Tuesday, December 5, 2023

सांख्य दर्शन ४ : सृष्टीची निर्मिती

 कोणत्याही गोष्टीची (Object) निर्मिती होण्यासाठी 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण' या दोन्हीची आवश्यकता  असते असे सांख्य दर्शन मानते. या सृष्टीच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे, तर 'प्रकृती' हे उपादान कारण आहे हे आपण मागील लेखात पाहीले. तसेच प्रकृती 'सत्व', 'रज' आणि 'तम' या तीन गुणांनी बनली आहे हे ही पाहिले.

प्रकृती तिच्यामधील असीम शक्यतांचे प्रदर्शन करता यावे/ प्रकटीकरण करता यावे  म्हणून सतत बेचैन असते. या उलट पुरुष हा केवळ चैतन्य आहे. समोरील गोष्टींना अनुभवणे हे चैतन्याचे कार्य आहे. पण समोर अनुभवण्यासाठी काहीही नसेल तर पुरुषाला आपल्यातील चैतन्य सिद्ध करता येत नाही. म्हणून पुरुष-प्रकृती एकत्र आले तर प्रकृतीला आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटन करता येते आणि चैतन्य ते अनुभवू शकते. 

पुरुष आणि प्रकृती एकत्र आल्यावर मूल प्रकृती (महत) सत्व गुणापासून प्रथम बुद्धी निर्माण करते. ही बुद्धी चेतनारहित असते. नंतर प्रकृती 'रज, गुणापासून अहंकार निर्माण करते. पुरुष एकदा अहंकाराच्या जाळ्यात फसला ही बाहेर येणे कठीण असते. हा अहंकार पुरुषामध्ये 'मी पणाची' भावना जागवितो. यानंतर प्रकृती जे निर्माण करेल ते 'माझे' आहे असे पुरुषाला वाटते. नंतर 'तम्' या गुणापासून   मनाचा जन्म होतो. मन, अहंकार आणि बुद्धी यांनी मिळून चित्त बनते. अहंकार राजस असल्याने सतत काहीतरी करावे, अधिक चांगले व्हावे असे वाटून बेचैन असतो. याउलट मन हे तामसिक असते. तामसिक असल्याने ते आळशी (Inert) असते, आपल्याजवळ अनेक आठवणींचा साठा करू शकते. म्हणूनच सात्विक बुद्धी, राजसिक अहंकार आणि तामसिक मन आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत. 

एकदा चित्ताचा जन्म झाला की प्रकृती आपला खेळ जोरात चालविते. तीन गुणांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टी (Objects - वस्तू आणि ऊर्जा) बनतात. या तीन गुणांमधील 'रज' हा गुण क्रियाशील असतो. त्यामुळे तीन गुणांचे मिश्रण होताना सत्व आणि रज तसेच रज आणि तम यांचे मिश्रण होताना दिसते. मात्र सुरुवातीला सत्व आणि तम यांचे मिश्रण होत नाही. 

सृष्टीची निर्मिती होताना प्रथम पंचमहाभुतांची निर्मिती झाली. यातही प्रथम सत्व गुणांपासून 'आकाश' उत्पन्न झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने अन्य पंचमहाभूते उदयास आली. सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने 'वायू' उत्पन्न झाला. रज गुणांपासून 'अग्नी' निर्माण झाला. रज आणि तमोगुणांच्या मिश्रणाने 'जल' हे पंचमहाभूत निर्माण झाले. शेवटी तमोगुणापासून पृथ्वीतत्वाची निर्मिती झाली. 

परंतु केवळ पंचमहाभूतांची निर्मिती होऊन त्याचा अनुभव पुरुष घेऊ शकणार नव्हता. या पंचमहाभूतांचा अनुभव पुरुषाला (चैतन्याला) घेता यावा म्हणून पंचमहाभूतांपासून तन्मात्रे उत्पन्न झाली. आकाशापासून 'शब्द' हे तन्मात्र बनले, वायूपासून 'स्पर्श', अग्नीपासून 'रूप', जलापासून 'चव' आणि पृथ्वीप्ससुन 'गंध' ही तन्मात्रे उत्पन्न झाली. 

केवळ तन्मात्रे उत्पन्न होऊन चालणार नव्हते. या तन्मात्रांचा अनुभव घेण्यास इंद्रिये आवश्यक होती. मग अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. 

हा सृष्टीचा अनुभव चांगल्याप्रकारे यावा म्हणून पाच कर्मेंद्रिये निर्माण झाली. तोंड, हात, पाय, मलोत्सर्जनासाठी अवयव आणि पुनरुत्पादनासाठी अवयव ही ती  पाच कर्मेंद्रिये आहेत. 

प्रकृती कायम अस्वस्थ असते आणि सातत्याने आपापले रूप बदलत असते. याउलट पुरुष म्हणजेच चैतन्य स्थिर असते. पुरुष प्रकृतीच्या खेळात हळूहळू गुंतत जातो. अहंकारामुळे तो आपण कोण आहोत हेच विसरतो. यामुळे प्रकृतीच्या खेळात तो दु:ख अनुभवतो.  पुरुषाला आपण प्रकृतीच्यापेक्षा वेगळे असल्याची जाणीव होणे हाच दु:खमुक्तीचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुरुषाला प्रकृतीच्या खेळाची जाणीव करून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनेक मार्ग अनुसरले. त्यातील एका मार्गाची ओळख आपण पुढील भागात करून घेऊ. 

No comments:

Post a Comment