Tuesday, November 9, 2021

अद्वैत वेदांत आणि मुक्ती

अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानानुसार हे विश्व म्हणजे दुसरे काही नसून ब्रह्म आहे.आपण ब्रह्म आहोत. त्यामुळे मुक्तच आहोत. त्यामुळे मुक्तीची संकल्पना या तत्वज्ञानात नाही. जर आपण मुक्तच आहोत तर ही मुक्तता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात का जाणवत नाही? आपण मुक्त असूनही, ब्रह्म असूनही सुख-दु:खाच्या फेऱ्यात का अडकलेले आहोत?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला अंगभूत गुण उधार गुण यातील फरक समजून घ्यावा लागेल. चुलीवर एक भांडे ठेवले आहे. पाण्याची उष्णता हा त्या पाण्याचा अंगभूत गुणधर्म नाही. हा गुणधर्म पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. जर ते पाणी भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतले तर ती उष्णता टिकून राहिलच असे नाही. तद्वातच त्या पाण्याचा आकार हाही त्या पाण्याने भांड्याकडून घेतलेला आहे. तो पाण्याचा उधार गुणधर्म आहे. मात्र पाण्याचे वस्तुमान हा गुणधर्म पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे.
त्या चुलीवरील भांड्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. तो त्याने खालच्या अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हे त्या भांड्याचे अंगभूत गुणधर्म आहेत. अग्नीचा मात्र उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे. जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत उष्णता राहाणार आहे. म्हणजेच उष्णता हा गुणधर्म अग्नीकडून भांड्याकडे आणि तेथून पाण्याकडे संक्रमित झाला आहे.
ब्रह्माचा (साक्षी चैतन्याचा) सूर्य तळपत आहे. आपल्या मनात या ब्रह्माचे प्रतिबिंब पडले आहे. आपल्या मनाच्या 'अहंकार' या भागाशी हे प्रतिबिंब एकरूप होते. अहंकाराच्या साहाय्याने चेतासंस्थेमार्फत हे प्रतिबिंब संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. साक्षी चैतन्याच्या या अहंकाराशी एकरूप झालेल्या प्रतिमेलाच आपण आपला आत्मा समजतो. या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेने साक्षी चैतन्याकडून सत् (अस्तित्व), चित् (चैतन्य) आणि आनंद हे गुण उधार घेतले आहेत. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्या चैतन्याचे प्रक्षेपण बाह्य जगतावर करतो (उदा. डोळ्यांनी बघतो). त्यावेळी आपण साक्षी चैतन्याचा सत् (अस्तित्व) हा गुण त्या वस्तूला देतो. ती वस्तू (आपल्या दृष्टीने) अस्तित्वात येते. म्हणजेच सत् (अस्तित्व) हा गुण ती वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियाकडून उधार घेते. हा गुण ज्ञानेंद्रियांनी साक्षीचैतन्याच्या (ब्रह्माच्या) प्रतिमेकडून, चैतन्याच्या प्रतिमेने साक्षीचैतन्याकडून (ब्रह्माकडून) उधार घेतलेला आहे.
अद्वैत वेदान्ताच्या मते 'मुक्ती' याचा अर्थ आपल्या अहंकाराशी साक्षी चैतन्याचे झालेले तादात्म्य ओळखणे आहे. हे तादात्म्य आपण तोडू शकत नाही. परंतु त्याची जाणीव झाली की आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते. 'अष्टावक्रगीता' या ग्रंथात हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment