Friday, December 8, 2023

सांख्य दर्शन ७ : उपसंहार

 गेला आठवडा आपण सांख्य दर्शनाचा अभ्यास करत होतो. हे इ.स. पूर्व ७०० वर्षे इतके प्राचीन दर्शन आहे.  भारतीय जनमानसावर सर्वात अधिक प्रभाव या दर्शनाचा आहे. 

'सत्कार्यवाद' हा या दर्शनाचा आधार आहे. म्हणजेच शून्यातून काही निर्माण होऊ शकत नाही असे हे दर्शन मानते, त्यामुळे या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या 'देवाने विश्व घडविले' या सिद्धांतास हे दर्शन विरोध करते. या विश्वाची 'पुरुष' आणि 'प्रकृती' ही दोन मूलभूत तत्वे असल्याचे हे दर्शन प्रतिपादन करते.

प्रकृतीमध्ये असीम शक्यता दडलेल्या आहेत. मात्र या शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी ती अस्वस्थ आहे. पुरुष हा केवळ चैतन्य आहे. अनुभवाशिवाय चैतन्यला अर्थ नाही. प्रकृती आणि पुरुष एकत्र आल्यावर प्रकृती पुरुषापुढे विश्व उभे करते. पुरुष त्याचा अनुभव घेण्यात अडकत जातो. आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हेच विसरतो. त्यामुळे तो दु:ख अनुभवतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुरुषाला आपल्या निरंजन चैतन्याची जाणीव होणे. याला या दर्शनात 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला ही जाणीव होण्यासाठी अनेक मार्ग या ऋषीमुनींनी दाखविले आहेत. आपण एक उदाहरण म्हणून त्यातील एका मार्गाची ओळख करून घेतली.

हे दर्शन प्रकृतीचा खोलात शिरून अभ्यास करते. प्रकृतीने हे विश्व आपल्यापुढे उभे केले आहे. आपल्या समस्याच या विश्वातील समस्याच आहेत. त्यामुळे आपल्या विविध ज्ञानशाखांनी आपल्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी याच दर्शनाचा आधार घेतला. आपण यापैकी एका ज्ञानशाखेचे उदाहरण पाहिले. 


प्राचीन भारतीय ज्ञान हे विविध शाखांच्या तुकड्यातुकड्यात निर्माण झालेले नाही. ते एकसंघ (streamlined) आहे. हेच आपल्या विविध ज्ञानशाखांचे वैशिष्ट्य आहे.  आयुर्वेदाचा अभ्यास सांख्यदर्शनाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण राहील. असेच अन्य शाखांच्याबाबत आहे. 

एक भारतीय म्हणून आपल्याला सांख्य दर्शनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते. 

ही लेखमाला येथेच संपवितो. 
लेखनसीमा  !

Thursday, December 7, 2023

सांख्य दर्शन ६ : आयुर्वेद


सांख्यदर्शन हे आपले अतिप्राचीन दर्शन आहे. भारतीय माणसावर या दर्शनाने अनेक शतके प्रभाव टाकलेला आहे. 

वेदान्त दर्शन प्रामुख्याने हे विश्व 'माया' आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील समस्यांवर या दर्शनाच्या माध्यमातून उपाय शोधणे कठीण जाते. याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी करून प्रकृतीचा खोलात जाऊन वेध घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील विविध समस्यांची कारणे आणि उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होतो. 

भारतीय आयुर्विज्ञान शास्त्र आयुर्वेद हे ही सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. यात आपल्या शरीरात 'कफ', 'पित्त' आणि 'वात' या तीन दोषांचे (गुणांचे) संतुलन असते असे मानले गेले आहे. हे दोष पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून तयार होतात. जर हे संतुलन बिघडले तर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात असे आयुर्वेद मानतो. हे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी विविध रसायने आयुर्वेद सुचवितो. 


आकाश आणि वायू एकत्र येऊन 'वात' दोषाची निर्मिती होते. 'आकाश' आणि 'वायू' एकत्र आल्यामुळे 'हालचाल' हे वाताचे मुख्य लक्षण आहे. आपल्या शरीरातील आणि चित्तामधील चलनवलन यावर वातदोषाचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ रक्तप्रवाह, शरीरातील विषद्रव्यांचे निराकरण, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, चेतासंस्थेचे कार्य, मनातील विचारांचा प्रवाह, सांध्यातील हालचाली इत्यादींवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'अग्नी' आणि 'जल' एकत्र येऊन 'पित्त' दोषाची निर्मिती होते. ही दोन पंचमहाभूते एकत्र आल्याने उष्णता, तरलता आणि स्निग्धता ही पित्ताची मुख्य लक्षणे आहेत. पचनसंस्था, त्वचा आणि त्वचेचा उजळपणा, शरीराचे तापमान यावर पित्तदोषाचा प्रभाव असतो. पित्तदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'जल' आणि 'पृथ्वी' एकत्र येऊन 'कफ' दोषाची निर्मिती होते. 'पृथ्वी' हे अत्यंत स्थिर पंचमहाभूत आहे हे आपण जाणतोच.  संथपणा, स्थिरता, शांतता, गारवा ही कफदोषाची मुख्य लक्षणे आहेत. कफदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येतो. 

आयुर्वेदात या तीन दोषांच्या संतुलनाचा विचार केला जातो. पण आपल्या शरीरावर 'प्रकृती' आणखीही वेगळ्या मार्गाने प्रभाव टाकत असते. जन्मत:च आपले शरीर संतुलित नसते. प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या दोषाचा अधिक प्रभाव असतो. आपले शरीर त्यानुसार विविध गोष्टींना प्रतिसाद देत असते. त्यामुळे आयुर्वेदिक औषध देताना आपल्या शरीरात मूलभूत कोणते दोष अधिक आहेत यावरही औषधयोजना ठरत असते. आपल्या शरीरात कोणता दोष अधिक आहे हे आपले आपल्याला ओळखता येते आणि त्याप्रमाणे आपण आपली काळजी घेऊ शकतो. हा विषय मोठा आहे आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाही. कधीतरी यावर विस्तृत लिहीन. 

आयुर्वेदाचा आधार 'सांख्यदर्शन' आहे.  सांख्यदर्शन भारतीय समाजात खोलवर मुरलेले आहे. 







Wednesday, December 6, 2023

सांख्य दर्शन ५ : कुंडलिनी ध्यान

 प्रकृती आपल्यातील असीम शक्यता दाखविण्यासाठी अस्वस्थ आहे. पुरुष (चैतन्य) विविध अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष एकत्र आले की एकमेकांना सहाय्यभूत होतात. परंतु आपला खेळ अधिकाधिक वेळ चालत राहावा म्हणून प्रकृती पुरुषाला आपल्यात अधिकधीक गुंतवत जाते. यात पुरुष आपण मुळात 'केवळ चैतन्य' आहोत हेच विसरतो. मग प्रकृतीमुळे मनात निर्माण होणारी सुख-दु:खे आपलीच आहेत असे समजू लागतो. हेच माणसाच्या दु :खाचे कारण आहे. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याची जाणीव होणे - म्हणजे कैवल्य प्राप्त होणे - हा या जीवनातील दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

कपिल मुनींनी इ.स.पूर्वी सातशे वर्ष या काळात सांख्य दर्शन प्रतिपादन केले. त्यानंतर सत्तावीसशे वर्षात पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक मार्ग सुचविले गेले. यापैकी एक मार्ग आहे 'कुंडलिनी ध्यान'. कुंडलिनी ध्यानाचा आधार सांख्य तत्वज्ञान आहे. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर यायचे असेल तर अत्यंत सावधपणे ज्या क्रमाने गुंतत गेलो त्याच्या विरुद्ध क्रमाने स्वत:ला सोडवून घ्यावे लागेल. म्हणजेच ज्या गोष्टीत शेवटी गुंतलो त्यातून प्रथम सुटका करावी लागेल. कोठल्याही जाळ्यात अडकलेल्या माणसाला अशाच क्रमाने जावे लागते. कुंडलिनी ध्यानात हाच क्रम आहे. 

पाठीच्या काण्यात प्रत्येक दोन मणक्यांमधून चेतातंतू बाहेर पडतात. यातील पाच ठिकाणे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली गेली आहेत. या शिवाय कपाळावरील दोन भुवयांमधील जागा (भ्रूमध्य) आणि डोक्याचा सर्वात वरचा भाग (टाळू) ही ठिकाणेही महत्वाची मनाली गेली आहेत. या ठिकाणांना 'चक्र' म्हणतात. ही सात चक्रे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली जातात. 

सर्वात खालचे गदद्वाराजवळचे मूलाधार चक्र  या चक्रावर  'पृथ्वी' या पंचमहाभूतांचे  वर्चस्व असते. त्यानंतर अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्र (जल), मणिपूर चक्र (अग्नी), अनाहत चक्र (वायू) आणि घशातील विशुद्ध चक्र (आकाश) अशी चक्रे येतात. प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडायचे असेल तर क्रमाक्रमाने मूलाधार चक्रापासून सुरुवात करून विशुद्ध चक्र जागृत करावे लागते. नंतर भ्रूमध्यातील आज्ञाचक्र आणि टाळूमधील सहस्त्रार जागृत करावे लागते. शेवटची दोन चक्रे आपल्या चित्ताशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पुरुष ज्या क्रमाने प्रकृतीच्या जाळ्यात अडकला त्याच्या विरुद्ध क्रमाने सुटका करून घ्यावी लागते. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी इतरही अनेक उपाय ऋषीमुनींनी शोधले आहेत. परंतु त्यावर माझा फार अभ्यास नाही. आपला नित्य व्यवहार प्रकृतीशी होत असल्याने सांख्य दर्शन आधारभूत मानून अनेक जीवनोपयोगी शास्त्रे विकसित झाली आहेत. उदा. योग, आयुर्वेद. आपण याबद्दल पुढील लेखात विचार करू. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी विस्तृत विवेचन माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' विभागात आहे. 

Tuesday, December 5, 2023

सांख्य दर्शन ४ : सृष्टीची निर्मिती

 कोणत्याही गोष्टीची (Object) निर्मिती होण्यासाठी 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण' या दोन्हीची आवश्यकता  असते असे सांख्य दर्शन मानते. या सृष्टीच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे, तर 'प्रकृती' हे उपादान कारण आहे हे आपण मागील लेखात पाहीले. तसेच प्रकृती 'सत्व', 'रज' आणि 'तम' या तीन गुणांनी बनली आहे हे ही पाहिले.

प्रकृती तिच्यामधील असीम शक्यतांचे प्रदर्शन करता यावे/ प्रकटीकरण करता यावे  म्हणून सतत बेचैन असते. या उलट पुरुष हा केवळ चैतन्य आहे. समोरील गोष्टींना अनुभवणे हे चैतन्याचे कार्य आहे. पण समोर अनुभवण्यासाठी काहीही नसेल तर पुरुषाला आपल्यातील चैतन्य सिद्ध करता येत नाही. म्हणून पुरुष-प्रकृती एकत्र आले तर प्रकृतीला आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटन करता येते आणि चैतन्य ते अनुभवू शकते. 

पुरुष आणि प्रकृती एकत्र आल्यावर मूल प्रकृती (महत) सत्व गुणापासून प्रथम बुद्धी निर्माण करते. ही बुद्धी चेतनारहित असते. नंतर प्रकृती 'रज, गुणापासून अहंकार निर्माण करते. पुरुष एकदा अहंकाराच्या जाळ्यात फसला ही बाहेर येणे कठीण असते. हा अहंकार पुरुषामध्ये 'मी पणाची' भावना जागवितो. यानंतर प्रकृती जे निर्माण करेल ते 'माझे' आहे असे पुरुषाला वाटते. नंतर 'तम्' या गुणापासून   मनाचा जन्म होतो. मन, अहंकार आणि बुद्धी यांनी मिळून चित्त बनते. अहंकार राजस असल्याने सतत काहीतरी करावे, अधिक चांगले व्हावे असे वाटून बेचैन असतो. याउलट मन हे तामसिक असते. तामसिक असल्याने ते आळशी (Inert) असते, आपल्याजवळ अनेक आठवणींचा साठा करू शकते. म्हणूनच सात्विक बुद्धी, राजसिक अहंकार आणि तामसिक मन आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत. 

