Friday, December 7, 2018

पंचमहाभूते

भारतीय अध्यात्मशास्त्र हे पाश्चात्य संकल्पनांनुसार केवळ तात्विक Philosophy नाही तर ऐहिक जीवनाचा पाया  आहे.

भारतीय अध्यात्मात पंचममहाभुतांची कल्पना मांडली आहे. ही कल्पना भारतीय अध्यात्माचा पाया आहे असे म्हणता येईल. ही कल्पना न्याय-वैशेषिक तत्वज्ञानातून आलेली आहे. न्याय-वैशेषिक तत्वज्ञान अत्यंत प्राचीन मानले जाते. प्रपंच या शब्दाचा अर्थच पंचमहाभूतांपासून बनलेले.

ही पंचमहाभूतांची कल्पना माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांभोवती गुंफलेली आहे.

आकाशतत्व हे पहिले पंचमहाभूत.आकाशाचा शब्दगुण  आहे.
वायूतत्व हे दुसरे पंचमहाभूत. वायूमध्ये शब्दगुण आहेच, पण स्पर्शगुणही आहे.
अग्नीतत्व हे तिसरे पंचमहाभूत. यात शब्द आणि स्पर्शगुण  आहेतच. पण यात रूपगुणही आहे.
जलतत्व हे चौथे पंचमहाभूत. त्यात  शब्दगुण , स्पर्शगुण आणि रूपगुण आहेतच. पण यात रसगुणही आहे.
पृथ्वीतत्व हे पाचवे पंचमहाभूत. यात शब्दगुण , स्पर्शगुण, रूपगुण आणि रसगुणही आहेतच, पण यात गंधगुण ही आहे.

हा जो क्रम मांडला आहे तो सूक्ष्म (तरल) अनुभूतीपासून आपण स्थूल अनुभूतीकडे आहे. पृथ्वीतत्त्व सर्वात स्थूल अनुभूती देणारे आहे तर आकाशतत्व सर्वात तरल अनुभूती देणारे आहे.

गांधत्व, द्रव्यत्व, उष्णत्व, चालावं आणि अप्रतिघात (प्रतिघात = अडथळा) हे अनुक्रमे पृथी, जल, अग्नी, वायू आणि आकाशतत्वाचे गुण  आहेत.
पंचमभूतांचा त्रिदोषांशीही संबंध आहे. आकाश हे प्रामुख्याने सत्वगुण दर्शक आहे, वायू रजोगुणदर्शक आहे, सत्व आणि रजोगुण हे अग्नितत्वात असतात. सत्व आणि तमोगुण जलतत्वात असतात. पृथ्वीतत्त्व प्रामुख्याने तमोगुणांनी भरलेले आहे.

वैशेषिक दर्शनानुसार परमेश्वराला जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा ही पंचमहाभूते पंचमहाभूते एकमेकांशी संलग्न झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली.

सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊन कुंडलिनी शास्त्र उगम पावले. यात सप्त चक्रे सांगितली आहेत. ही चक्रे या पंचमहाभूतांच्या क्रमानेच येतात. मूलाधार चक्र हे पहिले चक्र. ते पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि ते आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली असते. पृथ्वीतत्त्व स्थूलअनुभवांशी जोडलेले असल्याने साधना या चक्रापासून सुरु होते. त्यानंतर येणारे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. त्यानंतरचे मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायुतत्वाशी तर विशुद्ध चक्र आकाशतत्वाशी संबंधित आहे. या नंतरची दोन चक्रे 'आज्ञाचक्र आणि 'सहस्त्रार' अधिक सूक्ष्माकडे घेऊन जातात. कुंडलिनी साधना याच क्रमाने या चक्रांना जागृत करते. या साधनेत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करतो.

योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊनच विकसित झाले आहे. या दोन्ही शास्त्रातही पंचममहाभूतांना महत्व आहे.

पंचमहाभूते आयुर्वेदातील त्रिदोषांशी संबंधीत आहेत. कफदोष हा पृथ्वी आणि जल तत्व यांच्या संयोगाने बनतो. पित्तदोष हा अग्नीतत्वाचे रूप आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश या तत्वांनी बनतो.

अशाप्रकारे भारतीय अध्यात्मशास्त्र हे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.







Tuesday, December 4, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ६


हर्न्लेने केलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या भाषांतराने जगभरात खळबळ उडवून दिली. जगभरातले पुरातत्त्वसंशोधक अजून नवीन काही हस्तलिखिते सापडतील ह्या आशेने मध्य आशियाकडे धाव घेऊ लागले. अनेकांना ती सापडली - पण बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इतके महत्त्वाचे काहीही नव्हते. गौतम बुद्धानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतात सुरु होऊन त्यानंतर प्रामुख्याने मध्य आशियातून युरोपकडे जाणाऱ्या पश्चिमेकडीलखुश्कीच्या मार्गावरून (सिल्क रूट) होत गेला होता. बौद्ध धर्माला बरेच श्रीमंत व्यापारी अनुयायी म्हणून लाभले होते. त्यांनीच दिलेल्या धनामुळे मध्य आशियात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक बौद्ध स्तूप, विहार, आणि बुद्धप्रतिमा (उदाहरण: अफगाणिस्थानमधील बामियानच्या बुद्ध मूर्ती - ज्या २००१ मध्ये तालिबानने तोडल्या!) बनवल्या गेल्या होत्या.

Image may contain: fire and textहे झाले थोडे विषयांतर. पुन्हा बॉवर मॅन्युस्क्रीप्टसकडे वळूया. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हर्न्लेने शोधून काढले की त्यांमध्ये एकूण ७ खंड होते: २ ज्योतिषविषयक, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. ह्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या सुरुवातीला १० अश्या 'पवित्र' व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे की ज्या हिमालयाच्या परिसरात रहात होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होत्या. ही नावे होती: अत्रेय, हरित, पराशर, भेल, गार्ग, संभव्य, वसिष्ठ, कारल, काप्य आणि - आणि - सुश्रुत! ह्यापुढे जाऊन हे जे ३ पुरातन वैद्यकीय खंड बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमध्ये होते त्याचे लेखक होते: चरक, भेल, आणि - होय - सुश्रुत!

अश्याप्रकारे भारतातील एक ऋषीतुल्य व्यक्तीचे नाव एका ऐतिहासिक दस्तावेजात येण्याची जगातली ही पहिली वेळ होती. बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा कालखंड विज्ञानाच्या आधारे निश्चित करता येत होता आणि त्यामध्ये सुश्रुताचे नाव एक वैद्य म्हणून आल्याने हे निश्चित झाले की भारतीयांना कमीतकमी ईसवी सन ६५० मध्ये सुश्रुताच्या सुश्रुत संहितेबद्दल आणि त्यात सांगितलेल्या सर्जरी व प्लास्टिक सर्जरीबद्दल माहिती होती. मागील एका भागात दिलेल्या जेम्स बॉन्डच्या उदाहरणाप्रमाणे आपण अजूनही सुश्रुत खरा होता की नव्हता ह्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ईसवी सन ६५० मध्ये कोणी एक सुश्रुत नावाची व्यक्ती वैद्यकीय शास्त्रज्ञ मानली जात होती आणि त्याच्या नावाने एक 'सुश्रुत संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला गेला होता. कविराज कुंजलाल भिषगरत्न म्हणतात त्याप्रमाणे सुश्रुत संहितेचा काल ईसवी सन पूर्व ८०० असेलही कदाचित पण हाती असलेल्या पुराव्यांनी इतके नक्कीच म्हणता येते की ईसवी सन ६५० मध्ये आज माहित असलेली सुश्रुत संहिता नक्की माहित होती. ह्या सर्जरीच्या विषयावर लिहिले गेलेले आणि ह्यापेक्षा जुने असे दुसरे कोणतेही पुस्तक संपूर्ण जगात उपलब्ध नाही - त्यामुळे निश्चितच ही आपल्या भारतीयांसाठी मोठ्या गर्वाची गोष्ट आहे!

पण सुश्रुत संहिता खरच इतकी भारी आहे? का उगाच फक्त ती भारतीय आहे म्हणून मी तिचे गोडवे गातोय? माझे आयुर्वेदावरचे ज्ञान जवळपास शून्य आहे. पण इतक्या शतकांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या ग्रंथात जे वैद्यकीय क्षेत्रासंबंधित ज्ञान संपादित केलेले आहे ते पाहून माझ्यासाख्या (थोडेफार फक्त इतिहास विषयाशिवाय इतर वाचन नसणाऱ्या) माणसाचेसुद्धा भान हरपून जायला होते. उदाहरणार्थ: ह्या संहितेत ७६ प्रकारचे डोळ्याचे रोग सांगितलेले आहेत - १२१ प्रकारच्या सर्जरीत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे उल्लेख आहेत - ४२ सर्जीकल प्रोसेसेसचे उल्लेख आहेत - आणि हे सर्व कमी आहे की काय म्हणून जवळपास ७०० विविध वनस्पतींचे त्यांच्या औषधी गुणानुसार ३७ विविध गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे! आणि हे सर्व - कविराजांचे मत ग्राह्य धरले तर २८०० वर्षांपूर्वी - किंवा हाती असलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे वय लक्षात घेतले तर १४०० वर्षांपूर्वी!

आता एक अप्रुपाची गोष्ट. सुश्रुत संहितेच्या पहिल्या खंडातील - सूत्रस्थानमधील - सोळाव्या अध्यायात खालील श्लोक आहेत:

विश्लेषितायास्त्वथ नासिकाया वक्ष्यामि सन्धानविधिं यथावत् |
नासाप्रमाणं पृथिवीरुहाणां पत्रं गृहीत्वा त्ववलम्बि तस्य ||२७||

तेन प्रमाणेन हि गण्डपार्श्वादुत्कृत्य बद्धं त्वथ नासिकाग्रम् |
विलिख्य चाशु प्रतिसन्दधीत तत् साधुबन्धैर्भिषगप्रमत्तः ||२८||

सुसंहितं सम्यगतो यथावन्नाडीद्वयेनाभिसमीक्ष्य बद्ध्वा |
प्रोन्नम्य चैनामवचूर्णयेत्तु पतङ्गयष्टीमधुकाञ्जनैश्च ||२९||

सञ्छाद्य सम्यक् पिचुना सितेन तैलेन सिञ्चेदसकृत्तिलानाम् |
घृतं च पाय्यः स नरः सुजीर्णे स्निग्धो विरेच्यः स यथोपदेशम् ||३०||

रूढं च सन्धानमुपागतं स्यात्तदर्धशेषं तु पुनर्निकृन्तेत् |
हीनां पुनर्वर्धयितुं यतेत समां च कुर्यादतिवृद्धमांसाम् ||३१||

(भावार्थ: आता मी तुम्हाला कृत्रिम नाक जोडायची पद्धत सांगतो. सुरुवातीला झाडाचे एक पान घ्या जे नाकाच्या कापल्या गेलेल्या भागावर लांबीरुंदीने व्यवस्थित बसेल. हे माप घेऊन झाले की ह्या मापाने गालावर खूण करून घेऊन खालून वर सुरीने त्वचा कापून घावी. ही त्वचा संपूर्णपणे शरीरापासून वेगळी होऊ न देता नाकावर लावण्यात यावी. त्यानंतर थंड डोक्याच्या डॉक्टरने त्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी (साधुबंद) बांधावी. डॉक्टरने हे पण पहावे की सर्व भाग व्यवस्थित चिकटले आहेत आणि त्यानंतर दोन नळ्या श्वासोच्छवासाठी आणि त्वचा खाली नाकात चिकटू नये म्हणून तेथे घाल्याव्यात.)

लागला क्लू? ओळखीची वाटतेय ही पद्धत? पहिल्या भागात आपण पाहिलेल्या कावसजीच्या ऑपरेशनशी ही पद्धत किती मिळतीजुळती आहे पहा - फक्त फरक इतकाच की त्या कुंभाराने कपाळावरची त्वचा वापरली आणि सुश्रुत गालावरची त्वचा वापरायला सांगतो - बस्स बाकी काही नाही! पण त्वचा वाळू न द्यायची 'ट्रीक' तीच आहे - की मूळ शरीरापासून ती वेगळी होऊ न देणे. कावसजीच्या आधी कमीतकमी १००० वर्षे ही पद्धत भारतात वापरली जात होती हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमुळे सिद्ध झाले आणि हे जगन्मान्य आहे!

थोडंसं विषयांतर पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमधली भाषा आणि लिपी त्या वेळच्या वापरल्या जाणाऱ्या सामान्यांच्या वापरातील होती. भारतात ज्ञानसाधना ही कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक वर्गाची मक्तेदारी नव्हती असाही ह्यातून निष्कर्ष काढता येतो. हेच ज्ञान परंपरागत पुढे गेले. १७९४ मध्येही त्या कुंभाराने चक्क सुश्रुत संहितेतील पध्दत वापरली ह्यात कोणालाही वावगं काही वाटलं नाही ह्यातूनही तेच अधोरेखित होते.

पुढे ह्या कावसजीबद्दलच्या लेखाने जगातली प्लास्टिक सर्जरीची दिशा खरंच बदलली. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुरु झाले. कावसजीचा लेख १७९४ मध्ये येउन गेल्यानंतर एक इंग्लिश सर्जन जोसेफ कॉन्स्टन्टाइन कार्प्यू (Carpue) हा सुश्रुताची कृत्रिम नाक बसवायची पद्धत लंडनमध्ये वापरू लागला. त्याने १८१४ आणि १८१५ मध्ये ह्या पद्धतीने दोन यशस्वी ऑपरेशन्स केली. ह्यावर त्याने १८१६ मध्ये 'An Account of two successful operations for restoring a lost nose from the integuments of the forehead' ह्या नावाने एक प्रबंधपण लिहिला. कार्प्यूच्या प्रबंधाचे १८१७ मध्ये कार्ल फर्डिनांड फॉन ग्रेफ (Graefe) ह्या जर्मन सर्जनने जर्मन भाषेत भाषांतर केले. त्यानंतर पुढे त्याने स्वतःचे एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव होते ‘ऱ्हीनोप्लास्टिक' (Rhinoplastik). ह्या सर्जरीला 'प्लास्टिक' हे नाव सर्वात प्रथम त्याने वापरले. कार्प्यू आणि ग्रेफच्या कामाची युरोपात भरपूर प्रशंसा झाली. 'ऱ्हीनोप्लास्टी' ह्या कृत्रिम नाक बसवायच्या सर्जरीला खूप मागणी येऊ लागली. आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा पाया जगात ह्या दोघांनी ऱ्हीनोप्लास्टीद्वारे घातला असे मानले जाते. कावसजीची गोष्ट खरी असो वा नसो - पण ह्याचे मूळ श्रेय सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला जाते हे मात्र त्रिवार सत्य आहे - म्हणूनच सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला 'Father of Plastic Surgery' आपण सर्व जगात छातीठोकपणे म्हणू शकतो!

समाप्त

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो: बॉवर मॅन्युस्क्रीप्टचा एक भाग

ता क: बॉवर मॅन्युस्क्रीप्टस सध्या कुठे आहेत? इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डमध्ये - युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या बॉडलिअन लायब्ररीत हर्न्लेची आठवण म्हणून ह्या जतन करून ठेवलेल्या आहेत. जर कुणी लंडनला येणार असेल तर मला नक्की सांगा, आपण बघायला जाऊया!

जिज्ञासूंना हर्न्लेने केलेले बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे भाषांतर येथे वाचायला मिळेल: https://archive.org/stream/TheBowerManuscript#page/n1/mode/2up

शोध सुश्रुताचा - भाग ४

Image may contain: 3 peopleसोबतचे पहिले चित्र पहा. दिसतात की नाही दोघे दाढीवाले सख्खे भाऊ? अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावसभाऊ होते हे दोघे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या जगातल्या दोन सर्वशक्तिमान साम्राज्यांचे सम्राट होते. डावीकडचा आहे रशियाचा झार दुसरा निकोलस आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज (आपल्यासाठी त्या काळचा 'भो पंचम भूप जॉर्ज' वगैरे वगैरे). ह्या दोन भावांमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरु झाली - मध्य आशियात साम्राज्य विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवे होते आणि ब्रिटीशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती. आणि ब्रिटीशांना मध्य आशियामधले रशियाचे अस्तित्व नकोच होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील होते. ह्या चढाओढीचे नावपण इतिहासात समर्पकपणे ठेवलेले आहे - 'द ग्रेट गेम'. ह्या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. ह्याच चढाओढीत काही वर्षांनी ह्या दोघांचा तिसरा मावस भाऊ उतरला - तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कैझर विल्हेम आणि ह्या ग्रेट गेमचे रुपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झाले. तीन मावस भावांनी आपापसात खेळलेले हे युद्ध - पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली!

आपल्याला पहिल्या महायुद्धाइतके दूर जायचे नाहीये. आपण एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी थांबूया. सन १८८८. इराण नावाचा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्या ठिकाणी भरपूर टोळ्या आणि अनेक छोटी मोठी संस्थाने होती. 'खानत' म्हणत असत त्यांना. अमिरांच्या अमिराती आणि खानांच्या खानत. अफगाणिस्थानची परिस्थिती अगदी आजच्यासारखी होती. कोणतीही मध्यवर्ती राजवट नसलेली. (आणि असली तरी तिला न जुमानणाऱ्या 'सार्वभौम' टोळ्या!). मध्य आशियातल्या देशांमधले बरेचसे ब्रिटीश, रशियन, तुर्की, आणि अफगाणी व्यापारी पार्ट टाईम व्यापार करायचे आणि पार्ट टाईम इंग्लंडसाठी किंवा रशियासाठी हेरगिरी करायचे. त्यांचे मोठे मोठे व्यापारी काफिले असायचे त्यामुळे हेरगिरी वगैरे उद्योग सोपे पडायचे आणि वरून भरपूर पैसे. हेरगिरी म्हणजे त्या त्या भागातली माहिती (विशेषकरून सैनिकी) आणायची आणि आपापल्या ब्रिटीश किंवा रशियन मालकांना पुरवायची. असाच एक स्कॉटीश व्यापारी होता. ॲंड्रू दाल्ग्लेइश (Andrew Dalgleish) हे त्याचे नाव. हा ब्रिटीश हेर होता. ह्याची बायको मध्य आशियातल्या यार्कंद भागातली होती. स्वतः ॲंड्रूला तिकडची स्थानिक उघ्यूर भाषा नीट अवगत होती. त्यामुळे व्यापार आणि हेरगिरी दोन्ही सुरळीत चालले होते. लेह-लडाख मधून मध्य आशियात हा व्यापारासाठी बरीच ये-जा करायचा.

मार्च १८८८ मध्ये व्यापारासाठी ॲंड्रू लेहवरून यार्कंदला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर बरेचसे नोकर आणि अनेक स्थानिक यात्रेकरू होते. काही अंतर गेल्यावर दाउद मोहोम्मद नावाचा एक क्वेट्टा भागातला पठाण त्याच्या काफिल्यात सामील झाला. दाउद मोहोम्मद पूर्वीचा व्यापारी होता पण व्यापारात दिवाळे निघाल्याने सध्या रशियासाठी लपून-छपून हेरगिरी करत होता. ८ एप्रिल १८८८ रोजी हा काफिला काराकोरम खिंडीत पोहोचला. ॲंड्रू सगळ्यांच्या पुढे होता. काराकोरम खिंड पार करून त्याने आपला तंबू बर्फात टाकला होता. संध्याकाळ झाली होती. थोडे चहापाणी करून आवरेपर्यंत बाकीच्या सगळ्यांची खिंड पार करून झाली. बाकी काफिल्याचे तंबू ठोकून झाले. ॲंड्रू सगळ्या तंबूंची पहाणी करायला निघाला. अनेक लोकांनी त्याला चहा विचारला पण सस्मित नाही म्हणून तो पुढे निघाला. जाताजाता प्रत्येक तंबूमधून रोटीचा छोटा तुकडा घ्यायला तो विसरला नाही. (मुस्लिम जगतात बंधुभाव दाखवण्यासाठी ह्या प्रथेला फार मोठे महीत्त्व होते - आणि ॲंड्रूला हे नीट माहित होते!) चालत चालत तो काफिल्याच्या शेवटी पोहोचला. दाउद मोहोम्मदचा तंबू नुकताच लावून झाला होता. त्याच्या तंबूत बसून ॲंड्रूने त्याचा हालहवाल विचारला. व्यापार नीट कसा करावा ह्याचा ॲंड्रू त्याला सल्ला देत होता. अचानक मोहोम्मद उठला. ॲंड्रूने विचारले, "कुठे चाललास?" मोहोम्मद म्हणाला, "काही नाही. जरा बाहेर जाऊन येतो." मोहोम्मद ताडकन तंबूबाहेर गेला. ॲंड्रूला कसलाच संशय आला नाही. मोहोम्मद बाहेर जाउन त्याची बंदूक घेऊन आला आणि तंबूच्या भिंतीमधून त्याने ॲंड्रूवर पाठीमागून गोळी चालवली. गोळी ॲंड्रूया खांद्याला लागली. तो कळवळला पण लगेच उठायचा प्रयत्न त्याने केला. त्याचा तंबू होता सर्वात पुढे म्हणजे अगदी लांब. त्यामुळे कोणतेही हत्यार आणणे अशक्य होते आणि आता दाउद मोहोम्मद नंगी तलवार घेऊन त्या तंबूत घुसला होता. दाउदने केलेले तलवारीचे वार ॲंड्रूने दोन हातांनी झेलायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी तो जखमी अवस्थेत बाहेर पळाला आणि बर्फात उताणा पडला. दाउद मोहोम्मदाने त्याचावर सपासप वार करून त्याला यमसदनास धाडले. ॲंड्रूचे नोकर आणि असलेले यात्रेकरू हा सगळा प्रसंग घाबरून बघत होते. दाऊदने त्या सर्वांना धमकावले. रात्रीचे जेवण बनवले गेले. दाउद ॲंड्रूच्या तंबूत परतला आणि ॲंड्रूच्या पलंगावरच त्या रात्री झोपला. सकाळी तो तिथून निघून गेला. अश्या प्रकारे एक ब्रिटीश हेर एका रशियन हेराकडून मारला गेला.

ॲंड्रू ब्रिटीशांचा 'माणूस' असल्याने ब्रिटीश सरकारने ह्या सर्व प्रकारचे साक्षी पुरावे करून लागलीच पुढच्या वर्षी - म्हणजे १८८९ मध्ये - हॅमिल्टन बॉवर नावाच्या एका आर्मी इन्टलीजन्स ऑफिसरला ह्या कामगिरीवर लेहला धाडले. ह्याचे काम एकच होते ते म्हणजे दाउद मोहोम्मदला पकडणे. संपूर्ण मध्य आशियामधून एका माणसाला शोधणे आणि त्याला पकडणे अशक्यप्राय काम होते. पण हॅमिल्टन बॉवरने हे काम स्वीकारले. तो लेहमधून निघाला आणि दाउद मोहोम्मदचा शोध घेत घेत तिआन शान डोंगरांच्या पायथ्याशी कुशर नावाच्या गावात पोहोचला. ह्या गावात दाउद मोहोम्मदची चौकशी करता करता त्याला एक तुर्की माणूस भेटला. त्याने बॉवरला सांगितले की जवळच एक वाळवंट आहे आणि स्थानिक लोक मानतात की त्याच्या खाली एक शहर गाडलेले आहे. तो माणूस आणि त्याचा मित्र तिथे खजिना शोधायला गेले होते. पण त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. फक्त एक जुनाट पुस्तकासारखे काहीतरी मिळाले. बॉवरला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला ते घेऊन यायला सांगितले. तासाभरात तो माणूस ते घेऊन परत आला. ते पुस्तक म्हणजे एक हस्तलिखित पोथी होती. (बॉवरच्या मूळ इंग्लिश ट्रॅव्हल रेकॉर्डस मध्ये 'पोथी' हाच शब्द आहे!) त्यातली अक्षरे संस्कृतसारखी होती. सहज उत्सुकता म्हणून बॉवरने ही पोथी पैसे देऊन विकत घेतली. पुढे आपले 'नेटवर्क' वापरून बॉवरने दाउद मोहोम्मदला समरकंदजवळ पकडले. (कसे पकडले ते सांगायची ही जागा नाही!) पण तुरुंगात दाउद मोहोम्मदने संशयितरीत्या फाशी लावून घेऊन आत्महत्या केली. (त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही!) बॉवरने लेहमध्ये ॲंड्रू दाल्ग्लेइशसाठी एक स्मारक बांधले आणि तो कलकत्त्याला परत आला. त्याने ती विकत घेतलेली पोथी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. त्याची भाषा अगदी वरवर संस्कृतसारखी वाटली तरी अगम्य भाषेत ती लिहिली होती - त्यांना काही ती वाचता येईना. कोणीतरी तज्ञ माणसाकडून त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे गरजेचे होते.

पुढे कोणी केले हे काम? नक्की काय होते त्या पोथीत लिहीलेले?

पुढच्या भागात पाहूया!

क्रमश:

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो १: रशियाचा झार दुसरा निकोलस आणि इंग्लंडचा पाचवा जॉर्ज, हॅमिल्टन बॉवर

फोटो २: बॉवरला मिळालेली 'पोथी' आणि त्यातील अगम्य भाषा

Sunday, December 2, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ३


एक मात्र नक्की की सुश्रुत नावाचा कोणी एक माणूस होऊन गेला ह्याची आपल्याकडे काहीही ऐतिहासिक नोंद नाही. इतिहास लिखाणाच्या बाबतीत एकूणच उदासीनता. मग कसं शोधायचं ह्या सुश्रुताला? पहिले सोप्पे उत्तर - अर्थातच सुश्रुत संहितेतून. इंटरनेटवर शोधले तर सुश्रुत संहितेबद्दल भरपूर म्हणजे अगदी भरपूर लेख, पुस्तके, आणि वर्तमानपत्रातले लेख मिळतात. पण सर्वात व्यापक आणि विश्वसनीय असे सुश्रुत संहितेचे इंग्रजीतले भाषांतर १९०७ साली केलेले कविराज कुंजलाल भिशग्रत्न ह्यांचे आहे. सूत्रस्थान / निदानस्थान - कल्पस्थान / उत्तर तंत्र असे हे तीन खंड आहेत. ह्या खंडांमध्ये कविराजांनी त्यांना उपलब्ध असणाऱ्या सर्व पुरातन हस्तलिखितांमधल्या सर्व 'सुश्रुत' ह्या नावाने येणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय कामाचा समावेश केला आहे. हे तीनही खंड बघण्यासारखे आहेत. लेखाच्या शेवटी मी ह्या तीनही खंडांच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या जिज्ञासूंनी पहाव्यात.
Image may contain: 1 personआता आपण सुश्रुत संहितेबद्दलच्या समस्या पाहूया. आज आपल्याला उपलब्ध असणारी सुश्रुत संहिता ही कमीत कमी एक वेळा आधीच्या एका सुश्रुत संहितेवर बेतलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन ह्याने ही आज आपल्याला माहित असलेली संहिता बनवलेली आहे. त्यामुळे हे सांगणे अशक्य आहे की त्यातले किती मूळचे आणि किती नागार्जुनाने वाढवलेले अथवा वगळलेले आहे. दुसरी समस्या म्हणजे कविराजांनी बघितलेल्या हस्तलिखितांमध्ये एकापेक्षा जास्त सुश्रुतांचा उल्लेख येतो. (सुश्रुताचा उल्लेख महाभारतातपण आहे!) त्यामुळे हे ठरवणे कठीण आहे की नेमका 'आपला' सुश्रुत कोणता! कविराजांच्या मते हा सुश्रुत गौतम बुद्धाच्या आधी २०० वर्षे होऊन गेला असावा - म्हणजे त्याचा काल ईसवी सन पूर्व ८०० येतो - पण ह्याबद्दल कोणतेच पुरावे नाहीत. काही इतिहास संशोधकांचे मत आहे की सुश्रुत बुद्धानंतर झाला. नक्की काहीच माहित नाही.
अजून पुढे काही प्रश्न उभे रहातात. सुश्रुत संहिता ही स्वतः सुश्रुताने लिहिली का त्याच्यानंतर काही शतकांनी त्याच्या एखाद्या शिष्याने? सुश्रुत मर्त्य मानव होता की पुराणांमधल्या अश्विनीकुमारांसारखा एखादा 'देव'? मी त्याला 'देव' म्हणण्याचे कारण सांगतो. हे उदाहरण पहा. समजा (असे न होवो पण) लंडन एखाद्या नैसर्गिक प्रलयामुळे गाडले गेले आणि आजपासून २००० वर्षानंतर उत्खनन सुरु असताना 'Leadership lessons from life of James Bond' ह्या नावाचे एक पुस्तक सापडले ज्याची काहीच मधली पाने शिल्लक आहेत. त्या वेळचे संशोधक काय अंदाज बांधतील? ते म्हणतील २००० वर्षांपूर्वी जेम्स बॉन्ड नावाचा कुणी एक महान नेता लंडनमध्ये होऊन गेला होता. आज आपली तीच परिस्थिती सुश्रुताबद्दल नाहीये का? आपल्याला फक्त लिखाणात 'सुश्रुत' भेटतो आणि बाकी कुठल्याच इतिहासात नाही. माझ्या म्हणण्याचा मुद्दा हा आहे की सुश्रुत संहिता पुस्तकाच्या कालावरून सुश्रुत कधी होऊन गेला (आणि झाला की नाही!) ह्याची काहीच माहिती मिळत नाही. पण आपल्याला समजा एखादे असे पुस्तक अथवा हस्तलिखित मिळाले ज्यामध्ये सुश्रुताच्या आयुष्याचा 'उल्लेख' येतो तर मग आपण मान्य करू की सुश्रुत नावाचा माणूस खरंच होऊन गेला. आणि हा उल्लेख जर एखाद्या शल्यक्रियेविषयीच्या हस्तलिखीतामध्ये मिळाला तर आपण नक्की म्हणू शकू की सुश्रुत नावाचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत माणूस होऊन गेला असावा. आपल्या लंडनच्या उदाहरणाकडे पुन्हा जाऊया. जर २००० वर्षांनंतर संशोधकांना २०१८ सालच्या वर्तमानपत्रात (ज्याची तारीख शाबूत आहे) जेम्स बॉन्ड चित्रपट परीक्षणाचा काही भाग वाचायला मिळाला तर? तर त्यांना असे म्हणता येईल की आधी मिळालेल्या पुस्तकातली व्यक्ती आणि परीक्षणातली व्यक्ती एकच आहे. ते असा निष्कर्ष काढू शकतील की जेम्स बॉन्ड हा २०१८ च्या आसपास होऊन गेला. पण हा माणूस खरा होता की नाही हे ते सांगू शकतील का? अजिबात नाही!
पुढची पायरी म्हणजे एखादे जुने हस्तलिखित (ज्यात सुश्रुताचा उल्लेख आहे) मिळवून त्याचा काल निश्चित करणे आणि त्यावरून सुश्रुताच्या कालखंडाचा अंदाज करणे. पण हेही खूप कठीण आहे कारण आपल्याकडच्या हस्तलिखित ग्रंथांचे कालखंड फारसे जुने नाहीयेत. आपल्याकडच्या सर्वात जुन्या ऋग्वेदाची प्रत सन १४६४ मधली आहे (पुण्याच्या भांडारकर ईन्स्टीटयुटमध्ये ठेवलेली आहे) - ह्यावरून असं म्हणायचं का की ऋग्वेद फक्त ५५० वर्षे जुना आहे? किंवा ह्याआधी भारतात ग्रंथच लिहीले गेले नाहीत? म्हणजे ही पद्धतपण संपूर्ण विश्वसनीय नाहीये. दुर्दैवाने सुश्रुत नावाच्या माणसाचा आपला शोध येथे येऊन थांबल्यासारखा होतो.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न - इटलीमध्ये कागदोपत्री पुरावे आहेत की त्यांच्याकडे सोळाव्या शतकात त्वचारोपणाचे प्रयोग सुरु झाले होते आणि काही यशस्वीसुद्धा होत होते. मग मागील लेखात पाहिल्याप्रमाणे सुश्रुतालाच जग ह्या शास्त्राचे जनक का म्हणते? कशावरून हे जगमान्य आहे की भारतात त्यांच्या आधी हे शास्त्र विकसित झालेले होते? असे एखादे हस्तलिखित अथवा ग्रंथ आहे की ज्यात सुश्रुताचा उल्लेख आढळतो आणि जो १९०७ सालच्या आधी कविराजांनी अभ्यासला नाही? ह्याचे उत्तर आहे - होय! कविराजांनी त्यांचे ग्रंथ प्रकाशित करायच्या आधी ही हस्तलिखिते लेह भागात घडलेल्या एका संशयित रशियन गुप्तहेराच्या खूनामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या अपघातात्मक परिस्थितीमुळे सापडली होती. एखाद्या हॉलीवूडपटात शोभावी अशी ती घटना होती. काय झाले होते नक्की? कशी शोधली गेली ही हस्तलिखिते? पुढच्या लेखात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: कविराज कुंजलाल भिशग्रत्न
सुश्रुत संहिता - खंड १: https://archive.org/stream/englishtranslati01susruoft…
सुश्रुत संहिता - खंड २: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaDvitiyaKhanda1…
सुश्रुत संहिता - खंड ३: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaTritiyaKhanda1…

शोध सुश्रुताचा - भाग २


मागील भागात आपण पाहिलं की ऑक्टोबर १७९४ मध्ये पुण्यातल्या एका कुंभाराने कावसजीवर केलेल्या सर्जरीमुळे युरोपातील - विशेषतः इंग्लंडमधील डॉक्टरांची आणि सर्जन्सची झोप उडाली. येथे एक गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे की ती वाहवा त्या सर्जरीला मिळाली होती - ती एका 'कुंभाराने' केली होती म्हणून नव्हे. इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स - जिची फेलोशिप जगातले डॉक्टर्स मिळवतात आणि मानाने Fellow of Royal College of Surgeons (F.R.C.S.) असे स्वतःच्या नावामागे लावतात - ह्या संस्थेचे संस्थापक मूळचे न्हावी होते. इंग्लंडमध्ये पंधराव्या - सोळाव्या शतकांमध्ये जखमी सैनिकांवर सर्जरी मुख्यतः हे न्हावी (ज्यांना 'बार्बर सर्जन्स' म्हणत) करत असत. आजही इंग्लंडमध्ये पारंपारिक सर्जन्सना स्वतःला 'डॉक्टर' म्हणून घ्यायला आवडत नाही. त्यांच्यामते औषधे देणारा साधा 'मेडिसिन मॅन' म्हणजे 'डॉक्टर' - 'सर्जन' म्हणजे त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा (शैक्षणिकदृष्ट्या) जो प्रत्यक्ष ऑपरेशन करतो आणि म्हणून त्यांच्या स्वतः च्या नावामागे ते 'मिस्टर' लावतात आणि नावापुढे FRCS. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची स्थापना १८०० ची म्हणजे कावसजीवर केलेल्या ऑपरेशननंतर फक्त ६ वर्षांनंतर झाली - हा नक्कीच योगायोग नव्हता!
Image may contain: 1 person, sittingआता पुन्हा सुश्रुताकडे वळूया. त्याआधी एक गोष्ट करून पहा. गुगल ईमेज सर्च मध्ये 'Sushrut Surgeon India' हे सर्च करून पहा. पहिला जो फोटो येतो तो आपण सगळीकडे पाहिलेला असतो. एक दाढीवाला तेजस्वी माणूस एका रुग्णाच्या चेहेऱ्यावर काहीतरी शस्त्रक्रिया करत आहे. साधी पांढरी धोतरे घातलेले त्यांचे दोन सहाय्यक आहेत ज्यांनी रुग्णाला धरून ठेवले आहे - एक साडी नेसलेल्या बाई हातात काहीतरी घेऊन त्यांना मदत करत आहेत. एक सहाय्यक फक्त मागे उभा राहून हे सर्व पहात आहे. राजा रवि वर्म्याने काढल्यासारखे वाटते हे चित्र. बरेचदा त्याखाली लिहिलेले असते "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये प्लास्टिक सर्जरी करताना" किंवा "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करताना". चित्र तेच असते फक्त कॅप्शन्स वेगवेगळ्या असतात. ह्या असल्या चित्रांखाली मी 'सुश्रुत' हे नाव पहिल्यांदा वाचले.
मग मी शोधायचा प्रयत्न केला कोणी बरं काढलं आहे हे चित्र? चित्रातला माणूस खरंच 'सुश्रुत' आहे का? काही तथ्य आहे का ह्या कॅप्शन्समध्ये? बऱ्याच शोधाअंती समजलं की हे चित्र कुणा भारतीयाने काढलेले नाहीयेच! १९४८ मध्ये पार्क - डेव्हीस नावाच्या औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीने रॉबर्ट थोम नावाच्या चित्रकाराला ८५ चित्रे काढायचे काम दिलेले होते - त्याने ८ वर्षे रिसर्च करून ही सगळी चित्रे काढली - त्यातलेच हे एक चित्र! पार्क - डेव्हीस कंपनीने ही सगळी चित्रे एकत्र करून त्याचे विविध संच बनवले आणि अमेरिकेतल्या सगळ्या डॉक्टरांकडे पाठवून दिले. अनेक डॉक्टरांनी ही चित्रे आपापल्या वेटिंग रूम मध्ये लावून टाकली. मग पार्क - डेव्हीस कंपनीने हळूच कंपनी ब्रांडीगसाठी ही चित्रे वापरून टाकली. आपण जे हे 'सुश्रुता'चे चित्र पहातोय त्याची फुल पेज जाहिरात १० ऑगस्ट १९५९ च्या 'टाईम' मासिकात आलेली होती. खाली लिहिले होते "Plastic Surgery, usually regarded as a recent medical advance, was practised thousands of years ago by a Hindu surgeon, Susruta. Living in a society that punished wrongdoers with physical disfigurement, his restorative skills were greatly in demand. His writings contributed to the spread of Hindu medicine throughout the ancient world.". पुढच्या काही दशकांमध्ये हे चित्र भारतात आले. आपल्याकडे त्याच्या लाखो-करोडो कॉप्या बनल्या आणि एका औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या ऐवजी हे चित्र आयुर्वेद आणि सुश्रुताचे 'ब्रांडीग' करू लागले!
जर पार्क - डेव्हीस कंपनीला खात्री होती की सुश्रुत होता आणि तो ही ऑपरेशन्स करायचा मग आपण कशाला आपलं डोकं खपवतोय? रॉबर्ट थोमने सुद्धा जवळपास ८ वर्षे अभ्यास करून मगच ही चित्रे काढली होती - मिळाले असेल त्याला एखादे सुश्रुताचे चित्र - आपल्याला काय करायचेय? पण आपण जर इथेच थांबलो तर आपल्याला सुश्रुताचा 'शोध' कधीच लागणार नाही. भारतात जवळपास १००० वर्षांपूर्वी ही ऑपरेशन्स होत असत ह्याची खात्री देता येणार नाही. खरंच सुश्रुत नावाचा कोणी माणूस होऊन गेला का? खरंच तो प्लास्टिक सर्जरी करायचा का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत रहातात!
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या आधी आपण छोट्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. सुश्रुत कोण होता? याचा कार्यकाल काय होता? अनेक संदर्भ - अगदी पार्क - डेव्हीसच्या जाहिरातीपण - सांगतात की सुश्रुत ह्या शास्त्राचा जनक होता. ह्या शास्त्राची सर्व सूत्रे सुश्रुतच्या पुस्तकात - 'सुश्रुत संहिते'त मिळतात. सुश्रुताबद्दल आपल्याकडे काहीच माहिती नाही पण नशिबाने 'सुश्रुत संहिता' मात्र उपलब्ध आहे.
मग कोणी लिहिली 'सुश्रुत संहिता' आणि कधी? शोधू शकतो का आपण? हे आपण पुढच्या भागात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: रॉबर्ट थोमचे सुप्रसिद्ध चित्र

शोध सुश्रुताचा - भाग १

देश इंग्लंड. जानेवारी १७३१ चा हाडे गोठवून टाकणारा थंड गारठा. इंग्रजी भाषेला इंग्लंडच्या राष्ट्रभाषेचा दर्जा मिळून फक्त ८० वर्षे झालेली. सन १०६६ नंतर इंग्लंडमध्ये इंग्रजी बोलणे कमीपणाचे मानले जात असे. सध्या मराठीचे जे मुंबईत हाल आहेत तेच इंग्रजीचे इंग्लंडमध्ये हाल होते. तिला अशिक्षित खेडवळांची भाषा मानली जात असे. इंग्रजीत कोणतीही साहित्यनिर्मिती होत नसे. जवळपास ५५० हून अधिक वर्षे खुद्द इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषा फ्रेंच आणि लॅटिन भाषेच्या वर्चस्वाखाली होती. लोकांच्या दबावामुळे शेवटी १६५० मध्ये कोर्टाच्या निकालाने जानेवारी १६५१ पासून इंग्रजीचा सार्वत्रिक वापर (राज्यकारभारात / न्यायदानात / सार्वजनिक शिक्षणात इत्यादी.) इंग्लंडमध्ये पुन्हा सुरु झाला आणि इंग्रजीला पुन्हा वैभवाचे दिवस आले. त्या तपशीलवार इतिहासाबद्दल पुन्हा कधीतरी.
Image may contain: 2 peopleतर पुन्हा वळूया जानेवारी १७३१. पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम संपले नव्हते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायला ४५ वर्षे शिल्लक होती. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एडवर्ड केव्ह नावाच्या माणसाने जगातले पहिलेवहिले मासिक छापले. 'द जन्टलमन्स मॅग्झिन' हे त्याचे नाव. एडवर्ड हा एका चांभाराचा मुलगा. अत्यंत धडपड्या. त्याने ही मासिकाची कल्पना लंडनमध्ये बऱ्याच लोकांकडे मांडली पण कुणाला पसंत पडली नाही. शेवटी त्याने स्वतःच कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. हे ते आद्य मासिक आणि त्यानंतर आलेली जगातली सर्व मासिके ह्याच 'द जन्टलमन्स मॅग्झिन' वर बेतलेली आहेत. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक ह्या मासिकासाठी लिहीत असत. युरोपात ह्या मासिकाला प्रचंड मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनी त्या वेळी भारतात आपले हातपाय पसरत होती. त्यामुळे पूर्वेकडील देशांमधील विविध गोष्टी - चालीरीती ह्या मासिकामूळेच युरोपात कळाल्या. तब्बल २०० वर्षे हे मासिक चालले आणि १९२२ मध्ये बंद झाले. ह्या लेखाचा विषय हे मासिक नाहीये. मी ह्या मासिकाचे जुने अंक चाळत असताना ऑक्टोबर १७९४ मध्ये ह्या मासिकात आलेला एक लेख माझ्या पहाण्यात आला. तो लेख हा कुतूहलाचा मुद्दा आहे. तो काय ते आपण पाहूया.
ह्या लेखाचे नाव होते "A portrait illustrative of a remarkable chirurgical operation" (म्हणजे मराठीत: "एका शल्यक्रियेचे चित्र आणि लेख"). ह्या चित्रात एक कावसजी नावाचा मराठी (होय!) माणूस दाखवला आहे. काळासावळा. डोक्यावर पागोटे असलेला. खांद्यावर फडके घेतलेला. एकदम दमदार गडी. कावसजीचे चित्र 'द जन्टलमन्स मॅग्झिन' मध्ये यायचे कारण म्हणजे पुण्यात (होय पुण्यात!) त्याच्यावर झालेली Rhinoplasty (ऱ्हीनोप्लास्टी: म्हणजे कृत्रिम नाक बसवण्याची शस्त्रक्रिया!). १७९४ मध्ये जेव्हा युरोपातील डॉक्टर शरीरातील एकीकडील त्वचा दुसरीकडे लावू शकत नव्हते तेव्हा कावसजीचे संपूर्ण नाक कृत्रिमरित्या बसवले होते. आणि ते कोणत्या राजवाड्यात नाही तर पुण्यातील रस्त्यावर - आणि तेपण एका पार्ट टाईम शल्यविशारदाने!
ह्या चित्रानंतर एक लेख होता. त्याचा सारांश असा - दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजीचे संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. तिसऱ्या इंग्रज टिपू युद्धात कावसजी इंग्रजांच्या बाजूने लढत होता आणि टिपूच्या सैन्याद्वारे पकडला गेला. कावसजी हा काही शिपाई नव्हता आणि सैन्यात बैलगाडी चालवत होता. त्यावेळच्या प्रचलित शिक्षेनुसार कावसजीचे नाक कापून टाकले गेले. कावसजी तिथून पुण्याला गेला आणि एका कुंभाराकडून हे नवीन नाक बसवून घेतले.
त्या कुंभाराने सर्वप्रथम मेणाने कावसजीच्या नाकाच्या मापाचा आकार बनवून घेतला. तो कावसजीच्या कपाळावर (चेहेऱ्यावर नाकाच्या ठिकाणी नव्हे!) बसवला. कपाळावर त्या मेणाभोवती त्याचा आकार (outline) काढून घेतला. नंतर एका चाकूने त्या आकाराची त्वचा कापली पण ती संपूर्ण कापून टाकली नाही. दोन डोळ्यांच्या मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवली. त्यानंतर मेणाला नाकाचा आकार देऊन ते नाकाच्या जागी बसवले. कपाळावरून आणलेली त्वचा त्याच्यावर पांघरली. थोड्या जडीबुटी लावल्या. काही आठवड्यात ती त्वचा नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) रुजली. कपाळाचा व्रण तीन महिन्यांनी भरला. ह्या लेखाचा समारोप "This operation is very generally successful." ह्या वाक्याने केलेला आहे. अधिक माहितीसाठी सोबतचे कावसजीचे मूळ चित्र पहा.
ह्या लेखाने युरोपात खळबळ माजवली. युरोपिअन डॉक्टर्स ह्या गोष्टीवर अनेक वर्षे रिसर्च करत होते. पण शरीराचा कोणताही भाग कापला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला की तो वाळून जात असे. त्याला योग्य रक्तपुरवठा अथवा प्राणवायू न मिळाल्याने तो कोमेजून जात असे. युरोपिअन डॉक्टर्स गालांवरून अथवा मांड्यांवरुन नीट त्वचा कापू शकत असत पण ती खोट्या नाकावर बसवली की ती कडक होऊन जात असे - आणि ह्यासाठी त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. पण ह्या पुणेरी कुंभाराने हा प्रश्न सोडवला होता. डोळ्यांच्या मध्ये ती त्वचा मूळ शरीराशी संलग्न असल्याने ती वाळून जायचा अथवा कडक व्ह्यायचा प्रश्न उरला नाही. त्या त्वचेला रक्त आणि प्राणवायू नियमित मिळाल्याने नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) ती व्यवस्थित रुजत होती. आणि एकदा का ती रुजली की मग डोळ्यांच्या मधील तो ब्रीज कापून टाकत असत. कपाळावर व्रण रहात असे पण संपूर्ण नाक नसण्यापेक्षा हे केव्हाही बरे होते!
कावसजीबद्दलच्या या लेखाबद्दल गेली अनेक शतके वाद सुरु आहेत. अगदी २००९ मध्येपण ब्रिटीश मेडिकल जर्नल्स हा विषय चघळत होती. हा कावसजीबद्दलचा लेख खरा असो वा नसो पण ह्या एका लेखाने संपूर्ण युरोपातील डॉक्टर्स आणि सर्जन्सना हलवून टाकले. त्यांची विचारसरणी बदलून टाकली. सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ह्या शाखांमधील मूलभूत बदलांसाठी हा लेख कारणीभूत ठरला. सर्जरीसाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांमध्ये बदल करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताबद्दल आणि भारतीय चिकित्सापद्धतीबद्दल त्यांच्या मनात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली. आयुर्वेदाचे नाव युरोपात ह्याआधी गेले होते. कोणी एक 'सुश्रुत' हा "Father of Plastic Surgery" म्हणून त्यांना माहीत होता. त्याची 'सुश्रुत संहिता' ऐकून माहीत होती. पण त्याची पद्धत वापरून त्या कुंभाराने केलेले ऑपरेशन मात्र सर्वांची वाहवा मिळवून गेले.
कोण होता हा सुश्रुत? खरंच होता का तो "Father of Plastic Surgery"? पाहूया आपण पुढच्या भागात!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: 'द जन्टलमन्स मॅग्झिन'चा संस्थापक एडवर्ड केव्ह, कावसजीचे ऑक्टोबर १७९४ मधले चित्र
ता. क. १: ज्यांना हा मूळचा १७९४ चा लेख पहायचा असेल त्यांनी खालील लिंकवर पान ८९१ पहावे.
ता. क. २: जिज्ञासूंना 'द जन्टलमन्स मॅग्झिन' चे काही लेख खालील लिंकवर वाचायला मिळतील:

Wednesday, November 28, 2018

मांडुक्य उपनिषद-७

आपण मागच्या भागात माणसाच्या चार अवस्था असतात हे पहिले.
१> जागृतावस्था
२> स्वप्नावस्था
३>सुषुप्ती
४> तुर्यावस्था

खरेतर तीनच अवस्था म्हणता येईल. पाटल्या, हार, अंगठी आणि सोने असे चार पदार्थ  नाहीत. पाटल्या, हार आणि अंगठी यातच सोने अंतर्भूत आहे हे आपल्याला सहज समजते. परंतु सोयीसाठी आपण या चार अवस्था मानू.

या उपनिषदाच्या १२ श्लोकांपैकी पहिल्या सात श्लोकात या चार अवस्थांचे विवेचन (आत्मविचार) आहे. मात्र तुर्यावस्थेचे केवळ पुस्तकी ज्ञान असून भागणार नाही, तर त्या अवस्थेच्या अनुभवातून ज्ञान झाले पाहिजे असे मांडुक्य उपनिषद आग्रहाने सांगते. आठव्या श्लोकापासून हे उपनिषद तुर्यावस्थेचे ज्ञान होण्यासाठी एक मार्ग सुचविते. हा मार्ग (ओंकारविचार) म्हणून ओळखला जातो.

Image result for om imagesओंकाराचा उच्चार योग्य प्रकारे केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो असे मांडुक्य उपनिषद सांगते. ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. 'अ ', 'उ ', 'म' आणि उच्चाररहित अर्धमात्रा. यातील 'अ ' हा जागृतावस्थेशी, 'उ' हा स्वप्नावस्थेशी तर ' म' हा सुषुप्तीशी संबंधित आहे. उच्चाररहित अर्धमात्रा आपल्याला तुर्यापर्यंत घेऊन जाते असे हे उपनिषद सांगते. ओमचा उच्चार करताना 'म' नंतर जी स्पंदने जाणवतात त्यावर ध्यान केले असता एका विलक्षण शांततेचा अनुभव येतो. हाच तो तुर्य.

ओंकारासंबंधी मांडुक्य उपनिषदाने  काय सांगितले आहे हे स्पष्ट होण्यासाठी आपण ज्ञानेश्वरमाउलींनी ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पुढील लेखात पाहू.





Saturday, November 24, 2018

मांडुक्य उपनिषद-६

तुर्यावस्था म्हणजे काय हे समजण्यासाठी एक गोष्ट पाहू.

एका लहान मुलाने कधीही चित्रपट पहिला नव्हता. चित्रपट काय आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याच्या वडिलांनी त्याला त्याबद्दल माहिती दिली. "तेथे एक पडदा असतो. त्यावर चित्रे येतात. ती हालचाल करताना दिसतात. पण ती खरी नसतात."

मुलाला नीटसे काही कळले नाही. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला चित्रपटाच्या थेटरमध्ये नेले. ते तेथे पोचले तेव्हा चित्रपट सुरु झाला होता. अंधारात कसेबसे वाट काढत ते त्यांच्या खुर्चीपर्यंत पोचले.

समोरच्या चित्रपटातील प्रसंग मुलाला खरे वाटत होते. ती  केवळ पडद्यावर हलणारी चित्रे आहेत हे त्याचे वडील त्याला समजावून सांगत होते. तेव्हा मुलाचा समज झाला की ती चित्रे पडद्यावर कोणीतरी काढलेली आहेत. पडद्यावर काढलेली चित्रे हलतात कशी, बोलतात कशी हेच त्याला कळत नव्हते. वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. मागील पडदा कोरा आहे, त्यावर चित्रे काढलेली नाहीत हे त्याचे वडील त्याला परत परत समजावून देत होते.

Related image मध्येच त्या चित्रपटात आगीचा प्रसंग आला. त्या मुलाला वाटले, आता तो पडदा जळणार. त्याच्या हे सर्व आकलनाबाहेर होते. शेवटी त्या चित्रपटाचे मध्यंतर झाले. दिवे लागले. वडिलांनी मुलाला तो पांढरा पडदा दाखविला. प्रोजेक्टर दाखवला. त्याच्या साहाय्याने पडद्यावर चित्रे कशी पडतात हे दाखविले. पडदा नसेल तर चित्रेच दिसणार नाहीत हेही त्या मुलाच्या लक्षात आले.

आपली तुर्यावस्था ही अशीच त्या चित्रपटाच्या पडद्यासारखी आहे. चित्रपटाच्या पडद्यावर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटात कदाचित आगीचे प्रसंग असतील, पाणी असेल. पण त्यामुळे तो पडदा जळणार नाही की ओला होणार नाही. चित्रपटातील प्रसंग कोणताही असो, तो पडदा आहे तसाच राहील. पण जर तो पडदा नसेल तर चित्रपट दिसणार नाही. पडद्याच्या आधारानेच चित्रपट दिसेल. तुर्यावस्थेच्या आधारानेच जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती यांचा अनुभव आपण घेऊ शकतो. पण ते अनुभवताना होणाऱ्या सुखाचा, दु:खाचा, यातनेचा कोठलाही परिणाम तुर्यावस्थेवर होत नाही.

जसे त्या मुलाला लाईट लागल्यावर तो पडदा दिसला आणि नंतर त्या चित्रांच्या खोटेपणाची जाणीव झाली तसेच  आपल्याला आत्मज्ञान झाल्यावर तुर्यावस्थेची जाणीव होते. मध्यंतरात कोरा पडदा दिसल्यावर चित्रपटाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यावरही तो मुलगा पुढील चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकला , तसेच आत्मज्ञान झाल्यावरही आत्मज्ञानी पुरुष आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आस्वाद घेऊ शकतो. किंबहुना तणावरहित अवस्थेत तो हा आस्वाद अधिक आनंदाने घेऊ शकतो.

पुढील लेखात आपण मांडुक्य उपनिषदाने प्रतिपादलेला ओंकारविचार काय आहे हे पाहू. 

मांडुक्य उपनिषद ८

आपण मागील लेखात मांडुक्य उपनिषदाने ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पहिले. ते अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण हा ओंकारविचार ज्ञानेश्वरांनी कसा मांडला आहे पाहू. ज्ञानेश्वर हे काळाच्या दृष्टीने अधिक जवळ असल्याने त्यांचे म्हणणे कदाचित आपल्याला लौकर समजू शकेल.

ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानदेव प्रार्थना करतात. त्यात त्यांनी ओंकाराचे (शब्दब्रह्म) वर्णन केले आहे.

अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रम्ह कवळले।

ज्यावेळी आपण अकार उच्चारतो तेव्हा 'चरण युगूल' म्हणजे जेथे दोन पाय जुळतात तेथे आपले ध्यान हवे. हे स्थान मूलाधार चक्राचे आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्वाशी, म्हणजेच सर्वात स्थूल गुणांशी जोडलेले आहे. जागृत अवस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे हे आपण पहिलेच. म्हणजेच 'अ' हा जागृत अवस्थेशी जोडलेला आहे. उच्चारण करताना दोन पाय जेथे जुळतात तेथे होत असलेल्या स्पंदनांवर आपले ध्यान हवे.

उकार हा उदराशी संबंधित आहे असे ज्ञानेश्वरमहाराज सांगतात. उदरापाशी, म्हणजेच बेंबीपाशी मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र हे अग्नीतत्वाशी संबंधीत आहे. स्वप्नावस्था ही अग्नितत्वाशी संबंधीत असल्याचे मांडुक्य उपनिषद सांगते. स्वप्नावस्थेतील पुरुषास 'तेजस' असे नाव मांडुक्य उपनिषदाने दिले आहे तर स्वप्नावस्थेतील अभिमानी 'हिरण्यगर्भ ' या नावाने ओळखला जातो. स्वप्नावस्थेतील अनुभव येण्यास तेजाची आवश्यकता असते. म्हणूनच 'उ' हा स्वप्नावस्थेशी संबंधित आहे. 'उ' उच्चारताना बेंबीतील स्पंदनांकडे ध्यान हवे.

मकार हा महामंडलातुन यावा असे ज्ञानेश्वर म्हणतात. महामंडल म्हणजे 'गळा'. गळ्याच्या ठिकाणी विशुद्ध चक्र असते. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधीत आहे. आकाशतत्व सर्वात तरल तत्व आहे.  सुषुप्ती ही आपली सर्वात तरल अवस्था आहे. म्हणूनच मकार हा सुषुप्तीशी संबंधित आहे. मकार उच्चारताना गळ्याकडे ध्यान हवे.

सर्वात शेवटची जी अर्धमात्रा आहे ती  'मस्तकाकारे' असे ज्ञानेश्वरमाउली म्हणतात. हा गळ्याकडून डोक्याकडे जाणाऱ्या स्पंदनांचा उल्लेख आहे. या अर्धमात्रेच्या उच्चारणाच्यावेळी जी स्पंदने जाणवतात तिच्यावर ध्यान हवे असे ज्ञानेश्वर सुचवितात. हीच ती  तुर्यावस्थेची जाणीव. ही जाणीव जेव्हा अधिकाधिक स्पष्ट होत जाते तेव्हा एक असीम शांतता अनुभवाला येते.

ओंकारसाधना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ओंकार हा अत्यंत शांतपणे केला पाहिजे. दोन ओंकारांच्यामध्ये थांबून शरीराचा वेध घेतला पाहिजे.

ओंकाराचा असा उच्चार केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो.

आकाराने सर्वात लहान पण समजण्यास जटिल अशा मांडुक्य उपनिषदांची तोंडओळख आपण करून घेतली. मांडुक्य उपनिषदांची ओळख करून देणे ही  माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती. पण मी लिहिलेले आपण गोड मानून घेतल्याने मला उत्साह आला. धन्यवाद.

या लेखमालेतील मांडुक्य उपनिषदावरील हा शेवटचा लेख.

मांडुक्य उपनिषदाच्या ब्रह्मवाक्याचे स्मरण करून आपण मांडुक्य उपनिषदाच्या विवेचनाचा समारोप करू.

"अयम आत्मा ब्रह्म ।"  :  अर्थात "हा आत्मा ब्रह्म आहे."

Wednesday, November 21, 2018

मांडुक्य उपनिषद-५

आपण मागील एका लेखात शाश्वत सत्य म्हणजे काय पहिले. पहिल्या तीन अवस्थांचे अस्तित्व तुर्यावस्थेवर अवलंबून आहे, पण तुर्यावस्थेचे अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. म्हणूनच आपण पाहिलेल्या गोष्टीमध्ये अष्टावक्र ऋषी जनक राजाला 'तेही असत्य, हे ही असत्य. राजा केवळ तूच सत्य' असे म्हणाले.

Image result for universe imagesआपल्या विश्वात पसरलेला चैतन्याचा सागर आपल्या शरीर-मनाला प्रकाशित करतो, चैतन्य देतो. शरीर-मनाचे क्लेश, दु:ख यातना याचा परिणाम या चैतन्य सागरावर अथवा तुर्यावस्थेवर होत नाही. या तुर्यावस्थेची जाणीव झाली की शरीर/मनाचे क्लेश-यातना यापासून आपण आपल्याला अलिप्त ठेऊ शकतो.

जसे सोने ही त्या तीनही दागिन्यांची स्वाभाविक अवस्था आहे तसेच तुर्यावस्था अन्य तीनही अवस्थांची स्वाभाविक अवस्था आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकेच. ज्या क्षणी आपल्याला त्याची जाणीव होईल त्या क्षणी आपण दु:ख-यातना यापासून अलिप्त  होऊ.

तुर्यावस्थेचे वर्णन करण्याला भाषेच्या मर्यादा येतात. एखाद्या गोष्टीचा अथवा साधर्म्य असलेल्या गोष्टीचा अनुभव असलेल्यालाच भाषेद्वारे आपण काही सांगू शकतो. उदाहरणार्थ आयुष्यात कधीही गोड न खाल्लेल्याला आपण साखरेची चव कशी असते हे शब्दात सांगू शकत नाही. फार तर 'छान वाटते' एवढेच सांगू. मांडुक्य उपनिषद म्हणूनच तुर्यावस्थेचे वर्णन करताना 'नेति नेति' प्रकारच्या भाषेचा उपयोग करते. म्हणजे तूर्य  असेही नाही आणि तसेही नाही.

तुर्यावस्था 'अव्यावाहारिक' आहे असेही हे उपनिषद सांगते. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काहीही उपयोग नाही. सोन्याचे दागिने घालून मिरविता येते. पण निव्वळ सोन्याचा असा काही उपयोग नाही. तरीही दागिने सोन्याशिवाय घडविणे शक्य नाही. तुर्यावस्थेचे काहीसे असेच आहे.

 तुर्यावस्था  समजून घेण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार पुढील लेखात घेऊ. 

Tuesday, November 20, 2018

मांडुक्य उपनिषद ४

मागील लेखात आपण माणसाच्या चार अवस्था आहेत हे पहिले.
१> जागृतावस्था : यात आपले चैतन्य बाह्यमुखी असते. आपल्या शरीराबाहेरच्या गोष्टींचा अनुभव घेण्याचा ते प्रयत्न करीत असते. यासाठी त्याला आपली पंचेंद्रिये आणि मन यांचा उपयोग होतो.
२> स्वप्नावस्था: यात आपले चैतन्य अंतर्मुखी होते. मनाच्या साहाय्याने बाह्य जगतात असणाऱ्या गोष्टींचे प्रक्षेपण करून स्वप्नातील पंचेंद्रियांच्या साहाय्याने ते अनुभव घेते.
३> सुषुप्ती: यात आपण गाढ झोपेत असतो. येथेही चैतन्य असते, पण या चैतन्याला प्रकट होण्यासाठी कोठलेही साधन (Object) नसते. चैतन्य हे प्रकाश किरणांसारखे असते. अंतराळात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला असतो. पण एखादी वस्तू असेल तरच त्यावर परिवर्तित झालेल्या प्रकाशामुळे आपल्याला त्या प्रकाशाचे ज्ञान होते. अंधाऱ्या आकाशात प्रखर झोत टाकला तरी आपल्याला त्याचे ज्ञान होणार नाही. वाटेत धुळीचे कण असतील तरच त्याचे  ज्ञान होईल. (उदा. धूमकेतूच्या शेपटीतील धुळीमुळे अंतराळातील प्रकाशाचे ज्ञान होते) सुषुप्तीमध्ये चैतन्य प्रकट होत नाही. पण ते अस्तित्वात असल्यानेच झोपेतून उठल्यावर शांत झोप लागली होती याचे ज्ञान होते. सुषुप्ती ही आपली बीजावस्था आहे. कारण उठल्यावर आपल्याला परत या विश्वाचे भान येते. म्हणजेच हे भान सुषुप्तावस्थेत बीजावस्थेत असते.

Related image
या तीन अवस्थांचे प्रत्येकी तीन भाग करता येतील. पुरुष, अभिमानी आणि द्रष्टा. जनकराजाच्या गोष्टीत स्वप्नावस्थेमध्ये जनक राजा लढाई करत होता, रस्त्यावरून जात होता, आक्रोश करीत होता. हा स्वप्नपुरुष-स्वप्नातील पुरुष-होय. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आले की हे सर्व स्वप्न होते, हे त्याच्याच मनाने निर्माण केलेले जग होते. हे जाणणारा झाला स्वप्नअभिमानी, हे सर्व स्वप्न माझेच आहे असा अभिमान (ego) असणारा. हे सर्व स्वप्न आणि जाग आल्यावर आलेले भान आपल्या चैतन्यात घडले. हे चैतन्य धारण करणारा तो स्वप्न द्रष्टा.

असाच प्रकार जागृतावस्थेतही असतो. जागृतावस्थेत आपण म्हणजे जागृत पुरुष. पण जेव्हा आपण आपली स्वत:ची ओळख विशाल करतो तेव्हा जागृत अभिमानी दिसतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा भारत-पाकिस्तानची क्रिकेटस्पर्धा पाहतो तेव्हा अंतरंगात आपण भारताच्या विशाल समुदायाचा भाग होतो. एखादा माणूस जातीसाठी-धर्मासाठी काही विचार करतो तेव्हा तो त्या विशाल समुदायाचा भाग होतो. अशाच प्रकारे जेव्हा तो सर्व मानवजातीचा भाग होतो तो जागृतअभिमानी होतो. ज्या चैतन्यात हे घडते ते जागृत द्रष्टा होय. सुषुप्तावस्थेत सुषुप्त  अभिमानी  आणि द्रष्टा असतो. मात्र सुषुप्त पुरुष नसतो कारण चेतना बाह्यजगात प्रक्षेपित होत नसते.
या सर्व अवस्थांत द्रष्टा हा एकच असतो. तोच तुर्य म्हणता येईल.

जागृत पुरुष हा व्यवहारासाठी उपयुक्त असतो तर जागृत अभिमानी हा आनंद उपभोगतो. जागृत द्रष्टा हा मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतो.

चौथी तुर्यावस्था म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव,  आपण विशाल चैतन्यसागर असल्याची जाणीव.
 मागील लेखातील उदाहरणात सोने जसे पाटल्या, हार, अंगठी अशा अनेक रूपात प्रकट होते, परंतु अंतरंगी ते सोनेच असते तसेच आपली तुर्यावस्था अन्य तीन अवस्थांमध्ये प्रकट होते. आपल्याला आपल्याला पाटल्या पाहिल्यावर ते सोने आहे याची जाणीव झटकन होत नाही, तसेच जागृतावस्था, स्वप्नावस्था अथवा सुषुप्तीमध्ये आपल्या तुर्यावस्थेची जाणीव नसते. पण या अवस्थांच्या पाठीशी तुर्यावस्था ठामपणे उभी असते. जसे सोने काढून घेतले तर पाटल्यांचे अस्तित्व राहात नाही तसेच तुर्यावस्थेशिवाय अन्य अवस्थांचे अस्तित्व उरत नाही. सोनाराला जसे कोठल्याही दागिन्यात सोनेच दिसते तसेच ज्ञानी (आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव झालेल्या) पुरुषास कोठल्याही अवस्थेत तुर्यावस्थेचेच दर्शन होते.

पुढील लेखात आपण या तुर्यावस्थेची अधिक माहिती घेऊ.


Saturday, November 17, 2018

मांडुक्य उपनिषद -3

मागील लेखात आपण जनक राजाची गोष्ट पहिली. राजाला 'पडलेले भयंकर स्वप्न खरे की उठल्यावर अनुभवास येणारे राजवैभव खरे' हा प्रश्न पडला होता. त्यावर अष्टावक्र ऋषींनी स्वप्नातला अनुभव आणि जागृतावस्थेत अनुभव या दोहोंना असत्य ठरविले. मात्र राजाला 'केवळ तूच सत्य' असल्याचे प्रतिपादन केले.
खरे तर आपण जागृतावस्थेत अनुभवांना सत्य समजतो तर स्वप्नावस्थेतील अनुभवांना असत्य समजतो. म्हणूनच प्रथम आपण भारतीय अध्यात्मानुसार 'सत्य' म्हणजे काय हे समजून घेऊ.
भारतीय अध्यात्मानुसार जे चिरकाल टिकते तेच सत्य असते. ज्याचे अस्तित्व अन्य गोष्टींवर अवलंबून असते (dependent existence) ते असत्य समजले जाते. उदाहरणार्थ सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा हार, सोन्याची अंगठी हे वेगवेगळे पदार्थ आहेत. परंतु तुम्ही सोनाराकडे ते गहाण ठेवायला गेल्यास त्याच्या दृष्टीने ते फक्त सोने आहे. सोन्याच्या पाटल्या वितळवून त्याचा हार बनविता येतो. अशावेळी पाटल्या नष्ट होऊन त्याचा हार होतो. परंतु 'सोने' तसेच राहते. सोने काढून  टाकल्यास हार राहणार नाही. परंतु हार काढून टाकल्यास (तो वितळविल्यास) सोने तसेच राहते. म्हणजेच हाराचे अस्तित्व सोन्यावर अवलंबून आहे, पण सोन्याचे अस्तित्व हारावर अवलंबून नाही (Absolute existence). या हाराच्या अवलंबित अस्तित्वाला (dependent existence) भारतीय अध्यात्माने 'असत्य' म्हटले आहे. या दृष्टीनेच जनकाला 'केवळ तूच सत्य' असे अष्टावक्र ऋषी सांगतात.
आपण आपल्या जागृतावस्थेमध्ये ज्याचा अनुभव घेऊ शकतो त्यालाच सत्य समजतो. म्हणूनच शंकराचार्यानीं त्याला व्यावहारिक सत्य म्हटले आहे तर अध्यात्मिक भाषेतील सत्याला शाश्वत सत्य अथवा अंतिम सत्य म्हटले आहे. शाश्वत सत्याची ही व्याख्या समोर ठेऊनच आपण मांडुक्य उपनिषदाचे विवेचन करणार आहोत.

Image result for तुर्यावस्थामाणसाच्या तीन अवस्था आपल्याला सहज ओळखता येतात.
१> जागृतावस्था
२>स्वप्नावस्था
३> गाढ निद्रा (सुषुप्ती)
मांडुक्य उपनिषदाच्या मते चौथी अवस्थाही अस्तित्वात आहे. त्याला मांडुक्य उपनिषद कोणतेही नाव न देता चौथी (चतुर्थ) अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चौथी असाच होतो. आज तुर्यावस्था हेच नाव प्रचलित आहे.

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.
या अवस्थांच्या मधल्याही अवस्था असू शकतात. जागृतावस्थेत आपले मन भरकटून दिवास्वप्ने बघू शकतो. किंवा जागृतावस्थेत डुलक्या येऊ लागतात.
या तीनही अवस्थांमागे त्या अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्थेसंबंधी पुढील लेखात आपण विस्ताराने विचार करणार आहोत.


Thursday, November 15, 2018

मांडुक्य उपनिषद २

मांडुक्य उपनिषद हे केवळ १२ श्लोकांचे आहे आणि ते सांगायचे आहे ते थेट सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच हे उपनिषद अत्यंत महत्वाचे पण समजण्यास जाटील आहे हे आपण मागील लेखात पहिले.

हे उपनिषद समजण्यास सोपे व्हावे म्हणून एका गोष्टीने प्रारंभ करू.

जनक राजा एकदा आपल्या महालात निद्रा घेत होता. एक पहारेकरी आत आला आणि त्याने जनक राजाला त्याच्या शत्रूने अचानक हल्ला केल्याचे सांगितले. राजा लढाईची तयारी करू लागला. परंतु युद्धात त्याची हार झाली. शत्रूने  त्याचे राज्य घेतले आणि त्याला परराज्यात हाकलून दिले. सर्वस्व हरलेला जखमी अवस्थेतील जनकराजा गलितगात्र होऊन चालू लागला. शत्रुराजाच्या भीतीने त्याला कोणीही मदत केली नाही. अशावेळी तो एका अन्नछत्रात पोचला. तेथे अन्नासाठी गरीब, दरिद्री लोकांची रांग लागलेली होती. अत्यंत भुकेलेल्या अवस्थेत तो रांगेत उभा राहिला. त्याचा अन्न घेण्यासाठी नंबर येताच अन्नछत्रातील अन्न संपले. तेथील सेवकाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. पण खूप आर्जवे केल्यावर त्या खिचडीच्या भांड्यातील खाली राहिलेली थोडी पेज सेवकाने राजाला दिली. जनकराजा ते पेजेचे भांडे मुखाला लावणार तोच एक घार येऊन त्याच्या भांड्याला धडकली आणि ती सर्व पेज मातीत मिसळली. जनक राजा दु:खाने आक्रोश करू लागला.

तोच एका सेवकाने राजाला झोपेतून उठविले  आणि आक्रोशाचे कारण विचारले. राजा जागा झाला . पण त्याला प्रश्न पडला की 'आता पाहत आहोत ते सत्य का मगाशी पाहिलेले सत्य". त्याने त्या सेवकाला प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?'. त्या बिचाऱ्याला याचे उत्तर देता आले नाही. राजाने राणीलाही हा प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?' तिला राजा काय विचारतो आहे तेच कळले नाही.  राजा आता वेडापिसा झाला. प्रत्येकाला तो हाच प्रश्न विचारू लागला.  राजसभा भरली. तेथेही तो सर्वांना हाच प्रश्न विचारू लागला. सभेचे कामकाज ठप्प झाले.

जनक राजाला वेड लागल्याची बातमी राजधानीत पसरली. अष्टावक्र ऋषींच्या कानावर हे गेले. ते दरबारात आले. जनक राजाने त्यांना तोच प्रश्न विचारला  ' हे सत्य का ते सत्य?' अष्टावक्र ऋषींनी उत्तर दिले, 'राजा, हेही असत्य आणि तेही असत्य.' राजा गोंधळात पडला. त्याने विचारले  'मग सत्य काय?' 'राजा, केवळ "तू" सत्य. तेव्हा पाहिलेले शत्रूराष्ट्राचे सैन्य, तुझी दारूण अवस्था आता आहे काय? म्हणूनच ते असत्य. आताचा दरबार तेव्हा होता काय? मग हे ही असत्य. पण राजा दोन्हीवेळी बघणारा तू मात्र होतास. म्हणून केवळ तूच सत्य'

पुढील लेखात या गोष्टीच्या अंतरंगात शिरून मांडुक्य उपनिषद समजून घेण्याचा प्रयत्न करू.


Sunday, October 28, 2018

मांडुक्य उपनिषद १

उपनिषदे हे भारतीय प्राचीन ज्ञानाचे अत्युच्च शिखर समजले जाते. तसेच जगातील अत्यंत प्राचीन साहित्यापैकी एक समजले जाते. उपनिषदे हे वेदांचे एक अविभाज्य अंग आहे. वेदांचे सार त्यात सामावले आहे, म्हणून त्याला वेदांत म्हटले जाते. ('अंत' या शब्दाचा एक अर्थ 'शेवट' असा आहे तर दुसरा अर्थ 'शिखर' असाही आहे. उदा. 'सिद्धांत'). बहुसंख्य उपनिषदे वेदांच्या शेवटी येत असली तरी काही उपनिषदे वेदांच्या मध्येही येतात. म्हणून 'वेदांत' शब्दाचा 'वेदांचे सार'अर्थ योग्य वाटतो.

उपनिषदे अनेक आहेत. 'मुक्तीकोपानिषद ' या उपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत. असे असले तरी दहा (अथवा अकरा) उपनिषदे महत्वाची समजली जातात. याचे कारण या उपनिषदांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. (अकराव्या उपनिषदावरील भाष्य आद्य शंकराचार्यांचे आहे काय याबद्दल काहींच्या मनात शंका आहे). 'वेदांत (उत्तर मीमांसा) दर्शन' याच शंकरभाष्यावर आधारलेले आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत मताचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी प्रतिपादिलेले दर्शन 'अद्वैत वेदांत' म्हणून ओळखले जाते. आपण मांडुक्य उपनिषदाची ओळख या अद्वैत वेदांताच्या परिभाषेत करून घेणार आहोत.

मांडुक्य उपनिषद हे सर्वात महत्वाचे आणि कठीण समजले जाते. मुक्ती मिळविण्यासाठी हे एकच उपनिषद समजून घेतले तरी पुरेसे आहे असेही काहीजण मानतात. आद्य शंकराचार्य त्यांच्या भाष्यात म्हणतात की या उपनिषदात वेदांताचे सारे सार सामावलेले आहे. यात  केवळ १२ श्लोक आहेत. हे उपनिषद अथर्ववेदाचा भाग आहे. यातील सातवा श्लोक या संपूर्ण उपनिषदाची मध्यवर्ती कल्पना आहे.; या उपनिषदात इतर अनेक उपनिषदाप्रमाणे गुरु-शिष्य संवाद अथवा कथा नाही.
मांडुक्य उपनिषदावरील गौडपादाचार्यांचे भाष्यही (मांडुक्यकारिका या नावाने) प्रसिद्ध आहे. गौडपादाचार्य हे आद्य शंकराचार्यांचे आजेगुरू. गोविंदपादाचार्य हे गौडपादाचार्य यांचे शिष्य. आद्य शंकराचार्य हे गोविंदपादाचार्य यांचे शिष्य. आद्य शंकराचार्यांनी मूळ मांडुक्य उपनिषद तसेच गौडपादाचार्य यांनी लिहिलेल्या कारिकेवरही भाष्य लिहिले आहे. या दृष्टीनेही मांडुक्य उपनिषदाचे महत्व आहे. १२ श्लोकांच्या मांडुक्य उपनिषदावर गौडपदाचार्य यांनी २१५ कारिका लिहिल्या आहेत. शंकराचार्यांच्या भाष्यावरही अनेकांनी टीका लिहिल्या आहेत. यामुळे या उपनिषादावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे.

गौडपादाचार्यांच्या मांडुक्यकारिकेत चार प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण मूळ मांडुक्य उपनिषदातील श्लोक पूर्वपक्ष म्हणून आले आहेत. दुसऱ्या प्रकरणात हे जग कसे मायावी (मिथ्या) आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या प्रकरणात अद्वैतवादाचा पुरस्कार आहे. चौथ्या प्रकरणात यावर असलेल्या अन्य मतांचा परामर्श घेतलेला आहे.

मांडुक्य उपनिषद 'मी कोण आहे' याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. अन्य सर्व उपनिषदांप्रमाणे हे उपनिषदही 'आपण प्रत्येक जण ब्रह्म असल्याचे' प्रतिपादन करते. 'अयम् आत्मा ब्रह्म|' हे मांडुक्य उपनिषादातले ब्रह्मवाक्य आहे.परमेश्वर शोधण्यासाठी अन्य कोठेही जाण्याची गरज नाही. तो या क्षणी येथेच , तुमच्यातच आहे हे सर्वच उपनिषदे आग्रहाने सांगतात. तुम्हाला परमेश्वर बघायचा असेल तर तो काही विशेष रूपाने, चमत्कार घडून, अवकाशातून येणार नाही तर तो येथेच तुमच्यातच उपस्थित आहे असे हे सांगणे आहे. वेदांतानुसार परमेश्वर (ब्रह्म) अन्य कोणत्या जगात, स्वर्गात नाही तर तो सर्वव्यापी आहे. तसेच परमेश्वर (ब्रह्म)  सदा सर्वकाळ सर्व ठिकाणी  उपलब्ध आहे.  प्रश्न तुम्हाला त्याची अनुभूती येण्याचा आहे.म्हणजेच अध्यात्माचा प्रवास हा space आणि time मधून नाही तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे आहे. प्रत्येक उपनिषदाचा सांगण्याचा दृष्टीकोन (Approach) वेगवेगळा आहे. पण अंतिमत: सर्व उपनिषदे या एकाच गोष्टीचा पुरस्कार करतात. मांडुक्य उपनिषदाचा दृष्टीकोन या विषयाला सरळ भिडण्याचा आहे. म्हणूनच केवळ १२ श्लोकांत हे उपनिषद जे काही सांगायचे आहे ते सांगून टाकते.

हे उपनिषद दोन भागात विभागलेले आहे. पहिले सात श्लोक 'आत्मविचार' म्हणून ओळखले जातात. ते आत्म्याच्या स्वरूपाची माहिती देतात. नंतरचे श्लोक 'ओमकार विचार' म्हणून ओळखले जाते. यात ओमकाराचा उपयोग करून आपले ब्रह्मस्वरूप आपल्याला कसे ओळखता येते याचे विवेचन आहे.



Friday, October 19, 2018

किं प्रयोजनम्

माझा उपनिषदांचा अभ्यास आणि त्यावर लेखन चालू आहे. ईशावास्य उपनिषद आणि केन उपनिषद यांचा अभ्यास आणि त्यावर फेसबुक/Blog वर लेखन केले आहे. आता 'मांडुक्य उपनिषदाचा' अभ्यास  चालू आहे. सुमारे एक-दोन महिन्यात त्यावर लिहिता होईन.

पण माझ्या काही सुहृदांना मी या विषयावर का लेखन करीत आहे हा प्रश्न पडला आहे. म्हणून त्यासबंधी थोडे स्पष्टीकरण द्यावेसे वाटले. 'उपनिषदांच्या अभ्यासाने अथवा अध्यात्माच्या अभ्यासाने काही फायदा होतो काय?' हा तो मूलभूत प्रश्न आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात असा प्रश्न पडणे रास्तही आहे.

कोठलाही माणूस सतत दोनच गोष्टींमागे धावत असतो.
१> दु:ख अथवा यातना कमी व्हाव्यात
२> आनंदात राहावे

किंबहुना आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येकाची धडपड चालू असते. मग तो कोट्याधीश असो अथवा रस्त्यावरील भिकारी असो. म्हणूनच वेदात आत्मा हा आनंदस्वरूपी असल्याचे म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या निर्वाणषटकात "चिदानंद रूप: शिवोहम शिवोहम' असे आत्म्याचे वर्णन केले आहे.

अध्यात्माची सारी साधना हा आनंद मिळविण्यासाठी असते. आत्मा हा कायम आनंदात असतो. त्यामुळे आपल्याला आत्म्याचे हे स्वरूप 'अनुभवाला आले' की आपणही कायम आनंदात राहतो. जोपर्यंत आपल्याला आपले हे आत्मरूपी स्वरूप अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपण आपल्या शरीराला, मनालाच स्वत:शी एकरूप केलेले असते. त्यामुळे शरीराला/मनाला होणाऱ्या सुखातच आपण आनंद शोधीत असतो, दु:खात आनंदापासून वंचित होतो. एकदा या आत्मस्वरूपाचा अनुभव आला की आपण आपल्याला आपले शरीर, मन यापासून वेगळे समजू शकतो. मग शरीराला/मनाला होणारे दु:ख/यातना आपला आनंद हिरावून घेऊ शकत नाहीत. आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यावरही शरीराला/मनाला दु:ख-यातना होतातच. पण त्यापासून आपण अलिप्त असतो.

आत्मस्वरूपाविषयी 'पुस्तकी ज्ञान' मिळविणे आणि त्याचे स्वरूप 'अनुभवणे' या भिन्न गोष्टी आहेत.
हा आत्मस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अध्यात्मात तीन प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत.
१> भक्तिमार्ग
२> ध्यानमार्ग
३> ज्ञानमार्ग

या तीन मार्गांसंबंधी आपण पुढील लेखात अधिक माहिती घेऊ.

Sunday, September 30, 2018

केन उपनिषद ३

केन उपनिषदासंबंधी मागील दोन लेखांत थोडी माहिती घेतली. आता ‘ब्रह्म’ (चैतन्य) या संदर्भात हे उपनिषद काय सांगते हे पाहू.

  1. मन आणि शरीर यापेक्षा चैतन्य हे वेगळे आहे. चैतन्य हे मन अथवा शरीरामुळे निर्माण झालेले नाही. आधुनिक विज्ञान चैतन्य हे शरीर अभिक्रियांचा परिपाक आहे असे मानते. परंतु उपनिषदांना हे मान्य नाही. 
  2. चैतन्य हे मन आणि शरीरापेक्षा वेगळे आहे. परंतु ते मन आणि शरीराला उर्जा (चेतना) पुरविते. चैतन्य हे मनाला प्रकाशित करते, चेतना देते. मन हे शरीराला चेतना देते असे उपनिषदे मानतात.  
  3. चैतन्य हे देह आणि मनापुरते मर्यादित नाही. चैतन्य हे सर्वव्यापी आहे. एखादी वस्तू, देह, मन काहीही नसेल तरीही तेथे चैतन्य आहेच. येथे प्रकाशाचे उदाहरण घेता येईल. अवकाशात सर्वत्र ताऱ्यांपासून आलेला प्रकाश असतो. 
  4. देह, मन इत्यादींचे अस्तित्व चैतन्याच्या अस्तित्वामुळेच कळू शकते. जसे काळोखात वस्तू असतात, परंतु प्रकाशाशिवाय त्यांचे अस्तित्व कळत नाही.
  5. जर देह आणि मन नसेल तेथे चैतन्य अस्तित्वात असेल, परंतु त्याचे अस्तित्व प्रकट होणार नाही. चैतन्याचे प्रकटीकरण होण्यास देह/मनाची आवश्यकता असते. अवकाशात सर्वत्र प्रकाश असतो. परंतु एखादी वस्तू त्याच्या मार्गात आली तरच त्या प्रकाशाच्या परावर्तनाने  (Reflection) त्या प्रकाशाचे अस्तित्व आपल्यास कळते. अन्यथा प्रकाश आहे हे कळणार नाही. तसेच काहीसे हे आहे. 

आपण म्हणजे हे सर्वव्यापी चैतन्य आहोत. म्हणूनच सर्वांभूती एकाच आत्मा आहे असे वेदांत दर्शन मानते. (सांख्य दर्शनापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. सांख्य दर्शन प्रत्येकाचा ‘पुरुष’ वेगळा आहे असे मानते.) अविद्येमुळे आपल्या मनात अहंकाराचा उगम होतो आणि आपण स्वत:ची ही चैतन्यरूपी ओळख विसरतो. या अविद्येचा नाश करून आपल्या चैतन्यस्वरूपाची जाणीव करून घेणे हे जीवनाचे इतिकर्तव्य आहे असे उपनिषदे मानतात.
केन उपनिषदाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. पुढील लेखात कठोपनिषदाची ओळख करून घेऊ.

Saturday, September 29, 2018

केनोपानिषद २

या आधीच्या लेखात आपण केन उपनिषदात शिष्याने उपस्थित केले प्रश्न पहिले. मनाचे व्यापार कोण चालविते, डोळ्यांनी बघणारा कोण आहे, कानांनी ऐकणारा कोण आहे, वाणीने बोलणारा कोण आहे अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. अध्यात्मिक उच्च पातळीवर पोचलेल्या शिष्याचे हे प्रश्न आहेत.या प्रश्नांना उत्तर देताना उपनिषदातील ऋषी थोडे कोड्यातच उत्तर देतात. ब्रह्म मनाचे मन आहे, डोळ्यांचे डोळे आहे, कानांचे कान आहे असे उत्तर हे ऋषी देतात. एकच ब्रह्म अथवा चैतन्य सर्व विश्वाला चेतना देते. त्यामुळे मनाला, डोळ्यांना, कानांना चेतना देणारे हेच ते ब्रह्म आहे. ब्रह्म मनाला चेतना देते, हेच मन त्या चेतनेमुळे डोळ्यांना बघण्याची चेतना देते, कानांना ऐकण्याची चेतना देते, जिभेला बोलण्याची चेतना देते.
आपण मागील लेखात विचार केलेल्या उदाहरणात पंखा हा विजेमुळे फिरतो. याचा अर्थ ती वीज पंख्याबरोबर फिरत नाही. तीच वीज दिव्याला प्रकाशण्याची चेतना देते. हीच वीज रेफ्रिजरेटरमध्ये वस्तू थंड करण्याची चेतना देते तर हिटरमध्ये हवा गरम करण्याची चेतना देते. म्हणजेच एकाच शक्ती तिचे प्रत्यंतर अनेक रूपांत देते. असेच ब्रह्माचे आहे. एकच ब्रह्म अनेक रूपांत आपल्यासमोर प्रकट होते.
पण विजेसारखेच हे ब्रह्म आपल्याला दिसत नाही. वीज जशी अनेक रूपांत प्रकट झाल्यावर ती आहे हे कळते तसेच ब्रह्माचे प्रकटीकरण झाल्यावरच आपल्याला त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण ब्रह्माला पाहू शकत नाही, मनाने त्याची कल्पना करू शकत नाही. ब्रह्म हे अतिंद्रिय आहे. जो कोणी ब्रह्म समजल्याचा दावा करीत असेल त्याला ब्रह्म समजलेलेच नसते असे हे उपनिषद सांगते.
आपण ब्रह्मस्वरूपी आहोत. आपले मन अथवा शरीर हे ब्रह्माच्या अस्तित्वामुळेच प्रकट झालेले दिसते. असे हे सर्व विश्व व्यापून राहिलेले ब्रह्म आपल्या मनात, शरीरात प्रकट होते, त्याला प्रकाशित करते. या मनातच आपला अहंकार अथवा स्वत्वाची जाणीव उगम पावते. पण आपण खरे ब्रह्मस्वरूप आहोत. या ब्रह्मस्वरूपाची जाणीव झाल्यावर आपल्याला आपल्या ‘अमरत्वाची’ जाणीव होते. कारण हे शरीर/मन नाशवंत आहेत, पण ब्रह्म चिरंतन आहे.
यातून आपल्याला ब्रह्मासंबंधी पाच गोष्टी कळतात. त्याचा उहापोह पुढील लेखात करू.

Friday, September 28, 2018

केनोपानिषद -१

उपनिषदांच्या मालिकेतील हे दुसरे उपनिषद. उपनिषदे हे भारतीय प्राचीन ज्ञानाने गाठलेले अत्युच्च शिखर म्हणता येईल. एकूण १०८ उपनिषदे आहेत. त्यापैकी १० महत्वाची मानली जातात. ही उपनिषदे महत्वाची मानली जाण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. उत्तर मीमांसा (वेदांत) दर्शन या दहा उपनिषदांवर आधारलेले आहे. या दहापैकी ईशावास्य उपनिषद आपण मागील लेखात पहिले. आता केन उपनिषद पाहू.

Image result for केनोपनिषदकेन उपनिषद ‘केन’ या शब्दाने सुरु होते. म्हणून त्याला केन उपनिषद म्हणतात. ईशावास्य उपनिषद हे ‘ईशावास्य’ शब्दाने सुरु होते म्हणून त्याचे नाव ईशावास्य उपनिषद आहे हे आपण मागील लेखात पहिले. परंतु सर्व उपनिषदांची नावे या पद्धतीने आलेली नाहीत. केन उपनिषद हे सामवेदाचा भाग म्हणून येते.
काही उपनिषदे मोठी आहेत, तर काही लहान आहेत. ईशावास्य उपनिषद सर्वात लहान आहे. त्यानंतर केन उपनिषदाचा क्रम लागतो. अत्यंत थोड्या शब्दात मोठा आशय सामावल्यामुळे ही उपनिषदे समजून घेण्यास कठीण वाटतात.

बहुतेक उपनिषदे प्रश्न-उत्तर स्वरूपात आहेत. केन उपनिषद हे ही शिष्याने विचारलेला प्रश्न आणि त्याला उत्तर याच स्वरूपात आहे. मात्र हा शिष्य आणि त्याला उत्तर देणारे गुरु यांचे नाव अज्ञात आहे. हा शिष्य अध्यात्मिक उंचीवर पोचलेला असावा हे त्याच्या प्रश्नावरून लक्षात येते.

मी विचार करतो, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, जिभेने चव घेतो, स्पर्श अनुभवतो. पण माझ्या डोळ्यांनी बघण्यामागे कोणती शक्ती आहे, कामांनी ऐकण्यामागील शक्ती कोणती हा प्रश्न या शिष्याला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा या उपनिषदाचा मुख्य हेतू आहे. जर या सर्व गोष्टी म्हणजे केवळ मेंदूतील रासायनिक प्रक्रिया असतील तर जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यात काय फरक आहे? हे शरीर तर केवळ एक यंत्र आहे, मग या यंत्राला जाणून घेणारे, Analysis करणारे कोणी यामागे आहे काय हा तो प्रश्न आहे. माझ्या समोरचा एक पंखा फिरत आहे, दुसरा फिरत नाही. दोन्ही पंखे एकाच प्रकारच्या सामुग्रीपासून बनलेले आहेत. मग एक फिरत आहे आणि दुसरा बंद आहे असे का? एक दिवा बंद आहे, दुसरा प्रकश देतो आहे असे का? फिरणाऱ्या पंख्यामागे, प्रकाशणाऱ्या दिव्यामागे कोणती शक्ती काम करत आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पंख्यामागे, दिव्यामागे कार्यरत असलेल्या विद्युत शक्तीचा शोध घेण्यासारखा हा प्रयत्न आहे.

या प्रश्नाला गुरुजींनी काय उत्तर दिले हे पुढील भागात पाहू.

Sunday, September 9, 2018

तक्षशिला


प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!  .
 
तक्षशिला ही प्राचीन नगरी आपले नाते जोडते प्रभू रामचंद्राशी! हा प्रांत त्या काळात केकय म्हणून ओळखला जात होता. दशरथाच्या काळात या देशाचा राजा होता अश्वपती. अनेक अश्व असलेला, अश्वांचा स्वामी किंवा अश्वांचा व्यापार करणारा राजा असावा, असे त्याच्या नावावरून वाटते. याची कन्या कैकयी ही दशरथाची कनिष्ठ भार्या होती. युध्दशास्त्रात आणि राजकारणात पारंगत होती. एकदा कैकयीचा पुत्र भरत आजोळी गेला होता. त्या वेळी दशरथाने रामाला राज्याभिषेक करायचे ठरवले. अश्वपतीने कैकयीबरोबर लग्नात पाठवलेली हेर मंथरा, ही बातमी ऐकताच कामाला लागली. तिने कैकयीचे कान फुंकले. रामाला वनवास आणि भरतासाठी राज्य मागायला सांगितले. कैकयीने आपले ठेवणीतले वर मागितले. राम वनवासात गेला आणि दशरथ पुत्रवियोगाने मृत्यू पावला. त्या वेळी भरत केकय प्रांतातून निघून थेट अयोध्येस आला.

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!


पुढे भरताने रामासाठी चौदा वर्षे राज्य केले. राम परत आला. रामाला राज्याभिषेक होऊन तो अयोध्येचा राजा झाला. त्यानंतर भरताचे पुत्र तक्ष आणि पुष्कल हे भरताच्या आजोळी केकयला गेले. असे सांगितले जाते की तक्षने तक्षशिला नावाची एक नवीन नगरी वसवली, तर पुष्कलने पुष्कलावती नावाची नगरी वसवली. जवळच रामपुत्र लवने लवपुरी वसवली, तर कुशने कुशावती नावाची नगरी वसवली. आज या चारही नगरी पाकिस्तानमध्ये आहेत, ज्या तक्षिला, पेशावर, लाहोर आणि कुसूर या नावांनी ओळखल्या जातात.

तक्षशिला, पुष्कलावती, लवपुरी आणि कुशावती या नगरींची नाळ अयोध्येशी जोडली होती एका प्राचीन महामार्गाने. या महामार्गाचे नाव होते - उत्तरापथ. रामायणात या पथाचे नाव येत नाही, पण केकय ते अयोध्या हा प्रवास वेगाने करता येण्यासारखा होता हे कळते, त्या अर्थी हा मार्ग तेव्हा अस्तित्वात असावा. उत्तरापथवरील तक्षशिला ही एक अतिशय समृध्द नगरी होती. या नगरीद्वारे उत्तर भारत Silk Roadला जोडला गेला होता. Silk Roadने चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तक्षशिला भरभराटीस आली होती. मौर्यांच्या काळात उत्तरापथ पाटलीपुत्रपर्यंत पोहोचला. कुषाण, गुप्त, हर्षवर्धनपासून शेरशहा सुरीने आणि नंतर इंग्रजांनी या मार्गाचा विकास केला. वाजपेयींच्या काळात हा रस्ता सुवर्ण चतुष्कोनचा भाग म्हणून विकसित केला गेला.

आज हा महामार्ग चट्टग्राम (चित्तगाव - Chittagong)पासून काबुलपर्यंत जाणारा Grand Trunk Road म्हणून ओळखला जातो. हा आशियातील सर्वात प्राचीन आणि सर्वात लांब महामार्ग आहे.

रामाशी नाते सांगणारी तक्षशिला, महाभारतातील कृष्णाशीसुध्दा नाते सांगते. तक्षक नागाच्या दंशाने हस्तिनापूर नरेश परीक्षिताचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी परीक्षिताचा पुत्र जनमेजय याने तक्षशिला येथे सर्पसत्र केले होते. या यज्ञात व्यासांचे शिष्य वैशंपायन आले होते. त्या वेळी जनमेजय राजाने त्यांना आपल्या पूर्वजांची कथा सांगण्याची विनंती केली. वैशंपायनांनी व्यासलिखित महाभारताचे आख्यान सांगितले. महाभारताची सुरस, रोमांचकारक आणि अमर कथा पहिल्यांदा सांगितली गेली ती तक्षशिला नगरीत. पांडवांच्या विजयाचे, कृष्णाच्या नीतीचे आणि भगवंताच्या गीतेचे अलौकिक शब्द प्रथम उमटले ते तक्षशिलेला!

बौध्द साहित्यात तक्षशिला नगरीचा उल्लेख गांधारची राजधानी म्हणून येतो. आज तक्षशिलेला अनेक स्तूपांचे अवशेष पाहायला मिळतात. त्याबद्दल पुढील लेखांमधून विस्ताराने जाणून घेऊ.

तक्षशिला हे व्यापाराचे केंद्र होते, तसेच विद्येचेही केंद्र होते. येथील विद्यापीठाची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. ग्रीस, रोम, पर्शिया, मध्य आशिया, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया येथून आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येथे येत असत. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच शिकायला मिळत असे. गणित, ज्योतिष, अर्थशास्त्र, वैद्यक शास्त्र, व्याकरण आदी विषय येथे शिकवले जात. एका वेळी 10,000 विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था होती. तक्षशिलेच्या विद्यापीठात शिकलेले आणि शिकवणारी काही भारतीय रत्ने म्हणजे व्याकरणकार पाणिनी, आयुर्वेदाचार्य चरक आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्य.

या नगरीवर मौर्य, यवन, कुशाणपासून गुप्तांपर्यंत अनेक राजघराण्यांनी राज्य केले. साधारण पाचव्या शतकात तक्षशिलेवर हूणांनी केलेल्या स्वारीनंतर इथला व्यापार मंदावला, बौध्द मठ ओस पडू लागले आणि विद्यापीठही लयास गेले. सातव्या शतकात शवान झांग आला, तेव्हा त्याने या नगरीत पडक्या वास्तू पहिल्या होत्या. हळूहळू ही नगरी अगदीच विस्मृतीत गेली. हजार-बाराशे वर्षांचा काल लोटला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अलेक्झांडर कनिंगहॅमने चिनी प्रवासी शवान झांगचा वृत्तान्त वाचून तक्षशिला नगरी शोधली. इथे उत्खनन केल्यावर तक्षशिलामध्ये वेगवेगळया काळातील अवशेष मिळाले. नवाश्मयुगापासून ते कुशाणकाळापर्यंतचे अवशेष पाहायला मिळतात. इथली विविधता, प्राचीनता, भव्य अवशेष, देदीप्यमान भूतकाळ, प्राचीन जगतावरील प्रभाव या सर्वांमुळे आज पाकिस्तानमधील तक्षिला ही एक World Heritage Site आहे

Ref http://www.evivek.com/Encyc/2018/9/5/2295301

Sunday, July 29, 2018

आषाढाच्या पहिल्या दिवशी : वसंत बापट

आषाढाच्या पहिल्या दिवशी
चिंब भिजून गेली धरित्री
(कैक दिसांनी न्हाऊन माखून
प्रसन्न झाली तुटकी छत्री)

स्वर्गधरेचे मीलन झाले
सांगत फिरतो गंधित वारा
(जाने दो जी, मारो गोली
आज कचेरीस दांडी मारा)

हिरवळ हसली खडकावरुनि
झरे लागले थयथय नाचू
(गरम भजी आणि चहा भूरकुनी
आपण फिल्मी मासिक वाचू)

आषाढाच्या पहिल्या दिवशी
जलधाराना कशास भेटा
(खरे सांगु का? कवितेतच
तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा)

Wednesday, June 27, 2018

मेंदूचा default mode

डॉ. यश वेलणकर यांचा मनपूर्वक अभारासाहित पुनरप्रकाशीत

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??🤔🤔

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!

आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!

कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??🤔🤔

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!

आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!

त्यासाठीचा एक साधा उपाय करून पहा..!!

शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!

ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!

असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??

अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि

.......!!👍👍👍

Friday, June 15, 2018

ईशावास्य उपनिषद -4

ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते हे आपण पहिल्या लेखात पहिले. गीतेतील कर्मयोगाचे हेच उगमस्थान असावे. या उपनिषदात अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या नीट समजून घ्याव्या लागतात.
या उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.
इंद्रियांच्या (आवश्यकतेपेक्षा अधिक) तृप्तीसाठी  कर्मे करणारा माणूस अंध:कारात जातो. परंतु केवळ अहंकाराच्या पूर्तीसाठी कर्मे करणारा माणूस घोर अंध:कारात जातो असे हे उपनिषद सांगते.
उपनिषद ब्रह्माच्या दोन रुपांसंबंधी सांगते. एक प्रकट रूप आणि दुसरे अप्रकट. या दोन्ही रूपांची आराधना केली जाऊ शकते. परंतु या दोन्ही आराधानेची फले वेगळी असतात. प्रकट रूपाची आराधना मृत्युपर्यंत फळे देते. परंतु अप्रकट रुपाची आराधना मृत्युनंतरही फले देते.
सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन:पुन: प्रतीक्षा करतो. हेच ते सुवर्णाने झाकलेले सत्याचे मुख. सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो.
सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून 'ममत्वाला' काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते.

Saturday, June 9, 2018

ईशावास्य उपनिषद -३

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' हे ईशावास्य उपनिषदातील पहिल्याच श्लोकात आलेले महत्वाचे सूत्र. पाश्चिमात्य पद्धतीत प्रथम निरनिराळे तर्क देऊन शेवटी आपल्याला काय म्हणायचे आहे तो निष्कर्ष म्हणून पुढे ठेवला जातो. पौर्वात्य पद्धत वेगळी आहे. येथे सुरुवातीलाच निष्कर्ष ठेऊन नंतर त्याचे निरुपण केलेले दिसते. पाश्चिमात्य पद्धत म्हणजे माणूस एक दिवा घेऊन वाटचाल करीत आहे. त्याला फक्त आपल्या पावलासमोरचे दिसते. अशी हळूहळू मार्गक्रमणा होत शेवटी निष्कर्षाला येतो. पौर्वात्य पद्धत म्हणजे एका क्षणी वीज चमकते. संपूर्ण आसमंत नजरेच्या टप्प्यात येतो. नंतर तो माणूस त्याचे वर्णन करतो. म्हणूनच या उपनिषदात जे सांगायचे आहे ते पहिल्याच श्लोकात सांगून हे उपनिषद त्याचे निरुपण करते.
'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' याचा शब्दश: अर्थ 'जो त्यागतो तोच भोगतो' असा आहे. वरकरणी विरोधाभासी वाटणारे हे विधान आहे. हे उपनिषद अशाच विरोधाभासी विधानांनी परिपूर्ण आहे, म्हणूनच समजण्यास कठीण आहे. अनेकजण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या विधानाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावताना दिसतात. काहीजण याचा अर्थ आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा निर्लेपपणे भोग घ्यावा असे सांगतात. काहीजणांच्या मते याचा अर्थ दुसऱ्यांच्या धनावर आपली दृष्टी ठेऊ नये असा आहे.
मला वाटते या सूत्राचा अर्थ त्याच श्लोकातील सुरुवातीच्या सूत्रात दडलेला आहे.
ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। १ ।।
हा तो पूर्ण श्लोक आहे. स्लोकाची सुरुवातच 'ईशावास्यमिदम् सर्वम्' या घोषणेने होते. जर सर्व विश्व हे ईश्वराचेच आहे, तर माझे काहीच रहात नाही. मग मी त्याग कसला करणार? आणि अन्य लोकांकडे असलेल्या धनाची अपेक्षा तरी कशी करणार? जर याच भावनेने आपण या जगात वावरलो तर आपल्यावर कसलेच दडपण/ताण येत नाहीत. मन हलके होते. जीवनातील आनंदाचा आपण पूर्णपणे उपभोग घेऊ शकतो. जर हे जीवन आहे तसेच स्वीकारले, 'अहोभावाने' (धन्यावादपूर्वक....ईश्वराला धन्यवाद देत) स्वीकारले तर आयुष्यात एक असीम शांतीचा जन्म होतो. या शांत मानसिकतेत आपण जे काही घडत आहे त्याचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो.
एक झेन कथा आहे. एक माणूस एकदा एका झेन फकिराकडे गेला आणि विचारू लागला "मी एवढा अशांत आहे आणि आपण शांत आहात हे कसे काय?" तो फकीर म्हणाला "कारण तू अशांत आहेस आणि मी शांत आहे". तो माणूस म्हणाला "तुम्ही कसे शांत झालात हे सांगा". फकीर म्हणाला "तू अशांत कसा झालास हे प्रथम मला सांग." तो माणूस उत्तरला "मी असाच आपोआप अशांत झालो." साधू उत्तरला " मीही असाच आपोआप शांत झालो. मी स्वत: काहीच करत नाही. ईश्वराने जे 'दिले आणि दिले नाही' ते काहीतरी कारणासाठी असेल हे समजून मी त्याला धन्यवाद देतो. अशांती आली तर मान्य करतो की मी अशांत आहे. शांती आली तर तेही मान्य करतो. जर मी अशांतीत शांत होण्याचा प्रयत्न केला तर मी अधिक अशांत होईन. जे माझ्याकडे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नच मला अशांत करेल."
'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे सांगताना संत तुकारामांना असेच काही म्हणायचे असेल काय?
या पुढील लेखात ईशावास्य उपनिषदातील अन्य काही श्लोक पाहू.

Wednesday, June 6, 2018

मंगेश पा(प)डगावकर

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पा(प)डगावकर !
लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील सर्व प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !
आता पावसाळा आला हे पावसात भिजलो तरी खरे वाटत नाही.
लिज्जतने याचा गंभीरपणे विचार करावा.

ईशावास्य उपनिषद -२

सर्व काही परमात्मा आहे, ईश्वर आहे या घोषणेने शांतीमंत्रानंतर या उपनिषदाची सुरुवात होते. जीवनात जे काही घडते, आपण जे काही करतो ते ईश्वर इच्छेनेच होते असा या घोषणेचा अर्थ आहे.  या जगात जगत असूनही कर्माने लिप्त न होण्याची कला हे उपनिषद शिकविते आहे. माणसाने शंभर वर्षे आनंदाने कोठल्याही कर्माने लिप्त न होता जगावे असे हे उपनिषद सांगते. जर परमेश्वराच्या चरणी तुम्ही स्वत:ला पूर्ण अर्पण केलेत तर त्या भावनेने आपण जे कराल त्याने कर्माचे लेप अंगाला चिकटत नाहीत.
माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याच्या इंद्रियांना अनेक गोष्टींचा स्पर्श होतो. यावेळी तो आपल्या पूर्वस्मृतींच्याद्वारा या स्पर्शाला प्रतिसाद देतो. डोळ्यांनी काही गोष्टी पाहतो. त्यावेळी पूर्वी पाहिलेल्या अशाच गोष्टींच्या आठवणीने तो रागावतो अथवा दु:खी होतो. असेच अन्य ज्ञानेंद्रियांना झालेल्या स्पर्शाने घडते. यातूनच नवी कर्मबंधने निर्माण होतात. जोवर आपण या जगात आहोत तोवर हे असेच चालू राहील. पण इशावास्योपनिषद यातून मुक्तीचा मार्ग दाखविते.
'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व) यामुळे राग (लोभ), द्वेष आदी दोष माणसात येतात. त्यामुळेच कर्मबंधन माणसाला चिकटते आणि माणूस या जगात परत जन्म घेतो आणि 'भवचक्रात' अडकतो असे सर्वच उपनिषदांचे म्हणणे आहे. खरे तर 'माझे' ही भावना प्रथम निर्माण होऊन त्यातूनच 'मी' चा जन्म होतो. जर या 'माझे' असण्याचा आधारच काढून घेतला तर ममत्व निर्माण होणार नाही आणि पर्यायाने अहंकाराचा जन्म होणार नाही. जर या जगातील सर्व काही या ईश्वराने निर्माण केले आहे, त्याचेच आहे तर कोठलीही गोष्ट 'माझी' म्हणण्याला काहीच अर्थ रहात नाही. आणि मग कर्माचे लेपही बसणार नाहीत. इशावास्योपनिषाद हा अहंकारमुक्तीचा मार्ग दाखविते.
एकदा एक राजा रस्त्यावरून जात होता. त्याला एक गरीब माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस ते ओझे तसेच डोक्यावर घेऊन बसला होता. ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'राजाने मला रथात घेतले हेच खूप उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"
आपली अशीच अवस्था झालेली असते असे  ईशावास्य उपनिषदाला म्हणायचे आहे. परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे आपल्या चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे?
पुढील लेखात आपण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या पहिल्या श्लोकात आलेल्या महत्वाच्या सूत्राचा मागोवा घेऊ.




Tuesday, June 5, 2018

ईशावास्योपनिषद - १

तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |
या एका सूत्रातच या उपनिषदाला जे काही सांगायचे आहे ते सांगितलेले आहे. 'जो सोडतो तोच भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. आपण या सूत्राचा अर्थ नंतर विस्तृतपणे बघू.
शुक्ल यजुर्वेदाच्या कण्व शाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदांत ह्याला पहिले स्थान दिले जाते.
कर्म व ज्ञान या विरोधी द्वंद्वाचा समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. हे उपनिषद कर्मयोग सांगते असे आपल्याला म्हणता येईल. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले. या संहितेला ईशोपनिषद, वाजसनेयी उपनिषद, मंत्रोपनिषद असेही म्हटले जाते. तसेच ते 'ईशावास्य' (ईश्वरच सर्व काही आहे) अशी घोषणा करते. म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

 खालील शांतीमंत्र हे उपनिषद सुरु होण्यापूर्वी येतो. या शांतीमंत्रात सर्वच उपनिषदांचे सार सामावलेले आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे.

खरेतर पूर्णवाद सांगणारे उपनिषद आणि शून्यवाद सांगणारा बुद्ध एकच गोष्ट सांगत आहेत. पूर्णवादात अन्य कोणी उपस्थित नसते आणि शून्यवादातही. अन्य दुसऱ्या कोणाच्या उपस्थितीशिवाय पूर्ण किंवा शून्य हे एकाच आहेत.

हे ब्रह्म पूर्ण आहे, त्यातून काहीही काढले तरी पूर्णच शिल्लक राहते. गणिती अथवा तार्किक बुद्धिवादाच्या विरोधी भासणारे हे विधान आहे. पण ते एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. हे ब्रह्म आणि त्याने निर्माण केलेले विश्व हे अमर्याद आहेत. त्यामुळे अमर्यादित गोष्टीतून काहीही काढले तरी ते अमर्यादितच राहणार. मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. ते कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे सत्य आहे आणि हे विश्व त्यावर आरोपित केलेले आहे. हे विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण केली (अनेक विश्वे एकाच वेळी अस्तिवात असू शकतील असे आधुनिक विज्ञान सांगते) तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे.

पुढील लेखात आपण या उपनिषदात काय सांगितले आहे ते पाहू.