Saturday, October 7, 2023

घटस्थापना

 आज शक्तीच्या महोत्सवाला सुरुवात होणार.

आपल्या सर्व देवतांच्या हातात शस्त्र आहे. देवतांच्या कहाण्यांमध्ये दुष्ट शक्तीवर प्रहार ही प्रमुख गोष्ट आहे. याचाच अर्थ आपल्या आपल्या संस्कृतीत ध्यानमार्ग-भक्तिमार्गाद्वारे आपल्या अध्यात्मिक प्रगतीला जेवढे महत्व आहे तितकेच आपल्या संस्कृतीवर प्रहार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांविरद्ध आवश्यक असेक तर हिंसेचा वापर करण्याला महत्व आहे. आपली संस्कृती कोठेच अतिरेकी हिंसेला अथवा अहिंसेला प्रोत्साहन देत नाही. मात्र अशावेळी मनात द्वेषबुद्धी नसावी, तर त्या शत्रूला चांगली बुद्धी पुढील जन्मात मिळावी, चांगली गति मिळावी असा भावही असावा. आपले कर्तव्य म्हणूनच ही हिंसा करावी, मनाचे संतुलन न घालविता करावी असे भगवान श्रीकृष्णही सांगतात.
मी सिंगापूरला गेलो असता आमच्या गाईडने एक महत्वाची गोष्ट सांगितली. सिंगापूर या छोट्याश्या देशाकडेही उत्तम लष्करी सामर्थ्य आहे. तेथे १८ वर्षांवरील सर्वांना लष्करी शिक्षण घ्यावे लागते. सिंगापूरचे असे म्हणणे आहे की आपल्याकडील समृद्धी टिकविण्यासाठी, तिचे संरक्षण करण्यासाठी लष्करी सामर्थ्याचीही आवश्यकता आहे. एकाच गाडीची ही दोन चाके आहेत. मला सिंगापूरचे हे विचार आपल्या धर्माच्या/प्राचीन भारतीय संस्कृतीच्या बाबतीतही योग्य वाटतात. आपली हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती आहे. संस्कृतीच्या या समृद्धतेचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला बलशाली व्हावे लागेल, आवश्यक असेल तेव्हा या बळाचा वापरही करावा लागेल. कालीमातेच्या आणि अन्य देवतांच्या कथा याकडेच निर्देश करतात.
आज आपल्या संस्कृतीवर प्रहार होत आहेत. काहीशे वर्षे आपण गीतेतील हा उपदेश, शस्त्रसज्ज देवता देत असलेला संदेश विसरलो होतो. आता जागृत होऊ. जे आपल्या संस्कृतीवर प्रहार करीत नाहीत (उदा. पारशी, ज्यू समुदाय) त्यांना त्यांची संस्कृती जपण्यासाठीही आपण मदतच करू. जे अन्य धर्माचे पण भारतीय वंशाचे आहेत आणि आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल अभिमान बाळगतात ते ही आपलेच आहेत. मात्र विनाकारण जे आपल्या संस्कृतीवर प्रहार करतात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. या वर्षीच्या या शक्तीच्या महोत्सवाचा हाच संकल्प.
आपली सर्वांची आंतरिक शक्ती जागृत होवो आणि त्याद्वारे आपल्याला मानसिक शांतता, प्रसन्नता लाभो ही कालीमातेच्या चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment