Monday, June 4, 2018

प्रास्ताविक

वेद हा प्राचीन भारतीय ज्ञानसंपत्तीचा अमुल्य वारसा आहे. विषयाच्या दृष्टीने पाहिल्यास वेदांची तीन भाग ('कांड') करता येतात.  कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. वेदांच्या ज्ञानकांडाचे दुसरे नाव 'उपनिषद' आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा आणि मूलतत्वाचा विचार हा उपनिषदांत केलेला आहे. उपनिषदांनी नेकाना भुरळ घातली. यात केवळ हिंदू नाहीत तर अन्य धर्माचेही लोक होते. शहजहानचा मोठा मुलगा आणि गादीचा वारस (जो नंतर औरंगजेबाकडून मारला गेला) 'दारा शुकोह' याने फारसीत उपनिषदांचे भाषांतर केले आहे. दारा शुकोहच्या या भाषांतराची नंतर युरोपियन भाषेत भाषांतरे झाली. त्यामुळे युरोपियन लोकांना त्याबद्दल माहिती झाली. नंतर मॅक्समुल्लर, शोपेनहर आदी पाश्चात्य विचारवन्तांनी उपनिषदांची खूप स्तुती केली. एकशे बारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. शंकराचार्यांनी त्यापैकी दहा-बारा उपनिषदांवर भाष्य केली आहेत.
आपण भारतीय दुर्दैवाने या अमुल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. या लेखमालेत आपण काही उपनिषदांचा थोडक्यात अभ्यास करू.
उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात ज्ञानाचे सार सांगण्याचा ऋषींचा प्रयत्न आहे. ती समजण्यास कठीण आहेत. विशेषत: ज्याची अध्यात्मात फार वाटचाल झालेली नाही अशांना ती कठीण वाटतात. म्हणूनच उपनिषदे अथवा ज्ञानकांड हा वेदांचा शेवटचा भाग आहेत. कर्म आणि उपासना यांच्या सहाय्याने माणसाने आपली अध्यात्मिक प्रगती करावी आणि पुरेशी अध्यात्मिक पातळी गाठल्यावर उपनिषदे समजणे सोपे जाईल असा तो विचार असावा. पण माझा अनुभव असा आहे की आपल्यापैकी अनेकांची वाटचाल मागील जन्मांत अधात्माच्या मार्गाने झालेली असते. त्यामुळे त्याना उपनिषदे समजण्यास कठीण वाटत नाहीत.
खरे तर उपनिषदे ही उच्च अध्यात्मिक उंची गाठलेल्या गुरूंकडून प्रत्यक्ष समोर बसून समजून घेणे योग्य आहे. त्यातील अनेक खाचाखोचा तेच समोरासमोर समजावून देऊ शकतात. परंतु सध्याच्या गतिमान जीवनात ते कठीण आहे. त्यामुळे मी ही उपनिषदांचा अभ्यास पुस्तके वाचूनच केला. आणि माझ्या अल्पशा बुद्धीला जे समजले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
उपनिषदातील ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. परंतु हा आनंद अंतर्यामी न शोधता बाह्य गोष्टील शोधण्यास सुरुवात केल्याने माणूस बंधनात पडतो. बंधन हे दु:खात लोटते. माणसाला आपल्या आनंदमय स्वरूपाचा बोध व्हावा ही उपनिषदांची धडपड आहे.
मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या एका जिवलग मित्राकडे त्याच्या नातेवाईकांचे ओशोंनी लिहिलेले 'उपनिषदांच्या गवाक्षातून' हे पुस्तक माझ्या हाताला लागले. त्यातून मला 'उपनिषद' या विषयात रस वाटू लागला. मी ओशोंची पुस्तके वाचू लागलो. यथावकाश माझी त्या मित्राच्या नातेवाईकांशी (ज्यांचे पुस्तक होते) ओळख झाली. ते माझे एकअध्यात्मिक मार्गदर्शक ठरले. हे आहेत ओशोंचे सुरुवातीपासूनचे शिष्य ठाण्याचे 'स्वामी आनंदऋषी'. ओशो आणि आनदऋषी यांचे बोट धरूनच मी ही मालिका लिहितो आहे.


Sunday, May 27, 2018

'घोंगड्या' ✍🏼 रवि वाळेकर, पुणे

"घोंगड्या लै डेंजर हाये बर्का" आमच्याच वाड्यात राहणाऱ्या सातवीतल्या सुनिलदादाने मौलिक माहिती पुरवली होती.

"त्याच्याशी एकदम नीट राहायचे. आमच्या वेळी ४६ जणांना त्याने पहिल्याचं घटक चाचणीत नापास केले होते"

"बाप रें! कितीजणं होते तुमच्या वर्गात?" मी भीतभीत विचारले.

"४७!"

पोटात गोळाचं आला!

त्या सरांचे आडनाव चांगले दोन अक्षरी होते. हे 'घोंगड्या' असे त्यांना का म्हणायचे, ठाऊक नव्हते. शाळेतले सगळेचं 'दादा' त्यांना 'घोंगड्या' म्हणायचे, म्हणून आम्हीही म्हणायला लागलो.

प्राथमिक शाळेची टेकडी पार करून नुकतीच माध्यमिक शाळेच्या डोंगरावर चढायला सुरूवात झाली होती. शाळेचा गणवेश, टैमटेबल, इंग्रजीत 'म्याय कम्मिंग, स्स्सर?' असे विचारणे याचे भलतेचं अप्रूप वाटत होते.

प्राथमिक शाळेतं, हे सारे नव्हते. गणवेश वगैरे फालतू भानगडी नव्हत्या, पुर्ण कपडे घालून जाणे, हेचं खुप होते. एक पवार गुरुजी एकटे सगळा वर्ग हाकायचे. सरकारी कामांमधून वेळ मिळाला, तर अधुनमधून शिकवायचे पण! 'पारथमिक शाळा' असा खरा ऊच्चार असलेल्या प्राथमिक या शाळेत - ४ वर्षात - मी, 'गायी पाण्यावरं काय म्हणूनी आल्या' ही कविता आणि १२ पर्यंतचे पाढे, एवढेचं शिकल्याचे आठवते. चार वर्षे वर्गात इतरं काय शिकलो, ते काहीच आठवतं नाही.

वर्गात नसेल, पण 'डबा खायच्या' आणि 'लघ्वीच्या' सुट्टीत मात्र बरेचं ज्ञानसंपादन व्हायचे.

रिठ्याच्या बिया घासून गरम करून चटका कसा द्यायचा, अंगठा चार बोटांच्या मध्ये घुसवून आणि अंगठ्याला थुंकी लाऊन बुक्की कशी मारायची, कागदी विमानाच्या शेपटात पोट खपाटीला जाईपर्यंत फुंक मारून सगळ्यांपेक्षा वरं कसे ऊडवायचे, भिंगाने कागद कसा जाळायचा, पडलेल्या दाताचा योग्य ऊपयोग कसा करायचा, रक्ताने भळभळणाऱ्या जखमेवर एका दिवसात खपली धरण्यासाठी काय करायचे, अशा अनेक गोष्टी गुरूजींनी न शिकवता आणि गुरूजींना न कळू देता शिकलो.

'मुली' नामक देवाने निव्वळ तिरस्कार करण्यासाठी बनवलेल्या प्राण्यापासून दुर कसे राहायचे, कधीकाळी एखाद्या 'फिंद्री'च्या मागे बसावेचं लागले, तरं त्या मुलीला कळूही न देता तिच्या वेण्यांच्या 'रिबणी' एकत्र करकचून कशा बांधायच्या, अशा बऱ्याच मौलिक गोष्टी शिकता शिकता शाळेतली पहिली ४ वर्षे कशी निघून गेली, ते कळलेही नव्हते.

पवार गुरूजींचे एक बरे होते. 'हजेरी' घेतली की एखादा धडा वाचायला वा कविता पाठ करायला सांगायचे आणि आपल्या लिखाणाच्या कामाला लागायचें. ते त्यांच्या कामात आणि आम्ही आमच्या कामात! एकमेकांना काडीचाही त्रास देत नव्हतो. वर्षातून एकदा 'इनसपेक्टर सायेब' नावाचा फाजील इसमं येई, तो यायच्या आधीचा आठवडा फक्त थोड्या हाल-अपेष्टा काढाव्या लागायच्या!

पवार गुरूजी अधुनमधून छड्या वगैरे मारायचे, पण त्याचे काही विशेष नव्हते. त्यांची खरी मोठी शिक्षा असायची, ती दोन मुलींमध्ये बसायची शिक्षा! सगळी मुले तिरप्या डोळ्यांनी बघतं तोंडावर हात ठेऊन हसायचे आणि शिक्षा मिळालेल्या मुलाला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे! लहान होतो, समजं नव्हती.

त्या वयात ती शिक्षा वाटायची!

(पुढे कॉलेजात आल्यावर, पवारगुरूजींनी दोन बुके जास्त शिकून आपल्या वर्गावरं 'प्रोफेसर' म्हणून कमीतकमी या शिक्षेसाठी यायला हवे, असे राहून राहून वाटायचे!)

माध्यमिक शाळेला 'हाय्स्कूल' म्हणायचे, हे नव्या शाळेच्या पहिल्याचं दिवशी समजले. शाळेत कधी झिपऱ्यांची शुद्ध नसलेल्या गुरूजींच्या साऱ्या शिष्या इथे दोन वेण्या घालून, एकसारख्या लाल रंगाच्या रिबिणी लाऊन एकदमं झोकात! स्नो-पावडर लाऊन, कपाळावर टिकली लाऊन, डोक्याला खोबरेल तेल चोपडून आलेल्या, निळ्या गणवेशातल्या कित्येकींना तरं पहिल्या दिवशी आम्ही ओळखलेही नाही. मुलांची अवस्थाही वेगळी नव्हती. दोन्ही खिशातल्या गोट्या, चिंचा, विट्ट्या यांच्या वजनाने चड्डीची बटणे तुटली तरी, पर्वा न करणारी पोरं इथे स्वच्छ पांढरा शर्ट निळ्या चड्डीत खोचून, 'जंगणमन'ला चप्पल घालून रांगेत हजर!

संपुर्ण नाक स्वच्छ असलेल्या विजा ढगेला (मुळ ऊच्चार - इजा ढग्या) पवार गुरुजींनी सोडा, खुद्द इजाच्या टेलर बापानेसुद्धा ओळखले नसते!

"ही काही धर्मशाळा नाही. कधीही यायचे आणि कधीही जायचे चालणार नाही. वर्गात येताना 'म्याय कमिन सर' असे विचारायचे"

पहिल्याचं तासाला पहिलेच 'सर' कडाडले! गुरुजींचे इथे 'सर' झाले होते. 'काटकसर' हा शब्द त्याकाळी सगळीकडे ऐकू यायचा, त्यामुळे या 'हायस्कूला'त 'काटक' नावाचे एखादे सरं असावे, असे ऊगाचचं वाटले. नव्हते. काटक-सर कोणी नव्हते, पण हे पहिल्याचं तासाला आलेले सर मात्र भलतेचं राकट-सर होते.

इंग्रजीत बोलायला लागलो, या आनंदात पहिला दिवस मस्त गेला.

दुसऱ्या दिवशी 'जंगणमन' आणि 'पारथना' संपवून बेंचवर बसलोचं होतो, की सरं आले. मी नुकताच पाच काडिपेट्यांवरच्या चित्रांच्या बदल्यात दोन रिकाम्या सिगारेट पाकिटांचा 'व्यवहार' आटोपला होता. ही सिगारेटची पाकिटे वेगळी होती. आमच्या गावात ती सिगारेट कोणी पीत नव्हते, त्यामुळे दुर्मिळ खजिनाच मला मिळाला होता. व्यवस्थित 'डिल' झाल्याची खुशी दोन कानांमध्ये आरपार पसरली होती.

"हसतोय काय रे फिदीफिदी?"

सर मलाचं ऊद्देशून बोलतं होते. ते वर्गात आले तेव्हा मी ओणवा होऊन मागच्या बाकावरच्या एकाशी, '१२ चिंचोक्यांच्या बदल्यात ३ सागरगोटे' अशा महत्वाच्या वाटाघाटी करतं होतो. सर वर्गात आले तरी मी फारसे लक्ष दिले नाही. त्यांना सागरगोट्यांत काय इंटरेस्ट असणार?

"नाव काय रे तुझे?" मी खरेतरं कालचं नाव सांगितले होते, पण ऊगाच द्विपक्षीय संबंध बिघडू नये म्हणून परतं सांगितले. त्यांनी काल सांगितलेले त्यांचे नाव मी लक्षात ठेवले होते, आणि यांना माझे नाव आठवू नये? असतात, काही जण विसरभोळे!

त्यांचे खरे नाव आणि 'घोंगड्या' हे टोपणनाव, मला दोन्ही आठवत होते. 'घोंगड्यासर' म्हंटलो, असतो तरं मजाचं आली असती!

"घरी कोणी आले, तरं असेच दाताड दाखवतो का?"

मी 'नाही' म्हणालो खरां, कारण तेच ऊत्तर समोरून अपेक्षित होते, पण मी खरचं घरी कोणी आले तरं काय करतो, हेचं आठवतं नव्हते!

हे एवढे महत्वाचे असेल, असा कधी वाटले नव्हते.

"मग? मग काय करतो?"

मी खरेचं यावर कधीच विचार केला नव्हता.

"काहीच नाही!"

"काहीच नाही? तू मुर्ख आहेस"

हे घरी सकाळ-संध्याकाळ ऐकलेले असायचे, त्यामुळे अमान्य असायचे काही कारणचं नव्हते.

"आता तुम्ही सगळे मोठे झालात. हायस्कूलमध्ये आलाय. वर्गात सर आले की, 'गुड मॉर्निंग, सरं' असे म्हणायचे. काय?"

मग, त्या दिवशीची गुड मॉर्निंग पार गुड इव्हिनींग होईपर्यंत आम्ही सगळेजण सामुदायिक रित्या 'गुड मारनिंग, स्स्सर' घोकत होतो!

सर इंग्रजी शिकवायचें.

पुढचा आख्खा महिना या सरांनी आम्हाला सळो की पळो केले. घामाघूम केले.

या सरांचा वेग भन्नाट होता. आम्हीही त्यांच्या वेगाने पळावे ही अपेक्षा! आम्ही बैलगाडीत, तरं हे मोटारसायकलवरं!.

'चला, पळा माझ्या बरोबरीने!' मग त्यांच्या मोटारसायकलीची बरोबरी करता करता आम्हाला ते फरपटतं न्यायचे. आमची दाणाफाण व्हायची. घटोत्कच पडल्यावर कौरवसेनेची धावाधाव व्हायची, तशी आमची अवस्था व्हायची! बैल कुठे, गाडी कुठे, कासरा कुठे, चाबूक कुठे आणि आम्ही कुठे! अरारा! एकदमं दैन्यावस्था व्हायची! आम्हा मस्तवाल बैलांची पार केविलवाणी गोगलगाय व्हायची!

कुठून अवदसा आठवली आणि चौथी पास झालो, असे झाले! काही जण तरं संध्याकाळी पवारगुरूजींच्या घरी जाऊन, परतं चवथीचे काही जमते का, याची चाचपणी पण करून आले!

"ए, बी, सी, डी,... किती शिंपल आहे रे गधड्यांनो. तुमच्या क, ख, ग, घ पेक्षा किती सोपे. काय?"

सगळे 'गधडे' निमूटपणे माना डोलवायचे!

सिम्पल या साध्या शब्दाला हे 'शिंपल' का म्हणतात? पण, विचारायची सोय नव्हती!

"नंदिबैलासारखे मान काय डोलावताय?"

'गधडे' की 'नंदिबैल' यातले आपण नक्की कोण, याचा विचार करत असतानाचं फर्मान यायचे,

"परवा सोमवारी चार रेघी वहीत पाच वेळा सगळे अल्फाबेट्स लिहून आणा"

एक सुकलेला, धारातीर्थी पडलेला रविवार डोळ्यासमोर यायचा. खरेतरं रविवारी शेजारच्याच गल्लीतल्या पोरांबरोबर 'टेस्टमॅच' ठरवलेली असते. आता कॅन्सल केली, तर ती पोरं गावभरं 'शेपुट घातली रे' असा गवगवा करणार!

बरं, चार रेघी वही आणणे म्हणजे काही कमी दिव्य नसायचे! अगोदरं आईला पटवावे लागायचे. मग तिच्या, 'कोऱ्या पानांची वही आहे ना? त्यावर चार रेघा मारून घे', 'ताईच्या मागच्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही पाने सापडतात का बघं', अशा अलौकिक सुचनांवर बाजीप्रभू देशपांडेंच्या थाटात खिंड लढवावी लागायची. जिंकलो, तर जेवताना वहीची केस हायकोर्टात पोहोचायची!

"शाळा सुरू होतानाचं घ्यायला काय होते रे? दररोज हे घ्यायचे आणि ते घ्यायचे. शाळेला सांग, वडिलांचा सगळा पगार शाळेतच जमा करून घ्या दर महिन्याला. घेत रहा काय घ्यायचे ते"

हे सगळे मुकाट्याने ऐकून घेऊन पैसे मुठीत घेऊन दुकानाकडे पळायचें! त्याच्याकडे तसली चार रेघी वही संपलेली नसेलं, तर हायसे होऊन जाताना केलेला नवस फेडायला, येताना मारुतीला जाऊन यायचे!

अल्फाबेट कसेबसे पाठ झाले, तर 'ए, ई, आय, ओ, यू' या पाच स्वरांनी 'आय' आठवायची! मग टेंशन द्यायला 'टेन्स' आले! त्यात प्रत्येक काळाचे तिन तिन प्रकार! खरेतरं, एकदा 'पास्ट' झाला म्हणजे पास्ट झाला, त्याचे तिन्ही प्रकार 'प्रेझेंट'मध्ये कशासाठी? 'फ्युचर'चे तिन प्रकार जेव्हा फ्युचर येईल तेव्हा बघू. प्रेझेंट मध्ये हा चोंबडा कशासाठी लुडबूड करतो?

हे सगळे बोलायची चोरी होती, कारण, "शिम्पल आहे रे, गधड्यांनो" असे ५४ गधड्यांचे सर तासाला दहादा म्हणायचे!

"एकदा तुम्हाला ए, ई, आय, ओ, यू समजले ना, की कोणाच्या बापाची तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची हिंमत नाही!"

हे जे कोणी, 'कोण आणि त्याचा बाप' होते, त्यांना आमच्या इंग्रजी शिकण्यात एवढा का रस होता, ते समजायचे नाही, पण ते बाप-लेक पुढच्या आठवड्यात परतं वर्गात हजर असायचे!

" हे एवढे, सी कधी वापरायचे, के कधी आणि एस कधी वापरायचे, एवढे आले ना, की कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची!"

हे बाप-लेक परतं आमच्या मानगुटीवर!

पहिल्या काही महिन्यातचं आता झाले तेवढे शिक्षण पुरे करावे आणि कामधंद्याला लागावे, असे आमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटू लागले. चौथी पास, हे काही कमी शिक्षण नाही. कित्येक जणं एवढेही शिकत नाहीत.

गोट्या, विटीदांडू, पतंग, लपाछपी, लिंगोरच्या आणि मुख्य म्हणजे क्रिकेट यांचा बळी देऊन पाचवीला आम्ही थोडेफार इंग्रजी शिकलो आणि सहाव्वीला आलो.

घोंगड्याला दिव्य सिद्धी प्राप्त आहे, यावरं आम्हा विद्यार्थ्यांमध्ये 'मे महिन्याच्या सुट्टी'त एकमतं झाले. ज्या पोराने अभ्यास केलेला नसतो, त्यालाचं नेमका प्रश्न कसा विचारतो? आपण रविवारी 'म्याच' ठरवली, की याला कसे कळते? नेमका त्याचं शनिवारी जास्तीचा 'एच.डब्ल्यू.' कसा देतो?

सहाव्वीला याने कहरचं केला. वर्गात म्हणे इंग्रजीत बोलायचे! दुसरी भाषा चालणारं नाही! वर्गात टॉयलेटला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली! ऊगाच इंग्रजीचा खुन नको आणि डोक्याला ताप नको, म्हणून बरेचं जण बेंबीला थुंकी लाऊन स्थितप्रज्ञासारखे बसायचे. बरेचं जण जबड्यात कापसाचा मोठा बोळा घालुन बसू लागले. सरांनी विचारले तर 'टिथ इज पेन' असे लिहून देऊन 'पेन' नसलेल्या बाजूला मुस्कडात खाऊ लागले. इंग्रजी बोलण्यापेक्षा एक मुस्कडात खाल्लेली कधीही बरी!

तरीही सर हिरिरीने शिकवतचं राहिले. सगळ्या वर्गाला 'शँपेन'चे स्पेलींग बरोबर आले, तेव्हा तरं ते नाचायचेच बाकी होते! त्या आनंदात त्यांनी दुसऱ्या दिवशी 'झेकोस्लोव्हाकीया'चे स्पेलींग पाठ करून यायला सांगितले!

त्या दिवशी रात्री विठ्ठलमंदिरात, विठ्ठलाच्या साक्षीने, 'घोंगड्या'वर कोणीतरी 'चेटूक' केलेचं पाहिजे, यावरं आम्हा ४-५ मित्रांमध्ये एकमतं झाले. पण हे 'चेटूक' नेमके कोण करतो, हे आमच्यापैकी कोणालाही माहिती नसल्याने 'घोंगड्या' वाचला!

सहावीच्या दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून भाषण स्पर्धा होती. दोन गट. ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी.

सहामाहीच्या शेवटच्या परिक्षेनंतर सरांनी मला 'टिचर्स रुम'मध्ये बोलावले. एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितले, "चिठ्ठी वडलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे, तु भाग घे. जायचे भाडे आपल्याला भरायचे आहे, तुझ्या वडिलांना काही जास्त नाही'"

"सर! ते भाड्याचे ठिक आहे, पण..."

"तु काळजी करू नकोस. मी भाषण लिहून देतो. तु सुट्टीत सराव करं. एकदम शिंपल आहे रे......."

त्यांनी 'गधड्या' हा शब्द निग्रहाने घशातून परतं पाठवला होता, हे जाणवले.

घरच्यांनी ना म्हणायचा प्रश्नचं नव्हता. यथावकाश नागपूरला गेलो. मुखोद्गत केलेले 'सरांचे भाषण' पोपटासारखा तिथे बोललो. निर्णय नंतर देणार होते. मला पर्वा नव्हती. भुगोलात वाचलेले 'नागपूर' मी प्रत्यक्ष पाहिले होते. नागपूर पहाणारा शाळेतला मी पहिलाचं!

दुसरी सहामाही सुरु झाली. नागपुरहून काहीच ऊत्तर आले नव्हते. फक्त जिंकलेल्यांना कळवतं असावेत. नंतर मी ती स्पर्धा विसरूनही गेलो.

पंधरा-विस दिवस गेले असावेत. रात्री साडेदहाला तारवाला घरी आला. सगळे काळजीत. त्याकाळी तार येणे अशुभ सुचक! त्यात एवढ्या रात्री!

वडिलांनी तार घेतली.

वाचली.

माझ्याकडे डोळे रोखतं म्हंटले,

"नागपुरात जिंकलास रे तू! तुझ्या गटात तू राज्यात पहिला आला आहेस!"

आई तर आनंदाने रडायलाचं लागली! मला काहीच ऊमजेना.

वडिल ऊठले. मला म्हणाले, "चल, शाळेचा गणवेश घाल"

मग आईकडे वळून म्हणाले, "कागदात साखर बांधून दे!"

आम्हाला दोघांनाही काहीच कळले नाही! रात्रीचे अकरा वाजलेले.

"चलं, तुझ्या सरांच्या घरी जाऊ. ही बातमी पहिल्यांदा ऐकायचा मान त्यांचा आहे!"

सगळे गाव साडेआठ-नऊला झोपते. आमच्या मोटारसायकलच्या आवाजाने सरांची आख्खी गल्ली ऊठली. मोटारसायकल असणे, ही फार मोठी गोष्ट होती त्याकाळी. गावात फक्त २ मोटारसायकल. त्यातली एक आमची!

डोळे चोळतचं सरही बाहेर आले. फाटक्या बनियन आणि विटक्या पायजम्यात ते ओळखू येत नव्हते!

वडील बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. वडिलांकडे बघताचं ते म्हणाले,

"काय झाले साहेब?"

वडिलांनी साखरेची पुडी त्यांच्या हातात दिली.

"नाही समजले, साहेब!"

वडिलांनी तार त्यांच्या हातात दिली.

तार वाचताच सर ओक्साबोक्शी रडू लागले. भर ओसरल्यावर मला जवळ घेत, डोक्यावर हात फिरवत म्हणाले,

"तुला सांगितले नव्हते?, 'शिम्पल' आहे रे...."

आणि परत रडायला लागले.

वडिलांनी मला खुण केली. मी त्यांच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला.

त्यांनी "नको रे नको रे" म्हणतं मला ऊचलतं, मला छातीशी कवटाळले.

"सर, आता कोणाचा बाप म्हणू शकत नाही, मला इंग्रजी येत नाही...."

"खरं आहे रे पोरा...."

