Wednesday, April 4, 2018

गौतम बुद्धाचा अनात्मवाद

No automatic alt text available.बौद्ध धर्म 'अनात्मवाद' सांगतो. पण गौतम बुद्धाने आपल्या मागील जन्माच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्या 'जातककथा' या नावाने प्रसिद्ध आहेत. जर 'आत्मा'च नसेल तर पुनर्जन्म कसा अशा शंका उद्भवतात. या संदर्भात अनेकांच्या मनात गोंधळ असतो. कालच एका पोस्टवर यावरून चर्चा चालू होती. माझ्या मित्रांच्या माहितीसाठी त्या चर्चेतील माझी COMMENT येथे पुनरुधृत करीत आहे.

गौतम बुद्धाने भवचक्राची संकल्पना मांडली. मृत्युच्या शेवटच्या क्षणी एक खोलवर ठसा उमटविलेला संस्कार (वासना/इच्छा) डोके वर काढतो, तो चार स्कंधान्च्या (वेदनास्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध, विद्यानस्कंध) समुच्चयाला नव्या रूपस्कंधाशी (शरीराशी) जोडतो.त्यामुळे नवा जन्म मिळतो आणि आपल्याला जीवनाचे सातत्य जाणवते.

जेव्हा हा संस्कारसंचय नष्ट होतो आणि नवा संस्कार बनत नाही तेव्हा माणूस मुक्त होतो (बौद्ध शब्दावलीप्रमाणे 'निर्वाणाला' पोचतो). मग मृत्युच्या वेळी कोठलाही संस्कार आपले शीर उभारीत नाही. मग नवा जन्म मिळत नाही. यावेळी काहीच उरत नाही. आत्मासदृश काहीही उरत नाही. म्हणूनच बुद्धदर्शन शून्यवाद सांगणारे म्हणून ओळखले जाते. अन्य बहुसंख्य (काही अपवाद वगळता) भारतीय दर्शनांत मुक्तीनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो असे म्हटले आहे. या दृष्टीने बौद्ध दर्शन वेगळे आहे. ते अनात्मवादी आहे.

अशाप्रकारे पुनर्जन्म (भवचक्र) ही संकल्पना बौद्ध धर्मातही आहे. स्वत: तथागताचे मागील अनेक जन्म त्यांना आठवले आणि त्याच जातक कथा होत.

अन्य भारतीय दर्शनात ज्याला 'वासना' म्हणतात त्याला बौद्ध शब्दावलीत 'संस्कार' (पाली शब्द 'संखारा') म्हणतात.

प्राचीन भारतीय दर्शने (बौद्ध , जैन धरून) अनेक आहेत. त्यात भेद असला तरी थोडाच आहे. त्या दर्शनांचे उद्गाते ज्या काळात होऊन गेले त्यांनी त्या काळाची भाषा वापरली आहे. म्हणून ही दर्शने प्रथमदर्शनी वेगळी वाटतात. चार्वाक दर्शन (लोकायत) हेच वेगळे असावे. पण चार्वाक दर्शनाची संहिता उपलब्ध नाही. त्याच्यावरील टीका उपलब्ध आहेत. त्यावरूनच ते दर्शन काय म्हणते याचा अंदाज करावा लागतो.

तेव्हा सर्व भारतीय दर्शने मूलत: सारखीच गोष्ट सांगतात. त्यात थोडाच फरक आहे.



No comments:

Post a Comment