Saturday, June 8, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ८

मागील काही लेखात आपण आपले खरे स्वरूप 'साक्षी चैतन्य' अथवा 'ब्रह्म' आहे हे पहिले. या लेखात आपण 'माया' या संकल्पनेसंबंधी अधिक जाणून घेऊ. 
ब्रह्म हे सत्-चित्-आनन्द या स्वरूपात व्यक्त होते.  'सत्' म्हणजे अस्तित्व हा ब्रह्माचा अथवा साक्षी चैतन्याचा अंगभूत गुणधर्म आहे हे आपण मागील लेखात पहिले. हा साक्षी चैतन्याचा अंगभूत गुणधर्म त्याच्या प्रतिबिंबात उधार (aquired) गुणधर्म म्हणून दिसतो. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाशी आपला अहंकार एकरूप होतो. अहंकार आपल्या शरीराच्या सर्व भागात पसरतो. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत 'सत्' हा उधार गुणधर्म आपल्या आसपासच्या विश्वात पसरतो. ' चित्' म्हणजे चैतन्य हा ही साक्षी चैतन्याचा अंगभूत गुण आहे हे ही आपण पहिले. 'आनंद' हा ही साक्षी चैतन्याचा अंगभूत गुण आहे. आनंद हा साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबातून आपल्या मनात सतत पाझरत असतो. मनावर मळभ आल्याने कधी कधी जाणवत नाही.
जर ब्रह्म (साक्षी चैतन्य)  सर्वकाही असेल तर हे शरीर, हे विश्व कोठून आले हा प्रश्न पडणे  सहाजिक आहे. ब्रह्म हे सत्-चित्-आनन्द या स्वरूपात व्यक्त होते. आपले शरीर, मन , विश्व हे 'माया' आहे असे वेदांत सांगते.
ब्रह्माची संकल्पना समजून घेण्यास सोपी आहे.  'माया' ही संकल्पना तेवढी सोपी नाही.
माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. ही शक्ती ब्रह्माला विश्वरूपात आपल्यापुढे ठेवते. देवाने हे विश्व निर्माण केले असे जगातील बहुसंख्य धर्म मानतात. पण अद्वैत वेदान्ताच्या मते देवाने (ब्रह्माने) हे विश्व निर्माण केलेले नाही, मायेच्या शक्तीमुळे ब्रह्मच विश्व रूपात आपल्यासमोर प्रकट झाले आहे. माया ही या ब्रह्माचीच शक्ती आहे. ती ब्रह्मापासून वेगळी नाही.
माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. पण खरेतर तिच्यात दोन शक्ती अंतर्भूत आहेत.
  1. विक्षेपशक्ती : माया आपले शरीर, मन, विश्व यांचा विक्षेप करते, Project करते.
  2. आवरणशक्ती : आपण (आणि विश्व) ब्रह्म असल्याच्या वस्तुस्थितीवर माया आवरण घालते.

अद्वैत वेदांतात रज्जू-सर्प उदाहरण नेहमी देतात. अंधाऱ्या कोपऱ्यात एक दोर (रज्जू) पडलेला आहे. पण अंधारामुळे आपल्याला तो 'साप' वाटतो. आपण घाबरतो. दोर असल्याच्या वस्तुस्थितीवर माया पांघरूण  घालते. ही झाली आवरणशक्ती. तो दोर आपल्याला सापासारखा वाटतो. ही झाली विक्षेपशक्ती.
यातही आवरणशक्ती संपूर्ण वस्तुस्थितीवर आवरण घालू शकत नाही. आपल्याला भासणाऱ्या सापाचा आकार, लांबी ही प्रत्यक्षातील दोराची लांबी आणि आकार असतो. मात्र तो साप, त्याचे विषारी दात वगैरे माया आपल्यापुढे ठेवते.
ज्यावेळी माया ब्रह्माला आपल्यापुढे विश्व स्वरूपात उभे करते त्यावेळी ब्रह्माला संपूर्ण  आवरण घालू शकत नाही. ब्रह्माचे  सत्-चित्-आनन्द हे स्वरूप त्यातून डोकावतच असते. या सत्-चित्-आनन्द स्वरूपाला माया 'रूप आणि नामाची' जोड देते. सत्-चित्-आनन्द-रूप-नाम अशा स्वरूपात असलेल्या विश्वातील सत्-चित्-आनन्द स्वरूप आपण ओळखू शकलो तर आपल्याला येथे या क्षणी मायेच्या आवरणाखाली दडलेल्या ब्रह्माचे दर्शन होईल.
अद्वैत वेदांतानुसार विक्षेप शक्ती आपल्या ब्रह्मज्ञानात अडथळा ठरत नाही तर आवरण शक्ती हीच अडथळा ठरते. विवेकानंद एकदा राजस्थानमधील वाळवंटातून प्रवास करीत होते. समोर मृगजळ दिसत होते. विवेकानंद त्या जागेपर्यंत पोचले. त्यांनी मागे वळून पहिले. आता मगाशी ते जेथे होते तेथे मुगजळ दिसत होते. पण तेथे पाणी नाही हे विवेकानंदाना आता माहित होते. त्यामुळे जरी मृगजळ भासले तरी ते त्यांना फसवू शकत नव्हते. म्हणूनच विक्षेप शक्ती हा ब्रह्मज्ञानात अडथळा नाही. परंतु आवरणशक्ती बरोबर विक्षेप शक्ती असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. एखादे भयाण स्वप्न, स्वप्न आहे हे न कळल्याने आपली बोबडी वळवू शकते. एकदा ब्रह्मावरचे आवरण निघाले, हे विश्व ब्रह्म आहे याची आपणास जाणीव झाली की हे विश्व आपल्या डोळ्यापुढे येऊनही आपण फसत नाही. आकाश निळे नाही तर काळे आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे ते निळे भासते हे आपण भौतिकशास्त्राच्या पुस्तकात शिकतो. पण हे ज्ञान होऊनही आकाश निळेच दिसते. तसेच ब्रह्मज्ञान होऊनही महात्म्यांना हे जग आपल्याला दिसते तसेच दिसते. पण आता मायेचे आवरण गाळून पडल्याने हे महात्मे फसत नाहीत. अर्थात त्यांचे या जगातील व्यवहार तसेच चालू राहातात.
विक्षेप शक्ती प्रथम सत्-चित्-आनन्द रूपी ब्रह्माच्या भोवती मनाची निर्मिती करते. मग शरीर, ज्ञानेंद्रिये आणि त्यानंतर हे विश्व आपल्यापुढे उभे करते. आवरणशक्तीमुळे आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरतो आणि आपले मन-शरीर यालाच आपण 'मी' मनू लागतो.
पुढील लेखात आपण 'मायेसंबंधी' अधिक विचार करू.

No comments:

Post a Comment