Tuesday, May 5, 2026

नासदीय सूक्त आणि अद्वैत वेदांत

 सृष्टीच्या अगदी सुरुवातीचा विचार करताना आपण लगेच “काहीतरी कारण असेल” असं मानतो. पण ऋग्वेदामधील नासदीय सूक्त हा आपला हा पाया हलवून टाकतो.

ऋषी म्हणतात — “ना सत् होतं, ना असत् होतं…” म्हणजे अस्तित्व आणि अनस्तित्व या दोन्ही कल्पना सुद्धा तेव्हा नव्हत्या.

इथेच अद्वैत वेदांताची किल्ली सापडते.
अद्वैत सांगतं — “ब्रह्म” हे ना ‘अस्तित्व’ या मर्यादेत बसतं, ना ‘अनस्तित्व’ या. कारण ही दोन्ही शब्दं आपल्या बुद्धीची चौकट आहेत. ब्रह्म त्या चौकटीच्या पलीकडे आहे.


नासदीय सूक्तात पुढे “तम आसीत्तमसा गूळ्हमग्रे” — अंधारावर अंधार दाटलेला होता, असं वर्णन येतं.

हा अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव नाही… तर ‘भेदभावाचा अभाव’ आहे.
अद्वैताच्या भाषेत — अजून “द्वैत” निर्माण झालेलंच नाही. पाहणारा आणि पाहिलेलं, जाणणारा आणि ज्ञेय — हे विभाजनच अस्तित्वात नाही.

सूक्तात “काम” (इच्छा) ही पहिली हालचाल मानली आहे.
ही इच्छा म्हणजेच सृष्टीचा बीजांकुर.
अद्वैत वेदांतातही “माया” किंवा “इच्छा-शक्ती” यामुळे एकत्वात अनेकतेचा भास निर्माण होतो.
म्हणजे ब्रह्म बदलत नाही… पण त्याच्या अनुभूतीत विविधता दिसू लागते.

अद्वैत वेदांतात जसं म्हटलं आहे — “ब्रह्म सत्यम्, जगत् मिथ्या”--
आपण जे जग पाहतो ते अंतिम सत्य नसून “उपाधी”मुळे दिसणारं रूप आहे.
नासदीय सूक्त यालाच एका काव्यमय पद्धतीने स्पर्श करतं.
ते स्पष्ट सांगत नाही, पण सूचित करतं — जे दिसतंय ते कदाचित अंतिम नाही.

आणि मग शेवटचा जबरदस्त टप्पा —
“को अद्धा वेद?” — कोण खात्रीने सांगू शकतो?
इथे ऋषी ज्ञानाच्या मर्यादा मान्य करतो.

अद्वैतातही हेच —
ब्रह्म ‘जाणण्याची’ वस्तू नाही.
ते आपण ‘आहोत’.
म्हणूनच त्याला जाणण्याचा प्रयत्न केला की तो चुकतो… आणि स्वतःमध्ये स्थिर झालं की तो उलगडतो.

आज आपण विज्ञान, कॉस्मॉलॉजी, बिग बँग याबद्दल बोलतो.
पण नासदीय सूक्त एक पाऊल पुढे जातं —
ते विचारतं, “ज्याने हे सर्व निर्माण केलं, त्यालाही खरंच माहीत आहे का?”

ही केवळ शंका नाही… ही एक खोल जाणीव आहे —
सत्य हे बौद्धिक उत्तरात सापडत नाही, तर अनुभवाच्या शांततेत उगवतं.

म्हणूनच —
नासदीय सूक्त आणि अद्वैत वेदांत दोन्ही आपल्याला एकच दिशा दाखवतात…
बाहेर उत्तर शोधू नकोस…
स्वतःकडे वळ.

© संतोष कारखानीस