Monday, January 21, 2019

तीन मार्ग

भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मुक्तीपर्यंत पोचण्यासाठी तीन प्रमुख मार्ग सांगितले आहेत.  हे तीन मार्ग तीन  प्रमुख दर्शनांनी सुचविलेले आहेत.

पहिला मार्ग 'भक्तिमार्ग' म्हणून ओळखला जातो. 'पूर्वमीमांसा दर्शन' भक्तिमार्ग पुरस्कृत करते.  देव आहे आणि  तोच देवच  आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल यावर पूर्ण श्रद्धा असणे हे भक्तिमार्गातील पूर्वअट आहे. देवाची विविध मार्गाने पूजाअर्चा करून देवाला प्रसन्न करून घेणे असा हा मार्ग आहे.

दुसरा मार्ग 'ध्यानमार्ग' हा सांख्य दर्शनाने पुरस्कृत केला आहे. सांख्य दर्शन पुरुष आणि प्रकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. हा निसर्ग प्रकृतीने बनला आहे तर पुरुष हा केवळ द्रष्टा  आहे असे हे दर्शन मानते. पृष्ठ आणि प्रकृती यात सरमिसळ झाल्याने (असा समाज झाल्याने) आपल्याला जीवनातील दु:खे वाटूयाला येतात असे हे दर्शन मानते. ध्यानाच्या साहाय्याने निर्विकल्प समाधी अवस्थेतप्रकृतीची जाणीव पूर्णपणे मिटल्याने पुरुषाला आपले खरे स्वरूप कळते आणि तो कैवल्याच्या अवस्थेपर्यंत पोचतो. योगमार्ग हा सांख्य दर्शनावर आधारलेला असल्याने योगमार्गातही समाधी अवस्थेला महत्व आहे.

तिसरा मार्ग 'ज्ञानमार्ग' हा वेदांत दर्शनाचा मार्ग आहे. अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच केवळ सत्य आहे आणि बाकी सर्व जग हे मायेच्या आवरणामुळे तसे भासते असे अद्वैत वेदांती मानतात. ज्ञान झाल्याने मायेचे हे आवरण निघून जाते आणि आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव होते. आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव झाल्यावरही मायेने निर्माण केलेले हे जगही आपल्याला दिसते पण ते मायावी असल्याची जाणीवही होते. हीच ती वेदमार्गात सांगितलेली मुक्ती.  

No comments:

Post a Comment