Showing posts with label अद्वैत वेदांत. Show all posts
Showing posts with label अद्वैत वेदांत. Show all posts

Tuesday, June 2, 2026

अद्वैत वेदांत - २ (२०२६)

अद्वैत वेदांत हे सहा हिंदू दर्शनांमधील सर्वात अर्वाचीन दर्शन आहे. हे दर्शन उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे या तीन गोष्टींवर आधारलेले आहे. म्हणून त्यांना 'प्रस्थानत्रयी' असे नाव आहे. उपनिषदे हा वेदांमधील अध्यात्मविषयक भाग आहे. वेदांत म्हणजे वेदाचा शेवटचा भाग असे नसून वेदातील महत्वाचा भाग आहेत. 'अंत' याचा अर्थ येथे 'उच्चतम पातळीवर पोचलेले' असा आहे.


चार वेदात एकूण १०८ उपनिषदे आहेत. त्यापैकी ११ प्रमुख आहेत. ही उपनिषदे प्रमुख मानतात कारण त्यावर आद्य शंकराचार्यांनी आपले भाष्य लिहिले आहे. आद्य शंकराचार्य या दर्शनाचे संस्थापक नसून प्रमुख प्रेनेते आहेत. या अकरा उपनिषदांपैकी एका - मांडुक्य उपनिषदावर आद्य शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंनी भाष्य लिहिले आहे. ते ही या दर्शनात महत्वाचे समजले जाते. अकरा प्रमुख उपनिषदे पुढील प्रमाणे
क्र. उपनिषदाचे नाव- संबंधित वेद - मुख्य विषय / विशेष महत्त्व
१ ईशोपनिषद - शुक्ल यजुर्वेद - कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय. "इशावास्यमिदं सर्वम्" हा प्रसिद्ध मंत्र याच उपनिषदात आहे.
२ केनोपनिषद - सामवेद - परब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन आणि शक्ती ही ईश्वराचीच आहे हा संदेश (यक्ष आणि देवांची कथा).
३ कठोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - बालक नचिकेता आणि यमराज यांचा संवाद; मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान.
४ प्रश्नोपनिषद - अथर्ववेद - ६ ऋषींनी पिप्पलाद ऋषींना विचारलेले प्राण, सृष्टी आणि आत्म्याविषयीचे ६ महत्त्वाचे प्रश्न.
५ मुंडकोपनिषद - अथर्ववेद - परा आणि अपरा विद्यांचे वर्णन. भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" येथूनच घेतले आहे.
६ मांडुक्योपनिषद - अथर्ववेद - सर्वात लहान उपनिषद (१२ मंत्र). 'ॐ' (ओम्) कार आणि चेतनेच्या ४ अवस्थांचे (जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय) विश्लेषण.
७ तैत्तिरीयोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - यात "सत्यं वद, धर्मं चर" (सत्य बोला, धर्माने वागा) हा दीक्षान्त संदेश आणि 'आनंदवल्ली' चे वर्णन आहे.
८ ऐतरेयोपनिषद - ऋग्वेद - सृष्टीची उत्पत्ती आणि आत्म्याचे स्वरूप. "प्रज्ञानं ब्रह्म" (ज्ञान हेच ब्रह्म आहे) हे महावाक्य यात आहे.
९ छांदोग्योपनिषद - सामवेद - अतिशय प्राचीन आणि मोठे उपनिषद. आरुणी आणि श्वेतकेतू यांचा संवाद, ज्यामध्ये "तत्त्वमसि" (ते तूच आहेस) हे महावाक्य आहे.
१० बृहदारण्यकोपनिषद - शुक्ल यजुर्वेद - सर्वात मोठे उपनिषद. याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद आणि "अहं ब्रह्मास्मि" व "असतो मा सद्गमय" हे प्रसिद्ध मंत्र यात आहेत.
११ श्वेताश्वतरोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - शिव (रुद्र) यांना परमेश्वर मानून भक्ती, योग आणि सांख्य तत्त्वज्ञानाचा सुंदर मेळ.
या उपनिषदांची थोडक्यात वैशिष्ट्ये:
ईशोपनिषद: हे आकाराने खूप लहान (फक्त १८ श्लोक) आहे, पण यात संपूर्ण वेदांताचे सार आहे. "इशावास्यमिदं सर्वम्" हा प्रसिद्ध मंत्र याच उपनिषदातील आहे.
कठोपनिषद: यात बालक नचिकेता आणि यमराज यांच्यातील अतिशय सुंदर आणि मार्गदर्शक संवाद आहे, ज्यामध्ये मृत्यू आणि आत्मज्ञानाचे रहस्य सांगितले आहे.
मुंडकोपनिषद: भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" याच उपनिषदातून घेतले गेले आहे.
मांडुक्योपनिषद: हे सर्व उपनिषदांमध्ये आकाराने सर्वात लहान आहे (फक्त १२ मंत्र), यात 'ॐ' (ओम्) काराची आणि चेतनेच्या चार अवस्थांची (जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय) सखोल चर्चा आहे.
बृहदारण्यकोपनिषद: हे आकाराने सर्वात मोठे आणि प्राचीन उपनिषद आहे. यात याज्ञवल्क्य, मैत्रेयी आणि जनक राजा यांचे प्रसिद्ध संवाद आहेत. "असतो मा सद्गमय" हा मंत्र याच उपनिषदातील आहे.
या सर्व उपनिषदांचा मुख्य उद्देश माणसाला 'अहं ब्रह्मास्मि' (मीच तो ब्रह्म आहे) म्हणजेच आत्मज्ञान आणि मोक्षाची अनुभूती करून देणे हाच आहे.
आपण पुढील भागात अद्वैत वेदांताच्या अभ्यासात प्रमुख मानल्या गेलेल्या ग्रंथांसंबंधी माहिती घेऊ .
©संतोष कारखानीस

Monday, June 1, 2026

अद्वैत वेदांत - १ (२०२६)

 मी परत एकदा अद्वैत दर्शनावर एक लेखमाला चालू करत आहे. 


भारतीय प्राचीन तत्वज्ञानाच्या आठ (अथवा नऊ - योग हे दर्शन आहे काय याबद्दल मतभेद आहेत) प्रमुख शाखा मानल्या जातात. या शाखांना 'दर्शन' अशी संज्ञा आहे.  प्रत्येक दर्शनाची अनेक उपदर्शने आहेत. यातील सर्वात अर्वाचीन दर्शन म्हणजे वेदांत दर्शन. वेदांत दर्शन हे वेदांमधील उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर आधारलेले आहे. म्हणून त्यांना 'प्रस्थानत्रयी' या नावाने ओळखतात. 



वेदांत दर्शनामध्ये अनेक उपदर्शने आहेत.

१. अद्वैत वेदांत :

यात “ब्रह्म आणि जीव एकच” असा ठाम विचार आहे.

प्रणेते — आद्य शंकराचार्य


२. विशिष्टाद्वैत वेदांत

इथे एकत्व आहे, पण त्यात भेदाची झाक आहे—जीव आणि जग हे ब्रह्माचेच अंश.

प्रणेते — रामानुजाचार्य


३. द्वैत वेदांत

“जीव आणि ईश्वर वेगळेच” असा स्पष्ट भेद मांडणारा विचार.

प्रणेते — मध्वाचार्य


४. द्वैताद्वैत (भेदाभेद) वेदांत

इथे एकाच वेळी भेदही आहे आणि अभेदही—दोन्ही एकत्र.

प्रणेते — निंबार्काचार्य


५. शुद्धाद्वैत वेदांत

सगळं काही ब्रह्मच आहे, पण जगाला माया न मानता सत्य मानलं जातं.

प्रणेते — वल्लभाचार्य


६. अचिन्त्य भेदाभेद वेदांत

“भेद आणि अभेद दोन्ही आहेत, पण ते मानवी बुद्धीला पूर्ण कळणं कठीण” असा विचार.

प्रणेते — चैतन्य महाप्रभू


आपल्याला माहीत असलेला आणि पाश्चात्य जगात मान्यता पावलेला 'हरेकृष्ण' संप्रदाय 'अचिन्त्य भेदाभेद वेदांत' या वेदान्ताच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. 'ईश्वर (कृष्ण), जीव आणि जग यांच्यात भेदही आहे आणि अभेदही आहे, पण तो भेद-अभेद “अचिन्त्य” आहे—म्हणजे पूर्णपणे बुद्धीने समजून घेणं कठीण' असे हा संप्रदाय मानतो. 


या सहा वेदान्ताच्या शाखांत 'अद्वैत वेदांत' हे नाव आणि आद्य शंकराचार्यांची माहिती भारतातील जवळपास प्रत्येक हिंदू माणसाला माहित असते. शंकराचार्यांनी मांडलेला हा अद्वैत वेदांत अत्यंत तर्कशुद्ध असून ईश्वराची (ब्रह्माची) प्रचिती येण्यासाठी कोठे अन्य ठिकाणी (उदा. स्वर्गात) जाण्याची गरज नाही, भविष्याची (उदा. मृत्यू) वाट बघण्याची गरज नाही. ही प्रचिती कोणालाही येथे आणि या क्षणी येऊ शकते असे हे दर्शन मानते. किंबहुना आपण ब्रह्म नेहमीच अनुभवत असतो, पण आपल्याला त्याची ओळख नसल्याने लक्षात येत नाही असे हे दर्शन सांगते. 


आपण या लेखमालेत 'ब्रह्म हेच एकमेव आहे, ब्रह्मशिवाय काहीच नाही' हे तर्कशुद्ध पद्धतीने जाणून घेणार आहोत.  आपण ब्रह्माला का ओळखू शकत नाही, त्यासाठी काय करावे लागेल हे ही या मालिकेत पाहू. आपल्याला आपले ब्रह्मस्वरूप ओळखण्यासाठी ही मालिका नक्कीच सहायय करेल. 


पुढील लेख : अद्वैत वेदांतासंबंधी प्रमुख ग्रंथ आणि अद्वैत वेदांताची ढोबळ मांडणी यासंबंधी. 

©संतोष कारखानीस

Tuesday, May 5, 2026

नासदीय सूक्त आणि अद्वैत वेदांत

 सृष्टीच्या अगदी सुरुवातीचा विचार करताना आपण लगेच “काहीतरी कारण असेल” असं मानतो. पण ऋग्वेदामधील नासदीय सूक्त हा आपला हा पाया हलवून टाकतो.

ऋषी म्हणतात — “ना सत् होतं, ना असत् होतं…” म्हणजे अस्तित्व आणि अनस्तित्व या दोन्ही कल्पना सुद्धा तेव्हा नव्हत्या.

इथेच अद्वैत वेदांताची किल्ली सापडते.
अद्वैत सांगतं — “ब्रह्म” हे ना ‘अस्तित्व’ या मर्यादेत बसतं, ना ‘अनस्तित्व’ या. कारण ही दोन्ही शब्दं आपल्या बुद्धीची चौकट आहेत. ब्रह्म त्या चौकटीच्या पलीकडे आहे.


नासदीय सूक्तात पुढे “तम आसीत्तमसा गूळ्हमग्रे” — अंधारावर अंधार दाटलेला होता, असं वर्णन येतं.

हा अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव नाही… तर ‘भेदभावाचा अभाव’ आहे.
अद्वैताच्या भाषेत — अजून “द्वैत” निर्माण झालेलंच नाही. पाहणारा आणि पाहिलेलं, जाणणारा आणि ज्ञेय — हे विभाजनच अस्तित्वात नाही.

सूक्तात “काम” (इच्छा) ही पहिली हालचाल मानली आहे.
ही इच्छा म्हणजेच सृष्टीचा बीजांकुर.
अद्वैत वेदांतातही “माया” किंवा “इच्छा-शक्ती” यामुळे एकत्वात अनेकतेचा भास निर्माण होतो.
म्हणजे ब्रह्म बदलत नाही… पण त्याच्या अनुभूतीत विविधता दिसू लागते.

