Friday, July 10, 2015

आपली ऊर्जेची गरज किती?

आपली ऊर्जेची गरज किती?

दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत चांगले जगता येईल?
प्रत्येकाला चांगल्या दर्जाची राहणी खात्रीने मिळण्यासाठी किती ऊर्जा लागेल?

हा एक मूलभूत प्रश्न आहे. ऊर्जा नियोजन करताना त्याचा विचार मुळात करावा लागतो. आजपर्यंतच्या या प्रश्नाकडे पुरेश्या गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. देशाला ऊर्जा किती हवी याचा अंदाज करण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन किती हवे असा विचार करून अनुमान केले जाते. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले की प्रत्येक देशवासीयाच्या मूलभूत गरजा भागल्या जातील – याची खात्री देता येत नाही. त्यामुळे काहीजणांनी ऊर्जेचे अनुमान करण्यासाठी देशाची प्रगती जोखण्याचे काही विशिष्ठ निकष लावले आहेत किंवा हे निकष पूर्ण होतील अशा बाबींच्या वाढीचे निर्देशांक आधारासाठी घेतले आहेत. प्रगतीची चाचपणी करू शकणार्‍या अशा प्रकारच्या अनेक निकषांनी बनलेल्या चौकटीत – चांगल्या दर्जाचे राहाणीमान म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करता येते.
“प्रयास” ऊर्जा गटाने या प्रश्नाबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात उर्जेच्या गरजेचा अंदाज  करणार्‍या विविध पद्धतींची तुलना केली आहे आणि ती सोदाहरण स्पष्ट केली आहे.
·         यात भारतीय नियोजन आयोगाने २००६ साली आणलेले एकात्मिक ऊर्जा धोरण आहे.

·         २०३२ सालच्या ऊर्जेच्या गरजेचा अंदाज करण्यासाठी
१) सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीचा दर आणि
२) सकल राष्ट्रीय उत्पादन व ऊर्जेचा वापर यातील लवचिकता, या दोन बाबींचा आधार घेतला आहे.

·         केंद्रिय विद्युत आयोगाने विद्युतशक्तीबाबत केलेल्या सर्वेक्षणावरही या शोधनिबंधात एक नजर टाकली आहे. आगामी २० वर्षांसाठी किती उर्जा लागेल याचे अनुमान करण्यासाठी हा आयोग सकल राष्ट्रीय उत्पादन आणि त्यातील संभवनीय बदलाचे रेखांकन यांवर भर देतो. वरील दोन्ही पद्धतींमध्ये - १००% घरांना वीजपुरवठा – अशासारखे समान सामान्य हेतू असले तरी विवक्षित वाढीचे लक्ष्य आणि ऊर्जावापर यात कोणताही थेट संबंध असल्याचे म्हटलेले नाही.
आणखी विशेष म्हणजे - विशिष्ट वाढीचे लक्ष्य आणि त्याच्याशी जोडलेला ऊर्जावापर – यांच्या केल्या गेलेल्या अभ्यासांचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे.
उदा. चांगल्या दर्जाची राहाणी कितपत साध्य झाली याचा निर्देशक असलेला मानवी विकास निर्देशांक. (एच डी आय.). याबाबत जगात सगळीकडे झालेल्या पहाण्यामध्ये - मानवी विकास निर्देशांक आणि दरडोई वीजवापर – यांच्या पातळीत सरळ संबंध असल्याचे दिसून आले आहे. या संबंधाच्या आधारे विजेच्या गरजेचा अंदाज आपल्याला हव्या त्या पातळीपर्यंत करता येतो. मानवी विकास निर्देशांकात काही लक्ष्ये अंतर्भूत नाहीत असा एक आक्षेप घेतला जातो. त्याशिवाय काही देशांमध्ये कमी प्रमाणात ऊर्जावापर करूनसुद्धा मानव विकास निर्देशांक वरच्या स्तरावर आलेला दिसतो. हा इतरांसाठी एक वस्तुपाठ ठरू शकतो.
२०१४ मध्ये भारतीय नियोजन मंडळाने - सर्वसमावेशक विकासासाठी कर्बनी पदार्थांच्या अल्प वापराची रणनीती – या विषयाबाबत एक अहवाल दिला, त्याचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे. या अहवालाच्या आधारे बनवलेल्या प्रतिरूपाद्वारे २०३० सालचा वीज आणि ऊर्जा यांच्या गरजेचा अंदाज करता येतो. या प्रतिरूपात १२व्या पंचवार्षिक योजनेत अपेक्षित केलेल्या ‘सर्वसमावेशक वाढ’ या धोरणाचा समावेश केला आहे तसेच शाश्वत आणि वेगवान वाढीसाठी आवश्यक वाटणार्‍या २५ गाभाभूत दर्शकांचाही समावेश केलेला आहे. गरीबी, रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासारख्या गोष्टींमध्ये आकडेवारीत मोजता येतील अशी उद्दिष्ट्ये ठरवून दिली आहेत. त्यामुळे अध्ययन केवळ ऊर्जा आणि शक्तीक्षेत्रापुरतेच न राहाता पूर्ण अर्थव्यवस्था त्याच्या कवेत आलेली आहे. हे या प्रतिरुपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या प्रतिरूपातील उद्दिष्टे अधिक आर्थिक आधार दिल्याने पूर्ण होतील असे दिसत असले तरी अधिक ऊर्जा पुरविण्याबाबत मात्र काही स्पष्टता दिसत नाही.
या शोधनिबंधात विकासाचे विशिष्ट उद्देश्य आणि खास त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या ऊर्जेचा अंदाज करणार्‍या अभ्यासांचे परिक्षण करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या - उर्जा आणि पर्यावरणातील बदल - विषयक सल्ला देणार्‍या गटाने जगात सर्वांना चूल, उजेड, संपर्क आणि उत्पादन यांसाठी ऊर्जास्रोत उपलब्ध असावेत अशी भूमिका घेतली आहे.
‘दि पुअर पिपल्स एनर्जी आउटलुक’ यांनी ऊर्जेपासून वंचित असणार्‍यांच्या ऊर्जेच्या गरजेबाबत खुलासेवार लिखाण केले आहे आणि त्यांच्या सहा क्षेत्रातील उर्जेच्या गरजेचा, निकडीचा आणि हक्काचा ऊहापोह केला आहे, ही क्षेत्रे म्हणजे उजेड, अन्न शिजवणे आणि पाणी तापवणे, घरातील उबदारपणा, थंडावा, संपर्क आणि माहिती स्रोत उपलब्ध होणे आणि रोजंदारीसाठी ऊर्जा. या गरजांपैकी काहींबाबत या अभ्यासात मापन करण्याच्या पद्धती दिल्या आहेत.
विवक्षित साहित्य, वस्तू आणि सेवा-सुविधांच्या गरजा भागवून चांगल्या दर्जाची राहाणी मिळवी यासाठी लागणारी ऊर्जा किती याचा अंदाज करणार्‍या तीन अभ्यासांची दखल या शोधनिबंधात घेतली आहे.

1.       १९८० मध्ये अमूल्य रेड्डी आणि सहकार्‍यांनी एक नमुना समोर ठेवला, यात सर्व भारतीयींनी १९७० मध्ये युरोपात सर्वत्र उपलब्ध होती अशा - राहणीमानाच्या पातळीचा विचार केला आहे. अगदी प्रत्येकाला दर किलोमीटर प्रवासासाठी लागणार्‍या ऊर्जेचीही गणना घर चालवण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसोबत केली आहे. प्रत्येक बाबीसाठी लागणारी ऊर्जा आकड्यांनिशी देताना त्या काळात उपलब्ध असणार्‍या सर्वात किफायतशीर पर्याय गृहीत घरला आहे. दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत हे साध्य होईल असे अमूल्य रेड्डी यांच्या गटाने दाखवून दिले आहे.

2.       अशाच प्रकारचा 2007 मध्ये चीनमध्ये झालेला एक अभ्यास या शोधनिबंधात पहायला मिळतो. झियानली झ्यू आणि जियाहुआ पान यांनी चीनमधील १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ७५% लोक शहरी असल्याचे गृहीत धरून मूलभूत गरजांसाठी प्राथमिक व्यावसायिक ऊर्जेची आवश्यकता त्यांनी गणिते करून मांडली आहे.

3.       २००० वॅट सोसायटी – यांच्या नावाप्रमाणे दर डोई दर साल २ किलोवॅट ऊर्जेत आवश्यक गरजा भागवता येतील अशा स्वरूपाची ऊर्जा व्यवस्था या अभ्यासात मांडली आहे.

4.       नरसिंहराव यांचा अजून अपूर्ण असलेला एक अभ्यासही यात समाविष्ट आहे. त्यांच्या मते यासाठी एक सर्वसमावेशक अशी एक चौकट असू शकतो मात्र त्यात स्थलकालाप्रमाणे विशेष वेगळे असू शकतात. उदा. अन्नाची गरज हा त्या चौकटीतला एक वैश्विक घटक असला तरी अन्नासाठी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असू शकते – अन्न शिजवण्याच्या पारंपारीक पद्धती, स्थानिक खाद्यसंस्कृती, शाकाहार – मांसाहार यावर अन्न या घटकापायी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असेल.

या सर्व गोष्टींचा उहापोह करून २०३२ साली भारतात वीज आणि ऊर्जा किती लागेल याचा अंदाज प्रयास ऊर्जा गटाने केला आहे. मूलभूत गरजांवर आधारीत ऊर्जेचा अंदाज योग्य केला तरी ती ऊर्जा योग्य जागी आणि योग्य तितकी पोचवण्यात योग्य काळजी घेऊन अंमलबजावणी केली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जानिर्मितीचे शाश्वत मार्ग आणि निर्माण झालेल्या ऊर्जेचे समन्यायी वितरण – हे जगात सर्वत्र झाले तर चांगल्या दर्जाचे राहाणीमान सर्वांना मिळू शकेल असे या शोधनिबंधात म्हंटले आहे.



How Much Energy Do We Need:Towards End-Use Based Estimation For Decent Living
संशोधन क्षेत्र - ऊर्जा स्रोत आणि विकास

 Research Area:

  Energy Resources & Development
लेखक - श्रीपाद धर्माधिकारी, ऋतुजा भालेराव

Authors: Shripad Dharmadhikary, Rutuja Bhalerao

प्रसिद्धी दिनांक - मे २०१५

Publication Date: May, 2015

हा शोधनिबंध या क्षेत्रातील सर्व अभ्यासकांनी जरूर वाचावा आणि सर्वांना चांगले जीवनमान मिळवण्यासाठीच्या या प्रयासात आपले योगदान द्यावे.

Monday, June 29, 2015

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ? : लेखक चिंतामणी कारखानीस

लेखक : चिंतामणी कारखानीस

सदर माझा लेख ठाण्याच्या 2010 साली कायस्थांच्या मेळाव्याच्या निमित्ताने कायस्थ विकास या मासिकात प्रसिद्ध झाला आहे . जरी यात तत्कालीन काही ब्राह्मण वृत्तींवर विखारी टीका केली असली तरी एकंदर ब्राह्मण समाजा बद्दल माझे मत चांगलेच आहे.माझे अनेक शिक्षक ब्राह्मण होते त्यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर असा भेद भाव केला नाही.इतिहास म्हणून या लेखा कडे पाहावे . आता परिस्थिती बदलली आहे.!!!!

चिंतामणी कारखानीस ----

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
बुद्धीचे किती युक्तीचे किती मानी अभिमानी ।
कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ।
संख्येने जरी अल्पही असलो कर्तृत्वाचा वसा ।
इतिहासाला ठेऊनी साक्षी घडवू इतिहासा ...... !

रंगो बापुजी गुप्ते !!!!!

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.

पुण्याची जहागिरी प्राप्त होताच शिवाजी राजांनी बारा मावळ प्रांत काबीज केले. बारा मावळातील देशमुख, दस्तकरुन जे पुंड आणि प्रजेला छळणारे होते त्यांना मारिले. देशमुख मराठा जातीचे होते आणि देशमुखीचा कारभार पाहणारे “देशपांडे” कायस्थ प्रभू होते. देशमुख व्यसनी, भांडखोर मानमरातब आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मारामार्‍या, खून खराबा करणारे होते. मुसलमान सुभेदाराची मर्जी राखायची आणि वतन सांभाळून चैन करायची असा त्यांचा स्वभाव होता. ज्या देशमुखांनी शिवाजीराजांना प्रतिकार केला त्या देशमुखांना शिवाजीराजांनी अत्यंत चातुर्याने स्वत:कडे वळवून आणले. परंतु जे स्वराज्य स्थापनेच्या योजनेत सहभागी होत नव्हते. त्यांना कुठलीही नातीगोती आड येऊन न देता, दयामाया न दाखवता ठेचून मारले.

देशमुखांना स्वराज्याच्या कामी मिळवण्याच्या आधी शिवाजीराजांनी सर्वप्रथम मावळातील देशपांडे, जे कायस्थ प्रभू समाजाचे होते त्यांची सहानभूति मिळवली. स्वराज्याचा मनसुबा सर्वप्रथम पचनी पडला तो कायस्थ प्रभू देशपांड्यांना.

स्वराज्याच्या स्थापनेसाठी -पहिला कायस्थ प्रभू !!!!!!

स्वराज्य स्थापनेच्या कामी रायरेश्वरासमोर बेलभंडार उचलून शपथपूर्वक सामिल झाला. त्या कायस्थप्रभूचे नाव होते दादजी नरस प्रभू गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे दादजी नरस प्रभूंचे वंशज आहेत. मराठी स्वराज्याच्या कार्यात कायस्थांचा जो प्रचंड सहभाग होता त्याचे उगमस्थान म्हणजेच दादजी नरस प्रभू गुप्ते (देशपांडे) हेच आहेत.

दांदजी नरस प्रभूला हाताशी धरुन शिवाजी मावळात गोंधळ घालीत असल्याचा बातम्या खोपडे आणि जेधे यांनी विजापुरास कळविल्या. वजिराने एक धमकीचा खलिता दादजी देशपांड्याला पाठवला. या खलित्यात रायरेश्वराची शपथ आणि पेशजी किल्ल्यावरील ठाणे काबीज करुन शिवाजीला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाजीला मदत केलीस तर विजापुरास नेऊन “गरदन मारु” अशी धमकी बादशहाच्या वजिराने दादजी प्रभूंना दिली होती.

शिवाजीराजांना या खलिताची बातमी येताच त्यांनी दादजींना धीर देणारे पत्र पाठवले. आपल्या भेटीला बोलावले. दादजींना स्वराज्य स्थापनेचे महत्व पटलेलेच होते. त्यांनी विजापुरच्या शहाच्या धमकीला भीक घातली नाही आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत शिवरायांच्या मागे दादजी प्रभू (देशपांडे) गुप्ते हे ठामपणे उभे राहीले.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात दादजी प्रभूंची स्थिती हालाखीची झाली. शाहू आणि मातोश्री येसूबाई दिल्लीला बादशाही छावणीत सेवेला गेले. दादजींचा मुलगा कृष्णाजी शाहू महाराजांसोबत होता. या सर्व राजकारणाच्या धुमाळीत मुखत्यार नेमलेल्या शंकर नारायण सचिवाने दादजी प्रभूंचे वतन बळजबरीने खालसा केले. शिवाजी महाराजांचे लेखी वचन त्यांच्या मृत्यूनंतर साफ बुडवले. दादजीप्रभू राजाराम महाराजांची भेट घेण्यासाठी जिंजीला जात असतानाच रांगण्याच्या मुक्कामी दादजी प्रभू आणि राजाराम महाराजांची भेट झाली. दादजीने सर्व प्रकार राजाराम महाराजांच्या कानी घातला. महाराज संतापले. त्यांनी शंकर नारायण पंडीत सचिव यांना आज्ञापत्र पाठवले. परंतु शंकर नारायण यांनी राजाज्ञा जुमानली नाही.

याच दादजी प्रभूच्या वंशात रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म झाला. रंगो बापूजी गुप्ते यांच्या चरित्रावर भाष्य करणारे पुणेरी इतिहास संशोधक मात्र रंगोबापूजी आपल्या वाडवडीलांच्या वतनासाठी लढले असे चक्क खोटे लिहून रंगोबापूजींना मतलबी ठरवण्याचा डाव टाकीत होते. पुण्यातल्या पेशव्यांनी पेशवे पद मिळताच मराठी राज्याच्या धन्याची गळचेपी सुरु केली होती. पेशवाईचा अंत होईपर्यंत मराठेशाहीच्या छत्रपतींना कोंडीत पकडून स्वत: राज्याचा कारभार पाहण्याचा आणि नामधारी छत्रपतींना नामोहरम करण्याचे राजकारण पेशवे आणि पेशव्यांच्या हस्तकांनी केले. पेशव्यांचे “भाट” पुढे पेशव्यांचे सरदार झाले आणि छत्रपतींकडे दुर्लक्ष करुन पेशव्यांना मुजरे करु लागले. राजाशी नमक हरामी करुन पेशव्यांची मर्जी सांभाळणारे एकूण एक संस्थानिक छत्रपती शिवरायांच्या बेलभंडार्‍याच्या शपथेशी हरामखोरी करणारे निपजले. इतिहासातीले राजद्रोहाचे सत्य अनेक कादंबरीकार, नाटककारांनी बेमालूमपणे दडवले आणि स्वार्थी लोकांचा जयजयकार मराठी वाचकांनी आणि बु्दधीवंतांनी केला. याच बुद्धीवान नाटककारांनी मराठेशाहीचे खरे स्वामी जे छत्रपती त्यांना “नादान” ठरवून पेशवाईचा उदो उदो केला.

छत्रपती शिवरायांच्या काळात रंगो बापूजींच्या पूर्वजांना दिलेले टिचभर वतन हिराऊन घेऊन पुणेरी लाल पगड्यांनी स्वामी निष्ठा वांझोटी करण्याचा प्रयत्न केला. परंतू वतन गेले तरी रंगो बापूजी गुप्ते हे मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहीले. शेवटचे छत्रपती सातारचे प्रतापसिंह महाराज यांचे राज्य खालसा होऊ नये यासाठी रंगो बापूजी इंग्रजांशी लढले. पेशवाईच्या अंता नंतर एकीकडे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेला असताना रंगो बापूजी मात्र मराठेशाहीच्या शेवटच्या छत्रपतींची गादी वाचविण्याच्या विवंचनेत होते. उतारवयात केवळ स्वामीनिष्ठेसाठी इंग्लंडच्या थंड हवेत हिंदूस्थानी पोशाख, रिवाज आणि धर्म पाळून रंगो बापूजी या कायस्थाने छत्रपतींची वकीली केली. इंग्लंडमध्ये मराठ्यांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सभा घेतल्या. अनेक इंग्रज लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. राणीकडे विनंती अर्ज केले. ६० हजार

सह्यांचे १०० अर्ज ब्रिटीश पार्लमेंटच्या दप्तरात दाखल केले. याच सुमारास त्यांनी ब्रिटनच्या न्यायव्यवस्थेचा अणि लोकशाहीचा अभ्यास केला. इंग्रजांच्या दडपशाहीच्या विरोधात इंग्रजांची मते बदलण्याचे काम रंगोबापूजींनी केले. या सुमारास पुण्याचे ब्राह्मण काय करीत होते ते पहाणे सुद्धा गरजेचे आहे.

पेशवाईत कायस्थांवर धार्मिक अन्याय मोठ्या प्रमाणात झाले. ब्राह्मण कायस्थांना अत्यंत तुच्छतेने वागवत असत. कायस्थांनी आपल्या मुलांची मुंज करु नये असा फतवा नारायणराव पेशव्यांच्या काळात काढला होता. सर्व ब्राह्मणांनी ही गोष्ट उचलून धरली. पुण्यातील सरदार आंबेगावकरांनी हा पेशव्यांचा फतवा जाहीर रित्या फाडला आणि जाळून टाकला. ॐ कारेश्वराच्या प्रांगणात घडलेली ही घटना पेशव्यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी आंबेगावकरांना पकडण्याची आज्ञा दिली. आंबेगावकर बडोद्याला आश्रयास गेले परंतू पुण्यात मात्र पेशव्यांनी त्यांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला.

ब्राह्मणांनी कायस्थांवर घातलेल्या निर्बंधाचा विरोध बळवंतराव मल्हार या हुशार कायस्थाने केला. कायस्थांचे उपनयन, विवाह, श्राद्ध वगैरे विधींवर ब्राह्मणांनी बंदी घातली होती. पुणे, सातारा, कर्‍हाड, सांगली भागात या बंदीमुळे कायस्थांची कार्ये खोळंबली होती. आम्हाला आमची वैदिक कार्ये करण्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही हे बळवंतरावांनी ज्ञातीबांधवांना सांगितले. स्वत: अग्नीहोत्राची दीक्षा घेतली. कायस्थांच्या खोळंबलेल्या असंख्य लग्न-मुंजी कायस्थ समाजाच्या आचार्यांनी स्वत: लावल्या. या प्रकारामुळे ब्राह्मण खवळले. पुणेरी ब्राह्मणांनी प्रतापसिंग महाराजांकडे कायस्थांच्या विरोधात तक्रारी केल्या. महाराजांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली.

१९२८ साली मुंबईचा गव्हर्नर जॉन माल्कम हा छत्रपतींच्या भेटीसाठी सातार्‍याला आला होता. बाळाजीपंत नातू या मराठेशाहीचा झेंडा उतरवण्यास इंग्रजांना मदत करण्यार्‍या भटाने तातडीने सतारा, सांगली, कर्‍हाड, वाई, कोल्हापूर याठिकाणी पत्रे पाठवली, कायस्थ शुद्र आहेत त्यांना अग्नीहोत्र घेण्यापासून परावृत्त करावे या मागणीसाठी १० हजार ब्राह्मणांनी कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी गावात असलेल्या जॉन माल्कमच्या तंबूला वेढा घातला. माल्कमच्या छावणीसमोर कायस्थांच्या विरोधात हे ब्राह्मण घोषणा देत होते. चिंतामणराव सांगलीकर जमावाचे नेतृत्व करीत होते. माल्कमच्या हुजर्‍यांनी ब्राह्मणांच्या ४ ते ५ प्रतिनिधींना आंत बोलावून घेतले. थत्ते, भडकमकर, आबा जोशी, चिमणराव पटवर्धन आत गेले. त्यांनी कायस्थांच्या विरोधात कागाळ्या केल्या. कायस्थांनी धर्म बुडवला असा कांगावा केला. तावातावाने भांडले. जॉन माल्कमनी मात्र आम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीत निर्णय देणार नाही असे सांगून ब्राह्मणांना हाकलले.

रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म आणि मृत्यू या बाबत इतिहासात अधिकृत नोंदी सापडत नाहीत. परंतू मराठेशाही वाचवण्यासाठी रंगो बापूजींनी दिलेला लढा मात्र सर्वांच्या सदैव स्मरणांत राहील. इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर इंग्रजांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल केले होते. रंगो बापूजी अनेक वर्षे भूमिगत होते. ठाण्याच्या कडवागल्लीत त्यांनी वास्तव्य केले होते. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी आले असता सोवळ्या विधवा बाईच्या वेषात इंग्रजांना गुंगारा दिला.

ठाण्यातील जांभळी नाक्याला महानगर पालिकेने ठराव संमत करुन “रंगो बापूजी गुप्ते चौक” हे नाव दिले. मध्यंतरीच्या काळात या चौकाला चिंतामणी चौक हे नाव पडले. श्री. सुधाकर वैद्य, शशी गुप्ते, दिनकर बक्षी या समाजधुरीणांना पुन्हा नव्याने या चौकास रंगो बापूजी गुप्ते हे नाव देण्यासाठी पाठपुरावा केला आणि श्री. दत्ता ताम्हणे व सतीश प्रधान यांच्या उपस्थितीत ९ जून २००७ या दिवशी पुन्हा या चौकाचे “श्री रंगो बापूजी गुप्ते चौक” असे नामकरण करण्यात आले. बाळाजी आवजी, बाजी प्रभू, दादजी प्रभू, रंगो बापूजींच्या स्मृतीस अत्यंत कृतज्ञतेने अभिवादन करीत आहोत.

चिंतामणी गंगाधर कारखानीस

अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना...मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना

'whatsapp वरील एक पोस्ट '
(ही घटना खरी नाही अशीही पोस्ट नंतर whatsapp वर आली होती)

मित्रांनो. खरंच. या कवितेवर भरभरून लिहा. पत्नीवियोगावर याहून आर्त कोणी लिहू शकेल असं वाटत नाही... किती संयमित शब्द आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. आकांडतांडव नाही. आसा कवितांचं रसग्रहण करून आपली काव्य निर्मितीची ताकद वाढते. पत्नीवियोगानंतर कवी अनिल यांनी ही काळजाचा ठाव घेणारी कविता लिहीली.

खर तर मला हे एक कुमार गंधर्वान्नी गायलेल सुंदर गाणं म्हणुन ठाउक होतं पुढे एका माझ्या स्नेहींनी या गाण्याच बॅकग्राउंड सांगितलं आणि खरोखर ही कविता पुन्हा जेव्हा वाचली तेव्हा मी अक्षरशः हेलावून गेलो.

कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे, यांचा कुसुमावती नावाच्या मुलीवर प्रेम परंतु धर्म वेगळा असल्या कारणाने प्रचंड विरोध घरातून !!! तब्बल ९ वर्षच्या संघर्षातून अखेर त्यांचा प्रेम सफल झाल ...आणि त्याचं सुंदर सहजीवन सुरु झाल कुसुमावती बाई ही लेखिका . असेच एकदा कुठल्याश्या कार्यक्रमाला अनिल गेले होते यायला उशीर झाला ....घराच दार खूप वाजवल पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही ....अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे .रात्रभर अनिल बाहेरच पण नंतर काळजात काही लकलकल आणि दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती जिच्या सोबतीने आयुष्य काढ्याची शपथ व्हायली होती ..तिचा निष्प्राण देह बघन नशिबी आलं ....अनिल पूर्ण कोसळून गेल ९ वर्षाच्या घोर तपश्चर्या चे फळ असा उणपूर सहजीवन ...तेव्हा अनिलांच्या लेखणीतून शब्द झरझरले ......

