Thursday, June 6, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ७

अद्वैत वेदान्ताच्या प्रांतात आता आपण अधिक खोलात शिरत आहोत.
पुढील विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही वस्तूतील अंगभूत गुण आणि उधार (Acquired) गुण यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. जेव्हा एखादे पाण्याने भरलेले भांडे चुलीवर ठेवले आहे आणि त्यातील पाणी उकळत आहे तेव्हा त्या पाण्याचे वस्तुमान, तरलता इत्यादी गुणधर्म पाण्याचे अंगभूत गुणधर्म असतात. परंतु त्याची उष्णता आणि आकार हा गुणधर्म त्याने भांड्याकडून उधार घेतलेला असतो. भांड्याकडे त्याचे वस्तुमान आणि आकार हे अंगभूत गुणधर्म असतात, परंतु उष्णता हा गुणधर्म त्याने चुलीतील आगीकडून घेतलेला असतो. आगीचा उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे.
लोहार आगीतून तप्त लोखंडाचा गोळा काढतो तेव्हा त्या गोळ्याचे वस्तुमान, आकार हा गोळ्याचा अंगभूत गुणधर्म असतो, पण उष्णता, त्यातून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश हा तो ज्या आगीतून काढला आहे तिच्यातून त्याने उधार घेतलेला असतो. 
आपल्या आजूबाजूचे हे जे विश्व आहे त्याच्या गुणधर्मांपैकी अस्तित्व (सत) हा गुणधर्म ब्रह्माकडून घेतलेला आहे. जर ब्रह्मच नसेल (म्हणजे त्या वस्तूची जाणीव असणारे आपण नसू) तर त्या वस्तूच्या अस्तित्वाला अर्थच राहणार नाही. म्हणूनच अस्तित्व हा त्या वस्तूचा अंगभूत गुणधर्म नसून उधार गुणधर्म आहे. आपल्या पंचेंद्रियांनी (आणि मनाने) अस्तित्व हा गुणधर्म ब्रह्माच्या (साक्षी चैतन्याच्या) प्रतिबिंबापासून घेतला आहे आणि आपल्या पंचेंद्रियांना (आणि मनाला)जाणवणाऱ्या गोष्टींनी तो गुणधर्म आपल्या पंचेंद्रियांकडून घेतला आहे. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाने तो गुणधर्म साक्षी चैतन्याकडून घेतला आहे. साक्षी चैतन्याचा मात्र अस्तित्व हा अंगभूत गुणधर्म आहे. 
हे अंगभूत गुण आणि उधार गुण वेगळे ओळखणे हाच 'विवेक' आहे. आपला विवेक जागृत करणे हेच या ग्रंथाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 
विवेकाचे हे लक्षण लक्षात ठेऊन आपण पुढील लेखात 'माया' या संकल्पनेची ओळख करून घेऊ. 

No comments:

Post a Comment