Monday, January 21, 2019

तीन मार्ग

भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मुक्तीपर्यंत पोचण्यासाठी तीन प्रमुख मार्ग सांगितले आहेत.  हे तीन मार्ग तीन  प्रमुख दर्शनांनी सुचविलेले आहेत.

पहिला मार्ग 'भक्तिमार्ग' म्हणून ओळखला जातो. 'पूर्वमीमांसा दर्शन' भक्तिमार्ग पुरस्कृत करते.  देव आहे आणि  तोच देवच  आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल यावर पूर्ण श्रद्धा असणे हे भक्तिमार्गातील पूर्वअट आहे. देवाची विविध मार्गाने पूजाअर्चा करून देवाला प्रसन्न करून घेणे असा हा मार्ग आहे.

दुसरा मार्ग 'ध्यानमार्ग' हा सांख्य दर्शनाने पुरस्कृत केला आहे. सांख्य दर्शन पुरुष आणि प्रकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. हा निसर्ग प्रकृतीने बनला आहे तर पुरुष हा केवळ द्रष्टा  आहे असे हे दर्शन मानते. पृष्ठ आणि प्रकृती यात सरमिसळ झाल्याने (असा समाज झाल्याने) आपल्याला जीवनातील दु:खे वाटूयाला येतात असे हे दर्शन मानते. ध्यानाच्या साहाय्याने निर्विकल्प समाधी अवस्थेतप्रकृतीची जाणीव पूर्णपणे मिटल्याने पुरुषाला आपले खरे स्वरूप कळते आणि तो कैवल्याच्या अवस्थेपर्यंत पोचतो. योगमार्ग हा सांख्य दर्शनावर आधारलेला असल्याने योगमार्गातही समाधी अवस्थेला महत्व आहे.

तिसरा मार्ग 'ज्ञानमार्ग' हा वेदांत दर्शनाचा मार्ग आहे. अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच केवळ सत्य आहे आणि बाकी सर्व जग हे मायेच्या आवरणामुळे तसे भासते असे अद्वैत वेदांती मानतात. ज्ञान झाल्याने मायेचे हे आवरण निघून जाते आणि आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव होते. आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव झाल्यावरही मायेने निर्माण केलेले हे जगही आपल्याला दिसते पण ते मायावी असल्याची जाणीवही होते. हीच ती वेदमार्गात सांगितलेली मुक्ती.  

Saturday, January 19, 2019

शोध सुश्रुताचा - भाग ५

ऑगस्टस फ्रेडेरिक रुडॉल्फ हर्न्ले (Hoernle) - आपल्यापैकी किती जणांनी ऐकलय हे नाव? माझी खात्री आहे की बहुतेकांनी नाही.
हर्न्लेचा जन्म सन १८४१ चा. उत्तर भारतातल्या आग्र्यात एका प्रोटेस्टन्ट जर्मन मिशनऱ्याच्या घरात. त्या वेळेच्या प्रथेनुसार वयाच्या ७ व्या वर्षी हर्न्लेला शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्यात आले. ह्याचे शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्याला संस्कृत भाषेत विशेष रस होता म्हणून त्यानंतर पुढे तो लंडनमध्ये त्यावेळेचा संस्कृत भाषेचा पंडित थिओडोर गोल्डस्टूकर (हा पण जर्मन होता!) ह्याच्याकडे संस्कृत शिकायला गेला. संस्कृतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हर्न्ले १८६५ मध्ये भारतात परत आला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील क्वीन्स कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर म्हणून ह्याने आपली कारकीर्द सुरु केली. बनारसमध्ये हिंदू धर्मसुधारक आणि धर्मशास्त्रपारंगत दयानंद सरस्वतींचा हर्न्ले चांगला मित्र बनला. दयानंद सरस्वतींवर एक पुस्तकही त्याने लिहिले होते. बनारसला अनेक वर्षे राहून हर्न्ले नंतर १८८५ च्या सुमारास कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करायला गेला.
मागील लेखात आपण पाहिले की हॅमिल्टन बॉवरने ती हस्तलिखित पोथी कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. बॉवरने आणलेले म्हणून ह्या हस्तलिखिताचे नामकरण झाले 'बॉवर मॅन्युस्क्रीप्टस'. हर्न्ले त्यावेळी कलकत्त्याला होता. संस्कृतबरोबर मध्य आशियात बोलली जाणारी खोतानी भाषादेखील हर्न्लेला अवगत होती. त्यामुळे ते हस्तलिखित साहजिकपणे त्याच्याकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आले. हे वर्ष होते सन १८९१.
हर्न्लेने ह्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा अभ्यास सुरु केला. सर्वात प्रथम अडचण होती भाषेची. त्या हस्तलिखिताची भाषा संस्कृतसम होती पण संस्कृत नव्हती. लिपीपण नेहमीपेक्षा वेगळी होती. भाषा अगम्य आणि लिपी अगम्य! भाषा वेगळी आणि लिपी वेगळी - असे कसे शक्य आहे? उदाहरण देतो: 'एक्झाम्पल' - इंग्रजीत हा शब्द 'Example' असा लिहिता आला असता पण हा इंग्रजी 'भाषे'तला शब्द मी देवनागरी 'लिपी'त लिहिलाय. हर्न्लेची समस्या नक्की समजण्यासाठी हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. समजा मी देवनागरीत लिहिले 'बाएश्पीएल' आणि सांगितलं की इंग्रजीत भाषांतर करा - तर तुम्हाला काय समजेल? तुम्हाला मराठीत वाचता येतंय पण अर्थ लागत नाही - मग काय करणार तुम्ही ह्याचे भाषांतर? जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये की मी देवनागरी लिपीतून जर्मन भाषेत हा शब्द लिहिलाय तोपर्यंत तुम्ही त्याचे भाषांतर करूच शकणार नाही. आणि ह्यासाठी मराठी (लिपी), जर्मन (भाषा) आणि इंग्रजी (भाषांतर भाषा) ह्या तिन्ही भाषा जाणणारा माणूस लागेल. (जाता जाता सांगतो 'बाएश्पीएल' म्हणजे जर्मनमध्ये 'उदाहरण' आणि इंग्रजीत 'Example'). नेमका असाच प्रश्न हर्न्लेला पडला होता आणि त्या वेळेला इंटरनेट अथवा गुगल वगैरे काही नसल्याने हाताशी असेल तेवढेच संदर्भ वापरून त्याला त्या हस्तलिखितांचे भाषांतर करायचे होते. त्यात अजून ती हस्तलिखिते लिहिलेली होती बर्च झाडाच्या पानांवर. बरेचसे भाग पुसट झालेले होते - काही भाग वाचण्याच्या परिस्थितीत नव्हते हापण एक त्रास होताच. हर्न्लेला अनेक जुने संदर्भग्रंथ अभ्यासावे लागले. त्याला तेव्हा कळाले की ती लिपी 'गुप्त ब्रह्मी' लिपी होती. भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात (ई स २४० ते ई स ५५०) ही लिपी संस्कृत आणि तत्सम भाषा लिहिण्यासाठी वापरली जात असे. त्या हस्तलिखिताची लिपी जरी 'गुप्त ब्रह्मी' लिपी असली तरी भाषा नक्की कोणती होती ते हर्न्लेला नीट समजत नव्हते. पण त्याला ही माहिती मिळाली की बौद्ध धर्माचे बरेचसे साहित्य ब्रह्मी लिपीत आहे आणि ह्यासाठी त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास सुरु केला.
असं मानतात की ई स पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने वैदिक भाषेवरून संस्कृत भाषेचे नियम निश्चित केले. संस्कृत ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'संपूर्णपणे बनलेली' / 'नियमांनी बांधलेली' असा होतो. गौतम बुद्धाचा काल पाणिनीच्याच आसपासचा मानतात. पण त्या काळी संस्कृत भाषा उच्चवर्णीयांची आणि कर्मकांडाची भाषा झाल्याने बुद्धाने त्याचे तत्त्वज्ञान सामान्यांच्या ब्रह्मी आणि पाली भाषांत सांगितले. पण काही वर्षांनंतर संस्कृत हीच सामान्यांची मुख्य प्रचलित भाषा बनली आणि त्यामुळे त्यावरून बौद्ध भिक्षूंनी त्यांची स्वतःची अशी संस्कृतोद्भव संकरीत भाषा बनवली. हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टस ह्या संस्कृतोद्भव संकरीत भाषेत पण 'गुप्त ब्रह्मी' लिपीत लिहिलेले होते. चार वर्षे - होय - चार वर्षे अथक परिश्रम करून हर्न्लेने शेवटी शोधून काढले की ती लिपी आणि भाषा नेमकी कोणती होती! फक्त कल्पना करा चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जेव्हा हर्न्लेला ह्याचा शोध लागला असेल तेव्हा त्याला किती अफाट आनंद झाला असेल! त्यानंतर पुढे बारा वर्षे बसून हर्न्लेने ते बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इंग्रजीत भाषांतरित केले आणि त्याचे थोडे थोडे भाग दर दोन तीन वर्षांनी प्रकाशित केले. आयुष्यातली एकूण अठरा ते वीस वर्षे हर्न्लेने बॉवर मॅन्युस्क्रीप्टसवर खर्च केली.
हर्न्लेने हे पण सिद्ध केले की ती हस्तलिखिते ई स ६०० च्या आसपासच्या काळातली आहेत. त्या वेळेपर्यंत भारतात सापडलेली सर्वात जुनी कागदपत्रे हीच होती. लंडनमध्ये अनेक वर्तमानपत्रांत ह्याच्या बातम्या आल्या. (सध्याचे कार्बन डेटिंग तंत्र वापरून हे सिद्ध झाले आहे की ती हस्तलिखिते ई स ६५० च्या आसपासचीच आहेत. म्हणजे त्याचा अंदाज बरोबरच होता!) त्यामध्ये एकूण ७ खंड होते - २ ज्योतिषविषयक खंड होते, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक खंड होते, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. दुर्दैवाने हे वैद्यकीय खंड अपूर्ण होते. जर ते का पूर्ण असते तर संपूर्ण जगातले सर्वात प्राचीन आणि सर्वसंपूर्ण असे ठरले असते. ह्या अपूर्ण खंडांमध्येपण भरपूर वैद्यकीय ज्ञान भरलेले होते - इतके की हर्न्लेच्या ह्या वैद्यकीय खंडांच्या भाषांतरांची दखल चक्क जून १८९५ च्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये पण "The Most Ancient Sanskrit Medical Treatise Extant" ह्या मथळयाने घेतली गेली. त्यातल्या भारतीय वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या इतकं 'पोटात दुखलं' की ह्या लेखाचा शेवट असा केला आहे - "No doubt many of the articles of the Hindu materia medica are of important therapeutic character and might with advantage be tested in hospitals; but a collection of complex farragos prescribed according to a fanciful and erroneous pathology is practically useless."
असं नक्की काय होतं त्या वैद्यकीय खंडांमध्ये? सुश्रुताचा आणि त्याच्या प्लॅस्टीक सर्जरीच्या पध्दतींचा ह्यात काही संदर्भ मिळाला का? १७९४ मध्ये पुण्यात त्या कुंभाराने वापरलेली पध्दत त्यात सांगितलेली होती का? पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात!
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut