Sunday, October 10, 2021

अचपळ मन माझे - भाग ४

 दुर्योधनाने कृष्णाला सांगितले की 'मला माझे हित कशात आहे आणि अहित कशात आहे ते कळते. पण माझया अंगात एक अनामिक शक्ती आहे. आणि ती माझ्याकडून जसे करवून घेते तसे मला करावे लागते, माझे त्यात अहित दिसत असेल तरीही'. अर्जुन हाच प्रश्न थोड्या वेगळ्या भाषेत विचारतो आहे, पण तो त्यावर काय करावे याचे उत्तर श्रीकृष्णाकडे मागतो आहे हे आपण पाहिले. हा प्रश्न आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्यासमोर नेहमी येतो. जर आपण आपल्याला योग्य वाटते तेच करू शकलो तर आपल्याला भावी आयुष्यात खूप उपयोगी ठरेल हे आपण जाणतो. म्हणूनच कृष्णाने दिलेल्या उत्तराबद्दल आपल्याला उत्सुकता आहे. आपल्या अंतर्मनात खोलवर दडलेले 'संस्कार' आपल्या 'वृत्ती जागवितात', त्यानुसार आपण प्रतिक्रिया देतो, नंतर याच वृत्ती आपले पूर्वसंस्कार अधिक दृढ बनवितात हे आपण मागच्या भागात पाहिले. मग या चक्रातून बाहेर येण्याचा काहीच मार्ग नाही का? श्रीकृष्ण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या ३४ व्या श्लोकाच्या उत्तरार्धात या मार्गाकडे निर्देश करतात. पण आपल्याला हा मार्ग विस्तृतपणे समजून घेणे आवश्यक आहे. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ | तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४|| श्रीकृष्ण सांगताहेत की माणसाने हे राग-द्वेषाचे संस्कार अंतर्मनातून आपल्या बहिर्मनावर येतात तेव्हाच (म्हणजे त्याची वृत्ती बनण्यापूर्वीच) त्यापासून स्वतः:ला सोडवून घेतले पाहिजे. या संस्कारांना वश होणे टाळले पाहिजे. आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की हे कसे साध्य होणार? कारण इंद्रियांचा स्पर्श एखाद्या विषयाला होताच हे लोभ-मोहाचे संस्कार आपले डोके वर काढतात, त्यांचे वृत्तीमध्ये रूपांतर होते. मला न आवडणारा माणूस दिसला की त्याक्षणी माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेषाची भावना उत्पन्न होते. समोर चमचमीत पदार्थ आला की लगेच माझ्या मनात तो खाण्याची अनावर इच्छा निर्माण होते. मग श्रीकृष्ण सांगताहेत ते मला माझ्या शक्तीपलीकडचे वाटू लागते. पण या संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्कार या चक्रातही एक कमजोर कडी - weak link - आहे. आपण या कमजोर कडीबद्दल आणि त्याचा उपयोग करून हे संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्काराचे दुष्टचक्र कसे भेदायचे हे पुढील भागात पाहू. संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment