Tuesday, June 11, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग १०

मागील काही भागात आपण आपले खरे स्वरूप 'साक्षी चैतन्य' आहे हे पहिले. साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्या मनावर उमटते. त्यामुळे मनाचे दोन भाग होतात. एक भाग अहंकार तर दुसरा बाकी बुद्धी, चित्त इत्यादी. आपला अहंकार या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप होतो आणि शरीरभर पसरतो. म्हणूनच आपल्याला शरीर चैतन्यमय भासते. अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्याला चैतन्याचा मूळ स्रोत भासते. तिलाच आपण आपला आत्मा समजतो. खरे तर आपण साक्षी चैतन्य आहोत. हे साक्षी चैतन्य सर्व जीवांसाठी एकाच असल्याने 'सर्वांभूती एकच ब्रह्म' आहे असे अद्वैत वेदांत प्रतिपादन करते.
आपण स्वत: साक्षी चैतन्य असल्याने 'मुक्ती'ची संकल्पना अद्वैत वेदांतला मान्य नाही. आपण सदा सर्वकाळ मुक्तच असतो असे अद्वैत वेदांत मानते. स्वत:ला आपल्या अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा मानल्याने आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. हा एकरूप झालेला अहंकार आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत पसरत असल्याने शरीर हे आपल्याला आपली मर्यादा वाटते. मुक्ती मिळवायचीच असेल तर आपल्या स्वत:बद्दलच्या या भ्रामक कल्पनेपासून मुक्ती मिळवली पाहिजे. अद्वैत वेदांताची ही मुक्तीची संकल्पना 'अष्टावक्र गीता' या ग्रंथात अत्यंत चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे.
आपण आपल्या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप झालेल्या अहंकारालाच 'आपण स्वत:' असे मानत असतो.    हे अज्ञान दूर करण्यासाठी अद्वैत वेदांत 'ज्ञानमार्गाचा अवलंब करावा' असे सुचविते. म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला येत असलेला अनुभव नक्की कोणाला येत आहे, ज्ञानेंद्रियांना की त्यापाठच्या मनाला की त्यापाठच्या साक्षी चैतन्याला याबद्दल सजग राहावे. यातूनच आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होईल असे अद्वैत वेदांत सुचविते.
मायेची ओळख पटविण्यासाठी वेदांत हाच मार्ग सांगते. आपण आसपासच्या विश्वाची आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत माहिती मिळविताना सतत सजग राहून त्यातील सत्-चित-आनन्द स्वरूपाला वेगळे ओळखण्यास शिकलो तर मायेचे आवरण दूर होईल.
अर्थात हा मार्ग सोपा नाही. यासाठी अत्यंत स्थिर मनाची आवश्यकता आहे. माझ्या मते या अवस्थेपर्यंत येण्यासाठी कोठल्यातरी साधनेची आवश्यकता आहे. अद्वैत वेदांत अशा साधनेच्या विरोधात नाही. एखादा साधक पूर्वजन्मातील साधनेमुळे आधीच या अवस्थेपर्यंत आलेला असू शकतो. बाकी साधकांना साधनेची आवश्यकता भासते. कोठली साधना साधकाला अशा अवस्थेपर्यंत आणण्यास मदत करेल हे त्या त्या साधकाने पूर्वायुष्यात कोणती साधना केली आहे यावर अवलंबून असेल. ते ज्याने त्यानेच शोधून काढायचे आहे. मनावर बालपणी कोठल्याही 'संस्कारांचे लेप' लागले नसतील तर अंत:प्रेरणेने हा मार्ग लवकर सापडू शकतो. अन्यथा हे लेप खरवडून काढावे लागतात. म्हणूनच हा मार्ग शोधून काढण्याचा प्रवास खडतर आहे. बुद्धाला ते शोधण्यास सहा वर्षे खडतर तपश्चर्या करावी लागली. पण हा मार्ग सापडला की अध्यात्माचा प्रवास झपाट्याने आणि सुखकर होतो. आपल्यात अद्वैत वेदान्तातील 'ज्ञानमार्गाने' जाण्याची क्षमता निर्माण होते.
पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल. या लेखमालेतील विचारांचे थोडक्यात सार आपण त्या लेखात पाहू.

No comments:

Post a Comment