Wednesday, October 21, 2015

विचार महात्मा गांधींचा ,एका सावरकर भक्ताच्या नजरेतुन.

अभिषेक देशपांडे  यांच्या facebook वरील लेखातून साभार

विचार महात्मा गांधींचा ,एका सावरकर भक्ताच्या नजरेतुन...............
--------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा गांधीचा विचार सर्वसाधारण हिंदुत्ववादी लोक मुस्लिमांचा प्रेमी ,पाकिस्तानचा जनक ,एक मूर्ख, हिंदुंचा शत्रु,अहिंसेचा अतिरेकी, ब्रह्मचर्याचे आणि खाण्यापिण्याचे खूळचट प्रयोग करणारा राष्ट्राचा शत्रु असा काहीसा करतात.

बहुतेक लोक मग गांधीजींच्या लिखाणाचा,वक्तव्याचा अभ्यास करतात.त्यातही हा सगळा गोंधळ वाढ्वायला "५५ कोटीचे बळी" अशी प्रचाराने भरलेली पुस्तके वाचतात आणि "मी नथुराम गोड्से बोलतो आहे" सारखी टाळ्या खेचणारी दुय्यम गल्लाभरु नाटके बघतात. महात्म्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होते. बहुतेक वेळा त्यांचे अभ्यासक चुकीचा रस्ता घेउन भूलभूलैयात फसतात.

महात्माजींच्या लिखाणाचा आणि वक्तव्याचा अभ्यास करतांना लोक बहुदा रिकाम्या हाताने परत येतात कारण ते "गांधीवाद" नावाचे तत्वज्ञान शोधायचा प्रयत्न करतात.पण असे काहीही तत्वज्ञान नाही आणि गांधीजी कूठल्याही राजकिय तत्वज्ञानाचा पुरस्कार करत नव्हते.महात्माजींचे बोलणे आणि लिहीणे हे सगळ्याना घेउन चालण्याच्या त्यांच्या पध्दतीमुळे त्या त्या प्रसंगाला अनुरुप असले तरी खूप वेळा विसंगत असायचे शब्दांचा धूम्र पडदा [Smokescreen] उभा करुन आपला खरा हेतु लपविण्यात महात्माजी हुशार असल्याने त्यांच्या लिखाणात गांधीवाद नाही.

हा शोध आणखी एका गोष्टीने अजुन अतिशय कठीण झाला आहे.महात्माजी वैयक्तीक आयुष्यात एक नंबरचे विक्षीप्त आणि चक्रम होते आणि हे ते स्वतः मान्य करतात. [“ I am the biggest crank around”] त्यांचे ब्रह्मचर्य, उपास,सर्वधर्म प्रार्थना सभा,शेळीचे दूध,खादी,सुत कातणे, वैद्यकीय उपचाराला नकार, ग्रामोद्योग आणि या विषयावरील त्यांच्या लिखाणाने अथवा पत्रकांनी एक प्रकारचे विनोदी किंवा अप्रीय चित्र बर्‍याच लोकांपुढे उभे रहाते.

एक दुःखाची गोष्ट म्हणजे महात्माजींचा वारसदार म्हणून त्यांच्यापेक्षाही चक्रम असणारे आचार्य आणि सर्वोदयी समजले जातात, ज्यांना गांधीजी तर धड समजले सुध्दा नाहीत.

मला स्वतःला या महान माणसाचे विश्लेषण करतांना एकच वर्णन ,एकच ध्येय जाणवते. भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणे आणि त्या प्रक्रियेत देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला जागे करणे. हा खेड्यातला गरीब,अशिक्षीत माणूस त्याला आपल्या देशाची,त्याच्या स्वातंत्र्याची जाणिव करुन देणे आणि त्याला ह्या लढ्यात सहभागी करुन घेणे हे होते त्यांचे ध्येय.

गांधी ,नेहरु ,मौलाना आझाद, सरदार पटेल,नेताजी हे सगळेच इतिहासाचे गाढे अभ्यासक होते पण इतिहासाचा अभ्यास आणि त्यापासुन शिकणे ही महात्माजींची खासियत होती.

महात्माजीनी एका गोष्टीवर विचार केला की जातिव्यवस्थेमुळे सर्वसामान्य भारतीय हा कोण राज्यकर्ता आहे आणि कोण आपला/परका आहे याबद्द्ल उदासीन राहिला.राजे ,आक्रमक,परकिय आपापसात लढत होते पण सर्वसामान्य जनता या लढ्यात उतरत नसे.जनता नुसतीच भरडली जात असे. हा देश माझा आहे आणि हा नेता माझा आहे ही भावना भारतियांमध्ये अभावानेच होती. इतिहासापासुन गांधीजींनी शिकलेला “धडा क्रमांक एक” होता की हा सगळा झोपलेला समाज जागा करणे जरुरी आहे. ब्रिटीश भारतावर राज्य भारतीय पोलीस,सैन्य,भारतीय अधिकारी यांच्यातर्फे करत होते .ब्रिटीश फारच थोडे होते. हे सगळे भारतीय देशद्रोही नव्हते ,त्यांना देशाची जाणिव नव्ह्ती. महात्माजी नेहमी राणा प्रतापचे उदाहरण देत की तो स्वतः लढला पण बाकीचे राजपुत राजे मोगलांच्या बाजूने लढत होते आणि जनता उदासीन होती.

काही ब्रिटीश अधीकार्‍याना मारुन अथवा काही बाम्ब फोडुन काही साध्य होणार नाही कारण सशस्त्र उठाव करण्यासाठी जी सामाजिक जागृती लागते ती नसली तर ब्रिटीश हे क्रांतीकारक काही दिवसात गुंडाळतात.

गांधीजीनी ब्रिटीशांचा पूर्ण अभ्यास केला.ब्रितिशांचा एक महत्वाचा गुण अथवा अवगुण त्यांच्या लक्षात आला तो म्हणजे कायद्याबद्दलचा आदर.जर कायदा फाशीची सजा सांगत असेल तर ब्रिटीश न्यायसंस्था फाशी देईल पण जो मनुष्य "कायदेशीरपणाने" कायदा तोडेल त्याला कायद्यात असेल तेवढीच सजा मिळेल. १८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ.

ज्यांच्यावर संशय आहे पण पुरावा नाही त्यांच्यावर दूसर्‍याच फालतू कारणाने खटला भरुन लांब कैद जसे लोकमान्य टिळकांवर अग्रलेखावरुन खटला भरुन ६ वर्षे मंडालेला पाठविले जिथे त्या थोर महामानवाची प्रकृती कायमची ढासळली.

या क्रांतीकारकांच्या चळवळी एक महिन्यात खणल्या जात असत आणि सर्वसामान्य जनता उदासिन असल्याने सगळे मग थंड थंड होत असे. तेंव्हा महात्माजींनी “दूसरा धडा” शिकला; तो होता की ब्रिटीशांविरुध्द राष्ट्र जागे होईपर्यंत लढा अहिंसेने चालवायचा.

महात्माजींचा स्वतःचा अहिंसेवर फारसा विश्वास नव्ह्ता.१९२१ च्या सत्याग्रहात महात्माजींनी ज्या मागण्या ब्रिटीशांसमोर ठेवल्या त्यात पहीलीच मागणी आहे "भारतियांना शस्त्र बाळगण्याची मनाई रद्द करा". १९४२चा लढा,काश्मीर,जुनागड इ.ठिकाणी कांग्रेसने शस्त्र वापरले पण महात्माजींनी त्याचा कधीही निषेधसुध्दा केला नाही.

महात्माजींनी अतिशय धूर्तपणाने अहिंसा हे शस्त्र म्हणून वापरले ,तत्व म्हणून नाही. आणि महात्म्याचे समर्थक आणि विरोधक दोघेही या शस्त्राला तत्व समजून त्याचा गवगवा,धिक्कार इ.करत बसले.पण या अहिंसेचा दिखावा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने केला.त्याचे तत्वज्ञान दाखविले.ब्रिटिश यामुळे पूर्ण बुचकळ्यात पडले आणि त्यांना या माणसाला कसे आवरावे हा मोठाच यक्षप्रश्न झाला.

