Monday, June 10, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ९

मागील लेखात आपण मायेच्या अंगी असेलेली 'विक्षेप शक्ती' आणि 'आवरण शक्ती' यांची माहिती घेतली. माया ही स्वत: ब्रह्माची शक्ती असून तिच्यात या दोन शक्ती अंतर्भूत असतात. यातील विक्षेप शक्तीमुळे फारसे बिघडत नाही, परंतु आवरण शक्तीमुळे ब्रह्माची ओळख पटविणे कठीण होते.

आपल्या सभोवालच्या विश्वाने त्याचे अस्तित्व ब्रह्माकडून घेतलेले आहे. जसे टेबलाचे अस्तित्व त्याने लाकडातून घेतलेले आहे, दागिन्यांचे अस्तित्व सोन्याकडून घेतलेले आहे तसेच हे आहे. जर टेबलातील लाकूड काढले तर टेबल उरणार नाही, दागिन्यांमधील सोने काढले तर दागिना उरणार नाही. तसेच आपले अस्तित्व काढून घेतले तर काहीच उरणार नाही. आपले सूक्ष्म शरीर ब्रह्माकडून अस्तित्व घेते, पण त्या बरोबर ते चैतन्यही घेते.

ब्रह्माचा 'सत्' (अस्तित्व) हा गुण सर्व विश्वात आपल्याला दिसतो. 'चित्' हा गुण आपल्याला सर्व प्राणिमात्रांच्या सूक्ष्मदेहात दिसतो. हे चैतन्य विश्वात सर्वत्र भरून राहिले आहे. परंतु आपल्या मनातून त्याचे पुनःप्रक्षेपण होते. हे पुनर्प्रक्षेपीत चैतन्य आपल्या शरीराच्या रोमारोमात पसरते. आपली ज्ञानेंद्रिये या चैतन्याने चैतन्यमय होतात. त्यामुळे आपले पुनः क्षेपित चैतन्य  'प्रमाता' (Knoewer) आहे हे आपल्याला जाणवते. आपल्याशिवाय अन्य गोष्टींचे आपल्याला ज्ञान होते, विश्व आपल्यासाठी 'प्रमेय' (Known) बनते. विश्व आपल्यासाठी ज्ञानेंद्रियांना जाणवणारे 'रूप आणि नाम' यांचे बनलेले दिसते. हे मायेने घातलेले 'रूप आणि नाम' रूपी आवरणामुळे आपल्याला सहजासहजी त्यातील अस्तित्वाचा गुण दिसत नाही, ब्रह्म दिसत नाही. साक्षी चैतन्याचे मनात पडलेले प्रतिबिंब 'प्रमाता' म्हणून जाणवत असल्याने त्यालाच आपण 'मी' समजतो आणि आपले मूळ स्वरूप जे ब्रह्म अथवा साक्षी चैतन्याचा आपल्याला सहजासहजी बोध होत नाही. म्हणजेच आपले सूक्ष्म शरीर आणि ब्रह्म यांच्यातील जो फरक आहे त्यावर माया आवरण टाकते.

यात एक महत्वाची गोष्ट  अशी आहे की ब्रह्माला माया कधीही झाकू शकत नाही, त्यावर आवरण घालू शकत नाही. ब्रह्म हे सतत तळपत असते. मात्र आपल्याला ब्रह्म आणि आपले मन यातील फरक कळत नाही. मायेच्या आवरणामुळे आपल्याला या विश्वात असलेल्या अस्तित्वरूपी ब्रह्म आपण सहज ओळखू शकत नाही.   काळोखात पडलेल्या दोराला आपण साप समजतो तेव्हा तो दोर झाकलेला नसतो. पण दोर आणि साप यातील फरक झाकलेला असतो. सापाची आकृती, लांबी इत्यादी त्या दोराचा गुणधर्म असते. मात्र सापाचे विष, त्याचा जिवंतपणा हे मायेने निर्माण केलेले असते.

पुढील लेखात आपण मायेचे आवरण दूर करून ब्रह्माला असे बघायचे हे पाहू. 

No comments:

Post a Comment