Sunday, July 27, 2025

पंचप्राण

 भारतीय प्राचीन अध्यात्मात "पंचप्राण" (पाच प्राणशक्ती) ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. वेद, उपनिषदे, योगशास्त्र आणि आयुर्वेद यामध्ये याचा बारकाईने उल्लेख आहे. "प्राण" म्हणजे केवळ श्वास नव्हे, तर जीवनधारणेसाठी आवश्यक अशी सूक्ष्म उर्जा. ही उर्जा शरीरात विविध कार्यांसाठी विभागलेली आहे, आणि तीच पंचप्राण म्हणून ओळखली जाते.

चला तर पाहूया, हे पंचप्राण कोणते आणि त्यांची कार्ये काय आहेत:


१. प्राण (Prāṇa)

  • स्थान: छाती, हृदय व फुफ्फुसे

  • कार्य: श्वास घेणे, हृदयाची गती नियंत्रित करणे, प्राणवायूचा प्रवेश

  • लक्षण: हेच जीवनाचे मूळ आहे. प्राण नसेल, तर जीवनच नाही.

  • दिशा: वरच्या दिशेने (उर्ध्वगामी)


२. अपान (Apāna)

  • स्थान: पोटाच्या खालचा भाग (मूलाधाराजवळ)

  • कार्य: मल-मूत्र विसर्जन, प्रसूती, शुक्रस्राव, घाम

  • लक्षण: शरीरातून बाहेर टाकण्याची सर्व क्रिया

  • दिशा: खाली जाणारी (अधोगामी)


३. समान (Samāna)

  • स्थान: नाभीच्या आसपास (पचनेंद्रियात)

  • कार्य: अन्नाचे पचन, रसविभाजन, अन्न व ऊर्जा समान रीतीने वितरित करणे

  • लक्षण: शरीरातील संतुलन राखणे

  • दिशा: अंतर्गत केंद्रीभूत (नाभीकेंद्राकडे)


४. उदान (Udāna)

  • स्थान: घशाच्या आसपास (कंठप्रदेश)

  • कार्य: बोलणे, उचकी, उलटी, झोपेत स्वप्न पाहणे, मृत्युनंतर आत्म्याचा शरीरातून बाहेर पडणे

  • लक्षण: वर जाण्याची शक्ती – ध्यान, समाधी यासाठी महत्त्वाचे

  • दिशा: वरच्या दिशेने


५. व्यान (Vyāna)

  • स्थान: सर्व शरीरभर पसरलेले

  • कार्य: रक्तसंचार, स्नायूंची हालचाल, घाम, त्वचेसंबंधी संवेदना

  • लक्षण: शरीरभर ऊर्जा आणि संदेश पोहोचवणे

  • दिशा: सर्वदिशांनी कार्यशील


थोडक्यात समजून घ्या:

प्राणशक्ती   स्थान            दिशा मुख्य कार्य
प्राण     हृदय           उर्ध्व              श्वसन
अपान     गुदप्रदेश         अधो              विसर्जन
समान     नाभी        अंतर्गत              पचन व समतोल
उदान     कंठ        उर्ध्व             बोलणे, मृत्यूनंतर आत्मा बाहेर
व्यान    सर्वत्र       सर्वदिशा              रक्तप्रवाह, हालचाल


पंचप्राण ही केवळ भौतिक प्रक्रियेची नावे नाहीत. ती जीवन उर्जा आहे. ध्यान, योग, प्राणायाम या सर्वांत पंचप्राणांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा हे प्राणशक्ती योग्य प्रमाणात कार्य करतात, तेव्हा शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधला जातो.

यामुळेच, भारतीय योगशास्त्रात "प्राणायाम" हे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले गेले आहे — जे पंचप्राणांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि त्यांना संतुलित ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे.


Saturday, July 5, 2025

गुरुपौर्णिमा

 आज गुरुपौर्णिमा. महाभारताचे रचयिता, वेदांचे संकलक कृष्ण द्वैपायन व्यास यांच्या नावाने ही पौणिमा ओळखली जाते. कृष्ण द्वैपायन व्यास हे व्यास परंपरेतील अठरावे आणि शेवटचे व्यास. सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. पराशर ऋषी आणि सत्यवती (मत्स्यगंधा - योजनगंधा) यांचा पुत्र. ते रंगाने कृष्ण असल्याने आणि त्यांचा जन्म एका बेटावर झाल्याने त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असे म्हणतात. वयाच्या आठव्या वर्षी ते हिमालयात तपश्चर्येला निघून गेले. जाताना आईला वचन देऊन गेले की कधीही आईने मनोमन आठवण करून बोलाविले तर आईच्या सेवेत हजर होईन. सत्यवतीने अंबिका आणि अंबालिकेसाठी नियोगासाठी बोलाविताच ते दिलेल्या वचनाप्रमाणे हजर झाले आणि कुरु वंशाला धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे पुत्र आणि विदुर हा दासीपुत्र दिला.

महाभारतात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. शंतनू>विचित्रवीर्य-चित्रांगद.... स्वत: व्यास >धृतराष्ट्र, पांडू >कौरव-पांडव>अभिमन्यू> परीक्षित>जनमेजय अशा कुरु वंशाच्या सात पिढ्यांचा इतिहास त्यांनी लिहिला. कुरु वंश हा त्या काळाचा बलाढ्य राजवंश होता. भारतवर्षात झालेल्या महायुद्धांपैकी एक म्हणजे हे महाभारत त्याचा साद्यन्त इतिहास त्यांच्यामुळेच आपल्यापुढे आला. (आणखी असेच एक युद्ध त्यापूर्वी झाले होते, पण त्याहा फक्त संक्षिप्त उल्लेख वेदांत आढळतो). व्यासांचे एक शिष्य 'वैशंपायन' हे जनमेजयाच्या सर्पसत्राच्या समारोपप्रसंगी उपस्थित होते. जनमेजयाच्या विनंतीवरून त्यांनी महाभारत उपस्थितांना ऐकविले. त्यात भर पडून आजचे महाभारत आपल्यापुढे आले. पैल, जैमिन, वैशम्पायन, सुमन्तुमुनि इ त्यांच्या चार शिष्यांमार्फत आणि पुत्र शुकदेव यांच्यामार्फत त्यांनी महाभारत सर्वांपर्यंत पोचविले.
कृष्ण द्वैपायन व्यासांचे महत्वाचे कार्य म्हणजे वेदांचे संकलन. त्या पूर्वी वेद विखुरलेल्या अवस्थेत होते. अनेक ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेत हे ज्ञान पुढे आणलेले होते (म्हणून त्यांना अपौरुषेय म्हणतात). त्यांचे व्यासांनी व्यवस्थित संकलन केले. त्याचे विषयानुरूप चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार भागांना त्यांनी क्रमशः पैल, जैमिन, वैशम्पायन आणि सुमन्तुमुनि यांना शिकविले. तसेच उपनिषदांचे सार असलेल्या ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली.
मात्र काशी विश्वेश्वराने दिलेल्या शापामुळे त्यांना काशी सोडावी लागली अशी कथा प्रचलित आहे. त्यांचा आश्रम काशीपासून सुमारे पाच मैलांवर गंगातटी वसलेला आहे. व्यास हे चिरंजीव असल्याने आजही त्याठिकाणी येऊन ते आपल्या शिष्यांना ज्ञानदान करतात अशी श्रद्धा आहे.
आज गुरुपौणिमेला विश्वगुरू व्यासांना वंदन करण्याची प्रथा आहे.
वेदांचे रचयिता कृष्ण द्वैपायन व्यास यांना प्रणाम