एकदा चित्ताचा जन्म झाला की प्रकृती आपला खेळ जोरात चालविते. तीन गुणांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टी (Objects - वस्तू आणि ऊर्जा) बनतात. या तीन गुणांमधील 'रज' हा गुण क्रियाशील असतो. त्यामुळे तीन गुणांचे मिश्रण होताना सत्व आणि रज तसेच रज आणि तम यांचे मिश्रण होताना दिसते. मात्र सुरुवातीला सत्व आणि तम यांचे मिश्रण होत नाही. 

सृष्टीची निर्मिती होताना प्रथम पंचमहाभुतांची निर्मिती झाली. यातही प्रथम सत्व गुणांपासून 'आकाश' उत्पन्न झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने अन्य पंचमहाभूते उदयास आली. सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने 'वायू' उत्पन्न झाला. रज गुणांपासून 'अग्नी' निर्माण झाला. रज आणि तमोगुणांच्या मिश्रणाने 'जल' हे पंचमहाभूत निर्माण झाले. शेवटी तमोगुणापासून पृथ्वीतत्वाची निर्मिती झाली. 

परंतु केवळ पंचमहाभूतांची निर्मिती होऊन त्याचा अनुभव पुरुष घेऊ शकणार नव्हता. या पंचमहाभूतांचा अनुभव पुरुषाला (चैतन्याला) घेता यावा म्हणून पंचमहाभूतांपासून तन्मात्रे उत्पन्न झाली. आकाशापासून 'शब्द' हे तन्मात्र बनले, वायूपासून 'स्पर्श', अग्नीपासून 'रूप', जलापासून 'चव' आणि पृथ्वीप्ससुन 'गंध' ही तन्मात्रे उत्पन्न झाली. 

केवळ तन्मात्रे उत्पन्न होऊन चालणार नव्हते. या तन्मात्रांचा अनुभव घेण्यास इंद्रिये आवश्यक होती. मग अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. 

हा सृष्टीचा अनुभव चांगल्याप्रकारे यावा म्हणून पाच कर्मेंद्रिये निर्माण झाली. तोंड, हात, पाय, मलोत्सर्जनासाठी अवयव आणि पुनरुत्पादनासाठी अवयव ही ती  पाच कर्मेंद्रिये आहेत. 

प्रकृती कायम अस्वस्थ असते आणि सातत्याने आपापले रूप बदलत असते. याउलट पुरुष म्हणजेच चैतन्य स्थिर असते. पुरुष प्रकृतीच्या खेळात हळूहळू गुंतत जातो. अहंकारामुळे तो आपण कोण आहोत हेच विसरतो. यामुळे प्रकृतीच्या खेळात तो दु:ख अनुभवतो.  पुरुषाला आपण प्रकृतीच्यापेक्षा वेगळे असल्याची जाणीव होणे हाच दु:खमुक्तीचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुरुषाला प्रकृतीच्या खेळाची जाणीव करून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनेक मार्ग अनुसरले. त्यातील एका मार्गाची ओळख आपण पुढील भागात करून घेऊ. 

Monday, December 4, 2023

सांख्य दर्शन - ३ : त्रिगुणात्मक प्रकृती

सत्कार्यवाद हा सांख्य दर्शनाचा पाया आहे हे आपण पाहीले. सत्कार्यवादानुसार कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी निमित्त कारण आणि उपादन कारण या दोन्हीची आवश्यकता असते. या विश्वाच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे आणि 'प्रकृती' हे उपादान कारण आहे असे हे दर्शन मानते. पुरुष हे प्रत्येकाचे चैतन्य आहे तर प्रकृती ही चेतनाहीन  आहे. 

जेव्हा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते तेव्हा तिच्यात उपादान कारणाचे काही गुणवैशिष्ट्य सापडू शकते असे सांख्य दर्शनकर्त्यांचे मत होते. मातीपासून मातीचा घट बनविला तर तो पाहून आपण तो मातीचा आहे, सोन्याचा नाही हे सांगू शकतो. कारण मातीचे काही गुण (उदा. रंग) त्या घटात आलेले असतात. तसेच ही सृष्टी बनताना प्रकृतीचे काही गुण सृष्टीत आले असणार असे त्या ऋषींनी मानले. 

जेव्हा त्यांनी सृष्टीचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना सृष्टीतील काही गोष्टी तेजस्वी (उदा. तारे) दिसल्या, काही गोष्टी गतिमान दिसल्या (उदा. ग्रह) तर काही गोष्टी एकाच ठिकाणी स्थिर आहेत, अंधाऱ्या आहेत असे दिसले. यावरून त्यांनी मूळ प्रकृतीतही ही तीन गुण असावेत असे मानले. या तीन गुणांना त्यांनी सत्व, रज आणि तम अशी नावे दिली. 

प्रकृतीमध्ये या तीन गुणांचे समत्व असते तेव्हा प्रकृती स्थिर असते. तिच्यात काहीही बदल होत नाहीत. परंतु काही कारणाने या तीन गुणांचे प्रमाण बदलते तेव्हा त्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टींची (Objects) निर्मिती होते. या विविध गोष्टी म्हणजे वस्तू अथवा ऊर्जा असू शकतात.  लाल, पिवळा आणि निळा या तीन मूलभूत रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग बनू शकतात तसेच काहीसे हे आहे. 

पण ही तीन गुणांच्या समत्वाने बनलेली प्रकृती अस्थिर का होते? प्रकृतीमध्ये असीम शक्यता (Potential) दडलेल्या आहेत. परंतु प्रकृती स्थिर राहिल्यास या असीम शक्यतांचे प्रकटीकरण होण्यास वाव राहात नाही. आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी प्रकृती सतत अस्वस्थ असते. म्हणून प्रकृती अस्थिर होऊन (सत्व, रज आणि तम) गुणांचे विविध प्रकारे मिश्रण करून पुरुषासमोर - चेतनेसमोर एक विश्व उभे करते. 

पुरुषांची चेतना ही अनुभवाशिवाय निष्क्रिय असते. चेतनेचे अंतिम उद्दिष्ट विविध अनुभव घेणे हेच असते. प्रकृती  स्थिर असेल तर चेतनेला म्हणजेच पुरुषाला विविध घेता अनुभव येणार नाहीत. आपण 'चेतना' आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला अनुभव घ्यावे लागतात. प्रकृती आणि पुरुष या दोघांच्याही अस्तित्वाला अर्थ येण्यासाठी त्यांनी एकत्र येणे आवश्यक असते. विश्वाची निर्मिती झाल्यावर पुरुष या विश्वातील अनुभव घेण्यात रमतो. त्यात तो प्रकृतीच्या जाळ्यात गुंतत जातो. 

सत्व, रज आणि तमोगुणांच्या सहाय्याने प्रकृती क्रमाक्रमाने विश्वाची निर्मिती कशी करते, त्यात पुरुष कसा गुंतत जातो आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे पुढील काही लेखांत पाहू. 

सांख्य दर्शन -२ : सत्कार्यवाद

 सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. इ.स. पूर्व ७०० या कालखंडातील कपिल मुनी या दर्शनाचे प्रवर्तक समजले जातात हे आपण मागील लेखात पाहिले. 


'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा पाया आहे. आपण अद्वैत वेदांत दर्शनाचा अभ्यास करताना 'सत्' शब्दाचा अर्थ पाहिला आहे. सत् म्हणजे 'अस्तित्व'. कोणतीही गोष्ट शून्यातून अस्तित्वात येऊ शकत नाही. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट अस्तित्वात येते असे सत्कार्यवाद मानतो. (आधुनिक विज्ञान असेच मानते). 'माती' या कारणावर 'कार्य' घडून 'घट' बनतो, 'दुध' या कारणावर कार्य घडून 'दही' बनते.


'कारण' हे ही दोन प्रकारचे असते. एखादे कार्य घडण्यास ही दोन्ही प्रकारची कारणे आवश्यक असतात. मातीपासून घट बनविण्यासाठी केवळ माती असून पुरेसे नसते. घटाची निर्मिती करणारा कुंभारही आवश्यक असतो. म्हणजेच कुंभाराची चेतना आवश्यक असते. कुंभार हे 'निमित्त' कारण आहे. तर माती हे 'उपादान' कारण आहे.

हा सत्कार्यवाद कपिलमुनींच्या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या प्रतिपादनाला छेद देणारा आहे. न्याय आणि वैशेषिकांच्या मते या विश्वाला देवाने/परमेश्वराने घडविले. कपिल मुनींच्या मते हे केवळ 'निमित्त कारण' आहे. मात्र त्यातून 'उपादान कारणाचा' बोध होत नाही.

कपिल मुनींनी विश्वाच्या उपादान कारणाला 'प्रकृती' असे नाव दिले. विश्वाचे निमित्त कारण 'पुरुष' हे आहे. अर्थात पुरुषाची चेतना हे आहे. मात्र विश्वाच्या निर्मितीनंतर प्रकृतीच्या खेळात पुरुष फसत जातो. आपले स्वतंत्र अस्तित्व तो विसरतो. मानवी दु:खाचे हेच मूळ कारण असल्याचे सांख्य दर्शन मानते. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याचे उमगणे - म्हणजेच पुरुष कैवल्याला पोचणे - हा दु:खमुक्तीचा मार्ग असल्याचे सांख्य दर्शन प्रतिपादन करते.

पुढील काही लेखात आपण 'पुरुष या प्रकृतीच्या खेळात कसा फसत जातो आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग' पाहू. तसेच प्रकृती कशी बनली आहे, तिची तत्वे याचा विचार करू. आयुर्वेद, योगशास्त्र, कुंडलिनीविद्या, तंत्रशास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र अशा अनेक प्राचीन विद्यांचा आधार प्रकृतीची तत्वे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

Sunday, December 3, 2023

सांख्य दर्शन

 

आपण अद्वैत दर्शन खूप खोलात जाऊन पहिले. आता सांख्य दर्शनाकडे वळू. माझा सांख्य दर्शनावर अद्वैत वेदांत दर्शनाएवढा सखोल अभ्यास नाही. आपण मला समजून घ्याल अशी आशा. 

सांख्य दर्शन हे खूप प्राचीन दर्शन आहे. कपिल मुनी याचे प्रणेते आहेत. कपिल मुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला जातो. न्याय आणि वैशेषिक दर्शन या पूर्वीचे आहेत.  'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. त्यानंतर अनेक ऋषींनी यावर ग्रंथ लिहिले आहेत. इसवीसन   पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी 'सांख्य कारिका' हा ग्रंथ लिहिला आहे.  आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो

आपण आधी अभ्यासलेला अद्वैत वेदांत हा 'विश्व हे सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे' असे मानतो. अद्वैत वेदांताची संपूर्ण मांडणी ही मायेचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झालेली आहे. मायेचे अस्तित्व लक्षात आले आणि ब्रह्माचा क्षणोक्षणी अनुभव येऊ लागला की आपण मुक्त असल्याची प्रचिती येते असे हे दर्शन मानते. जागृतावस्थेत विश्व हे ब्रह्माचे विवर्त असल्याने त्याचा फार खोलात जाऊन अभ्यास या दर्शनात नाही.

याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती या भिन्न गोष्टी आहे असे मानते. प्रकृती (जागृतावस्थेतील विश्व) का आणि कशी निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न हे दर्शन करते. यामुळे जागृतावस्थेतील विश्वात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न या दर्शनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हेच या दर्शनाचे बलस्थान आहे. यामुळेच भारतवर्षात 'योग', 'आयुर्वेद', 'कुंडलिनी विद्या', 'शाक्तविद्या', 'शिवस्वरोदय शास्त्र' यासारख्या नित्य जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक विद्या या दर्शनातूनच निर्माण झाल्या. कदाचित यामुळेच हे दर्शन गेली कित्येक शतके भारतीय जनमानसावर आपला प्रभाव टिकवून ठेवत आहे.

सांख्य दर्शन काय आहे ते पुढील लेखापासून बघू.