Sunday, August 25, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-२

कृष्णाने यादवांना द्वारकेला आणले आणि कालयवन याच्याबरोबर झालेल्या युद्धात योग्य रणनीती वापरून त्याला ठार मारले हे आपण मागील भागात पहिले. मात्र कृष्णाला याच वेळी यादव राज्यावर येऊ घातलेल्या संकटाची जाणीव झाली असावी. कंसाला मारल्याने त्याचा सासरा आणि अति बलाढ्य मगध साम्राज्याचा सम्राट जरासंध कृष्णावर रागावलेला होता. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जाऊन बसलेल्या कृष्णापर्यंत पोचण्याचा जरासंध प्रयत्न करणार हे स्पष्ट होते. मगध साम्राज्य आणि द्वारका यामध्ये कुरु साम्राज्य होते. त्याचा राजा धृतराष्ट्र होता. भीष्म, द्रोण इत्यादींच्या सल्ल्याने कुरु साम्राज्याचा राज्यकारभार चालू होता. त्यामुळे यादव राज्याला लगेच धोका नव्हता. परंतु धृतराष्ट्राच्या मुलांबद्दल काही सांगता येत नव्हते. मगध साम्राज्याने अनेक बलशाली राज्यांना आपले मित्र केले होते. हस्तिनापूर (येथे अजून दुर्योधनाच्या हातात राज्य आले नव्हते, पण येण्याची शक्यता होती), गांधार (शकुनीचा भाऊ राज्यकारभार पाहत होता), चेदी (शिशुपाल), विदर्भ (रुक्मि), सिंधूदेश (जयद्रथ), आसाम (नरकासुर), पौंड्र (वासुदेव), विराटाचे राज्य (सत्ता सेनापती किचकाच्या हातात) इत्यादी राज्यांची भक्कम फळी मगध साम्राज्याने उभी केली होती. यादव राज्य त्यासमोर कस्पटासमान होते. श्रीकृष्णाला कोणा भक्कम राज्याच्या आधाराची गरज होती आणि तो त्याच्या शोधात होता.
अशा वेळी द्रौपदी स्वयंवरात कृष्णाने प्रथम पांडवांना पाहिले. तेथे तो आगंतुक पाहुणा म्हणून आला होता. त्याला स्वयंवराचे आमंत्रण नव्हते (तो पुरु वंशाचा नव्हता तर यदु वंशाचा होता म्हणून ?). हे पांडवच आहेत हे त्याने ओळखले.  पांडवांचा उपयोग आपल्याला आपले राज्य राखण्यासाठी होऊ शकेल हे कृष्णाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. तो पांडवांचा शोध घेत त्यांच्या घरी पोचला. 'आणलेली भिक्षा सर्व भावंडे वाटून घ्या' असा आदेश कुंती देत असतानाच तो तेथे पोचला. या आदेशाचे पालन कसे करायचे हे त्यानेच पांडवांना समजावून दिले. कुंतीला आपल्या नातेसंबंधांची जाणीव त्याने करून दिली आणि कुंतीचा विश्वास संपादन केला. सर्व पांडवांचे मनही त्याने जिंकले आणि अर्जुनाचा जवळचा मित्र झाला. पांडवांचा मित्र या नात्याने त्याने कौरवांशी मैत्री केली आणि भीष्म, द्रोण इत्यादींचा विश्वास प्राप्त केला. कृष्णाच्याच सल्ल्याने पांडवांनी राज्याची मागणी केली. कौरव त्यासाठी तयार नव्हते. शेवटी भीष्मांनी राज्याची फाळणी करून निबीड खांडववन पांडवांना दिले. ते जाळून कृष्णाने तेथे इंद्रप्रस्थ ही राजधानी पांडवांसाठी उभारली. तेथे नागा जमातीची वस्ती होती. नागा हे स्वतंत्र बाण्याचे लोक होते. त्यांनी पांडवांना सुखासुखी राज्य करून दिले नसते. नागा आणि कुरु /यदु वंशीय यांचा संघर्ष पूर्वीपासूनच चालू होता. म्हणून कृष्णाने तेथील नागांना मारण्याचा सल्ला अर्जुनाला दिला. वाडे बांधण्याची कला नागांना अवगत होती. नागांचा स्थापत्यशास्त्रद्न्य मयासूर याला कृष्णाने अभय दिले आणि पांडवांसाठी राजमहाल बांधण्याची आज्ञा दिली. हीच ती प्रसिद्ध मयसभा. महाभारत घडविण्यात या मयसभेचा महत्वाचा वाटा आहे. 

No comments:

Post a Comment