Friday, June 7, 2019

अध्यात्माचे दोन प्रमुख मार्ग

सध्याच्या जीवनात अनेक ताण-तणावांना सामोरे जावे लागते. यावर मार्ग म्हणून कित्येकवेळा अध्यात्माचा मार्ग सांगितलं जातो. अध्यात्म म्हणजे भक्तिमार्ग अशी अनेकांची समजूत असते.  माझ्यासारख्या काही जणांना 'भक्ती' ही संकल्पना आत्मसात होत नाही. मग अशांनी काय करावे?
खरेतर अध्यात्माचे दोन स्पष्ट मार्ग आहेत. एक मार्ग खूप जणांना भावतो. तो आहे भक्तिमार्ग. यात सुरुवातीलाच देवावर अपार श्रद्धा असावी  लागते. या देवावरील श्रद्धेनेच अध्यात्मात प्रगती होत असते. देव हा सर्वशक्तीमान आहे, आपल्या सर्व समस्यांवर तोच उपाय करू शकेल ही श्रद्धा आहे. त्यामुळे जीवनातील समस्या सोडविण्याची जबाबदारी देवावर येते आणि त्या माणसाच्या डोक्यावरील भार हलका होतो. माणूस जीवनात आनंदी होतो. हा मार्ग सोपा वाटतो. पण यात एक धोका संभवतो. देवावरील विश्वास- देव अस्तित्वात आहे काय या वरील विश्वास एखाद्या कसोटीच्या क्षणी डळमळीत होऊ शकतो. अशा वेळी हा माणूस मानसिकदृष्ट्या कोसळून पडू शकतो. हा मार्ग जगातील बहुतेक सर्व धर्मांनी स्वीकारलेला दिसतो. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू धर्मातील अनेक शाखा यांनी हा मार्ग स्वीकारलेला दिसतो. सध्याच्या भारतीय मनावर प्रभाव असलेले 'सांख्य दर्शन' या मार्गावर विश्वास ठेवते. भगवतगीतेत कृष्ण अर्जुनाला 'माझ्यावर विश्वास ठेव' सांगतो तेव्हा हाच मार्ग दाखवितो.
पण काही माणसे अशीही असतात ज्यांना सुरुवातीलाच अंधपणे देवावर विश्वास ठेवणे जमत नाही. परंतु त्यांच्या मनात 'मी कोण' हा प्रश्न उपस्थित होतो. मग या 'मी कोण' याचा शोध सुरु होतो. ही शोध घेण्याची प्रक्रिया अध्यात्मातच मोडते. या प्रक्रियेच्या वेळी त्याला आपल्यातील आनंदाचा शोध लागतो. या प्रक्रियेत संशयाचा भाग नसतो. 'मी आहे' यात संशयाला जागाच नसते. मात्र माझ्या भोवती असणाऱ्या समस्या सोडविण्याची जबाबदारीही माझीच ठरते. त्यामुळे या काळात ताण-तणावांना सामोरे जावे लागू शकते. ही शोध घेण्याची प्रक्रिया पुढे गेली की आपणच 'ब्रह्म' असल्याचा पत्ता लागतो.  मग कितीही समस्या आल्या तरी तो माणूस आनंदात राहतो. हा 'मी कोण' चा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान होय. बौद्ध धर्म, हिंदू धर्मातील काही पंथ (उदा. अद्वैत वेदांत) हे या दुसऱ्या प्रकारच्या माणसांना मार्ग दाखवितात.
सध्याच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेकांना देवावर विश्वास ठेवणे जमत नाही. अशांनी 'मी कोण' याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा.
भक्तिमार्ग किंवा ध्यानमार्ग यात प्रगती झाली की दोन्ही मार्गात फारसा फरक नाही असे लक्षात येते. दोन्ही मार्ग शेवटच्या टप्प्यात एकत्र येतात. 

No comments:

Post a Comment