Saturday, May 7, 2022

The Hard Problem of Consciousness: Part 2

 मागील भागात आपण डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने मांडलेला The Hard Problem of Consciousness काय आहे याची तोंडओळख करून घेतली. आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या विविध संवेदना मेंदूपर्यंत कशा पोचतात हे दाखविण्यास प्रचलित विज्ञान समर्थ आहे. परंतु या संवेदनांचे अनुभवात रूपांतर कसे होते आणि त्याद्वारे विविध भावभावना कशा उत्पन्न होतात हे दाखविण्यास सध्याचे विज्ञान असमर्थ आहे हे डेव्हिड चालमर्स यांनी दाखवून दिले आहे. काही भौतिकवादी (Materialistic) शास्त्रज्ञांच्या मते भविष्यकाळात विज्ञान पुढे सरकले की हे दाखविण्यास समर्थ ठरेल. या शास्त्रज्ञांचा 'हे जग पदार्थ-ऊर्जा यांनी बनलेले आहे आणि त्याव्यतिरिक्त काहीही नाही' यावर गाढ विश्वास आहे. या उलट अनेक शास्त्रज्ञ 'चैतन्य' हे पदार्थ-ऊर्जेपेक्षा वेगळे असल्याचे मानतात.


काही शास्त्रज्ञानी Hard Problem of Consciousness सारखाच Hard Problem of Matter असल्याचे दाखवून दिले आहे. सध्याचे भौतिक शास्त्राचे नियम पदार्थांचे एकमेकांवरील परिणाम दाखविते. म्हणजेच ते Software आहे. परंतु प्रत्येक softwear मागे त्याला आधार देणारे hardware असावे लागते. हे hardware काय आहे हे सध्याचे विज्ञान सांगू शकत नाही असे हे शास्त्रज्ञ मानतात. Matter म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास जेवढे अधिक खोलात जाऊ तेवढे नवे विसंवाद सापडत जातात. विज्ञान अधिक आपल्याला अधिकाधिक गोंधळात पाडते. विज्ञानाच्या मुळापर्यंत आपण आलो असे वाटत असतानाच Heisenberg's principle of uncertainty नी आपल्याला धक्का दिला. तसेच प्रकाश हा किरणांच्या स्वरूपात जातो या आपल्या दृढ समजुतीला धक्का मिळाला आणि आता प्रकाशाच्या या विसंगत आचरणातील संगती शोधण्याची प्रयत्न चालू आहेत. तीन मितींपेक्षा अधिक मिती असण्याची शक्यता दिसते आहे. या परिस्थितीत आपले तीन मितींमधील अवकाशावर (space) आधारलेले विज्ञान अपुरे भासू लागेल. काही दशकांपूर्वी मानवाला वाटत होते की लवकरच त्याला विज्ञानाची सर्व कोडी उलगडतील आणि विश्वनिर्मितीचे गूढ उकलेल. पण आपण जसे विज्ञानाच्या खोलात शिरत आहोत तशी विज्ञानाची सर्व कोडी उलगडण्याचे शक्यता धूसर होत चालली आहे. असे असेल तर भविष्यात पदार्थापासून (Matter) चैतन्याची निर्मिती होते हे दाखविण्याची आणि तसे प्रयोगाने करून दाखविता येण्याची शक्यता मला फारच कमी वाटते.
मग अशा वेळी आपल्याला उपनिषदे लिहिणारे प्राचीन ऋषी मार्ग दाखवितात. ध्यानस्त अवस्थेत असताना झालेले चैतन्य-पदार्थ संबंधातील ज्ञान ते आपल्यापुढे ठेवतात. हे ज्ञान आपण अंधभक्तीने जसेच्यातसे न स्वीकारता आपल्या दैनंदिन अनुभवांच्या कसोटीवर पारखून घ्यावे अशीही त्यांची अपेक्षा आहे. उपनिषदांत ऋषींनी काय सांगितले आहे ते पुढील लेखांत पाहू.
संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment