Tuesday, June 4, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ६

अद्वैत वेदान्ताच्या प्रांतात आपण 'मी कोण? को अहं ? ' या मूलभूत प्रश्नाचा शोध घेत आहोत.
आपण माणसाच्या जन्ममृत्यूच्या अवस्थांचे वर्णन बादल्यांच्या रूपकाने करू शकू. एका माळ्याच्या बागेत पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवलेल्या होत्या. काही बादल्या लहान, काही मोठ्या, काही नव्या, काही जीर्णशीर्ण, काही पांढऱ्या, काही काळ्या, काही लाल वगैरे. प्रत्येक बादलीत पाणी भरले होते. त्या पाण्यात आकाशात तळपणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब पडले होते. प्रत्येक बादलीला वाटायचे तिचे पाणी म्हणजे ती बादली, तिच्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब म्हणजेच तिचा आत्मा. नव्या बादलीला आपल्या सुंदर असण्याचा गर्व होता, जुन्या बादल्यांना आपण जीर्ण असल्याची खंत होती. काही बादल्यातील  पाणी ढवळले गेल्याने गाळ वर येऊन गढूळ झाले होते. त्यातील सूर्याचे प्रतिबिंब क्षीण झाले होते. या बादल्यांना आपण क्षीण झाल्याचे वाटल्याने खूप दु:ख होत असे. जीर्ण झालेली बादली कधीकधी गळू लागे. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बादलीत ओतत असे. जीर्ण बदलीला आपण मृत्यू पावल्याचे जाणवत असे. पण त्यातील पाणी दुसऱ्या बादलीत ओतल्यावर आणि त्या पाण्यात परत सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर पुनर्जन्माचा आनंद होत असे. बादल्यांना कळात नव्हते की आसपासच्या सर्व बादल्यांत एकाच सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. गढूळ पाण्याने प्रतिबिंब क्षीण झाले असले तरी सूर्य क्षीण झालेला नाही. आपली अवस्था त्या बादल्यांसारखीच झालेली असते.

आपण मागील लेखात पहिले की आपण म्हणजे स्थूल-सूक्ष्म शरीर नाही, आपण म्हणजे मन नाही तर आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत. हे साक्षी चैतन्य सतत आपल्या विश्वावर चैतन्याचा वर्षाव करीत असते. हे साक्षी चैतन्य मनातून परिवर्तित होते. मनातील अहंकार त्याला पकडून त्याच्याशी तादात्म्य पावतो. हा चैतन्याशी तादात्म्य पावलेला अहंकार आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत सर्व शरीरात आणि मनात पसरतो. यामुळे सर्व शरीर चैतन्यमय होते. मनात पडलेल्या या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेलाच आपण 'मी' मानू लागतो.

प्रतिमेचे एक वैशिष्ट्य असते. जर आरसा धुळीने भरलेला असेल तर प्रतिमा अस्पष्ट दिसते. आरसा वेडावाकडा असेल तर प्रतिमा वेडीवाकडी दिसते, फुटलेल्या आरशात प्रतिमा भंग पावलेली दिसते. जत्रेत असलेल्या 'हंसी घर' मध्ये ठेवलेल्या अंतर्वक्र, बहिर्वक्र आरशावर आपली विचित्र प्रतिमा पडलेली पाहून आपल्याला हसू येते. म्हणजे आपली प्रतिमा आपल्यापेक्षा आरसा कसा आहे हे दाखविते. पण या प्रतिमेला जर आपण खरी मानू लागलो तर अनावस्था प्रसंग येईल. दुर्दैवाने आपली हीच अवस्था झालेली असते. आपण, म्हणजे साक्षी चैतन्य कायम शुद्ध, निरंजन असते. पण मनाच्या /अहंकाराच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला त्यात प्रतिमा दिसते. आपण मग कधी दु:खी होतो तर कधी निराश तर कधी आनंदी.

आपले खरे स्वरूप म्हणजे 'सतत तळपणारे साक्षी चैतन्य ' हे आहे हे आपण पहिले. पण आपल्याला असा अनुभव येत नाही. सकाळी उठल्यावर झोप पूर्ण झाली असेल तर आपण चैतन्याने मुसमुसलेलो  असतो. संध्याकाळी दमून भागून आल्यावर हाच चैतन्याचा झरा आटलेला वाटतो. खरे तर आपले साक्षी चैतन्य तसेच तळपते असते, पण मनावर मळभ आल्याने आपल्याला हा चैतन्याचा स्रोत आटलेला भासतो.

यामुळेच आपण (अहंकारासोबतची आपली प्रतिमा) आणि साक्षी चैतन्य यातील संबंध म्हणजे एक भ्रांती असल्याचे हा ग्रंथ प्रतिपादन करतो. आपला चेहरा आणि आरशातील प्रतिबिंब यांचा संबंध भ्रांतीजनक आहे. ते प्रतिबिंब त्या आरशाची अवस्था सूचित करते, चेहऱ्याची नाही. आरसा नसेल तरी चेहरा तसाच असेल. म्हणजे चेहऱ्याचा आणि आरशातील प्रतिबिंबाचा काहीही संबंध नाही.

हा आपण (अहंकारासोबतची आपली प्रतिमा) आणि खरे आपण (साक्षी चैतन्य) यातील हा भ्रांतीजन्य संबंध तोडण्याचे काम वेदांत करते. केवळ यथार्थ ज्ञानाने हा संबंध तोडता येतो असे वेदांत सांगते. यालाच 'ज्ञानमार्ग' म्हणतात.

आपण म्हणजे हे साक्षी चैतन्य किंवा ब्रह्म आहोत हे आपण पहिले. पण मग आपले शरीर, आपल्या आसपासचे विश्व काय आहे ते पुढील लेखात पाहू. 

No comments:

Post a Comment