Friday, December 7, 2018

पंचमहाभूते

भारतीय अध्यात्मशास्त्र हे पाश्चात्य संकल्पनांनुसार केवळ तात्विक Philosophy नाही तर ऐहिक जीवनाचा पाया  आहे.

भारतीय अध्यात्मात पंचममहाभुतांची कल्पना मांडली आहे. ही कल्पना भारतीय अध्यात्माचा पाया आहे असे म्हणता येईल. ही कल्पना न्याय-वैशेषिक तत्वज्ञानातून आलेली आहे. न्याय-वैशेषिक तत्वज्ञान अत्यंत प्राचीन मानले जाते. प्रपंच या शब्दाचा अर्थच पंचमहाभूतांपासून बनलेले.

ही पंचमहाभूतांची कल्पना माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांभोवती गुंफलेली आहे.

आकाशतत्व हे पहिले पंचमहाभूत.आकाशाचा शब्दगुण  आहे.
वायूतत्व हे दुसरे पंचमहाभूत. वायूमध्ये शब्दगुण आहेच, पण स्पर्शगुणही आहे.
अग्नीतत्व हे तिसरे पंचमहाभूत. यात शब्द आणि स्पर्शगुण  आहेतच. पण यात रूपगुणही आहे.
जलतत्व हे चौथे पंचमहाभूत. त्यात  शब्दगुण , स्पर्शगुण आणि रूपगुण आहेतच. पण यात रसगुणही आहे.
पृथ्वीतत्व हे पाचवे पंचमहाभूत. यात शब्दगुण , स्पर्शगुण, रूपगुण आणि रसगुणही आहेतच, पण यात गंधगुण ही आहे.

हा जो क्रम मांडला आहे तो सूक्ष्म (तरल) अनुभूतीपासून आपण स्थूल अनुभूतीकडे आहे. पृथ्वीतत्त्व सर्वात स्थूल अनुभूती देणारे आहे तर आकाशतत्व सर्वात तरल अनुभूती देणारे आहे.

गांधत्व, द्रव्यत्व, उष्णत्व, चालावं आणि अप्रतिघात (प्रतिघात = अडथळा) हे अनुक्रमे पृथी, जल, अग्नी, वायू आणि आकाशतत्वाचे गुण  आहेत.
पंचमभूतांचा त्रिदोषांशीही संबंध आहे. आकाश हे प्रामुख्याने सत्वगुण दर्शक आहे, वायू रजोगुणदर्शक आहे, सत्व आणि रजोगुण हे अग्नितत्वात असतात. सत्व आणि तमोगुण जलतत्वात असतात. पृथ्वीतत्त्व प्रामुख्याने तमोगुणांनी भरलेले आहे.

वैशेषिक दर्शनानुसार परमेश्वराला जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा ही पंचमहाभूते पंचमहाभूते एकमेकांशी संलग्न झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली.

सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊन कुंडलिनी शास्त्र उगम पावले. यात सप्त चक्रे सांगितली आहेत. ही चक्रे या पंचमहाभूतांच्या क्रमानेच येतात. मूलाधार चक्र हे पहिले चक्र. ते पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि ते आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली असते. पृथ्वीतत्त्व स्थूलअनुभवांशी जोडलेले असल्याने साधना या चक्रापासून सुरु होते. त्यानंतर येणारे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. त्यानंतरचे मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायुतत्वाशी तर विशुद्ध चक्र आकाशतत्वाशी संबंधित आहे. या नंतरची दोन चक्रे 'आज्ञाचक्र आणि 'सहस्त्रार' अधिक सूक्ष्माकडे घेऊन जातात. कुंडलिनी साधना याच क्रमाने या चक्रांना जागृत करते. या साधनेत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करतो.

योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊनच विकसित झाले आहे. या दोन्ही शास्त्रातही पंचममहाभूतांना महत्व आहे.

पंचमहाभूते आयुर्वेदातील त्रिदोषांशी संबंधीत आहेत. कफदोष हा पृथ्वी आणि जल तत्व यांच्या संयोगाने बनतो. पित्तदोष हा अग्नीतत्वाचे रूप आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश या तत्वांनी बनतो.

अशाप्रकारे भारतीय अध्यात्मशास्त्र हे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.







No comments:

Post a Comment