Thursday, December 7, 2023

सांख्य दर्शन ६ : आयुर्वेद


सांख्यदर्शन हे आपले अतिप्राचीन दर्शन आहे. भारतीय माणसावर या दर्शनाने अनेक शतके प्रभाव टाकलेला आहे. 

वेदान्त दर्शन प्रामुख्याने हे विश्व 'माया' आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील समस्यांवर या दर्शनाच्या माध्यमातून उपाय शोधणे कठीण जाते. याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी करून प्रकृतीचा खोलात जाऊन वेध घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील विविध समस्यांची कारणे आणि उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होतो. 

भारतीय आयुर्विज्ञान शास्त्र आयुर्वेद हे ही सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. यात आपल्या शरीरात 'कफ', 'पित्त' आणि 'वात' या तीन दोषांचे (गुणांचे) संतुलन असते असे मानले गेले आहे. हे दोष पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून तयार होतात. जर हे संतुलन बिघडले तर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात असे आयुर्वेद मानतो. हे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी विविध रसायने आयुर्वेद सुचवितो. 


आकाश आणि वायू एकत्र येऊन 'वात' दोषाची निर्मिती होते. 'आकाश' आणि 'वायू' एकत्र आल्यामुळे 'हालचाल' हे वाताचे मुख्य लक्षण आहे. आपल्या शरीरातील आणि चित्तामधील चलनवलन यावर वातदोषाचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ रक्तप्रवाह, शरीरातील विषद्रव्यांचे निराकरण, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, चेतासंस्थेचे कार्य, मनातील विचारांचा प्रवाह, सांध्यातील हालचाली इत्यादींवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'अग्नी' आणि 'जल' एकत्र येऊन 'पित्त' दोषाची निर्मिती होते. ही दोन पंचमहाभूते एकत्र आल्याने उष्णता, तरलता आणि स्निग्धता ही पित्ताची मुख्य लक्षणे आहेत. पचनसंस्था, त्वचा आणि त्वचेचा उजळपणा, शरीराचे तापमान यावर पित्तदोषाचा प्रभाव असतो. पित्तदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'जल' आणि 'पृथ्वी' एकत्र येऊन 'कफ' दोषाची निर्मिती होते. 'पृथ्वी' हे अत्यंत स्थिर पंचमहाभूत आहे हे आपण जाणतोच.  संथपणा, स्थिरता, शांतता, गारवा ही कफदोषाची मुख्य लक्षणे आहेत. कफदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येतो. 

आयुर्वेदात या तीन दोषांच्या संतुलनाचा विचार केला जातो. पण आपल्या शरीरावर 'प्रकृती' आणखीही वेगळ्या मार्गाने प्रभाव टाकत असते. जन्मत:च आपले शरीर संतुलित नसते. प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या दोषाचा अधिक प्रभाव असतो. आपले शरीर त्यानुसार विविध गोष्टींना प्रतिसाद देत असते. त्यामुळे आयुर्वेदिक औषध देताना आपल्या शरीरात मूलभूत कोणते दोष अधिक आहेत यावरही औषधयोजना ठरत असते. आपल्या शरीरात कोणता दोष अधिक आहे हे आपले आपल्याला ओळखता येते आणि त्याप्रमाणे आपण आपली काळजी घेऊ शकतो. हा विषय मोठा आहे आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाही. कधीतरी यावर विस्तृत लिहीन. 

आयुर्वेदाचा आधार 'सांख्यदर्शन' आहे.  सांख्यदर्शन भारतीय समाजात खोलवर मुरलेले आहे. 







No comments:

Post a Comment