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

कवि अनिल यांची ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी अमर केलीय रसिकांनी या कवितेचे रसग्रहण करावे अशी मी विनंती करत आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !

कवि - आ. रा. देशपांडे ’अनिल’

ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गातील असा अनिलांचा आग्रह होताआणि तसच झाल अनिल कुसुमावातीच हे गीत कुमारांनी अजरामर केल .

Thursday, June 25, 2015

अर्थव्यवस्थेचा पहिला नियम : लेखक संजय सोनवणी

संजय सोनवणी यांच्या Facebook Post वरून साभार

मी काहीतरी काल्पनीक भय निर्माण करण्यासाठी आर्थिक अराजकाच्या नांदीचे संकेत देत नसुन एका वास्तवाची जाणीव करुन देण्यासाठी लिहित आहे. जेवढा उपभोग घेता येवू शकतो तेवढेच उत्पादन असावे हा शाश्वत अर्थव्यवस्थेचा पहिला नियम आहे. अति-उत्पादन करत ती उत्पादने खपवण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या गरजा निर्माण करत, काल्पनिक, आभासी प्रतिष्ठा संकल्पना निर्माण करत व्यक्ती-व्यक्तींतच एक खरेदी-स्पर्धा निर्माण केली जाते व समाजमानसिकताही त्याला बळ देते ती व्यक्तीनिष्ठ आर्थिक अराजकाची स्थिती असते. अति-उत्पादनामुळे वस्तु स्वस्त होतात हे काही काळासाठी बरोबरच आहे, परंतु एका विशिष्ट बिंदुपासुन हा समतोल ढळत जातो व उत्पादने पुन्हा महाग होण्याच्या दिशेने वाटचाल करु लागतात. कोणतेही उत्पादन शेवटी नैसर्गिक साधनस्त्रोतांच्या उपलब्धतेवर अवलंबुन असते व अति-उत्पादन व तेही एकुणातील गरजांपेक्षा अधिक होवू लागते तेंव्हा मर्यादित होत जाणा-या नैसर्गिक स्त्रोतांच्या प्रमानात इकडे भाववाढ होत जाणे अटळ असते. असे कधीच होणार नाही, काहीतरी नवे शोध लागतील हा आशावाद झाला.

अराजकाची स्थिती तशीही अस्तित्वात असतेच, फक्त तीची तीव्रता तेवढी जाणवत नाही, वा काहीतरी तात्पुरते उपाय करुन त्या स्थितीवर नियंत्रण आणता येते. परंतु ते काही एककांपुरते (म्हणजे एखादे औद्योगिक संस्थान वा एखाद-दुसरे राष्ट्र) मर्यादित असते तेंव्हाच शक्य आहे...अर्थात तरीही दमछाक होतेच. परंतु गेल्या २० वर्षांत ज्या प्रकारे प्रत्येक राष्ट्र/औद्योगिक संस्थान व पर्यायाने व्यक्तीघटकही जागतीक प्रवाहात असल्याने संपुर्ण जगच आर्थिक अराजकाच्या खाईत सापडणार नाही हाही एक आशावाद झाला. अराजकाचीच स्थिती चांगली असा एक भाव भांडवलशाहीवादींमद्धे आहे. परंतु, तो "अराजकवाद" हा अत्यंत आदर्शवादी अर्थतद्न्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. यात नियंत्रकांची अपेक्षा नाही. त्यात व्यापक प्रकारची कोणत्याही प्रशासनविरहित अशा मानवी जीवन (उत्पादनेही) सुंदर बनवणारी व्यवस्था आनण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न नवे नाही. उपनिषदांतही (जेथे राजा नसेल, कोणी शासित नसेल, अपराधच नसतील तर दंड कोठुन? प्रजाच प्रजेचे धारण करेल.) असाच मौलिक सिद्धांत मांडला गेलेला आहे, परंतु तो वास्तवात येणे अशक्य आहे. माझ्या द्रुष्टीने अराजक म्हनजे नियंत्रणाबाहेर गेलेली व कोनत्याही क्रुत्रीम उपायांनी सुरळीत न होवू शकणारी स्थिती.

आर्थिक अराजकाचे खालील प्रकार पडु शकतात. औद्योगिक संस्थानांतर्गतची आर्थिक अराजकता. स्वत:च्याच ओझ्याखाली काही संस्थाने कोसळुन पदतात. असे होण्यामागे भ्रष्ट प्रव्रुत्तीच असतात असा निष्कर्ष काढता येत नाही. एन्रोन असेल वा आता किंगफिशर असेल, आर्थिक अराजकतेतुन अशी पतने होतात. राष्ट्रांतर्गत आर्थिक अराजके ही जगाला नवीन नाहीत. रोम साम्राज्याच्या पतनामागे आर्थिक अराजक हे मोठ्या प्रमानावर जबाबदार होते हा इतिहास मी एकदा सांगितला आहेच. अलीकडे आपण ग्रीस देशांबाबत तसेच झाले असल्याचे दिसून येते.

असे का होते? अति-उत्पादन हेच या पतनांमागील मुख्य कारणे आहेत. "कर्ज" हेही एक आर्थिक उत्पादन (प्र्रोडक्ट) मानले तर त्याचेही अतिउत्पादन (फेडता न येणारी कर्जे घेणे) हा राष्ट्र, औद्योगिक संस्थाने व व्यक्तींनाही कोसळवणारा घटक असतो. अति-उत्पादनाच्या चक्रात ग्राहक निर्माण करावेच लागतात. ती उत्पादने विकत घेण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. त्यातुन लोक गरज नसलेल्या आभासी सुख देणा-या वस्तु विकत घेत सुटतात. म्हनजे नेमकी आपली गरज काय आहे हे व्यक्तींना नीट ठरवता येत नाही. किंबहुना ती ठरवण्यासाठी मुलात जी एकुणातील व्यवस्था असायला हवी तिचा असणारा अभाव आणि नेमके हेच आजच्या अर्थव्यवस्थेला अभिप्रेत असते. श्रमप्रतिष्ठा लयाला जात व्हाईटकोलर-कार्य-प्रतिष्ठा येणे हे काही आपोआप झालेले नाही. आजच्या अर्थसंस्क्रुतीची व तिने रुजवलेल्या आभासी संकल्पनांची ही अपरिहार्य परिणती आहे. यातुन भविष्यात फक्त अर्थव्यवस्था कोसळतील असे नाही तर दोन वर्गांत संघर्ष पेटेल याची चिन्हे आताच दिसु लागली आहेत.

ग्रामीण भारत विरुद्ध शहरी भारत यातील मानसिकतेत पराकोटीची दरी पडत चालली आहे. माओवादी अलीकडे पुणे-मुंबईतही पकडले जावू लागले आहेत याचा भविष्यातील धोकाही लक्षात घ्यायला हवा. ते लोन खेड्यापाड्यांत पसरू शकते. कारण आर्थिक दबाव वाढत चालले आहेत. अर्थव्यवस्था जेंव्हा एकांगी दिशेने वातचाल करत जाते तेंव्हा असे घडणे अपरिहार्य असेच आहे.

माणसे जेंव्हा उत्पादनाला नियंत्रीत न करता उत्पादनांकडुनच नियंत्रीत होवू लागतात तेंव्हा जी स्थिती निर्माण होते तिला आर्थिक अराजक असे म्हनता येते. संपत्तीचे मुल्य हे नेहमीच अस्थिर असते हे आपण दैनंदिन व्यवहारात पाहतोच. परंतु ते मुल्य रसातळाला जावू शकते याचेही भान असले पाहिजे. उदा. १६३०च्या दुष्काळात एवढी अनवस्था झाली होती कि श्रीमंतांना शेरभर रत्नांच्या बदल्यात शेरभर कुळीथ महामुश्कीलीने मिळत. (परमानंदक्रुत शिवभारत) म्हनजेच संपत्तीचे मुल्य केवळ परिस्थितीवर अवलंबुन आहे. अति-उत्पादनाच्या हव्यासात, गरज नसलेल्या वस्तुंची मानसिक गरज निर्माण करत जेंव्हा त्याधारित आर्थिक फुगवटा निर्माण केला जातो तो मुळात शाश्वत असु शकत नाही व तो अंतत: आर्थिक दुष्काळाकडे घेवून जातो.

उत्पादन हे नेहमीच ग्राहकाला सशक्त करण्यासाठी असले पाहिजे, त्याला आभासी सुखात दंग करण्यासाठी नाही. क्रुत्रीम गरजांधारीत अर्थव्यवस्था आपल्याच विनाशाची (पर्यायाने सर्वच समाजाची) बीजे आपल्यात घेवुनच वावरत असते. तो कधी फोफावेल व सारे काही गिळंक्रुत करत जात जी अवस्था आणेल ती नक्कीच भयावह असेल याबाबत मला तरी शंका नाही.