Tuesday, December 6, 2022

जन्म-पुनर्जन्म

 अद्वैत तत्वज्ञानानुसार मृत्यूनंतर माणसाचे चैतन्य (म्हणजे आपण) कोठेही जात नाही. कारण मुळात चैतन्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच आपल्याला पुनर्जन्म नाही. जर जन्मच नसेल तर पुनर्जन्म कसा असेल?

चैतन्याची मनात पडलेली प्रतिमा आपल्या अंत:करणाच्या अहंकार भागाशी तादात्म्य पावते आणि आपल्या चेतासंस्थेमार्फत सर्व शरीरात पसरते. ही चैतन्याची प्रतिमा चेतासंस्थेमार्फत देहात पसरत असल्याने आपल्याला आपला देह चैतन्यमय जाणवतो. ही प्रतिमा अंत:करणाच्या 'अहंकार' या भागाशी तादात्म्य पावत असल्याने आपल्याला ही चैतन्याची प्रतिमा म्हणजे 'आपला' आत्मा वाटते. एखाद्या स्वच्छ लोलकाशेजारी लाल जास्वदांचे फुल ठेवले तर लोलकाचा रंग लाल भासतो (याला शास्त्रात 'उपाधी' असे नाव आहे). खरे तर लोलक रंगहीनच असतो. परंतु लाल फुलाच्या सानिध्यामुळे तो लाल आहे असे भासते. तद्वतच मनाच्या सानिध्यामुळे मनात येत असलेल्या भावना - राग, लोभ, सुख, दु:ख - या आपल्या चैतन्यात उगम पावल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर त्या रंगहीन लोलकासारखे आपले चैतन्य निरंजन असते- त्यावर कोठलाही परिणाम झालेला नसतो. आपण म्हणजे आपले चैतन्य निर्विकारच असते.
आपल्या देहाच्या मृत्यूनंतर आपले सूक्ष्म शरीर अन्य देहात जाते. सूक्ष्म शरीर हे एकोणीस घटकांचे बनलेले असते. पाच ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ) शक्ती, पाच कर्मेंद्रियांच्या (तोंड, पाय, हात, गुदद्वार, लैगिक इंद्रिये) शक्ती, पंचप्राण (प्राण, आपण, समान, उदान, व्यान), अंत:करणाचे चार भाग (मन, बुद्धी, अहंकार, चित्त) असे हे एकोणीस घटक आहेत. अंत:करणाच्या चार भागांसोबत आपण मिळवलेले ज्ञान, आपल्या वासना, कर्मे इत्यादी पुढील जन्मात जातात. मात्र आपण - म्हणजेच आपले चैतन्य कोठेही जात नाही. जसे एखादे स्वप्न आपल्या मनात घडते तसे हे जन्म आणि पुनर्जन्म आपल्या चैतन्यातच घडत असतात. जसे झोपेतून उठल्यावर (जागृतावस्थेची जाणीव झाल्यावर)आपले स्वप्न संपते तसेच आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची -तुर्यावस्थेची-जाणीव झाल्यावर हे आपल्या सूक्ष्म देहाचे जन्म-पुनर्जन्माचे रहाटगाडे थांबते.
मला आणि आपणा सर्वांना या जन्मातच आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment