Wednesday, November 21, 2018

मांडुक्य उपनिषद-५

आपण मागील एका लेखात शाश्वत सत्य म्हणजे काय पहिले. पहिल्या तीन अवस्थांचे अस्तित्व तुर्यावस्थेवर अवलंबून आहे, पण तुर्यावस्थेचे अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. म्हणूनच आपण पाहिलेल्या गोष्टीमध्ये अष्टावक्र ऋषी जनक राजाला 'तेही असत्य, हे ही असत्य. राजा केवळ तूच सत्य' असे म्हणाले.

Image result for universe imagesआपल्या विश्वात पसरलेला चैतन्याचा सागर आपल्या शरीर-मनाला प्रकाशित करतो, चैतन्य देतो. शरीर-मनाचे क्लेश, दु:ख यातना याचा परिणाम या चैतन्य सागरावर अथवा तुर्यावस्थेवर होत नाही. या तुर्यावस्थेची जाणीव झाली की शरीर/मनाचे क्लेश-यातना यापासून आपण आपल्याला अलिप्त ठेऊ शकतो.

जसे सोने ही त्या तीनही दागिन्यांची स्वाभाविक अवस्था आहे तसेच तुर्यावस्था अन्य तीनही अवस्थांची स्वाभाविक अवस्था आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकेच. ज्या क्षणी आपल्याला त्याची जाणीव होईल त्या क्षणी आपण दु:ख-यातना यापासून अलिप्त  होऊ.

तुर्यावस्थेचे वर्णन करण्याला भाषेच्या मर्यादा येतात. एखाद्या गोष्टीचा अथवा साधर्म्य असलेल्या गोष्टीचा अनुभव असलेल्यालाच भाषेद्वारे आपण काही सांगू शकतो. उदाहरणार्थ आयुष्यात कधीही गोड न खाल्लेल्याला आपण साखरेची चव कशी असते हे शब्दात सांगू शकत नाही. फार तर 'छान वाटते' एवढेच सांगू. मांडुक्य उपनिषद म्हणूनच तुर्यावस्थेचे वर्णन करताना 'नेति नेति' प्रकारच्या भाषेचा उपयोग करते. म्हणजे तूर्य  असेही नाही आणि तसेही नाही.

तुर्यावस्था 'अव्यावाहारिक' आहे असेही हे उपनिषद सांगते. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काहीही उपयोग नाही. सोन्याचे दागिने घालून मिरविता येते. पण निव्वळ सोन्याचा असा काही उपयोग नाही. तरीही दागिने सोन्याशिवाय घडविणे शक्य नाही. तुर्यावस्थेचे काहीसे असेच आहे.

 तुर्यावस्था  समजून घेण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार पुढील लेखात घेऊ. 

No comments:

Post a Comment