Sunday, October 10, 2021

अचपळ मन माझे - भाग ५

'मला माझ्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे याचे भान आहे. परंतु ऐन वेळी माझ्या मनातील एक अनामिक शक्ती मला अयोग्य गोष्ट करण्यास भाग पाडते' असे दुर्योधनाचे सांगणे आहे. ऐन युद्धाच्यावेळी समोर आपल्याच भाऊबंदांना पाहून अर्जुनाची गात्रे कापू लागतात, यावेळी अर्जुन दुर्योधनासारखेच वक्तव्य करतो आणि श्रीकृष्णाला सल्ला विचारतो. असाच प्रश्न आपल्यालाही जीवनात अनेकवेळा पडतो. यातून मार्ग कसा काढायचा याचे उत्तर कृष्णाने दिले, ते आपण मागील लेखात पाहिले. अर्जुन आणि कृष्ण यावेळी युद्धभूमीवर उभे होते. युद्धाला प्रारंभ होण्याची वेळ आली होती. अशावेळी कृष्णाने अर्थातच थोडक्यात उत्तर दिले. याचे विस्तृत विवेचन आपल्याला निरनिराळ्या उपनिषदांत सापडते. 

आधुनिक मानसशास्त्राने आपल्या मनाचे अंतर्मन आणि बाह्यमन असे भाग केले आहेत.  अगदी असेच विभाजन आपल्या प्राचीन गंथांतही आढळते. अंतर्मनात दडलेल्या भावनांना आपल्या प्राचीन भाषेत 'संस्कार' असे नाव आहे, आपल्या पंचेंद्रियांना अथवा मनाला एखाद्या गोष्टीचा (विषयाचा) स्पर्श झाल्यास त्यासंबंधित संस्कार बहिर्मनात येतात, वृत्तींना जन्म देतात. आपण त्या वृत्तीच्या आधारे प्रतिक्रिया देतो. याच प्रतिक्रिया पुनश्च अधिक दृढ संस्कार बनून अंतर्मनात जातात. 

श्रीकृष्णाने या दुष्टचक्राला भेदण्याचा मार्ग सांगितला तो स्पष्ट आहे. आपल्याला या देहात ज्ञानेंद्रिये आहेत. त्यांना कोठल्यातरी गोष्टीचा स्पर्श होणारच. डोळ्यांना काही दिसेल, कानावर आवाज येईल इत्यादी. त्यामुळे अंतर्मनातील संस्कार जागृत होऊन बहिर्मनातही येणार. आपले त्यावर काहीच नियंत्रण नाही. मात्र बहिर्मनात त्याच्या वृत्ती बनण्यापूर्वी आपल्याला त्यांना थोपविता येते. काही क्षणांसाठी ही Opportunity Window आपल्यासाठी उघडी असते. अशा वेळी या संस्कारांना - आठवणींना - प्रतिसाद न देता म्हणजेच मनात राग-द्वेषाचे भाव उमटू न देता त्याकडे केवळ द्रष्टया भावाने बघता येते. यासाठी आपण सतत सावध - सजग असणे आवश्यक आहे. काहीजण ही सजगता मागील जन्मातूनच घेऊन येतात. आपण त्या व्हिडीओमध्ये पाहिले की काही मुले मोहावर मात करू शकली. समोर मॅशमेलो दिसत असतानाही तो खाण्याचा मोह त्यांनी आवरला. आपल्याला ही सजगता आपल्या अंगात बाणावयाची आहे, असलेली सजगता अधिक दृढ करायची आहे. 

यासाठी उपनिषदांनी काय मार्ग सांगितलं आहे ते बघू. सजगता वाढविण्यासाठी उपनिषदे विपश्यना ध्यानाचा मार्ग सुचवितात. विपश्यना ध्यानात आपण आपल्या श्वासाबाबत, शरीरावरील संवेदनांबाबत सजग बनतो. बहिर्मनात येणारा - वृत्तीत रूपांतरित होणारा प्रत्येक संस्कार आपल्या श्वासात प्रथम सूक्ष्मसा बदल घडवितो. आपल्या शरीरावर कुठेतरी कसलीतरी संवेदना जागवितो. आपण याबाबत खूप जागरूक असू तर आपल्याला हा बदल लगेच जाणवतो. मग या संस्कारातून वृत्ती जागृत करायची का पूर्णपणे तटस्थ राहायचे हे आपल्या हातात रहाते. एखादा आपल्याला न आवडणारा माणूस समोर आला तर आपले द्वेषाचे संस्कार बहिर्मनात येतील, पण द्वेषवृत्तीत त्याचे रूपांतर होणार नाही. मग ही द्वेषवृत्ती परत अंतर्मनात जाऊन त्याचे नवे संस्कारही बनणार नाहीत. हळूहळू अंतर्मनातील मोह आणि द्वेषाच्या संस्कारांचे ओझे कमी होऊ लागेल. आपल्या इंद्रियांचा स्पर्श एखाद्या गोष्टीला झाला (कोणती गोष्ट पाहिली, एखादा आवाज ऐकू आला इत्यादी) तरी अंतर्मनातील संस्कार बहिर्मनावर येण्याची तीव्रता कमी होऊ लागेल, या संस्कारांना वृत्तीत बदलण्याआधी पकडणे सोपे होऊ लागेल. आपला आपल्या मनावर ताबा येऊ लागेल. आपल्यसाठो योग्य तीच गोष्ट (श्रेयस) करण्याची, अयोग्य गोष्ट (प्रेयस) करण्याच्या उर्मिला रोखण्याची आपली क्षमता वाढू लागेल. मग अर्जुनासारखा प्रसंग आपल्यावर आल्यास आपली गात्रे कापणार नाहीत, हातातले धनुष्य गळून पडणार नाही. 

विपश्यना ध्यान शिकण्यासाठी आपण गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत जाऊ शकता. हे शिबीर विनामूल्य आहे. http://www.dhamma.org येथे रजिस्ट्रेशन करता येते. माझ्या ब्लॉगवर (http://chintan.karkhanisgroup.com) 'कुंडलिनी ध्यान' विभागात मी त्रोटक माहिती दिली आहे. पण विपश्यना केंद्रात जाऊन ध्यान शिकल्यास उत्तम. तेथे आपल्याला टप्याटप्प्याने ध्यानाची पद्धत शिकवितात. संपूर्ण जगभर अनेक विपश्यना केंद्रे आहेत, त्यात दर महिन्याला हजारो साधक ही विद्या शिकून जातात. मग आपल्याला जमणे सहज शक्य आहे. 

जर काही कारणामुळे आपणास विपश्यना शिबिरात जाणे शक्य नसेल तर आपण ध्यानाची पूर्वतयारी असलेले 'अनापान सति' / प्राणधारणा करूनही काही प्रमाणात सावधपणा आपल्या स्वभावात आणू शकतो.  विपश्यना ध्यान / अनापान सति/ प्राणधारणा  कशी करायची याची थोडक्यात माहिती माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' या विभागात आहे. प्राणधारणा आणि विपश्यना ध्यान या कुंडलिनी ध्यानाच्या पहिल्या दोन पायऱ्या आहेत. 

आपल्या सर्वांचे मन आपल्याला वश होवो आणि त्याद्वारे आपली ऐहिक आणि अध्यात्मिक प्रगती होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना. 

लेखमाला समाप्त. लेखनसीमा.


संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment