Sunday, May 31, 2020

पराभवाचे श्राद्ध १-- लेखक जयंत कुलकर्णी

फेसबुकवरून साभार : लेखक जयंत कुलकर्णी 

नमस्कार!

आज एक नवीन लेखमालिका सुरु करतोय. ‘‘पराभवाचे श्राद्ध‘‘

चिनने जे भारतावर आक्रमण केले त्याची ही कहाणी. नवीन पिढीला हे सांगणे आपले काम आहे. आपली नाचक्की झाली असली तरी कोणी तरी हे सांगायलाच हवे. आता परिस्थिती बदलली आहे आणि भारताने या आक्रमणापासून बरेच धडे घेतले आहेत. पण योग्य राजकारणी जर सत्तेवर नसले तर काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. यात वादाचे मुद्दे बरेच आहेत पण जर या लेखात काही खोटे लिहिले असेल तरच वाद होऊ शकतो नाही तर यातून शिकण्यासारखेच खूप आहे. असो..

हे याच महिन्यात लिहीले पाहिजे.

हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सेन्याधिकाऱ्याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी हिमालयन ब्लंडर वाचलेले आहे. अर्थातच मला तेव्हा गप्प बसवण्यात आले. ते योग्यच होते. कारण प्रश्र्न वयाच्या दृष्टीने जरा आगाऊपणाचाच होता. पण मित्रांनो जेव्हा असा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही मात्र गप्प बसू नका.

पराभवाचे श्राद्ध!

भारताच्या सैनिकी इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाला या महिन्यात ५८ वर्षे पूर्ण होतील. हा पराभव कसा साजरा करायचा हे मला समजत नव्हते. शेवटी ही लेखमालिका लिहावी असे ठरवले.

या घटनेची आठवण म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांच्या “हिमालयन ब्लंडर” या पुस्तकातील काही पानांचे स्वैर भाषांतर आपल्यासमोर ठेवत आहे... ते “कडू” मानून घ्यावे. पण यात राजकीय प्रवास जास्त आहे. प्रत्यक्ष लढाई कशी झाली हे वाचायचे असेल तर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.

( लेखाची भाषा माझी आहे )

No photo description available.छायाचित्र -१

पहाटे ५ वाजता नेफामधील शांत नामका चू खोऱ्याला तोफांच्या आवाजाने जाग आली. काय होत आहे हे कोणालाच कळेना. चिनी तोफखाना धडाडला आणि मागोमाग चिनी पायदळाने आक्रमण केले. तीन तासातच त्या खोऱ्यातील लढाई संपली. संपणारच होती ती, कारण ती लढाई होती दोन अतुल्यबळ सैन्यामधली. आसामला जाणारे सर्व रस्ते आता त्यांना मोकळेच होते. या पहिल्या दणक्याचा फायदा चिन्यांनी उठवला नसता तर नवलच. त्यांनी सरळ १६० मैल भारताच्या भूमीवर मुसंडी मारली आणि २० नोव्हेंबरला ब्रह्म्पूत्रेच्या खोऱ्यात आक्रमण केले. सेला आणि बोमडिलाच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत त्यांनी काहीही विरोध न होता तवांगवर कब्जा केला. भारताचे याला उत्तर फारच केविलवाणे होते. त्या उंचीवर युद्धाचे प्रशिक्षण नसलेले, त्या उंचीवर लागणारी युद्धसामग्री नसलेले, त्या हवामानाची सवय नसलेले आणि दूर १६०० मैलावर असलेले पंजाबमधील सैन्य घाइघाईने जमा करण्यात आले आणि त्यांना राजकारण्यांनी मोठ्या आवेशाने ‘चिन्यांना सिमेबाहेर फेकून द्या’ असे आदेश दिले. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे सगळे सैन्य चिनी सैन्याच्या नरड्यात अलगद सोडून दिले असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्व हालचालीत ना ठाम योजना होती ना खोलवर संरक्षणाची तयारी होती. या चिन्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो आपल्या राजकारण्यांना नाही, तर चिन्यांना. त्यांनी मारे मोठ्या युद्धाची तयारी ठवली होती. ३०,००० ते ५०,००० सैनिक या युद्धासाठी त्यांनी सिमेलगत तयार ठेवले होते. पूर्वचाचणी म्हणून चिन्यांनी ८ स्प्टेंबरला थागला भागात घुसखोरी करून आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतली होती. अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या राजकारण्यांनी सिमेवरच्या नेहमीच्या किरकोळ चकमकी म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले होते.

No photo description available.छायाचित्र २
No photo description available.छायाचित्र ३

या नेफामधील पराभवाने भारतातील जनता खडबडून जागी झाली. सत्ताधाऱ्यांना आणि संरक्षणदलाला हादरे बसले पण सगळ्यात नुकसान झाले ते भारतीय जनतेचे. जनता पराभूत मनोवृत्तीच्या गर्गेत कोसळली. त्यांचा त्यांच्या पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला. यातून बाहेर पडायला पूढे दोन युद्धे जावी लागली. (पण राजकारणाच्या दृष्टीकोनातून जनता काही शिकली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल)

या चिनी आक्रमणाच्या अगोदर आपल्या सत्ताधाऱ्यांची ठाम कल्पना होती की चीनबरोबर युद्ध होणारच नाही. (अपवाद फक्त सरदार पटेलांचा. त्यांनी पं. नेहरूंना १९५० मधे पत्र लिहून याची स्पष्ट कल्पना दिली होती व चीनला युनोमधे सिक्युरीटी कौन्सीलमधे प्रवेश देण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का याचा फेरविचार करायला सुचवले होते. हे पत्र आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ब्रि. दळवींच्या पुस्तकातही दिले आहे.) हिंदी-चीनी भाई भाई चा नारा जगप्रसिद्ध होता आणि जे काही किरकोळ मतभेद होते ते टिबेटच्या निर्जन भागाच्या ताब्याबद्दल होते. (ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही त्याबद्दल फार विचार करायची आपली तयारी नव्हती) या किरकोळ मतभेदांमुळे सिमेवर काही चकमकी उडतील पण सर्वंकश युद्ध ? छे ! ते शक्यच नव्हते. असा गोड समज आपला झाला होता.

या आक्रमणाने भारताला धक्का बसला आणि त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. (अर्थात आता असे म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण आपण आता या धक्क्यातून पूर्ण सावरलेलो आहोत आणि धक्का देण्याची ताकद ठेऊन आहोत) हा धक्का राजकीय पातळीवर, युद्धनितीच्या पातळीवर, आंतरराष्टीय राजकारणाच्या पतळीवरही तेवढाच जबरी होता. हिमालयाच्या या दुर्गम भागात, त्या थंडीत, आणि उंचीवर आपली ना युद्धाची तयारी होती. ना आमची मानसिक तयारी होती ना शारीरिक. गाफीलपणाची ही हद्द होती. आमची हिमालयात युद्ध लढण्याची तयारीच नव्हती. या आक्रमणाला आमचे उत्तर गोंधळाचे व भावनीक होते.

तेव्हाचे आपले राष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले “ आम्ही (आपले पंतप्रधान, राजदूत, मंत्री इ.) दुधखूळे आहोत आणि निष्काळजी राहीलो हेच खरे”........ भारताच्या सर्वोच्चस्थानावर बसलेल्या या माणसाची ही कबूली सगळे काही सांगून जाते.

आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान पं नेहरू यांनी या आक्रमणाचे विश्लेषण “चीनने आमच्या पाठीत सुरा खूपसला” असे केले. पण शत्रूच्या समोर आपली पाठ करायची नसते हे ते सोयीस्कररित्या विसरले होते. आपल्या आकाशवाणीवरच्या भाषणात ते म्हणाले,

“ मला सांगायला दु:ख होते आहे की आमच्या सैन्याला सिमेवर माघार घ्यावी लागली आहे. चीनी सैन्याची प्रचंड संख्या, तोफखाना, आणि चिनी सैन्याने बरोबर आणलेली अवजड युद्ध सामग्री याच्यापुढे त्यांनी टिकाव धरला नाही.”

ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय.......

त्या वेळचे संरक्षणमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले,

“चीनी सैन्य हे आपल्या सैन्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. संख्याबल आणि दारूगोळा यात आपल्यापेक्षा ते फारच सरस होते. आमच्या जुनाट शस्त्रे व कमी संख्या असलेल्या सैन्यदलाला त्यांनी सहज हरवले”.

आपल्या देशाचे संरक्षण व संरक्षणदल ही या माणसाची जबाबदारी होती.

या पराभवाचे खरे कारण हे होते की सत्ताधाऱ्यांना चीनशी युद्ध करावे लागेल असे स्वप्नातही आले नव्हते. या स्वप्नरंजनातच या पराभवाची कारणे दडलेली आहेत...

क्रमश:.....
जयंत कुलकर्णी.

सप्तचिरंजीव प्रस्तावना लेखक : अभिजित खेडकर

अभिजित खेडकर यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार 

भारतीय प्राचीन इतिहासातल्या अनेक गूढ संकल्पना आणि गोष्टींच गूढ आजही हजारो वर्षांनंतर तसच कायम आहे. पुराणांमध्ये वर्णन केलेले दशावतार, त्यातही अजून न झालेला आणि हे कलियुग संपवणारा कल्की अवतार, समुद्र मंथनातून देवांनी प्राप्त केलेलं आणि दानवांना अप्राप्य झालेलं अमृत, त्याच तोडीची विलक्षण संजीवनी आणि सोमवल्ली वनस्पती, आणि जगातल्या कुठल्याही अन्य प्राचीन संस्कृतीत नसलेले, मृत्यू वर विजय मिळवून अमरत्वाच वरदान मिळालेले सप्त चिरंजीव...

‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।’

या श्लोकात वर्णन केल्यानुसार अश्वत्थामा, बळीराजा, व्यास महर्षी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सात चिरंजीव आहेत. खरंतर, आपण सगळ्यांनी या सप्त चिरंजीवांबद्दल लहानपणा पासून ऐकलय, वाचलय. तरीही यांच्या बद्दलचे अनेक प्रश्न जे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी न कधी तरी रुंजी घालून गेले असतील जसे, ह्या चिरंजीवांचं अस्तित्व नेमकं कशासाठी आहे? चिरंजीव सातच का? खरच, कुणाला असं अमर होता येतं का? यांना असा चिरंजीवी होण्याचं वरदान म्हणा, शाप म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा नेमका कुणी दिला? आणि जर हे चिरंजीव खरंच अस्तिवात असलेच तर आत्ता या काळात नेमके कुठे असतील, काय करत असतील?

ह्या सातही व्यक्ती एका काळातल्याही नाहीत. अश्वत्थामा, व्यास, कृपाचार्य हे महाभारत काळातले, बिभीषण आणि हनुमान रामायण काळातले, परशुराम रामायण पूर्व काळातले रामांच्या आधीचे अवतार आणि बळी तर वामन अवतारातला. बिभीषण आणि बळी तर चक्क असुर कुळातले, तरीही त्यांना हे वरदान मिळालं. परशुराम हे एकाचवेळी अवतारही होते आणि चिरंजीवीही. अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्वाचा श्राप देणारे कृष्ण हे अवतार असून त्यांना मात्र मृत्यू आहे. अश्वत्थामा सोडून उर्वरित सहा जणांना चिरंजीवीत्व हे वरदान आहे, अश्वत्थाम्याला मात्र त्याने केलेल्या अक्षम्य पातकाचा परिणाम म्हणून मिळालेल्या मस्तकावरच्या सतत भळभळत्या जखमेमुळे हा श्राप आहे. परशुराम सोडले तर बाकीचे सगळे चिरंजीव त्या त्या काळातल्या कथेतले मुख्य नायकही नाहीत, काही जण तर बळी आणि अश्वत्थाम्या सारखे चक्क खलनायक हीआहेत.

या सगळ्यांना फक्त चिरंजीवीत्वाचं वरदान आहे, चिरतारुण्याचं नाही. मग प्रश्न उरतो कि असं गलितगात्र शरीर घेऊन वर्षानुवर्ष जिवंत रहाण्याचं नेमकं औचित्य तरी काय असेल, आणि उद्देश तरी काय असेल. कल्की पुराणात याचा उल्लेख सापडतो, कि जेव्हा कल्की अवतार होतो तेव्हा कल्की ला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व चिरंजीव शम्भल ग्रामी येतात. असेही म्हंटले जाते कि या सातही जणांचा उद्देश कल्की अवताराला सहाय्य करणे, आणि कलियुगाचा अंत करून पुन्हा सत्युगाची स्थापना करणे असा आहे. या सगळ्याचं चिरंजीवीत्व हे अनादी काळापर्यंत नाही तर कलियुगाच्या अंतापर्यंत आहे, त्या नंतर त्यांच्या अस्तित्वाच प्रयोजन संपेल.

या पुढच्या सात भागात आपण एकेक चिरंजीवाची चर्चा करणार आहोत. त्या प्रत्येकाचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, पण त्यांच्या बद्दल असलेल्या वेगवेगळ्या किवंदती, आख्यायिका, भारतात आणि भारताबाहेरही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले देणारे स्थान, घटना आणि कथांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

मी हि लेखमाला लिहितोय याचा अर्थ मला सगळ्याच गोष्टी परिपूर्णपणे माहिती आहेत असं अजिबात नाही, पण आपल्या सगळ्यांना या विषयात माहिती असलेल्या अनेक गोष्टी, संदर्भ कॉमेंट आणि लिंक च्या स्वरुपात नक्की पाठवा, कारण त्या जाणून घ्यायची माझीही खूप मनापासून इच्छा आहे. प्रत्येक शनिवारी या लेखमालेतला एक एक भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.

आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आणि शुभेच्छांच्या अपेक्षेत...
आपला,

©अभिजीत खेडकर.

सप्तचिरंजीव १ महाबली लेखक : अभिजित खेडकर

#सप्त_चिरंजीव_१_महाबली लेखक अभिजित खेडकर ((फेसबुक पोस्टवरून)

सप्त चिरंजीवांच्या श्लोकात उल्लेख आल्याप्रमाणे प्रथम नाव अश्वथाम्याचं येतं, परंतू जन्म कालक्रमानुसार पुराणकाळातील बळी किंवा महाबली याचा या यादीत पहिला क्रमांक लागतो.

Image may contain: 2 peopleबळी हा विष्णुभक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा मुलगा. दक्ष प्रजापतीच्या दोन कन्या दिती आणि आदिती यांचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. दिती पासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन पुत्र झाले, त्यांच्या वंशाला दैत्य (दितीपासून झालेले) असे संबोधले गेले, तर आदिती चा पुत्र इंद्र उत्पन्न झाला, त्याच्या वंशाला देव संबोधले गेले. नृसिहांनी हिरण्यकश्यपू चा वध केल्यावर त्याचा पुत्र प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला. प्रल्हादाचा पुत्र विरोचन याला बळी हा पुत्र झाला.

देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या परस्पर विरोधी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणून देव आणि असुर यांच्यात झालेल्या देवासुर संग्रामात अनेक वेळा दैत्यांना पराभव पत्करावा लागला. समुद्र मन्थनातून निघालेल्या अनेक शक्तींच्या सहाय्याने इंद्राने बळीचा वध केला. देव अमृत मिळवून अमर झाले, पण शुक्राचार्यांनी आपल्या मंत्रबलाच्या सामर्थ्याने बळी ला पुन्हा जिवंत केले. बळीने ब्रम्हांची तपश्चर्या करून स्वतःला अधिक सामर्थ्यशाली बनवले. गुरु शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार त्याने शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण करायचा संकल्प सोडून तिन्ही लोकांवर, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावर आपले राज्य स्थापित केले.

आपल्या सामर्थ्याच्या बळावर नव्याण्णव अश्वमेध यज्ञ पूर्ण करून शेवटच्या शंभराव्या यज्ञाची तयारी करीत असतांना विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याच्याकडून तीन पद भूमी दान मागितली. शंभराव्या यज्ञपूर्ती नंतर खरंतर त्याचं त्रैलोक्याचं राज्य अखंड काळापर्यंत अबाधित राहीलं असतं. परंतू दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवायचं नाही या भूमिकेमुळे म्हणा किंवा माझ्या दारी प्रत्यक्ष विष्णूला याचक म्हणून यावं लागलं या अहंकारामुळे म्हणा, त्याने शुक्राचार्यांच्या विरोधाकडे साफ दुर्लक्ष करून वामनाची मागणी पूर्ण केली. एका पदात स्वर्ग, दुसऱ्यात पृथ्वीचं राज्य देवांसाठी दान देऊन, तिसरं पाउल ठेवायला जागाच उरली नाही म्हणून स्वतःच्या मस्तकावर पाउल ठेऊन घेत स्वतः पाताळाचं राज्य स्वीकारलं. विष्णूंनी त्याच्या भक्तीवर आणि दानीवृत्तीवर प्रसन्न होऊन त्याला चिरंजीवित्वाचं वरदान दिलं आणि त्याच्या विनंती नुसार स्वतः त्याच्या पातालसाम्राज्याचे रक्षक म्हणून बळी चे द्वारपाल ही भूमिका स्वीकारली. हि कथा आपणा सर्वांनी लहानपणापासून ऐकलीये, वाचलीये.

No photo description available.या बळी चे म्हणजेच महाबली चे राज्य पूर्वे पासून पूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेले होते. दक्षिण भारतात त्याला महाबली चा अपभ्रंश म्हणून मावेली असेही संबोधिले जाते. दरवर्षी केरळ मध्ये ओणम हा उत्सव याच महाबलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आपलं पाताळाचं राज्य सोडून महाबली आपल्या या प्रजेला दर्शन देण्यासाठी ओणम च्या वेळी खास केरळ मध्ये येतो अशी वदंता आहे. बळीला त्याची पत्नी वेदवल्ली हिच्या पासून सहा पुत्र होते, ज्यांच्या सहित तो या प्रदेशावर राज्य करत होता. त्यांची नावे अंग, वंग, कलिंग, सुम्ह, पौंड्र आणि आंध्र. यांच्याच नावाने पुढे त्यांची राज्ये बंगाल पासून ते आंध्रप्रदेशा पर्यंत वसवली गेली. यांच्या सोबतच बाणासुर नावाचाही एक पुत्र बळी ला होता असेही मानतात. या बाणासुराने आपल्या पित्याचा अपमान सहन न होऊन वामनाला विरोध केला, तेव्हा वामनाच्या रुपात असलेल्या विष्णूंनी त्याला पुढच्या मन्वंतरात पुढचा इंद्र हा बळी हाच असेल असेही वचन दिले.

No photo description available.महाबली हा स्वतः एक उत्कृष्ट कवीही होता. त्याने श्री विष्णूच्या स्तुतीपर लिहिलेले "हरीनाम माला स्तोत्र" हे अजूनही सुपरिचित आहे. पंडित जसराज यांनी गायलेले "ओम नमो नारायणा" हे सुप्रसिध्द भजन याच स्तोत्रातील आहे.

वामनाने जेव्हा बळी ला पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली तेव्हा तो त्याच्या जहाजात बसून दक्षिणपूर्व आशिया च्या बेटांना भेट देत ऑस्ट्रेलिया मार्गे पाताळात अर्थात दक्षिण अमेरिकेत पोहचला आणि तेथे पोहोचून त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. या मार्गाचे वर्णन वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडात वाचायला मिळते. जेव्हा सुग्रीव सीतेला शोधण्यासाठी जे वानर सैन्य पाठवतो त्यात त्यांना तो या मार्गाचे सविस्तर वर्णन सांगतो. या वर्णनात पेरू देशातील अँडीज पर्वतावरचा हजारो फुट कोरलेला त्रिशुळाच्या आकाराचा तालवृक्ष, न्यूझीलंड मधील सुदर्शन नावाने वर्णन केलेला अतिशय रम्य असा पुकाकी तलाव, पॅसिफिक महासागरातल्या उकळत्या ज्वालामुखींच म्हणजेच रिंग ऑफ फायर च वर्णन अगदी तंतोतंत मिळत.

दक्षिण अमेरिकेतल्या अतिशय प्राचीन माया संस्कृतीचा मुळ पुरुष मयासुराने बळी साठी तेथे नवीन वसाहत वसवली. बळीचा राजमहाल हा तीन पुरांचा म्हणजेच तीन मोठ्या महालांचा बांधला, त्या मुळे त्याला त्रिभूवनांक म्हणजे तीन भुवनांचा स्वामी संबोधलं गेलं. तोच भाग आजही बोल्विया प्रांतात तियाहुनान्को (Tiahuanaco किंवा Tiwanaku ) या नावाने प्रसिध्द आहे. बळीने वेगवेळी सात नवी नगरे तेथील प्रजेसाठी वसवली त्याला नवतल (नवीन नगर) हे नाव रूढ झालं असं मानलं जात.

याच पेरू देशात वसणारी इंका हि अतिशय प्राचीन संस्कृती. त्या संस्कृती चा उद्गाता मानला जाणाऱ्या विराकोचा (Viracocha) ह्याची मूर्ती याच तीयाहुनान्को भागात कालासासाया (Temple of Kalasasaya) या मुक्त आकाशाखाली असलेल्या मंदिरात बघायला मिळते. इंका च्या प्राचीन साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे विराकोचा हा पॅसिफीक समुद्र ओलांडून लांब नौकांमधून हजारो वर्षांपूर्वी पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने त्या ठिकाणी मातीपासून प्रजेची निर्मिती केली. त्या प्रजेला कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान ह्या सारख्या अनेक गोष्टीत पारंगत बनवलं, एक प्रगल्भ संस्कृती उभी केली आणि काही कालावाधी नंतर पुन्हा कधीही परत न येण्यासाठी समुद्रावर चालत, ज्या दिशेकडून आला होता, त्याच दिशेने निघून गेला, अशी आख्यायिका त्याच्या बद्दल सांगितली जाते. या विराकोचाने आकाश (Hanan pacha), आंतरिक पृथ्वी अर्थात पाताळ (Uku pacha) आणि बाह्य पृथ्वी (Cay pacha) यावर प्रभुत्व मिळवलं होतं अस इन्काज मानतात.

ह्या विराकोचाचं बरचसं वर्णन महाबलीच्या कथेशी मिळतं-जुळतं आहे आणि विराकोचा हे नावही महाबली च्या पित्याशी म्हणजेच विरोचनाशी साधर्म्य दाखवणारं आहे. विराकोचा ज्या लांब बोटीतून पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर पोहचला, तश्याच लांब बोटीतून आजही ओणम च्या सणाच्या वेळी केरळ मध्ये नौकानयनाची स्पर्धा हजारो वर्षांपासून आयोजित केली जात असते. अर्नामली भागात पंपा नदीत होणारी हि स्पर्धा ओणम च्या परंपरेचा एक खास भाग आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणात म्हटल्या प्रमाणे पाश्चात्य जनता हि विरोचानाची वंशज आहे हे वाक्यही या साधर्म्याला पुष्टी देतं. (Source: Talks with Vivekananda: Publisher- Advaita Ashram, Mayavati, Himalayas, January 1939.)

अर्थात या सगळ्या महाबली बद्दलच्या आख्यायिका असल्या तरी आधुनिक काळात कुणालाही महाबलीचं दर्शन झाल्याचा उल्लेख मात्र अजिबात सापडत नाही. "इडा पिडा टळो, बळीचे राज्य पुन्हा येवो" या जनभावनेच्या इच्छेतून, दिवाळीतल्या बलीप्रतिपदेच्या पूजनातून आणि ओणमच्या सणातून महाबली अजूनही आपल चिरंजीवित्व राखून आहे, हे तितकच खरं.

©अभिजीत खेडकर.
9420602780.

माहिती संदर्भ - गुगल, विकिपीडिया,
फोटो सौजन्य - गुगल.


सप्त चिरंजीव प्रस्तावना लिंक -
https://www.facebook.com/ekalabhi/posts/3028702153894310

Saturday, May 16, 2020

पंचांग - महिने

आपले पंचांग अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविले गेले आहे. ग्रेगेरीयान महिन्यांप्रमाणे आपले महिने हे कसेही (२८-२९-३०-३१ दिवसांचे) नसून त्याचा चंद्राच्या कलांशी म्हणजेच निसर्गाशी मेळ घातला आहे. पूर्वीच्या काळी रात्रीच्या अंधारात आकाश स्पष्ट दिसत असे. आपल्या पूर्वजांनी आकाशातील तारे सर्वसाधारणपणे स्थिर असतात तर ग्रह जागा बदलतात हे निरीक्षण केले होते. त्यांनी चंद्राच्या कलेवरून चांद्रमास ठरविले. परंतु चांद्रमास आणि ऋतू यांचे गणित बसविण्यासाठी वर्षाची सूर्याच्या गतिशी सांगड घालणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी वर्षाचे महिने ठरविताना सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सूर्योदयाला कोणत्या राशीत आहे याची सांगड घातली. आकाशातील ताराकासमुहाचे अंदाजे सारखे बारा भाग पाडून (राशी) त्यातून दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावे दिली. सूर्य नव्या महिन्यात कोणत्या राशीत उगवतो याचे निरीक्षण केले आणि त्यावरून महिन्यांची नावे दिली. सूर्य कधी कधी लागोपाठ दोन महिने एकाच राशीत उगवतो. म्हणजेच हे दोन्ही महिने त्यामुळे एकाच नावाने ओळखले जातात. यातील पहिला महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. या पद्धतीने चांद्रमासाची सूर्यमासाबरोबर सांगड घातली गेली आणि आपले महिने आणि ऋतू यांचा मेळ बसला. मुस्लीम कॅलेंडरमध्ये असे न केल्याने त्यांचे महिने आणि ऋतू यांचा मेळ बसत नाही. चीनी पद्धतीत अशीच काही युक्ती करून चांद्रमास आणि सुर्यमास यांचा मेळ घातला आहे. तेथेही अधिक महिना असतो.
काही राशी थोडी लांब पसरलेल्या आहेत तर काही लहान जागेत सामावली गेली आहेत. जी थोडी लांब आहेत त्यामध्येच अधिक महिना येऊ शकतो. चैत्र ते अश्विन या मासातच अधिक मास येऊ शकतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो.
क्वचित सूर्य एका महिन्यात दोन राशी पुढे सरकतो. यावेळी एखादा महिना येताच नाही म्हणजेच क्षय मास येतो. क्षयमास आकाराने लहान राशी असलेल्या महिन्यातच, म्हणजे मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यातच येतो.अलीकडच्या काळात इ.स.१९८३मधला माघ महिना हा क्षयमास होता. या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.

Friday, May 8, 2020

महाभारताच्या युद्धातील १८ दिवस


Ref रोहित चंद्रशेखर पाराशरे यांची Facebook पोस्ट 

असे मानले जाते की महाभारताचा युद्धात एकमेव जीवंत राहिलेला कौरव युयुत्सु होता आणि २४,१६५ कौरव सैनिक बेपत्ता झाले होते. लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले जे महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते.
संशोधनानुसार जेव्हा महाभारताचे युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णाचे वय ८३ वर्षांचे होते. महाभारताच्या युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांनी देहत्याग केला होता. याचा अर्थ ११९ वर्षांच्या वयात त्यांनी देहत्याग केला होता. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. ज्योतिषीय माहितीनुसार कलियुगाचा आरंभ शक संवत च्या पूर्वी ३१७६ वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला होता. आत्ता शके १९३६ आहे. यावरून कालीयुदाची सुरुवात होऊन ५११२ वर्ष झाली.
कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, जे १८ दिवस चालले होते. चला पाहूयात महाभारताच्या युद्धाच्या या १८ दिवसांच्या रोचक घटनाक्रम..

स्थान

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर ठोकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ ठोकला.
दोन्ही शिबिरात सैनिकांचे भोजन आणि जखमी सैनिकांच्या इलाजाची उत्तव व्यवस्था करण्यात आली होती. हत्ती, घोडे आणि रथांची वेगळी व्यवस्था होती. हजारो शिबिरांपैकी प्रत्येक शिबिरात मुबलक प्रमाणात खाद्य सामग्री, अस्त्र-शस्त्र, यंत्र आणि अनेक वैद्य आणि शिल्पी वेतन देऊन ठेवण्यात आले होते.

दोन्ही सैन्यात युद्धासाठी ५ योजने ४० किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता.

कौरवांचे सहयोगी प्रांत होते – गांधार, मद्र, सिन्ध, काम्बोज, कलिंग, सिंहल, दरद, अभीषह, मागध, पिशाच, कोसल, प्रतीच्य, बाह्लिक, उदीच्य, अंश, पल्लव, सौराष्ट्र, अवन्ति, निषाद, शूरसेन, शिबि, वसति, पौरव, तुषार, चूचुपदेश, अशवक, पाण्डय, पुलिन्द, पारद, क्षुद्रक, प्राग्ज्योतिषपुर, मेकल, कुरुविन्द, त्रिपुरा, शल, अम्बष्ठ, कैतव, यवन, त्रिगर्त, सौविर आणि प्राच्य.

कौरवांकडून हे योद्धे लढले होते – भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, मद्रनरेश शल्य, भूरिश्र्वा, अलम्बुष, कृतवर्मा, कलिंगराज, श्रुतायुध, शकुनि, भगदत्त, जयद्रथ, विन्द-अनुविन्द, काम्बोजराज, सुदक्षिण, बृहद्वल, दुर्योधन आणि त्याच्या ९९ भावांसहित अन्य हजारो योद्धे.

पांडवांचे सहयोगी प्रांत होते – पांचाल, चेदि, काशी, करुष, मत्स्य, केकय, सृंजय, दक्षार्ण, सोमक, कुन्ति, आनप्त, दाशेरक, प्रभद्रक, अनूपक, किरात, पटच्चर, तित्तिर, चोल, पाण्ड्य, अग्निवेश्य, हुण्ड, दानभारि, शबर, उद्भस, वत्स, पौण्ड्र, पिशाच, पुण्ड्र, कुण्डीविष, मारुत, धेनुक, तगंण आणि परतगंण.

पांडवांकडून हे योद्धे लढले होते – भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, युधिष्टर, द्रौपदीचे पाचही पुत्र, सात्यकि, उत्तमौजा, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, पाण्ड्यराज, घटोत्कच, शिखण्डी, युयुत्सु, कुन्तिभोज, उत्तमौजा, शैब्य आणि अनूपराज नील.

तटस्थ प्रांत – विदर्भ, शाल्व, चीन, लौहित्य, शोणित, नेपा, कोकण, कर्नाटक, केरळ, आन्ध्र, द्रविड इत्यादींनी या युद्धात भाग घेतला नव्हता.

नियम:

पितामह भीष्मांच्या सल्ल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र होऊन युद्धाचे काही नियम बनवले.
१. प्रत्येक दिवशी युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. सूर्यास्तानंतर युद्ध होणार नाही.
२. युद्ध समाप्त झाल्यानंतर छल – कपट विसरून सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतील.
३. रथवाला रथवाल्याशी, हत्तीवाला हत्तीवाल्याशी आणि पायदळ पायदळाशीच युद्ध करेल.
४. एका वीरासोबत एकच वीर युद्ध करेल.
५. भीतीने पळून जाणाऱ्या किंवा शरण आलेल्या लोकांवर अस्त्र-शस्त्राचा प्रहर केला जाणार नाही.
६. जो वीर निःशस्त्र होईल त्याच्यावर कोणतेही शस्त्र उचलले जाणार नाही.
७. युद्धामध्ये सेवकांचे काम करणाऱ्यांवर कोणीही शस्त्र चालवणार नाही.

पहिल्या दिवसाचे युद्ध

प्रथम दिवशी जेव्हा कृष्ण आणि अर्जुन आपल्या रथासोबत दोन्हीकडच्या सैन्याच्या मधोमध उभे होते आणि कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होता, त्याच दरम्यान भीष्म पितामहांनी देखील सर्व योद्ध्यांना सांगितले की आता युद्ध सुरु होणार आहे. या वेळी ज्या कोणा योद्ध्याला आपली भूमिका बदलायची आहे तो या निर्णयासाठी स्वतंत्र आहे की त्याने कोणाच्या बाजूने युद्ध लढावे. या घोषणेनंतर धृतराष्ट्राचा पुत्र युयुत्सु डंका वाजवत कौरवांचे दल सोडून पांडवांच्या पक्षात निघून गेला. कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवून युद्धाची घोषणा केली.
या दिवशी १०,००० सैनिकांचा मृत्यू झाला. भीमाने दुःशासनावर आक्रमण केले. अभिमन्यूने भीष्मांचे धनुष्य आणि रथाचा ध्वजदंड तोडून टाकले. पहिल्या दिवसाअखेर पांडव पक्षाला भारी नुकसानीला सामोरे जावे लागले. विराट नरेशाचे पुत्र उत्तर आणि श्वेत हे शल्य आणि भीष्म यांच्याकडून मारले गेले. भीष्मांनी त्यांच्या कित्येक सैनिकांचा वध केला.
कोण मजबूत राहिले : पहिल्या दिवशी पांडव पक्षाला नुकसान जास्त झाले आणि कौरव पक्ष मजबूत राहिला.

दुसऱ्या दिवसाचे युद्ध

कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन आणि भीष्म, द्रोणाचार्य आणि धृष्टद्युम्न यांच्यात युद्ध झाले. सात्यकीने भीष्मांच्या सारथ्याला जखमी केले. द्रोणाचार्यांनी धृष्टद्युम्नला अनेक वेळा हरवले अन त्याचे अनेक धनुष्य तोडले. भीष्मांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाला अनेक वेळा जखमी केले. या दिवशी भीमाचे कलिंग आणि निषाद यांच्याशी युद्ध झाले आणि भीमाने हजारो कलिंग आणि निषाद मारून टाकले. अर्जुनाने देखील भीष्मांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले होते. कौरवांच्या बाजूने लढणारे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले : दुसऱ्या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.

तिसरा दिवस:

Image may contain: text that says 'अर्धचंद्र व्यूह इस व्यूह को के तीसरे दिन ने कौरवों के व्यूह के प्रत्युत्तर में बनाया था'कौरवांनी गरुड आणि पांडवांनी अर्धचंद्राकार अशी व्यूहरचना केली होती. कौरवांकडून दुर्योधन आणि पांडवांकडून भीम आणि अर्जुन सुरक्षा करत होते. या दिवशी भीमाने घटोत्कचासोबत मिळून दुर्योधनाच्या सेनेला युद्धातून पळवून लावले. हे पाहून भीष्मांनी भीषण संहार करायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने अर्जुनाला भीष्मांचा वध करण्यास सांगितले, परंतु अर्जुन उत्साहाने लढू शकत नव्हता, ज्यामुळे श्रीकृष्ण स्वतः भीष्मांना मारण्यास उद्युक्त झाला, परंतु अर्जुनाने त्याला प्रतिज्ञारूपी आश्वासन देऊन कौरव सेनेचा भीषण संहार केला. त्याने एका दिवसातच प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव क्षत्रिय गणांना मारून टाकले.
भीमाच्या बाणाने दुर्योधन बेशुद्ध झला आणि त्याचवेळी त्याच्या सारथ्याने रथ तिथून पळवून नेला. भीमाने शेकडो सैनिकांचा खात्मा केला. या दिवशी देखील कौरावांनाच जास्त नुकसान सोसावे लागले. अनेक प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले
: या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

