Saturday, June 9, 2018

ईशावास्य उपनिषद -३

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' हे ईशावास्य उपनिषदातील पहिल्याच श्लोकात आलेले महत्वाचे सूत्र. पाश्चिमात्य पद्धतीत प्रथम निरनिराळे तर्क देऊन शेवटी आपल्याला काय म्हणायचे आहे तो निष्कर्ष म्हणून पुढे ठेवला जातो. पौर्वात्य पद्धत वेगळी आहे. येथे सुरुवातीलाच निष्कर्ष ठेऊन नंतर त्याचे निरुपण केलेले दिसते. पाश्चिमात्य पद्धत म्हणजे माणूस एक दिवा घेऊन वाटचाल करीत आहे. त्याला फक्त आपल्या पावलासमोरचे दिसते. अशी हळूहळू मार्गक्रमणा होत शेवटी निष्कर्षाला येतो. पौर्वात्य पद्धत म्हणजे एका क्षणी वीज चमकते. संपूर्ण आसमंत नजरेच्या टप्प्यात येतो. नंतर तो माणूस त्याचे वर्णन करतो. म्हणूनच या उपनिषदात जे सांगायचे आहे ते पहिल्याच श्लोकात सांगून हे उपनिषद त्याचे निरुपण करते.
'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' याचा शब्दश: अर्थ 'जो त्यागतो तोच भोगतो' असा आहे. वरकरणी विरोधाभासी वाटणारे हे विधान आहे. हे उपनिषद अशाच विरोधाभासी विधानांनी परिपूर्ण आहे, म्हणूनच समजण्यास कठीण आहे. अनेकजण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या विधानाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावताना दिसतात. काहीजण याचा अर्थ आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा निर्लेपपणे भोग घ्यावा असे सांगतात. काहीजणांच्या मते याचा अर्थ दुसऱ्यांच्या धनावर आपली दृष्टी ठेऊ नये असा आहे.
मला वाटते या सूत्राचा अर्थ त्याच श्लोकातील सुरुवातीच्या सूत्रात दडलेला आहे.
ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। १ ।।
हा तो पूर्ण श्लोक आहे. स्लोकाची सुरुवातच 'ईशावास्यमिदम् सर्वम्' या घोषणेने होते. जर सर्व विश्व हे ईश्वराचेच आहे, तर माझे काहीच रहात नाही. मग मी त्याग कसला करणार? आणि अन्य लोकांकडे असलेल्या धनाची अपेक्षा तरी कशी करणार? जर याच भावनेने आपण या जगात वावरलो तर आपल्यावर कसलेच दडपण/ताण येत नाहीत. मन हलके होते. जीवनातील आनंदाचा आपण पूर्णपणे उपभोग घेऊ शकतो. जर हे जीवन आहे तसेच स्वीकारले, 'अहोभावाने' (धन्यावादपूर्वक....ईश्वराला धन्यवाद देत) स्वीकारले तर आयुष्यात एक असीम शांतीचा जन्म होतो. या शांत मानसिकतेत आपण जे काही घडत आहे त्याचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो.
एक झेन कथा आहे. एक माणूस एकदा एका झेन फकिराकडे गेला आणि विचारू लागला "मी एवढा अशांत आहे आणि आपण शांत आहात हे कसे काय?" तो फकीर म्हणाला "कारण तू अशांत आहेस आणि मी शांत आहे". तो माणूस म्हणाला "तुम्ही कसे शांत झालात हे सांगा". फकीर म्हणाला "तू अशांत कसा झालास हे प्रथम मला सांग." तो माणूस उत्तरला "मी असाच आपोआप अशांत झालो." साधू उत्तरला " मीही असाच आपोआप शांत झालो. मी स्वत: काहीच करत नाही. ईश्वराने जे 'दिले आणि दिले नाही' ते काहीतरी कारणासाठी असेल हे समजून मी त्याला धन्यवाद देतो. अशांती आली तर मान्य करतो की मी अशांत आहे. शांती आली तर तेही मान्य करतो. जर मी अशांतीत शांत होण्याचा प्रयत्न केला तर मी अधिक अशांत होईन. जे माझ्याकडे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नच मला अशांत करेल."
'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे सांगताना संत तुकारामांना असेच काही म्हणायचे असेल काय?
या पुढील लेखात ईशावास्य उपनिषदातील अन्य काही श्लोक पाहू.

1 comment:

  1. संतोष भाऊ....
    खूप छान समीक्षा
    जर हे जीवन आहे तसेच स्वीकारले, 'अहोभावाने' (धन्यावादपूर्वक....ईश्वराला धन्यवाद देत) स्वीकारले तर आयुष्यात एक असीम शांतीचा जन्म होतो.
    हे अतिशय महत्वाचे आहे.

    ReplyDelete