Tuesday, May 31, 2022

कर्मयोग- साधना- ज्ञानयोग - मुक्तीच्या तीन पायऱ्या - भाग १

 सर्व विश्व हे ब्रह्म आहे असे अद्वैत वेदांत सांगते. अद्वैत वेदान्ताच्या दृष्टीतून आपण सगळे सदासर्वकाळ मुक्तच असतो. पण मायेच्या पांघरुणामुळे आपल्याला आपण आणि आसपासचे विश्व ब्रह्म असल्याचा अनुभव येत नाही, मुक्तीचा अनुभव  येत नाही.  जर आपण मुक्तच आहोत तर दैनंदिन जीवनात आपला जो संघर्ष चालू असतो, विविध समस्यांना  आपल्याला सामोरे जावे लागते त्याबाबत हे तत्वज्ञान काय सांगते? वेदान्ताच्या प्रस्थानत्रयींमध्ये भगवद्गीतेला स्थान आहे. गीता कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलेली आहे. त्यात कर्मयोगाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर अद्वैत वेदांताचा संदर्भ काय - अद्वैत वेदांतात कर्मयोगाचे स्थान काय  हे शोधणे नक्कीच उपयोगी ठरेल. 

आपण ब्रह्म आहोत, मग आपल्याला आपण ब्रह्म असल्याचा अनुभव का येत नाही? याचे कारण अज्ञान आहे. अज्ञान दूर करण्याचा मार्ग म्हणजे अर्थातच ज्ञान मिळविणे. हा आहे ज्ञानयोग. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, विविध ग्रंथ यांच्या साहाय्याने अथवा प्रवचने ऐकून आपण ज्ञान मिळवू शकतो. परंतु केवळ वाचन करून अथवा प्रवचने ऐकून आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. अद्वैत वेदान्ताने ज्ञानयोगाच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. 'श्रवण','मनन' आणि 'निजिध्यासन' या त्या तीन पायऱ्या,  

श्रवण म्हणजे एखादी गोष्ट नीट ऐकून अथवा वाचून समजून घेणे. समोरच्या माणसाला काय सांगायचे आहे ते सर्व खाचा खोचांसकट समजून घेणे म्हणजे श्रवण. जे ऐकले आहे त्यावर विचार करून त्यात आलेल्या शंकांचे निरसन करून घेणे म्हणजे मनन. सर्व शंकांचे निरसन झाल्यावर जे ऐकले आहे/ वाचले आहे आणि समजले आहे ते अनुभवाला येते काय हे पाहणे म्हणजे निजिध्यासन. श्रवण-मनन-निजिध्यासन हे एकाच वेळी होऊ शकतात. आपण आधी ऐकल्याचे आज मनन-निजिध्यासन करू शकतो. याच वेळी नवे काही श्रवण करू शकतो. 

मात्र काही जण हे श्रवण-मनन टप्पे पार करूनही 'अहं ब्रह्मास्मि' चा अनुभव येत नाही.  याचे कारण म्हणजे या व्यक्तींचे मन स्थिर नसते. त्यामुळे अनुभव जाणण्यासाठी लागणारी एकाग्रता त्यांच्याकडे नसते. यावर उपाय काय? .... पुढील लेखात याचा विचार करू. 

No comments:

Post a Comment