मुलींची (आसित आणि प्रापित) लग्ने कंसाबरोबर झाली होती. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मगध हीच भारतभूमीची मध्यवर्ती सत्ता राहिली आहे. हिरण्यकश्यपू-प्रल्हाद-बळीराजा हे मगधेचेच सम्राट होते. जरासंध याने ८६ राजांना आपल्या कैदेत ठेऊन त्यांचे राज्य बळकाविले होते. उग्रसेन हे मथुरेचे राजे होते. ते धर्मात्मा म्हणूनच ओळखले जात जरासंध त्याच्या मुलींचे लग्न कंसाशी करण्याच्या निमित्ताने सैन्यासह मथुरेसी आला आणि त्याने उग्रसेनाना कैदेत टाकून मथुरेचे राज्य त्यांचा मुलगा आणि आपला जावई कंसाच्या हातात दिले. कंसाने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना कैदेत टाकले. त्यांची मुले तो मारून टाकी. अशा परिस्थितीत वसुदेवाने तुरुंगाच्या रक्षकांशी संधान बांधून पूर आलेली नदी ओलांडून कृष्णाला सुरक्षित स्थळी पोचविले. पण कंसाला हे कळताच त्याने कृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा वातावरणात परक्या घरी वाढलेल्या या मुलाला किती तणावपूर्वक परिस्थितीतून जावे लागले असेल? नंद आणि यशोदेच्या ठाम पाठिंब्यामुळेच हा मुलगा असा असामान्य निपजला. अगदी लहान वयातच योग्य नियोजन करून कंसासाख्या पाताळयंत्री माणसाला बेसावध ठेऊन मारणे हे सोपी गोष्ट नव्हे. तेव्हापासूनच त्याने आपले नियोजनकौशल्य दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी बंदिवासात ८६ राजांना कृष्णाने मुक्त केले. त्यामुळे या राजांचा पाठिंबा पुढील काळात कृष्णाला मिळाला. कंसाला मारल्यामुळे जरासंघ रागावला. जरासंघ भारतातील बलाढ्य साम्राज्याचा सम्राट होता. त्याचा सेनापती तशाच बलाढ्य सिंधू साम्राज्याचा राजा होता. सातत्याने यादव साम्राज्यावर हल्ले करून त्याचे लचके तोडण्यास जरासंघाने सुरुवात केली. बलाढ्य यवन साम्राज्याचा (वायव्य भारत) सम्राट कालयवन याला जरासंघाने मदतीला बोलाविले. आता एका बाजूने मगध सेना आणि दुसऱ्या बाजूला यवन सेना अशा कचाट्यात कृष्ण सापडला. एकाच वेळी या दोन्ही बलाढ्य शत्रूंशी सामना करणे छोट्या यादव राज्याला शक्यच नव्हते. अशावेळी कृष्णाचे नियोजन कौशल्य परत एकदा कामी आले. कृष्णाने यादव समाजाला धोक्यात टाकण्याऐवजी यादव राज्य दूर हलविण्याचे ठरवून केवळ आपल्या सैन्यासह या संकटाचा सामना करण्याचे ठरविले. हे राज्य हलवितानाही कृष्णाची दूरदृष्टी दिसली. आपले पेशाने गवळी असलेल्या यादवांचे राज्य दूधदुभत्याच्या गवताळ प्रदेशात न हलविता समुद्रकाठच्या उत्तम बंदर असलेल्या द्वारकेत हलविले. द्वारका ही खूप जुनी भरभराटीस आलेली नगरी होती (तिचे अवशेष सापडले आहेत). द्वारकेस गेल्यावर यादवांनी दुधाचा व्यवसाय केला नाही, तर समुद्रमार्गे पश्चिमी देशांशी व्यापार केला (याचे पुरावे सीरिया आदी देशांत सापडले आहेत. महाभारतात उल्लेख असलेल्या श्रीकृष्णाने वितरित केलेल्या तीन प्राण्याच्या मुद्रा तेथे सापडल्या आहेत). त्यामुळे द्वारका भरभराटीस आली (पूर्वीच्या भाषेत सोन्याची झाली).
यादवांना द्वारकेत पाठविल्यावर कृष्णाने कालयवनाशी सामना केला. इंद्राने वर दिलेला मुचकुंद राजा मथुरेजवळच्या टेकड्यांत झोपला असून त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल अशी अफवा कृष्णाने उठविली. कालयवानाच्या मोठ्या सेनेला आपण घाबरलो आहोत असे दाखवून कृष्णाने त्याला एकट्यालाच लढण्याचे आव्हान दिले. बलाढ्य कालयवानाने ते लगेच स्वीकारले. मग घाबरल्याचे दाखवीत कृष्ण या टेकड्यांच्या बाजूला पळाला. कालयवन त्याच्या मागे टेकड्यात शिरला. आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात कालयवन ठार झाला. मुचकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भासम झाला असे कृष्णाने उठविले. आपला राजा प्रत्यक्ष इंद्राच्या कोपाने भस्म झाल्याचे पाहून प्रचंड यवनसेना घाबरली आणि पळत सुटली.
पुढे महाभारत युद्धापूर्वी कृष्णाच्या नियोजनामुळे अनेक राजे पांडवांच्या बाजूने आले. तरीही कौरव सेना भारी होती. पण कृष्णाच्या मानसशास्त्रीय युद्ध खेळण्याच्या कौशल्याने ही सेने गलितगात्र झाली आणि शेवटी पांडवांचा विजय झाला.

Friday, July 26, 2019

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’ : राजीव साने

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’


[सूचना: १.     मनुष्याबाबत सांस्कृतिक-अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठीका एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी.  २. या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स आणि मॅट रिडली यांचे आहे.  ३. जीवशास्त्रीय क्षेत्रात संतुलने कसकशी बनत जातात याचा हा वैज्ञानिक खुलासा असून त्यात कोणत्याच प्रकारे मूल्यात्मक निवाडा किंवा पुरस्कार/धिक्कार अभिप्रेत नाही. हा लेख आजचा सुधारक आणि  मनोविकास प्रकाशनच्या डार्विनवरील पुस्तकात पूर्वप्रकाशित आहे.]


स्वतःच्या प्रती काढल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करीत असतात. ही वर्तने अशी असतात की जेणेकरून त्या जीवातील जनुके पुढे चालू रहातील. जीवाची धडपड जणू काही जनुकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कार्याची पूर्ती करण्यासाठी चालते. जीव ज्या तुंबळ जीवनसंघर्षात सापडलेला असतो (भक्ष्य-भक्षक, यजमान-परोपजीवी, समाईक भक्ष्यासाठी स्पर्धा, समाईक भक्षकापासून वाचण्याची स्पर्धा,  नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक-पाल्य, भावंडे-भावंडे, इत्यादींतील संघर्ष) त्यातील आव्हाने पेलत तो आपले जनुकीय कार्य पार पाडण्यात यशस्वी ठरतो की नाही, यावर त्यातील जनुके पुढे चालू रहातात की नाही हे ठरत असते. यशस्वी ठरणारी वर्तने जेव्हा पुढील पिढ्यांना यशोदायक-वर्तन-प्रवर्तक-जनुके प्राप्त करून देतात, तेव्हाच ही वर्तने स्थिरावतात. साहजिकच एकूण वर्तनांपैकी प्रजननविषयक वर्तनांना कळीचे स्थान प्राप्त झालेले असते.

यात जनुकांनी सोपवलेली कार्ये कोणती? किंवा जनुक-प्रवर्तित स्वार्थ कोणते?
१)    स्वतः टिकणे, भक्ष्य मिळवणे, भक्ष्यस्थानी न पडणे व आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींवर मात करणे.(किमान काही प्रजननसंधी मिळेपर्यंत तरी)
२)    स्वतःसाठी संख्येने जास्त किंवा जास्त लाभदायक, अशा प्रजननसंधी मिळविणे.
३)    स्व-अपत्यांची संख्या तरी जास्त ठेवणे किंवा संख्येने कमी पण जास्त टिकाऊ अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
४)    स्व-अपत्यांना ज्याच्याकडून जास्त जोमदार जनुके मिळतील अशाच जोडीदाराला (अन्यलिंगीयाला) प्रजननसंधी देणे.
५)    स्व-अपत्य संगोपनासाठी (पोषण, रक्षण इ.)लागणाऱ्या श्रमांत जोडीदाराकडून जास्तीत जास्त वाटा प्राप्त करणे.
६)    ज्यांना स्व-जातीय अन्यलिंगीयांकडून पसंती/प्रजननसंधी मिळेल अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
वरील स्वार्थांमधले प्राधान्यक्रम हे प्रस्तुत जीव नर आहे की मादी यानुसार कसकसे भिन्न होतात ते आता पाहू.(द्विलिंगीय व एक-व्यक्ती-एक-लिंगीय, हाच प्रजनन-प्रकार आपण लक्षात घेऊ. इतर प्रकारची प्रजनने विषयमर्यादेस्तव सोडून देत आहोत.)

अंडी विरुध्द शुक्राणू

नर-मादी यातेल मूलभूत भेद शरीररचनेवरून किंवा कोणाच्या शरीरात गर्भधारणा होते यावरून करता येणार नाही. उदाहरणार्थ सी-हॉर्स या जलचरात मादी आपली अंडी नर-शरीरात घालते व तेथेच त्यांचे फलन होते! म्हणूनच तो तो जीव कोणत्या प्रकारच्या जननपेशी(गॅमेट्स) निर्माण करतो यावरूनच त्याचे लिंग ठरविणे शास्त्रशुध्द ठरते. नर-जननपेशी म्हणजे शुक्राणू व मादी-जननपेशी म्हणजे अंडी. या दोहोंत टोकाची विरोधी स्वरूपे उत्क्रांत झालेली आहेत. (अभिन्न-जननपेशी म्हणजेच आयसोगॅमेट्सची उत्क्रांती, परस्परविरोधी स्वरूपाच्या जननपेशीत कशी झाली, हा विषय विस्तारभयास्तव सोडून देत आहोत.) अंडी आणि शुक्राणू यांच्या स्वरूपांमधील विरोध पुढील कोष्टकात व्यक्त केलेले आहेत.

अंडी
शुक्राणू
१) मोठा आकार(पक्ष्यांत फारच मोठा)
१) अति-लहान आकार
२) बीज-भांडवल-अन्नसाठा + अर्धे   (मादीनिर्मित) केंद्रक
२) शून्य अन्नसाठा + फक्त अर्धे  नरनिर्मित केंद्रक
३) जड व अचल
३) हलके व शीघ्रचल
४) संख्या कमी (मर्यादित)
४) संख्या प्रचंड (प्रायः अमर्याद)
५)उत्पादनाचा वेग कमी व त्यामुळे (अल्प आयुर्मर्यादेत) स्वतःच्या क्षमतेपोटी प्रजननसंधी कमी
५) उत्पादनाचा वेग प्रचंड व त्यामुळे प्रजननसंधीबाबत स्वतःच्या क्षमतेपोटी मर्यादाच नाही
६) शुक्राणूला प्रवेश देण्या न देण्या चे  काम अंड्यांकडे
६) अंड्यांपर्यंत पोहोचण्याचे काम         शुक्राणूंकडे
७) मादीची दर अंड्यामागील अन्न-गुंतवणूक फारच जास्त. त्यामुळे अपव्यय झाल्यास मादीचा मोठाच तोटा
७) नराची दर शुक्राणूमागील अन्न-गुंतवणूक अगदीच नगण्य,त्यामुळे अपव्यय झाल्यास नराचा काहीच तोटा नाही

त्या त्या प्रजातीत, नर-मादी यांचे संख्याप्रमाण जरी तुल्य असले, तरी अंडी हाच दुर्मीळ व महागडा स्रोत असतो. अंडी अफलित रहाणे किंवा फलित पण अल्पजीवी ठरणे, यात प्रजनन प्रकल्पाचे मोठे नुकसान असते. याउलट शुक्राणू अफलित रहाणे वा फलित पण अल्पजीवी ठरणे यात प्रजातीचे काहीच नुकसान नसते. ही असममिती (आसिमेट्री) मादी-पक्ष्यांबाबत फारच जास्त असते. कारण त्यांची अंडी ही त्यांच्या शरीराचा बऱ्यापैकी अंश व्यापण्याइतकी मोठी असतात; शुक्राणूंच्या तुलनेत तर फारच मोठी. सस्तनप्राण्यांतही मूळ असममिती जरी पक्ष्यापेक्षा कमी असली तरी असममितीची दिशा तीच असते.

प्रत्येक व्यक्ती-जीवाला आपली एकूण धडपड/यत्नशक्ती कोणत्या कार्यात किती घालायची हे ठरवावे लागते, किंबहुना त्याच्याकडून ठरले जाते! जनुककेंद्री उत्क्रांतिशास्त्रात वर्तनांचे वर्णन करताना वापरलेले अकर्तृक प्रयोग(पॅसिव्ह व्हॉइसेस) हे वाच्यार्थाने घ्यावेत तर कर्तृक प्रयोग (म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसेस) हे लक्षणार्थाने घ्यावेत असा नियम आहे. कारण-भाषित विवरण करणे हे फारच विस्तृत आणि जटिल बनते. संक्षेप व सोपेपणासाठी प्रयोजन-भाषा वापरण्याचा (---साठी अशी निवड करणे) प्रघात आहे. असो.

प्रजननसंधी प्राप्त करण्यासाठी किती धडपडायचे व प्रजासंगोपानार्थ किती, यात मादीचा कल स्वाभाविकपणे संगोपनाकडे जास्त तर नराचा कल प्रजननसंधी मिळवण्याकडे जास्त असतो. हे या मूळ असममितीमुळे घडते. एखादी वीण वाया जाणे हे मादीला (तिची जनुके पुढे चालविण्याच्या मूलभूत स्वार्थानुसार) फारच महाग पडणार असते. एका दिशेला कल असला की तो कल पिढी दर पिढी वाढत जाण्याची स्ववर्धक प्रक्रिया घडत असते. संगोपननिष्ठ माद्या त्यांची जनुके पुढे चालू ठेवण्यात जास्त यशस्वी ठरल्या की तशी जनुके वाढून पुढील पिढीतील माद्या जास्तच संगोपननिष्ठ बनतात. तसेच जास्त संधींसाठी धडपडणारे नर हे नर म्हणून यशस्वी ठरले की की त्यांची तशीजनुके निवडली जाऊन नर अधिकाधिक तसे बनतात. अर्थात यावर नर-नर संघर्षाने व मादी-मादी संघर्षाने आणि विशेषतः नर-मादी संघर्षाने कशी वेसण बसते हे आपण पाहूच. पान जननपेशींच्या स्वरूपामुळेच नर हा सक्रीय-याचक तर मादी ही अक्रिय-अनुमती-दात्री असे बनतात हे निश्चित.

जोडीदार: अडकणारा आणि सटकणारा   
जर का नर हा संगोपनात मदत करेल याची खात्री असेल, तर माद्यांनासुध्दा (नराप्रमाणे) जास्त संधी शोधायला नको असते असे नाही. पण त्यांना तशी खात्री मिळत नसते. मासे हा याला अपवाद आहे. कारण मादी मासे पाण्याच्या तळातच अफलित अंड्यांचे संच (क्लच) घालतात. फलन त्यांच्या शरीराबाहेर होणार असते. नर मासा जर लहरीनुसार शुक्राणू सोडत सुटला तर त्याचा जनुकीय तोटा होतो. शुक्राणू हे द्रवात गतिमान असतात. एरवी मादीशरीरातील द्रवात त्यांना नेमकी दिशा मिळाली असती. पण पाण्यात मात्र ते वेगाने सर्व दिशांना विखरून जात असल्याने ते क्लचपर्यंत पोहोचतील याची अजिबात शाश्वती नसते. याकरिता नर मासा हा अगोदर घातलेल्या क्लचवरजवळात जवळ जाऊन शुक्राणू सोडण्यास बाध्य असतो. तेवढ्या वेळात मादी गायब झालेली असते! प्रजेला नशिबावर सोडणे ही गोष्ट, ज्या जोडीदाराला ही प्रजा निश्चितपणे आपलीच आहे याची खात्री असेल त्याला, नक्कीच क्लेशकारक असते. 

नर मासा, त्याने शुक्राणू सोडलेला क्लच ही त्याची प्रजा असणार आहे, हे माहीत असल्याने त्याला संगोपनार्थ तेथे थांबावेच लागते. याला म्हणायचे अडकणारा जोडीदार. आपल्या अन्य जोडीदार हा अडकणारा आहे याची खात्री पटलेला जोडीदार हा सटकणारा बनतो. म्हणजेच अन्य-लिंगीय जोडीदार संगोपन करणारच आहे याची खात्री, हीच स्वतः अन्यत्र संधी शोधण्याची मुभा ठरते. पाण्यामध्ये ही मुभा (म्हणजे क्लचेस घालत हिंडण्याची) मादीला मिळते! पण अन्यत्र तसे नसते.

मादी-पक्ष्यांची दर एकक अंड्यामागे पालकीय गुंतवणूक अंड्याच्या मोठ्या आकारामुळे खूपच जास्त असते. तसेच फलन हे मादी-शरीरात होत असते. अंडी उबवणे व पिलांना चारा आणोन घालणे यात वेळ आणि श्रम यांची प्रचंड गुंतवणूक लागते. पक्षाबाबत दोन्ही जोडीदारांनी श्रमात अगदी बरोबरीने वाटा उचलला तरी एकेकाच्या वाट्याला येणारे श्रम प्रचंड असतात. मादीच्या आयुष्यात थोड्याशाच विणी शक्य असल्याने माद्यांतील संगोपननिष्ठेकडे असणारा कल पक्षी-मादीत अधिकच तीव्र झालेला असतो. नर-पक्षी हा मूलतः नर असल्याने त्याचा कल संगोपन-श्रमातून पलायनाकडे आणि इतर माद्यांच्या अनुराधनाकडे असतोच! म्हणूनच अडकणारा जोडीदार बनण्याचा धोका माद्या-पक्ष्यांना असतो व हा धोका त्यांना पक्षी असण्यामुळे अजिबातच परवडण्यासारखा नसतो. यासाठीच नर-पक्ष्याची मूलतः असणारीनर(म्हणजे उनाड) प्रवृत्ती वठणीवर आणून त्यांना जास्तीतजास्त कामात जुंपणे आवश्यक असते. यासाठी पक्षी-माद्यांना कडक धोरण अवलंबिणे भाग असते. (धोरण = जनुकीयरित्या यशस्वी ठरून स्थिरावणारे वर्तन). नरांकडून श्रम करवून घेण्याच्या धोरणाला आपणसदगृहस्थ निवड धोरण असे नाव देऊ.

सदगृहस्थ निवड धोरण
जननपेशींमधील वैधर्म्यामुळेच नर हा सक्रिय-याचक तर मादी ही अक्रिय-अनुमती-दात्री असते. पक्ष्यांत (व बऱ्याच सस्तन प्राण्यांतसुध्दा) कोणत्या नराला प्रजननसंधी द्यायची, याची निवड करण्यावरील नियंत्रण हे माद्यांकडेच असते. (सस्तन प्राण्यांमधील काही प्रजातीतील माद्या हा अधिकार कसा गमावतात, हे आपण नंतर पाहणार आहोत.)
सदगृहस्थ म्हणजे निष्ठाळू आणि कष्टाळू असा नर! माद्या या शास्त्रज्ञाप्रमाणे प्रयोगशाळेत जनुकीय-रचना तपासू शकणार नसतात. त्यांना बाह्यवर्तनावरूनच परीक्षा करावी लागते. यासाठी माद्या कोणत्या क्लृप्त्या (अबोधपणे व किंचित सबोधपणे) वापरतात?

१.     प्रियाराधन कालावधी शक्य तितका लांबवणे: यात नराच्या धीर धरण्याची परीक्षा होते. जो नर लवकरच कंटाळून अनुराधनाचा मोहरा दुसरीकडे वळवतो तो नापास होतो. प्रियाराधनकाळ प्रदीर्घ असण्यात नरांचाही एक जनुकीय स्वार्थ साधला जात असतो. कारण मी परापत्य पोषणात तर अडकत नाहीये ना? ही नरांची एक स्वाभाविक (म्हणजे स्वतःचीच जनुके पुढे चालवण्याच्या स्वार्थाच्या संदर्भात) चिंता असते. माकडे, सिंह इत्यादीतील नर हे इतर नरांची अपत्ये मारून टाकतात. उंदरांमध्ये स्वतःचे एक व्यक्तीविशिष्ट रसायन सोडण्याची क्षमता असते. याचा गंध मादीने घेतला व व तिच्यात जर इतर उंदीर-नराचे गर्भ असले, तर गर्भपात होतो! या चिंतेमुळे पक्षी-नरदेखील प्रदीर्घ प्रियाराधनाला सहकार्य देत रहातात. अर्थात मादीच्या अनुमतीविना त्यांचा नाईलाजही असतोच.

२.     आन्हिकवजा गोष्टी करवून घेणे: पसंतीस उतरण्यासाठी नराला अशा काही गोष्टी करून घ्याव्या लागतात की ज्यांचा थेटपणे जीवशास्त्रीय उपयोग काहीच नसतो. उदाहरणार्थ दुर्मिळ अशी पिसे किंवा तुरे शोधून आणून त्यांनी घरटे सजवणे! या गोष्टी केवळ अवघड असल्यामुळे त्यांचा पण म्हणून उपयोग असतो.

३.     नराकडून घरटे बांधून घेणे: यात नुसती परीक्षा नसून श्रमांची गुंतवणूक अगोदरच पदरात पडून घेणेही असते.

४.     प्रियाराधनकाळात मादी पिलांची नक्कल करत चाऱ्यासाठी नाराकडे याचना करते व स्वतःला चारून घेते. मोठे अंडे बनविण्यासाठीचा (व अंड्यातलाही) अन्नसाठा हा नराची गुंतवणूक म्हणून वसूल केला जातो. यात टोकाचे उदाहरण म्हणजे कोळी व विंचू यांच्या काही प्रजातीत खुद्द नरच मादीच्या भक्ष्यस्थानी पडतो. म्हणजे त्याची जनुके पुढे चालू ठेवण्याचे श्रेय त्याला मरणोत्तरमिळते!

५.     फसवे सदगृहस्थही असू शकतात. हे म्हणजे प्रियाराधन काळात निष्ठाळू/कष्टाळू पण पण प्रत्यक्ष संधी मिलातच उनाडपणा सुरू करणारे नर. हा धोका टाळण्यासाठी माद्या, आधीच्या विणीत ज्याने मीलनोत्तर संगोपन-श्रमही निष्ठेने केले होते त्याच (टेस्टेड) नराला पुन्हा पसंत करतात. यामुळे फसव्या सदगृहस्थांना पहल्या विणीच्याच काही संधी मिळतात. पण पुढील विणींमध्ये खऱ्या सदगृहस्थांनाच वाव मिळतो. यातूनच मुळात एका विणीपुरते असणारे पेअर-बाँडिंग हे मोनोगामीकडे सरकते.

आखडूपणा/बेफिकीरी यांतील परवडणारे संतुलन

दोन्ही पालकांनी १००% श्रम घेतल्याखेरीज पिले जगणारच नाहीत ही अगदी टोकाची अट झाली. जी प्रजाती परिपूर्ण आदर्श असल्याखेरीज टिकणारच नसेल, ती वास्तवात टिकेल कशी? संगोपनात नराच्या श्रमाची आवश्यकता ही गोष्ट असते तरी वा नसते तरी अशी दोन टोकाची नसून तिच्या विविध मात्रा(डिग्रीज) वास्तवात असतात. सदगृहस्थ निवडीसाठी माद्यांनी पत्करलेला आखडूपणा(कॉयनेस)देखील परिपूर्णनसतो. मादीसाठी संगोपन जरी जास्त महत्त्वाचे असले तरी तिला स्वतःला प्रजननसंधी मिळण्याची गरजही असतीच. मादी निवडकर्ती आणि नर उमेदवार असे जरी असले तरी सगळेच उमेदवार बाद ठरवून पोस्ट रिकामी ठेवणेही शक्य नसते! आखडूपणाबाबत अतीच ताणणे कुठले आणि ढिलाई कुठली याचे नेमके मोजमाप माद्यांना माहीत असण्याचा प्रश्नच नसतो. त्यांच्यातील आखडूपणा यदृच्छया कमी किंवा अधिक असतो इतकेच. 

आखडूपणा अजिबात नसणारी मादी म्हणजे बेफिकीर मादी असे आपण म्हणू. माद्यांमध्येही स्पर्धा असतेच! या स्पर्धेत बेफिकीर मादीला इतर माद्यांपेक्षा फायदा किंवा झुकते माप मिळणार असते. कारण सदगृहस्थ म्हणून उत्क्रांत झालेला नर जरी जास्त प्रतीक्षा करूशकणारा असला तरी जर तीच गोष्ट त्याला लवकर मिळत असेल तर नको असते असे नाही. कारण नर हा मूलतः नरच असतो! माद्यांतील बेफिकीरीला झुकते माप मिळत गेले की त्यातून बेफिकिरीची जनुके प्रसारित होतील. त्यायोगे नरांतही उनाडपणाची जनुके प्रसारित झाल्यावाचून रहाणार नाहीत. एखादा कल हा तदनुषंगिक जनुकान्द्वारे अधिकच वाढवत नेणाऱ्या स्ववर्धिष्णू (क्युम्यूलेटिव्ह) प्रक्रिया अमर्यादपणे चालत नाहीत कारण त्या हमखास उलटा फटका खाणाऱ्या असतात. आत्ताच्या संदर्भात जर बेफिकीरीमुळे ओढवलेलाएकटीने संगोपन हा भार पेलला नाही की ती मादी, (पिले मरून) जनुके पुढे पोहोचवण्यात अयशस्वीच ठरते आणि बेफिकीरी-प्रवर्तक जनुके घटू लागतात. म्हणजेच स्ववर्धक प्रक्रिया उलटते. स्वैरता वाढवणारी प्रक्रिया स्ववर्धक असते तशी उलट ताळ्यावर आणणारी प्रक्रियादेखील स्ववर्धकच असते! एकतर ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू व्हावी लागेल किंवा ती प्रजाती नष्ट तरी होईल. टिकून राहणाऱ्या प्रजाती या ताळ्यावर येऊनच (किंवा ताळ्यावर राहूनच) टिकलेल्या असतात. 

पण ताळ्यावर म्हणजे नेमके काय? प्रजातीचे निष्ठा/स्वैरता गुणोत्तर हे संगोपनात नराच्या श्रमांची आवश्यकता किती असेल यानुसार स्थिरावेल. यालाच वर्तन-वैविध्याचे परवडणारे संतुलन(इव्होल्युशनरीली स्टेबल स्ट्रॅटेजी) म्हणतात.

निसर्गातला हा द्वंद्वात्मक तोल फक्त प्रजननसंधी या एकाच आघाडीला लागू असतो असे नसून तो सर्वच आघाड्यांवर लागू असतो. उदाहरणार्थ नर-नर संघर्षात जर सगळेच नर जिंकू किंवा मरू या प्रवृत्तीचे असतील तर ती प्रजाती नष्ट पावेल. कारण वाचलेले सर्वच नको इतके जखमी झालेले असतील. सगळेच भुंकू किंवा पळू प्रवृतीचे असतील तर काहीकाळ शांतता नांदेलही. मात्र त्यात एखादा जरी जिंकू किंवा मरूवाला शिरला की त्याला झुकते माप मिळत जाऊन तत्प्रवर्तक जनुके वाढू लागतील आणि या दोन प्रवृत्तीतला समतोल साधला जाईल. म्हणजेच जसे निष्ठा/स्वैरता याचे समुचित प्रमाण स्थिरावते तसेच लढाऊ बाण्यांचेही समुचित प्रमाण स्थिरावते. येथे समुचितचा अर्थचांगला असा नाही. जेथून कुठल्याही दिशेने ढळल्यास तोटा वाढतो त्या बिंदूत प्रजाती अडकतात. काहीच तोटा नसतो असा हा बिंदू नसून तो तोटा सोसत रहावे लागते पण टिकता येते असा हा बिंदू असतो. टिकून असणे म्हणजे अगदी सुखात असणे असे अजिबात नाही.

नरोत्तम निवड धोरण(आकर्षणाधिष्ठित)
मत्स्यांत प्रायः मादीराज्य व पक्ष्यांत प्रायः समताराज्य असले तरी सस्तन प्राण्यांत त्यामानाने नरांचे फावते. अन्नाचा जितका सुकाळ मादी जितकी स्वावलंबी तितके नर चुकार! संगोपनात नराचे श्रम न लागण्यामुळे काही (विशेषतः सस्तन प्राण्यांपैकी) प्रजातीतील नरांनी सदगृहस्थ निवड धोरण पार उधळून लावले आहे. सदगृहस्थपणाच्या मात्रा कमीअधिक आहेत. माद्यांचा पहिला प्राधान्यक्रम जरी सदगृहस्थ हा असला तरी जर सदगृहस्थ उपलब्धच नसले किंवा सदगृहस्थपणाची मात्रा कमी असली, तर माद्यांचा दुसरा प्राधान्यक्रम डोके वर काढतो. मूळ जनुकीय-स्वार्थ यादीतला स्वार्थ क्र.४ म्हणजे ज्या नराकडून स्व-अपत्यांसाठी जोमदार जनुके मिळतील अशाच नराला संधी देणे हा असतो. या स्वार्थानुसार माद्या जे धोरण अवलंबितात त्याला आपण नरोत्तम-निवड-धोरण असे नाव देऊ.

येथेही धोरणचा अर्थ स्थिरावणारे वर्तन असाच आहे. म्हणजे असे की मादीला तिच्या आवडीनुसार आपाततः आकर्षक वाटणारा नर जर जोमदार जनुके देणारा निघाला, तर जनुक प्रसारामुळे तत्सम वैशिष्ट्ये आकर्षक वाटणाऱ्या माद्या वाढत जातात, तत्सम वैशिष्ट्ये असणारे नर वाढत जातात आणि/किंवा नरांतील ती वैशिष्ट्ये वृद्धींगत होत जातात. मॅट रिडली यांनी या प्रकरणाला मोराच्या पिसाऱ्याची कहाणीअसे शीर्षक दिलेले आहे. नरांचे सुशोभीकरण(ऑर्नमेंटलायझेशन) हा नरोत्तम-निवड-धोरणाचाच परिपाक असतो.

नरांचा विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम मधोमध चालू आहे आणि भोवती कोंडाळे करून माद्या तो पहात आहेत, असाही प्रकार( याला लेकम्हणतात) काही प्रजातींत आढळतो.  यातून एखादाच किंवा दोन/तीन नरच निवडले जातात. एखाद्या मादीने(किंवा काही थोड्याच माद्यांनी) पुढाकार घेऊन नरोत्तम निवडला की इतर माद्या तिचे अनुकरण करून त्यालाच निवडतात. पुढाकार घेणाऱ्या मादीला आकर्षक वाटलेले लक्षण जोमदार जनुके देणारे नसेलही. 

गूज पक्ष्यांतले नर गळयाजवळच्या हवेच्या पिशव्या जास्तीत जास्त फुगवून दाखवतात. यातून जनुकीय दृष्ट्या लाभदायक असे काहीच मिळणार नसते. म्हणजेच आकर्षकतेचे नियम माद्यांमधील अन्यानुकरण प्रवृत्तीमुळे निव्वळ फॅशन्स म्हणूनही रुळू शकतात. माद्यांमध्ये ही अन्यानुकरण प्रवृत्ती का निर्माण होते? मूळ स्वार्थ क्र.६ येथे लागू पडतो. अशी स्वअपत्ये निर्माण करणे की ज्यांना स्वजातीय अन्यलिंगीयांकडून पसंती मिळेल. कारण नातवंडे मिळण्यात जनुकीय स्वार्थ साधला गेल्याची पक्की खूण असते. एखाद्या मादीला व्यक्तिशः कोणते वैशिष्ट्य आकर्षक वाटते यापेक्षा सामान्यतः तिच्या प्रजातीतील माद्या कोणते वैशिष्ट्य निवडतात याचा दबाव तिच्यावर असतो. हा दबाव तिच्या पुत्राला माद्या मिळतील की नाही या चिंतेमुळे असतो. याला सेक्सी-सन-आर्ग्युमेंट म्हटले जाते.

नरांचे सुशोभीकरण हे माद्या मिळण्याच्या दृष्टीने जरी सोयीस्कर असले तरी नराच्या आत्मरक्षणाच्या दृष्टीने धोक्याचेच ठरू शकते. गुंताड्याची शिंगे असलेले सांबर ध्यानात घेऊ. लढण्यासाठी टणक आणि टोकदार अशी दोनच शिंगे पुरेशी असतात. डोक्यावर शिंगांचा पसारा वागवत पळून जायची वेळ आली तर झाडात पसारा अडकून ते सांबर कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडण्याचीच शक्यता अधिक. सुशोभीकरण फारच अडचणीचे ठरून काही प्रजाती नष्ट देखील झालेल्या आहेत. नराला सुशोभीकरणाची अडचण किंवा भार होणे याला एनकंबरन्स म्हणतात. हा एनकंबरन्स जर प्रत्यक्ष घात करण्याइतपत जास्त नसला तर तोच उलटपक्षी जोमदार जनुकांचे लक्षण असू शकतो. एनकंबरन्स असूनही हा नर भक्षकांपासून स्वतःला वाचवू शकला हा त्याच्यात जोमदार जनुके असल्याचा पुरावा नव्हे काय? 

लांब शेपटीचे आकर्षण हे असेच आहे. शास्त्राभ्यासकांनी प्लॅस्टिकची खोटी लांब शेपूट चिकटवली तरी तो नर मादीप्रिय ठरल्याचे आढळून येते!

माद्यांना जास्त वयाच्या नराचे आकर्षण असते असेही आढळले आहे. याचे कारण असे की सामान्यतः आपली जनुके आपल्याला तारकच असली तरी आपल्यात काही मारक (सेमीलीथल व लीथल) जनुकेही असतात. अल्पवयात जागृत होणारी मारक जनुके जास्त वयाच्या नरात नसणार हा ठोकताळा सहजच पटणारा आहे.(कोणाचाही कोणताही पूर्वज कधीच बालपणीच मेलेला असू शकत नाही!) माद्यांमधील या वृत्तीमुळे प्रजातींचे आयुर्मानही वाढत गेलेले आहे.

आकर्षण कोणतेही असो, नरोत्तम-निवड-धोरणामुळे थोडेच नर निवडले जातात आणि बाकीचे वंचित रहातात. नर हा बऱ्याच माद्यांना संधी देऊ शकत असल्याने या धोरणाचा परिपाक म्हणून बहुगामीत्व (पॉलीगामी) प्रस्थापित होऊ लागते.

पराक्रमी नरोत्तम: माद्यांची आत्मघातकी निवड  
माद्यांचे एकाच/थोड्याच नरांकडे बहुगामीत्व वाढल्याने बरेच नर वंचित रहातात. वंचितता टाळण्यासाठी अंशतः सदगृहस्थ बनणे हा उपाय काहीसा यशस्वी ठरतोदेखील. पण वंचितता प्रधान राहिल्याने नर-नर संघर्ष वाढणे अटल होते. यामुळे नुसती आकर्षकता पुरेशी रहात नाही. जोमदार जनुके असणे याचा अर्थ भक्षकांपासून वाचणे, भक्ष्ये मिळवणे, आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींपासून वाचणे एवढाच उरत नाही तर स्वजातीतील इतर नरांपासून वाचणे हा प्रश्न देखील उभा ठाकलेला असतो.

बहुगामी प्रजातीत निवडलेल्या नराला स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी, इतर नरांना पिटाळून लावणे, मारून टाकणे किंवा मारामारीत लोळविणे आवश्यक बनते. यातून आक्रमकतेची व बलदंडतेची जनुके स्थिरावू लागतात. उदाहरणार्थ एलेफंट-सील या प्रजातीत नराचे वजन हे मादीच्या वजनाच्या तिप्पट बनले आहे.

आकर्षणाचा मोहरा बलदंडतेकडे वळविण्याद्वारे माद्या त्यांचे निवडकर्ती हे स्थान स्वतःहून गमावून बसतात. कारण पराक्रमी नरोत्तम आपले बल इतर नरांना पिटाळून लावण्यापुरते न वापरता माद्यांना वठणीवर आणण्यासाठीही वापरू लागतात! अशा बलोपासक प्रजातीत पराक्रमी नरोत्तम हा टोळीपती व टोळीपिताही बनतो व पॉलीगामीबरोबर पॅट्रिआर्की (पितृराज्य) देखील प्रस्थापित होते.

पितृराज्य स्थापन झालेल्या प्रजातीत, जो नर राजेपद बळकावील(कमिंग टू प्राईड) त्या नराचा अनुनय करण्यात माद्यांचा जनुकीय स्वार्थ अडकला जातो. माद्या स्वतःहून पदच्युत राजापासूनचे गर्भ पाडून नव्या राजाचे स्वागत करण्यास, वेळ न दवडता सज्ज होतात!

अर्थात बलिष्ठता एकच गुण प्राण्याच्या एकूण स्वार्थासाठी कधीच पुरेसा नसतो. इतर बाबतीत जोमदार (उदाहरणार्थ आरोग्य, सांघिक-कामगिरी, संगोपननिष्ठा) जनुके ही सर्वात बलवान नसलेल्या नरांत उपलब्ध असू शकतात. अशा इतर सर्व नरांना संधी नाकारण्याने जनुकीय अपव्ययही होतो. शिवाय नर-नर संघर्षसुध्दा अपव्ययकारी असतोच. याचा प्रजातीला उलट फटका बसून ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू होते. याही बाबतीत ती ती प्रजाती टोकाच्या मक्तेदारीकडून काहीशा उदारतेकडे सरकते. राज्यकर्त्या नरांमध्ये इतर नराबाबत सहिष्णुता वाढते. नर-नर संघर्षात होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण व बलेतर गुण-प्रवर्तक जनुकांची गरज यानुसार संधीप्राप्त/वंचित नरांचे गुणोत्तर वाढते. यालाच रीझनेबल ऑपॉरचुनिटी रेशो असे म्हणतात.
संगोपननिष्ठा/आकर्षकता/बलिष्ठता या गोष्टी आपण जरी वेगळ्या काढून पाहिल्या तरी पत्यक्षात त्या त्या प्रजातीत तीनहीचे स्थिरतम मिश्रणच साधले गेलेले असते.