एवढा कर्दनकाळ 'घोंगड्या' एखाद्या मुलीसारखा मुसमुसत होता! मनातल्या मनात का होईना, पण त्यांना ते 'घोंगड्या' म्हणणे, मला खुप खजिल करून गेले!

ते पाठीवर हात फिरवतं असताना जाणवले, आई-वडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरचं शिक्षकाचा असतो!

शिम्पल आहे! नाही का?

Tuesday, May 22, 2018

उपसंहार

मित्रहो, गेले काही दिवस मी भारतीय प्राचीन दर्शनशास्त्रावर लिहित होतो. खरे तर मी यातील अधिकारी व्यक्ती नाही. पण तरीही यावर लिहिण्याचे औधात्य केले. आपण माझे हे औधत्य सहन केलेत. हे औधत्य करण्याला एकाच कारण होते की सध्याची सामाजिक स्थिती पाहून भारताची संस्कृती कशी सर्वसमावेशक आहे याची जाणीव करून द्यावी असे प्रकर्षाने वाटले. आपल्या विरुद्ध मताचे कोणी आहे असे दिसले की फेसबुकवर जी अर्वाच्य भाषा काहीजणांकडून वापरली जाते त्याने मनाला यातना होतात. आपल्या दर्शनांनी किती वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यांनी वाद-विवाद केले. पण ते समोरच्या मताचा आदर ठेऊनच. या वादविवादातून आवश्यक त्या सुधारणा करीत आपले दर्शन अधिक निर्दोष बनविले.

आपण आठ दर्शने पहिली. त्यातील तीन (जैन, बौद्ध आणि चार्वाक) नास्तिक दर्शने होती. नास्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य पूर्णपणे नाकारणारी. दोन दर्शने (पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा) वेदप्रामाण्याला महत्व देणारी होती.  तर अन्य तीन दर्शने (वैशेषिक, न्याय, सांख्य) वेदप्रामाण्य नाकारीत नाहीत. पण स्वीकारासंबंधी स्पष्टपणे सांगतही नाहीत. चार्वाक वगळता अन्य दर्शने मोक्ष/कैवल्य/ निर्वाण इत्यादी मनुष्याचे अंतिम लक्ष्य मानतात.

जैन आणि बौद्ध दर्शने वगळता अन्य सहा दर्शने (चार्वाक, वैशेषिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा) हिंदू दर्शने (षटदर्शने) म्हणून परंपरेने मानली जातात. (अंबेच्या आरतीत 'साही विवाद करीता' असा या षटदर्शनांचा उल्लेख आहे) त्यांच्याकडे नजर टाकली असता हिंदू धर्माचा पाया किती विस्तृत आहे याची कल्पना येते. चार्वाकासारखे परलोक नाकारणारे , सांख्यांसारखे ईश्वर नाकारणारे, न्याय-वैशेषिक दर्शनासारखे अनेक ईश्वर आणि त्यांचा प्रत्येकाचा आत्मा मानणारे, वेदांतासारखे एकच ब्रह्म मानणारे दर्शन अशी ही विस्तृत परंपरा आहे. सांख्य दर्शन 'पुरुषाला' आपण अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून वेगळे असण्याची जाणीव होणे (विवेक) म्हणजे मोक्ष असे समजते, तर वेदांत याच्या उलट, म्हणजे आत्म्याला आपण सर्व एकच ब्रह्मस्वरूप आहोत असे समजणे' म्हणजे मोक्ष असे समजते.

सध्या काही हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाचा अर्थ संकुचित करू लागल्या आहेत. त्यांना अपेक्षित असलेली जीवनपद्धती, खाणेपिणे म्हणजेच हिदुत्व अशी त्यांची भावना आहे.  अनेक दर्शनांच्या विस्तृत पायावरच आज हिंदुधर्म टिकून आहे. या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांना कळकळीची विनंती की त्यांनी हिंदू धर्माचा हा विस्तृत पाया खिळखिळा करू नये.

दु:ख निवारण हे बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुद्धाने त्यासाठी यादेशात अनेक वेळा उगम पावून लुप्त झालेली ध्यानाची विद्या परत परिश्रमाने शोधून काढली.  'अविद्या' हे सर्व दु:खांचे मूळ कारण आहे असे सांगितले. अविद्या म्हणजे 'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व). सध्या फेसबुकवर अनेक पोस्ट वाचताना बौद्धधर्म समर्थकांची भाषा पाहून गौतम बुद्धाच्या या शिकवणुकीचा त्यांना विसर पडला आहे अथवा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी समाजाचे धुरीण कमी पडताहेत असे वाटते. अशा पोस्टमधून 'अविद्येचीच' जोपासना होते आहे अशी भीती वाटते. हीच गोष्ट स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या माझ्या काही बांधवांसाठी खरी आहे. 'अहंकार' आणि 'ममत्व' यांच्यामुळेच आपण मायेच्या आवरणाखाली येतो, बंधनात अडकतो असे अनेक उपनिषदांनी वारंवार सांगितले आहे. मग अहंकाराच्या आहारी जावून द्वेष जागवित ते धर्माचे कोठले काम करीत असतात?

आपण भारतीय आहोत. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. एवढे लक्षात आले तरी या लेखमालेचा फायदा झाला असे मी म्हणेन.

लवकरच दुसऱ्या विषयावर  एखादी लेखमाला घेऊन आपल्या समोर येईन.

  

Sunday, May 20, 2018

उत्तरमीमांसा (वेदांत दर्शन) : अद्वैतवाद

सांख्यदर्शनाखालोखाल भारतीय समाजावर अद्वैत दर्शनाचा प्रभाव आहे.

एका जुन्या सुभाषितकाराने अद्वैतवाद एका श्लोकात मांडला आहे
ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव, नापर: |

आपण आद्यशंकराचार्यांनी मांडलेला अद्वैतवाद थोडक्यात पाहू.
१>पहिला सिद्धांत म्हणजे ब्रह्म हेच सत्य होय. ब्रह्म म्हणजे जाणीव, आपणास एकसारखे होत राहणारे भान. ती स्वयंसिद्ध आहे. इतर पदार्थ आहेत अथवा नाहीत हे जाणीवेच्या सहाय्याने कळते. परंतु जाणीव आहे अथवा नाही हे आपणास कळण्यासाठी अन्य कशाचीही आवश्यकता नसते. अद्वैत्वाद्यान्च्या मते ब्रह्म हे सत्, चित् आणि आनंद स्वरूपी आहे.
२>दुसऱ्या सिद्धांतानुसार जग हे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ असा नाही की त्याला घनता, आकार नाही. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी मिथ्या आहे असा त्याचा अर्थ आहे. दिशा, काल आणि कार्य-कारण संबंध या संदर्भातच या जगाला अर्थ आहे असाही त्याचा अर्थ आहे. काल हे परिमाण सापेक्ष आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. दिशा/अंतर हे परिमाणेही सापेक्ष आहेत हे अत्याधुनिक पदार्थ विज्ञान सांगते. इतकेच नव्हे तर या विश्वासारखीच अनेक विश्वे एकाचवेळी अस्तित्वात असू शकतील असेही नवे विज्ञान सांगते. या सापेक्षतावाद सिद्धांताचा विचार केला तर 'जग हे मिथ्या आहे' या विधानाचा अर्थ थोडा थोडा उलगडू लागतो.
३>'जीवो ब्रह्मैव' हा तिसरा सिद्धांत आहे. 'जग हे मिथ्या' म्हटल्यावर काहीच उरणार नाही असा आपला समाज होतो. पण वेदांत दर्शन हे 'ब्रह्म सत्यं' अधिक उच्चरवाने सांगते. जीव म्हणजे ज्याला आपण 'मी' म्हणतो त्यातून 'अहंकार' काढल्यावर जे उरते ते. जीवाला आत्मा असेही म्हणतात. हा आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. उपाधीमुळे आत्म्यास जीवत्व येते असे अद्वैतदर्शन सांगते. स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फुल ठेवल्यास स्फटिकाला त्या फुलाचा लाल रंग आला आहे असे भासते. तसेच आत्म्याला उपाधी लावल्याने त्याच्यात जीवत्व भासते.
सर्वाचा आत्मा एकाच ब्रह्मस्वरूपी असूनही वेगवेगळे का भासतात याचे कारण देताना अद्वैतदर्शनकार घटाकाश आणि महाकाश यांचे उदाहरण देतात. घटामुळे घटात कोंडलेले आकाश आणि बाहेरील आकाश वेगळे भासते. अशाप्रकारे प्रत्येक घटातील आकाश स्वतंत्र भासते. पण तो घट फुटल्यास घटातील घटाकाश आणि बाहेरील महाकाश एकच आहेत याचे ज्ञान होते.
अद्वैत दर्शनाच्या (आणि उपनिषदांच्या) मते मोक्ष ही प्राप्त करून घेण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष हा सिद्धच असतो. परंतु आत्म्याला त्याचे भान नसते. म्हणूनच संसार आणि बंध येतात. मायेमुळे आत्म्याला ते भान रहात नाही. म्हणून मायेचे आवरण दूर केल्यावर आत्म्याला तो मुक्त असल्याचे भान येते.
या संदर्भात एक मनोरंजक गोष्ट आहे. उंटांचा एक काफिला प्रवासास निघालेला असतो. रात्री एका ठिकाणी मुक्काम पडतो. काफिल्याच्या प्रमुखाच्या लक्षात येते की बांधण्यासाठी आणलेले दोरखंड अपुरे आहेत. एका उंटाला बांधण्यासाठी दोरखंड कमी पडत आहे. तो विचारात पडतो. पण त्याच्या काफिल्यातील एक शहाणा माणूस प्रश्न सोडवितो. तो त्या उंटाला दोरखंडाने बांधण्याचा अभिनय करतो. आश्चर्य म्हणजे तो उंट आपल्याला बांधले आहे असे समजून रात्रभर तेथेच बसून असतो. सकाळी काफिला पुढे जाण्यास निघतो. पण तो उंट काही जागेवरून हलत नाही. त्याला मारूनमुटकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण तरी तो काही हलत नाही. तेवढ्यात  या शहाण्या माणसाच्या लक्षात एक गोष्ट येते. तो त्या उंटाला बांधलेली दोरी सोडविण्याचा अभिनय करतो. उंट लगेच चालू लागतो. उंटाची जशी आपल्याला बांधले असल्याची समजूत झाली होती तशीच आपल्या आत्म्याची आपण बद्ध असल्याची समजूत झालेली असते. त्या शहाण्या माणसासारखे कोणीतरी आपल्याला सोडविण्याचा अभिनय करावा लागतो. उपनिषदे याचाच प्रयत्न करीत असतात.
वेदांत दर्शनातील नंतर आलेल्या आचार्यांनी शंकराचार्यांनी प्रतिपादिलेल्या अद्वैतमतात काही बदल सुचविले. परंतु आजही वेदांत दर्शनात शंकराचार्यांचे मत प्रमाण मानले जाते.

आपण आठ महत्वाच्या प्राचीन भारतीय दर्शनांची थोडक्यात माहिती गेले काही दिवस घेतली. पुढील लेखात या सर्व दर्शनांचा एकत्रित गोषवारा घेऊ. तसेच या दर्शनशास्त्राचा सध्याच्या आपल्या जीवनाशी काही संबंध आहे काय हे ही पाहू.


पॉझिटिव्ह_थॉट्स

हर्षद शामकांत बर्वे यांच्या फेसबुक पोस्टवरून


मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता, डॉक्टर म्हणाले या मुलाला घरी घेऊन जा, स्पेन्ड टाइम विथ हिम, आम्ही आता काहीही करू शकत नाही. ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो, पण असा निर्णय जो आपले, आपल्यांचे, या जगाचे फ्युचर बदलू शकते असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत, डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यू होईल असे सांगितले. माझ्या आईने त्या ९६% कडे न बघता उरलेल्या ४% कडे बघितले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली. त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे असे सांगितले, अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते, एकही क्षण न घालवता आईने तात्काळ होकार दिला. पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली, काही दिवसात अजून चार गेली, मी एकटा उरला होतो. रोज डॉक्टर येत असत, आपली झिप बॅग उघडून औषध काढून देत. इंग्लिश डिक्शनरीत Love पेक्षा Hope हा शब्द जास्त पावरफुल आहे असे मला नेहमी वाटते. लोकांना वाटते मी वाचलो कारण मी लकी होतो, पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले. ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाही, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती. मग तो दिवस उजाडला, डॉक्टरांनी मला मी बरा झालोय अशी बातमी दिली. पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही, याने आपले टीनएज बघितले तरी तो एक चमत्कार असेल. पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच. मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकत असते, हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले. मग एक दिवस मी आईला म्हणालो, आई माझे एक स्वप्न आहे ,मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही, तुम्ही काय करू शकणार नाही हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले, मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झालेला, माझ्या आयुष्यात मला आलेला पहिला हार्ट अटॅक, मी फक्त १२ वर्षांचा होतो, लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो. वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो, एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते, क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटत. ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८ व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत अनफेअर वागते आहे असे मला वाटायला लागले, मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा, मला उचलून घे, पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. माझा तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता, मला मृत्यू येत नव्हता. पण परत एकादा मला माझा परमेश्वर इथेच भेटला, आईच्या रुपात. तिने मला या डिप्रेशनमधून बाहेर काढले.

मग मी बँकेची नोकरी जॉईन केली. एक दिवस एक उंचापुरा माणूस जो आमच्या बँकेचा सीइओ होता त्याचे मला बोलावणे आले, आपण बोलायला हवे. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील. मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले, दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार, चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, तुझ्या खुर्चीत. मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही, माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली, मला त्रास द्यायला लागला. ओण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रास माझ्या महत्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो. वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो. वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० बँक ब्रांचेस सांभाळत होतो. माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सच घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती. पण हे यश मटेरियलास्टिक होते, आपण या जगात राहतो. जगाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का? हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे. मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला. जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अश्या माझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती, मी सात वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अश्या आविर्भावात मी आईला विचारले होते, आई डॉक्टर काय म्हणाले, त्यावर आई म्हणाली होतो, काही नाही, सर्व ठीक होईल. मला पहिला हार्टअटॅक आला तेंव्हा ही आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल. "सर्व काही ठीक होइल" हे वाक्य माझ्यावर ऋण होते, पण दैव बघा, यावर्षी मला तिच हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली. माझ्या घश्यात चार ट्युमर डिटेकट् झाले, आईने विचारले, डॉक्टर काय म्हणाले, मी म्हणालो, सर्व ठीक होईल. यापूर्वी मी माझ्या बायकोला इतके रडताना मी कधीही बघितले नव्हते. डॉक्टर मला म्हणाले, आता कामाचा, आयुष्याचा थोडी स्पीड कमी कर कारण आता उद्याची गॅरंटी नाही. पण मित्रांनो, आयुष्याची हीच तर खरी गंमत आहे, या जगात कोणाच्याही आयुष्याची क्षणभराची देखील गॅरंटी नाही.

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगले याला महत्व नाही, इथे असतांना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे. तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्वाचे आहे. आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे, आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे. आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

http://michaelcrossland.com

#हर्षदशामकांतबर्वे

© हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद पुणे प्रवास