Thursday, August 29, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-५

महायुद्धात यादवसेने कौरवांच्या बाजूने लढणार आणि कृष्ण पांडवांच्या हे स्पष्ट झाले. यादवसेनेचा सेनापती कृष्णाचा मोठा भाऊ बलराम होता. बलराम अत्यंत शूर होता. तसेच त्याला कौरवांची बाजू पटत होती. कृष्णाने 'हे युद्ध अधर्माने लढले जाणार आहे. त्यामुळे बलरामाने त्यापासून दूर राहावे' असे त्याला पटविले. त्यामुळे बलराम युद्धाच्या काळात हिमालयात तपश्चर्येला निघून गेला. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाने हे एक उदाहरण आहे.
युद्धाला सुरुवात होण्याआधी दोन्ही बाजूंकडून निरनिराळ्या राजांना आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न चालू होते. अशा प्रयत्नात काहीवेळा कृष्ण कमी पडल्याचे जाणवते. मद्रदेशाचा राजा शल्य हा माद्रीचा भाऊ - नकुल, सहादेवांचा मामा होता. त्यामुळे तो पांडवांच्या बाजूने युद्धात सहभागी होणार होता. परंतु वाटेतच त्याला गाठून कौरवांच्याकडून त्याचे आदरातिथ्य करण्यात आले. प्रथम हे आदरातिथ्य पांडवांच्या बाजूने आहे असा त्याचा समज झाला. नंतर वस्तुस्थिती कळल्यावर अतिथी परंपरेचा मान राखून त्याने कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यास मान्यता दिली.
महाभारत युद्धाला सुरुवात झाली आणि कृष्णाचे युद्धकौशल्य पणाला लागले. या युद्धात भारतवर्षातील बहुसंख्य राज्ये सामील झाली होती. कौरवांची सेना संख्येने मोठी होती. तसेच कौरवांकडे भीष्म, द्रोण, कर्ण यासारखे युद्धात निपुण असलेले बुजुर्ग योद्धे होते. अर्जुन हा पांडवांचा प्रमुख योद्धा  होता. त्याचे सारथ्य कृष्णाने पत्करले. सारथ्य ही सोपी गोष्ट नव्हती. युद्धभूमीत योग्य त्या ठिकाणी आपला रथ सांभाळून नेणे हे कौशल्याचेच काम होते. कौरवांकडे शल्यराजा  हा असाच उत्कृष्ट सारथी होता. त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले होते. युद्धभूमीत झालेल्या रक्ताच्या चिखलात तरीही कर्णाचा रथ रुतला. यावरूनच सारथ्याचे महत्व लक्षात येते. युद्धप्रसंगी एक बाण अर्जुनाच्या डोक्याचा वेध घेऊन आला. सावध असलेल्या कृष्णाने रथाच्या घोड्यांना त्याक्षणी खाली बसविले आणि अर्जुन वाचला. यावरून कृष्ण किती कसलेला सारथी होता हे लक्षात येते. सारथ्याला आणखीही एका गोष्टीमुळे महत्व आहे. युद्धाच्या धामधुमीच्या आणि अत्यंत तणावाच्या वातावरणात तो एकटाच त्या योध्याबरोबर असतो. योध्याचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, प्रसंगी त्याला लढण्यास प्रोत्साहित करणे हे काम सारथीच करू शकतो. कृष्ण हे काम करण्यास किती योग्य होता हे आपल्याला युद्धाच्या प्रारंभीच त्याने अर्जुनाला धीर दिला त्यावरून लक्षात येते. याउलट शल्य हा मद्रदेशाचा राजा होता. तो उत्तम सारथ्य करू शके. म्हणून कर्णाने युद्ध करण्यास तयार होताना 'शल्य हाच सारथी असावा' अशी अट घातली. शल्य हा मद्रदेशासारख्या मोठ्या देशाचा राजा असल्याने त्याला सारथ्य करणे अपमानास्पद वाटले. परंतु त्याचा दुर्योधनापुढे नाईलाज झाला. 'मी काहीही बोललो तरी मला कोणी अडवता काम नये' अशा अटीवरच त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले. युद्धाच्यावेळी तो सातत्याने कर्णाबद्दल अपशब्द उच्चारित होता, कर्णाचा 'सूतपुत्र' म्हणून अपमान करीत होता. यामुळे कर्णाची एकाग्रता भंग पावली. कदाचित स्वतः:शल्याचीही एकाग्रता भंग पावली असावी. त्यामुळेच कर्णाचा रथ रक्ताच्या चिखलात फसला.
युद्धाला प्रत्यक्ष तोंड लागण्याआधीच पांडवांच्या सेनापतीचा - अर्जुनाचा धीर खचला. यावेळी कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि त्याचे मन खंबीर केले. यावरून कृष्ण हा उत्तम युद्धमानसशास्त्रज्ञ होता हे ही लक्षात येते. कृष्णाने सांगितलेली ही भगवद्गीता आद्य शंकराचार्यांनी वेदांताच्या तीन आधार ग्रंथांपैकी - प्रस्थान त्रयींपैकी- एक म्हणून स्वीकारली यातच गीतेचे महत्व दिसून येते. आजही गीता हाच हिंदू धर्माचा आधारग्रंथ म्हणून मानण्यात येतो. कृष्ण हा ;ब्रह्मज्ञानी' माणूस होता, 'मुक्तावस्थेला पोचलेला' होता हे भागवद्गीतेवरून सहज लक्षात येते. (मी अद्वैत वेदांताचा पुरस्कर्ता आहे. आपण सर्वच 'ब्रह्म' आहोत. परंतु ब्रह्मज्ञान झालेले  थोडेच आहेत . त्यामुळे कृष्णाला 'देवत्व' न देता कृष्ण हा ब्रह्मज्ञानी माणूस होता असे मी मानतो).
आधी उल्लेख केल्याप्रमाणे कृष्णाला बालवयात आलेल्या अनुभवांमुळे 'वाईट लोकांशी वागताना अति चांगुलपणा दाखविला तर ते विनाशाला आमंत्रण असते ' याची जाणीव खूप आधीच झाली होती. त्यामुळे तथाकथित धर्माच्या नियमांना न जुमानता कृष्णाने या युद्धात पांडवांना सल्ले दिले.
कौरवांचे सेनापती भीष्म यांनी सर्व पांडवांचा दुसऱ्या दिवशी नाश  करण्याच्या प्रतिज्ञेची माहिती कृष्णाला त्याच्या गुप्तहेरांकरवी मिळताच तो द्रौपदीसह  त्यांना भेटला आणि भीष्मांना ठार करण्याचे रहस्य त्यांच्याकडूनच त्याने जाणून घेतले. भीष्म हे रणधुरंदर होते, तसेच त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ही भीष्मांकडून रहस्य जाणून घेण्याची कथा आहे ती खूपच रोचक आहे, पण विस्तारभयास्तव येथे देत नाही.
द्रोणाचार्यांचे आपल्या एकुलत्या एक मुलावर -अश्वत्थामावर खूप प्रेम होते. द्रोणाचार्य त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे पांडवांना भारी पडत आहेत असे दिसताच त्यांना 'अश्वत्थामा युद्धात मेल्याचे' खोटे  सांगून ते विचलित होताच मारण्याचे कृष्णाने ठरविले. नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्माला ही खोटी बातमी द्रोणाचार्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले. द्रोणाचार्य धर्माने सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतील याची कृष्णाला खात्री होती. पण खोटे बोलण्यास धर्म तयार नव्हता. तेव्हा अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून 'अश्वत्थामा मेल्याचे' द्रोणाचार्यांना सांगण्यास धर्माला सांगितले गेले. तरीही धर्म शेवटी 'नरो व कुंजरो वा' (माणूस अथवा हत्ती) असे सांगणार होता. पण कृष्णाने समयसूचकता वापरून यावेळी शंख जोरात वाजविला. त्यामुळे हा वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यांना ऐकू गेला नाही. धर्मराजाच्या नेहमी खरे बोलण्याच्या प्रतिज्ञेला बाधा आली नाही.
महाभारत युद्धाचा शेवट अत्यंत भीषण झाला. युद्धात पांडवांचे सर्व वंशज मारले गेले. यामुळे द्रौपदी दु:खी झाली.अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची आज्ञा व्यासांनी दिली. पण अश्वत्थामाला ते परत घेण्याची कला ज्ञात नव्हती. यावेळी अभिमन्यूची बायको उत्तरा गर्भवती होती. तिच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वाळविल्याने तिचा पुत्र जन्मात:च मृतवत निपजला. कृष्णाने त्याला जिवंत केले (औषधी वनस्पतीचे ज्ञान होते?). परंतु तो शरीर आणि  मनाने दुबळा राहिला.  त्याला नागांच्या तक्षक राजाने मारले. परंतु परीक्षिताने पांडवांचा वंश पुढे चालू ठेवला. त्याचा मुलगा जनमेजय शूर निपजला.
युद्ध संपल्यावर कृष्ण आणि कौरवांच्या बाजूने लढणारी (युद्धात वाचलेली) यादव सेना द्वारकेला परतली. कृष्णाने आपले आयुष्य यादव राज्यासाठी समर्पित केले होते. पण त्याच्या डोळ्यासमोरच यादव राज्याचा अंत त्याला पाहावा लागला. पुढील भागात त्यासंबंधी. पुढील भाग या लेखमालेतील शेवटचा भाग असेल.

No comments:

Post a Comment