Thursday, August 29, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-६

महाभारत युद्ध संपले. भारतवर्षातील आजवरचे सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून हे युद्ध ओळखले जाते. महाभारत हा कुरु वंशाच्या सात पिढ्यांचा .(शंतनू-विचित्रवीर्य-पंडू-अर्जुन-अभिमन्यू-परीक्षित-जनमेजय ) इतिहास आहे. हा व्यासांच्या डोळ्यासमोर घडलेला आहे. व्यास हे शंतनूचे सावत्र पुत्र आणि धृतराष्ट्र-पांडू-विदुर यांचे जैविक पिता. यामुळे या लेखनाला वैधता प्राप्त होते. आपण या लेखमालेत त्यातील कृष्णाचा सहभाग फक्त पाहत आहोत. कृष्णाची धडपड ज्या यादव राज्यासाठी चालली होती त्याचे महाभारत युद्धानंतर काय झाले हे आपण या  लेखात पाहू. या लेखमालेतील हा शेवटचा लेख आहे.
भारतवर्षातील जवळपास सर्व  राज्ये यात सहभागी झाली होती. ब्रह्मास्त्राचा रणभूमीवर उपयोग कदाचित प्रथमच (आणि शेवटचा) झाला असावा. येथील सुमारे ८०% प्रौढ पुरुष जनसंख्या या युद्धात मृत्युमुखी पडली. या युद्धानंतर शेकडो वर्षे भारत अंधारयुगात चाचपडत होता. काहीजण या युद्धासाठी कृष्णाला जबाबदार ठरवितात. पण मला तसे वाटत नाही. त्यावेळची भारताची भूराजकीय परिस्थिती, येथील अनेक सामर्थ्यसंपन्न राष्ट्रे आणि त्यांच्यातील वैर पाहता महाभारत झाले नसते तरी एखादे असेच महाभयंकर युद्ध लवकरच झाले असते. कृष्ण हा मुक्त पुरुष होता. त्यामुळे त्याने या युद्धात अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मानवजातीला पुढील कित्येक हजार वर्षे मार्गदर्शक ठरेल असे गीतेचे ज्ञान दिले. महाभारत लिहिणारे व्यासमुनी, त्यांचा शिष्य वैशंपायन आणि वैशंपायनाला सर्पसत्राच्या समारोपप्रसंगी महाभारत सांगण्याची विनंती करणारा अर्जुनाचा पणतू जनमेजय याच्यामुळे ही महाभारत कथा आपल्यापुढे आली.
महाभारत युद्धात कृष्ण स्वत: काही वीरांसह  पांडवांच्या बाजूने  उभा राहिला तर यादव सेना कौरवांच्या बाजूने लढली हे आपण पहिले. खरेतर यामुळे युद्धात कोणत्याही बाजूचा विजय झाला तरी यादव राज्याला धोका नव्हता. परंतु कृष्णाचा हा अंदाज चुकला. युद्धात सैन्य जीवावर उदार होऊन लढत असते. त्यामुळे ज्याच्या बाजूने लढते त्या बाजूची निष्ठा असल्याशिवाय असे जीवावर उदार होणे शक्य नसते. यादव सैन्याची निष्ठा कृष्णाच्या अशा दुहेरी धोरणामुळे विभागली गेली.
सात्यकी हा कृष्णाचा जीवाभावाचा मित्र होता. कृष्णाला सोडून कोठेही जाण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे तो युद्धात पांडवांबरोबर होता. युद्धाआधी कृष्ण हस्तिनापूर येथे मध्यस्ती करण्यास गेला तेव्हाही कृष्ण फक्त सात्यकीला सोबत घेऊन गेला होता. यादव सेनेमध्ये अनेक शूर वीर होते. कृतवर्मा हा असाच एक 'अतिरथी' होता. युद्धात त्याने युधिष्ठिर, भीमसेन, धृष्टद्युम्न अशा अनेक वीरांना पराजित केले होते. त्यामुळे तो दुर्योधनाच्या अत्यंत विश्वासातील होता. युद्धाच्या दरम्यान अश्वत्थामाचा तो जवळचा मित्र बनला होता. त्यामुळे अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्यांना अधर्माने मारल्याचा त्याला राग आला होता. अश्वत्थाम्याचे पितृवियोगाचे दु:ख त्याने जवळून अनुभवले होते. युद्ध संपल्यावर अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला तेव्हा कृतवर्मा अश्वत्थामासोबत होता.
कृष्ण आणि यादव सैन्य द्वारकेत परतल्यावर नित्य व्यवहार सुरु झाले. द्वारका परदेशांशी व्यापार करून समृद्ध होत होती. अचानक आलेल्या समृद्धीमुळे काही दोष यादवांच्यात शिरले होते. गोकुळात दह्या-दुधाचा आस्वाद घेत रमलेले यादव आता दारूच्या पाशात अडकले होते. असेच एकदा दारूच्या नशेत असलेल्या कृतवर्मा आणि सात्यकी यांच्यामध्ये 'द्रोणाचार्य यांना ज्या प्रकारे मारण्यात आले त्यावरून' बाचाबाची झाली. यावेळी कृतवर्माने कृष्णाची निर्भत्सना केली. ते सात्यकीला आवडले नाही. त्याने कृतवर्माला ठार मारले. दारूने उन्मत्त झालेले यादव दिसेल ते शस्त्र घेऊन या मारामारीत सामील झाले. त्यांचे आपापसात घनघोर युद्ध झाले. या आपापसातील युद्धालाच 'यादवी' असे नाव आहे. या यादवीत कृष्णाच्या समोरच यादवराज्य नाश पावले.
आता आपले जीवितकार्य पूर्ण झाले हे ओळखून कृष्ण प्रभास नदीच्या काठी ध्यानास बसले असता त्यांचे पाऊल एका पारध्याला हरिणाच्या तोंडासारखे वाटले. त्याने बाण सोडला. तो श्रीकृष्णाला लागून श्रीकृष्णाने प्राण सोडला. एक महान तत्ववेत्ता, युगपुरुष जगाला गीतेसारखे अनमोल रत्न देऊन काळाच्या पडद्याआड गेला.
चक्रधर श्रीकृष्णाला वंदन करून ही लेखमाला येथेच संपवितो. 

No comments:

Post a Comment