Tuesday, August 27, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-३

कृष्णाने आपल्या आजोबांना आणि आई-वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या, आपल्या भावंडांना जन्मात:च ठार मारणाऱ्या आपल्या जुलुमी मामाचा, कंसाचा वध लहानपणीच केला. पण त्यामुळे कंसाचा सासरा आणि मगधेच्या बलाढ्य साम्राज्याचा सम्राट जरासंधाचा त्याने रोष ओढवून घेतला. जरासंध आता कृष्ण आणि यादव राज्याचा विनाश करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत होता. त्यामुळे कृष्णाला गोकुळ सोडून  द्वारकेला प्रस्थान करावे लागले हे आपण पहिल्या भागात पहिले. आपल्या छोट्याशा यादव राज्याला वाचविण्यासाठी कृष्ण एका बलाढ्य राज्याच्या शोधात होता. त्याला वनवासातील पांडव भेटले. आता पुढील खेळी तो पांडवांच्या सहाय्याने करणार होता. पांडवांना कुरु साम्राज्याचा एक भाग मिळाला. कृष्णाच्या नियोजनाला आता फळे येऊ लागली होती. पांडवांना मिळालेला भाग खांडववाणाचे निबीड अरण्य होता. तेथे लढाऊ नागा समाजाची वस्ती होती आणि ते पांडवांचे वर्चस्व मान्य करण्याची शक्यता नव्हती. कृष्णाने हा प्रश्न सोडविण्यासाठी आपले कौशल्य वापरले. कृष्णाची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी असावी. या यंत्रणेच्या साहाय्यानेच त्याने वनवासातील पांडवांचा शोध घेतला असावा. आता खांडववनातील नागा राजा तक्षक आपल्या सैन्यासह उत्तरेस गेला असल्याची बातमी कृष्णाने मिळविली आणि त्याचा फायदा घेऊन खांडववन जाळून टाकले. त्यातील सर्व नागा कुटुंबांचा बायकामुलांसह कृष्णाने संहार केला. फक्त मयासूर या स्थापत्यअभियंत्याला अभय दिले आणि त्याच्याकडून मयसभा हा राजवाडा पांडवांसाठी बांधून घेतला. नागांचा राजा तक्षक याला ही बातमी समजताच तो सुडाने पेटून उठला. त्यानंतर नागांबरोबर पांडवांचा संघर्ष चार पिढ्या चालू होता. त्यात अर्जुनाचा नातू परीक्षित याला आपले प्राण द्यावे लागले. शेवटी परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने चालविलेले सर्पसत्र (नागांचा समूळ विनाश) आस्तिकऋषींच्या  मध्यस्तीने थांबले तेव्हाच हा संघर्ष थांबला. (आस्तिक ऋषींची आई नागा होती).
पांडवांसाठी 'इंद्रप्रस्थ' ही राजधानी तयार झाल्याबरोबर कृष्णाने पुढील खेळीला सुरुवात केली. बलाढ्य कुरु साम्राज्याचा एक भागच पांडवांना मिळाला होता. साम्राज्याची मूळ राजधानी हस्तिनापूर कौरवांकडेच होती. त्यामुळे बलाढ्य कुरु साम्राज्याचा वारसा आपल्याकडेच आला आहे हे अन्य राजांना दाखविणे पांडवांना भाग होते. यासाठी कृष्णाने धर्मराजाला राजसूय यज्ञ करण्यास सांगितले. 'राजसूय यज्ञ'' आणि 'अश्वमेध यज्ञ' हे जगज्जेते राजेच करू शकत होते. पांडवांनी हा यज्ञ करणे म्हणजे त्यांचे वर्चस्व सर्व राजांनी मान्य करण्यासारखे होते. हे कौरवांसाठी लाजिरवाणे होते. परंतु जवळचे नातेसंबंधी असल्याने आणि हस्तिनापूरचे राज्य अजूनही भीष्म-द्रोण-विदुर यांच्या सल्ल्याने चालत असल्याने कौरव या यज्ञात अनिच्छेनेच सहभागी झाले.
मात्र राजसूय यज्ञ करण्याआधी या यज्ञाला विरोध करू शकतील अशा राजांचा पाडाव करणे आवश्यक होते. कृष्णाने भीमाला आणि अर्जुनाला घेऊन मगध देशाची राजधानी गिरिव्रज गाठली. तेथे भीमाने मल्लयुद्धात जरासंधाचा वध  केला आणि त्याच्या मुलाला मगधाच्या गादीवर बसविले. जरासंधाने बंदी बनविलेल्या अनेक राजांना कृष्णाने सोडले. याच सुमारास कृष्णाने दूरवर आसामपर्यंत जाऊन नरकासुराचा वध  केला. या दोन शक्तिमान राजांचा पाडाव केल्यावरच राजसूय यज्ञ केला गेला.
राजसूय  यज्ञाचा उपयोग कृष्णाने आपल्या राजकारणासाठी पुरेपूर करून घेतला. कौरवाना यावेळी हलक्या दर्जाची कामे देऊन त्यांची जागा दाखविण्यात आली. आपल्या वैभवाचे प्रदर्शन पांडवानी या यज्ञात पुरेपूर केले. मयासुराने बांधलेली अद्भुत मयसभा सर्वानाच चकित करून गेली. मयसभेत जेथे पाणी दिसत होते तेथे जमीन होती तर जमीन दिसत होती तेथे पाणी होते. यामुळे दुर्योधन गोंधळून गेला. तेव्हा द्रौपदीला हसू आवरले नाही. हा अपमान समजून दुर्योधन रागावला.
राजसूय यज्ञात अग्रपूजा करण्याचा मान भीष्माने कृष्णाला देण्यास सुचविले. परंतु चेदी नरेश शिशुपाल याला हे रुचले नाही. कृष्ण हा कोणत्याही देशाचा राजा नसल्याने अथवा ब्राह्मण नसल्याने त्याला हा मान मिळू शकत नसल्याचे शिशुपालाचे म्हणणे होते. त्याने यज्ञमंडपातच अग्रपूजेचा मान असलेल्या कृष्णाला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. यज्ञमंडपात कोणीही सैन्य अथवा शस्त्रे न्यायाची नाहीत, कोणालाही मारायचे नाही  असा दंडक होता. तसेच यज्ञमंडपात कोणी भांडण करू नये असाही संकेत होता. शिशुपालाने संकेत मोडल्याने कृष्णाने यज्ञमंडपातच शिशुपालाला ठार मारले. शिशुपालाचा संतापी स्वभाव कृष्णाला माहित होता. शिशुपाल कृष्णाचा द्वेष करतो (रुक्मिणी स्वयंवरात कृष्णाने रुक्मिणीला पळविले होते. तिचा शिशुपालाबरोबर विवाह व्हावा अशी तिच्या भावाची-रुक्मिची इच्छा होती) याची कृष्णाला कल्पना होती. त्यामुळे शिशुपालाला मारण्याची संधी मिळावी म्हणून कृष्णाने कदाचित भीष्मांकरवी हा डाव मुद्दाम खेळाला असावा.
यज्ञात कोणालाही मारू नये हा नियम कृष्णाने मोडला. नंतरच्या काळात असे तेव्हा घालून दिलेले अनेक दंडक कृष्णाने मोडलेले आढळतात. कृष्णाचे आजोबा उग्रसेन राजे हे धर्मात्मा समजले जात. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उठवून जरासंध आणि कंसाने त्यांना आणि कृष्णाच्या आई-वडिलांना कैदेत टाकले हे कृष्णाने लहानवयातच पहिले होते. 'कपटी लोकांबरोबर अति चांगुलपणा करणे हे सर्वनाशाला आमंत्रण देते' हा धडा कृष्णाने तेव्हाच गिरविला असावा. म्हणूनच सर्व दंडकांना वळसा घालून आपल्याला हवे तेच करण्याचा कृष्णाचा स्वभाव आपल्याला महाभारतात सतत जाणवत राहतो. 

No comments:

Post a Comment