चौथा दिवस:

चौथ्या दिवशी देखील कौरव पक्षाला भारी नुकसान सोसावे लागले. या दिवशी कौरवांनी अर्जुनाला आपल्या बाणांनी झाकून टाकले, परंतु अर्जुनाने सर्वांना मारून पळवून लावले. भीमाने तर या दिवशी कौरव सेनेत अक्षरशः हाहाःकार माजवला, दुर्योधनाने आपली गजसेना भीमाला मारण्यासाठी पाठवली, परंतु घटोत्कचाच्या सहाय्याने भीमाने त्या सर्वांचा नाश केला आणि १४ कौरव देखील मारले, परंतु राजा भगदत्तने लवकरच भीमावर नियंत्रण मिळवले. नंतर भीष्मांना देखील अर्जुन आणि भीमाने भयंकर युद्ध करून कडवी झुंज दिली.
कोण मजबूत राहिले : या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.

पाचवा दिवस:

श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि मग भयंकर कापाकापी सुरु झाली. दोनही पक्षाच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वध झाला. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेला आपल्या बाणांनी झाकून टाकले. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आधी अर्जुन आणि मग भीमाने त्यांच्याशी भयंकर युद्ध केले.
सात्यकीने द्रोणाचार्यांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले. भीष्मांनी सात्यकीला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. सात्यकीचे १० पुत्र मारले गेले.

कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

सहावा दिवस:

कौरवांकडून क्रोंचव्यूह तर पांडवांकडून मकरव्यूह आकाराची सेना कुरुक्षेत्रात उतरली. भयंकर युद्धानंतर द्रोणाचार्यांचा सारथी मारला गेला. युद्धात वारंवार होणाऱ्या पराभवामुळे दुर्योधन भडकून जात होता, परंतु भीष्म त्याचे धाडस वाढवत राहिले. शेवटी भीष्मांनी पांचाल सेनेचा भीषण संहार केला.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

सातवा दिवस:

सातव्या दिवशी कौरवांनी मंडलाकार व्यूहरचना केली आणि पांडवांनी वज्र व्यूहाच्या आकृतीत सेना उतरवली. मंडलाकार व्युहात एका हत्तीच्या जवळ सात रथ, एका रथाच्या रक्षणासाठी ७ अश्वरोहक, एका अश्वरोहीच्या रक्षणासाठी ७ धनुर्धर आणि एका धनुर्धाराच्या रक्षणासाठी १० सैनिक लावण्यात आले होते. सेनेच्या मध्यभागी दुर्योधन होता. वज्राकारात दाही मोर्चांवर घमासान युद्ध झाले.
या दिवशीने अर्जुनाने आपल्या युक्तीने कौरव सेनेत पळापळ माजवली. धृष्टद्युम्नने दुर्योधनाला युद्धात हरवले. अर्जुन पुत्र इरावान याने विंद आणि अनुविंद यांना हरवले, भगदत्तने घटोत्कचाला आणि नकुल सहदेवाने मिळून शल्यला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. हे पाहून पुन्हा एकदा भीष्मांनी पांडव सेनेचा भीषण संहार केला.
विराट पुत्र शंख मारला गेल्याने या दिवशी कौरवांचे मोठे नुकसान झाले.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

आठवा दिवस:

कौरवांनी कासव व्यूह तर पांडवांनी तीन शिखरांचे व्यूह रचले. पांडव पुत्र भीमाने धृतराष्ट्राच्या ८ पुत्रांचा वध केला. अर्जुनाची दुसरी पत्नी उलूपी हिचा पुत्र इरावान याचा बकासुराचा पुत्र आष्ट्रयश्रंग (अम्बलुष) याने वध केला.
घटोत्कचाने दुर्योधनावर शक्तीचा प्रयोग केला परंतु बंगनरेशाने दुर्योधनाला बाजूला करून शक्तीचा प्रहर स्वतःवर झेलला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्योधनाच्या मनात मायावी घटोत्कचाबद्दल भीती आणखी वाढली.
तेव्हा भीष्मांच्या आज्ञेने भगदत्तने भीम, युधिष्ठीर आणि अन्य पांडव सैनिकांना मागे हटवले. दिवसाच्या अंतापर्यंत भीमसेनाने धृतराष्ट्राच्या ९ पुत्रांचा वध केला.
पांडव पक्षाचे नुकसान : अर्जुनपुत्र इरावान मारला गेला.
कौरव पक्षाचे नुकसान : धृतराष्ट्राच्या १७ पुत्रांचा भीमाने वध केला.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला आणि दोन्ही पक्षांना नुकसान सोसावे लागले. परंतु कौरवांना जास्त नुकसान सोसावे लागले.

नववा दिवस:

कृष्णाच्या उपदेशानंतर भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये भीष्मांनी शौर्य दाखवत अर्जुनाला जखमी करून त्याचा रथ नष्ट केला. युद्धात भीष्मांनी चालवलेला भीषण संहार रोखण्यासाठी कृष्णाला शेवटी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. आपला रथ नष्ट झालेला पाहून श्रीकृष्णाने रथाचे चाक उचलून भीष्मांवर झडप घातली, परंतु ते शांत झाले. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेचा बहुतांश भाग नष्ट केला.

कोण मजबूत राहिले : कौरव.

दहावा दिवस:

भीष्मांनी मोठ्या प्रमाणावर पांडव सेनेचा खात्मा केल्याने पांडवांच्या पक्षात भीतीचे वातावरण पसरले, तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवानी भीष्मांसमोर हात जोडून त्यांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य विचारले. काही वेळ विचार करून भीष्मांनी उपाय सांगितला.
यानंतर भीष्मांनी पांचाल आणि मत्स्य सेनेचा भयंकर संहार केला. तेव्हा पांडव पक्षाने भिश्मांसमोर शिखंडीला युद्धाला उतरवले. युद्धक्षेत्रात समोर शिखंडी उतरलेला पाहून भीष्मांनी शस्त्र खाली ठेवले. त्याच दरम्यान अतिशय कंटाळलेल्या अर्जुनाने आपल्या बाणांनी भीष्मांवर वार केले. भीष्म त्या बाणांच्या शरशय्येवर झोपले. भीष्मांनी सांगितले की ते सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच देह सोडतील, कारण त्यांना आपले वडील शांतनू यांच्याकडून इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.

पांडव पक्षाचे नुकसान : शतानीक
कौरव पक्षाचे नुकसान : भीष्म
कोण मजबूत राहिले : पांडव

अकरावा दिवस:

भीष्म शरशय्येवर पडल्यावर अकराव्या दिवशी कर्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांना सेनापती बनवले गेले. अकराव्या दिवशी सुशर्मा आणि अर्जुन, शल्य आणि भीम, सात्यकी आणि कर्ण व सहदेव आणि शकुनी यांच्यात युद्ध झाले. कर्णाने देखील या दिवशी पांडव सेनेचा भयंकर संहार केला. दुर्योधन आणि शकुनीने द्रोणांना सांगितले की त्यांनी युधिष्ठिराला बंदी बनवावे म्हणजे युद्ध आपल्या आपण समाप्त होईल, तव्हा दिवसअखेर जेव्हा द्रोणांनी युधिष्ठिराला युद्धात हरवून ते त्याला बंदी बनवण्यासाठी पुढे झाले तेवढ्यात अर्जुनाने येउन आपल्या बाणांच्या वर्षावाने त्यांना रोखले. नकुल युधिष्ठिराच्या सोबत होता आणि आता अर्जुनही युधिष्ठिराचा सोबत आला. अशा प्रकारे कौरव युधिष्ठिराला पकडू शकले नाहीत.

कोण मजबूत राहिले : कौरव.

बारावा दिवस:

कालच्या युद्धात अर्जुनामुळे युधिष्ठिराला पकडता आले नाही त्यामुळे शकुनी आणि दुर्योधनाने अर्जुनाला युधिष्ठिरापासून जास्तीत जास्त लांब पाठवता यावे यासाठी त्रिगर्त देशाच्या राजाला त्याच्याशी युद्ध करून त्याला व्यस्त ठेवण्यासाठी पाठवले, त्याने तसे केले देखील, परंतु पुन्हा एकदा अर्जुन वेळेवर पोचला आणि द्रोण असफल राहिले.
झाले असे की जेव्हा त्रिगर्त अर्जुनाला दूर घेऊन गेले तेव्हा सात्यकी युधिष्ठिराचा रक्षक होता. परत आल्यावर अर्जुनाने प्राग्ज्योतिषपुर (ईशान्येचे एक राज्य) चा राजा भगदत्त याला अर्धचंद्राकृती बाणाने मारून टाकले. सात्यकीने द्रोणांच्या रथाचे चाक उडवले आणि त्यांचे घोडे मारले. द्रोणांनी अर्धचंद्र बाणाने द्रुपदा चा शिरच्छेद केला.
सात्यकीने कौरवांच्या अनेक उच्च कोटीच्या योद्ध्यांना मारले ज्यामध्ये प्रमुख होते जलासंधी, त्रिगर्तांची गजसेना, सुदर्शन, म्लेन्छांची सेना, भूरिश्रवा, कर्णपुत्र प्रसन हे होते. युद्धभूमीवर सात्यकीला भूरिश्रवाकडून कडवी टक्कर झेलावी लागली. प्रत्येक वेळी सात्यकीला कृष्ण आणि अर्जुनाने वाचवले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद
कौरव पक्षाचे नुकसान : त्रिगर्त नरेश
कोण मजबूत राहिले : दोनही पक्ष.

तेरावा दिवस:

कौरवांनी चक्रव्युहाची रचना केली. या दिवशी दुर्योधनाने राजा भगदत्तला अर्जुनाला व्यस्त ठेवण्यास सांगितले. भगदत्तने पुन्हा एकदा पांडव वीरांना युद्धात पळवून लावले आणि भीमाचा पराभव केला आणि नंतर अर्जुनाशी भयंकर युद्ध केले. श्रीकृष्णाने भगदत्तचे वैष्णवास्त्र आपल्यावर झेलून अर्जुनाची रक्षा केली.
शेवटी अर्जुनाने भगदत्तच्या डोळ्यांची पट्टी तोडली ज्यामुळे त्याला दिसायचे बंद झाले आणि अर्जुनाने याच अवस्थेत त्याचा वध केला. याच दिवशी द्रोणांनी युधिष्ठिरासाठी चक्रव्यूह रचला ज्याला तोडणे फक्त अभिमन्यूला माहिती होते, परंतु त्यातून बाहेर पडणे त्याला माहिती नव्हते. तेव्हा अर्जुनाने युधिष्ठीर, भीम उत्यादिंना त्याच्यासोबत पाठवले परंतु चक्रव्यूहाच्या द्वारावर ते सर्व जयद्रथाकडून त्याला मिळालेल्या शिवाच्या वरदानामुळे अडवले गेले आणि केवळ अभिमन्यूलाच प्रवेश करता आला.
या लोकांनी केला अभिमन्यूचा वध : कर्णाच्या सांगण्यावरून सातही महारथी कर्ण, जयद्रथ, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योध्दन, लक्ष्मण आणि शकुनीने एकाच वेळी अभिमन्युवर आक्रमण केले. लक्ष्मणाने जी गदा अभिमन्यूच्या डोक्यावर मारली तीच गदा अभिमन्यूने लक्ष्मणाला फेकून मारली. यामुळे दोघांचाही त्याच वेळी मृत्यू झाला.
अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्जुनाने सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारण्याची अन्यथा अग्नी समाधी घेण्याची प्रतिज्ञा केली.
पांडव पक्षाचे नुकसान : अभिमन्यू
कोण मजबूत राहिले : पांडव

चौदावा दिवस:

अर्जुनाची अग्नी समाधीची प्रतिज्ञा ऐकून कौरव पक्षात आनंदी आनंद पसरला आणि त्यांनी योजना बनवली की आज युद्धात जयद्रथाला वाचवण्यासाठी सर्व कौरव योद्धे आपल्या प्राणांची बाजी लावतील. द्रोणांनी जयद्रथाला वाचवण्याचे पूर्ण आश्वासन दिले आणि त्याला सेनेच्या मागच्या भागात लपवले.
युद्ध सुरु झाले. भूरिश्रवा सात्यकीला मारणार होता तेव्हा अर्जुनाने भूरिश्रवाचे हात कापले, तो जमिनीवर पडला आणि सात्यकीने त्याचा शिरच्छेद केला. द्रोणांनी द्रुपद आणि विराट यांना मारले.
तेव्हा कृष्णाने आपल्या मायाशाक्तीने सूर्यास्त केला. सूर्यास्त झालेला पाहून अर्जुनाने अग्नी समाधीची तयारी सुरु केली. लपून बसलेला जयद्रथ जिज्ञासेला वश जाऊन अर्जुनाला समाधी घेताना पाहण्यासाठी बाहेर येऊन हसू लागला. त्याच वेळी कृष्णाच्या कृपेने सूर्य पुन्हा दिसू लागला आणि त्याच वेळी अर्जुनाने सगळ्यांना धुडकावून लावत कृष्णाकडून करण्यात आलेल्या कृत्रिम सूर्यास्ताने बाहेर आलेल्या जयद्रथाला मारून त्याचे मस्तक त्याच्या वडिलांच्या मांडीवर पाडले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद, विराट
कौरव पक्षाचे नुकसान : जयद्रथ, भगदत्त

पंधरावा दिवस:

द्रोणांची शक्ती वाढत चालल्याने पांडवांच्या पक्षात दहशत पसरली होती. पिता पुत्रांनी मिळून महाभारत युद्धात पांडवांचा पराभव जवळ जवळ निश्चित केला होता. पांडवांचा जवळ येणारा पराभव पाहून कृष्णाने युधिष्ठिराला कपटाचा सहारा घ्यायला सांगितले. या योजनेअंतर्गत युद्धात ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला. पण युधिष्ठीर खोटे बोलण्यास तयार नव्हता. तेव्हा अवन्तिराज याच्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा भीमाने वध केला. यानंतर ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला.
गुरु द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला या गोष्टीची सत्यता विचारली कारण त्यांना माहित होते की धर्मराजा कधीही खोटे बोलणार नाही. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले, की “होय, अश्वत्थामा मारला गेला, परंतु हत्ती.”
जेव्हा युधिष्ठिराच्या तोंडून “हत्ती” शब्द निघाला, त्याच वेळी श्रीकृष्णाने जोराने शंखनाद केला, ज्याच्या आवाजात द्रोणाचार्यांना युधिष्ठिराचा शेवटचा शब्द ऐकू आला नाही आणि आपला प्रिय पुत्र अश्वत्थामा याच्या मृत्यूची बातमी ऐकून ते हताश झाले आणि त्यांनी आपले शस्त्र त्यागले आणि युद्धभूमीवर डोळे बंद करून अत्यंत दुःखी अवस्थेत जमिनीवर बसले. हीच संधी साधून द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने निःशस्त्र असलेल्या द्रोणांचे तलवारीने मस्तक उडविले.

कौरव पक्षाचे नुकसान : द्रोण
कोण मजबूत राहिले : पांडव

सोळावा दिवस:

द्रोणांचा कपटाने वाढ झाल्यानंतर कौरवांचा सेनापती कर्णाला बनवण्यात आले. कर्णाने पांडव सेनेचा भयंकर संहार केला आणि नकुल व सहदेवाला युद्धात पराभूत केले, परंतु कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण मात्र घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनासोबतही भयंकर युद्ध केले.
दुर्योद्धानाच्या सांगण्यावरून कर्णाने अमोघ शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध केला. ही अमोघ शक्ती कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवली होती परंतु घटोत्कचाला घाबरलेल्या दुर्योधनाने कर्णाला ती शक्ती वापरायला सांगितली. ही अशी शक्ती होती की तिचा वार कधीही रिकामा जाणार नव्हता. कर्णाने ती अर्जुनाचा वध करण्यासाठी राखून ठेवली होती.
याच दरम्यान भीमाचे दुःशासनाशी युद्ध झाले आणि त्याने दुःशासनाचा वध करून त्याच्या छातीचे रक्त प्रश्न केले आणि तेव्हा सूर्यास्त झाला.

कौरव पक्षाचे नुकसान : दुःशासन
पांडव पक्षाचे नुकसान : घटोत्कच
कोण मजबूत राहिले : दोन्ही पक्ष

सतरावा दिवस:

शल्यला कर्णाचा सारथी बनवण्यात आले. या दिवशी कर्णाने भीम आणि युधिष्ठिराचा पराभव केला पण कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनाशी युद्ध सुरु केले. कर्ण आणि अर्जुन यांच्यात भयंकर युद्ध झाले. कर्णाच्या रथाचे चक जमिनीत धसले आणि कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने असहाय्य अवस्थेतील कर्णाचा वाढ केला.
यानंतर मात्र कौरवांचा उत्साह पूर्णपणे हरवून गेला. त्यांचे मनोबल ढासळले. मग शल्य प्रधान बनला, परंतु त्याला देखील युधिष्ठिराने दिवस अखेर मारले.
कौरव पक्षाचे नुकसान : कर्ण, शल्य आणि दुर्योधनाचे २२ भाऊ मारले गेले.
कोण मजबूत राहिले : पांडव.

अठरावा दिवस:

अठराव्या दिवशी कौरवांचे ३ योद्धे उरले होते – अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा. याच दिवशी अश्वत्थामाने पांडवांच्या वधाची प्रतिज्ञा केली. अश्वत्थामा आणि कृतवर्मा, कृपाचार्य यांनी रात्री पांडव शिबिरावर हल्ला केला. अश्वत्थामाने सर्व पांचाल, द्रौपदीचे पाच पुत्र, धृष्टद्युम्न आणि शिखंडी इत्यादींचा वध केला.
द्रोण कपटाने मारले गेल्याचे ऐकून अश्वत्थामा दुःखी आणि क्रोधीत झाला आणि त्याने ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला ज्यामुळे युद्धभूमी स्मशानभूमीत बदलली. हे पाहून कृष्णाने त्याला कलियुगाच्या अंतापर्यंत रोगी अवस्थेत जिवंत भटकत राहण्याचा शाप दिला.
या दिवशी भीमाने दुर्योधनाच्या उरलेल्या भावांना मारून टाकले, सहदेवाने शकुनीला मारले आणि आपला पराजय ओळखून दुर्योधन पळून जाऊन सरोवराच्या स्तंभात जाऊन लपला. याच दरम्यान बलराम तीर्थयात्रेवरून परत आले. त्यांनी दुर्योधनाला निर्भय राहण्याचा आशीर्वाद दिला.
लपून बसलेल्या दुर्योधनाला पांडवानी ललकारल्यावर त्याने भिमाशी गदायुद्ध केले आणि जान्घेवर प्रहर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पांडव विजयी झाले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, शिखंडी.
कौरव पक्षाचे नुकसान : दुर्योधन.

शेवटी

काही यादव युद्धात आणि काही गांधारीच्या शापाच्या प्रभावाने आपसात युद्ध करून मारले गेले. पांडव पक्षाचा विराट आणि विराट पुत्र उत्तर, शंख आणि श्वेत, सत्याकीचे १० पुटे, अर्जुनाचा पुत्र इरावात, द्रुपद, द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, कौरव पक्षाचे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर, प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर, कौरवांच्या बाजूने धृताराष्ट्राच्चे दुर्योधनासह सर्व पुत्र, भीष्म, त्रिगर्त नरेश, जयद्रथ, भगदत्त, द्रौण, दुःशासन, कर्ण, शल्य इत्यादी सर्व युद्धात मारले गेले होते.
युधिष्ठिराने युद्ध समाप्ती नंतर शिल्लक राहिलेल्या मृत सैनिकांचे (दोनही पक्षातील) दहन संस्कार आणि तर्पण क्रिया केल्या. या युद्धानंतर युधिष्ठिराला राज्य, धन, वैभव यांपासून वैराग्य आले. असे म्हटले जाते की युद्धानंतर अर्जुन आपल्या भावांसह हिमालयात निघून गेला आणि तिथेच त्यांचा देहांत झाला.

वाचलेले योद्धे – महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. त्यांची नावे आहेत –

कौरव : कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा
पांडव : युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी इत्यादी.


Image may contain: text that says 'मण्डल व्यूह पितामह भीष्म ने यद्ध के सांतवे दिन कौरव सेना को इस तरह से सजाया था'
Image may contain: text that says 'कौंच व्यूह यद्ध के दसरे दिन ने इस तरह से पांडवो सेना सजाई थी'
Image may contain: textImage may contain: text that says 'चकव्यूह यही है प्रसिद्ध अभिमन्य की हत्या इसी में फंसाकर की गई थी'Image may contain: text that says 'चकशकट व्यूह की रचना द्रोण ने जयद्रथ को अर्जन से बचाने के लिए की थी'