Tuesday, August 27, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-४

पांडवांकडे  साम्राज्याचा काही भाग आला. त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ वसविली गेली. जरासंध, नरकासुर, शिशुपाल यासारखे प्रबळ विरोधक मारले गेले. पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न झाला. आता कृष्णाचे नियोजन यशस्वी ठरू लागले होते. पण कृष्णाला आपल्या जवळची माणसे त्यांच्या स्वभावामुळे गोत्यात आणू शकतील याचा अंदाज आला नाही. धर्मराज धर्माचे नियम पाळण्यात कोणतीही कसूर करीत नसे. परंतु 'मोह' या एका षड्रिपूपासून त्याची मुक्तता झाली नव्हती. राजसूय यज्ञामुळे कौरव दुखावले गेले होते. शकुनी हा हस्तिनापुरात ठाण मांडून बसला होता आणि आपल्या भाच्यांना मदत करीत होता. शकुनी हा पाताळयंत्री होता आणि मानसशास्त्रात प्रवीण होता. त्याने आपल्या बोलण्यात धर्मराजाला गुंतविले आणि द्यूत खेळण्याच्या भरास घातले. धर्मराजाने द्युतात आपल्या बायको भावांसह सर्वकाही पणास लावले आणि तो हरला. पांडवांच्या नशिबी तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास आला. कृष्णाने केलेले नियोजन एका क्षणात उधळले गेले.
कृष्ण उत्तम नियोजनकार होता. अनपेक्षित घटनेने आधीचे नियोजन उधळले गेले तरी नाउमेद न होता नव्या परिस्थितीत नव्याने नियोजन करणे त्याला अवगत होते. पण आता किमान चौदा वर्षे थांबणे आवश्यक होते. आता पांडवांना परत राज्य मिळणे शक्य नाही हे त्याने ओळखले. कौरव-पांडव युद्धाशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आले. आता कृष्णाने या युद्धाच्या तयारीसाठी नियोजनाला सुरुवात  केली. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने करायचे या भावनेने तो कामाला लागला. भारतवर्षातील राज्ये आपल्या बाजूला कशी राहतील हे कृष्णाने या काळात पाहिले. धर्म-द्रौपदी यांना एकांतात पाहिल्याने अर्जुनाला एक वर्ष द्रौपदीचा सहवास मिळणार नव्हता. या काळात येथील अनेक अवैदिक समूहांना पांडवांशी जोडून घेतले गेले. नागा कन्या उलुपी हिच्यापासून अर्जुनाला मुलगा झाला. मणिपूरची चित्रांगदा हिच्याशीही अर्जुनाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला बभ्रुवाहन हा मुलगा झाला. भीमाने हिमाचल प्रदेशमधील हिडिंबा हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून घटोत्कच हा मुलगा झाला.  पांडवांच्या या पराक्रमी मुलांनी महाभारत युद्धात अतुलनीय कामगिरी केली. या चौदा वर्षांच्या काळात कृष्णाने हस्तिनापूरशी आपले संबंध चांगले ठेवले होते. राजनीतीत सर्वांशी संबंध चांगले ठेवणे गरजेचे असते हे कृष्ण जाणून होता.
पांडव वनवास-अज्ञातवास संपवून परतल्यावर त्यांना परत राज्य मिळावे म्हणून कृष्णाने शिष्टाई केली. पण ती  अयशस्वी झाली. युद्ध होणार हे निश्चित झाले. कृष्ण कौरव आणि पांडव या दोघांशीही चांगले संबंध ठेऊन असल्याने कौरव आणि पांडव या दोघांनाही त्याच्या मदतीची अपेक्षा होती.
आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्णाच्या मनात आपल्या यादव राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य होते. त्यामुळे कृष्णाने या युद्धात कोणा एकाचा पक्ष न घेता दोन्ही पक्षांना न्याय दिला. आपले सैन्य कौरवांच्या मदतीला दिले, तर आपण स्वतः: पांडवांच्या बरोबर राहिला. आता युद्धात कोणाचाही विजय झाला तरी यादव राज्याचे हित सांभाळणे कृष्णाला शक्य होणार होते. हा कृष्णाच्या मुत्सद्देगिरीचा हा कळस असावा. अर्थात यामुळे यादव राज्याचे हित सांभाळले गेले नाहीच, तर यादव राज्याचा विनाश झाला. या संबंधी आपण नंतर पाहू. 

No comments:

Post a Comment