Monday, January 11, 2016

असहिष्णुता : लेखक संजय सोनवणी

खेद...विरोध नेमका कशाचा हवा?
गतकाळात रमवत, त्याच चश्म्यातून भविष्याकडे पाहत आपल्या अनुयायांना पुढे नेण्याची स्वप्ने दाखवत मागेच ओढत राहणा-या विचारधारांचा.
यातून प्रगतीही होत नाही आणि मानसिकता पुराणपंथी बनत जाते. मानवी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे ते समजुच देत नाहीत कारण त्यांना अबौद्धिक गुलामच हवे असतात. ते अनुयायांचे असे काही ब्रेन वाशिंग करुन टाकतात कि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणाच नष्ट होते. किंबहुना विचार करायचीच त्यांना भिती वाटू लागते.
असे एका साच्यात घडलेले लोक काही नवनिर्मिती करू शकतील याची सुतराम शक्यता नसते. ते कधी स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ शकतील याचीही संभावना नसते. आणि इतरांनीही स्वतंत्र विचार केलेला त्यांना आवडत नाही. किंबहुना इतरांचेही स्वातंत्र्य बंदिस्त करत त्यांनाही आपल्या झापडबंद अविचारशील विचारधारेत आणण्याचा त्यांचा जबरदस्त प्रयत्न असतो. येत नसतील तर त्यांना संपवुनच टाकायचे हेच काय ते धोरण असते. कारण ते भेकड असतात. त्यांना विचारांचीच भिती वाटते, प्रकाशाला घाबरणा-या दिवाभितांसारखी. ते प्रकाशावरच तुटून पडू पाहतात.
खेद या अविचा-यांचा असायला हवा. विरोधही. कारण ते इतरांनाच घातक आहेत म्हणून नव्हे तर स्वत:च्या अनुयायांसाठी तर जास्तच घातक आहेत. रक्तशोषक किड्यांप्रमाणे ते आपल्या अनुयायांचा आत्मा आधी शोषतात मग नंतर बाह्य कक्षेतील माणसांवरही तेच प्रयोग करायला सिद्ध होतात. अनुयायांनीही किमान झापडबंद होऊ नये असा प्रयत्न करायला हवा. स्वत:चे स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्य नव्हे हे समजावून घ्यायला हवे. जगात आजवर अगणित अशा राज्यव्यवस्था, हुकुमशहा, संघटना झाल्या आहेत, मानवी दुर्दैव कायम असेल तर पुढेही होत राहतील.
यात माणसाचे माणुसपण कोठे राहिले?आमचा विरोध अशा माणुसपणाला हिरावणा-या अविचारी, एककल्ली, एका साच्यातले माणसे बनवण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहत, खोट्या आशा, खोटी स्वप्ने आणि खोटे शत्रू समोर ठेवत हिंस्त्र प्रेरणा देत माणसाने माणसांनाच फसवत राहणारी व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नांना असला पाहिजे.
आम्हाला अखिल मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे.
सर्वांना स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा, विचार करण्याचा व आपले विचार निर्भयपणे मांडण्याचा, आपापले धर्म (उपद्रव न निर्माण करता) पाळण्याचा, राजकीय हवे ते विचार बाळगण्याचा अधिकार सहिष्णुता सर्वप्रथम मान्य करते. मानवी सहजीवन हे एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांचे अधिकार मान्य करत संविधानाच्या चौकटीत जीवन जगण्याचे स्वातंत्र्य घेणे व देणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुतेचे तत्वज्ञान मानवाचा मुलभूत व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मानाच्या संकल्पनेवर उभे आहे. महात्मा गांधी जे म्हणत, "मला केवळ भारताचे नव्हे तर भुतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे." ही उदात्त भुमिका सहिष्णुतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वातंत्र्य इतरांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी नाही याचे भान प्रत्येक सहिष्णू ठेवत असतो. आपले राष्ट्र "सेक्युलर" राष्ट्र आहे. हा सेक्युलरिझम बहुतेक विद्वान फक्त "धर्म-निरपेक्ष" या शब्दाशी जोडतात, जे चुकीचे आहे. सेक्युलर या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ खूप व्यापक आहे. तो मानवाच्या (नागरिकांच्या) सौहार्दमय सहजीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार करण्याचा, जीवन जगण्याचा, धर्म, अर्थविषयक श्रद्धा-विचार ठेवण्याचा, आपापली खाद्य ते जीवनसंस्कृती (अन्य कोणालाही उपद्रव होणार नाही व वर्तन कायद्यांच्या चौकटीत असेल या पद्धतीने) जपण्याचा अधिकार आहे. ही बाब सहिष्णुता मान्य करते. ज्याक्षणी सहजीवनाची संकल्पना हद्दपार होऊ लागते तत्क्षणी ते ते समाज असहिष्णू होत जातात असे म्हणावे लागेल.
आम्हाला आमची मुले ते पतवंडे व त्याहीपुढील पिढ्या मुक्त वातावरणात वाढवायच्या आहेत कि द्वेषाने, हिंसेने भरलेल्या जहरी, जगण्याची कसलीही शाश्वती नसलेल्या वातावरणात सडू द्यायच्या आहेत याचा निर्णय आताच घ्यावा लागणार आहे. असहिष्णुतेच्या तत्वज्ञानाचा पाया मिथ्या वर्चस्ववादात आहे. कोण कोणावर कशी सत्ता (आणि कसल्याही प्रकारे) गाजवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आहे. नव-याची बायकोवर व आईबापाची मुलांवर प्रेमविरहित वर्चस्व गाजवण्याची इच्छा जेथे जन्माला येते तेथेच माणसाच्या असहिष्णुतेचा प्रवास सुरु होतो. अनिर्बंध आकांक्षांतुन खोटेपणा, हिंस्त्रता, द्वेष इत्यादिचा आधार घेत असहिष्णूता टोक गाठत जाते व अंतता: अमानवी बनते. आम्हाला जर आमचे भवितव्य असे अमानवी बनवायचे नसेल तर आताच सावध होणे आवश्यक आहे.
असहिष्णुतेचे तत्वज्ञान हे दुस-यांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी जन्माला येते. या चारही बाबी या तत्वज्ञानात हातात हात घालून वावरत असतात. त्यांना वेगळे करता येत नाही. Theory of others  हा या तत्वज्ञानाचा पहिला नियम असतो. हा नियम म्हणजे आपण (स्वधर्मीय वा विचारप्रणालीचे) व इतर अशी विभागणी सर्वप्रथम काळजीपुर्वक केली जाते. आपले धर्म/तत्वज्ञान हे इतरांपेक्षा कसे पुढारलेले आहे, इश्वरप्रणित आहे, श्रेष्ठ आहे, पुरातन आहे, हे लिहिणे, सांगत राहणे, बिंबवने व त्यातुनच हाडाचे कट्टर अनुयायी तयार करणे ही स्वभावत:च पुढील पायरी असते. या प्रवसात सुरुवातीला जमतील ती सत्तास्थाने (आर्थिक/राजकीय) प्रप्त करत जात अंतिम उद्देश साध्य करायचा असतो सत्ता संपादनाचा. त्यासाठी शत्रू मानलेल्या वर्ग-गटांबाबत द्वेष पसरवत प्रसंगी हिंसक होण्याची त्यांची अर्थातच तयारी असते, कारण द्वेष केल्याखेरीज, त्यांच्याबाबत खोटे का होईना भय निर्माण केल्याखेरीज आपले लोक एका झेंड्याखाली राहणार नाहीत याची त्यांना खात्रीच असते. आपले अनुयायी स्वतंत्र विचार करणार नाहीत, एक साच्याचे बनतील यासाठी ते अपरंपार कष्ट घेत असतात. कोणी स्वतंत्र विचार मांडत असतील, त्यांच्या विचारांनी आपल्यला हवी तशी समाजरचना करण्यात अपयश येणार असेल, अडथळे येणार असतील तर त्यांना धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न होतात, एनकेन प्रकाराने अंधारात फेकले जाते व तेही जमणार नसेल तेंव्हा सरळ हत्या केल्या जातात. अमेरिकेतील कु-क्लक्स क्लान या गुप्त संघटननेने अनेक ज्यू व बायबलमधील तत्वज्ञानाविरोधी जाणा-या विचारवंतांची हत्या केली हा इतिहास आहे. भारतात अलीकडेच झालेल्या तीन विचारवंतांच्या हत्याही याच परिप्रेक्षात पहाव्या लागतात. आयसिसचा झालेला उदय याच तत्वज्ञानातून झाला आहे. किंबहुना सर्वच दहशतवादांमागेही हेच तत्वज्ञान व साध्य असते.