Sunday, September 6, 2015

आर्यांच्या मूर्तीपूजेचा उद्गाता कृष्ण

माझे महाभारतील अत्यंत आवडते व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण. तो खरा 'विकासपुरुष' होता. जरासंधाचे मगध राज्य
मथुरेच्या शेजारी होते. जरासंध लोभी आणि आक्रमक होता. त्याचे राज्य मथुरेपेक्षाअनेक पटींनी सामर्थ्यवान होते. त्यामुळे कृष्णाने वेळीच धोका ओळखून द्वारकेला यादवांचे स्थलांतर केले. आता मध्ये सामर्थ्यशाली आणि कृष्णाचे मित्र असे कुरु राज्य असल्याने जरासंधाचा धोका नव्हता. द्वारका हे एक उत्तम बंदर होते. मथुरेत गोपालक असणारे यादव आता व्यापारी बनले. परदेशांशी व्यापार करून द्वारका अल्पावधीतच सोन्याची झाली.........परंतु अल्पावधीत आलेली श्रीमंती नेहमीच धोकादायक असते. यादव या अल्पावधीत आलेल्या श्रीमंतीने दारू आणि अन्य व्यसनांत बुडाले आणि त्यांनी कृष्णाच्या समोरच आपला नाश ओढवून घेतला.
कृष्ण उत्तम राजानितीज्ञ होता. पश्चिमेपासून दूर पुर्वेपर्यंत त्याने स्वत: आणि पांडवांची लग्नसंबंध जुळवून सर्व राज्यांशी उत्तम संबंध जोडले. युद्धात प्रसंगी नीतिमत्तेशी तडजोड करून (उदा. धर्मराजाला द्वयार्थी बोलण्यास उद्युक्त करणे) पांडवांना युद्ध जिंकून दिले.
 मानसशास्त्र युद्धात किती महत्वाचे असते याची त्याला जाणीव होती. द्रोणाचार्यांना मानसिकदृष्ट्या खचविणे तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्जुनाला युद्धात उभे करणे यातून हे स्पष्ट होते. कर्णाला युद्धाच्या पूर्वी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची केले.
अत्यंत प्रबळ अशा यवन (राजा : कालयवन) आणि मगध (राजा : जरासंध) राज्यांनी एकाच वेळी मथुरेवर हल्ला केला. (यवन : उत्तरेकडून, मगध : दक्षिणेकडून) त्यावेळी त्याने वापरलेले युद्धतंत्र अप्रतिम होते.
सर्व यादवांना मथुरेहून सुरक्षित अशा द्वारकेला हलविणे आणि आपल्या सेनेसह युद्धाला सज्ज होणे.
जवळच्या डोंगरात मुचुकुंद राजा झोपला असल्याची आणि 'त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल' असा वर इंद्राकडून मिळाल्याची आवई उठविणे, 
कालयवनला एकट्याने युद्ध करण्यास येण्याचे आव्हान देणे.
स्वत: घाबरून पळाल्याची बतावणी करत कालयवनाला आपल्या मागे त्या डोंगरात नेणे, 
आधीच पेरलेल्या स्फोटकांच्या (भू-सुरुंग?) सहाय्याने कालयवनाला उडवून देणे,
 मुचुकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भस्मसात झाला झाले असे सांगणे
इंद्राच्या शापाने आपला राजा भस्मसात झाला हे कळल्यावर कोणती सेना युद्ध करण्यास तयार होईल?
          अति बलाढ्य शत्रूविरुद्ध लढताना यापेक्षा उत्तम रणनीती कोणती असू शकेल?

*कृष्ण महान तत्वज्ञानी होता. गीतेत सांगितलेले तत्वज्ञान कृष्ण मुक्तावास्थेला पोचलेला पुरुष होता याचीच साक्ष देते.

* कौरवांकडून पांडवांना मिळालेल्या खांडववनात बलिष्ठ नाग जमात राहत होती. तेथे राज्याची राजधानी वसावयाची तर नागांशी संघर्ष अटळ होता. म्हणून कृष्णाने नाग वंशाचाच संहार करायचे ठरविले. मात्र तो त्यात अपयशी ठरला. नाग-पांडव संघर्ष नंतर चार पिढ्या (अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि जनमेजय) चालला. खांडववनातील नागांचा संहार करताना कृष्णाने नागांचा सर्वोत्तम अभियंता मयासुराला अभय देऊन पांडवांसाठी राजवाडा बांधून घेण्याची समयसूचकता दाखविली.

* कृष्ण हा 'पूर्णावतार' होता. त्याने जे काही केले ते पूर्ण झोकून देऊन केले. त्यासाठी त्याने जनमताची लाज बाळगली नाही की देवांची भीती बाळगली नाही. आर्य निसर्गदेवता मानणारे होते. कृष्णाने प्रथमच 'गोवर्धन पर्वत' म्हणजे ऐहिक (Physical Objects) देवता मानण्यास सुरुवात केली. या दृष्टीने तो 'आर्यांमधील मूर्तीपूजेचा उद्गाता होता' असे म्हणता येईल.

Thursday, August 20, 2015

आकांत

कवी : संजय सोनवणी

माझ्या आक्रंदणा-या मित्रा,
जवळ ये
शांत बैस
तुझा आकांत
ज्यांच्यासाठी आहे
ते गप्प आहेत
बहिरे आहेत
पण ज्याविरुद्ध आहे
ते मात्र सैतानासारखे
तुझा आकांत दबवत आहेत.....

हरकत नाही
पण तू आकांतत रहा
मीही तुझ्या आकांतात
माझाही आकांत मिसळतो
निखळत्या ता-यांचा असेल तसा....
न ऐकणारे ऐको न ऐकोत
या सैतानी झुंडीला
आपण तोंड देवु...

तू एकाकी नाहीस
तुझ्या क्षीण आकांतात
माझाही क्षीण आकांत मिसळला
तर आकांत थोडा तरी
कानी पडेल....

आपल्याच लोकांच्या!

Wednesday, August 12, 2015

संत शिरोमणी नामदेव महाराज

Pravin Karkhanis यांच्या facebook post वरून साभार

संत शिरोमणी नामदेव महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठल-मंदिराजवळ , आपल्या आप्तेष्टांसह , कृष्ण -पक्ष त्रयोदशी , शके १२७२ म्हणजेच इंग्रजी दिनांक ३ जुलै १३५० या दिवशी , समाधिस्थ झाले अशी महाराष्टातल्या भाविकांची श्रद्धायुक्त समजूत असल्याने , यंदा .१२ ऑगस्ट रोजी त्यांचा , तिथीनुसार , समाधी-दिन ! " अमृताहुनी गोड नाम तुझे देवा , मन माझे केशवा का बा न घे " ही रचना , अथवा " चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती , झाले मज प्रती तैसे आता " हा अभंग , किंवा घराघरात म्हटली जाणारी " युगे अठ्ठावीस विटेवरी उभा , वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा " ही आरती ---या साऱ्या संत नामदेवांच्या आहेत . कीर्तन -परंपरा लोकप्रिय केली ती नामदेवांनीच . त्यांचा जन्म ,अनेकांच्या मते हिंगोली जवळ असलेल्या नरसी-बामणी या गावी झाला होता तर काहींच्या मते त्याच नावाच्या सातारा अथवा सोलापूर जवळच्या गावात ते जन्मले . संत नामदेव यांच्या बरोबर संत ज्ञानेश्वर यांनी बराच प्रवास केला होता . संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेताच संत नामदेव उत्तरेस निघून गेले . फिरता फिरता ते पंजाब प्रांतातल्या ' घुमान ' ला गेले . त्यांच्या अवती-भवती जमणाऱ्या लोकांना त्यांनी भक्ती-संप्रदायाकडे वळविले , प्रसंगी त्यांची सेवाही केली . लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा जडली .तब्बल बावीस वर्षे तीच त्यांची कर्मभूमी झाली ...........अलीकडेच मी " घुमान " येथील संत नामदेव गुरुद्वारात राहून आलो . नामदेवांची पंजाबी भाषेत लिहिलेली एकसष्ट पदे , शिखांच्या ' ग्रंथसाहेब ' या धर्मग्रंथात गुरुमुखी लिपीत समाविष्ट असल्याने ' बाबा नामदेव ' हे त्यांचे संत-पुरुष ठरले आहेत . मूर्ती-पूजा न मानणाऱ्या शीख-धर्मियांचा हा जगातला एकच गुरुद्वारा असा आहे , जिथे बाबा नामदेव यांची मूर्ती स्थापित केलेली आहे . अर्थात , येथे असलेले नामदेवांचे रूप अगदी वेगळेच आहे . ( फोटो पाहावा ) .... बाबा नामदेव यांनी इहलोकाची यात्रा , ' घुमान --पंजाब ' इथेच संपवली अशी त्यांची ठाम समजूत असल्याने संत नामदेवांची समाधी तिथेही पाहावयास मिळते . (फोटोत वर : मराठी माणसाला अभिप्रेत असलेले संत नामदेव आणि खाली शीख समाजाला अभिप्रेत असलेले बाबा नामदेव )



Sunday, August 9, 2015

पाया

पाया : कवी : विंदा करंदीकर : 'विरूपिका' मधून

(कविता आठवली तशी लिहिली आहे)

मित्रा, माझा आशावाद दोन पायांवर उभा नसून चारशे चाळीस पायांवर उभा आहे.
कसा ते ऐक,

तरुणांना भडकाविल्याच्या  आरोपाखाली सोक्रेटीसवर अथेन्सच्या न्यायालयात खटला झाला
आणि त्याला विषाचा प्याला घेण्याची शिक्षा झाली
(ती त्याने कशी भोगली ते प्लेटोला विचार, ते विषयांतर होईल)

पण सारे काही एवढ्यावरच संपलेले नाही.
त्या खटल्यातील पाचशे ज्युरींपैकी दोनशे वीस ज्युरींनी त्याला निर्दोष ठरविले.
(त्यांना कधीकधी भेटावेसे वाटते, पण ते विषयांतर झाले)

मित्रा, माझा आशावाद  सोक्रेटीसवरच्या दोन पायांवर उभा नसून
त्या दोनशेवीस ज्युरींच्या चारशे चाळीस पायांवर उभा आहे.

Saturday, August 8, 2015

संधीचे सोने

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल  तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईन तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते