Monday, December 4, 2023

सांख्य दर्शन - ३ : त्रिगुणात्मक प्रकृती

सत्कार्यवाद हा सांख्य दर्शनाचा पाया आहे हे आपण पाहीले. सत्कार्यवादानुसार कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी निमित्त कारण आणि उपादन कारण या दोन्हीची आवश्यकता असते. या विश्वाच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे आणि 'प्रकृती' हे उपादान कारण आहे असे हे दर्शन मानते. पुरुष हे प्रत्येकाचे चैतन्य आहे तर प्रकृती ही चेतनाहीन  आहे. 

जेव्हा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते तेव्हा तिच्यात उपादान कारणाचे काही गुणवैशिष्ट्य सापडू शकते असे सांख्य दर्शनकर्त्यांचे मत होते. मातीपासून मातीचा घट बनविला तर तो पाहून आपण तो मातीचा आहे, सोन्याचा नाही हे सांगू शकतो. कारण मातीचे काही गुण (उदा. रंग) त्या घटात आलेले असतात. तसेच ही सृष्टी बनताना प्रकृतीचे काही गुण सृष्टीत आले असणार असे त्या ऋषींनी मानले. 

जेव्हा त्यांनी सृष्टीचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना सृष्टीतील काही गोष्टी तेजस्वी (उदा. तारे) दिसल्या, काही गोष्टी गतिमान दिसल्या (उदा. ग्रह) तर काही गोष्टी एकाच ठिकाणी स्थिर आहेत, अंधाऱ्या आहेत असे दिसले. यावरून त्यांनी मूळ प्रकृतीतही ही तीन गुण असावेत असे मानले. या तीन गुणांना त्यांनी सत्व, रज आणि तम अशी नावे दिली. 

प्रकृतीमध्ये या तीन गुणांचे समत्व असते तेव्हा प्रकृती स्थिर असते. तिच्यात काहीही बदल होत नाहीत. परंतु काही कारणाने या तीन गुणांचे प्रमाण बदलते तेव्हा त्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टींची (Objects) निर्मिती होते. या विविध गोष्टी म्हणजे वस्तू अथवा ऊर्जा असू शकतात.  लाल, पिवळा आणि निळा या तीन मूलभूत रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग बनू शकतात तसेच काहीसे हे आहे. 

पण ही तीन गुणांच्या समत्वाने बनलेली प्रकृती अस्थिर का होते? प्रकृतीमध्ये असीम शक्यता (Potential) दडलेल्या आहेत. परंतु प्रकृती स्थिर राहिल्यास या असीम शक्यतांचे प्रकटीकरण होण्यास वाव राहात नाही. आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी प्रकृती सतत अस्वस्थ असते. म्हणून प्रकृती अस्थिर होऊन (सत्व, रज आणि तम) गुणांचे विविध प्रकारे मिश्रण करून पुरुषासमोर - चेतनेसमोर एक विश्व उभे करते. 

पुरुषांची चेतना ही अनुभवाशिवाय निष्क्रिय असते. चेतनेचे अंतिम उद्दिष्ट विविध अनुभव घेणे हेच असते. प्रकृती  स्थिर असेल तर चेतनेला म्हणजेच पुरुषाला विविध घेता अनुभव येणार नाहीत. आपण 'चेतना' आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला अनुभव घ्यावे लागतात. प्रकृती आणि पुरुष या दोघांच्याही अस्तित्वाला अर्थ येण्यासाठी त्यांनी एकत्र येणे आवश्यक असते. विश्वाची निर्मिती झाल्यावर पुरुष या विश्वातील अनुभव घेण्यात रमतो. त्यात तो प्रकृतीच्या जाळ्यात गुंतत जातो. 

सत्व, रज आणि तमोगुणांच्या सहाय्याने प्रकृती क्रमाक्रमाने विश्वाची निर्मिती कशी करते, त्यात पुरुष कसा गुंतत जातो आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे पुढील काही लेखांत पाहू. 

No comments:

Post a Comment