अद्वैत वेदांतात जसं म्हटलं आहे — “ब्रह्म सत्यम्, जगत् मिथ्या”--
आपण जे जग पाहतो ते अंतिम सत्य नसून “उपाधी”मुळे दिसणारं रूप आहे.
नासदीय सूक्त यालाच एका काव्यमय पद्धतीने स्पर्श करतं.
ते स्पष्ट सांगत नाही, पण सूचित करतं — जे दिसतंय ते कदाचित अंतिम नाही.

आणि मग शेवटचा जबरदस्त टप्पा —
“को अद्धा वेद?” — कोण खात्रीने सांगू शकतो?
इथे ऋषी ज्ञानाच्या मर्यादा मान्य करतो.

अद्वैतातही हेच —
ब्रह्म ‘जाणण्याची’ वस्तू नाही.
ते आपण ‘आहोत’.
म्हणूनच त्याला जाणण्याचा प्रयत्न केला की तो चुकतो… आणि स्वतःमध्ये स्थिर झालं की तो उलगडतो.

आज आपण विज्ञान, कॉस्मॉलॉजी, बिग बँग याबद्दल बोलतो.
पण नासदीय सूक्त एक पाऊल पुढे जातं —
ते विचारतं, “ज्याने हे सर्व निर्माण केलं, त्यालाही खरंच माहीत आहे का?”

ही केवळ शंका नाही… ही एक खोल जाणीव आहे —
सत्य हे बौद्धिक उत्तरात सापडत नाही, तर अनुभवाच्या शांततेत उगवतं.

म्हणूनच —
नासदीय सूक्त आणि अद्वैत वेदांत दोन्ही आपल्याला एकच दिशा दाखवतात…
बाहेर उत्तर शोधू नकोस…
स्वतःकडे वळ.

© संतोष कारखानीस

Saturday, November 25, 2023

सर्वं खल्विदं ब्रह्म

 

गेले काही दिवस आपण अद्वैत वेदांताची मांडणी बघत आहोत.

अद्वैत वेदांतानुसार सगळे विश्व (आणि अन्य विश्वे) सत्-चित्-आनंद स्वरूपी ब्रह्म आहे. विश्वाचे 'अधिष्ठान' ब्रह्म आहे. त्यावर मायेने 'नाम-रुपाचे' पांघरूण घातले आहे. पण या पांघरूणाआडूनही ब्रह्म डोकावत असते. आपण कधीही ते अनुभवू शकतो. हे आपण पाहीले. मात्र या ब्रह्माची जाणीव होण्यासाठी आपण जागृत हवे. मनाची जागरूकता कशी वाढवायची?
यासाठी दोन मार्ग आहेत. 'भक्तिमार्ग' आणि 'ध्यानमार्ग' . दोनपैकी कोठलाही मार्ग आपल्याला निवडता येतो. आपापल्या स्वभावानुसार आणि मागील जन्मातील वाटचालीनुसार हा मार्ग निवडायचा असतो. आपला मार्ग कुठला हे समजत नसेल तर सुरुवात दोन्ही मार्गांनी करावी. जो आपला मार्ग असेल त्यात प्रगती वेगाने होते. आपोआप आपल्याला आपला मार्ग कळतो.
यासाठी 'गुरु'ची आवश्यकता कितपत आहे? मला निश्चित सांगता येणार नाही. माझा प्रवास अंत:प्रेरणेने झाला. भगवान शिव हेच माझे या जन्मातील गुरु आहेत असे मी मानतो. माझ्या प्रवासात मला वेळोवेळी अनेक मार्गदर्शक भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रवास सुकर झाला. परंतु ते माझे गुरु नव्हेत. गुरूंसमोर संपूर्ण समर्पण करायचे असते. गुरु जे सांगेल ते मनात कोठेही किंतु न आणता करायचे असते. म्हणूनच केवळ भगवान शिव हेच माझे गुरु आहेत असे मी मानतो. जर गुरु निवडायचाच असेल तर फार काळजीपूर्वक निवडावा लागतो. अर्धाकच्चा गुरु असेल तर तो त्याच्या मार्गानेच जाण्याचा आग्रह धरण्याची शक्यता असते. आणि त्याचा मार्ग हा आपला मार्ग नसू शकतो.
अनेक वेळा भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्गाने बराच काळ प्रवास करूनही ब्रह्माची प्रचिती येत नाही, मन स्थिर होत नाही. याचे कारण म्हणजे मालिन चित्त. मालिन चित्त कधीही स्थिर होत नाही. चित्ताची मलिनता दूर करण्यासाठी गीतेत 'कर्मयोग' सांगितला आहे. पातंजल योगात 'यमनियम' सांगितले आहेत. तसेच बौद्ध आणि जैन धर्मातही उपाय सांगितले आहेत.
आपल्याला आपला योग्य मार्ग लवकर मिळावा आणि या जन्मातच ब्रह्मज्ञान व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ही मालिका येथेच संपवितो आहे.

लेखनसीमा.
संतोष कारखानीस ठाणे.

Friday, November 24, 2023

माया

 

माया ही अद्वैत वेदांतातील महत्वाची संकल्पना. विश्व हे केवळ सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे असे हे दर्शन मानते. आपल्याला प्रतीत होणारे, आसपास आपण अनुभवतो ते सगळे 'माया' कसे असेल हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. म्हणूनच 'माया' हे सामान्य साधकांसाठी कायम एक गूढ राहिले आहे.

प्रथम हे लक्षात घेऊ की 'माया' ही ब्रह्मापासून वेगळी नाही. ती ब्रह्माची एक 'शक्ती' आहे. तिच्यात 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती सामावलेल्या आहेत. आवरणशक्ती सत्य गोष्टींवर पांघरूण घालते तर विक्षेप शक्ती आहे त्या गोष्टींना वेगळेच आहे असे भासविते. उदाहरणार्थ अंधारात एक दोर पडला आहे. आवरणशक्ती त्या दोराच्या खऱ्या स्वरूपावर आवरण घालते आणि विक्षेपशक्ती त्या दोराच्या जागी सर्प आहे असा आभास निर्माण करते. मात्र माया या दोराला संपूर्ण झाकू शकत नाही. आपल्याला भासणाऱ्या सर्पाची लांबी, जाडी, वेटोळे घालण्याची ढब इत्यादी त्या दोरापासूनच आलेले असते. मायेच्या आडून ब्रह्म असेच डोकावत असते. आपण जागरूक असू तर हे क्षणोक्षणी दिसणारे ब्रह्म ओळखू शकू. हाच मुक्तीकडे जाणारा मार्ग आहे.
आपण 'अधिष्ठान' या संकल्पनेचा विचार करताना पाहिले की मातीच्या घटाचे अधिष्ठान 'माती' आहे. हा घट फोडला तर केवळ माती शिल्लक राहील. त्या मातीपासून आपण अन्य वस्तू बनवू शकू. म्हणजेच तो घट हा केवळ मातीला दिलेले एक रूप आहे. त्या रुपाला आपण 'घट' हे नाव आपल्या सोयीसाठी दिले आहे. वस्तूत: ती केवळ माती आहे. या नावामुळे व्यवहारात या घटाचा उपयोग करणे आपल्याला सोयीचे होते.
समुद्रात लाटा उसळत असतात. प्रत्येक लाटेचे अधिष्ठान 'पाणी' आहे. लाटा या केवळ पाण्याला आलेले रूप आहे. त्याला 'लाट' हे नाव आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी दिले आहे. लाट किनाऱ्याला येऊन नष्ट होईल. त्यातील पाणी परत सागराला मिळेल. त्यातून नवी लाटही तयार होईल. तसेच दागिन्यांचे अधिष्ठान सोने आहे. एक दागिना मोडून आपलं दुसरा करू शकतो. तो दागिना हा केवळ सोन्याला दिलेले रूप आहे. आणि त्या रुपाला आपण 'बांगड्या', 'पाटल्या', 'हार' इत्यादी नावे आपल्या सोयीसाठी देतो.
अगदी अशाच पद्धतीने आपण पाहिले होते की या विश्वाचे अधिष्ठान 'सत्' म्हणजेच 'अस्तित्व' आहे, अर्थात ब्रह्म आहे. या अस्तित्वाला - आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या वस्तूंना-उर्जेला-शक्तींना मायेने काही रूप दिले आहे, त्या रुपाला आपण व्यवहारातील सोयीसाठी नावही दिले आहे. पण ते केवळ अस्तित्व आहे , ब्रह्म आहे. हेच सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्मावर मायेने घातलेले 'नाम-रूपाचे' पांघरूण'. आपण जागरूक असू तर क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तूतून आपल्याला अस्तीत्व म्हणजेच 'ब्रह्म' जाणवत असते. या जागरूकतेतूनच आपला मुक्तीचा प्रवास सुरु होतो. अशी अखंड जागरूकता म्हणजेच 'मुक्ती'.
नित्य व्यवहारात आपली जागरूकता वाढविण्यासाठी काय करावे लागेल, त्यात येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करायची हे पुढील लेखात पाहू.
संतोष कारखानीस ठाणे

Thursday, November 23, 2023

प्रकटीकरण

आज आपण विविध गोष्टींच्या प्रकटीकरणासंबंधी थोडा विचार करू. मी जेव्हा गोष्ट असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Objects असा आहे. Objects म्हणजे चैतन्य अनुभवू शकते अशा सर्व गोष्टी. यात केवळ भौतिक वस्तू नव्हे, तर विविध ऊर्जा, शक्तीही येतात.

एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तरी ती अनुभवण्यासाठी तिचे प्रकटीकरण व्हावे लागते. सूर्यप्रकाश संपूर्ण अंतराळ व्यापून राहिला आहे. परंतु अवकाशात गेल्यावर अंतराळवीरांना आकाश अंधारे भासते. एखादी वस्तू अंतराळात असेल तर ती प्रकाशमान झाल्यामुळे तेथे प्रकाश आहे हे कळते. अंधाऱ्या खोलीतही प्रकाशाची तिरीप आल्यास वाटेतील धूलिकणांमुळे त्या प्रकाशाच्या येण्याचे अस्तित्व जाणवते. म्हणजेच प्रकाशाच्या प्रकटीकरणासाठी वाटेत एखाद्या वस्तूची गरज आहे, एखाद्या माध्यमाची गरज आहे.
तसेच चैतन्य संपूर्ण विश्व व्यापून राहिले आहे. एखादी निर्जीव वस्तू असेल त्यात चैतन्य असतेच. परंतु तेथे त्या चैतन्यला प्रकट होण्यास वाव मिळालेला नसतो. चैतन्य प्रकट होण्यासाठीचे माध्यम म्हणजे सूक्ष्म शरीर. त्याच्या साहाय्यानेच चैतन्य प्रकट होते. अंत:करण हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे. त्यात चैतन्याची प्रतिमा उमटते आणि अंत:करणाच्या अहंकार या भागाशी एकरूप होऊन चेतासंस्थेच्या साहाय्याने संपूर्ण शरीरात पसरते. अहंकाराशी एकरूप झाल्याने आपल्याला हे चैतन्य 'माझे' आहे असे वाटते. परंतु विश्वात पसरलेल्या चैतन्याचा केवळ तो एक भाग असते.
ब्रह्म सत्-चित्-आनंद स्वरूपी आहे. चित् म्हणजेच चैतन्य. संपूर्ण विश्व चैतन्यमय म्हणजेच ब्रह्ममय आहे. मी चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे.
अहम् ब्रह्मास्मि |
संतोष कारखानीस ठाणे

Wednesday, November 22, 2023

अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म

आता अद्वैत वेदान्तामधील आणखी एक संकल्पना पाहू. ही संकल्पना समजण्यास खूप सोपी आहे. 'अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म' .
एका चुलीवर भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याची उष्णता हा त्या पाण्याचा मूलभूत गुणधर्म नाही. तो त्याने भांड्याकडून 'उधार' घेतला आहे. पाण्याचा आकार हा ही भांड्याकडून उधार घेतला आहे. मात्र पाण्याचे वस्तुमान हा पाण्याचा मूलभूत गुणधर्म आहे. पाणी दुसऱ्या भांड्यात ओतले तर ते थंड होईल. त्याचा आकारही बदलेल.
तसेच भांड्याची उष्णता हा भांड्याचा मूलभूत गुणधर्म नाही. त्याने तो खालच्या चुलीच्या जाळाकडून उधार घेतला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हे त्या भांड्याचे मूलभूत गुणधर्म आहेत. भांडे चुलीवरून उतरवले तरी त्याचा आकार तोच राहील.
चुलीच्या जाळाचा मात्र उष्णता हा मूलभूत गुणधर्म आहे. ही उष्णता जाळाकडून भांड्याकडे आणि भांड्याकडून पाण्याकडे जाते. चुलीखालचा जाळ काढून घेतला तर भांड्यातील आणि पाण्यातील उष्णता निघून जाईल.
तसेच चैतन्य हा आपल्या शरीराचा मूलभूत गुणधर्म नाही. आपल्या शरीराने तो आपल्या सूक्ष्म शरीराकडून घेतला आहे. सूक्ष्म शरीराने तो ब्रह्माकडून घेतला आहे. म्हणूनच सूक्ष्म शरीराने स्थूल शरीराचा काही कारणाने त्याग केला की आपले जड शरीर चैतन्यहीन होते.
संतोष कारखानीस ठाणे

#santoshkarkhanisthane #advaita 

Tuesday, November 21, 2023

वृत्ती

 या पूर्वी आपण साक्षी, विवर्त, उपाधी आणि अधिष्ठान या अद्वैत वेदांतातील चार महत्वाच्या संकल्पनांसंबंधी माहिती घेतली. या चार संकल्पनांवर अद्वैत तत्वज्ञानाची उभारणी झालेली आहे असे म्हणता येईल. आता आपण भारतीय तत्वज्ञानातील अन्य एका संकल्पनेची माहिती करून घेऊ.

'वृत्ती' हा शब्द मराठी भाषेत रुजला आहे. त्याचा मूळ अर्थ आता आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूची कार्यपद्धती बघावी लागेल. मेंदूत अनेक पेशी असतात. त्यांना चेतापेशी म्हणतात. त्यातून चेतातंतू शरीराच्या भागात गेले असतात. हे चेतातंतू सतत मोठ्या प्रमाणात माहिती मेंदूकडे आणत असतात. या माहितीचे पृथकारण करून ती माहिती योग्य ठिकाणी साठविण्याचे काम मेंदू करत करत असतो. याच वेळी मेंदूत साठविलेल्या प्रचंड माहितीतील योग्य माहितीतील माहितीचे पृथकारण करून योग्य त्या अवयवांना कृती करण्याचे आदेश देण्याचे कामही मेंदू करत असतो. या सगळ्यासाठी मेंदूला खूप मोठी Processing Capacity ची आवश्यकता असते. परंतु मेंदूची Processing Capacity केवळ १२० bits/second एवढीच आहे.
याचाच अर्थ मेंदूकडे येणाऱ्या सगळ्या माहितीचे पृथकारण मेंदू करू शकत नाही. त्यातही आधी साठविलेल्या माहितीचे पुनराविलोकन (Retrival) मेंदू करत असेल तर सर्व अवयवांकडून आलेल्या फारच थोड्या माहितीचे पृथकारण होऊ शकते. अशावेळी मेंदू कोठल्या अवयवांकडून येणाऱ्या माहितीचे पृथकारण करायचे याचा निर्णय घेतो. यालाच त्या विषयीची वृत्ती आपल्या मनात जागृत झाली असे म्हणतात.
मी शाळेत वर्गात बसलो आहे. शिक्षक शिकवीत आहेत. मला तो विषय शिकण्याची इच्छा जागृत झाली तर त्या विषयाच्या वृत्तीने माझे मन व्याप्त झाले असे म्हणता येईल. मग माझ्या डोळ्यांकडून आणि कानांकडून हेणाऱ्या संदेशांचे मेंदू ग्रहण करून पृथकारण करेल आणि मला तो विषय समजेल. एखाद्या विषयाचे ज्ञान होण्यासाठी त्या विषयाची वृत्ती मनात जागणे आवश्यक आहे.
एखादी अंधारी खोली आहे. त्यातील एका कोपऱ्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे. खोलीच्या खिडकीत ऊन येत आहे. आपण एक आरसा घेऊन त्याचा कवडसा त्या खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाडून त्या कोपऱ्याचे ज्ञान मिळवू शकतो. आपल्याला हव्या त्या जागी तो कवडसा फिरवून ज्ञान घेता येईल. मात्र तो आरसा लहान असल्याने एकाच वेळी खोली उजळू शकणार नाही.
चैतन्याचा सूर्य आकाशात तळपत आहे. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने चैतन्याचा कवडसा एखाद्या गोष्टीवर टाकून हवे ते ज्ञान मिळवू शकतो. मात्र आपल्याला सूर्याचे ज्ञान हवे असेल तर मनाच्या आरशाने सूर्यावर कवडसा पाडण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच चैतन्य स्वयंप्रकाशित आहे. प्रत्येक क्षणी आपल्याला चैतन्याची जाणीव असते. त्याच्या साहाय्यानेच आपण ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. त्यासाठी चैतन्याची वृत्ती जगविण्याची गरज नाही.
चैतन्यमय जीवनासाठी शुभेच्छा.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, November 20, 2023

साक्षी

 'साक्षी' ही केवळ अद्वैत वेदांतातील नाही, तर सर्वच भारतीय दर्शनांतील एक मूलभूत संकल्पना आहे.

