Friday, March 23, 2018

भारतीय दर्शनशास्त्रे

आपल्या प्राचीन ज्ञानसंपत्तीत अनेक दर्शने येतात. प्रत्येक दर्शन अध्यात्म/ देव यांचे आपल्या परीने अर्थ लावते. अशा अनेक (शेकडो) दर्शनांपैकी आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत.
Image result for ऋषिआजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते. चार्वाक दर्शन हे तर परमेश्वराला न मानणारे दर्शन आहे.
हिंदू धर्म असा व्यापक पायावर उभा आहे.  परंतु बहुसंख्य भारतीयाना आपल्या या अमुल्य ठेव्याची कल्पना नाही. त्यामुळे अतिरेकी धर्मावाद्यान्च्या जाळ्यात ते गुरफटतात. तसेच भारतीय दर्शनांमधील विविध एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी (उदा. पुरुष-शक्ती कल्पना आणि 'सर्वांभूती एकाच परमेश्वर')   'हिंदू धर्मातील' म्हणून पुढे आल्याने गोंधळून आपला धर्मच गोंधळ असलेला आहे अशी त्यांची समजूत होते. खरेतर आपल्या धर्मात प्रत्येक दर्शनात अत्यंत तार्किक पद्धतीने मांडणी केलेली आहे. यात कोठेही तार्किक गोंधळ नाही. परंतु आपल्या धर्मविषयीच्या अज्ञानाने अशी समजूत होते. आपला धर्म अन्य पाश्चत्य धर्मांसारखा नाही तर अनेक दर्शनांना सामावून घेणारा व्यापक धर्म आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.

 भारतीय दर्शनशास्त्रावर  सोप्या शब्दात एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे.
मी दर्शनशास्त्रातील अधिकारी व्यक्ती नाही. महाविद्यालयात (IIT Mumbai) अभियंत्याची पदवी घेत असताना अभ्यासात भारतीय तत्वज्ञान हा विषय होता. त्यामुळे तेव्हा या विषयाच्या संपर्कात आलो. आमचे तेव्हाचे त्या विषयाचे 'प्राध्यापक भट' (initials आठवत नाहीत) यांनी तो विषय मन लावून शिकविला आणि आम्हाला गोडी लावली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ही लेखमाला सुरु करीत आहे. या लेखनाला संदर्भ म्हणून श्री. दिक्षित यांचे 'भारतीय तत्वज्ञान' हे पुस्तक प्रमाण मानत आहे. तसेच internet वरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास मला त्याची जाणीव करून द्यावी ही या विषयातील अधिकारी व्यक्तींना प्रार्थना.

No comments:

Post a Comment