Sunday, September 30, 2018

केन उपनिषद ३

केन उपनिषदासंबंधी मागील दोन लेखांत थोडी माहिती घेतली. आता ‘ब्रह्म’ (चैतन्य) या संदर्भात हे उपनिषद काय सांगते हे पाहू.

  1. मन आणि शरीर यापेक्षा चैतन्य हे वेगळे आहे. चैतन्य हे मन अथवा शरीरामुळे निर्माण झालेले नाही. आधुनिक विज्ञान चैतन्य हे शरीर अभिक्रियांचा परिपाक आहे असे मानते. परंतु उपनिषदांना हे मान्य नाही. 
  2. चैतन्य हे मन आणि शरीरापेक्षा वेगळे आहे. परंतु ते मन आणि शरीराला उर्जा (चेतना) पुरविते. चैतन्य हे मनाला प्रकाशित करते, चेतना देते. मन हे शरीराला चेतना देते असे उपनिषदे मानतात.  
  3. चैतन्य हे देह आणि मनापुरते मर्यादित नाही. चैतन्य हे सर्वव्यापी आहे. एखादी वस्तू, देह, मन काहीही नसेल तरीही तेथे चैतन्य आहेच. येथे प्रकाशाचे उदाहरण घेता येईल. अवकाशात सर्वत्र ताऱ्यांपासून आलेला प्रकाश असतो. 
  4. देह, मन इत्यादींचे अस्तित्व चैतन्याच्या अस्तित्वामुळेच कळू शकते. जसे काळोखात वस्तू असतात, परंतु प्रकाशाशिवाय त्यांचे अस्तित्व कळत नाही.
  5. जर देह आणि मन नसेल तेथे चैतन्य अस्तित्वात असेल, परंतु त्याचे अस्तित्व प्रकट होणार नाही. चैतन्याचे प्रकटीकरण होण्यास देह/मनाची आवश्यकता असते. अवकाशात सर्वत्र प्रकाश असतो. परंतु एखादी वस्तू त्याच्या मार्गात आली तरच त्या प्रकाशाच्या परावर्तनाने  (Reflection) त्या प्रकाशाचे अस्तित्व आपल्यास कळते. अन्यथा प्रकाश आहे हे कळणार नाही. तसेच काहीसे हे आहे. 

आपण म्हणजे हे सर्वव्यापी चैतन्य आहोत. म्हणूनच सर्वांभूती एकाच आत्मा आहे असे वेदांत दर्शन मानते. (सांख्य दर्शनापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. सांख्य दर्शन प्रत्येकाचा ‘पुरुष’ वेगळा आहे असे मानते.) अविद्येमुळे आपल्या मनात अहंकाराचा उगम होतो आणि आपण स्वत:ची ही चैतन्यरूपी ओळख विसरतो. या अविद्येचा नाश करून आपल्या चैतन्यस्वरूपाची जाणीव करून घेणे हे जीवनाचे इतिकर्तव्य आहे असे उपनिषदे मानतात.
केन उपनिषदाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. पुढील लेखात कठोपनिषदाची ओळख करून घेऊ.

Saturday, September 29, 2018

केनोपानिषद २

या आधीच्या लेखात आपण केन उपनिषदात शिष्याने उपस्थित केले प्रश्न पहिले. मनाचे व्यापार कोण चालविते, डोळ्यांनी बघणारा कोण आहे, कानांनी ऐकणारा कोण आहे, वाणीने बोलणारा कोण आहे अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. अध्यात्मिक उच्च पातळीवर पोचलेल्या शिष्याचे हे प्रश्न आहेत.या प्रश्नांना उत्तर देताना उपनिषदातील ऋषी थोडे कोड्यातच उत्तर देतात. ब्रह्म मनाचे मन आहे, डोळ्यांचे डोळे आहे, कानांचे कान आहे असे उत्तर हे ऋषी देतात. एकच ब्रह्म अथवा चैतन्य सर्व विश्वाला चेतना देते. त्यामुळे मनाला, डोळ्यांना, कानांना चेतना देणारे हेच ते ब्रह्म आहे. ब्रह्म मनाला चेतना देते, हेच मन त्या चेतनेमुळे डोळ्यांना बघण्याची चेतना देते, कानांना ऐकण्याची चेतना देते, जिभेला बोलण्याची चेतना देते.
आपण मागील लेखात विचार केलेल्या उदाहरणात पंखा हा विजेमुळे फिरतो. याचा अर्थ ती वीज पंख्याबरोबर फिरत नाही. तीच वीज दिव्याला प्रकाशण्याची चेतना देते. हीच वीज रेफ्रिजरेटरमध्ये वस्तू थंड करण्याची चेतना देते तर हिटरमध्ये हवा गरम करण्याची चेतना देते. म्हणजेच एकाच शक्ती तिचे प्रत्यंतर अनेक रूपांत देते. असेच ब्रह्माचे आहे. एकच ब्रह्म अनेक रूपांत आपल्यासमोर प्रकट होते.
पण विजेसारखेच हे ब्रह्म आपल्याला दिसत नाही. वीज जशी अनेक रूपांत प्रकट झाल्यावर ती आहे हे कळते तसेच ब्रह्माचे प्रकटीकरण झाल्यावरच आपल्याला त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण ब्रह्माला पाहू शकत नाही, मनाने त्याची कल्पना करू शकत नाही. ब्रह्म हे अतिंद्रिय आहे. जो कोणी ब्रह्म समजल्याचा दावा करीत असेल त्याला ब्रह्म समजलेलेच नसते असे हे उपनिषद सांगते.
आपण ब्रह्मस्वरूपी आहोत. आपले मन अथवा शरीर हे ब्रह्माच्या अस्तित्वामुळेच प्रकट झालेले दिसते. असे हे सर्व विश्व व्यापून राहिलेले ब्रह्म आपल्या मनात, शरीरात प्रकट होते, त्याला प्रकाशित करते. या मनातच आपला अहंकार अथवा स्वत्वाची जाणीव उगम पावते. पण आपण खरे ब्रह्मस्वरूप आहोत. या ब्रह्मस्वरूपाची जाणीव झाल्यावर आपल्याला आपल्या ‘अमरत्वाची’ जाणीव होते. कारण हे शरीर/मन नाशवंत आहेत, पण ब्रह्म चिरंतन आहे.
यातून आपल्याला ब्रह्मासंबंधी पाच गोष्टी कळतात. त्याचा उहापोह पुढील लेखात करू.

Friday, September 28, 2018

केनोपानिषद -१

उपनिषदांच्या मालिकेतील हे दुसरे उपनिषद. उपनिषदे हे भारतीय प्राचीन ज्ञानाने गाठलेले अत्युच्च शिखर म्हणता येईल. एकूण १०८ उपनिषदे आहेत. त्यापैकी १० महत्वाची मानली जातात. ही उपनिषदे महत्वाची मानली जाण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. उत्तर मीमांसा (वेदांत) दर्शन या दहा उपनिषदांवर आधारलेले आहे. या दहापैकी ईशावास्य उपनिषद आपण मागील लेखात पहिले. आता केन उपनिषद पाहू.

Image result for केनोपनिषदकेन उपनिषद ‘केन’ या शब्दाने सुरु होते. म्हणून त्याला केन उपनिषद म्हणतात. ईशावास्य उपनिषद हे ‘ईशावास्य’ शब्दाने सुरु होते म्हणून त्याचे नाव ईशावास्य उपनिषद आहे हे आपण मागील लेखात पहिले. परंतु सर्व उपनिषदांची नावे या पद्धतीने आलेली नाहीत. केन उपनिषद हे सामवेदाचा भाग म्हणून येते.
काही उपनिषदे मोठी आहेत, तर काही लहान आहेत. ईशावास्य उपनिषद सर्वात लहान आहे. त्यानंतर केन उपनिषदाचा क्रम लागतो. अत्यंत थोड्या शब्दात मोठा आशय सामावल्यामुळे ही उपनिषदे समजून घेण्यास कठीण वाटतात.

बहुतेक उपनिषदे प्रश्न-उत्तर स्वरूपात आहेत. केन उपनिषद हे ही शिष्याने विचारलेला प्रश्न आणि त्याला उत्तर याच स्वरूपात आहे. मात्र हा शिष्य आणि त्याला उत्तर देणारे गुरु यांचे नाव अज्ञात आहे. हा शिष्य अध्यात्मिक उंचीवर पोचलेला असावा हे त्याच्या प्रश्नावरून लक्षात येते.

मी विचार करतो, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, जिभेने चव घेतो, स्पर्श अनुभवतो. पण माझ्या डोळ्यांनी बघण्यामागे कोणती शक्ती आहे, कामांनी ऐकण्यामागील शक्ती कोणती हा प्रश्न या शिष्याला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा या उपनिषदाचा मुख्य हेतू आहे. जर या सर्व गोष्टी म्हणजे केवळ मेंदूतील रासायनिक प्रक्रिया असतील तर जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यात काय फरक आहे? हे शरीर तर केवळ एक यंत्र आहे, मग या यंत्राला जाणून घेणारे, Analysis करणारे कोणी यामागे आहे काय हा तो प्रश्न आहे. माझ्या समोरचा एक पंखा फिरत आहे, दुसरा फिरत नाही. दोन्ही पंखे एकाच प्रकारच्या सामुग्रीपासून बनलेले आहेत. मग एक फिरत आहे आणि दुसरा बंद आहे असे का? एक दिवा बंद आहे, दुसरा प्रकश देतो आहे असे का? फिरणाऱ्या पंख्यामागे, प्रकाशणाऱ्या दिव्यामागे कोणती शक्ती काम करत आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पंख्यामागे, दिव्यामागे कार्यरत असलेल्या विद्युत शक्तीचा शोध घेण्यासारखा हा प्रयत्न आहे.

या प्रश्नाला गुरुजींनी काय उत्तर दिले हे पुढील भागात पाहू.

Sunday, September 9, 2018

तक्षशिला


प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!  .
 
तक्षशिला ही प्राचीन नगरी आपले नाते जोडते प्रभू रामचंद्राशी! हा प्रांत त्या काळात केकय म्हणून ओळखला जात होता. दशरथाच्या काळात या देशाचा राजा होता अश्वपती. अनेक अश्व असलेला, अश्वांचा स्वामी किंवा अश्वांचा व्यापार करणारा राजा असावा, असे त्याच्या नावावरून वाटते. याची कन्या कैकयी ही दशरथाची कनिष्ठ भार्या होती. युध्दशास्त्रात आणि राजकारणात पारंगत होती. एकदा कैकयीचा पुत्र भरत आजोळी गेला होता. त्या वेळी दशरथाने रामाला राज्याभिषेक करायचे ठरवले. अश्वपतीने कैकयीबरोबर लग्नात पाठवलेली हेर मंथरा, ही बातमी ऐकताच कामाला लागली. तिने कैकयीचे कान फुंकले. रामाला वनवास आणि भरतासाठी राज्य मागायला सांगितले. कैकयीने आपले ठेवणीतले वर मागितले. राम वनवासात गेला आणि दशरथ पुत्रवियोगाने मृत्यू पावला. त्या वेळी भरत केकय प्रांतातून निघून थेट अयोध्येस आला.

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!


पुढे भरताने रामासाठी चौदा वर्षे राज्य केले. राम परत आला. रामाला राज्याभिषेक होऊन तो अयोध्येचा राजा झाला. त्यानंतर भरताचे पुत्र तक्ष आणि पुष्कल हे भरताच्या आजोळी केकयला गेले. असे सांगितले जाते की तक्षने तक्षशिला नावाची एक नवीन नगरी वसवली, तर पुष्कलने पुष्कलावती नावाची नगरी वसवली. जवळच रामपुत्र लवने लवपुरी वसवली, तर कुशने कुशावती नावाची नगरी वसवली. आज या चारही नगरी पाकिस्तानमध्ये आहेत, ज्या तक्षिला, पेशावर, लाहोर आणि कुसूर या नावांनी ओळखल्या जातात.

तक्षशिला, पुष्कलावती, लवपुरी आणि कुशावती या नगरींची नाळ अयोध्येशी जोडली होती एका प्राचीन महामार्गाने. या महामार्गाचे नाव होते - उत्तरापथ. रामायणात या पथाचे नाव येत नाही, पण केकय ते अयोध्या हा प्रवास वेगाने करता येण्यासारखा होता हे कळते, त्या अर्थी हा मार्ग तेव्हा अस्तित्वात असावा. उत्तरापथवरील तक्षशिला ही एक अतिशय समृध्द नगरी होती. या नगरीद्वारे उत्तर भारत Silk Roadला जोडला गेला होता. Silk Roadने चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तक्षशिला भरभराटीस आली होती. मौर्यांच्या काळात उत्तरापथ पाटलीपुत्रपर्यंत पोहोचला. कुषाण, गुप्त, हर्षवर्धनपासून शेरशहा सुरीने आणि नंतर इंग्रजांनी या मार्गाचा विकास केला. वाजपेयींच्या काळात हा रस्ता सुवर्ण चतुष्कोनचा भाग म्हणून विकसित केला गेला.

आज हा महामार्ग चट्टग्राम (चित्तगाव - Chittagong)पासून काबुलपर्यंत जाणारा Grand Trunk Road म्हणून ओळखला जातो. हा आशियातील सर्वात प्राचीन आणि सर्वात लांब महामार्ग आहे.

रामाशी नाते सांगणारी तक्षशिला, महाभारतातील कृष्णाशीसुध्दा नाते सांगते. तक्षक नागाच्या दंशाने हस्तिनापूर नरेश परीक्षिताचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी परीक्षिताचा पुत्र जनमेजय याने तक्षशिला येथे सर्पसत्र केले होते. या यज्ञात व्यासांचे शिष्य वैशंपायन आले होते. त्या वेळी जनमेजय राजाने त्यांना आपल्या पूर्वजांची कथा सांगण्याची विनंती केली. वैशंपायनांनी व्यासलिखित महाभारताचे आख्यान सांगितले. महाभारताची सुरस, रोमांचकारक आणि अमर कथा पहिल्यांदा सांगितली गेली ती तक्षशिला नगरीत. पांडवांच्या विजयाचे, कृष्णाच्या नीतीचे आणि भगवंताच्या गीतेचे अलौकिक शब्द प्रथम उमटले ते तक्षशिलेला!

बौध्द साहित्यात तक्षशिला नगरीचा उल्लेख गांधारची राजधानी म्हणून येतो. आज तक्षशिलेला अनेक स्तूपांचे अवशेष पाहायला मिळतात. त्याबद्दल पुढील लेखांमधून विस्ताराने जाणून घेऊ.

तक्षशिला हे व्यापाराचे केंद्र होते, तसेच विद्येचेही केंद्र होते. येथील विद्यापीठाची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. ग्रीस, रोम, पर्शिया, मध्य आशिया, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया येथून आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येथे येत असत. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच शिकायला मिळत असे. गणित, ज्योतिष, अर्थशास्त्र, वैद्यक शास्त्र, व्याकरण आदी विषय येथे शिकवले जात. एका वेळी 10,000 विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था होती. तक्षशिलेच्या विद्यापीठात शिकलेले आणि शिकवणारी काही भारतीय रत्ने म्हणजे व्याकरणकार पाणिनी, आयुर्वेदाचार्य चरक आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्य.

या नगरीवर मौर्य, यवन, कुशाणपासून गुप्तांपर्यंत अनेक राजघराण्यांनी राज्य केले. साधारण पाचव्या शतकात तक्षशिलेवर हूणांनी केलेल्या स्वारीनंतर इथला व्यापार मंदावला, बौध्द मठ ओस पडू लागले आणि विद्यापीठही लयास गेले. सातव्या शतकात शवान झांग आला, तेव्हा त्याने या नगरीत पडक्या वास्तू पहिल्या होत्या. हळूहळू ही नगरी अगदीच विस्मृतीत गेली. हजार-बाराशे वर्षांचा काल लोटला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अलेक्झांडर कनिंगहॅमने चिनी प्रवासी शवान झांगचा वृत्तान्त वाचून तक्षशिला नगरी शोधली. इथे उत्खनन केल्यावर तक्षशिलामध्ये वेगवेगळया काळातील अवशेष मिळाले. नवाश्मयुगापासून ते कुशाणकाळापर्यंतचे अवशेष पाहायला मिळतात. इथली विविधता, प्राचीनता, भव्य अवशेष, देदीप्यमान भूतकाळ, प्राचीन जगतावरील प्रभाव या सर्वांमुळे आज पाकिस्तानमधील तक्षिला ही एक World Heritage Site आहे

Ref http://www.evivek.com/Encyc/2018/9/5/2295301