या शातंतापूर्ण सत्याग्रहात महात्माजींनी कांग्रस संघटना बांधली,लोक आणि समाज जागे केले ,हलवुन सोडले.. हा समाज जागा करावयाला त्यांनी साध्या साध्या आणि सोप्या गोष्टीवर लढा पुकारला आणि सत्याग्रह ,स्वदेशी,खादी या साध्या बाबी ज्यात लहानापासुन मोठे भाग घेउ शकत होते.

या साध्या माणसाने एक गोष्ट ओळ्खली की एकदा हा समाज जागा झाला की या समाजातल्या लोकांचेच भाउ,वडील,मुलगा इ.इ. लष्करात,पोलिसात, Governement मध्ये असतात आणि हा समाज जागा झाला की या सगळ्या संस्था हातात येण्यास वेळ लागत नाही. आझाद हिन्द फ़ौज,नाविक बंड इ. हा त्याचाच परिपाक असतो.

महात्माजी जेव्हा दक्षीण आफ़्रिका सोडुन १९१४साली भारतात परत आले तेंव्हा त्यांच्या या नवीन पध्दतीच्या आंदोलनाने बुचकळ्यात पडलेल्या तेथील जनरल जन स्मट्स याने लिहीलेल्या एका पत्रात तो कांहिसे हतबल होउन लिहीतो " हा संत आपल्या द. आफ़्रिकेचा किनारा सोडुन गेला आहे आणि माझी मनोमन प्रार्थना आहे का हा परत इथे येउ नये."

१९१४ ते १९१८ या चार वर्षात गांधीजीनी त्याकाळच्या रेल्वेच्या तृतीय वर्गाने देश पालथा घातला,ते महात्मा आणि नेते झाले नसल्याने फारसे कुणी त्यांच्याकडॆ लक्षही दिले नाही. या बरिस्टरचा वेश होता पागोटे,धोतर आणि बाराबंदी. या काळात त्यानी तळागाळातला समाज फार जवळून बघितला,त्यांच्या

बरोबर ते राहीले,जेवले आणि त्या सामान्य माणसाला जात-पात, दारिद्र्य,जमिनदार,राजे-रजवाडे ह्यांच्या पिळवणुकीखाली गांजलेला त्यांनी बघीतला,त्यांचा वेश देशी असल्याने तो गरीब त्यांच्याशी मोकळेपणाने बोलला.

त्यामुळे त्यांच्ये ह्र्दय त्या दरीद्रीनारायणाविषयी ज्या कळवळा,प्रेमाने आणि अनुकंपेने भरुन आले तसे तोपर्यंत कूठल्याही राजकीय नेत्याचे आले नसेल.

मुर्ख रूढी,जखडणारी जात-पात,दारिद्र्य आणि न परवडणारे सण,लग्नसमारंभ इ.नी दबलेला माणूस, स्त्रियांवर होणारे जुलुम इ. त्यांनी बघीतले आणि एक न भुतो न भविष्यती असा समाजसुधारक उभा राहीला,हा त्यांनी शिकलेला “ तिसरा धडा ” होता. सुधारकाची ही गांधिजींची भुमिका बव्हंशी दुर्लक्षीत राहीली आहे.

गांधीजी या सगळ्या प्रवासात आणि द. आफ़्रिकेत आपल्या समाजावर धर्माची असलेली लोखंडी पकड बघीतली. तेंव्हा गांधीजींच्या हेही लक्षात आले की लोकांना आपल्या कडे खेचुन घेण्यास त्यांना स्वामी बनणे अतिशय गरजेचे होते,धर्मावर हल्ला करण्याऎवजी हा तुमचा आमचा महात्मा सगळ्या ढोंगी स्वामींना संपवणारा ढोंगी स्वामी बनला. हा त्यांचा “४ था धडा” होता ,त्यांचे रूप , पंचा,सन्यासीपणा,दरिद्री राहाणी,प्रार्थना सभा,गीतेचे उदाहरण इ. पूर्णपणाने लोकांना पटवून गेले की हा देवाचा भक्त स्वामी आहे,चला चला रे सगळे नमस्काराला.

त्यांचा स्वतःचा देवाधर्मावर विश्वास नव्हता.त्यांची देवाची व्याख्या "सत्य हाच देव आहे आणि काम पूजा आहे " ही होती. त्यांचे सर्व पट्ट्शिष्य त्यांच्याप्रमाणे नास्तिक होते. महात्माजी कधी देवळात,स्वामीकडे अथवा पीर-दर्ग्यात दर्शन घेणे करायला गेल्याचे ऎकीवात नाही.पण सगळ्याना बरोबर घेउन चालायचे असल्याने ते कुणालाही दुखवत नसत.

उदा. त्यांना कोणीतरी विचारले "आपला चातुर्वणावर विश्वास आहे का?"त्यांचे उत्तर होते " माझा चातुर्वणावर पूर्ण विश्वास आहे.ही एक हिंदु धर्माची जगाला देणगी आहे पण माझा जन्मतः जात अथवा वर्ण ठरतो यावर विश्वास नाही,माझा रोटीबंदी[एकत्र जेवण्यावर बंदी] ,बेटीबंदी [आंतरजातिय विवाह], अस्पृशता,शिवाशिव, जाति,वर्णावर आधारित नोकरी अथवा काम यापैकी कशावरही विश्वास नाही आणि हे ह्या सर्व हिंदु धर्माला काळीमा लावणार्‍या मूर्खपणाचा नाश करणे हे माझे जीवनध्येय आहे."

पहीला भाग ऎकुन सनातनी हिंदु खूश आणि दूसरा भाग ते काय समाजसुधारणा करु पाहात होते ते स्पष्ट करतो.

गांधीनी भारत पालथा घालतांना हे ही बघीतले की खेड्यापाड्यातला अशिक्षीत माणूस सुट-बुटातल्या काळ्या साहेबाला घाबरतो आणि तो काळा साहेब जेंव्हा यस-फ़्यस करतो तेंव्हा त्याला कोणीतरी परग्रहावरचा साहेब वाटतो. हा त्यांचा “पाचवा धडा” होता ,त्यामुळे जेंव्हा गांधीजीनी त्यांची चळवळ चालु केली तेंव्हा त्यांनी आपल्या बरिस्टर,डाक्टर,ICS इ. नेत्याना भारतीय पोशाख घालण्याची सक्ती केली कारण त्यामुळे तो सामान्य भारतीय त्याला आपला आणि आपल्यातून आलेला नेता समजू लागला. त्यातही खादीसारखे कापड जे मळकट रंगाचे,सदा चुरगळलेले असे त्यामुळे ही एकात्मता पूर्ण झाली.

गांधीनी या सगळ्या काळ्या साहेबांना सांगितले की तुम्ही नेते आहात त्या खेड्यातल्या गरीबाचे आणि त्या गरिबाला पट्वुन दिले की हे तुमचे नेते आहेत.

गांधीजींना या त्यांच्या शांततापुर्ण सैन्याला गणवेश हवा होता ज्यामुळे ते कुठेही ओळखले जाईल.पण गणवेश ठेवला तर ब्रिटीश सरकार जागे झाले असते आणि त्यांनी कांग्रेस नष्ट करायला वेळ लावला नसता. महात्माजींनी हा प्रश्नसुध्दा त्यांच्या बुध्दीमत्तेने नीटसपणाने सोडवला. त्यांनी खादी हा गणवेश बनवला आणि आपला खरा हेतू लपविण्यासाठी त्यात चरखा,सुतकताई,किती सुत कातावे इ,इ, गोंधळ उभा केला.त्यामुळे ब्रिटीशांच्या डोक्यात एकच विचार आला " हा म्हातारा वेडा झाला ,सुत कातून स्वराज्य मिळविणार म्हणतो ,जाउ दे, कातू दे किती सुत काततो ते !!!"

अशा रीतीने कोणीही कांग्रेसवाला ओळखू येउ लागला.१९२२ नतंर महात्माजींनी खादीच्या बाबतीत फार गोंधळ घातला नाही कारण त्यांना जे हवे होते ते साध्य झाले होते.

ब्रिटीश शासन महात्माजींचे कौतुक करत नव्हते ,पण बुचकळ्यात जरूर पडले होते.जसे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकाना आजही वाटते की गांधी मूर्ख किंवा वाईट होते तसेच सुरवातीला ब्रिटीशाना वाटले हा फाटका माणूस उपास करून,सत्याग्रह करून आणि चरखा चालवून काय करणार आहे .१९३१ पर्यंत त्याना हे कळले की काय करणार आहे तेंव्हा उशीर झाला होता. त्यांना त्यांच्या सत्य अहिंसेच्या बुरख्याआडून ओळखणारी माणसे होती जिना,लॉर्ड व्हवेल आणि चर्चिल ,आणि हीच माणसे त्यांच्या विरुद्ध यशस्वी झाली.

गांधीजीनी आपली संत /महात्मा अशी प्रतिमा अतिशय प्रयत्नपूर्वक बनविली होती.१८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ. परंतु ब्रिटीशानी राजकीय पक्ष ,शांततापूर्वक सत्याग्रह ,चळवळी यावर बंदी घातली नव्हती.त्यामुळे गांधीजी आणि कांग्रेस याना सजा ह्या सात्याग्रहाबद्दल होत ज्या साधारणपणे १ महिना ते २ वर्षे तत्कालीन कायद्या प्रमाणे असत.

याला अपवाद फक्त १९२२ साली जेव्हा चोरीचोरामुळे कि जिथे जमावाने २४ पोलिसाना जिवंत जाळले बिटीश सरकारला महात्माजींच्या नाटकावरून विश्वास उडाला म्हणून त्याना ६ वर्षे सक्तमजुरी दिली ,महात्माजींचे नाटक इतके सुरेख होते की त्याना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाने ही सांगितले की आपल्यासारख्या महात्म्याला ही शिक्षा सुनावताना मला फार दुख होत आहे. पुढे त्यांचे apendix चे operation झाल्याने त्याना २ वर्षात सोडले .

आता जरा त्यांच्या चार शिष्योत्तमांकडे एक कुतुहल म्हणून एक नजर टाकु यात .

१९१६ मध्ये ते बिहारला गेले तिथे ते राजेंद्रबाबुंच्या घरी गेले.[ डा. राजेंद्रप्रसाद भारताचे पहीले राष्ट्रपती.] राजेंद्रबाबुंच्या चपराश्याने महात्माजींना घरात घेतले नाही,कारण त्याला हा धोतर नेसलेला गबाळा माणूस साहेबांनी सांगितलेले बरिस्टर गांधी असतील हे खरे वाटले नाही. आता राजेंद्रबाबु हे त्याकाळातले सुटाबुटातले स्वर्णपदक विजेते वकील.त्यात वैयक्तीक आयुष्यात ते अतिशय कर्मठ उपासतापास,सोवळेओवळे पाळणारे कायस्थ ब्राम्हण होते.

गांधीजींनी चंपारण्यात जाउन सत्याग्रहाची छावणी टाकली तेंव्हा राजेंन्द्रबाबु कार्य करण्यापेक्षा या विक्षीप्त माणसाबद्दलच्या कुतुहलाने तेथे गेले. महात्माजींना फ़क्त दोन दिवस लागले की राजेंद्र्बाबुंनी सुट्बुट त्यागून आयुष्यभरासाठी धोती-कुर्ता पेहनला. या कर्मठ कायस्थ ब्राह्मणाने आपले सोवळे-ओवळे त्यागुन सर्वांबरोबर एका पंगतीत जेवणे सुरु केले.

त्यांनतंर पाळी आली अतिशय तिक्ष्ण,फटकळ वल्लभभाई पटेलांची. वयाच्या ३६ वर्षी सरदार पटेलांनी इंग्लडला जाउन लंड्न मध्ये Middle Temple Inn मध्ये नाव नोंदविले .त्यांनी ३६ महिन्याचा अभ्यासक्रम ३० महिन्यात संपविला आणि स्वर्णपदक घेउन ते वर्गात पहिले आले. वल्ल्भभाई लंडनहुन येउन अहमदाबादला वसले.तिथे त्यांनी मित्रांच्या सांगण्यावरुन निवडणुक लढवून अहमदाबादचे स्वछता कमीशनर झाले आणि रोज ब्रिटीशांशी भांडू लागले. पुर्ण सुट/बुट ,हातात सिगार ,रोज सध्यांकाळी क्लब मध्ये जाउन व्हिस्की आणि पत्ते हे त्यांचे आयुष्य होते.बरिस्टर म्हणून ते फ़ार पैसे कमवत होते. वल्लभभाई इतके लहरी होते की त्यांचे शर्ट आणि त्याच्या त्याकाळी निघणार्‍या कालर या धोब्याला धूण्यासाठी अहमदाबादहून मुंबईला जात.

एका संध्याकाळी अहमदाबाद क्लबमध्ये पत्ते खेळत बसले असताना क्लबच्या हालमध्ये महात्माजींचे भाषण होते ,वल्लभभाईंनी जायला नकार दिला त्यांचे मित्र पाश्चीमात्य सुटातल्या दादासाहेब मांवलणकरांना ते म्हणाले," तो गांधी वेडा आहे असे सत्याग्रह करुन आणि सामाजिक चळवळी चालवुन काय स्वातंत्र्य मिळते का? आपण गेलो तर ते एक ताट हातात देउन गहु निवडायला बसवतील.”

शेवटी त्यांच्याबरोबर पत्ते खेळणारे सगळेच उठून गेल्याने सरदार नाईलाजाने हातात सिगार घेउन भाषणाला गेले. अर्थातच एका आठवड्यात त्यांनी सुट-बुट आणि बरीस्टरी त्यागली आणि ते सरदार पटेल बनुन लढ्यात उतरले आणि पुढे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. सरदारांनी एका मुलाखतीत सांगितले " मी जिथे आहे आणि जे काम करत आहे त्याचे कारण मला बापू [महात्मा गांधी] या जागी ठेवुन गेले.आम्ही सगळे त्या साबरमतीच्या वेड्याचे पिसे [भ्रमिष्ट ]आहोत ,आम्हाला तुम्ही काय सुधाराल?"

स्वतः दादासाहेब मावळणकर गांधी जादुमधून सुटले नाहीत ,त्यांनी सगळे त्यागून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. ते कांग्रेसचे जेष्ठ नेते झाले आणि स्वातंत्र्यानंतर लोकसभेचे पहिले सभापती झाले.

सुभाषचंद्र बोस मट्रीकच्या [H.Sc.] परिक्षेत बोर्डात १९११साली पहिले आले. १९२२ साली ते केंब्रीजमधुन B.A. झाले. ते I.C.S.परीक्षा दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि I.C.S.चा राजिनामा देउन भारतात येउन महात्माजींना चित्तरंजन दास यांच्या बरोबर भेटले आणि स्वतःला राष्ट्रकार्याला वाहुन घेतले. त्यांनतर ते सदैव महात्माजींच्या अंतरवर्तुळात होते,महात्माजींना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषबाबुंनी रेडियो बर्लिनवरुन भाषण करतांना दिली. कांग्रेसने स्वातंत्र्यानंतर जी मिश्र अर्थव्यवस्था राबवली त्याचे जनक नेताजी बोस होते.

मौलाना अबुल कलम आझाद ह्यांचे आजोबा १८५७ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून पळून मक्केला राहिले. तिथे मौलानांनी कुराण,हादिस,शरियत इ.चे शिक्षण घेतले. ते पुश्तु,टर्कीश,अरेबिक,पर्शीयन,उर्दु ,बंगाली,हिंदी आणि इंग्रजी भाषा जाणत होते. ते मौलाना वयाच्या १५व्या वर्षी झाले ,साधारण वयाच्या २५ व्या वर्षी लोक होतात. ते १२ व्या वर्षी कलकत्याला आले तेथे ते बरीच उर्दु मासिके चालवत होते. या काळात त्यांनी इंग्रजीचा शिक्षक ठेवला आणि अरबी,पर्शियन आणि इंग्रजी बायबलचा तौलनिक अभ्यास करुन स्वतःला इंग्रजी शिकविले. आणि त्यांनी स्वतःला पाश्चीमात्य तत्वज्ञान, इतिहास इ. इंग्रजीतून शिकविले. ते गांधीजींना १९१९ साली भेटले आणि सर्वस्वाने त्यांचे झाले. खादी त्यांनी आयुष्यभर वापरली.स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांचा फार मोठा सह्भाग University Grants commission, IIT, IIM, Sahitya Akademy साठी आहे.

या चौघांची उदाहरणे देण्याचे कारण म्हणजे गांधीजींच्या आतल्या वर्तूळातले लोक सगळे उच्चशिक्षीत, हुशार ,अतिशय वाचन केलेले आणि विचार करणारे असे होते बहुतेकांचा देवावर विश्वास नव्हता,बुध्दीवादावर होता.

हे असे लोक गांधिजीच्या विचाराने भारले गेले,सर्व त्यागून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. १९१८ साली गांधीजी त्यांना दारिद्र्य,हालअपेष्टा,तुरुंगवास याशिवाय काही देउ शकत नव्हते. त्यामानाने ६/८ वर्षाच्या लहान मुलांना घेउन आणि त्यांचे विचार लहानपणीच घडवणे हे तर तसे सोपे आहे.

हे सगळे २५ पासुन ४० वर्षाचे अतीशय बुध्दीमान लोक होते, अशा लोकांना प्रभावित करणारा हा महात्मा काय असेल याचा विचार करा.अशा या माणसामध्ये काहीतरी असेलच की, तो हिंदुत्ववादी कल्पनेप्रमाणे मूर्ख तर नसणार.

स्वा. सावरकरांचा एक भक्त म्हणून मला कुठेतरी थोडा हेवा, थोडी असुया जरुर वाटते कारण परदेशी कापडाची होळी करतांना १९०६ मध्ये स्वातंत्र्यवीर सही रस्त्यावर होते,त्यांच्यात तेवढी बुध्दी ,तेवढी क्षमता नक्कीच होती.

जर स्वा.सावरकरानी रस्ता आणि विश्लेषण बरोबर पकडले असते तर १९१० सालीच हे नेतृत्व त्यांच्या नशिबी होते.

एक आठवण देउन हा लेख संपवितो.गांधीजी एकदा रविन्द्र्नाथ टागोरांकडे शांतिनिकेतनात गेले होते ,हे दोघे महापुरुष सकाळी उठून प्रातःकाळचे चालण्यास निघाले. सगळीकडे फुले,झाडे बहरुन आली होती आणि पक्षी चिवचिवत होते.गुरुवर्य टागोरांनी महात्माजींना विचारले

" महात्माजी तुमच्या या सत्याग्रह,कायदा तोडा,झिंदाबाद इत्यादीमध्ये अशी सुंदर सकाळ हे चिवचिवणारे पक्षी आणि त्या पक्षांना बघुन कविता स्फुरणारा माझ्यासारखा कवी याला काही जागा आहे का?"

महात्माजींचे उत्तर होते " कवीवर्य मी चिंता करतो अशा स्वांतत्र्याची की ज्यात या पक्षांना रात्री झोपायच्या आधी पोट्भर खायला मिळेल म्हणजे ते व्यवस्थीत झोपतील आणि सकाळी उठून तुमच्यासारख्या कवीवर्यांसाठी अतीव आनंदाने गातील की तुम्हाला युगप्रवर्तक कविता सुचतील.

पुढच्या लेखात आपण गांधीजीनी कांग्रेस एखाद्या राजकारण्याप्रमाणे साम,दाम,दंड,भेद वापरुन कशी ताब्यात घेतली आणि लोकजागृतीला कशी सुरवात केली,तसेच खिलाफत चळवळ, मोपला बंड, १९२१ चा सत्याग्रह ,चौरीचौरा इ. पाहु.

Thursday, October 1, 2015

कर्म सिद्धांत

कर्म सिद्धांताबद्दल अनेकवेळा बोलले/लिहिले जाते. तथाकथित पुरोगामी विचारवंतांचा तर तो टिंगल करण्याचा विषय झाला आहे. हिंदू धर्माविषयी आस्था असलेल्या लोकांनाही कर्म सिद्धांत नीटसा कळला नसल्याने ते त्याचे लंगडे समर्थन करतात आणि त्यामुळे कर्म सिद्धांत अधिकच हास्यास्पद बनतो. पुरोहितांनी या कर्म सिद्धांताचा वापर चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि उच्च वर्णीय लोकांची महती वाढविण्यासाठी केला.

कर्म सिद्धांताचा उहापोह गीतेत झाला आहे. काही उपनिषदे त्याचा उल्लेख करतात. 'अष्टावक्र गीतेत' कर्मचा स्पष्ट उल्लेख नसला तरी मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. गौतम बुद्धाने या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागाताला जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. परंतु कदाचित त्या काळापर्यंत कर्म सिद्धांताचे पुरोहितांकडून  विकृतीकरण झाले होते. म्हणूनच याला त्याने 'कर्म' नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले. तथागताने 'भवचक्र' ('भव' म्हणजे 'होणे'. 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. गौतमाचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता. ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धाने विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर ही संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

बुद्धाने सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

  1. आपल्या सहा इंद्रियांपैकी कशावर (पाच इंद्रिये आणि मन) बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली ही इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.
  2. ही संवेदना मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवितो.
  3. ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 
  4. यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. हे सुखद तरंग काही काळच टिकतात. परंतु नंतर सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.
  5. हे संस्कार किती खोल आहेत त्यावर हे सुखद/दु:खद तरंग किती प्रमाणात जाणवतात हे अवलंबून असते. या संस्कारांचा प्रभाव शरीरावर क्षणमात्र असतो, परंतु असे संस्कार एकापाठोपाठ जागृत होतात आणि बराच काल ही अवस्था टिकते. 
  6. हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.
  7. हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात. आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.
  8. माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे एका शरीराला (रूप स्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म (भव) मिळतो. याला भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य कसे असेल हे ठरवितो.
विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही आणि तथाकथित पुरोगामी याची खिल्ली उडवू शकतात.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत. पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. हे प्रक्रिया शिकण्यासाठी काही प्रकारच्या ध्यानात देवाचा/ परमेश्वराचा उपयोग केलेला असतो. संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बह्य्मानावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवाल्यावस्थेस/मुक्तावस्थेस पोचतो. जर कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो, म्हणजेच चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. म्हणूनच साधूने/संताने काही केले तरी त्याला पाप/पुण्य लागत नाही असे म्हणतात. ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.

कर्मसंस्कारांचा हा अर्थ ध्यानात घेऊन गीता अथवा उपनिषदे वाचल्यास त्याचा अर्थ उमगतो आणि ती निरर्थक पोपटपंची ठरत नाही.

कर्माचा अर्थ थोड्या शब्दात सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता. मला कल्पना आहे की यातून जिज्ञासूंना अनेक नवे प्रश्न निर्माण होतील. हे प्रश्न येथे मांडल्यास मी माझ्या परीने समाधान करण्याचा प्रयत्न करेन. मात्र माझ्या काही तथाकथित पुरोगामी मित्राना जिज्ञासेपेक्षा भिन्नविचारी व्यक्तीना मूर्ख ठरविण्याची सवय आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही.

कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करा हे मात्र मी आवर्जून सांगेन.