Friday, May 24, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ४

आपल्या शरीराच्या रोमारोमात आपल्याला चैतन्याचा अनुभव येतो. आपले मनही चैतन्यमय आहे हे जाणवते. हे चैतन्य आपल्यात कोठून येते?

भारतीय तत्वज्ञानात मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सर्व सूक्ष्म शरीराचे भाग आहेत. आणि त्या पलीकडे आत्मा आहे. म्हणजेच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे तीन भाग आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. पाश्चात्य तत्वज्ञान सूक्ष्म शरीर आणि आत्मा यांचा वेगळा विचार करीत नाही. दोन्हीला soul हा एकाच शब्द तेथे आहे.

आकाशात सूर्य तळपत असतो.  सूर्यासमोर असलेल्या सर्व वस्तूंवरून सूर्यप्रकाशाचे परिवर्तन होते.  पण काही वस्तू विशेष असतात. त्यात सूर्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते, उदाहरणार्थ आरसा, चकचकीत धातूचा तुकडा अथवा पाण्याचे डबके यात सूर्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. वस्तूंवरून परावर्तित होणारा प्रकाश परत अन्य वस्तूंवर पडून तेथूनही परावर्तित होतो.

आपल्या मनात या साक्षी चैतन्याचे आरशासारखेच स्पष्ट प्रतिबिंब पडलेले असते. मनाच्या आरशात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब उमटल्यावर मनाचे द्विभाजन होते. एक भाग हा अहंकार अथवा 'मी'त्वाची भावना बनून येतो तर बाकी मन बुद्धी, चित्त इत्यादी रूपात राहातो. अहंकार हा साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाशी एकरूप होतो. हा अहंकार साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबातून परावर्तित होणारे चैतन्य प्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये पसरवितो. तेथून ते स्थूल शरीरात पसरते आणि आपल्याला आपले शरीर चैतन्यमय असल्याचे जाणवते. हा परावर्तित चैतन्यासह असलेला अहंकार आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत पसरत असल्याने आपल्याला आपण म्हणजे आपले शरीर-मन  असे भासते. आपला अहंकार हा चैतन्याचा मोठा स्रोत भासतो ते यामुळेच.

या परावर्तित चैतन्याशी एकरूप होऊन चैतन्याचे आपल्या शरीरात प्रसारण करणाऱ्या अहंकाराला या ग्रंथात तप्त लाल-पिवळ्या लोहगोलाची उपमा दिलेली आहे. भट्टीतून काढलेला तप्त लोहगोल प्रकाश फेकत असतो. लोहगोलाचे लोखंड, आकार गोळ्याचेच असले तरी त्याची उष्णता, परावर्तित होणार प्रकाश हा गुणधर्म त्याचा स्वत:चा नसतो, तो त्याने आगीतून 'उधार' घेतलेला असतो. ही उष्णता, प्रकाश आगीचा अंगभूत गुणधर्म आहे. वजन, आकार हा त्या लोहगोलांचा अंगभूत गुणधर्म आहे. प्रकाश हा त्या गोळ्याने आगीपासून उधार घेतलेला आहे. म्हणजेच त्या तप्त गोळ्याचे काही गुणधर्म अंगभूत आहेत तर काही उधार आहेत. (या तप्त लोहगोलाचे अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म वेगळे ओळखणे हाच 'विवेक' आहे). तसेच अहंकाराचा चैतन्य हा अंगभूत गुणधर्म नाही, त्याने तो साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाकडून उधार घेतला आहे. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाचाही तो अंगभूत गुणधर्म नाही. त्याने तो साक्षी चैतन्याकडून उधार घेतला आहे. साक्षी चैतन्याचा मात्र तो अंगभूत गुणधर्म आहे.

मनात पडलेल्या साक्षी चैतन्याच्या स्पष्ट प्रतिबिंबालाच आपले मन आपला चैतन्यदायी आत्मा समजते. खरेतर या चैतन्याचा उगमस्रोत साक्षी चैतन्य आहे. रात्री आकाशात चंद्र असतो. चंद्र परप्रकाशी आहे. पण चंद्राच्या प्रकाशात पौर्णिमेला आपल्याला आसपासचे दिसू शकते. हा प्रकाश चंद्राचा नसतो, तर चंद्रावरून परावर्तित होणारा सूर्याचा प्रकाश असतो. तसेच या परावर्तित चैतन्याने मन-शरीर उजळून निघते. शरीराचे हे चैतन्य परावर्तित आहे, उधार आहे. म्हणूनच मृत्यूनंतर शरीरातील चैतन्य नाश पावते.

आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत. जसा सूर्य कायम तळपत असतो, तसेच हे साक्षी चैतन्य कायम तळपत असते, कायम स्वच्छ असते, निरंजन असते. आरशावर मळ साठला की सूर्याचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते. तसेच आपल्या मनावर मळभ आल्यास चैतन्यावरच मळभ आले आहे असे भासते. आपण दु:खी होतो. खरे तर आपण (साक्षी चैतन्य) कायम निरंजनच असतो, पण मनाच्या आरसा आपण सुखी आहोत, दु:खी आहोत, त्रासलेले आहोत अशी भावना निर्माण करतो. हा मनाचा आरसा उलटा ठेवला की साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब उमटत नाही. मग आपल्यातले चैतन्य हरवते. प्रगाढ निद्रेत (सुषुप्तावस्थेत) मनाचे व्यवहार थांबल्याने चैतन्य हरवल्यासारखे भासते (पण साक्षी चैतन्य तसेच असल्याने झोप गाढ लागली होती याची उठल्यावर जाणीव होते).
सूर्य एकच असतो, पण अनेक आरशात त्याचे वेगळे प्रतिबिंब दिसते. तसेच आपण सर्वात चैतन्य एकाच साक्षी चैतन्य आहे, पण प्रत्येकाच्या मनाचा आरसा वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला आपला आत्मा अन्य आत्म्यांपासून वेगळा भासतो. 

No comments:

Post a Comment