Sunday, December 3, 2023

सांख्य दर्शन

 

आपण अद्वैत दर्शन खूप खोलात जाऊन पहिले. आता सांख्य दर्शनाकडे वळू. माझा सांख्य दर्शनावर अद्वैत वेदांत दर्शनाएवढा सखोल अभ्यास नाही. आपण मला समजून घ्याल अशी आशा. 

सांख्य दर्शन हे खूप प्राचीन दर्शन आहे. कपिल मुनी याचे प्रणेते आहेत. कपिल मुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला जातो. न्याय आणि वैशेषिक दर्शन या पूर्वीचे आहेत.  'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. त्यानंतर अनेक ऋषींनी यावर ग्रंथ लिहिले आहेत. इसवीसन   पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी 'सांख्य कारिका' हा ग्रंथ लिहिला आहे.  आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो

आपण आधी अभ्यासलेला अद्वैत वेदांत हा 'विश्व हे सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे' असे मानतो. अद्वैत वेदांताची संपूर्ण मांडणी ही मायेचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झालेली आहे. मायेचे अस्तित्व लक्षात आले आणि ब्रह्माचा क्षणोक्षणी अनुभव येऊ लागला की आपण मुक्त असल्याची प्रचिती येते असे हे दर्शन मानते. जागृतावस्थेत विश्व हे ब्रह्माचे विवर्त असल्याने त्याचा फार खोलात जाऊन अभ्यास या दर्शनात नाही.

याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती या भिन्न गोष्टी आहे असे मानते. प्रकृती (जागृतावस्थेतील विश्व) का आणि कशी निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न हे दर्शन करते. यामुळे जागृतावस्थेतील विश्वात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न या दर्शनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हेच या दर्शनाचे बलस्थान आहे. यामुळेच भारतवर्षात 'योग', 'आयुर्वेद', 'कुंडलिनी विद्या', 'शाक्तविद्या', 'शिवस्वरोदय शास्त्र' यासारख्या नित्य जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक विद्या या दर्शनातूनच निर्माण झाल्या. कदाचित यामुळेच हे दर्शन गेली कित्येक शतके भारतीय जनमानसावर आपला प्रभाव टिकवून ठेवत आहे.

सांख्य दर्शन काय आहे ते पुढील लेखापासून बघू.

No comments:

Post a Comment