Sunday, August 25, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-१

श्रीकृष्ण हा खूप मोठा स्ट्रॅटेजिस्ट होता. 
कंस हा अति बलाढ्य मगध साम्राज्याचा राजा जरासंध याचा जावई. जरासंध याच्या दोन्ही मुलींची (आसित आणि प्रापित) लग्ने कंसाबरोबर झाली होती. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मगध हीच भारतभूमीची मध्यवर्ती सत्ता राहिली आहे. हिरण्यकश्यपू-प्रल्हाद-बळीराजा हे मगधेचेच सम्राट होते. जरासंध याने ८६ राजांना आपल्या कैदेत ठेऊन त्यांचे राज्य बळकाविले होते. उग्रसेन हे मथुरेचे राजे होते. ते धर्मात्मा म्हणूनच ओळखले जात जरासंध त्याच्या मुलींचे लग्न कंसाशी करण्याच्या निमित्ताने सैन्यासह मथुरेसी आला आणि त्याने उग्रसेनाना कैदेत टाकून मथुरेचे राज्य त्यांचा मुलगा आणि आपला जावई कंसाच्या हातात दिले. कंसाने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना कैदेत टाकले. त्यांची मुले तो मारून टाकी. अशा परिस्थितीत वसुदेवाने तुरुंगाच्या रक्षकांशी संधान बांधून पूर आलेली नदी ओलांडून कृष्णाला सुरक्षित स्थळी पोचविले. पण कंसाला हे कळताच त्याने कृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा वातावरणात परक्या घरी वाढलेल्या या मुलाला किती तणावपूर्वक परिस्थितीतून जावे लागले असेल? नंद आणि यशोदेच्या ठाम पाठिंब्यामुळेच हा मुलगा असा असामान्य निपजला. अगदी लहान वयातच योग्य नियोजन करून कंसासाख्या पाताळयंत्री माणसाला बेसावध ठेऊन मारणे हे सोपी गोष्ट नव्हे. तेव्हापासूनच त्याने आपले नियोजनकौशल्य दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी बंदिवासात ८६ राजांना कृष्णाने मुक्त केले. त्यामुळे या राजांचा पाठिंबा पुढील काळात कृष्णाला मिळाला. कंसाला मारल्यामुळे जरासंघ रागावला. जरासंघ भारतातील बलाढ्य साम्राज्याचा सम्राट होता. त्याचा सेनापती तशाच बलाढ्य सिंधू साम्राज्याचा राजा होता. सातत्याने यादव साम्राज्यावर हल्ले करून त्याचे लचके तोडण्यास जरासंघाने सुरुवात केली. बलाढ्य यवन साम्राज्याचा (वायव्य भारत) सम्राट कालयवन याला जरासंघाने मदतीला बोलाविले. आता एका बाजूने मगध सेना आणि दुसऱ्या बाजूला यवन सेना अशा कचाट्यात कृष्ण सापडला. एकाच वेळी या दोन्ही बलाढ्य शत्रूंशी सामना करणे छोट्या यादव राज्याला शक्यच नव्हते. अशावेळी कृष्णाचे नियोजन कौशल्य परत एकदा कामी आले. कृष्णाने यादव समाजाला धोक्यात टाकण्याऐवजी यादव राज्य दूर हलविण्याचे ठरवून केवळ आपल्या सैन्यासह या संकटाचा सामना करण्याचे ठरविले. हे राज्य हलवितानाही कृष्णाची दूरदृष्टी दिसली. आपले पेशाने गवळी असलेल्या यादवांचे राज्य दूधदुभत्याच्या गवताळ प्रदेशात न हलविता समुद्रकाठच्या उत्तम बंदर असलेल्या द्वारकेत हलविले. द्वारका ही खूप जुनी भरभराटीस आलेली नगरी होती (तिचे अवशेष सापडले आहेत). द्वारकेस गेल्यावर यादवांनी दुधाचा व्यवसाय केला नाही, तर समुद्रमार्गे पश्चिमी देशांशी व्यापार केला (याचे पुरावे सीरिया आदी देशांत सापडले आहेत. महाभारतात उल्लेख असलेल्या श्रीकृष्णाने वितरित केलेल्या तीन प्राण्याच्या मुद्रा तेथे सापडल्या आहेत). त्यामुळे द्वारका भरभराटीस आली (पूर्वीच्या भाषेत सोन्याची झाली).
यादवांना द्वारकेत पाठविल्यावर कृष्णाने कालयवनाशी सामना केला. इंद्राने वर दिलेला मुचकुंद राजा मथुरेजवळच्या टेकड्यांत झोपला असून त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल अशी अफवा कृष्णाने उठविली. कालयवानाच्या मोठ्या सेनेला आपण घाबरलो आहोत असे दाखवून कृष्णाने त्याला एकट्यालाच लढण्याचे आव्हान दिले. बलाढ्य कालयवानाने ते लगेच स्वीकारले. मग घाबरल्याचे दाखवीत कृष्ण या टेकड्यांच्या बाजूला पळाला. कालयवन त्याच्या मागे टेकड्यात शिरला. आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात कालयवन ठार झाला. मुचकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भासम झाला असे कृष्णाने उठविले. आपला राजा प्रत्यक्ष इंद्राच्या कोपाने भस्म झाल्याचे पाहून प्रचंड यवनसेना घाबरली आणि पळत सुटली.
पुढे महाभारत युद्धापूर्वी कृष्णाच्या नियोजनामुळे अनेक राजे पांडवांच्या बाजूने आले. तरीही कौरव सेना भारी होती. पण कृष्णाच्या मानसशास्त्रीय युद्ध खेळण्याच्या कौशल्याने ही सेने गलितगात्र झाली आणि शेवटी पांडवांचा विजय झाला.

No comments:

Post a Comment