प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल
वरील मांडणी मनुष्याबाबत थेटपणे लागू करता येणार नाही. मनुष्याचे सांस्कृतिक अंग हे त्याच्या प्राकृतिक अंगापासून खूपच स्वायत्त बनलेले आहे. एकूणच जीवनसंघर्षातले सर्वच पक्ष एकमेकावर भरपूर कुरघोड्या करीत असतात. आवश्यक वर्तनप्रकारांची व्यामिश्रता आणि जटिलता जसजशी वाढत जाते तसतसे जनुकांचे जीवावरील थेट नियंत्रण सुटून जनुकांना अधिकाधिक प्रमाणात मज्जासंस्था विकसित करावी लागते. यातून जीवांच्या अबोध सचेतनतेचा सबोध सचेतनतेकडे विकास होत गेलेला आहे. 

मनुष्याच्या उदयानंतर उत्क्रांतीच्या घड्याळाशिवाय इतिहासाचे घड्याळही सुरू झालेले आहे. इतिहासाचे घड्याळ उत्क्रांतीच्या घड्याळापेक्षा वेगवान आहे. कारण अबोधपणे होत राहणाऱ्या निखळ संतुलनातून चालणाऱ्या उत्क्रांतीत शिकणे ही प्रक्रिया थेट मरूनचकरावी लागते. म्हणजे असे की सुयोग्य वर्तन करू न शकणारा जीव व्यक्तीशः मरतो. इतकेच नव्हे तर अरिष्टात सापडलेल्या एखाद्या प्रजातीला नेमके तारणारे नवघटन (म्युटेशन) यदृच्छया लाभले नाही तर ती प्रजाती नष्ट होते. अनेक व्यक्ती-जीव मरूनच तोल-साधलेलेव्यक्ती-जीव उरतात आणि अनेक प्रजाती नष्ट होऊनच तोल साधलेल्या प्रजाती उरतात. माणसांना मात्र चुकांपासून शिकण्यासाठी, चूक-प्रवर्तक-जनुक एकूण जनुकसंचातून लुप्त होईपर्यंत, थांबावे लागत नाही.

मज्जासंस्था निर्माण करून जनुकांनी जीव-प्रचालनावरील त्यांची थेट पकड ढिली केली व मज्जासंस्थाकडे सोपवली. माणसाच्या मेंदूने आत्मपरीक्षक जाणीव निर्माण करून मेंदूची थेट पकडही ढिली केली. जाणीवेला स्वायत्तता लाभलेल्या मनुष्याचे वर्णन प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल असे केले की विज्ञानाचे कारणमय जग आणि आपले संकल्पमय जग यांच्यात विसंगतीरहित-सह-अस्तित्व (कंपॅटिबिलिटी) येते. जनुककेंद्री उत्क्रांतीशास्त्र म्हणजे जनुक-नियतता-वाद(जेनेटिक डिटरमीनिझम) नव्हे. जोपासिताद्वारे सहजातता(नेचर व्हाया नर्चर) हे शीर्षक या दृष्टीने बोलके आहे. प्रश्न प्रकृतीबरोबर वहात जाण्याचा नसून प्रकृतीबाबतच्या जाणतेपणातून तिला ओलांडण्याचा आहे.

मनुष्यांतील नर-मादींची हंटर-गॅदरर(पुरुषांनी लांब जाऊन शिकार करणे आणि स्त्रियांनी वास्तव्यस्थानाच्या जवळपासचे वनस्पतीज अन्न जमवणे) झालेली जडणघडण खरे तर त्यांच्यात समता आणण्याला उपकारक अशी होती. शेतीच्या शोधानंतर लढाईत जिंकलेल्यांनी हरलेल्यांना गुलाम करणे व्यवहार्य बनले. यातून सरंजामी पितृसत्ताक व्यवस्था शक्य झाली. आधुनिकतेच्या उदयानंतर हे चित्र पुरतेच पालटले. या स्थित्यंतरानी स्त्री-परुष संबंधात येणारी परिवर्तने हा मोठाच विषय आहे. वरील मांडणी ही मनुष्याच्या कथेची नसून त्याच्या प्राकृतिक पूर्वपीठिकेची आहे. ती तेवढीच घ्यावी व स्त्री-पुरुषांना थेटपणे लावू नये.

मनुष्यावर जनुकीय दबाव नसतात असे नाही. पण हे दबाव मूळ स्वरूपात व्यक्त न होता सांस्कृतिकरीत्या बदललेल्या भावार्थांमध्ये व्यक्त होतात. उदाहरणार्थ नरांकडे निवड आली की ते शक्यतो सुप्रज मादीची निवड करीत असत. यातून यौवनाचे आकर्षण निर्माण होते आज आपण जे सौद्र्याचे आकर्षण म्हणतो ते मुळात यौवनाचे आकर्षण असते. अशी अर्थांतरे पुष्कळच शोधता येतात. मुख्य मुद्दा हा आहे की जीवोर्मींची विषयांतरे जाणीवेने करता येतात आणि हाच तर संकल्प-स्वातंत्र्याचा आधार आहे.