Saturday, November 17, 2018

मांडुक्य उपनिषद -3

मागील लेखात आपण जनक राजाची गोष्ट पहिली. राजाला 'पडलेले भयंकर स्वप्न खरे की उठल्यावर अनुभवास येणारे राजवैभव खरे' हा प्रश्न पडला होता. त्यावर अष्टावक्र ऋषींनी स्वप्नातला अनुभव आणि जागृतावस्थेत अनुभव या दोहोंना असत्य ठरविले. मात्र राजाला 'केवळ तूच सत्य' असल्याचे प्रतिपादन केले.
खरे तर आपण जागृतावस्थेत अनुभवांना सत्य समजतो तर स्वप्नावस्थेतील अनुभवांना असत्य समजतो. म्हणूनच प्रथम आपण भारतीय अध्यात्मानुसार 'सत्य' म्हणजे काय हे समजून घेऊ.
भारतीय अध्यात्मानुसार जे चिरकाल टिकते तेच सत्य असते. ज्याचे अस्तित्व अन्य गोष्टींवर अवलंबून असते (dependent existence) ते असत्य समजले जाते. उदाहरणार्थ सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा हार, सोन्याची अंगठी हे वेगवेगळे पदार्थ आहेत. परंतु तुम्ही सोनाराकडे ते गहाण ठेवायला गेल्यास त्याच्या दृष्टीने ते फक्त सोने आहे. सोन्याच्या पाटल्या वितळवून त्याचा हार बनविता येतो. अशावेळी पाटल्या नष्ट होऊन त्याचा हार होतो. परंतु 'सोने' तसेच राहते. सोने काढून  टाकल्यास हार राहणार नाही. परंतु हार काढून टाकल्यास (तो वितळविल्यास) सोने तसेच राहते. म्हणजेच हाराचे अस्तित्व सोन्यावर अवलंबून आहे, पण सोन्याचे अस्तित्व हारावर अवलंबून नाही (Absolute existence). या हाराच्या अवलंबित अस्तित्वाला (dependent existence) भारतीय अध्यात्माने 'असत्य' म्हटले आहे. या दृष्टीनेच जनकाला 'केवळ तूच सत्य' असे अष्टावक्र ऋषी सांगतात.
आपण आपल्या जागृतावस्थेमध्ये ज्याचा अनुभव घेऊ शकतो त्यालाच सत्य समजतो. म्हणूनच शंकराचार्यानीं त्याला व्यावहारिक सत्य म्हटले आहे तर अध्यात्मिक भाषेतील सत्याला शाश्वत सत्य अथवा अंतिम सत्य म्हटले आहे. शाश्वत सत्याची ही व्याख्या समोर ठेऊनच आपण मांडुक्य उपनिषदाचे विवेचन करणार आहोत.

Image result for तुर्यावस्थामाणसाच्या तीन अवस्था आपल्याला सहज ओळखता येतात.
१> जागृतावस्था
२>स्वप्नावस्था
३> गाढ निद्रा (सुषुप्ती)
मांडुक्य उपनिषदाच्या मते चौथी अवस्थाही अस्तित्वात आहे. त्याला मांडुक्य उपनिषद कोणतेही नाव न देता चौथी (चतुर्थ) अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चौथी असाच होतो. आज तुर्यावस्था हेच नाव प्रचलित आहे.

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.
या अवस्थांच्या मधल्याही अवस्था असू शकतात. जागृतावस्थेत आपले मन भरकटून दिवास्वप्ने बघू शकतो. किंवा जागृतावस्थेत डुलक्या येऊ लागतात.
या तीनही अवस्थांमागे त्या अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्थेसंबंधी पुढील लेखात आपण विस्ताराने विचार करणार आहोत.


No comments:

Post a Comment