साक्षीचे इंग्रजीत भाषांतर 'Observer' असे सर्वसाधारणपणे केले जाते. पण यात त्यातील सगळा अर्थ येत नाही. साक्षी हा Observer असतोच, पण त्या निरीक्षणाच्यामध्ये त्याची मानसिक गुंतवणूक नसते. तो त्रयस्थ असतो.
डोळे आसपासच्या गोष्टी बघतात. डोळे या गोष्टींचे 'साक्षी' असतात. म्हणूनच डोळे आणि ते बघत असलेल्या गोष्टी भिन्न असतात. डोळे स्वत:लाच बघू शकत नाहीत. फार तर आरशात डोळ्याचे प्रतिबिंब तो डोळा बघू शकेल. मेंदू आपल्या डोळ्यांनी पाठविलेले संदेश ग्रहण करू शकतो, अनुभवू शकतो. मेंदू डोळ्यांचा साक्षी आहे असे म्हणता येईल. मेंदू (अथवा मन) डोळ्यांनी पाहिलेले आपल्या चैतन्यासमोर उभे करतो. आपले चैतन्य हे मेंदूचे साक्षी आहे. म्हणूनच आपले चैतन्य (म्हणजेच आपण)आपल्या मनापेक्षा, मेंदूपेक्षा, शरीरापेक्षा वेगळे आहे. चैतन्य या गोष्टी कोणासमोरही उभ्या करत नाही. ते अंतिम साक्षी आहे. हे अंतिम साक्षी असलेले चैतन्य हीच आपली ओळख आहे.
आपले चैतन्य, म्हणजेच आपण केवळ साक्षी आहोत. मनात उद्भवणाऱ्या भाव-भावना, सुख-दु:ख यांचे चैतन्य केवळ साक्षी आहे. आपण निराश झालो तर त्या मनातील नैराश्याचे चैतन्य (म्हणजेच आपण) केवळ साक्षी असते. त्या नैराश्याचा 'आपल्यावर' काहीही परिणाम होत नाही, चैतन्यावर साधा ओरखडाही उठत नाही.
या साक्षीभावासंबंधी आपले तत्वज्ञान पूर्वीपासून सांगत आहे. परंतु विज्ञानातील नव्या संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडत आहे. १९८० साली जर्मन शास्त्रज्ञ H. Dieter Zeh यांनी केलेल्या डबल स्लिट एक्सपेरिमेंट - कोपनहेगन इंटरप्रिटेशन प्रयोगात असे दिसून आले की तरंग स्वरूपात असलेला फोटॉन निरीक्षण केले असता कण स्वरूपात येतो. याचा अर्थ कसा लावायचा याबद्दल अजून शास्त्रज्ञांत एकमत झालेले नाही. परंतु 'निरीक्षक' म्हणजेच 'साक्षीत्वा'मुळे हे विश्व उदयास येते का, 'हे विश्व केवळ चैतन्यात उदयास येते का' असा मूलभूत प्रश्न यामुळे पुढे आला आहे.
विज्ञान त्याच्या परीने उत्तर शोधेल. पण आपण हा साक्षीभाव जागवू आणि सुख-दु:खापासून स्वत:ला दूर ठेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

Sunday, November 19, 2023

अधिष्ठान

 'अधिष्ठान' ही अद्वैत वेदांतातील आणखी एक महत्वाची संकल्पना... 'विवर्त' आणि 'उपाधी' या संकल्पनांविषयी आपण आधी जाणून घेतले आहे.

ही संकल्पना काही उदहरणांनी समजून घेऊ. दगिन्यांतून सोने काढून घेतले तर दागिने राहाणार नाहीत. मात्र वितळवून दागिना नष्ट केला तरी सोने तसेच राहील. त्याचे अन्य दागिने बनविता येतील. सोने हे दगिन्यांचे अधिष्ठान आहे.
मातीच्या घटातून माती काढून टाकली तर घट रहाणार नाही. मात्र मातीतून घट काढला, म्हणजेच तो घट फोडला तरी माती शिल्लक राहील. त्या मातीपासून अन्य वस्तू बनविता येतील. माती हे त्या घटाचे अधिष्ठान आहे.
त्याचप्रमाणे 'अस्तित्व' (ज्याला 'सत्' असेही म्हणतात) हे या विश्वाचे अधिष्ठान आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट (Matter, Energy) अस्तित्वाने परिपूर्ण आहे. त्यातून अस्तित्व काढून टाकले तर ती गोष्ट राहणार नाही. एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट बनते तेव्हा पहिली गोष्ट नष्ट होते, पण अस्तित्व नष्ट होत नाही. ते दुसऱ्या गोष्टीच्या रूपाने दिसते. या विश्वाचा जेव्हा लय होईल तेव्हाही सर्व गोष्टी नष्ट होतील, पण अस्तित्व हे 'केवळ अस्तित्व' या रूपात उरेल, त्याचे Potential शाबूत असेल. त्यातून पुढे नवे विश्व आकाराला येईल.
ब्रह्म सत्-चित्-आनंद स्वरूपात आहे. आपल्या सगळ्यांचे अधिष्ठान अस्तित्व - अर्थात 'सत्' - आहे हे आपण पाहिलेच. म्हणजेच आपले अधिष्ठान ब्रह्म आहे. आपण ब्रह्मस्वरूपी आहोत.
अहम् ब्रह्मास्मि |
संतोष कारखानीस ठाणे

Saturday, November 18, 2023

उपाधी

 'उपाधी' हा अद्वैत वेदान्तामधील आणखी एक महत्वाची संकल्पना.

हा शब्द मराठीमध्येही अनेक वेळा वापरला जातो. पण त्यावेळी त्याचा मूळचा संस्कृतमधील अर्थ विसरला जातो. अनेकवेळा उपाधी हा शब्द 'विशेषण' अथवा 'पदवी' या अर्थाने वापरला जातो.
एखाद्या गोष्टीच्या सानिध्यामुळे त्या गोष्टीचे गुण दुसऱ्या गोष्टीचे आहेत असे वाटणे म्हणजे उपाधी. उदाहरणार्थ एखाद्या पारदर्शक काचेच्या लोलकामागे (Crystal) लाल जास्वंदीचे फुल ठेवले असता तो लोलक लाल भासतो. लोलकाला लाल रंग आलेला नसतो. केवळ त्या लाल फुलाच्या सानिध्यामुळे लोलकाचा रंग तसा भासतो. फुल दूर केले असता लोलक रंगहीनच आहे हे लक्षात येते.
ब्रह्म अथवा साक्षीचैतन्य आकाशात अविरत तळपत असते. आपल्या सूक्ष्म शरीराच्या अंत:करण या भागात त्याचे प्रतिबिंब पडते. अंत:करणाचे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे भाग आहेत. हे साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब अहंकार या भागाशी एकरूप होऊन चेतासंस्थेमार्फत संपूर्ण शरीरात पसरते. आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. आपल्या मनात उमटणाऱ्या भावभावना 'उपाधी'मुळे (मनाच्या सानिध्यामुळे) आपल्या चैतन्यातच उमटल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर आपले चैतन्य कायम निरामय, निरंजन असते. मनात उमटणाऱ्या भावभावनांचा, सुखदु:खाचा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नसतो.
आपण आपल्या कायम निरामय असलेल्या चैतन्यला जाणून घेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

Friday, November 17, 2023

विवर्त

'विवर्त' हा अद्वैत वेदांताचा पाया आहे असे म्हणावे लागेल. सत्य हे अनेक पातळ्यांवर असते असे हा सिद्धांत सांगतो.
वाळवंटात मृगजळ दिसते. ते आपल्या दृष्टीच्या पातळीवर सत्य असते. परंतु प्रत्यक्षात (सत्याच्या अधिक उच्च पातळीवर) ते केवळ वाळवंट असते. मृगजळ हे वाळवंटाचे 'विवर्त' आहे. अंधारात पडलेला दोर हा सापासारखा भासतो. दृष्टीच्या पातळीवर तो सर्प सत्यच असतो. सर्प हे त्या दोराचे 'विवर्त' आहे.
झोपेत स्वप्न पडते. स्वप्नाच्या पातळीवर ते सत्यच असते. मात्र जागृतावस्थेच्या पातळीवरील सत्य हे स्वप्नावस्थेतील सत्यापेक्षा उच्च पातळीवर असते. स्वप्नातील सत्याला कच्चा माल जागृतावस्थेतील मन अथवा घटना पुरवीत असतात. स्वप्न हे जागृतावस्थेचे 'विवर्त' आहे.
ही सर्व उदाहरणे आपल्या नित्य अनुभवातली आहेत, सहज समजणारी आहेत. म्हणूनच याचा अधिक विचार करता जागृतावस्था ही सुद्धा एक विवर्त आहे हे सहजपणे पटते. ब्रह्मावस्थेतील सत्य हे जागृतावस्थेतील सत्यापेक्षा उच्च पातळीवर असते. जागृतास्थेतील घटनांना कच्चा माल ब्रह्मावस्थेकडूनच येतो. जागृतावस्था हे ब्रह्मावस्थेचे विवर्त आहे.
जागृतावस्था हे ब्रह्मावस्थेचे विवर्त असण्याची संकल्पना समजली की तत्वज्ञानातील अनेक जटील प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. ब्रह्मावस्थेतील एक सर्वशक्तिमान परमात्मा (ब्रह्म) आणि जागृतावस्थेतील अनेक देव-देवता यात काही विरोधाभास दिसत नाही. जागृतावस्थेतील देवदेवता या ब्रह्माचे विवर्त आहेत. त्यांना शक्ती ब्रह्माकडूनच प्राप्त झाल्या आहेत. त्याही आपल्यासारख्या ब्रह्मस्वरूपच आहेत हे लक्षात येते. मग त्यांना आपल्यासारख्याच भाव-भावना असणे यात काहीच गैर वाटत नाही. जसे स्वप्नात झालेल्या रोगावर इलाज स्वप्नातील डॉक्टरकडूनच करावे लागतात. जागृतावस्थेतील डॉक्टरांचा तेथे उपयोग नसतो, तसेच जागृतास्थेतील आपल्या समस्यांवर उपाय या विश्वातील (विवर्तातील) देव-देवतांकडूनच होऊ शकतात - ब्रह्मावस्थेतील ब्रह्माकडून नाही हे लक्षात येते. आपले तत्वज्ञान अब्राहमीक (मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू) तत्वज्ञानापेक्षा कसे वेगळे आहे हे कळते.
आपण आपल्या तत्वज्ञानातील 'विवर्त' ही वैशिष्टपूर्ण संकल्पना नीट समजून घेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

 


प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.

चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस

Thursday, July 20, 2023

भक्तिमार्ग

 अद्वैत वेदांत परोपरीने हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की आपण आणि हे केवळ ब्रह्म आहोत. मग जेव्हा भक्तीचा प्रश्न येतो, मंदिरात जाण्याचा प्रश्न येतो तेव्हा वाटते, मी तर ब्रह्म आहे, मी केवळ साक्षी चैतन्य आहे. मग मी भक्ती कोणाची करायची? साक्षीचैतन्याबद्दल  माझ्या मनात कोणतीही भावना नाही. ना प्रेमाची, ना द्वेषाची. मग मी भक्ती कसली करू? मी माझीच भक्ती करू? माझ्यापुढेच नतमस्तक होऊ? 

हा प्रश्न योग्य आहे. कारण भक्तिभाव हा फक्त एखाद्या Object बद्दल असू शकतो. ज्याला आपले चैतन्य जाणू शकते त्याला Object म्हणतात. म्हणूनच Object आणि चैतन्य हे भिन्न असतात. चैतन्य हे चैतन्यालाच जणू शकत नाही. म्हणून ते Object नाही.  मग या साक्षी चैतन्याबद्दल भक्तिभाव कसा जागवायचा?

खरे तर याचे उत्तर आपल्या प्रश्नातच दडलेले आहे. 'मी भक्ती कोणाची करायची?' या प्रश्नातील 'मी' हे केवळ ब्रह्म अथवा साक्षीचैतन्य नाही. येथे 'मी' याचा अर्थ चैतन्यासहित मायेने उभे केलेले माझे स्थूल शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर आहे.  या मायेच्या 'नाम-रूपाच्या' पांघरुणामुळेच मी अन्य व्यक्तींपासून, अन्य वस्तूंपासून वेगळा झालेलो आहे. 'मी' एक Object आहे.  तेव्हा या 'नाम-रूपाच्या' पांघरुणाखालील 'मी' ने याच  मायेने नाम-रूपाचे पांघरूण  घालून आपल्यासमोर उभ्या केलेल्या देवतेचे ध्यान करायचे आहे. याच मायेने या देवतेला असीम शक्तीही दिलेल्या आहेत. आणि हा मायेचा खेळ या विश्वापुरता आहे.  ते या व्यावहारिक पातळीवरील सत्य आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी आपण भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्ग अवलंबितो तेव्हा आपण व्यावहारिक पातळीवर जगत असतो. तेव्हा 'मी माझीच भक्ती कशी करू?' हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. 

देव-देवता

 जर आपण सगळे ब्रह्म आहोत तर विविध देवता कोण आहेत? आपण त्यांची उपासना करण्याची गरजच काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. (माझ्या आठवणीप्रमाणे अशा स्वरुपाचा The Kerala Story या चित्रपटात अन्य धर्मियांकडून उपस्थित केलेला दाखविला आहे).

यासाठी आपल्याला आपल्या प्राचीन तत्वज्ञानामधील 'विवर्त' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. 'सत्य' हे अनेक पातळीवर अस्तित्वात असते. उदाहरणार्थ स्वप्नात आपल्यासमोर विश्व उभे ठाकते. आपणही त्यात असतो. स्वप्नाच्या पातळीवर स्वप्नात घडणाऱ्या सर्व घटना 'सत्य' असतात. ही सत्याची एक पातळी आहे. जागेपणाच्या पातळीवर स्वप्नातील गोष्टी असत्य होतात. पण स्वप्नाच्या पातळीवर त्या सत्यच असतात. मी स्वप्नात आजारी पडलो तर डॉक्टर स्वप्नांतलाच बोलावावा लागेल आणि औषधही स्वप्नातच घ्यावे लागेल. जागेपणी स्वप्नातील रोगावर औषध घेऊन उपयोग होणार नाही. 

स्वप्नातील घटनांसाठी Raw Material माझ्या मनातून पुरविले जाते. तसेच आपल्या जागृतावस्थेसाठी Raw Material आपल्या ब्रह्मस्वरूपाकडून पुरविले जाते.  जागृतावस्था ही जशी सत्याची स्वप्नावस्थेपेक्षा उच्च पातळी म्हणता येईल, तशी ब्रह्मावस्था ही सत्याची आणखी उच्च पातळी आहे. 

जसे स्वप्नातील रोगांसाठी स्वप्नातील डॉक्टरकडून इलाज करवून घ्यावा लागतो, तसेच जागृतावस्थेतील समस्यांसाठी या विश्वातील शक्तींकडूनच मदत घ्यावी लागते. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. परंतु आपल्या जागृतावस्थेतील सत्याच्या पातळीवर आपण आपले शरीर-मन आहोत. आपल्या समस्या या आपल्या ब्रह्मरूपाच्या समस्या नाहीत तर शरीर-मनाच्या समस्या आहेत. म्हणूनच त्या समस्यांसाठी आपल्याला या विश्वातील शक्तींकडूनच - देवतांकडूनच मदत मिळू शकते. आपण आणि या देवता शेवटी ब्रह्मस्वरूपच आहोत. या देवता या विश्वातीलच आहेत. तेव्हा त्यांना भावना असणे यात काहीही गैर नाही.  त्यांच्या या भावना उच्च स्वरूपाच्या असतात, म्हणजेच चांगल्या व्यक्तींना मदत करण्यास या शक्ती उत्सुक असतात. 

अन्य धर्मियांचे तत्वज्ञान वेगळे आहे. त्यांचे तत्वज्ञान आणि आपले तत्वज्ञान या गल्लत करू नका. आपले तत्वज्ञान अधिक लॉजिकल आहे. 

पुनर्जन्म:

पुनर्जन्म ही संकल्पना सर्व पौर्वात्य धर्मांमध्ये आहे. मात्र अब्राहमीक धर्मांत (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) या संकल्पनेला स्थान नाही. आपल्यावर ब्रिटिश राजवटीत ख्रिश्चन संकल्पनांचा मारा झाल्याने आपल्यालापैकी अनेकांना पुनर्जन्म ही संकल्पना म्हणजे एक कल्पनाविलास वाटू लागला आहे. परंतु भारतात आणि पाश्चिमात्य देशांत आता यावर शिस्तबद्ध अभ्यास सुरु झाला आहे. ज्यांना मागील जन्म आठवतो त्यांच्या आठवणी संकलित करून त्याची शहानिशा केली जात आहे. (मला मागील जन्म अंधुकसा आठवतो. त्याची सांगड मी या जन्मातील माझ्या वर्तनाशी घालू शकतो).
अद्वैत दर्शनाच्या दृष्टीने आपण पुनर्जन्माकडे पाहू. आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities). मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो. आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो.
एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?
वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालदीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे.
संतोष कारखानीस ठाणे

All reactions:
Prakash Patil, Rajendra Hirlekar and 39 others